Konkan Railway News:रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांचा विचार करायला सुरवात केली असून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर आता जनरल डब्यात करण्याचा सपाटा भारतीय रेल्वेने लावला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अजून जून एका गाडीच्या जनरल डब्यांत वाढ करून डब्यांची संरचना बदलण्यात आली आहे.
१६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, स्लीपर – १२, जनरल – ०२, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०४, स्लीपर – १२, जनरल – ०३, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसीच्या एका कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
Konkan Railway: येत्या आठवड्यात दक्षिण रेल्वे आणि मध्य रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक नसला तरी या या दोन्ही विभागातून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकांवर त्याचा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी – भुसावळ विभागात लूपलाइनच्या विस्ताराचे काम हाती गेले असल्याने खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२७४१ वास्को दा गामा – पाटणा एक्सप्रेस आणि दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०११४० मडगाव जं. – नागपूर विशेष या दोन्ही गाड्यांचा वेग मध्य रेल्वे विभागात १ तास ३० मिनिटे नियमित केला जाणार असल्याने त्या उशिराने धावणार आहेत.
याच बरोबर दक्षिण रेल्वेच्या अंगमली यार्डमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे. या कारणास्तव दक्षिण रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
या कामा दरम्यान कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या खालील तीन गाड्यांचा वेग दक्षिण रेल्वे विभागादरम्यान नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या उशिराने धावणार आहेत.
1)दिनांक ३१ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस २ तास १० मिनिटे.
2)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०९०९ कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेस २ तास २० मिनिटे
3)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) १ तास ५० मिनिटे
Konkan Railway: काल दुपारी बोरिवली स्थानकात शुभारंभ करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेसचे कोकणातील स्थानकांत जंगी स्वागत करण्यात आले. ही गाडी उशिरा सुटल्याने ती कोकणातील स्थानकांवर उशिरा पोहचली असली तरी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजर राहून या गाडीचे स्वागत केले.
वीर स्थानक
वीर स्थानक 1
चिपळूण स्थानक
चिपळूण स्थानक 1चिपळूण स्थानक 2
रत्नागिरी स्थानक
रत्नागिरी स्थानक 1रत्नागिरी स्थानक 2
सावंतवाडी स्थानक
सावंतवाडी स्थानक 1
सावंतवाडी स्थानक 2
वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेस मध्यरात्री अडीच वाजता सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीचे सावंतवाडीत जंगी स्वागत केले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, सल्लागार महेश परुळेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, राज पवार आदी उपस्थित होते.
रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कारवाई चालू केली असून प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हे काम केले नाही. त्यामुळे या महामार्गावर अपघात होऊन होऊ लागले. २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले. त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले. त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार करीत आहेत.
महामार्गाचे निकृष्ठ काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी तक्रारी केली होती. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकी करणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहिन काम केले.
सिंधुदुर्ग: माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना (उबाठा) आमदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसे पोहोचू शकतात? असा प्रश्न विचारून मालवणला जे घडले ते जाणूनबुजून राजकीय फायद्यासाठी घडवून आणण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
काल रात्री उशिरा त्यांनी एक्स X वर पोस्ट करून हे आरोप केले आहेत.
”आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो???
जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.” असे ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
आधीच येथील वातावरण तापलेले असताना निलेश राणे यांच्या या पोस्टमुळे नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सावंतवाडी: नुकतेच रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी कायमस्वरुपी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, सिंधुदुर्ग,आणि कणकवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे, मुंबई पासून कोकणापर्यंत सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी या गाडी साठी प्रयत्न केले होते.परंतु सध्या या गाडीचे वेळापत्रक बघता ही गाडी काही अंशी गैरसोयीची असेल असे काही रेल्वे अभ्यासकांना वाटते. त्यामुळे सदर रेल्वेचे वेळापत्रक नियमित वेळापत्रकात (सध्या पावसाळी वेळापत्रक लागू आहे)बदल करावा असे अभ्यासक आणि प्रवासी सांगत आहेत.
ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यासाठी संघटनेने पत्र व्यवहार आणि हजारो मेल प्रशासनाला केलेले होते. संघटनेने ही गाडी बोरिवली – वसई – सावंतवाडी अशी सुरू करावी या साठी प्रयत्न केले होते. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस हे अपूर्ण असल्याकारणाने सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नसल्याने ही गाडी मडगाव पर्यंत धावणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते.आणि अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकात देखील उभी राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी प्रयत्नशील आहे आणि सदरचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे संपर्क प्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली.
ही गाडी सुरू होण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल, खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण साहेब, आमदार सुनील राणे, माजी खासदार श्री विनायक राऊत यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले असून या गाडीचा लाभ वसई, भिवंडी, बोरिवली येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना नक्की होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्म कडेच्या बाजूने देखील सर्व माहिती समजणार आहे. ही माहिती इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये ३ सेकंदांच्या अंतराने दिसेल.
उपनगरी रेल्वेच्या १२ डब्यांच्या गाडीच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला मिळून एकूण आठ डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डने दिलेली माहिती आता प्लॅटफॉर्मवर बसूनदेखील मिळविणे शक्य होणार आहे.
सध्या डब्यांच्या आतमध्ये आणि मोटरमन केबिनच्या दर्शनी भागावर लोकांना प्रवासाबाबत माहिती मिळत होती. पण, प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या प्रवाशांना ती सहजरीत्या समजत नव्हती. यासाठी आता रेल्वेने डब्यांच्या बाहेरील बाजूसदेखील माहिती प्रदर्शित करणार आहे. सध्या एका गाडीवर असा डिस्प्ले बसविण्यात आला असून, येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या आणखीन १० गाड्यांवर असे डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत.
पॅनोरमा डिस्प्लेची वैशिष्ट्ये काय ?
१) फुल एचडी टीएफटी (पातळ फिल्म ट्रान्झिस्टर) डिस्प्ले.
२) डिस्प्ले याडफ काचेने संरक्षित.
३) माहिती ५ मीटर अंतरापर्यंत स्पष्ट दिसण्यासाठी कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केली जाणार आहे.
४) नट सैल झाल्यास डिस्प्ले पडू नये म्हणून सर्व नट स्लिप्ट पिनने लॉक केले आहेत.
मुंबई: वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे वाहतूक मंत्री आश्विनी वैष्णव यांनी हिरवा बावटा दाखवून मार्गस्थ केले. बोरिवली स्थानकावर या एक्सप्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम दुपारी साडे तीन वाजता पार पडला.
पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या या ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक्सप्रेसला हिरवा बावटा दाखवला. यावेळी बोरिवली रेल्वे स्थानकावर भाजप नेते पियुष गोएल, प्रविण दरेकर यांच्यासह रेल्वे अधिकारी व राजकीय नेते उपस्थित होते.
बोरिवली – मडगाव ट्रेन क्रमांक ०९१६७ ला बावटा दाखवल्यानंतर ट्रेनने मडगावच्या दिशेने प्रस्थान केले.
वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस कोकणात आर्थिक विकास वाढवेल तसेच, या ट्रेनचा स्थानिक व्यापार आणि व्यवसायांना फायदा होणार आहे. तसेच, सिंधू एक्स्प्रेसद्वारे प्रवास सुलभ झाल्याने या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.वांद्रे टर्मिनस ते मडगाव दर बुधवार आणि शुक्रवार तर, मडगाव ते वांद्रे टर्मिनस दर मंगळवार आणि गुरुवार ही ट्रेन धावणार आहे. प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरुन यासाठी बुकींग करता येणार आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम मार्गावर वांद्रे – मडगाव एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवादरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनमुळे प्रवासाचा आणखी एक सोयीस्कर आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे.
सिंधुदुर्ग: मालवण राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या ९ महिन्यात कोसळला. तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांची अशी अवहेलना खुद्द महाराष्ट्रातच होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? महाराजांची यापेक्षा मरणोत्तर अपमान आणि अवहेलना ती कोणती?
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यादृष्टीने कारवाई केली गेली पाहिजे होती. कोणी जबाबदार नेत्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे होती. मात्र घडले विपरीत…. कोणत्याही गोष्टीतील राजकीय फायदा बघणाऱ्या राजकारण्यांनी या घटनेचेही राजकारण सुरु केले. काल ठाकरे गट आणि राणे समर्थक एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर आल्यावर खूप मोठा राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते एकमेकांशी भिडले. या राड्याचे विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेत. हे विडिओ बघताना ही घटना यूपी बिहारमध्ये घडत असल्याचे भासत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि राडा हे आता जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव खराब होत आहे. याला जबाबदार आहेत येथील राजकारणी. पण कालचा विषय हा राजकारणाचा नव्हताच. तरी यांनी ती संधी वाया जाऊ दिली नाही. अगदी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला. पुतळा कोसळल्यानंतर महाराज येथून गायबच झाले जणू. मुख्य विषय बाजूलाच राहिला आणि त्याची जागा राजकारणाने घेतली. संपूर्ण देशात ज्या महाराजांची आराधना केली जाते त्यांचा पुतळा आपल्या घरात पडला ही शरमेची गोष्ट असताना येथील राजकारणी ताठ मानेने राडे करत आहेत? महाराजांचा पुतळा कोसळला हे कमी होते की काय म्हणून राजकारण्यांनी राजकोट किल्ल्याची तोडफोडही केली. त्यापेक्षा दुर्देव म्हणायचे तर त्यांना समर्थन देणारे आपलेच लोक आहेत.
आज सर्व सोशल नेटवर्किंग मीडियावर कालचा राडा कसा होता? कोणाला कशी धमकी दिली? कोणाची किती फा… ली? यासारख्या पोस्ट्स दिसत आहेत. अरे ज्यांच्यासाठी हे सर्व चालले ते छत्रपती शिवाजी महाराज कुठे गायब झालेत? पुतळा बांधणारा तो कंत्राटदार फरार झाला आहे याबाबत कोणाला काही सोयरसुतक आहे का?
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे महाराजांचा १०० फुटी येथे लवकरच उभारला जाणार असे विधान केले. एक शिवप्रेमी म्हणून मला वाटते ईथे १०० फुटी सोडाच तर १ फुटी पुतळा सुद्धा नका उभारू. जेथे महाराजांची अशी अवहेलना केली जाते तिथे आमच्या दैवताचा पुतळा नकोच.
Konkan Railway :वांद्रे मडगाव एक्सप्रेस ही नवीन गाडी कोकण रेल्वे मार्गावर पुढच्या आठवड्यापासून धावणार आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावरून खास कोकणी जनतेसाठी सोडण्यात आलेल्या या गाडीचे कोकणकरांनी स्वागत केले असले तरी या गाडीच्या विचित्र वेळापत्रकामुळे तसेच अनेक प्रमुख स्थानकांना थांब्यांच्या यादीतून वगळण्याने काही प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे. या गाडीला प्रत्येक तालुक्यात किमान १ ते २ थांबे देण्यात यावेत यासाठी रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल द्वारे एक निवेदन दिले आहे.
निवेदन:
बोरिवली – वसई – सावंतवाडी नियमित गाडी सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रवासी संघटनांनी गेली १० ते १५ वर्षे सतत प्रयत्न केले. एक प्रकारचा लढा उभारून हा निवडणुकीचा मुद्दा केला. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरच १०११५/१०११६ मडगाव वांद्रे मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सुरु होत आहे.
आजच रेल्वे बोर्डाचे पत्र सर्वांना मिळाले आहे. त्यात नमूद केल्यानुसार ही गाडी केवळ बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थीवी आणि करमळीला थांबणार आहे. ही मोठी निराशा असून बहुतांश कोकणवासीयांचा हिरमोड झाला आहे.
पेण, माणगाव, खेड, संगमेश्वर, लांजा (विलवडे), राजापूर, वैभववाडी अशा ७ तालुक्यांत तर कुडाळसारख्या महत्वाच्या स्थानकावर तसेच नागोठणे, सापे-वामने, करंजाडी, सावर्डा, आरवली रोड, आडवली, झाराप, मडुरे यांसारख्या इतर स्थानकांतही वाढीव गाड्यांची आवश्यकता असताना थांबे दिलेले नाहीत.
१०११५/१०११६ वांद्रे मडगाव एक्सप्रेसचा सरासरी वेग ताशी ३८ ते ४० किमीच्या दरम्यान आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि ५०१०३/५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा वेगही तेवढाच आहे. परंतु दिवा सावंतवाडीला पनवेल व सावंतवाडी दरम्यान ३०, दिवा रत्नागिरीला पनवेल व रत्नागिरी दरम्यान २६ थांबे आहेत तर नव्याने सुरु होत असणाऱ्या गाडीला केवळ ७ थांबे आहेत. एवढ्या संथ गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न दिल्यामुळे बहुतांश महाराष्ट्राला या गाडीचा फायदा होणार नाही. कोणतीही मागणी न करता गोव्याला थिवी आणि करमळी या केवळ १५ किलोमीटरवर असणाऱ्या दोन्ही स्थानकांवर थांबणारी गाडी दिली. परंतु, तीच गाडी महाराष्ट्रात पनवेल-रोहा ७५ किमी, वीर-चिपळूण ९८ किमी, चिपळूण-रत्नागिरी ७५ किमी, रत्नागिरी ते कणकवली १११ किमी अशा मोठ्या अंतरावर कुठेही थांबणार नाही. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पश्चिम रेल्वेवरून नियमित गाडी सुरु होत असल्यामुळे त्या गाडीला मध्य रेल्वेमार्गावरून कोकण रेल्वेवर सुरु झालेली पहिली गाडी दिवा सावंतवाडी प्रमाणे जास्तीत जास्त थांबे मिळणे आवश्यक आहे. तरी, १०११५/१०११६ मडगाव वांद्रे एक्सप्रेस या गाडीला अंधेरी, पेण, नागोठणे, माणगाव, सापे-वामने, करंजाडी, दिवाणखवटी, खेड, अंजनी, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, कुडाळ, झाराप आणि मडूरे येथे वाढीव थांबे देण्यात यावेत ही विनंती. प्रत्येक तालुक्यात किमान एक किंवा दोन थांबे मिळाल्याशिवाय या गाडीचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही व गाडी लोकप्रिय होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
एकदा गाडी सुरु झाल्यानंतर नव्याने थांबे मिळवणे किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे गाडी सुरु होण्याआधीच रेल्वे बोर्डला सुधारित प्रस्ताव पाठवून वाढीव थांबे मंजूर करण्यात यावेत, ही विनंती.