चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे
काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.
या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल.
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात. बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
सिंधुदुर्ग | देवगड तालुक्यातील बापर्डे रेडेटाका येथे एक मोठे विलक्षण मानवाकृती कातळशिल्प सापडले आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील इतर कातळचित्राचा अभ्यास करण्यासाठी कातळशिल्पे अभ्यासकांना दाखवण्यासाठी रणजित हिर्लेकर व अजित टाककर हे या भागात गेले असता त्यांना श्री. श्रीकांत नाईकधुरे यांच्या कलमाच्या बागेत हे कातळशिल्प सापडले आहे.
या सापडलेल्या कातळशिल्पाची वैशिष्ट्ये रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांच्या माहितीनुसार…
कोकणातील कातळचित्राच्या दुनियेत हे कातळचित्र अतिशय वेगळे आहे.
मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
जवळपास विस ते पंचविस कातळचित्रांचा एकत्रित समुह आहे.
यातील मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
जवळपास पंधरा ते सहा फुट रुंदीच्या आयाताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल अशी ही मानवाकृती आहे.
आतापर्यंत देवगड तालुक्यात सापडलेल्या मानवाकृती कातळचित्रात ही सर्वात मोठी मानवाकृती आहे.
ही संपुर्ण फेम विविध प्रकारे सजवली नटवली आहे.
पहाताक्षणी मानवी मनाला धक्का बसेल व ही भव्याकृती पाहुन तो त्यापुढे नम्र होईल, इतकी विलक्षण मोठी ही आकृती आहे.
आजवरच्या कातळचित्रां विषयीच्या संशोधनाला धक्का देईल, इतके वेगळेपण या आकृतीत पहायला मिळते.
जवळ पास चाळीस ते पन्नास चौरस फुटात ही विविध कातळचित्रे कोरलेली आहेत.
ही सर्वच कातळचित्रे आतापर्यंत दिसणाऱ्या कातळचित्रांपेक्षा वेगळी आहेत.
लगेचच या कातळचित्रांची साफसफाई व डाँक्युमेंटेशन करण्यासाठी नाईकधुरे यांच्याशी बोलुन टाककर व हिर्लेकर यांनी नव्या मोहीमेची योजना केली. सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळीच या जागी पोहोचुन त्याची साफसफाई करण्यात आली. या कामी साक्षी राणे, गौरव सोमले व निना हिर्लेकर या देवगड काँलेजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
देवगड इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या कातळचित्र संशोधन व संवर्धनाच्या कामा बाबत माहीती देताना श्री. अजित टाककर म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्हाला तिस ते चाळीस नविन कातळचित्रे सापडली आहेत. आता देवगड तालुक्यात सोळा- सतरा ठिकाणी साठ पासष्टहुन अधिक कातळचित्रांची नोंद आम्ही घेतली आहे. या विषयीचा रिपोर्ट व संशोधन लेख येत्या १७ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात भरणाऱ्या कोकण इतिहास परीषदेच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग :कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा आणि मांडवी खाडी यांच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच हे झुलते पूल (Sea Link ) पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटक येथे सेल्फि, फोटोग्राफी आणि प्रि-वेडींग फोटोशूट साठी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.
या पुलामुळे समुद्र किनार्यावर जाणे सोपे होणार आहे. याआधी ईथे जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर वळसा घालावा लागत होता. पुलामुळे आता अवघ्या 5 मिनिटांत समुद्रकिनारी जाणे आता शक्य होणार आहे.
तत्कालीन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी केसरकर यांच्या ‘समृद्ध कोकण’ या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याचे काम बरीच वर्षे रखडले होते. त्यावरून अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यावर वारंवार टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्याचे मंत्री शालेय मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणून हा पूल पूर्णत्वास नेला आहे. अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलते पूल असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. वेंगुर्ल्यात आल्यानंतर झुलत्या पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह पर्यटकांना होत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने गतिमान विकास होत असून यात हा पूल मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.
कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र राज्यातील 37 स्थानकांचा कायापालट होणार.
रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे
मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.
सिंधुदुर्ग। प्रतिनिधी :सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात अचानकपणे पुन्हा पाणमांजरे दाखल झाली आहेत. शनिवारी रात्री ही पाणमांजरे निदर्शनास आली. चार ते पाच पाणमांजरे काही नागरीकांना दिसून आली आहेत. मोती तलावाच्या कठड्याच्या बांधकामांमुळे तलावाचे पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामूळे माशांच्या शोधात ही मांजरे कमी पाण्यात फिरत असावीत असे प्राणी तज्ञांचे मत आहे.
सावंतवाडीतील तलावात पाणमांजरे असावीत कि नसावीत ह्यावर दोन विरुद्ध मतप्रवाह येथील नागरिकांमध्ये आहेत. पाणमांजर ही प्रजाती पाणी आणि जमिनीवर राहते, ती लाजाळू असून मासे, खेकडे यावर आपली गुजराण करते. त्यामुळे अनेकांनी तलावात सोडण्यात येणारे मत्स्यबीज, मासे खाऊन फस्त करतील अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर प्राणिमित्रांनीही ही निसर्ग साखळी असल्याने ती तोडू नये असंही मत व्यक्त केलं. काही प्राणी मित्रांनी अतिशय चांगले मत नोंदवताना, “शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने पोषक असेल त्यासाठी पाणमांजरांचे संवर्धन करावे, जेणेकरून नामशेष होत चाललेली ही प्रजाती सावंतवाडीतील तलावात दिसत असल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावात स्थिरावलेली पाणमांजरे हा कुतूहलाचा विषय असेल, आणि त्यांना पाहण्या साठी, त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक येथे थांबतील” असेही सांगितले. तर एका प्राणिमित्राने भारतीय उपखंडातील नष्ट होत चाललेल्या पाणमांजरांचे अस्तित्व सावंतवाडी च्या सुप्रसिद्ध मोती तलावात असणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. पाणमांजरे ही पर्यावरण पूरक पर्यटनाची संधी असल्याचंही मत प्राणिमित्रांनी व्यक्त केलं आहे
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिक आणि ‘होम स्टे’ धारक यांची संख्या लक्षणीय आहे. सरकारच्या पर्यटन विभागामार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि ‘होम स्टे’ला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगाला ला महावितरण मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरकमोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. तसेच हा विषय महावितरणकडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली.
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी चालू केलेली ‘रत्नागिरी दर्शन’ ही विशेष सेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर शनिवारी व रविवारी चालू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
वर्षाअखेरीस सोडलेल्या ह्या पर्यटक बससेवेस पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी होत होती.
या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
1.आडिवरे
2. कशेळी कनकादित्य मंदिर,
3. गणेशगुळे,
4. पावस,
5. कोळंबे कातळशिल्प
6. थिबा राजवाडा,
7. भगवती किल्ला,
8. लोकमान्य टिळक जन्मस्थान,
9. गणपतीपुळे
10. आरेवारे समुद्रकिनारा
टीप: प्रवास येथे अल्पोहार म्हणून खिचडी प्रसाद देण्यात येईल.
रत्नागिरी: रत्नागिरीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ह्यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी विमानतळासाठी प्रस्तावित २८ हेक्टर जमिनीपैकी २० हेक्टर भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन जानेवारीअखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक ७७.७० कोटींचा निधीही शासनाकडून मिळाला आहे. भूसंपादन झाल्यानंतर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार आहे. जमिनिचा ताबा मिळाल्यानंतर लगेचच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून काम सुरू करण्यात येणार आहे.
विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनामध्ये तुवंडेवाडी येथील २० हेक्टर आणि मिरजोळे येथील ८.६ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यापैकी तुवंडेवाडी येथील जागेचे निवाडे प्रांताधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत तर मिरजोळेतील संबंधित जमीनमालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात त्यापैकी चार खातेदारांना भूसंपादनाचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. भूसंपादनाला लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता लवकरच संबंधित जमीनमालकांना उर्वरित जमिनीसंदर्भातील निधी वितरित करण्याचे काम निवाडे घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.
MOPA Airport news :उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून सुरु झाले आहे. गुरुवारी हैद्राबाद-गोवा ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली. हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेले इंडिगो कंपनीचे 6E6145 हे विमान मोपा येथील मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचले. या विमानाने हैद्राबाद ते गोवा अंतर 1 तासांत पूर्ण केले. विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत मोपा विमानतळावर स्वागत करण्यात आले
उत्तर गोव्यातील मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून विमान कंपनी इंडिगोने देशातील 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. त्याबरोबरच गो फर्स्ट आणि अकसा एअर ह्या कंपन्यांनी ह्या विमानतळावरून सेवा चालू करण्याचे जाहीर केले आहे. .
इंडिगोने मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. गुरूवारपासून ही उड्डाणे सुरू झाली.
मुंबई ते गोवा अकसा एअर विमानाचे इकॉनॉमी क्लासचे प्रवासभाडे २३९३ रुपयांपासून सुरू होत आहे. विमान कंपन्या, प्रवासाची तारखेनुसार हे भाडे कमी जास्त आहे. हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जवळ असल्याने जलद आणि आणीबाणीच्या Emergency वेळेस तळकोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय ह्या विमानतळाच्या रूपाने निर्माण झाला आहे.
सध्या मुंबई ते गोवा आणि परतीसाठी इंडिगो आणि गो फर्स्ट कंपनीचे प्रत्येकी एक उड्डाण ह्या विमानतळावरून होत आहे. पुढच्या आठवड्यात अकसा एअर कंपनीपण ह्या मार्गावर येथून आपली सेवा चालू करणार आहे.