Category Archives: कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणारी विशेष गाडी आता नियमित धावणार; थांबे आणि वेळापत्रक ईथे पहा

   Follow us on        

​Konkan Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोईम्बतूर आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष ट्रेन (०२१९८/०२१९७) आता अधिकृतपणे नियमित (Regularize) करण्यात आली आहे. या ट्रेनला आता २०१६०/२०१५९ जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर एक्सप्रेस म्हणून चालवले जाईल. या निर्णयामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे नवीन क्रमांक आणि वेळापत्रक:

​१. गाडी क्रमांक २०१६० (जबलपूर ते कोईम्बतूर एक्सप्रेस):

​दिवस: दर शुक्रवारी रात्री २३:५० वाजता ही ट्रेन जबलपूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: शनिवारी सकाळी ०६:४२ वाजता खंडवा, दुपारी १६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि रविवारी दुपारी १४:३० वाजता कोईम्बतूरला पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक २०१५९ (कोईम्बतूर ते जबलपूर एक्सप्रेस):

​दिवस: दर सोमवारी संध्याकाळी १७:०५ वाजता ही ट्रेन कोईम्बतूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: बुधवारी पहाटे ०२:३२ वाजता खंडवा आणि सकाळी ०८:४५ वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

​महाराष्ट्रातील प्रमुख थांबे (Commercial Stoppages):

​कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या या ट्रेनला महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

​भुसावळ

​नाशिक रोड

​पनवेल

​रोहा

​खेड

​चिपळूण

​रत्नागिरी

​कणकवली

​कुडाळ

​इतर राज्यातील प्रमुख थांबे: नर्सिंगपूर, गाडरवारा, पिपारीया, इटारसी, हरदा, खंडवा, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, पालक्काड इत्यादी.

​गाड्यांची रचना (Coach Composition):

​या एक्सप्रेसला एकूण २४ डबे (Coaches) असणार आहेत, ज्यामध्ये प्रवाशांच्या सर्व श्रेणींचा विचार करण्यात आला आहे:

​स्लीपर क्लास (WGSCN): ९ कोच

​थर्ड एसी (WGACCN): ६ कोच

​सेकंड एसी (WGACCW): २ कोच

​फर्स्ट एसी (WGFAC): १ कोच

​सामान्य डबे (GS): ४ कोच

​इतर (GSLR/GSLRD): २ कोच

​कधीपासून होणार सुरू?

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून लवकरच एका सोयीस्कर तारखेपासून ही ट्रेन नियमित सेवा म्हणून रुळावर धावणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास सुरुवातीला ही गाडी विशेष उद्घाटनात्मक सेवा म्हणूनही चालवली जाऊ शकते. प्रवाशांनी तिकीट बुकिंग आणि अधिकृत तारखेसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी रस्ता नसल्याने रुळांवरून चालताना एक्सप्रेसची धडक; नाधवडे येथील तरुणाचा जागीच मृत्यू

   Follow us on        

वैभववाडी:रेल्वेची जोरदार धडक बसल्याने नाधवडे-हेलकरवाडी येथील अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६) या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भीषण घटना सकाळी साडेआठच्या सुमारास शुकनदी पुलाजवळ घडली. अमोल खांडेकर हे मुंबईतील चिंचपाडा परिसरात आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह राहत होते आणि एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ते आपल्या मालकीच्या जमिनीत काजू लागवडीची पूर्वतयारी करण्यासाठी गावी आले होते.

रविवारी सकाळी ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरले आणि तिथून पायीच घराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शुकनदी पुलाजवळ पोहोचताच गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या निस्सार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संबंधित एक्सप्रेस सुमारे तासभर घटनास्थळी थांबवण्यात आली होती, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

​लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच अपघात; ग्रामस्थांचा आरोप

​या भीषण अपघातानंतर हेलकरवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या वाडीत जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. रस्त्याअभावी येथील लोकांना जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून किंवा पुलावरूनच ये-जा करावी लागते आणि याच मुख्य कारणामुळे हा भीषण अपघात घडला आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे हक्काच्या पर्यायी रस्त्यासाठी वारंवार तक्रारी व मागण्या करण्यात आल्या आहेत, मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या याच उदासीनतेमुळे आज एका निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

​पोलिसांकडून तपास सुरू

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी वैभववाडी पोलिसांना तात्काळ कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनलवलकर, पोलीस हवालदार धनाजी धडे व उद्धव साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अपघाताची माहिती मिळताच अमोल खांडेकर यांचे मुंबईतील नातेवाईक गावी रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक जाण्याने हेलकरवाडी परिसरात आणि खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातून पर्यायी रस्त्याची मागणी आता अधिक आक्रमकपणे केली जात आहे.

Konkankanya Express: ‘सुपरफास्ट’ शुल्काच्या नावाखाली प्रवाशांची लूट!

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अत्यंत लाडकी आणि महत्त्वाची समजली जाणारी ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ (गाडी क्र. २०१११ / २०११२) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमालीची उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’चा दर्जा असलेल्या या गाडीकडून प्रवाशांकडून तिकिटासोबत जादा सुपरफास्ट शुल्क वसूल केले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही गाडी दररोज २ ते २.५ तास उशिराने धावत असल्याने, “रेल्वे प्रशासन सुपरफास्टच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लूट करत आहे का?” असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणारी ही गाडी प्रत्येक स्थानकावर वेळेचे उल्लंघन करत आहे. मुंबईकडे येणारी गाडी असो वा गोव्याकडे जाणारी, प्रवाशांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मडगावकडे जाणारी २०१११ कोकणकन्या एक्सप्रेस खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथे तब्बल २ ते २.५ तास उशिराने पोहोचली. रत्नागिरीत सकाळी ५:०० वाजता येणारी गाडी थेट ७:५४ वाजता पोहोचल्याने प्रवाशांचे हाल झाले. एवढेच नव्हे तर २१, २२ आणि २३ मे रोजी मडगावला पोहोचताना देखील या गाडीला २ तासांपेक्षा जास्त उशीर झाला होता.

​दुसरीकडे, मडगावहून मुंबईकडे येणाऱ्या २०११२ कोकणकन्या एक्सप्रेसची स्थितीही वेगळी नाही. २२ मे च्या प्रवासात ही गाडी पनवेल, ठाणे आणि दादर येथे तब्बल २ तास ४० मिनिटे उशिराने धावत होती. तर २३ मे रोजी सुटलेली गाडीही १ तास १० मिनिटे उशिराने धावत मुंबईला पोहोचली. कोकण रेल्वेच्या या सावळागोंधळामुळे प्रवाशांचे कामाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या गाडीला सुपरफास्ट वर्गात समाविष्ट करण्यात आले असले तरी ही गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याने प्रवाशी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘सुपरफास्ट’चे पैसे घ्यायचे आणि सेवा मात्र ‘पॅसेंजर’पेक्षाही संथ द्यायची, या रेल्वेच्या कारभारावर आता प्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतला असून, कोकण रेल्वे प्रशासनाने यावर तात्काळ सुधारीत पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सावंतवाडी: रात्रीच्या थरारक मोहिमेत ७ फूटी मगरीला जेरबंद

   Follow us on        

सावंतवाडी:झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फूट लांबीची मगर अखेर “वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली आहे. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ घडली असून, रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास मगर दिसल्याने संपूर्ण परिसरात मोठी धावपळ उडाली होती.

​मगरीच्या हालचालींची माहिती मिळताच “वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत सावधगिरीने आणि शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. अखेर काही तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले. ही मोहीम सावंतवाडीचे ACF वैभव बोराटे तसेच मठ वनपरिक्षेत्र अधिकारी सावळा कामळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पकडलेली मगर पुढील कार्यवाहीसाठी आकेरी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

​रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांचे सहकार्य

​या धाडसी मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष विष्णू मस्के, डॉ. प्रसाद धुमकर, दीपक दुतोडकर, सिद्धेश ठाकूर, प्रसन्न गंगावणे आणि मंदार गावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच नितीन मांजरेकर, शिरिधर मांजरेकर, केशव होडावडेकर, संतोष पेडणेकर, शुभम पेडणेकर, प्रमोद सावळ आदि ग्रामस्थांनीही मोलाची मदत केली. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची परिसरात मोठी चर्चा सुरू असून, नागरिकांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.

​नागरिकांना आवाहन:

दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष विष्णू मस्के यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “मगर किंवा अन्य वन्यजीव परिसरात आढळल्यास घाबरून न जाता स्वतःहून कोणतीही धोकादायक कृती करू नये. तात्काळ संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक 9545436244 किंवा वनविभागाच्या 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा.”

मुंबई गोवा महामार्गावर आंबे विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची आणि ग्राहकांची ‘देवगड हापूस’च्या नावाखाली होणारी मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्याजवळ काही विक्रेते महामार्गाच्या कडेला स्टॉल लावून कर्नाटकवरून आणलेला आंबा अस्सल देवगड हापूस सांगून विकत होते. विशेष म्हणजे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी देवगड हापूसचे ब्रँडिंग असलेल्या पेट्यांचा वापर केला जात होता. मात्र, शनिवार २३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास स्थानिक आंबा बागायतदार आणि जागरूक नागरिकांनी या स्टॉलवर अचानक धाड टाकत या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला.

​संशयावरून नागरिकांनी जेव्हा आंब्याच्या बॉक्सची बारकाईने पाहणी केली, तेव्हा त्यामध्ये खाली कर्नाटक (कन्नड) भाषेतील वृत्तपत्रांचे रद्दी कागद अंथरल्याचे उघड झाले. तसेच त्यातील आंबे हे हापूस नसून परराज्यातील असल्याचे स्पष्ट झाले. या लबाडीमुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित विक्रेत्याला चांगलाच जाब विचारला. हा राडा पाहून महामार्गावरील इतर स्टॉलधारकांनीही कारवाईच्या भीतीने आपले आंबे घाईघाईने टेम्पोमध्ये भरून तिथून पळ काढला.

​सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आधीच विविध नैसर्गिक व आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच अशा प्रकारे परराज्यातील स्वस्त आंबे देवगडच्या नावावर खपवले जात असल्याच्या तक्रारी देवगड आंबा-काजू बागायतदार संघटनेकडे सातत्याने येत होत्या. या बनावटगिरीमुळे मूळ देवगड हापूसच्या बाजारपेठेचे आणि नावाचे मोठे नुकसान होत असून, स्थानिक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची चिंता यावेळी बागायतदारांनी व्यक्त केली.

Photo Credit – Google

पोलिसांची सतर्कता आणि बचावाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने वाचवले पती पत्नीचे प्राण

   Follow us on        

मुरुड:पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद बीचवर काल, शुक्रवारी (२२ मे २०२६) रायगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. समुद्रात आंघोळ करताना लाटांच्या तीव्र प्रवाहामुळे बुडणाऱ्या एका पती-पत्नीचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे दांपत्य पुणे जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी असून, काशिद बीचवर पर्यटनासाठी आले होते. समुद्रात आंघोळ करत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हे दोघेही समुद्रात खोलवर खेचले गेले. स्वतःला सावरणे कठीण झाल्याने दोघेही बुडू लागले आणि त्यांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला.

​त्याच वेळी किनाऱ्यावर तैनात असलेल्या रायगड पोलिसांच्या बचाव पथकातील सुरक्षा रक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित हालचाली केल्या. कोणतीही वेळ वाया न घालवता पोलिसांनी ‘वॉटर रेस्क्यू क्राफ्ट’च्या (जीवरक्षक नौका) सहाय्याने समुद्रात धाव घेतली.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, वेगवान लाटांचा सामना करत पोलिसांनी कुशलतेने आणि वेगाने बचाव मोहीम राबवून या पती-पत्नीला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे दोन निष्पाप जीवांना जीवदान मिळाले आहे. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी पर्यटकांना सुरक्षेचे आवाहन केले असून, समुद्रात उतरताना पर्यटकांनी गाफील न राहता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि केवळ अधिकृत व सुरक्षित ठिकाणीच आंघोळ करावी, असे म्हटले आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! CSMT येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी रेल्वेचा १० दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंत मर्यादित

   Follow us on        

मुंबई:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने, अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या आगामी १० दिवसांसाठी दादर आणि ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत तसेच इतर आवश्यक कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानुसार, २९ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या कालावधीसाठी काही अप मेल/एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्म (दादर/ठाणे पर्यंतच) चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

या ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, ज्याची यादी खालीलप्रमाणे आहे:

​दादर पर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या:

गाडी क्र. १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, गाडी क्र. १२८१० हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११०२० भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, गाडी क्र. २२१४४ बिदर – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. २२१०८ लातूर – सीएसएमटी एक्सप्रेस आणि गाडी क्र. २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्सप्रेस या सर्व गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर येथे थांबवण्यात येतील.

ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या 

गाडी क्र. १२१३४ मंगळूर – सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी सीएसएमटीपर्यंत न जाता ठाणे स्थानकातच थांबवण्यात येईल.

​या रेल्वे ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने प्रवाशांना आधीच सूचित केले असून, सर्वांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदललेल्या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai Goa Highway: महामार्गावरील प्रवास महागणार!

   Follow us on        

रायगड: गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा ४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. असे असतानाच या महामार्गावर टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या जून महिन्यापर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्षात नागोठाणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेली घाट, माणगाव आणि इंदापूर जवळील रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दररोज भीषण वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे आणि रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये आधीच तीव्र असंतोष आहे.

​तीन ठिकाणी टोलनाक्यांचे नियोजन आणि स्थानिक विरोध

​अपूर्ण कामांच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यात खारपाडा, खांब आणि पोलादपूरजवळील लोहारे अशा तीन ठिकाणी टोलवसुली करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यापैकी खारपाडा येथे प्रत्यक्ष टोलवसुली सुरू झाली असून, या टोलनाक्याचे कंत्राट तीन महिन्यांचे आहे. नागरिकांकडून याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच, खांब येथेही टोलनाका उभारण्यात आला आहे. खारपाडा येथील टोलनाक्यावरून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन खांब येथे टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर लोहारे येथेही टोलनाका सुरू केला जाईल. या लागोपाठच्या टोलनाक्यांमुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक खर्चिक होणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य कोकणवासीयांसह वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबरोबरच बाजारपेठेतील इतर वस्तूही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​लोकप्रतिनिधींचे मौन ​आंदोलनाचा इशारा

​खारपाडा टोल सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना यातून वगळण्यात येईल, असे तोंडी सांगण्यात आले असले तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयावर पूर्णपणे मौन बाळगल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पूर्वी खारघर टोलनाक्याविरुद्ध जशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली होती, तशी भूमिका या टोलबाबत घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन त्याचे अधिकृत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे. तसेच, या अन्यायाविरोधात २१ मे रोजी खारपाडा टोलनाक्यावर ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशाराही रायगड प्रेस क्लबने प्रशासनाला दिला आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

Konkan Railway: पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जादा डबा (कोच) जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार गाडी संख्या १०११६/१०११५ मडगाव जंक्शन – वांद्रे (टर्मिनस) – मडगाव जंक्शन द्विसप्ताहिक एक्सप्रेस आणि गाडी संख्या १०२१५/१०२१६ मडगाव जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन – मडगाव जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये आता ‘३ टायर एसी’ (3 Tier AC) चा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात येणार आहे. यामुळे या गाड्यांची एकूण डब्यांची संख्या आता २० वरून २१ (LHB कोचेस) होणार असून, प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

​या सुधारित रचनेनुसार, मडगाव येथून सुटणाऱ्या वांद्रे एक्सप्रेसला (१०११६) २६ मे २०२६ पासून, तर वांद्रे येथून सुटणाऱ्या मडगाव एक्सप्रेसला (१०११५) २७ मे २०२६ पासून हा जादा डबा जोडला जाईल. तसेच, मडगाव-एर्नाकुलम एक्सप्रेसच्या (१०२१५) प्रवासासाठी २४ मे २०२६ पासून आणि एर्नाकुलम-मडगाव एक्सप्रेससाठी (१०२१६) २५ मे २०२६ पासून ही नवीन डब्यांची रचना लागू होईल. नवीन रचनेमध्ये १ डबा २ टायर एसी, ४ डबे ३ टायर एसी, २ डबे ३ टायर इकॉनॉमी, ८ स्लीपर क्लास, ४ जनरल डबे, १ जनरेटर कार आणि १ SLR कोचचा समावेश असेल.

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. गाड्यांच्या थांब्यांच्या व वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

सावंतवाडी: दिव्याखालीच अंधार! पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारीच मोबाईलवर मटका चार्ट पाहण्यात व्यस्त; व्हिडिओ व्हायरल

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जनसामान्यांच्या समस्या आणि सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या एका महत्त्वाच्या सरकारी बैठकीत, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी एक जबाबदार अधिकारी आपल्या मोबाईलवर मटका जुगाराचे चार्ट पाहण्यात मग्न असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक ३५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे शासकीय वर्तुळात आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, व्यासपीठावर इतर वरिष्ठ अधिकारी गंभीर मुद्द्यांवर चर्चा करत असताना, हा अधिकारी मात्र कोणाचीही भीती न बाळगता आपल्या स्मार्टफोनवर ‘कल्याण मॉर्निंग’ आणि ‘मुंबई रॉयल नाईट’ सारख्या नामांकित मटका मार्केटचे रिझल्ट्स आणि चार्ट्स स्क्रोल करत आहे. शासकीय बैठकीचे गांभीर्य बाजूला ठेवून, कर्तव्यावर असताना जुगाराच्या आकड्यांमध्ये गुंग राहण्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय अनास्था आणि बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. मटका जुगार हा कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित असतानाही, एका बड्या शासकीय अधिकाऱ्याकडूनच असे कृत्य केले जात असल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या लाजिरवाण्या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे, मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search