Category Archives: शेती
सिंधुदुर्ग :काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. या वर्षी काजू हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला आहे. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. मात्र काजू बीला प्रतिकिलो फक्त १२६ रुपये दर सध्या दिला जात असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे.
नोव्हेंबरमध्ये थंडीचा अभाव होता. त्यामुळे या वर्षी काजूला चांगला मोहर आला नाही. त्याचा परिणाम काजू उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तरीदेखील काजू बीला १२६ रुपयेच दर मिळत आहे. काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी बागायतदारांकडून सध्या सुरू आहे.
हंगामाच्या सुरवातीलाच जर असा कमी दर भेटत असेल तर काही दिवसांत आवक वाढली काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न काजू उत्पादक शेतकरी विचारताना दिसत आहेत. कारण मागील दोन तीन वर्षे पाहता हा दर शंभर रुपयाच्या खाली गेला आहे. काजूला हमी भाव मिळावा या शेतकर्यांच्या मागणीला शासनाकडून नेहमीच केराची टोपली दाखवली जात आहे.
वन्यप्राणी, माकडे यामुळे ईतर शेती उत्पादन करणे खूप तोट्याचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग काजू बागायती कडे वळला आहे. वडिलोपार्जित तुकड्यांत जेथे जमेल तेथे विकत आणून काजू कलमांची लागवड करणे, त्याला खतपाणी आणि ईतर मशागत करून वाढवून शेवटी मिळणार्या उत्पन्नातून मजुरी आणि बाकीचे खर्च सुध्दा निघत नसतील तर आम्ही जगावे तरी कसे असा प्रश्न काजू उत्पादक शेतकर्यांकडून विचाराला जात आहे.
रत्नागिरी : ऐन हंगामात कोणतेही कृषी उत्पादन एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यास दर कोसळतात, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पैशाची निकड असल्याने कमी बाजारभावात उत्पादन विकून त्याला मोठा होतो. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती Ratnagiri District Agricultural Produce Market Committee व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्तपणे दर वर्षी जिल्ह्यात काजू बी Cashew Nut Mortgage Scheme शेतमाल तारण योजना राबवित असते.
ज्या शेतकऱ्यांना पडलेल्या भावात काजू न विकता तारण ठेवायचे आहेत त्यांना हे काजू तारण ठेवून वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज दिले जाते. यासाठी कालमर्यादा सहा महिने (१८० दिवस) एवढी आहे. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पीक नोंदणीचा सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील जोडणे अनिवार्य आहे. तसेच काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत १७.५ टन काजू बी तारण ठेवण्यात आला असून, १३ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
सध्या ९० रुपये दर सुरू आहे. पावसाळा तोंडावर असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतमाल तारण योजना फायदेशीर ठरते. हंगामाच्या प्रारंभी काजूला चांगला दर मिळतो; मात्र जसजशी आवक वाढते, तसेतसे भाव गडगडतात. आता तर हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे. आधीच उत्पादन कमी आहे. त्यातच काजू कमी किमतीत विकणे परवडणारे नाही. त्याऐवजी तारण ठेवणे शक्यआहे
दोडामार्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी परत येवून धुडगूस घालणे चालू केल्याने येथील नागरिकांमध्ये चिंतेचे अणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवस केर आणि मोर्ले या गावांतील बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करून त्यांनी आपला मोर्चा वायंगणतड या गावी वळवला आहे.
अचानक शेतात हत्तीं आल्याने वायंगणतड ग्रामस्थांनी शेतात घाव घेवून त्यांना हिसकावून लावण्याच्या प्रयत्न केला. मात्र हत्तींना त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. त्यानंतर खबर मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी हजर झाले. ग्रामस्थांनी आणि या कर्मचाऱ्यांनी कसेबसे त्यांना हिसकावून लावले. मात्र हत्तीं पुन्हा आल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेताची, बागायतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने हाता तोंडाशी आलेले शेती उत्पादन शेतकर्यांना गमावण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. उन्हाळी शेती, काजू, नारळ, सुपारी केळी या बागायतीचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.

- 1
- 2











