Category Archives: रत्नागिरी

संगमेश्वरमध्ये जनआक्रोश समितीचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी; मात्र आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आक्रमक रस्ता रोको-

संगमेश्वर | ११ जानेवारी २०२६

“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!”

“या तिरडीत झोपलाय कोण,आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!”

अशा तीव्र व आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात नागरिकांचा संयम संपल्याने जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, नियोजनाचा अभाव व ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच मुक्या जनावरांचे प्राण गेले असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी, कायमचे अपंग झाले आहेत. आर्थिक नुकसान व मानसिक त्रास हे कोकणकरांचे रोजचे वास्तव बनले आहे.

“अजून किती जीव गेल्यावर शासन व प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण संगमेश्वर परिसर काही काळ पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी कनिष्ठ अभियंता – जनतेचा संताप

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ कनिष्ठ अभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला.

“आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला.

सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करत होते, तर महिलांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.

अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी

दीर्घ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या.जनआक्रोश समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस व कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू.” अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.

चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, विशाखा खेडेकर.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील गंभीर गुन्हेगारी कसूर आहे, असा ठाम आरोप जनआक्रोश समिती व नागरिकांनी केला आहे.

या आंदोलनात जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह मुंबईतून आलेले ८० कोकणकर, संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सावधान! येथे बिबट्यांचा वावर आहे; रत्नागिरीतील ‘या’ १०५ गावांना सतर्कतेचा इशारा

   Follow us on        

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, ज्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे अशा १०५ गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे.

​बिबट्यांच्या संख्येत वाढ आणि मानवी वस्तीत शिरकाव

​वनविभागाच्या अंदाजानुसार, या परिक्षेत्रात सध्या सुमारे १०० ते १२५ बिबट्ये असण्याची शक्यता आहे. पूर्वी बिबट्यांचा अधिवास १० किमी परिसरात असायचा, मात्र संख्या वाढल्याने आता हा अधिवास ५ किमीपर्यंत मर्यादित झाला आहे. यामुळे शिकारीच्या शोधात बिबट्ये आता थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. पाळीव प्राण्यांवर आणि काही ठिकाणी माणसांवरही हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील बिबट्या प्रवण गावांची यादी

​१. रत्नागिरी तालुका (सर्वात जास्त बाधित)

​जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, कर्बुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके, खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, करला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरवेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली.

​२. लांजा तालुका / परिसर

​धडे, वनगुळे, गावाणे, कुरुचे, पुनस, लांजा, घुडेरे, मठ, गोळवल, वाडगाव, कगडवली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली.

​३. राजापूर तालुका

​पेंढखळे, सागवे, केरवण, भू, भानवलो, नाटे, तुळसंवडे, शिवणे, वडदहसोल, कोळ्ये, ओणी, वाटूळ, आडीवरे, ताम्हाणे.

​४. संगमेश्वर तालुका / क्षेत्र

​फुणगुस, कोसुंब, शिवणे, कुरुधुंडा, साखळे, आरवली परिसर, कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, कजारी, साखरपा परिसर.

​महत्त्वाची सूचना: वनविभागाने या १०५ गावांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. बिबट्या दिसल्यास स्वतःहून त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला कळवावे.

गणपतीपुळे समुद्रात पोहताना पुण्याचा तरुण बुडाला

   Follow us on        

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढला गेल्याने पुण्यातील १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल शिवाजी वाघमारे असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

जयगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे (वय १८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला. पोहत असतानाच अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेशुद्ध झाला.

त्याच्या शोधासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

स्थानिकांनी तातडीने त्याला वादळ-खांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

गुहागर : मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटला, क्लिनर जखमी

   Follow us on        

गुहागर: चिपळूण महामार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी सुमारास चारच्या दरम्यान अंजनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा क्लिनर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवेलकडून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा चालक चिखली परिसरात वाहनावरील नियंत्रण गमावून बसला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातामुळे टेम्पोत असलेली मच्छी रस्त्यावर विखुरली गेली, तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमी क्लिनरला स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

   Follow us on        

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने मुम्बई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाट मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरड हटवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जेसीबी व यंत्रसामग्रीच्या मदतीने रवी इन्फ्रा कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे अडथळे येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, घाट मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

   

Chiplun: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा टेरव येथे साडेतीनशे किल्ल्यांचे सचित्र प्रदर्शन.

   Follow us on        

चिपळूण: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूमधील १ अशा भारतातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याबद्दल ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को या संस्थेने महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण आहे. या ११ किल्ल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याचाही समावेश झाल्यामुळे विशेष आनंद आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे अवचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती व ऐतिहासिक वारसा या विषयी अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक मोने सर यांच्या संकल्पनेतून व संग्रहित ३५० किल्ल्यांचे सचित्र माहितीसह प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर प्रदर्शन व आनंदोत्सवाचे उद्घाटन टेरव गावचे मुंबई स्थित ग्रामस्थ व सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक श्री सुधाकर कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी सुमन विद्यालय टेरवचे शिक्षक श्री भंडगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, सौ चिपळूणकर, सौ निशिगंधा कांबळे , श्री अनंत पवार, सौ स्नेहल गायकवाड, श्री प्रवीण सन्मुख, श्रीमती तनुजा मोहिते, हे शिक्षक – शिक्षिका उपस्थित होत्या. या प्रदर्शनाचा लाभ सुमन विद्यालय टेरवचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा टेरव १ मधील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार सर यांनी केले तर आभार श्री प्रवीण सन्मुख यांनी मानले.

 

श्री दिपक मोने, मुख्याध्यापक

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव 

Chiplun: श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार.

   Follow us on        

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते.

 

जसे वैष्णवाच्यांत भजन – कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानी माता आहे. गोंधळ हा भवानी मातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.

 

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. त्या नंतर दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून *’भैरी – भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो -उदो -उदो’* असा उदघोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील.

 

कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

 

दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशा प्रकारे गोंधळ ह्या धार्मिक विधीची सांगता होईल.

 

गोंधळ या भवानी मातेच्या मुख्य व आवडत्या मंगल उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

Mumbai Goa Highway: चिपळुणात १७ लाखांचा गुटखा जप्त; सावंतवाडीच्या तरुणाला अटक

   Follow us on        
चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे तब्बल 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली हा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर टेम्पोचालक सावंतवाडी येथे राहणारा आहे.. गुरुवारी परजिह्यातून बोलेरो टेम्पो भरुन तब्बल 16 लाख 94 हजार किंमतीचा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे सापळा रचला. यावेळी महामार्गावरुन आलेला बोलेरो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेली मोठ-मोठी पोती असल्याचे आढळले. त्यात 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याचा समावेश आहे. या प्रकरणी सज्जन निवेगी याला पोलिसांनी अटक केली तसेच गुटख्यासह लाखाचा टेम्पो असा 23 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सज्जन निवेगी पाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे पानटपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परजिह्यातून आणलेला हा गुटखा चिपळुणात नेमका कोणाला दिला जाणार होता, शिवाय यामागे अन्य कोणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Rajapur: अणूस्कुरा घाटात दरडीचा दगड अचानक रस्त्यावर

   Follow us on        
Rajapur: अणूस्कुरा घाटात सोमवारी एक मध्यम स्वरूपातील दगड रस्त्यावर येऊन पडला होता. स्थानिक ग्रामस्थांनी वाहन चालकांच्या सहकाऱ्याने तो दगड तत्काळ हटविला. मात्र सुदैवाने यादरम्यान तिथून कोणतंही वाहन जात नसल्याने अनर्थ टळला.
अणूस्कुरा घाट वाहतूकीसाठी जरी अनुकूल वाटत असला तरी केव्हा दरड कोसळेल याचा काही नेम नाही, अशी स्थिती असते. गेल्या वर्षी दरड कोसळून मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो वेळीच हटवून घाटमार्गे वाहतूक पूर्ववत सुरु केली होती.
अणूस्कुरा घाट (Anuskura Ghat) हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा एक घाट आहे. हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे. अणुस्कुरा घाट कोकण आणि घाटमाथा यांना जोडतो, कोल्हापूरला जाण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे, त्यामुळे हा घाट कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याने हा मार्ग धोकादायक बनतो.

Ratnagiri: कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग; मुंबईतील ‘सीलिंक’ च्या धर्तीवर केबल स्टे ब्रिजही उभारला जाणार

   Follow us on        
रत्नागिरी:कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रांताना जोडण्यासाठी केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. या ब्रिजमुळं सातारा आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. तसंच, या ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यूविंग गॅलरीदेखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळं सह्याद्रीतील कोयनेचे बॅकवॉटर आणि सनराइज व सनसेटही पर्यटकांना पाहता येणार आहे.
या नवीन मार्गामुळं कोयना खोऱ्यातील दुर्गम भागांना जोडणारा आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडेल गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच घाटमार्ग असून या पुलामुळं रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर सुमारे 50 किमीने कमी होणार आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे या पुलावरुन सातारा व महाबळेश्वर असा प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील सीलिंकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकाराचा ब्रिज होणार आहे. हा ब्रिज 540 मीटर लांब आणि 14 मीटर रुंदीचा पूल असणार आहे. मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. त्यामुळं आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाटमार्गाऐवजी नवा मार्ग प्रवाशांना खुला होईल. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गाने नव्या ब्रिजवरुन पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा असा प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे. त्यामुळं तापोळा ते सातारा हे अंतर 10 ते 15 किमीने कमी होईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search