Category Archives: कोकण

शिरोडा – बोरिवली एसटी बस सेवा सुरू

   Follow us on        

शिरोडा: कोकणातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिरोडा बस स्थानकातून बोरिवली (मुंबई) साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (MSRTC) एसटी बस सेवा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे शिरोडा आणि परिसरातील चाकरमानी तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

​बसचा मार्ग आणि थांबे

​ही बस शिरोडा येथून सुटल्यानंतर विविध महत्त्वाच्या शहरांमधून प्रवास करणार आहे. या बसचा मार्ग खालीलप्रमाणे असेल:

​शिरोडा

वेंगुर्ला

कुडाळ

कणकवली

राजापूर

लांजा

संगमेश्वर

चिपळूण

महाड

पनवेल

शीव (सायन)

अधेरी

बोरिवली.

वेळापत्रक

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे:

​शिरोडा स्थानक: संध्याकाळी ०४:३० वाजता सुटणार.

​वेंगुर्ला आगार: संध्याकाळी ०५:०० वाजता.

​बोरिवली स्थानक: सकाळी ०७:०० वाजता (दुसऱ्या दिवशी आगमन/प्रस्थान संदर्भात).

​प्रवाशांना या बससाठी ऑनलाइन आरक्षण (Online Booking) करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने सर्व प्रवाशांना या बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या बसमुळे मुंबई-कोकण प्रवासासाठी आता एक खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेची राज्य सरकारांकडे मदतीची हाक

   Follow us on        

मुंबई:  कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मार्गाची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने सुमारे २६३ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही महत्त्वाची माहिती दिली.

​खासदार वायकर यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत नियम ३७७ अन्वये कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (KRCL) ७४० कि.मी. मार्गापैकी रोहा-वीर आणि मडगाव-माजोर्डा या विभागांमधील सुमारे ५५ कि.मी.चे दुहेरीकरण आधीच पूर्ण झाले आहे. उर्वरित ६८५ कि.मी. मार्गाची वहन क्षमता वाढवण्यासाठी दुहेरीकरण आवश्यक असून, त्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे.

​या प्रकल्पासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाबाबत बोलताना पत्रात नमूद करण्यात आले की, यासाठी सर्व भागीदार राज्य सरकारांच्या सहभागाची आवश्यकता असेल. रेल्वे मंत्रालयाने संबंधित राज्य सरकारांना त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणात योगदान देण्याची विनंती केली आहे. सध्या कोकण रेल्वेमध्ये भारत सरकारचा ६६.३५%, महाराष्ट्र सरकारचा १५.११%, कर्नाटक सरकारचा १०.३०%, तर गोवा आणि केरळ सरकारचा प्रत्येकी ४.१२% वाटा आहे. तसेच, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा निर्णय देखील सर्व भागीदार राज्य सरकारांच्या संमतीवर अवलंबून असल्याचे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai Goa Highway: मे महिन्याचीही डेडलाईन हुकणार?

   Follow us on        

मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (NH66) काम पूर्ण करण्याबाबत नवीन आश्वासने दिली जात असली तरी, प्रत्यक्ष कामाची संथ गती आणि विलंबामुळे या प्रकल्पाच्या प्रगतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग एका महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, स्थानिक निरीक्षणा प्रमाणे खरी परिस्थिती गडकरींच्या दाव्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे दिसून येत आहे.

​महामार्गावरील अनेक महत्त्वाचे टप्पे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि जोडणी रस्ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. अधिकृत दावे आणि प्रत्यक्ष कामातील तफावत वाढत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. जाणकारांच्या मते, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जर पावसाळ्यामुळे कामाचा वेग मंदावला, तर ही मुदत आणखी लांबू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा प्रवासासाठी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अनिश्चितता चिंतेचा विषय ठरत आहे.

​या महामार्गाला यापूर्वीही भूसंपादन, तांत्रिक अडचणी आणि अंमलबजावणीतील दिरंगाई यामुळे अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या काही पट्टे वाहतुकीसाठी खुले असले, तरी अनेक ठिकाणी खड्डे, वळणे आणि अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता येणारे काही आठवडे हे ठरवतील की, हा बहुप्रतिक्षित महामार्ग खरोखरच पूर्ण होतो की प्रवाशांना पुन्हा एकदा विलंबाचा सामना करावा लागतो.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत बंद

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी  येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवण्यात आलेले डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत  बंद पडले आहेत. मागील नऊ दिवसांपासून ही यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना आपला डबा शोधण्यासाठी पुन्हा एकदा धावपळ करावी लागत आहे.

​प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये या स्थानकावर डिजिटल कोच इंडिकेटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही यंत्रणा कार्यान्वित झाली, मात्र तंत्रज्ञानातील बिघाडामुळे अवघ्या दीड महिन्यातच ती निकामी झाली आहे. सध्या हे इंडिकेटर असून नसल्यासारखेच आहेत.

​स्थानकावरील ही महत्त्वाची सुविधा बंद असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यात सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी यासंदर्भात रत्नागिरी येथील RRM (प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक) कार्यालयात रीतसर तक्रार नोंदवली आहे.

​”रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारली आहे, मात्र तिची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावी,” अशी मागणी मिहीर मठकर यांनी केली आहे.

​कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना कोच इंडिकेटर नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाडी आल्यावर डबा कुठे येईल हे समजत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. आता रेल्वे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन हे इंडिकेटर लवकरात लवकर सुरू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संगमेश्वर रोड स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्यासाठी आग्रही मागणी

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ९ महत्त्वाच्या साप्ताहिक गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी ‘निसर्गरम्य चिपळूण’ आणि ‘निसर्गरम्य संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपच्या वतीने रत्नागिरी येथे कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश बापट यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या मांडल्या.

​पर्यटन आणि ऐतिहासिक महत्त्व

संगमेश्वर तालुका हा सुमारे १९६ गावांचा विस्तार असलेला मोठा परिसर आहे. या भागात मार्लेश्वर, कर्णेश्वर यांसारखी धार्मिक स्थळे, तसेच प्रचितगड, भवानी किल्ला आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक (शृंगारपूर) यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या स्थळांना भेट देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविक येत असतात. सध्या नेत्रावती, पोरबंदर आणि जामनगर एक्सप्रेसला मिळालेल्या थांब्यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणि रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​या ९ गाड्यांच्या थांब्याची मागणी

वाढता प्रतिसाद पाहून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खालील ९ गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे:

​केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस

​अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस

​इंदौर सुपरफास्ट एक्सप्रेस

​हापा सुपरफास्ट एक्सप्रेस

​बांद्रा–मडगाव एक्सप्रेस

​श्रीगंगानगर एक्सप्रेस

​जबलपूर–कोकण एक्सप्रेस

​दुरंतो एक्सप्रेस

​मरूसागर एक्सप्रेस

​प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

या गाड्यांना थांबा मिळाल्यास स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेलच, शिवाय परिसराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळेल. रेल्वे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संदेश जिमन आणि समस्त संगमेश्वरवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या मोहिमेत रुपेश मनोहर कदम (सायले) व अन्य सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला आहे.

धक्कादायक! आकाशातून पडला ५ किलोचा बर्फाचा गोळा; घराचे छप्पर फोडून घरात कोसळल्याने खळबळ

   Follow us on        

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली-परबवाडी येथे एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना घडली आहे. भर उन्हाळ्यात विजय मधुकर देऊळकर यांच्या घराच्या छपरावर आकाशातून सुमारे ५ किलो वजनाचा बर्फाचा एक भलामोठा तुकडा कोसळला. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देऊळकर कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. हा बर्फाचा गोळा इतक्या वेगाने आणि शक्तीने पडला की, त्याने घराच्या छपराची कौले आणि लाकडी रिप तोडून थेट स्वयंपाकघरात प्रवेश केला.

​ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील महिला अर्चना देऊळकर या स्वयंपाकघरातच होत्या. सुदैवाने, बर्फाचा हा तुकडा त्यांच्या अंगावर न पडता बाजूला पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांची मोठी धावपळ उडाली आणि ग्रामस्थांनी देऊळकर यांच्या घराकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हा परिसरात कोणत्याही प्रकारचे ढगाळ वातावरण नव्हते किंवा पावसाचे कोणतेही संकेत नव्हते. घरच्या आजूबाजूला कोणताही उंच भागही नाही होता. रखरखत्या उन्हात अचानक आकाशातून एवढा मोठा बर्फाचा तुकडा पडल्याने हे नेमके काय गौडबंगाल आहे, यावर गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच देवली गावचे सरपंचांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा तुकडा नैसर्गिक गारांचा प्रकार आहे की विमानातून पडलेला साचलेला बर्फ (Blue Ice), याचा उलगडा होणे आवश्यक आहे. या रहस्यमय घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुराव्यासाठी देऊळकर यांनी तो बर्फाचा तुकडा सुरक्षितपणे फ्रीजमध्ये जतन करून ठेवला असून, सध्या संपूर्ण जिल्ह्यात या ‘आस्मानी’ संकटाचीच चर्चा रंगली आहे.

कोकणसाठी सुरू झालेल्या दोन्ही रो-रो सेवा बंद; नियोजनातील त्रुटींमुळे अपयश

   Follow us on        

कोकणासाठी मोठ्या अपेक्षांनी सुरू करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या Ro-Ro (Roll-on/Roll-off) सेवांना अल्पावधीतच ब्रेक लागला आहे. मुंबई–विजयदुर्ग फेरी बोट सेवा तसेच कोकण रेल्वे मार्गावरील कार Ro-Ro सेवा या दोन्ही प्रकल्पांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या सेवा सुरू होऊन एक महिनाही पूर्ण झाला नव्हता.

या सेवांमागचा उद्देश प्रवास सुलभ करणे, वेळ आणि इंधनाची बचत करणे असा होता. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वात मोठी अडचण म्हणजे भाडे जास्त असणे. मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी हे दर परवडणारे नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात आली. याशिवाय प्रतीक्षा कालावधी (लोडिंग टाइम) मोठा असल्याने वेळ वाचवण्याऐवजी उलट वेळ वाया जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली.

तसेच निवडलेली बंदरे आणि स्थानके गैरसोयीची असल्याचा मुद्दाही पुढे आला. शहराच्या मुख्य भागांपासून दूर असलेल्या ठिकाणी सेवा सुरू केल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत होता. परिणामी, या सेवांचा वापर करण्याऐवजी पारंपरिक रेल्वे किंवा रस्ते मार्ग अधिक सोयीस्कर वाटू लागले.

तज्ज्ञांच्या मते, या प्रकल्पांचे नियोजन करताना मुख्यतः उच्चभ्रू किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रवाशांचा विचार करण्यात आला. मात्र मुंबईसारख्या शहरातील मोठा मध्यमवर्गीय वर्ग हा या सेवांचा प्रमुख वापरकर्ता असू शकतो, याकडे दुर्लक्ष झाले. सेवा किचकट आणि महाग असल्याने सर्वसामान्य प्रवासी दूर राहिले.

या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा प्रकल्पांचे नियोजन करताना मध्यमवर्गीयांच्या गरजा, परवडणारे दर, सोयीची स्थानके आणि कमी प्रतीक्षा वेळ यांचा विचार करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, चांगल्या उद्देशाने सुरू केलेले प्रकल्पही अशाच प्रकारे अल्पावधीत बंद पडण्याचा धोका कायम राहणार आहे.

राज्यातील रेल्वे प्रश्नांसाठी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’

   Follow us on        

मुंबई:कोकणातील रेल्वेचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आगामी रविवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबईत भव्य ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र’ यांच्या कार्यकारिणी सभेत या परिषदेची संकल्पना मांडण्यात आली असून, आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

​२८ ते ३० गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर

​या परिषदेचा मुख्य हेतू दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि सह्याद्री एक्सप्रेस यांसारख्या महाराष्ट्रातील बंद केलेल्या किंवा शहरांतील मुख्य स्थानकाबाहेर (उदा. पनवेल, पुणे किंवा दिवा) फेकलेल्या २८ ते ३० महत्त्वाच्या गाड्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, या अन्यायाविरुद्ध प्रशासनाला इशारा देण्यासाठी राज्यातील सर्व प्रवासी संघटनांना एका छत्रछायेखाली आणून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

​दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प आणि सुविधा

​केवळ गाड्याच नव्हे, तर कोकण रेल्वे मार्गावरील दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अपूर्ण काम आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा अभाव यावरही या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी या परिषदेचे नियोजन केले असून, कोकणवासीयांनी या लढ्यात आता एकजुटीने सहभागी होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

​सामान्यांचा लढा, सामान्यांसाठी!

​या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून, तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य कष्टकरी आणि कोकणी चाकरमान्यांनी पुकारलेला हा हक्काचा लढा आहे. या परिषदेला कोणतेही मोठे राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे ही परिषद यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि आर्थिक नियोजनाची गरज आहे.

​”ही परिषद यशस्वी करण्यासाठी स्वतः आयोजक म्हणून पुढे यावे. तसेच ज्यांना या सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा आहे किंवा आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

​कोकणच्या रेल्वे विकासासाठी आणि हक्काच्या प्रवासासाठी होणारी ही परिषद कोकण रेल्वेच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरण्याची शक्यता आहे.

Konkan Railway: प्रवाशांना दिलासा! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेसच्या मडगावपर्यंतच्या विस्ताराला आता ११ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

ही गाडी दर गुरुवारी मुंबईहून (एलटीटी) पहाटे ००:५० वाजता सुटते आणि सकाळी ११:१५ वाजता मडगावला पोहोचते, तर परतीच्या प्रवासात मडगावहून दुपारी १३:५० वाजता सुटून मध्यरात्री ००:१० वाजता पुन्हा मुंबईला पोहोचते. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला आधुनिक एलएचबी (LHB) कोच जोडण्यात आले असून, या गाडीची डब्यांची रचना २ जनरेटर कार (EOG), १ फर्स्ट एसी (H1), ३ सेकंड एसी (A1-A3), १ पॅन्ट्री कार आणि १५ थर्ड एसी (B1-B15) अशी एकूण २२ डब्यांची आहे.

​या प्रवासादरम्यान ही गाडी कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचे सर्व थांबे पुढीलप्रमाणे आहेत: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, करमळी आणि मडगाव जंक्शन. या मुदतवाढीमुळे उन्हाळी सुट्ट्या आणि आगामी पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रकातील अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार मुंबई-मडगाव विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: मुंबई ते गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

०११२९ क्रमांकाची मुंबई सीएसएमटी–मडगाव जंक्शन विशेष गाडी १० एप्रिल २०२६ (शुक्रवार) आणि १४ एप्रिल २०२६ (मंगळवार) रोजी मुंबई सीएसएमटी येथून रात्री १२:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तर ०११३० क्रमांकाची मडगाव–मुंबई सीएसएमटी विशेष गाडी १० एप्रिल आणि १४ एप्रिल रोजी मडगाव येथून सायंकाळी ४:०० वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कारमळी या स्थानकांवर थांबतील.

या गाड्यांमध्ये एकूण २० एलएचबी डबे असणार असून त्यात १८ एसी ३-टियर (इकॉनॉमी) डबे आणि २ एसएलआर डबे असतील. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास अधिक सोयीस्कर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

Give headline

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search