Category Archives: अपघात
मालवण: मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे काल रविवारी मध्यरात्री नौका समुद्रात पलटी होऊन तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक मच्छिमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने सुदैवाने बचावला आहे. ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत (53) रा. मोर्वे देवगड हे पोहत किनार्यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
दरम्यान, सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे व्यांगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले.
Train Derailment: मागच्या काही दिवसांपासून ट्रेनचे अपघात किंवा दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेन रुळ सोडून पुढे गेली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं असून घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.
19168 वाराणसी अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरले. 22 डबे डिरेल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून अशा घटना वाढत आहेत. या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलं नाही
कानपूर भीमसेन सेक्शनदरम्यान ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहेमहत्त्वाची बाब म्हणजे अजून तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.
प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात भयंकर होता. मात्र थोडक्यात जीवितहानी टळली आहे.
इंजिनला बोल्डर आदळल्याने इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाल्याचं लोको पायलनं सांगितलं आहे. त्यामुळे ट्रेन डिरेल झाली असावी असा अंदाज आहे.
Railway Accident Chakradharpur: आज पहाटे हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.

रायगड: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. तिने आपल्या या आवडीला करियर बनवले होते. प्रारंभिक तपासात समोर आले आहे की रायगडमध्ये कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात अन्वीचा हा अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्वी कामदार यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाख ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डिलॉइट या कंपनीत नोकरीही केली होती. मुंबईत राहणाऱ्या अन्वी कामदार मान्सूनमध्ये कुंभे धबधब्याची शूटिंग करण्यासाठी पोहोचल्या होत्या.
३०० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू
अधिकार्यांनी सांगितले की, अन्वी कामदार एक रील शूट करत असताना ३०० फुट खोल्या दरीत पडल्या. हा अपघात रायगडजवळ कुंभे धबधब्यावर घडला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्याच्या सैर करायला गेल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता हा प्रवास दुर्दैवी वाटेवर गेला. जेव्हा अन्वी व्हिडिओ शूट करत असताना एका खोल दरीत पडल्या. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आणि एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलांच्या सोबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांची अतिरिक्त मदत मागवण्यात आली पण अन्वीला वाचवता आले नाही. अन्वीने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये स्वत:चा परिचय देताना “यात्रा जासूस” असे लिहिले आहे. अन्वीला प्रवासाच्या सोबत चांगल्या स्थळांची माहिती देण्याचीही आवड होती.
Follow us on
रायगड दि. १५ जुलै : अलिबागहून पनवेलला जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस उलटली. बसमध्ये 45 ते 50 प्रवासी होते. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, लोकांना बाहेर काढण्यात आले.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. एसटी बसचा एस्केल तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.
Kanchenjunga Express accident: पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने सोमवारी रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे गंभीर नुकसान झाले.
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता रेल्वेचा अपघात झाला आहे. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.











