दिल्ली : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.
अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
दरम्यान, रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे.