Category Archives: सिंधुदुर्ग

नियतीपुढे जिद्द हरली! दहावीत ९९ टक्के गुण मिळवणारी कोकणची ‘नीट’ टॉपर सिद्धी भिडे हिचे वयाच्या २० व्या वर्षी निधन

 

   Follow us on        

बांदा (सिंधुदुर्ग):
एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करायची जिद्द आणि दुसरीकडे शरीराला ग्रासलेला जीवघेणा आजार, अशा द्वंद्वात अखेर मृत्यूचा विजय झाला. दहावीत ९९ टक्के गुण मिळवून आणि NEET परीक्षेत कोकणात अव्वल येऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे शुक्रवारी कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनाने संपूर्ण बांदा शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


कर्करोगावर मात करत मिळवले होते दैदिप्यमान यश


सिद्धी भिडे हिचा प्रवास कोणत्याही चित्रपटाला शोभेल असा प्रेरणादायी पण तितकाच क्लेशदायक होता. सातवीत असतानाच तिला कर्करोगाचे (Cancer) निदान झाले होते. मात्र, या संकटाने खचून न जाता तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवून सर्वांना थक्क केले होते. त्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या NEET परीक्षेतही तिने कोकण विभागातून प्रथम येत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले होते.


डॉक्टर होऊन सेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण


सिद्धीला स्वतः कॅन्सरचा त्रास होत असतानाही, भविष्यात डॉक्टर होऊन इतरांचे प्राण वाचवायचे होते. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून ती नक्कीच एक उत्तम डॉक्टर झाली असती, अशी भावना तिचे शिक्षक आणि नातेवाईक व्यक्त करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावली आणि वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली.

“समान मत, समान किंमत!” राजकीय नेत्यांना चिमटा काढणारा कणकवलीतील तो बॅनर लक्ष वेधतोय

   Follow us on    

 

 

कणकवली: निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पडतो, हे काही नवीन नाही. मात्र, याच पैशांच्या वाटपावरून आता मतदारांनी चक्क बॅनरबाजी करत राजकीय नेत्यांना चिमटा काढला आहे. कणकवली तालुक्यातील हळवल येथे लावण्यात आलेला एक बॅनर सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

​काय आहे बॅनरवर?

​हळवल ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळच ग्रामस्थांनी एक मोठा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिले आहे:

​”समान मत, समान किंमत..! शहरातील मतदारांना १५ हजार रू. देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये!”

— ग्रामीण भागातील मतदार

​नेमके प्रकरण काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना १०,००० ते २५,००० रुपयांपर्यंत वाटप झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती. याच चर्चेचा धागा पकडून ग्रामीण भागातील मतदारांनी हा उपरोधिक बॅनर लावला आहे.

​”पैशाची हाव की लोकशाहीवर घाव?” असा यक्षप्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. जर शहरात मताची किंमत एवढी मोठी असेल, तर ग्रामीण भागात भेदभाव का? असा तिरकस सवाल करत मतदारांनी राजकीय व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर उपरोधिक टीका केली आहे.

​सोशल मीडियावर व्हायरल

​या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अरण्यातून साक्षात अवतरला ‘वन विनायक’; मळगावच्या खडपकर कुटुंबाची २६ वर्षांची अनोखी भक्तीगाथा

   Follow us on    

 

 

सावंतवाडी: निसर्ग आणि मानवाच्या नात्याचे अनेक पदर आपण अनुभवतो, पण सावंतवाडीच्या माळगावात एक असा चमत्कार घडला ज्याने श्रद्धेला नवी परिभाषा दिली. एका बाजूला पितृशोक आणि दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या विसर्जनाचे दुःख अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या एका भक्ताला चक्क जंगलात ‘साक्षात देव’ भेटला. ही कथा आहे सुमन खडपकर आणि त्यांच्या घरी विराजमान असलेल्या ‘श्री वन विनायक’ या लाकडी मूर्तीची.

​जेव्हा ‘तो’ अरण्यात भेटला…

​वर्ष २००० ची ही गोष्ट. खडपकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पितृनिधनामुळे घरच्या गणपतीचे विसर्जन अवघ्या दीड दिवसात करावे लागले. लाडक्या बाप्पाला इतक्या लवकर निरोप द्यावा लागल्याची सल सुमनजींच्या मनात होती. अशातच माळगावच्या घनदाट अरण्यातून जात असताना, त्यांना निसर्गाच्या कुशीत लाकडाच्या ओंडक्याला आलेला एक नैसर्गिक आकार दिसला. तो हुबेहूब ‘एकदंती’ गणपतीसारखा होता. जणू बाप्पानेच शब्द दिला होता – “विसर्जनाचे दुःख करू नकोस, मी आता तुझ्या घरी कायमचा वास्तव्याला येतोय.”

​श्रद्धेचा ‘अडीच दशकांचा’ प्रवास

​तेव्हापासून आजतागायत, म्हणजे तब्बल २६ वर्षे, ही नैसर्गिक लाकडी मूर्ती खडपकर कुटुंबाचा अविभाज्य हिस्सा आहे. गेल्या वर्षी या मूर्तीचे ‘श्री वन विनायक’ असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी माघी गणेशोत्सवाचा सोहळा येथे एखाद्या उत्सवासारखा साजरा होतो. यंदाही सकाळी अभिषेक, पूजन आणि दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

​भक्तीचा ‘मळा’ आणि कीर्तनाची ‘सेवा’

​या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे सायंकाळची कीर्तन सेवा. स्वतः सुमन खडपकर जेव्हा आपल्या रसाळ वाणीने कीर्तन करतात, तेव्हा उपस्थित भक्त मंत्रमुग्ध होतात. यंदा त्यांना मयूर गवळी यांनी हार्मोनियमवर साथ दिली. केवळ एक धार्मिक विधी न राहता, या उत्सवाने माळगावच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

​नात्यांची वीण आणि निसर्गाची ओढ

​आजच्या काळात जिथे माणसांमधील संवाद संपत चालला आहे, तिथे या ‘वन विनायकाने’ सर्वांना एकत्र गुंफले आहे. निसर्गाने स्वतः घडवलेली ही मूर्ती आणि खडपकर कुटुंबियांची त्याप्रती असलेली निष्ठा, हे श्रद्धा आणि पर्यावरणाच्या संगमाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

Kudal: पिंगुळी येथे दि.२९ जानेवारीला सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या ४१ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

   Follow us on    

 

 

कुडाळ(प्रतिनिधी):
प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४१वा पुण्यतिथी उत्सव दि.२९ते ३१ जानेवारी २०२६ पासून सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, कुडाळ येथे सुरू होत असून या कालावधीमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमासोबतच आरोग्य उपक्रम घेण्यात आला आहे.

 

कार्यक्रमाचा शुभारंभ प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांच्या ‘ वर्णावी ती थोरी”या लीलामातृचे सामुदायिक पारायणाने उत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे. तद्वतच राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीप बुवा मांडके रामदासी पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांची आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्य कार्यक्रमाला शनिवारी दि.३१जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून प्रारंभ होऊन नित्य काकड आरती ,सकाळी ९ ते१० या वेळेत राऊळ महाराज समाधी मंदिरात अभिषेक व सार्वजनिक गाऱ्हाणे त्यानंतर प.पू.विनायक अण्णा महाराज पादुका पूजन १०.३० ते ११.३० हरिपाठ – जीवन विद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित उपासना व संगीत साधना ११.३० ते १२.३० नामस्मरण श्रीपत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज नामस्मरण परिवार माणगाव दुपारी १२.३० ते १ समाधीस्थळी महाराजांची महाआरती त्यानंतर दुपारी १ते रात्री ११ अखंड महाप्रसाद तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातून वारकरी भजन मंडळे आपली सेवा राऊळ महाराज चरणी सादर करतील. रात्रौ ८ते १० या वेळेत प.पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन होईल. ठिक ११ वाजता ‘लोकराजा ‘ सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेहरू यांचा महापौराणिक नाट्यप्रयोग ” ब्रम्हसंकेत सादर होईल.तरी समस्त राऊळ भाविकांनी सदर पुण्यतिथी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठोबा विनायक (अण्णा) राऊळ सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी यांनी केले आहे.

Sindhudurg: मोठी बातमी:प्रशासकीय राजवट संपणार! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर

   Follow us on    

 

 

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत असल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.

​प्रशासकीय राजवट संपणार; ५.९९ लाख मतदार बजावणार हक्क

​मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन पेचामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होती. आता या निवडणुकांमुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधी मिळणार आहेत.

​एकूण मतदार: ५,९९,५६७

​मतदान केंद्रे: ८७०

​जिल्हा परिषद जागा: ५०

​पंचायत समिती जागा: १००

​अध्यक्षपद ‘खुले’; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘खुले’ (General) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. हे पद सर्वांसाठी खुले झाल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

​पंचायत समित्यांचे आरक्षण: ४ तालुक्यांत ‘महिला राज’

​जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षणही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आठपैकी चार तालुक्यांचे नेतृत्व महिलांकडे जाणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

​तालुकानिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:

सावंतवाडी – अनुसूचित जाती (महिला)

कणकवली – ओबीसी (महिला)

दोडामार्ग – सर्वसाधारण (महिला)

मालवण – सर्वसाधारण (महिला)

वेंगुर्ला – ओबीसी (सर्वसाधारण)

कुडाळ – सर्वसाधारण (खुले)

वैभववाडी – सर्वसाधारण (खुले)

देवगड – सर्वसाधारण (खुले)

निवडणुकीचे महत्त्व

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ मानले जाते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्येही मोठा उत्साह आहे. प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवरून या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या या मतदानानंतर जिल्ह्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विधवा प्रथा बंद करण्यासाठी कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; राज्य महिला आयोगाकडून दखल

   Follow us on    

 

 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ग्रा. पं.च्या अभिनंदनाचे पत्र सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांना पाठविले आहे.

आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही, तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधने झुगारून सन्मानाने मुख्य प्रवाहात येतील तसेच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचे कार्य करेल व आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल.

आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचे स्वागत करतो. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी आम्हाला खात्री असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

 

परप्रांतियांना जमीनी विकणार नाही; ग्राम देवतेसमोर नारळ ठेवत गावकऱ्यांनी घेतली शपथ

   Follow us on    

 

 

दोडामार्ग | १२ जानेवारी (प्रतिनिधी):

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील (इकोसेन्सिटिव्ह झोन) असलेल्या कोलझर गावामध्ये सध्या परप्रांतीय लोकांचा वावर वाढल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या जमिनी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कोलझरमधील ग्रामस्थ एकवटले असून, त्यांनी ग्रामदेवतेसमोर नारळ ठेवून सामूहिक शपथ घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

​गेल्या काही दिवसांपासून या भागात अनधिकृत उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनींच्या विक्रीचे व्यवहार अद्याप अधिकृतरीत्या समोर आले नसले तरी, भविष्यात गावातील जमिनी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नयेत यासाठी ग्रामस्थ सावध झाले आहेत.

ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय:

  • जमीन विक्रीवर बंदी: गावातील कोणत्याही नागरिकाने आपल्या रक्ताच्या नात्याबाहेरील व्यक्तीला जमीन विकू नये, याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.
  • व्यावसायिकांना विनंती: ज्यांनी जमिनी विकण्याचे ठरवले आहे किंवा ज्यांच्या चर्चा सुरू आहेत, त्यांना विनंती करून हे व्यवहार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • आंदोलनाचा इशारा: इथून पुढे कुणालाही न विचारता अनधिकृत उत्खनन किंवा जमिनींचे व्यवहार झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलनात्मक लढा उभारला जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

​निसर्गसंपन्न असलेल्या कोलझर गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे.

कासार्डे (सिंधुदुर्ग) येथील कवी ओंकार धुरी यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र (ISO 9001:2015 मानांकन प्राप्त) व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार दिननिमित्त दर्पण रत्न पुरस्कार २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावचे कवी ओंकार धुरी यांना काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दर्पण रत्न पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.

अवघ्या २२ व्या वर्षी कवी ओंकार धुरी यांनी काव्य क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवला असून, लहानपणापासून कविता लेखनाची आवड जोपासत ते सातत्याने लेखन करत आहेत.

मागील वर्षी युवा कला मंच, रायगड आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कासार्डे गावाचे नाव राज्यभर उज्वल केले होते.

त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार २०२६ दि. ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे प्रदान करण्यात येणार आहे.

या सन्मानाबद्दल साहित्य व काव्य क्षेत्रातून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सिंधुदुर्ग : फोंडाघाट घोणसरी परिसरात बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद; ग्रामस्थांना मोठा दिलासा

   Follow us on    

 

 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – कणकवली तालुक्यातील फोंडाघाटजवळील घोणसरी-बोंडगवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्यांच्या कुटुंबातील एका बछड्याला वनविभागाने यशस्वीपणे जेरबंद केले आहे. ही कारवाई यशस्वी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, भीतीचे वातावरण काहीसे निवळले आहे.

घोणसरी गावातील बोंडगवाडी आणि पिंपळवाडी भागात गेल्या आठवड्यापासून बिबट्याची नर, मादी आणि दोन बछडे वावरत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. विशेषतः सतीचे मंदिर ते बोंडगवाडी हा जंगलमय आणि निर्मनुष्य मार्गावर या बिबट्यांचे वारंवार दर्शन होत होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. कामानिमित्त बाहेर पडताना लोकांना एकटे जाणे धोकादायक वाटत असल्याने घोळक्याने प्रवास करावा लागत होता.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घोणसरीचे सरपंच प्रसाद राणे आणि पोलीस पाटील भालचंद्र राणे यांनी फोंडाघाट वनविभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आणि बिबट्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. बिबट्याच्या शिकारी आणि वावराच्या आधारे गुरुवारी रात्री पिंजरा लावण्यात आला होता.

वनाधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि पिंजऱ्यात बिबट्याचा एक बछडा अलगद अडकला. या बछड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन कोल्हापूर वनक्षेत्रात हलवण्यात आले आहे. ही यशस्वी मोहीम फोंडाघाटचे नूतन वनपाल सारीक फकीर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

तथापि, एक बछडा जेरबंद झाला असला तरी नर-मादी बिबट्या आणि दुसरा बछडा परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवलेली दारू सापडली; इन्सुली येथे अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

   Follow us on    

 

 

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्याहून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली आहे. या कारवाईत सुमारे ३.५० लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन, असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कारवाईचा तपशील

​राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इन्सुली परिसरातील दत्त मंदिराजवळ वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत होती. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका ‘महिंद्रा बोलेरो’ टेम्पोला पथकाने अडवले.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवली होती दारू

​संशयास्पद वाटणाऱ्या या वाहनाची कसून तपासणी केली असता, मागील हौद्यात भाजीपाल्याचे रिकामे क्रेट ठेवलेले आढळले. मात्र, हे क्रेट बाजूला केल्यावर त्याखाली अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स सापडले.

​एकाला अटक

​या प्रकरणी पोलिसांनी तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात कडक पाऊले उचलली जात आहेत.

​जप्त केलेला मुद्देमाल:

​विदेशी दारू (३५ बॉक्स): ३,४९,३२० रुपये

​महिंद्रा बोलेरो वाहन: ५,००,००० रुपये

​एकूण किंमत: ८,४९,३२० रुपये

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search