Breaking News :केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने ज्या बहुमतावर शिंदे हेच खरे शिवसेनेचे नेते आणि त्यांच्याच गटाला धनुष्यबाण दिले आहे ती आकडेवारी पुढीलप्रमाणे
सिंधुदुर्ग | मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वे जोडणारा प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मागील दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली असून त्याचा समावेश 2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला होता. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला होता. प्रस्तावित सर्वेक्षणानुसार कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग व्यवहार्य असल्याची नोंद आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतेही काम झालेले नाही. हा रेल्वे मार्ग झाल्यास हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे.
काय आहेत अडथळे?
या मार्गाचे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही. कारण असे कठीण कामे कोकण रेल्वे मंडळाने या आधी केली आहेत. पण हा प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे निधीचा. या मार्गास रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य शासनाकडून निधी मंजूर होत नाही आहे.२०१७ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३४३८.४९ कोटी एवढा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि उर्वरित महाराष्ट्र सरकार देणार आहे. २०१६ च्या अर्थसंकल्पातील २५० कोटीची तरतूद वगळता अजूनपर्यंत कोणतीही तरतूद त्या पुढच्या अर्थसंकल्पात केली गेली नाही आहे. निधीअभावी फक्त सर्वेक्षण वगळता कोणतेही काम चालू झाले नाही आहे. या मार्गाकरिता 683 हेक्टर भूसंपादन गरजेचे आहे, पण अजूनपर्यंत काहीच भूसंपादन झाले नाही आहे. २०१८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कामास गती देण्याचा प्रयत्न केला गेला होता. २०२२ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण त्यानंतर काहीच प्रगती झाली नाही. मिळाल्या फक्त पुढच्या तारखा!
कोल्हापूर आणि कोकणातील उद्योग, व्यापार वाढीच्यादृष्टीने हा रेल्वेमार्ग उपयुक्त आहे. 107 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. कोल्हापुरातील शेती व इतर पूरक उत्पादने बाय रोड पाठवायची ठरवल्यास प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. येथील कंटेनरना न्हावाशेवा बंदरामध्ये चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्याचे भाडे भरावे लागते. मात्र हाच माल जयगडच्या बंदरापर्यंत रेल्वेने पोहचवला तर तो लवकर पाठवता येऊ शकेल. त्याचबरोबर या बंदराचा दुहेरी फायदाही होऊ शकतो. या बंदरावर कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लँटमध्ये १५ टक्के कोळसा वापरता येऊ शकतो. तसेच येथील इंडस्ट्रिजसाठीही हा कोळसा मिळू शकेल. सध्या कोल्हापुरात आणण्यात येणारा कोळसा ट्रक वाहतुकीने कारखान्यांपर्यंत आणणे प्रचंड खर्चिक आहे. रेल्वेचा हा नवीन मार्ग सुरु झाल्यास आयात व निर्यात व्यवसायासाठी मोठा फायदा होऊ शकतो. कमी खर्चामध्ये ही वाहतूक होऊ शकते.
पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी QUESTION BANK प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रश्नपेढीचा वापर करून विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतील.
संकेतस्थळावर गेल्यावर्षीचीच प्रश्नपेढी?
गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे २५ टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज येण्यासाठी एससीईआरटीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत एससीईआरटीच्या संकेतस्थळावर गेल्यावर्षीचीच प्रश्नपेढी दिसत होती. त्यामुळे यंदा प्रश्नपेढी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांसमोर निर्माण झाला होता.
एससीईआरटीने यंदा दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के अभ्यासक्रमावरील विषयनिहाय प्रश्नपेढी तयार केल्या आहेत. त्यामुळे, या प्रश्नपेढ्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येणार आहे. प्रश्नपेढी https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दिल्ली : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.
अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
दरम्यान, रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे.
मुंबई : या आठवडय़ात सुरू होणार्या मुंबई ते शिर्डी 22223/Mumbai CSMT – Sainagar Shirdi Vande Bharat Express या वंदे भारत गाडीमुळे भाविकांना शिर्डीला जाण्याचा जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
एका दिवसात शिर्डी यात्रा शक्य
मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस आनंदाची पर्वणी राहणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी दरम्यान सकाळी धावणार आहे. मुंबई येथून ही ट्रेन सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी (6:15 AM) शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. आणि दुपारी 12:10 वाजता ही ट्रेन शिर्डी या ठिकाणी पोहोचेल.तसेच शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन सायंकाळच्या वेळेला धावणार आहे. सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी (5:25 PM) ही ट्रेन शिर्डी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. रात्री अकरा वाजून 18 मिनिटांनी (11:18 PM)ही ट्रेन मुंबई या ठिकाणी पोहोचेल. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस ही ट्रेन धावणार आहे.
मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे तिकिटाचे दर
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1660 रुपये असे दर तर नाशिक ते मुंबईसाठी अनुक्रमे 550 आणि 1250 रुपये तिकीट दर आहेत.
थांबे
ही गाडी फक्त काही मोजक्या स्थानकावर थांबणार आहे. दादर, ठाणे, नाशिक हे या गाडीचे थांबे आहेत.
खाद्यपदार्थांचे पर्याय
सकाळच्या न्याहारीसाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय आहेत
जेवणासाठी अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय आहेत. यांसह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल.
सायंकाळच्या न्याहारीमध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबिर वडी, भरड धान्यांचे थालिपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा असे पर्याय आहेत. यासाठीचे पैसे प्रवाशांना भरावे लागणार आहेत, असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
सिंधुदुर्ग : एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीत आलेल्या व्यक्तिचा त्या मृतदेहासोबत दरीत पडून मृत्यू झाल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कराड येथील एका विट व्यावसायिकाने एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला व्यावसायिकाने एका मित्राच्या मदतीने मारहाण केली. या मारहाणी दरम्यान त्या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो व्यावसायिक आणि त्याचा मित्राने सरळ आंबोली गाठली आणि मृतदेह एका खोल दरीत टाकायचे ठरवले. पण तो मृतदेह दरीत टाकताना त्या व्यावसायिकाचा पाय घसरला आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. व्यावसायिकचा मित्र आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही मृतदेह पण सापडले आहेत. मारहाणी दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमूळे न होता हार्ट अॅटॅक मुळे झाला असल्याचेही त्याने सांगितले. नेमकी घटना काय आहे ह्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. आज दिनांक 31 जानेवारीपासून ऑनलाईन पध्दतीने हे अर्ज स्विकारले जातील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2023 आहे.
परीक्षेकरिता अर्जप्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटला क्लिक करून उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत आहे
प्रवेशपत्र डाऊनलोड
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 प्रवेशपत्र दिनांक १५/०२/२०२३ पासून डाउनलोड करू शकता
वेळापत्रक
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)
परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्त्वाचे
अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्य राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी.
स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे. सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल.
ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
Mumbai-Goa Highway News | मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे आणि महामार्गावर होणाऱ्या दुय्यम कामामुळे येथे होणाऱ्या अपघातांस सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे माणगाव येथील लोणेरे येथील भीषण अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी मुंबई गोवा जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दिनांक १९/०१/२०२३ रोजी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रक समोरासमोर आढळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. जर महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता तर हा अपघात टळला असता. या अपघातास पूर्णपणे सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारतर्फे त्वरित नुकसान भापाई जाहीर करण्यात यावी अशी समितीची मागणी आहे.
कोकणातील जनतेसोबत दुजाभाव का?
चार दिवसापूर्वी तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली होती . चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली होती .सदर घटना घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्वरित 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. ईतरांना मदत जाहिर होते तर कोकणाला का नाही? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.
कोकणाला आणि कोकणातील जनतेला नेहमीच दुय्यम स्थान देणार असाल तर आता कोकणकर शांत बसणार नाही .या अपघातात निधन झालेल्याना लवकरात लवकर मदत जाहिर करावी तसेच शिमग्यापूर्वी कामाला सुरुवात करून प्रवासासाठी प्रवासायोग्य महामार्ग करावा अन्यथा विविध संघटना,मंडळ आणि कोकणकर लवकरच मुंबईत आणि शिमग्यानंतर रस्त्यावर उतरून कोकणातील आजी माजी नेत्यांच्या नावे शिमगा करतील अशी चेतावणी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे देण्यात आली आहे.
कोल्हापूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बास्केट ब्रिज भूमिपूजनाच्या कार्यक्रमात होणाऱ्या ब्रिजच्या रस्त्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.कितीही मोठा पूर आला तरी पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबणार नाही. सांगली-कोल्हापुरात सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधू.पुढचे ५० वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची हमी देतो, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.गेली अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात महापरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच महापुराचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गावर येत असल्यामुळे अनेक दिवस या परिसरातील वाहतूकही ठप्प होत असते. यासाठी सातारा ते निपाणी या दरम्यान सहा पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुलावरून थेट कोल्हापूरपर्यंत बास्केट ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. याची पायाभरणी तसेच रत्नागिरी कोल्हापूर राज्य मार्ग चौपदरीकरण टप्पा 2 , रत्नागिरी कोल्हापूर चौपदरीकरण टप्पा 3 याचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘पुण्यासाठी लवकरत रिंग रोड बांधणार आहे. नागपूर ते कोल्हापूर सात तासात अंतर पार होईल अशी व्यवस्था करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात टेक्नॉलॉजीच्या आधारावर नवीन उद्योग झाले पाहिजेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना ऊर्जा दाता बनवलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यानेच पुढाकार घेतला पाहिजे’. असे गडकरी म्हणाले
मुंबई :आजपासून 4 दिवस म्हणजे 28 ते 31 जानेवारीपर्यंत बँका बंद राहतील. बँक कर्मचारी 30 आणि 31 जानेवारीला संपावर (Bank Strike) जाणार आहेत. यापूर्वी 28 जानेवारीला महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहणार होत्या. अशा परिस्थितीत लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मात्र, या काळात इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू राहणार आहे. यामुळे लोक पैशाचे व्यवहार करू शकतील.
दोन दिवस संपावर संपाबाबत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सांगितले की, 30-31 जानेवारी रोजी युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाचा परिणाम त्यांच्या शाखेतील कामगारांवर होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपात देशभरातील बँक शाखा कर्मचारी सहभागी होणार आहेत. ग्राहकांनी त्यांचे शाखेशी संबंधित काम अगोदरच निकाली काढले तर बरे होईल.
संपूर्ण देशात संप SBI ने सांगितले की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने कळवले आहे की युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने UFBU शी संबंधित संघटनांना म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA इत्यादींना संपाची नोटीस जारी केली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या आहेत. बँकिंग वर्किंग कल्चरमध्ये सुधारणा करा, बँकिंग पेन्शन अपडेट करा, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) रद्द करा, पगारात सुधारणा करा आणि सर्व कॅडरमध्ये भरती करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.