Category Archives: पर्यटन

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत कोकणातील दोन तीर्थक्षेत्रांना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर

रत्नागिरी: कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकासाकरीता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे.
अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेतंर्गत कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटीऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरूंना विविध सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंजा उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत नाही म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीर्थक्षेत्रांना नवीन प्रस्तावित निकषाप्रमाणे ३ कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे. प्रादेशिक योजनेत आणखी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, स्नानगृह, भाविकांसाठी भक्तनिवास, परिसर सुशोभीकरण, वृक्षारोपण, वाहनतळ यासंह पर्यटकांची सुरक्षितता, अशा विविध सुविधा या ठिकाणी करता येणार आहेत.

Loading

नागपूर – पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग कोकणच्या पर्यटनास तारक की मारक?

सिंधुदुर्ग, संपादकीय : नुकतीच बहुचर्चित नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसची अधिसूचना महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ MSRTC तर्फे जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समजण्यात येणारा हा मार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. एकूण 11 जिल्ह्यातून जाणारा महामार्गामुळे नागपूर गोवा हे अंतर फक्त 8 तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांमधील तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेली माहुरची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जोडली जाणार आहेत. या महामार्गाने पर्यटन विकास होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
कोकणाला किती फायदा?
हा महामार्ग तळकोकणातून जाणार असल्याने त्याचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होणार असल्याचा दावाही केला जात आहे.  महामार्ग जेथून जातो त्या भागाचा विकास होतो ही गोष्ट साहजिक आहे. मात्र आखणी करताना एखाद्या भागाचा विचार करून त्याप्रमाणे आखणी केली असती तर त्या भागाचा किंवा प्रदेशाचा अधिक विकास होतो. मात्र या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नसल्याचे दिसत आहे.
गोव्याला तारक; कोकणास मारक 
हा मार्ग कोल्हापूरहून फणसवडे, घारपी आणि बांदामार्गे सरळ गोव्याच्या सीमेला मिळणार आहे.या मार्गात कोकणातील एकही पर्यटनस्थळ किंवा शहर लागत नाही आहे. आंबोली घाटातही बोगदा पाडून हा मार्ग पुढे येणार आहे. त्यामुळे आंबोली पर्यटनस्थळ सुद्धा पर्यटकांना या मार्गात भेटणार नाही. या कारणाने नागपूर किंवा पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक हा महामार्गामुळे सरळ गोव्यात जाणार आहे. त्यामुळे कोकण पेक्षा गोव्याच्या पर्यटनास या महामार्गाचा अधिक फायदा होणार आहे.  दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या कोल्हापूर आंबोली या मार्गाने गोव्याला जाणारा पर्यटक नवीन एक्सप्रेस मार्गाचा वापर करणार असल्याने त्याचा आंबोली आणि सावंतवाडी पर्यटन स्थळांवर विपरीत परिणाम होणार आहे.
आंबोली ते सावंतवाडी इंटरचेंज गरजेचा 
महामार्ग सावंतवाडी शहरातून किंवा शहराच्या अगदी जवळून गेला असता तर त्याचा खूप मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासाला झाला असता.  काही बाबींमुळे हे जर शक्य नसेल तर  या महामार्गाला एक इंटरचेंज सांगलीच्या धर्तीवर किंवा आता आजरावासिय मागत आहेत त्या धर्तीवर सावंतवाडी साठी द्यावा. जेणेकरून सिंधुदुर्ग चे पर्यटन बहरेल आणि सिंधुदुर्ग वासियांना आणि कोकण वासियांना धार्मिक पर्यटनासाठी अजून एक महामार्ग उपलब्ध होईल असे मत येथील स्थानिक  श्री. सागर तळवडेकर यांनी केली आहे.

Loading

Sindhudurg: आंबोली चौकुळ भागात ब्लॅक पॅन्थरचा वावर; फोटो कॅमेरात कैद

आंबोली दि.२५ फेब्रु; पश्चिम घाटात अजूनही  जैविविधता टिकून आहे. तळकोकणात आंबोली – चौकुळ ही गावे  जैवविविधतेतेसाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जंगलात अजूनही वन्यप्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत आणि हे प्राणी कित्येकवेळा येथील ग्रामस्थांच्या आणि  पर्यटकांच्या नजरेस पडताना दिसतात. असेच काही पर्यटक येथे पर्यटनास आले असता  त्यांना येथे काळा बिबट्याचे Black Panther दर्शन झाले. यातील काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटोही काढलेत. फोटोस दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले आले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
येथील जैवविविधतेला धोका
येथील ग्रामस्थांनी जरी येथील जैवविविधतेचे आणि निसर्गाचे रक्षण केले असले तरी बाहेरील लोकांकडून त्याला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे येणारे काही पर्यटक शिकारीच्या हेतूने येत आहेत. गेल्याच आठवड्यात सावंतवाडी शहर आणि बांद्यातून काही युवकांनी येथे येऊन साळींदर ची शिकार केली होती. ग्रामस्थांनी जागरुकपणा दाखवून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरी गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी गैरमार्गाने विकत घेऊन तेथे बांधकामे केली जात आहेत. त्याचा परिमाण येथील निसर्गाला, जैवविविधतेला आणि ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. याविरोधात येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला असून आंदोलनाचा मार्ग अंगिकारला आहे.

Loading

गणपतीपुळे येथे सुरु होणार देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी :देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय संग्रहालय गणपतीपुळे जवळील मालगुंड मालगुंड मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मालगुंड येथे केली आहे. मालगुंड गावच्या सुकन्या तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती साधनाताई साळवी यांच्या वाढदिवसाला पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली उपस्थिती दाखवली होती यावेळी ते बोलत होते.
या प्राणिसंग्रहालयाची  जागा एक दोन दिवसांतच निश्चित होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच हे प्राणिसंग्रहालय मालगुंड येथे झाल्यानंतर आमचा असा अंदाज आहे की गणपतीपुळे येथे दरवर्षी 22 लाख पर्यंत भेट देतात मात्र त्याहीपेक्षा 30 लाखापर्यंत मालगुंड मध्ये पर्यटक भेटी देऊन मालगुंडच्या विकासाचा कायापालट होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading

Swadesh Darshan 2.0 योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश. पर्यटन व्यावसायिकांना नोंदणी करण्याचे जिल्हाधीकाऱ्यांचे आवाहन; ‘या’ वेबसाईटवर करता येईल नोंदणी

सिंधुदुर्ग : पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन २.० योजनेमध्ये ४८ अधिसूचित पर्यटनस्थळी राज्यातील सिंधुदुर्ग या एकमेव पर्यटनस्थळाचा समावेश झाला आहे. ही कोकणकरांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे. केंद्राच्या या योजनेमुळे पर्यटनात वाढ होणार असून पायभुत सुविधांचा देखील विकास होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील सर्व निवास युनिट्स हॉटेल, ब्रेड आणि ब्रेकफास्ट रिसॉर्ट्, फार्मस्टे, होमस्टे, टूर ऑपरेटर, पर्यटक गाईड्स, ट्रॅव्हल एजंट आणि पर्यटन उद्योगातील इतर भागधारकांनी https://nidhi.tourism.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून ‘ट्रॅव्हल फॉर लाइफ’ प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तावडे यांनी केले आहे. नोंदणी केल्यावर युनिक NIDHI ID (NID) द्वारे विविध सेवा आणि फायदे यांच्या इलेक्ट्रॉनिक वितरणाचा लाभ या व्यावसायिकांना मिळणार आहेत. 
‘स्वदेश दर्शन २.०’ उपक्रमाअंतर्गत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पर्यटनस्थळ व्यवस्थापन समिती देखील स्थापन केली आहे. विविध पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापन उपक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती जबाबदार आहे. पहिली डेस्टिनेशन मॅनेजमेंट समितीची बैठक जिल्हाधिकारी तावडे यांच्या अध्यक्षतेखाली डेस्टिनेशन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती.  यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
स्वदेश दर्शन २.० योजनेमधील अधिसूचित पर्यटनस्थळांची यादी 

Loading

नवीन वर्षात गोव्यात पर्यटनासाठी जात असाल तर ही बातमी वाचाच; गोव्यातील मंदिर समित्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Goa News:गोव्यात पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येतात. गोव्यातील समुद्रे किनारे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच येथील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. या मंदिरांना सुद्धा लाखो पर्यटक भेट देताना दिसतात. मात्र पर्यटकांच्या कपड्यांवरून मंदिर समित्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या 1 जानेवारीपासून गोव्यातील मंदिरांमध्ये कडेकोट ड्रेस कोड लागू होणार आहे. मात्र लहान मुलांना यातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर हे फॅशन दाखवण्याचे ठिकाण नाही, असे व्यवस्थापनाचे मत आहे. अनेक पर्यटक येथे आधुनिक कपडे घालून येतात ज्यामुळे प्रतिष्ठा राखली जात नाही. त्यामुळे लहान कपड्यांमध्ये कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
गोव्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानने म्हटले आहे की, मंदिराचे पावित्र्य आणि आदर राखण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व पर्यटकांसाठी कठोर ड्रेस कोड लागू केला जाईल. शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडी, स्लीव्हलेस टॉप, लो-राईज जीन्स आणि शॉर्ट टी-शर्ट परिधान केलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गोव्यातील सुप्रसिद्ध श्री मंगेश देवस्थाननेही नवीन वर्षापासून अतिशय कडक ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाविकांनी योग्य कपडे घालूनच मंदिरात यावे.
मंदिर समिती देणार कपडे
अयोग्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्यांना मंदिर समितीतर्फे छाती, पोट, पाय झाकण्यासाठी लुंगी किंवा कापड दिले जाईल. त्यामुळे आत्तापर्यंत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
श्री रामनाथ देवस्थानचे अध्यक्ष फोंडा म्हणाले की, आम्ही 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू करणार आहोत. यासाठी आम्ही एक सूचना जारी केली असून मंदिर परिसरात फलकही लावला आहे. पर्यटकांना जागरूक करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटक अनेकदा सभ्य कपडे घालून येतात. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी लहान कपडे घालून कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
मंदिरांनी म्हटले आहे की 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या ड्रेस कोडमधून सूट दिली जाईल, परंतु 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आणि प्रौढांना ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. जर कोणी लहान कपडे घालून आले तर त्याला स्मोक आणि लुंगी दिली जाईल. हे परिधान करून तुम्ही मंदिराला भेट देऊ शकाल. यापूर्वीही या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नव्हते. आता आम्ही ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करू.

Loading

कोकण: पर्यटन क्षेत्रात महिला व्यावसायिकांना ‘आई’ चा मदतीचा हात …लाभ कसा घ्याल ?

रत्नागिरी : कोकणात पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग आता दिसायला लागला आहे. होम स्टे, हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायात महिला महिला व्यावसायिक छाप पाडताना दिसत आहे.  अशा महिलांसाठी राज्यसरकारने यावर्षी  ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण आखले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही या धोरणाची पंचसुत्री महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तयार केली आहे.
या योजने अंतर्गत खालील फायदे मिळतील. 
प्रत्येक तालुक्यात पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या १० पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम १२ टक्केच्या मर्यादेत, त्यांच्या आधार लिंक बँकखात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४ लाख ५० हजारांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत दरमहा पुढील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल.
या अटी असतील 
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या असल्या पाहिजेत. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस, महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष स्थापन करण्यात येईल. महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या आई या महिला केंद्रित पर्यटन धोरणासाठी वार्षिक कृती आराखडा निश्चित केला आहे.
अर्ज आणि इतर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून PDF  डाउनलोड करावा. हि माहिती शक्य होईल तितकी समाज माध्यमांवर फॉरवर्ड करा जेणेकरून आपल्या कोकणातील भगिनी याचा लाभ घेऊन स्वावलंबी होतील

Loading

०९ डिसेंबर देवगड दुर्घटना: जबाबदार कोण? बेलगाम तरुणाई, निष्काळजीपणा की अपुरी सुरक्षा व्यवस्था ?

देवगड :काल दिनांक ०९ डिसेंबर रोजी देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या समुद्रात गेलेल्या चार विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची आणि एकजण बेपत्ता झाल्याची  दुर्घटना घडली.
अशा घटना घडल्या कि पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्या जागेवरील सुरक्षाव्यवस्था. साहजिकच सर्व स्तरावरून अशा येथील प्रशासनास जबाबदार धरले जाते आणि येथून प्रशासन सुरक्षा देण्यास कुठे कुठे कमी पडले त्यावर सर्वच माध्यमावर चर्चा सुरु होते. येथेही काही त्रुटी आढळून आल्यात.
देवगड नगरपंचायतीतर्फे जीव रक्षकांना पगार दिला जातो एवढा खर्च करू नाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नाही आहे. देवगड किनारपट्टीवर एक जीव रक्षक यापूर्वीच नोकरी सोडून गेला त्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक अद्यापही करण्यात आलेली नाही. या ठिकाणी नगरपंचायतीचा एक सफाई कर्मचारीही उपस्थित असतो मात्र तोही या दुर्घटनेच्या वेळी नव्हता तो कोठे होता? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हजारो लाखो रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालीम करण्यात येतात मात्र आपत्ती आल्यावर ही रंगीत तालीम काहीच उपयोगाची नसते याचा प्रत्यय आजच्या घटनेवरून आला व्यक्ती बुडाल्यावर पोलीस हजर झाले व देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाने बुडालेल्या  व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सागरी पोलिसांची एकच नौका देवगड समुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होती देवगड मधील मच्छिमार, ग्रामस्थ यांनीच आपत्ती व्यवस्थापन राबवले. पोलीस व देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वगळून कुठल्याही खात्याचे लोक आपत्ती व्यवस्थापनासाठी फिरकले नाहीत
सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना घडल्यास हानी होता नये.  पण पूर्णपणे अशा घटनेस प्रशासनास जबाबदार धरणे योग्य ठरेल का? मुले जवळपास असली कि पालकवर्ग मुलांकडे लक्ष ठेवून असतो.  तेच पालक मुलांना सहलीसाठी किंवा एका अभ्यास दौऱ्यासाठी शाळेतर्फे किंवा एखाद्या अकॅडेमी तर्फे पाठवत असतात आणि तीच जबाबदारी त्या संस्थेला वर्ग pass करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
मात्र कालच्या घटनेत संस्थेतर्फे निष्काळजीपणाचे दर्शन झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सैनिक अकॅडमी आहे, जेथे शिस्तीला मोठे स्थान आहे. संस्थेच्या शिक्षकांनी सहलीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या नाही होत्या का? विध्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची संख्या कमी होती का? त्यांचा विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कृतींवर पुरेसा लक्ष नाही होता का?  या घटनेवरून विद्यार्थी बेलगाम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अकॅडमीच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading

कोकण किनारपट्टीवर अवतरले ‘पाहुणे’; दोन-तीन महिने असणार मुक्काम

दापोली :कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी Seagull Birdअवतरले असून, त्यांच्या येण्याने दापोली तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारे गजबजले आहेत. हर्णैच्या किनाऱ्यावर रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांना ते आकर्षण ठरत असून या थव्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
किनाऱ्याला थवेच्या थवे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये मज्जा करत असतात. विशेषतः सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. सीगल पक्ष्यांच्या लयबद्ध हालचाली, भक्ष्य म्हणून छोटे मासे व खेकडे पकडण्यासाठीची शिताफी, आकाशात विहारण्याची शैली पाहता प्रत्यक्षदर्शीची करमणूक होत आहे.
या पक्ष्यांच्या हवेतील सहजसुंदर कसरती देखील पाहण्याजोगा असून या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनाऱ्यावर वळतात. यावर्षीही या पक्ष्यांचे आगमन झाल्याने किनारा पक्ष्यांच्या सफेद रंगाने न्हाऊन निघाला आहे. पुढील दोन-तीन महिने किनारे या पक्ष्यांनी फुलून जाणार आहेत.
थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी स्थलांतर करून येथे दाखल होतात. दिवाळी सुटीमुळे किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत दाखल झाले आहेत. या पर्यटकांसाठी सीगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरत आहे.

Loading

केरळच्या धर्तीवर कोकणात हाऊसबोटिंग प्रकल्प लवकरच; मगरसफर, डॉल्फिन दर्शनसह ‘या’ सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार….

रत्नागिरी –  केरळच्या धर्तीवर सिंधुरत्न योजनेतून जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे या बोटी महिला बचतगट चालवणार आहेत. या सेवेचा लाभ पर्यटकांना लवकरच मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. 

जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाऊसबोटींगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. महिला बचतगटांना ही हाऊसबोट चालवण्यास दिली तर महिलांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे.

यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनाऱ्‍यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो.पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु-रत्न योजनेतून निधी मिळणार असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

दोन्ही खाडीत काय पाहता येईल?

वेलदूर ते चिपळूण (३० ते ४० किलोमीटर) –

कांदळवन दर्शन, मगरसफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, डॉल्फिन दर्शन.

जयगड ते तवसाळ-भातगाव पूल (२२ किलोमीटर) 

कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन, मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे, फिश मसाज, कोकणकलांचे दर्शन, बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्र

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search