सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.
बॅनरमधील मजकूर काय आहे ?
“प्रिय दिपकभाई,
म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.
मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.
तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.
आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??
भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”

नवी मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अर्थात अटल सेतूवर प्रवास करत असताना तुम्ही पिकनिक च्या मूड मध्ये असाल आणि सेल्फी काढण्यासाठी गाडी थांबवत असाल तर सावधान! कारण या सेतूवर असे केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत सेल्फी घेण्यासाठी थांबल्याबद्दल नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांनी एकत्रितपणे एका महिन्यात 1,612 लोकांना दंड ठोठावला आहे.
21.8 किमी सागरी पुलावर थांबणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असताना, वाहन थांबल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये या साठी हा दंड आकारण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलिसांनी 1,387 जणांना तर मुंबई पोलिसांनी 225 जणांना दंड ठोठावला आहे. नवी मुंबई पोलिसांनी 10.99 लाख रुपये एवढा दंड वसूल केला तर मुंबई पोलिसांनी ₹1.12 लाख एवढी रक्कम या दंडाद्वारे वसूल केली आहे.
अनेक वाहनधारक आपली वाहने कडेला थांबवून सेल्फी घेत वेळ घालवत असत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. या साठी मुंबई पोलिस आणि नवी मुंबई पोलीसांनी ही मोहीम चालवली आहे. मात्र संपूर्ण 22 किमी लांबीच्या पुलावर गस्त घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

रत्नागिरी कोकण रेल्वेच्या एका स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा वडापावच्या ट्रे वर पाय ठेवून झोपण्याचा प्रकार ताजा असताना येथे एक असाच किळसवाणा प्रकार दुसर्या एका विक्रेत्याकडून घडला आहे. याबाबतचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
चिपळूण स्थानकावर एका विक्रेत्याच्या हातातून भज्यांच्या ट्रे निसटला आणि सर्व भजी जमिनीवर पडली. त्या विक्रेत्याने सर्व भजी पुन्हा त्या ट्रे मधून भरली आणि विकायला पुन्हा निघाला असे त्या विडिओ मध्ये दिसत आहे. एका प्रवाशाने हा विडिओ चित्रित केला आहे.
या प्रकारांमुळे सामान्य लोकांच्या आरोग्याचे या विक्रेत्यांना काहीच देणेघेणे नाही हे समोर येत आहे. प्रवासात लहान मुले अशा खाद्यपदार्थाचा नेहमीच आग्रह धरतात. मात्र अशा प्रकारांमुळे हे पदार्थ मुलांना द्यावेत की न द्यावेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तो विक्रेता खरोखरच ‘ती’ भजी फेकून देणार होता का?
पडलेली भजी भरून झाल्यावर तो विक्रेता तिथून निघाला; मात्र जागरूक प्रवाशांनी त्याला हटकले आणि ती भजी टाकून देणार आहे की नाही ते विचारले. तेव्हा तो विक्रेता हो बोलून पुढे चालायला लागला. मात्र तेथील प्रवाशांनी आरपीएफ कर्मचाऱ्याच्या मदतीने तिथेच जवळ असलेल्या कचराकुंडीत ती भजी फेकायला लावलीत. जर त्या विक्रेत्याला भजी फेकायचीच होती तर ती त्याने तिथेच बाजूला असलेल्या कचराकुंडीत न फेकता पुढे का घेऊन गेला? हा प्रश्न समोर आला आहे.
प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्याचे कौतुक
आपल्या समोर असा अनुचित प्रकार घडताना गप्प न बसता त्या विक्रेत्याला त्याच ठिकाणी जाब विचारला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडून त्याला ताब्यात घेतले. या सर्व घटनेत जागरूकता दाखवल्याबद्दल त्या प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्याचे कौतुक होत आहे.
–Video 👇🏻
Video: कोकण रेल्वेच्या स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; जमिनीवर पडलेली भजी उचलून……
बातमी वाचण्यासाठी लिंक 👇🏻https://t.co/zKXu5ksiie#konkanrailway #chiplun pic.twitter.com/pplCEBXSwW
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) February 16, 2024
सिंधुदुर्ग :भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक ही गुपचूप भेट घेतली. वैभवनाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे. या भेटीचे नेमके कारण समजले नाही. मात्र या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.वैभव नाईक हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा याआधी येत होत्या. मात्र या भेटीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.










