Category Archives: सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.
बॅनरमधील मजकूर काय आहे ?
“प्रिय दिपकभाई,
म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.
मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.
तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.
आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??
भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”
सिंधुदुर्ग :भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक ही गुपचूप भेट घेतली. वैभवनाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे. या भेटीचे नेमके कारण समजले नाही. मात्र या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.वैभव नाईक हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा याआधी येत होत्या. मात्र या भेटीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.
सावंतवाडी : बहुचर्चित संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात जाणार याबद्दल शासनाने काही निश्चित माहिती दिली नसल्याने येथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शासनाच्या कार्यालयां दरम्यान होणार्या पत्र व्यवहारांत हा मार्गच्या नावात माडखोल-सावंतवाडी-इन्सुली असे नमूद केल्याने हा मार्ग सावंतवाडीहून बांदा शहरात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाला एक पत्र पाठवले आहे. संकेश्वर ते आंबोली फाट्या पर्यंत रस्त्याच्या रुंदीरकण व मजबूती करणाचे काम सुरू आहे. तो भाग आपल्या विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाकडे केली आहे.
नियोजित संकेश्वर-बांदा क्रमांक ५४८ हा महामार्ग नेमका दाणेली-बावळाट मार्गे बांद्यात जाणार की सावंतवाडी शहरातून जाणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अधिकृत रेकॉर्ड कोणाचकडे नाही. अद्याप पर्यत आंबोलीच्या पुढे या रस्त्याचे सर्व्हे केला गेला नाही आहे. मात्र आज बांधकाम विभागाला रस्ता व त्या संबंधी असलेले रेकॉर्ड वर्ग करण्याबाबत पत्र झाले आहे. त्यात हा महामार्ग माडखोल, सावंतवाडी, इन्सुली येथून जाणार असल्याचे घोषित केल्याचा उल्लेख आहे. मात्र पत्रव्यवहारात असा उल्लेख केला असला तरी शासनाकडून या महामार्गाचा अंतिम आराखडा जाहीर केल्याशिवाय हा महामार्ग नक्की कुठून जाणार हे १००% खात्रीने सांगणे चुकीचे ठरेल.
सावंतवाडीकरांची मागणी..
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरा बाहेरून नेण्यात आला आहे. पूर्वीचा जुना मुंबई गोवा महामार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र वेगवान प्रवासाच्या नावाखाली तो बाहेरून नेण्यात आला. त्याचा शहराच्या विकासावर तसेच पर्यटनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यात संकेश्वर-बांदा महामार्ग सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात नेणार असल्याची चर्चा चालू झाली. मात्र या गोष्टीला सावंतवाडीस्थित नागरिकांकडून विरोध होत आहे. निदान हा महामार्ग तरी सावंतवाडी शहरातूनच नेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शक्तिपीठ महामार्गाचे काय?
समृद्धी महामार्गा पेक्षाही लांबीला मोठा असलेला नागपूर – गोवा महामार्ग तळकोकणातून जाणार आहे. या महामार्गाच्या आरंभीक तथा कच्च्या आराखड्यानुसार हा महामार्गसुद्धा आंबोली मार्गे गोव्याला जाणार आहे. मात्र हा मार्ग आंबोली ते गोवा कोणत्या गावातून /शहरातून जाणार याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह आहे.
मुंबई, दि.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे एकच सार्वजनिक बांधकाम मंडळ असून, स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या गतीमान कामकाज होणार आहे. या नवीन मंडळ कार्यालयासाठी १७ पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून यातील १० नियमित पदे आणि ७ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.
सद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी मिळून एकच मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहे. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात दापोली पासून दोडामार्ग पर्यंत सुमारे ४०० किलोमीटरचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय मंजुरी मिळाल्याने बांधकाम विभागाचे कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी विकास निधी अधिक प्राप्त होऊन विविध प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पद्धतीने होईल.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी या विभागाकडे मिळून सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी सुस्थीतीत आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.