Category Archives: कोकण

रोहा-दिवा मेमू गाड्यांच्या विलंबाने प्रवासी हैराण; ‘रोहा रेल्वे प्रवासी समिती’ आक्रमक

   Follow us on        

रोहा (प्रतिनिधी):रोहा-दिवा-रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू (MEMU) गाड्यांच्या सततच्या विलंबामुळे चाकरमानी आणि विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समिती’ने रेल्वे प्रशासनाला साकडे घातले असून, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आणि पनवेल स्टेशन मास्तरांना लेखी तक्रार सादर केली आहे.

नेमकी अडचण काय?

गेल्या अनेक आठवड्यांपासून ६१०१०/६१०११, ६१०१५/६१०१६, आणि ६१०१२/६१०१३ या गाड्या नियमितपणे विलंबाने धावत आहेत. रोहा आणि दिवा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी या गाड्या जीवनवाहिनी आहेत.  महत्त्वाच्या भेटी आणि कामाचे वेळापत्रक कोलमडत आहे.

मात्र गाड्यांच्या सततच्या अनिश्चिततेमुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नोकरीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पोहोचता न आल्याने कामाचे मोठे नुकसान होत असून, अनेकांच्या पगारावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. वेळेत गंतव्यस्थानी न पोहोचल्यामुळे महत्त्वाच्या बैठका, अपॉइंटमेंट्स तसेच कामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांना मानसिक तणाव आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने रेल्वे प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत. गाड्या उशिरा धावण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, संबंधित गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची खात्री द्यावी तसेच प्रवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

या निवेदनाची प्रत पनवेल स्टेशन मास्तरांनी स्वीकारली असून, त्यावर रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही प्रवाशांकडून मिळत आहेत.

रोहा-पनवेल रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; ‘रेल वन’ ॲपवर आता पास सुविधेचा मार्ग मोकळा

   Follow us on        

रोहा रेल्वे प्रवासी समितीच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचणार

रोहा: रोहा आणि पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला ‘रेल वन’ (Rail ONE) मोबाईल ॲपवरून रेल्वे पास काढण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. रोहा रेल्वे प्रवासी समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आता प्रवाशांना घरबसल्या आपला रेल्वे पास नूतनीकरण करता येणार आहे.

नेमका प्रश्न काय होता?

मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या सीमेवर रोहा स्थानक येत असल्याने तांत्रिक कारणांमुळे ‘रेल वन’ आणि इतर डिजिटल माध्यमांतून पास काढताना प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा रोहा ते पनवेल हा मार्ग ॲपवर दिसत नसे किंवा पेमेंटमध्ये तांत्रिक अडथळे येत. परिणामी, प्रवाशांना तासन् तास तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहावे लागत होते.

प्रवासी समितीचा लढा

या त्रासातून सुटका मिळावी यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांची वारंवार भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या थेट मांडल्या. डिजिटल इंडियाच्या युगातही ग्रामीण भागातील प्रवाशांना का डावलले जात आहे, असा थेट सवाल उपस्थित करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष या गंभीर मुद्द्याकडे वेधण्यात आले. तसेच, तिकीट प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि त्यातून होणारा अन्याय स्पष्ट करणारे पुरावे सादर करत रेल्वे प्रशासनाशी सविस्तर पत्रव्यवहारही करण्यात आला, ज्यामुळे या प्रश्नावर ठोस कारवाईची मागणी जोरकसपणे करण्यात आली.

प्रवाशांना होणारे फायदे

या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेची मोठी बचत होणार असून तिकीट खिडकीवरील लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. तसेच कॅशलेस व्यवहारामुळे सुट्या पैशांच्या कटकटीतून प्रवाशांची कायमची मुक्तता होईल. याशिवाय मोबाईलवरच प्रवास पास उपलब्ध असल्याने प्रवासादरम्यान प्रत्यक्ष पास हरवण्याची भीतीही उरणार नाही, त्यामुळे प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

“प्रवाशांची गैरसोय दूर करणे हेच आमचे मुख्य ध्येय होते. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन तांत्रिक अडथळे दूर केले आहेत.” – फैसल अधिकारी/ गणेश मासक

Konkan Railway:आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway:आंगणेवाडी जत्रा २०२६ दरम्यान होणारी प्रचंड प्रवासी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई–पुणे व कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

कोकण रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, आंगणेवाडी यात्रेच्या कालावधीत अतिरिक्त प्रवासी ताण कमी करण्यासाठी मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव या मार्गावर विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्यात येणार आहेत.

विशेष गाड्यांचा तपशील

गाडी क्रमांक 01004 – मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक (टी) विशेष

ही गाडी मडगाव जंक्शन येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल.

दिनांक: ७ फेब्रुवारी २०२६ आणि ९ फेब्रुवारी २०२६

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही गाडी पुढील दिवशी सकाळी ५.५० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01003 – लोकमान्य टिळक (टी) ते मडगाव जंक्शन विशेष

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ७.५५ वाजता सुटेल.

दिनांक: ८ फेब्रुवारी २०२६ आणि १० फेब्रुवारी २०२६

मडगाव जंक्शन येथे गाडी त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता पोहोचेल.

या गाड्यांचे थांबे

या विशेष गाड्या कार्मळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल व ठाणे या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत.

डब्यांची रचना

या गाड्यांना एकूण २२ डबे असतील.

▪️ स्लीपर कोच – २०

▪️ एसएलआर – २

आरक्षण माहिती

गाडी क्रमांक 01004 साठी आरक्षण ४ फेब्रुवारी २०२६ पासून पीआरएस काऊंटर, इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर खुले होणार आहे. प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेचे दुहेरीकरण कधी? रेल्वे मंत्र्याकडून मोठी माहिती समोर

   Follow us on        

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, यामुळे कोकणातील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी व मालवाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती केंदीय रेल्वे मंत्र्यानी दिली आहे.

रुळ अपग्रेड, बोगदे बंद, क्षमतेत वाढ

दुहेरीकरणाच्या या प्रस्तावांतर्गत कोकण रेल्वे मार्गावरील रुळांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या काही जुन्या बोगद्यांना बंद करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन बोगदे उभारण्याचा विचार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीचा वेग वाढणार असून, सुरक्षिततेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.

दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येणार आहे. सध्या एकेरी मार्गामुळे अनेक गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागते, मात्र दुहेरी मार्गामुळे ही अडचण दूर होणार आहे.

प्रवासी आणि मालवाहतुकीला फायदा

या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्यांसह मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे. विशेषतः कोकणातील आंबा, काजू, मासे तसेच औद्योगिक मालाची वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. परिणामी, कोकणातील व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

 

जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनसचा ‘पाणी’ मुद्दा निर्णायक

   Follow us on        

सावंतवाडी : रेल्वे प्रकल्प हा जरी केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असला, तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही पूर्णतः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळेच हा विषय केवळ प्रशासकीय न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी थेट जोडला गेला आहे.

तिलारी धरणातून रेल्वे टर्मिनससाठी पाणीपुरवठा करण्याची योजना सावंतवाडी पंचायत समितीने तयार केली असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ती मंजुरीसाठी पुढे पाठवली आहे. या योजनेची अंमलबजावणी, पाठपुरावा, निधी मिळवणे आणि काम वेळेत पूर्ण करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किती सक्षमपणे हा विषय हाताळतात, यावरच टर्मिनस प्रत्यक्षात सुरू होणार की नाही, हे ठरणार आहे.

याच कारणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिक आता केवळ आश्वासनांवर समाधानी न राहता, या पाणीपुरवठा योजनेला निधी मिळवून देण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी ठोस पाठपुरावा करतो, याकडे लक्ष ठेवून आहेत.

विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ सावंतवाडी रेल्वे टर्मिनसपुरता मर्यादित नसून मळगाव, कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट या गावांतील नागरिकांनाही शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विकास, सुविधा आणि लोकजीवनाशी थेट निगडित असल्याने तो स्थानिक निवडणुकांतील प्रमुख मुद्दा ठरला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी समितीचे पदाधिकारी सागर तळवडेकर यांनी माहिती देताना सांगितले की, रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारित असला तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे. त्यामुळे या योजनेचा पाठपुरावा करणे, निधी मिळवून देणे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच आहे.

तळवडेकर पुढे म्हणाले की, याच कारणामुळे हा मुद्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांशी थेट जोडला गेला असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी या विषयावर ठोस भूमिका घेणाऱ्या उमेदवारांकडे लक्ष द्यावे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटल्याशिवाय टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होणे शक्य नसून, हा प्रश्न केवळ रेल्वेपुरता न राहता संपूर्ण परिसराच्या विकासाशी संबंधित आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’! २०२७ मध्ये कामाला होणार सुरुवात

   Follow us on        

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेला जोडण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्षी म्हणजेच २०२७ साली प्रारंभ होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेच्या ३० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ३,४११ कोटी रुपये या महत्त्वाकांक्षी मार्गासाठी केंद्राचा हिस्सा म्हणून दिले जाणार आहेत. राज्य शासन देखील आपला वाटा तातडीने देणार असून लवकरच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडावे ही मागणी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित होती. २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देऊन निधीची तरतूद केली होती. त्यानंतरच्या १० वर्षांत सर्वेक्षण, डीपीआर (DPR) आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अशा विविध तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. आता केंद्राने रेल्वेसाठी एकूण २ लाख ५५ हजार ४४५ कोटी रुपयांची मोठी तरतूद केल्याने या मार्गाचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रकल्प हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन समृद्ध क्षेत्रांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून या मार्गाची मागणी प्रलंबित होती, कारण तांत्रिक आणि भौगोलिक आव्हानांमुळे हा प्रकल्प रखडला होता. या मार्गामुळे कोल्हापूर आणि वैभववाडी दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून, यामुळे या दोन्ही विभागांतील प्रवास सुखकर आणि जलद होईल.

या कनेक्टिव्हिटीचा सर्वात मोठा फायदा व्यापार आणि पर्यटनाला मिळणार आहे. कोल्हापूरची बाजारपेठ आणि कोकणातील बंदरं यांच्यातील दळणवळण सोपे झाल्यामुळे औद्योगिक मालाची ने-आण वाढेल, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होईल. त्याचबरोबर, पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातील भाविकांना कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी कमी वेळात प्रवास करणे शक्य होईल, ज्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

Konkan  Railway: सीएसएमटी स्थानकावर ८५ दिवसांचा ‘ब्लॉक’; विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जाणार्‍या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई, दि. (प्रतिनिधी) — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासकामांमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ हे १ फेब्रुवारीपासून पुढील ८५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे २६ एप्रिलपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे.

या कालावधीत कोकणवासियांची पसंती असलेली मडगाव–सीएसएमटी ‘तेजस एक्सप्रेस’ ही सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरच टर्मिनेट होईल. तसेच मंगळुरु–सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आता ठाणे स्थानकावरच संपणार आहे.

सीएसएमटी स्थानकाचा सुमारे २,४५० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येत असून, या कामाची जबाबदारी अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेडकडे देण्यात आली आहे. या प्रकल्पात नवीन इमारतींचे बांधकाम, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा, पार्सल सेवा तसेच हेरिटेज इमारतीचे जतन यांचा समावेश आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी विभागली जाऊन प्रवास अधिक सुकर होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातून येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि टर्मिनसमध्ये बदल करण्यात आले आहेत. अमरावती–सीएसएमटी एक्सप्रेस, बल्लारशाह–सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, हावडा मेल, भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, बिदर एक्सप्रेस आणि लातूर एक्सप्रेस या गाड्या आता सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावतील.

खालील गाड्या त्यांच्या निर्धारित स्थानकापर्यंत (CSMT) न जाता दादर स्थानकावरच थांबतील:

​१२११२ अमरावती-CSMT एक्सप्रेस

​११००२ बल्लारशाह-CSMT नंदीग्राम एक्सप्रेस

​१२८१० हावडा-CSMT एक्सप्रेस

​११०२० भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्सप्रेस

​२२१४४ बिदर-CSMT एक्सप्रेस / २२१०८ लातूर-CSMT एक्सप्रेस

​२२१२० मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस

​ठाणे स्थानकावर थांबणारी गाडी (Short Terminated at Thane)

​१२१३४ मंगळुरू-CSMT एक्सप्रेस ही गाडी आता फक्त ठाणे स्थानकापर्यंतच धावेल.

कसबा पंचायत समिती गणात संदेश जिमन यांच्या प्रचाराचा झंझावात; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम / सायले: कसबा पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, अपक्ष उमेदवार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रचाराने संपूर्ण गणात चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असताना, काही उमेदवारांना पक्षीय दिग्गजांचा पाठिंबा आहे, तर काही उमेदवार आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर राजकीय प्रवास घडवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत संदेश सुरेश जिमन यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रचारात संदेश जिमन यांनी आघाडी घेतली असून, त्यांचे नेतृत्व जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधत, त्यांनी आजवर केलेली जनसेवा आणि पुढील काळात समाजकार्य अधिक प्रभावीपणे करण्याची आपली निर्भीड भूमिका स्पष्ट केली आहे. कमी वयात समाजासाठी केलेल्या कामांमुळे त्यांना जनसामान्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा करत लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवरायांच्या चरित्र ग्रंथांचे तसेच गोष्टींच्या पुस्तकांच्या संचांचे वितरण, ही त्यांची उल्लेखनीय सामाजिक कामगिरी ठरली आहे. याशिवाय, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच गरीब व गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

विकास आणि रोजगारनिर्मिती, पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना, या गणातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी गरजेनुसार एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, तसेच कसबा हे ऐतिहासिक क्षेत्र पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संदेश जिमन यांनी दिले आहे.

कसबा पंचायत समिती गणातील या चुरशीच्या लढतीत संदेश सुरेश जिमन यांची सरशी होताना दिसत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ही वाढती लोकप्रियता इतर उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार की काय, याची उत्सुकता आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रवाशांना दिलासा! लोकमान्य टिळक टर्मिनसवरील ‘ब्लॉक’ संपला; गाड्यांचे वेळापत्रक पूर्वपदावर

मुंबई: मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे १ जानेवारी २०२६ पासून घेतलेला पायाभूत सुविधांच्या कामाचा ‘ब्लॉक’ आता नियोजित वेळेनुसार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी हा ब्लॉक संपल्यामुळे, या काळात विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, खालील गाड्या आता त्यांच्या मूळ वेळापत्रकानुसार आणि मूळ स्थानकापर्यंत धावतील:

१. आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील: (३१ जानेवारी २०२६ पासून):

आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील

गाडी क्र. १६३४६: तिरुअनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (नेत्रावती एक्सप्रेस)

गाडी क्र. १२६२०: मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस)

२. एल.टी.टी. वरून सुटणाऱ्या गाड्या:

३१ जानेवारी २०२६ पासून: गाडी क्र. १२६१९ (लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस) आता मूळ वेळापत्रकानुसार एल.टी.टी. वरून सुटेल.

१ फेब्रुवारी २०२६ पासून: गाडी क्र. १६३४५ (लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस) आपल्या नियमित वेळेनुसार एल.टी.टी. वरून मार्गस्थ होईल.

महिनाभर चाललेल्या या ब्लॉकचा फटका केवळ मुंबईकरांनाच नाही, तर कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला होता.

जिल्हापरिषद निवडणूका आणि आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई पुण्याहून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांची मागणी

   Follow us on        

मुंबई | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणातील अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव आंगणेवाडी जत्रा पार पडणार आहे. यामुळे ६ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई/पुणे ते कोकण व कोकण ते मुंबई/पुणे मार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

या काळात मतदार, मतदान व शासकीय कर्मचारी, सुरक्षा दल तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी जाणारे व परतीच्या प्रवासातील लाखो भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतील. मागील अनुभव लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील सध्याच्या नियमित गाड्या ही अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी अपुऱ्या ठरण्याची शक्यता असून, यामुळे प्रचंड गर्दी, प्रतीक्षा यादी (वेटिंग), तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर, ६, ७, ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी ठाम मागणी कोकण विकास समिती (शहरी व ग्रामीण विभाग) यांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रस्तावित विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असावे अशी विनंती कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांमुळे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यमान सेवांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होईल, तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तातडीने निर्णयाची अपेक्षा

मागणी निश्चित असून नियोजनासाठी वेळ मर्यादित असल्याने, या विशेष गाड्यांना लवकर मंजुरी देऊन तातडीने अधिसूचना जारी करावी, अशी जोरदार विनंती करण्यात आली आहे. वेळेत सकारात्मक निर्णय झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि स्थानिक प्रशासनालाही नियोजनात मदत होईल.

ही मागणी जयवंत शंकर दरेकर व अक्षय मधुकर महापदी (कोकण विकास समिती – शहरी व ग्रामीण विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search