Category Archives: रत्नागिरी

रत्नागिरी येथे बोलेरो टेम्पो पलटी होऊन अपघात

रत्नागिरी : झरेवाडी नजीक टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. अज्ञात वाहनाने हुल दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी येथून बारामती कडे जाणाऱ्या मच्छी वाहतुकीचा बोलेरो टेम्पो मोठ्या वाहनाने हूल दिल्याने अवघड वळणावर सकाळी साडे सहाच्या सुमारास कठड्यावर आदळला. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
पुणे येथून रत्नागिरी येथे मच्छी घेऊन आलेला बोलेरो टेम्पो कंपनीमध्ये मच्छी उतरवून परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. यावेळी स्थानिकांनी मदत करत बोलेरो गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.

उपग्रह टॅगिंग – ऑलिव्ह रिडले कासवांचे गूढ उलगडणार ?

रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना  उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. 
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण 
 टॅगिंग केलेल्या कासवांपैकी  एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी  दिली आहे.
टॅगिंग चा इतिहास 
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास  माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी  हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location)  माहिती होण्यास मदत होते.   

एसटी बसेसच्या कमी भारमानावर उपाय; रत्नागिरीत आता धावणार मिनी बसेस..

संग्रहित फोटो

रत्नागिरी: ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी भारमानामुळे बंद होताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा ग्रामीण भागात एसटीला कमी भारमान मिळत असल्याने अनेक फेऱ्या बंद करण्याची वेळ एसटी विभागावर आली आहे त्यातून महामंडळाने पर्याय काढण्याचे ठरवले असून आता ग्रामीण भागात मोठ्या बसेस ऐवजी मिनी बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी रत्नागिरीच्या एसटी विभागाला नवीन पन्नास मिनी बसेस देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

हेही वाचा >एका रात्रीत ३ मंदिरात चोरी; चोरट्यांसाठी कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’

सुरुवातीला या 50 मिनी बसेस कंत्राटी पद्धतीने एसटी विभागाला पुरवण्यात येणार आहेत त्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या बसेस मध्ये आणखी वाढ करण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात येणार आहे. 

मिनी बस चा प्रयोग आता शहरात यशस्वी होताना दिसत आहे. मोठ्या बसशी तुलना केल्यास या बसचा प्रवास जलद आणि कमी खर्चिक होतो. या बसेस ताफ्यात आल्यास व्यवस्थापनाच्या दृष्टीने लवचिकता पण येईल. कमी भारमान असलेल्या गावी मिनी बस सोडल्यास एसटीला तोटाही होणार नाही. 

संगमेश्वर येथे १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

संगमेश्वर : तालुक्यातील मुरडव येथे  बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे. रिया रमेश नावले (वय १७, मुरडव-नावलेवाडी) अस या मुलीचं नाव आहे. मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला आहेत. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नसताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काजू बागेतील आग विझवताना शेतकर्‍याचा मृत्यू

रत्नागिरी:  रत्नागिरी शहरापासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागायातीला लागलेल्या भीषण वणव्यात एका शेतकऱ्याचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला आहे. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

हातखंबा येथील काजूच्या बागेत आचानक वणवा पसरला. त्यामुळे बाग वाचविण्यासाठी शेतकरी गोविंद घवाळी यांनी धाव घेतली. मात्र एवढी आग भीषण होती की त्या आगीत ते होरपळले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली. 

 

कोकणातील ८ कातळशिल्पे संरक्षित होणार

रत्नागिरी:  रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे.  अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठह कातळ शिल्पे राज्य संरक्षित होणार आहे.

खाली नमूद केलेली कातळशिल्पे संरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.

  1. भगवतीनगर,
  2. चवे,
  3. देवीहसोळ,
  4. कापडगाव,
  5. उक्षी,
  6. कशेळी,
  7. वाढारूणदे,
  8. बारसू
    या रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.

ही शिल्प एका विशिष्ठ जागेत न आढळता समुद्र किनार्‍यालगत सुमारे ३०० कि.मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळशिल्पावर अश्मयुगी संस्कृती रूजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्‍या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास संरक्षण आणि जतन होवू शकते. म्हणून सुधीर रिसबूड, त्यांच्या सहकार्‍यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.

संगमेश्वर येथे सापडला बिबट्याचा मृतदेह; वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचा संशय..

 

संगमेश्वर: मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून २ ते ३ वर्षे अंदाजे वय असलेल्या या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार करत आहेत. वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे 

मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ श्री.सुर्वे व पोलिस पाटील यांनी कळविल्या नंतर परिक्षेत्र वन अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यासमवेत घटनास्थळी समक्ष पाहणी केली. त्यावेळी सदर बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले व ती मादी आहे. 

या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसा पूर्वी झाला असावा. बिबट्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला असावा असा अंदाज आहे

 

पॉलिश करण्याच्या बहाण्याने सव्वा तीन लाखाचे दागिने लंपास

रत्नागिरी | उजाला पावडरच्या जाहिरातीबाबत माहिती देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी सोन्याचे दागिने साफ करुन देतो सांगत दागिने लंपास केल्याची घटना गोळप विवेकानंद येथे घडली. याप्रकरणी अज्ञात दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शोभा श्रीकांत पाटील (57, गोळप विवेकानंदनगर, गारवा घर नं. १३१९ रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली.

नक्की काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शोभा पाटील यांच्या घरी दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी उजाला पावडरचे जाहिरातीबाबत माहिती दिली. त्यानंतर सोन्याचे दागिने साफ करुन देतो असे सांगितले. शोभा यांनी दागिने दिल्यानंतर त्यांनी गॅसवरील कुकरमध्ये साफ करण्यासाठी टाकले आहेत असे भासवले. शोभा या दागिने पाहण्यासाठी गेल्या असता दोघे तरुण दागिने घेऊन फरार झाले. कुकरमध्ये दागिने सापडलेच नाहीत. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच पूर्णगड पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अज्ञातावर भादविकलम 419, 420, 34 गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरी येथे मानवी वस्तीत आढळले खवले मांजर

रत्नागिरी : खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर एक पथक त्या ठिकाणी दाखल होऊन त्या खवले मांजराला जीवनदान देण्यात आले आहे. पथकाने खवले मांजर ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून ते सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यात आली त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती केतन साळवी यांनी दूरध्वनीद्वारे दिली होती. या बचाव कार्यात पालीचे वनपाल एन.एस.गावडे, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू, साबणे, जाकादेवी वान रक्षक शर्वरी कदम यांनी सहभाग घेऊन खवले मांजर ताब्यात घेतले आणि नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वन रक्षक रत्नागिरी आणि चिपळूण सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले.

खवले मांजरा विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

खवले मांजर भारतात हिमालय आणि ईशान्येकडील भाग वगळता सगळीकडे आढळतं. पण शिकारीमुळे बहुतेक भागात ही प्रजाती नष्ट झाली आहे. भारतात भारतीय खवले मांजर आणि चिनी खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. या प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर खवले असतात त्यामुळे धोक्याची सूचना मिळाली की ते आपल्या शरिराचे वेटोळे करून घेते. हल्ला न करता स्वतःचं संरक्षण करण्याची वृत्ती निसर्गाने त्याला बहाल केलीये. साधारण पाच फूट लांब आणि मोठी शेपटी असलेल्या या प्राण्याला दात नसतात पण शिकार करण्यासाठी एक फुट लांब जीभ असते. खवले मांजर आपल्या या एक फूट लांबीच्या चिकट जीभेने मुंग्या, वाळवी आणि डोंगळे खावून जगते.

तस्करीसाठी वापर
खूप पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे. पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. पण गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचं दिसतं. खवले मांजरांची बिळं शोधून त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्याची खवलं काढण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकलं जातं. या खवल्यांची किंमत आंतरराष्ट्रीय तस्करीत लाखोंमध्ये असते.

या खवल्यांचा उपयोग
ही खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो.

हेही वाचा – देवगड येथे सापडले आगळे वेगळे आणि विलक्षण मानवाकृती कातळशिल्प

तस्करी रोखण्यासाठी उपाय.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने International Union for Conservation of Nature (IUCN) जाहीर केलेल्या रेड डेटा लिस्ट म्हणजेच धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आलाय. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत या खवले मांजराचा पहिल्या श्रेणीत समावेश करण्यात आलाय. स्थानिक पातळीवर सुद्धा काही प्राणीमित्र संस्था या प्रजातीला वाचविण्यासाठी पुढे सरल्या आहेत.

 

वाशिष्टी नदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनची सामग्री दाखल

रत्नागिरी | चिपळूण येथे यांचा यंत्र वाशिष्टी नदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशन ची सामग्री दाखल झाली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा ची जबाबदारी नाम फाउंडेशनने स्वीकारली आहे. शासनाने गाळ उपसण्यासाठी लागणारा इंधन पुरवठ्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार सध्या दोन पोकलेन दाखल झाले आहेत .वाशिष्टीने देखील गाळ उपशासाठी गतवर्षी एकूण तीन टप्पे करण्यात आले होते त्यानुसार काही प्रमाणात गाळ काढला गेला अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे शिल्लक असल्याचे बचाव समितीचे म्हणणे आहे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम अतिशय संत गतीने होत असल्याचे निदर्शनास येतात चिपळूण बचाव समिती पुन्हा आक्रमक झाली होती

२२ जुलै २०२१ रोजी चिपळूणात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले.प्रत्येक क्षेत्राला या पुराचा जबरदस्त असा फटका बसला.या महापुराची कारणमीमांसा झाली तेव्हा धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेले भरमसाठ पाणी तसेच चिपळूणमधील वाशिष्ठी व शिव या दोन नद्यामध्ये साठलेला भयंकर गाळ अशी दोन प्रमुख कारणे समोर आली.त्यासाठी चिपळूण बचाव समितीने पुढाकार घेत प्रथम नद्यांमधील गाळ काढण्याची मागणी शासनाकडे केली.प्रथम दुर्लक्ष झाल्याने बचाव समितीने थेट उपोषणाचे हत्यार उपसले आणि त्याला एका जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search