मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय ३८, रा. डिकवल-बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २७) रात्री आठच्यासुमारास घडला.त्याने गावात खळबळ उडाली. याबाबतची वर्दी त्यांच्या भावाने पोलिस (Police) ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिकवलकर मुंबई येथे पत्नी व मोठ्या मुलासह राहात होते. त्यांचा लहान मुलगा डिकवल येथे मूळ घरी राहात होता.
मुंबईहून आपल्या लहान मुलाला नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिकवल येथे आले होते. कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
सावंतवाडी :सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामाविषयी आणि इतर मागण्यासांठी एक निवेदन सादर केले. सुप्रिया सुळे या सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती.
या निवेदनात एक्स्प्रेस गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा द्यावा तसेच कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या गाड्या तातडीने सुरु कराव्यात, या मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. याचसोबत सावंतवाडी स्टेशनचे फेज १ चे काम पुर्ण होत आले असले तरी फेज २ चे काम अद्याप अपूर्ण आहे. यासाठी आणखी ८.१४ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून हा निधी मंजूर करणे, सावंतवाडी ते वसई आणि सावंतवाडी ते पुणे या मार्गावर दोन नव्या गाड्या सुरु कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी संघटनेने दिलेले निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले.
यावेळी सावंतवाडी टर्मिनस संघटनेचे मिहिर मठकर, विहांग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर तर राष्ट्रवादीच्या सौ.अर्चना घारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी त्वरित या मागण्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना या मागण्यांचा प्राधान्याने सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा असे अशी विनंती केली आहे.
सिंधुदुर्ग : वंचितांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी “उमेद फौंडेशन,सिंधुदुर्ग” कडून “एक पणती वंचितांच्या दारी “या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फाउंडेशनने विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यासाठी उमेद फाउंडेशनच्या वतीने या वंचित घटकांना पणत्या,आकाश कंदील, दिवाळी फराळ, देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात सहभागी होऊन मोलाचा हातभार लावावा.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ/ पणत्या/ आकाशकंदील असे दिवाळी उपयुक्त साहित्य द्यावयाचे असल्यास आपण उमेद फाउंडेशनकडे दि. 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोच करावे.तसेच फराळासाठी आर्थिक मदत द्यावयाची असल्यास ऑनलाईन स्वरूपात/ रोख स्वरूपात उमेद फाउंडेशनकडे खालील अकाउंटवरती जमा करता येईल.यासाठी आर्थिक मदत पाठवण्याकरिता बँक अकाउंट माहिती
A/C name =UMED FOUNDATION, A/C Number- 636701000890 ,बँकेचे नाव -ICICI BANK IFSC Code =ICIC0006367 Google pay/Phone pay – 7972395675
तसेच वस्तू स्वरूपात मदत देणाऱ्यांनी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ देणार असल्यास देतांना त्याचे व्यवस्थित पॅकेट करून द्यावेत.तसेच आर्थिक मदत एका कुटुंबासाठी फराळ – 300 रू. , दोन कुटुंबासाठी फराळ – 600 रू.या टप्प्यात रक्कम स्वीकारली येईल. आपण दिलेल्या 300 रु. मदतीतून खालील प्रकारे एका गरजू कुटूंबासाठी दिवाळी किट बनविण्यात येईल. अंघोळीचा मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील, पणत्या, लाडू (250 ग्रॅम), चिवडा (500 ग्रॅम) चकली (250 ग्रॅम), शंकरपाळी ( 250 ग्रॅम ) इ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे तसेच जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि आश्रम व गरजू कुटुंबे यांचा समावेश असेल.वंचितांच्या जीवनात थोडासा प्रकाश आणून त्यांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे असे मत राजेंद्र एस.पाटील- प्रमुख, सामाजिक दिवाळी मोहिम,सिंधुदुर्ग 8888650077 यांनी व्यक्त केले आहे.
रायगड: महाड येथील चवदार तळे व आजूबाजूचा परिसर आता सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार असल्याचे महाड नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.
महाडमध्ये २० मार्च १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरोधात सामाजिक न्यायासाठी लढा दिला होता. या सत्याग्रहानंतर चवदार तळे जगाच्या नकाशावर आले. महाड नगरपालिकेने चवदार तळ्याचा इतिहास जपण्यासाठी १९८७ मध्ये तळ्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले होते.
चवदार तळ्याच्या भिंती नव्याने बांधण्यात आल्या असून तळ्याच्या काठी सभागृह बांधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता, त्या पायऱ्यांचे देखील सुशोभीकरण केले आहे. तळ्याच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे व दोन्ही बाजूला उद्याने विकसित करण्यात आली आहेत. चवदार तळ्यावर वर्षभर असंख्य अनुयायी व पर्यटक भेट देतात. शिवाय दरवर्षी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन, मनुस्मृतिदिन, डॉ. आंबेडकर जयंती व पुण्यतिथी यानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.
तळ्याच्या सुशोभीकरणांमध्ये आणखीन भर पडावी, या दृष्टीने महाड नगरपालिकेने आता चवदार तळे व परिसरामध्ये सजावटीचे दिवे व आकर्षक दिव्यांचे खांब उभारण्यास सुरुवात केली आहे. तळ्याच्या चारी बाजूने तसेच दोन्ही उद्यानांमध्ये ११० खांब उभारण्यात आले आहेत. खांबांवर नक्षीदार असे सजावटीचे दिवे लावले जाणार आहेत. या दिव्यांमुळे चवदार तळ्याचा परिसर आणखीनच उठून दिसेल. महानगरपालिकेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हे दिवे बसवण्यास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ सापडण्याचे प्रकार वाढत आहेत. कणकवली शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृतरित्या गांजा बाळगल्या प्रकरणी निलेश ज्ञानदेव साटम आणि चेतन रामू जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. गांजासह ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी, रोख रक्कम आणि मोबाईल पोलिसांनी संशयित आरोपींकडून जप्त केला आहे. कणकवली शहरात केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कणकवली शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पकडला. हॉटेल अप्पर डेक समोर सर्व्हिस रोडवर एलसीबीने ही कारवाई केली.
या गुन्ह्यात निलेश ज्ञानदेव साटम (४४, रा. जानवली गावठणवाडी), आणि चेतन रामू जाधव (२० वर्षे, रा. कलमठ कुंभारवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल रोख, १८० रुपये आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे. ही कारवाई एसपी अग्रवाल यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद घाग, पीएसआय आर बी शेळके, हवालदार राजू जामसंडेकर ,प्रमोद काळसेकर, अनुप खंडे, बसत्याव डिसोझा, आशिष जामदार, प्रकाश कदम, किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, पालकर, जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली. फिर्याद हवालदार प्रमोद काळसेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पीएसआय शरद देठे करत आहेत.
कुडाळ:साळगाव- वरची धुरीवाडी येथील अभिषेक सत्यवान धुरी यांच्या मालकीच्या गोपाळ गंगा दूध डेअरीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत आतील मशिनरी व दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्य साहित्य . मिळून सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली. अभिषेक धुरी यांनी तीन वर्षांपूर्वी साळगाव- वरची धुरीवाडी येथे ‘गोपाळ गंगा’ नावाने दूध डेअरी सुरू केली. २४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यातील मशिनरीच्या भागातून धूर येऊन आग लागली असल्याचे तेथीलच संजय धुरी यांनी पाहिले. त्यांनी लागलीच अभिषेक धुरी यांना त्याबाबत कल्पना दिली. त्यानंतर मालक धुरी यांच्यासह संजय धुरी, शशी धुरी, प्रसाद परुळेकर, जेरॉन फर्नांडिस व अन्य ग्रामस्थांनी धाव घेत डेअरीमध्ये असलेल्या पाण्याचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सतत पाण्याचा मारा करून ही आग मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत आतील किमती मशिनरी व साठवून ठेपलेले दुग्धजन्य पदार्थ जळून खाक झाले. यामध्ये सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाल्याचे कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत धुरी यांनी म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी दसरा सण असल्याने डेअरी बंद होती. रात्रीच्या वेळी घटना घडली. शेजारच्या व्यक्तींनी डेअरीला आग लागली असल्याचे सांगितले. या घटनेत २ हजार ७०० किलोचा तुपाचा साठा, मिल्क टेस्टिंग मशीन, मिल्क पॅकिंग मशीन, पॅकेजिंग मटेरिअल, होमोनायझर, मिल्क पाऊच पॅकिंग मशीन, मशीनच्या मोटर्स आदी सुमारे ३५ लाखांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता धुरी यांनी व्यक्त केली. कुडाळचे पोलीस हवालदार सचिन गवस व अमोल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास हवालदार ममता जाधव करीत आहेत.
मुंबई : आठवड्याभराच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात व्यापार सत्राचा शेवट गोड झाला आहे. गुरुवारी मार्केटमधील मोठी पडझडीनंतर शुक्रवारी देशांतर्गत बाजारात हिरवळ परतली आणि सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, त्यामुळे गुंतवणूकदारांनी अनेक दिवसांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्राचा शेवट सकारात्मक केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा NSE निफ्टी १९० अंक किंवा १.०१% वाढीसह १९,०४७.२५ अंकांवर स्थिरावला, तर मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ६३४.६५ अंक किंवा १.०१% उसळी घेत ६३,७८२.८० अंकांवर बंद झाला.
स्मॉलकॅप शेअर्सनी वाढीव आघाडी घेतली. तर बँक निफ्टी निर्देशांक ५०१.८५ अंकांनी म्हणजे १.१९ टक्क्यांनी ४२,७८२ अंकावर चढला. बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांनी मागील दिवसातील मोठ्या घसरणीनंतर जोरदार खरेदी केली.
क्षेत्रीय निर्देशकांची स्थिती
आज बाजारात सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. निफ्टी बँक ५०१ अंकांच्या किंवा १.१९ टक्क्यांच्या वाढीसह ४२,७८२ अंकांवर बंद झाला. तर एफएमसीजी समभागातील खरेदीमुळे निफ्टी आयटी १.२४%, निफ्टी ऑटो १.३५%, निफ्टी एफएमसीजी ०.८९% वाढीसह बंद झाला.
आजचे टॉप गेनर्स
टाटा स्टील, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, SBI, सन फार्मा आणि एनटीपीसी सेन्सेक्समध्ये हिरवळ राहिली, तर हिंदाल्को आणि बजाज ऑटो हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तसेच रिलायन्सने आज दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या जोरावर १ टक्के वाढ नोंदवली. सकाळच्या सत्रात केवळ एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचयूएलचे शेअर्स तोट्याने उघडले.
सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली असून मेटल, रियल्टी, मीडिया आणि ऑटो शेअर्स १% हून अधिक वाढले, तर बँक निर्देशांक ०.६% आणि आयटी निर्देशांक ०.८% चढले. तसेच इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल्स, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एसबीआयचे शेअर्स सध्या निफ्टीवर सर्वाधिक वाढले आहेत.
बांदा : शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे महाराष्ट्र शासनामार्फत बालवयातच देण्यात येत असून विद्यार्थ्यांकरवी अनेक अनेक कुटुंबे व्यसनमुक्तीही बनविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दसरा सणाच्या निमित्ताने बांदा शाळेतील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर ‘व्यसनमुक्त भारत ,सदृढ भारत’ “तंबाखू सोडा, कर्करोग टाळा” “तंबाखूचा घास, जीवनाचा नाश” अशा प्रकारच्या घोषणा लिहून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली.या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र शासनामार्फत तंबाखूमुक्त शाळा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी शाळा महाविद्यालये यामध्ये चालू आहे.या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक शाळा तंबाखू मुक्त शाळा जाहीर झाल्या आहेत .
मुंबई :कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रश्नांसाठी आणि प्रवासांदरम्यान सोयी आणि सुविधा मिळविण्यासाठी झटणाऱ्या कोंकण विकास समितीने निवेदनामार्फत काही मागण्या रेल्वे प्रशासनाकडे काल केल्या आहेत. कोकण विभागातील रेल्वे स्थानकावरील फलाटांची उंची वाढविणे, विविध एक्सप्रेस गाड्यांना कोकणातील स्थानकांवर थांबे देणे आणि ईतर काही मागण्यांसाठी काही निवेदने दिली आहेत.
या मागण्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
१. कोंकण रेल्वेवरील इंदापूर, गोरेगाव रोड, सापे-वामणे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजनी, कामथे, कडवई, निवसर, वेरवली, सौन्दळ आणि खारेपाटण रोड स्थानकांवर किमान अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उंच फलाट बांधणे. तसेच काही स्थानकांवर अजूनही फलाट बांधले गेले नाही आहेत अशा स्थानकांवर फलाट बांधणे
२. ११०२६/११०२५ पुणे भुसावळ एक्सप्रेस पूर्ववत करून चौक येथे थांबा देणे
३. वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबे
४. पॅसेंजरची एक्सप्रेस झाल्यानंतरही प्रवास वेळेत काहीच फरक न पडल्यामुळे १०१०५/१०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला कोंकण रेल्वे मार्गावर कमी केलेले कोलाड, इंदापूर, दिवाणखवटी, अंजनी, कामथे, उक्षी आणि भोके तर नव्याने निर्माण झालेले कळंबणी बुद्रुक आणि कडवई येथे तर मध्य रेल्वेवर पेण आणि नागोठणे येथे थांबे पूर्ववत करण्यात यावेत.
Konkan Railway News: दिवाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मध्यरेल्वेच्या सहकार्याने दिवाळी हंगामात आठवड्यातुन तीन दिवस धावणारी एक दिवाळी स्पेशल गाडी चालविणार आहे.
दिनांक 01/11/2023 ते 29/11/2023 शनिवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:15 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता थीवी या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक 02/11/2023 ते 30/11/2023 रविवार , मंगळवार आणि गुरुवार या दिवशी ही गाडी थीवी या स्थानकावरुन संध्याकाळी 15:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल
फर्स्ट एसी – 01, टू टायर एसी + फर्स्ट एसी (एकत्रित) – 01 +थ्री टायर एसी – 04 + सेकंड स्लीपर – 09 + जनरल – 04+ एसएलआर व अन्य – 02 असे मिळून एकूण 21 डबे
आरक्षण
Trains no. 01130 Thivim – Lokmanya Tilak या गाडीचे आरक्षण परवा दिनांक २७ ऑक्टोबर 2023 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत.