रत्नागिरी │ २० नोव्हेंबर २०२५
कोकण रेल्वे महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कता, तात्काळ निर्णयक्षमता आणि समन्वयाच्या मदतीने रेल्वेतून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लावण्यात येऊन त्याला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस (क्र. १२६१९) मध्ये प्रवास तपासणी करताना मुख्य प्रवासी तिकीट तपासनीस (एचडी टीई) श्री. प्रदीप झेड. शिरके यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) जनरल कोचमध्ये तिकीटाविना प्रवास करणारा विद्यार्थी वेशातील अल्पवयीन मुलगा आढळला. त्याच्याकडे शाळेची पिशवी असल्याने संशय निर्माण झाला. चौकशीदरम्यान मुलगा घरातून पळून आल्याची माहिती मिळताच श्री. शिरके यांनी तातडीने कमर्शियल कंट्रोलला कळवून रत्नागिरी स्थानकात रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) सहाय्याची मागणी केली.
काही वेळातच RPF पथकाने रत्नागिरी येथे हजर राहून मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. पुढील पडताळणीत संबंधित मुलगा गोवा येथील वास्को-द-गामा येथील शाळेतून बेपत्ता झाल्याचे उघड झाले असून, त्याच्या पालकांनी शोधासाठी माहिती सर्वत्र प्रसारित केली होती.
मुख्य तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची जागरूकता, कमर्शियल कंट्रोल विभागाचा तातडीचा प्रतिसाद आणि RPF च्या समन्वयातून मुलाचा शोध लागला व त्याचे कुटुंबीयांशी सुरक्षित पुनर्मिलन शक्य झाले, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिली.
Category Archives: कोकण
दि. 19 नोव्हेंबर 2025 | नवी मुंबई
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स लिमिटेड (BCSSL) यांनी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला असून, कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सेवा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. हा करार 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे करण्यात आला.
या संयुक्त उपक्रमाअंतर्गत, प्रारंभी तीन स्टेशन — मडगाव जंक्शन, रत्नागिरी आणि उडुपी — येथे सेवा चाचणी तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. ब्ल्यू क्लाउड कंपनी अत्याधुनिक 5G तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर व सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी अग्रणी संस्था असून या सहकार्याद्वारे स्टेशन परिसर आणि रेल्वे डब्यांमध्ये 5G Fixed Wireless Access (FWA) सेवा तसेच इन-स्टेशन आणि इन-ट्रेन डिजिटल मनोरंजन प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना जलद इंटरनेट सेवा, वास्तविक वेळेतील माहिती आणि उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करणे आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आधुनिक होण्याची अपेक्षा आहे.
POC (Proof of Concept) दरम्यान दोन्ही संस्थांकडून तांत्रिक व कार्यप्रणालीची क्षमता तपासली जाईल, तसेच भविष्यात सेवा विस्ताराचे नियोजन सुलभ होईल. मॉडेल यशस्वी ठरल्यास या सुविधांचा विस्तार कोकण रेल्वेच्या इतर स्थानकांवरही करण्यात येईल. तसेच हा प्रकल्प दीर्घकालीन महसूल-वाटप (Revenue Sharing) पद्धतीवर व्यावसायिक स्वरूपात राबवला जाईल.
या प्रसंगी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा म्हणाले:
“ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्ससोबतची भागीदारी आमच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन प्रणालींच्या माध्यमातून कोकण रेल्वेला आधुनिक करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत. या सहकार्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक समृद्ध होईल आणि भारतीय रेल्वे क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला जाईल.”
![]()
बदलापूर, १०: मुंबई–कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड–पनवेल एक्सप्रेसचा मार्ग कल्याणमार्गे सावंतवाडी रोडपर्यंत वाढवण्याची मागणी बदलापूर येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाने खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे केली.
या मंडळाच्या प्रतिनिधींनी खासदारांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कल्याण आणि कोकणदरम्यान थेट दैनंदिन रेल्वेसेवेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड–पुणे–पनवेल एक्सप्रेसला कल्याण जंक्शनमार्गे वळवून ती सावंतवाडीपर्यंत वाढवणे अत्यावश्यक आहे. या निर्णयामुळे पुणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध होईल.
तसेच सावंतवाडी टर्मिनसचे दुसऱ्या टप्प्याचे काम अपुऱ्या निधीअभावी थांबले असून, ते अमृत भारत स्टेशन योजनाअंतर्गत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नवीन प्लॅटफॉर्म, शेड, पाण्याची आणि बसण्याची सुविधा तसेच फूटओव्हर ब्रिजचा विस्तार करावा, अशी सूचना देण्यात आली.
![]()
कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ म्हणून अस्तित्व हेच तिच्या विकासातील मुख्य अडथळा
Konkan Railway: अखंड रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तराच्या आधारे कोकण रेल्वेच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतेवृद्धीचा कोणताही सक्रिय प्रकल्प अस्तित्वात नाही.
२३ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जास कोकण रेल्वे महामंडळाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या उत्तरानुसार पुढील बाबी स्पष्ट झाल्या :
-
रोहा–वीर हा सुमारे ४७ किमीचा भाग वगळता इतर कोणत्याही विभागाच्या दुपदरीकरणास मान्यता नाही.
-
ठोकुर–मुकांबिका रोड आणि वैभववाडी–माजोर्डा विभागांचे व्यवहार्यता परीक्षण सुरू असून, कोणताही सक्रिय प्रस्ताव तयार नाही.
-
नवीन स्थानक बांधणीसाठी कोकण रेल्वेकडे निधी उपलब्ध नाही.
-
२०२३ नंतर दुपदरीकरणासाठी राज्य सरकारांसोबत रेल्वे मंत्रालयाचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.
या उत्तरानुसार सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतेवृद्धीचा कोणताही प्रत्यक्ष प्रकल्प प्रगतीपथावर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७-१८ मध्ये तयार केलेला क्षमतावृद्धीचा प्रस्ताव २०२३ मध्ये आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरल्याने नामंजूर करण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
महापदी यांनी नमूद केले की, कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ म्हणून अस्तित्व हेच तिच्या विकासातील मुख्य अडथळा ठरत आहे. स्वतंत्र रचनेमुळे या महामंडळाला केंद्रीय अर्थसंकल्पातून थेट निधी मिळत नाही. त्यामुळे दुपदरीकरण, सिग्नलिंग आणि नवीन स्थानके उभारणीसारख्या भांडवली प्रकल्पांना पुरेसा वित्तपुरवठा करणे शक्य होत नाही.
समितीने सुचवले आहे की, कोकण रेल्वे मार्गाचा भारतीय रेल्वेत समावेश करूनच या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होऊ शकते.
यासाठी –
-
रोहा–मडूरे विभाग : मध्य रेल्वेत
-
पेडणे–ठोकुर विभाग : दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) रेल्वेत
अशा प्रकारे विलीनीकरण करण्याची मागणी समितीने केली आहे.
विलीनीकरणानंतर दुपदरीकरणासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून थेट निधी उपलब्ध होईल, कोकण मार्गाला राष्ट्रीय व्यस्त मार्ग (High Density Route) दर्जा मिळेल तसेच स्थानकांचा विकास, प्रवासी सुविधा आणि गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.
महापदी यांनी पुढे म्हटले की, “कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. स्वतंत्र अभ्यासांवर आणि पुनर्परीक्षणांवर वायफळ खर्च करण्याऐवजी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.”
शेवटी त्यांनी नमूद केले की, कोकण रेल्वे हा देशाच्या पश्चिम किनारपट्टीचा धोरणात्मक दुवा आहे. मात्र सध्याच्या रचनेत दीर्घकालीन विकास शक्य नाही. त्यामुळे भारतीय रेल्वेशी विलीनीकरण हा अनिवार्य, व्यावहारिक आणि शाश्वत मार्ग आहे, असे मत अखंड रेल्वे प्रवासी सेवा समितीने व्यक्त केले आहे.
कोकण रेल्वेवर दिवाणखवटीआणि कळंबणी बुद्रुक दरम्यान घडली घटना
मुंबई: ट्रेनमधून पडलेला आपला मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी धोक्याची साखळी (Alarm Chain) खेचणे एका प्रवाशाला चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या गैरवापराबद्दल संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३/१०/२०२५ रोजी १२६१८ ह. निजामुद्दीन – एरणाकुलम मंगला एक्स्प्रेसमध्ये दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांदरम्यान घडली. प्रवाशाचा मोबाईल फोन खिडकीतून खाली रुळावर पडला. मोबाईल उचलण्याच्या उद्देशाने त्याने ट्रेनची अलार्म चेन (ACP) खेचली, ज्यामुळे ट्रेन तातडीने थांबली. त्यानंतर तो प्रवासी खाली उतरून रुळावरून फोन घेऊन परत आला.
गुन्हा दाखल
ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या टीटीई श्री पी. एम. कृष्णन आणि श्री अजित जाधव यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली.. त्यांच्या अहवालाच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी भारतीय रेल्वे अधिनियम, १८८९ च्या कलम १४१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हे कलम धोक्याची साखळीचा अयोग्य वापर केल्यास दंडनीय कारवाईची तरतूद करते.
कोकण रेल्वेचे आवाहन:
साखळीचा गैरवापर केल्यामुळे रेल्वेच्या वेळेवर आणि सुरळीत संचालनात मोठा अडथळा निर्माण होतो, तसेच इतर प्रवाशांना विनाकारण त्रास होतो. कोकण रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी केवळ वैद्यकीय किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थितीतच अलार्म चेनचा वापर करावा. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आमदार संजय पोतनीसांना साकडे; तुतारी एक्स्प्रेसच्या धर्तीवर आणखी गाड्या सुरू करण्याची विनंती.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी च्या मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांनी कलिना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी बेस्ट (BEST) अध्यक्ष श्री संजय पोतनीस साहेब यांची भेट घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. संघटनेने आमदार साहेबांना दिलेल्या निवेदनात, तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी येथे प्रस्तावित रेल्वे टर्मिनस कोकणच्या विकासासाठी आणि हजारो कोकणी चाकरमान्यांच्या सोयीसाठी कसे आवश्यक आहे, हे पटवून दिले. आमदार पोतनीस यांनी या मागणीवर सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही दिली आहे.
मागील १० वर्षांपासून टर्मिनस रखडले
सावंतवाडी स्थानकावर रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी झाले होते. सावंतवाडी हे तळकोकणातील महत्त्वाचे आणि पर्यटन, शिक्षण, व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शहर आहे. या ठिकाणी टर्मिनस झाल्यास इथून सोडलेल्या गाड्या कोकणातील इतर स्थानकांवर देखील थांबतील आणि कोकणाला मुंबई, पुणे तसेच देशाच्या इतर भागांशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, राजकीय अनास्था आणि निधीअभावी हा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रखडल्यामुळे दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसच्या धर्तीवर अजून गाड्या सुरू करण्यावर मर्यादा येत आहेत, असे संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे.
प्रवाशांच्या हितासाठी संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
सावंतवाडी स्टेशनचा टर्मिनस म्हणून विकास
२०१५ मध्ये पायाभरणी झालेल्या टर्मिनस प्रकल्पाचा निधीअभावी रखडलेला दुसरा टप्पा तातडीने पूर्ण करावा. तसेच अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत येथे नवीन प्लॅटफॉर्म, शेल्टर शेड, पाणी, आसन व्यवस्था, पादचारी पुलाचा विस्तार आणि योग्य प्रकाश व्यवस्था करावी.
नवीन रेल्वेगाडी सुरू करावी
तुतारी एक्स्प्रेसच्या धर्तीवर दादर ते सावंतवाडी दरम्यान अजून एक नवी रेल्वेगाडी सुरू करावी.
सीएसएमटी-मंगलोर एक्स्प्रेसला थांबा:
१२१३३/३४ सीएसएमटी मुंबई-मंगलोर-सीएसएमटी मुंबई या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात यावा.
कोकणी चाकरमान्यांची मोठी सोय
सध्या धावणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी या गाड्या गोव्यातील मडगावपर्यंत धावतात, त्यामुळे तिकिटांचा मोठा कोटा गोव्यातील स्थानकांना मिळतो. गोव्यात पर्यटकांचा भरणा अधिक असल्याने कोकणी चाकरमान्यांना तिकीट मिळणे हा एक जटिल प्रश्न बनला आहे. केवळ सावंतवाडीपर्यंत धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्यास, सर्व तिकीट कोटा कोकणी जनतेला मिळेल आणि गणेशोत्सव, होळी, उन्हाळी सुट्ट्यांसारख्या सणासुदीच्या काळात हजारो चाकरमान्यांची सोय होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
यावेळी संघटनेतर्फे संदीप गुरव, केशव पांचाळ, विलास मोहिते, बाळा मोरे आदी सदस्य उपस्थित होते.
संगमेश्वर स्थानकात दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या बघता ९ अतिरिक्त गाडयांना थांबा मिळावा म्हणून कोंकण रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वर जनतेच्या वतीने निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपने मागणी केली होती त्यावेळी कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मागणी केलेल्या ९ गाड्यांपैकी जामनगर, पोरबंदर व मडगाव एक्सप्रेस या तीन गाडयांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबे देण्यास सर्व बाबी अनुकूल असून तसा प्रस्ताव आम्ही केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवतो असे सांगितले आणि तसा प्रस्ताव पाठवला.
या बैठकीला स्थानिक आमदार श्री शेखर निकम सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा आपली शिफारस त्यांच्या पत्राद्वारे केली होती.
थांबे मंजूरी हा विषय केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला स्थानिक खासदारांची शिफारस असणे क्रमप्राप्त असून त्यांचे रेल्वे मंत्र्यांना शिफारस पत्र लागेल असे कोंकण रेल्वे प्रशासनाने संगितले. त्याप्रमाणे मे २०२५ मध्ये खासदार श्री नारायण राणे यांना भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडण्यात आला आणि त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आपले शिफारस पत्र सुद्धा दिले आणि पुढील दोन दिवसात मी रेल्वे मंत्र्यांना भेटून मंजूरी घेतो असे आश्वासनही दिले परंतू या गोष्टीला आज सहा महिने उलटले तरी या गाड्यांच्या थांब्याना मंजूरी मिळालेली नाही त्यामुळे काल खासदारांच्या देवरुख येथे झालेल्या जनता दरबारात पुन्हा हा प्रश्न त्यांच्यासामोर मांडून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली गेली.
यावेळी उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले, “माझे मित्र असलेले केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी करून मी थांबे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो.”
परंतु थांबे मंजूर करुन घेण्यासाठी कधी कधी वजनदार व्यक्तींचा एक शब्दही कामी येतो याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यात आजूबाजूच्या जिल्ह्यात मंजूर झालेले थांबे बघता लक्षात येते. विशेष म्हणजे हे कोकणातील थांबे जिल्हयाबाहेरील नेत्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे आपले वजन वापरुन तातडीने मंजूर करून घेतले मग आपल्या खासदारांच्या शिफारशीला रेल्वे बोर्ड पहात नाही कां? असा सवाल विचारला जात आहे.
दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित किंवा कायमस्वरूपी मान्यता मिळाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांमध्ये पसरवल्या जात आहेत. मात्र, या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वेच्या अधिकृत माहितीपत्रकात म्हटले आहे की, “सध्या दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवीन कायमस्वरूपी किंवा नियमित गाड्यांबाबत कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती अधिकृत माध्यमांतून देण्यात येईल.”
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, प्रेस नोट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरूनच माहिती घ्यावी.
दरम्यान, कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मेमू सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असून, अनेक प्रवाशांनी तिला नियमित करण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वेने या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.
बांदा: मागील काही दिवसांपासून बांदा, माडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हैदोस माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवडेव व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.
शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.
वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुलि गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात धैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीची सावट पसरले आहे.
Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ वरील उघड्या जागेत तसेच शेड परिसरात दुहेरी दिशेच्या मार्गदर्शक प्रदर्शन फलक (सीजेमबीडी) पुरवठा, स्थापित करणे, चाचणी आणि कार्यान्वयनासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.
या कामासाठी निविदा क्रमांक KR-RN-S&T-07-2025-26 असून एकूण अनुमानित खर्च 19.84 लाख रुपये (जीएसटीसह) निश्चित करण्यात आला आहे. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025, दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे.
निविदेसाठी ईएमडी रक्कम 39,700 ठेवण्यात आली असून इच्छुक आणि पात्र ठेकेदारांनी अधिक माहितीसाठी www.ireps.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कोकण रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश
२६ जानेवारी २०२५ च्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील ऑफिसमधे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सावंतवाडी येथे ही डिजिटल कोच इंडिकेटर करिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणती गाडी प्लॅटफॉर्म ला उभी आहे आणि त्या गाडीतील कोच प्लॅटफॉर्मवर कोणत्या स्थानी लागला आहे हे कळणे आता सुलभ होईल.
हे सर्व कोकणवासीयांचा एकजुटीमुळे शक्य झाले आहे. सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी प्रथम लिफ्ट आणि आता कोच इंडिकेटर सारखी कामे सावंतवाडी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर १७० मीटरची निवारा शेड देखील होईल हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली आहे.











