Category Archives: महाराष्ट्र

नागपूर – पत्रादेवी ‘शक्तिपीठ’ महामार्ग ‘समृध्दी’ पेक्षाही मोठा; ८०५ किमी लांबीचा हा महामार्ग ठरणार राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग.

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग  यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून जाणार आहे. 

Loading

कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातला जाणार

सिंधुदुर्ग: कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असून, पुढील महिन्यात होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारविरुद्ध संतप्त भावना आहे.
गुजरात सरकारने माझगाव डॉकसोबत यासाठी करार केला आहे. यानुसार 35 टन वजनाची आणि 24 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित केली जाणार आहे. या पाणबुडीमध्ये 24 प्रवासी दोन रांगेत बसतील. प्रत्येक सीटला काचेची विंडो असेल. त्यामुळे समुद्रातील 300 फूट खाली असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल. दरम्यान, माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी 2018च्या अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार होता.
केंद्राने अलीकडेच मालवणमध्ये ‘नौदल दिन’ साजरा केला. त्यातून सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न दाखवले. मात्र काही दिवसांतच या आनंदावर पाणी फेरले. पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसेच 100 ते 150 कोटींची उलाढाल करण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हिसकावण्यात आला.
कोकणात रिफायनरी सारखे निसर्गाला हानिकारक प्रकल्प लादले जात आहेत असे प्रकल्पाला विरोधकांचे म्हणणे आहे. कोकणाला  विध्वंसकारी प्रकल्प न देता पर्यटनाला चालना देतील असे प्रकल्प देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. मात्र प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात येत असल्याने कोकणवासीय नाराज झाले आहेत.

Loading

Accident: ताम्हिणी घाटात खाजगी बसला मोठा अपघात, २ महिलांचा मृत्यू; ५५ प्रवासी जखमी

रायगड: पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत, तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला आहे.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Loading

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाच्या प्रक्रियेस आरंभ…

कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.

वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

Loading

आता गाव खेड्यात सुद्धा मिळणार गारेगार प्रवासाचा अनुभव; ९ मीटरची वातानुकूलित मिडी बस लवकरच एसटीच्या ताफ्यात…

MSRTC News: पूर्वी एसटी म्हंटले की डोळ्यासमोर नकारात्मक चित्र उभे राहायचे. जुनी बस, निखळलेली आसने Seats, काचा फुटलेल्या किंवा धुळीने माखलेल्या खिडक्या गळणारे छत आणि चालताना होणारा कर्णकर्कश आवाज. मात्र आता एसटी आपली ओळख बदलताना दिसत आहे. एसटीच्या ताफ्यात आता वातानुकूलित आणि आरामदायक बस दाखल होत आहेत. मात्र या बसेस लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी चालविण्यात येत होत्या. आता एसटीने एक पाउल पुढे टाकले आहे. आता अशा बसेस ग्रामीण भागात पण चालविण्याचा विचार एसटी प्रशासनाने केला आहे.
एसटीने या करिता ५१५० ई – बसेस साठी मोठे टेंडर काढले आणि हे संपूर्ण टेंडर ओलेक्टरा (ईव्ही ट्रान्स) या कंपनीस देण्यात आले आहे. एकूण ५१५० बसेस असलेल्या या श्रेणीत ९ मीटर लांबीच्या २३५० बसेस आणि १२ मीटर लांबीच्या २८०० बसेस, एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार असून, याबसेसच्या माध्यमातून एसटी एक वेगळी श्रेणी निर्माण करत असल्याचे समजते.
मध्यम लांब पल्ला, शहरी तसेच ग्रामीण भागात या बसेसचे प्रामुख्याने मार्गक्रमण करण्याचे एसटीचे प्रयोजन असून, ३५ + १ (चालक) इतकी (नॉन पुशबॅक) आसन क्षमता असलेली’ओर्डीनरी एसी बस’ अशी एक वेगळी श्रेणी एसटी नव्याने आणू इच्छिते हे बसवरील नव्या रंगसंगतीवरून समजत आहे.सध्या या बसेस ठाण्यात आल्या असून, ट्रायल आणि पासिंग झाल्यावर आपल्या इच्छित मार्गावर लवकर सुरू होतील, अशी आशा आहे.

Loading

कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे घसरले; वाहतूक विस्कळीत

ठाणे : मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ एका पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरून अपघात झाला आहे.  ही घटना आज रविवार, 10 डिसेंबर संध्याकाळी 6:31 च्या सुमारास घडली आहे. 
“कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल्वे एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) मागवण्यात आले आणि अपघातस्थळी हलवण्यात आले,” असे मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. अधिक माहितीची प्रतीक्षा करण्यात येत आहे.  

Loading

Video: रानडुकरांच्या शिकारीचा विडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करणे पडले महागात; ५ जणांना अटक, सावंतवाडी वन विभागाची कारवाई

सावंतवाडी : रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून त्याचा मांसाची तस्करी करणे तसेच इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक युवकाला सावंतवाडी वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले.
रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी रोहित कोळी याला अटक करण्यासाठी त्याचा माग काढत सावंतवाडी वन विभागाची टीम याबाबत कसून तपास करत होती. या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदरचा युवक हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची टीम रवाना झाली. यानुसार फिरते पथक सांगली यांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली हायवेवर रोहित कोळी व इतर ५ संशयितांना १० जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदरच्या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
सदरची कारवाई ही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर(प्रा.) श्री.आर. एम. रामनुजम, उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

 

Loading

आरपीएफची जवानांनी वाचवले ६६ प्रवाशांचे प्राण.

प्रतिनिधी: रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF ‘जिवन रक्षक अभियानांतर्गत’ रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एप्रिल ते ऑक्टोबर या काळादरम्यान विविध विभागांमध्ये साहस आणि प्रसंगावधान दाखवून चुकीच्या पद्धतीने गाडी पडणाऱ्या ६६ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.

यात मुंबई विभागातील १९, भुसावळ विभागातील १३, नागपूर विभागातील १४,पुणे विभागातील १५ तर सोलापूर विभागातील ५ प्रवाशांचा समावेश आहे.

रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, “अमानत” या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, रोख, दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या आहेत.  

 

यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने ८५७ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. त्याची किंमत २.७७ कोटी रुपये आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य आहे. भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख किमतीचे सामान नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख किमतीचे सामान, पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख किमतीचे सामान तर सोलापूर विभागात ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख किमतीच्या सामानाचा सामावेश आहे. 

मध्य रेल्वेचे आवाहन 

रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रवाशांनी त्यांना सहकार्य करावे तसेच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नये असे आवाहन केले आहे.

 

Loading

पनवेल तालुक्याला भूकंपाचे हादरे!

पनवेल:  पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. 

हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात  भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.

मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं. 

Loading

राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; कोकणसह ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Rain Alert : भारतीय हवामान खात्याने येत्या ५ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 
आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना तसेच कोल्हापूर,सातारा ,पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २५  नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी  करण्यात आला आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र नाशिक विभागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
दिनांक २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला नाही आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search