सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावर स्थित ओसरगाव येथील टोल नाका १७ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू होणार होता, परंतु सोमवारी तो सुरू होऊ शकला नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तशी घोषणा केली असली, तरी प्रत्यक्ष टोल वसुलीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. टोल नाक्यावर काही कर्मचारी तैनात असले तरी, नेमकी टोल वसुली कधी सुरू होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, टोल नाका सुरू होण्यामागे काही तांत्रिक अडचणी आहेत. या तांत्रिक समस्यांचे स्वरूप काय आहे आणि त्या दूर होऊन टोल वसुली कधी सुरू होईल, याबद्दल टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ठोस माहिती देण्यात आलेली नाही. टोल सुरू होण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने टोल वसुलीचे काम ‘मे. स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा. लि.’ या कंपनीला दिले आहे. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुसार कार, जीप आणि व्हॅनसारख्या हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी एकदा प्रवासासाठी १२५ रुपये, तर जिल्हा पासिंग असलेल्या वाहनांसाठी ६५ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
याशिवाय, स्थानिक अव्यावसायिक वाहनांसाठी ३५० रुपये मासिक पास शुल्क आकारले जाणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणजेच ‘एमएच ०७’ पासिंगच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. त्यामुळे टोल वसुली प्रत्यक्षात सुरू झाल्यावर या सवलतींची आणि स्वतंत्र लेनची अंमलबजावणी कशी केली जाते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
सध्या टोल नाक्यावर काही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार आणि तांत्रिक अडचणी दूर झाल्यावरच महामार्गावरील या टोल वसुलीचा अधिकृत मुहूर्त निश्चित केला जाईल. तोपर्यंत प्रवाशांना टोल वसुलीच्या सुरू होण्याबद्दल अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.











