या मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कालच्या एका दिवसात टर्मिनस साठीच्या तब्बल 264 तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती संघटनेचे संपर्कप्रमुख तसेच उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी दिली.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व्हावे यासाठी डिजिटल पद्धतीने लढाई करताना सुरवातीला इमेल मोहीम, त्यानंतर तक्रार मोहीम, त्यात महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार, माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे तक्रार, मुख्यमंत्री श्रीमान देवाभाऊ, रेल्वे मंत्रालय (रेल मदद) आणि कोकण रेल्वे कडे हजारो तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर असणारे मंत्री महोदयांचे जनता दरबारात देखील तक्रारींचा पाऊस पाडला होता. आणि आज देखील त्याचा प्रत्यय आला.
सोबतच सुरू असलेल्या डिजिटल सह्यांची मोहिमेला कोकणवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता देखील देत आहात याचा अर्थ कोकणवासी आपल्या हक्काच्या लढाईसाठी नक्कीच जागा झालाय. कोकणवासी आपल्या हक्कासाठी डिजिटली साक्षर होतोय यात मी समाधानी आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सावंतवाडी टर्मिनसचे काम त्वरित सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी नोंदवावी यात वेबसाईट www.pratapsamaik.com Grievances ( तक्रार) सेक्शन Public Transport ( सार्वजनिक वाहतूक) निवडा Describe your issue मध्ये पेस्ट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसमुळे कोकणी प्रवाशांचे हाल होत आहेत.निधी परत जाणे आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकल्प ठप्प आहे.हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी व प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तो तातडीने राज्य शासनाच्या मित्रा ( MlTRA ) संस्थेकडे वर्ग करावा.मागणी नोंदवल्यानंतर येणाऱ्या पोचपावतीला स्क्रीनशॉट संबधित ग्रुपवर अपलोड करा.या संदेशात सांगितल्याप्रमाणे आपण सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती देण्यासाठी आपली मागणी नोंदवू शकता आणि हा संदेश इतर कोकणवासीयांपर्यत पोहोचवावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे.











