Category Archives: कोकण

कोकणकरांची गाडी वाचविण्यासाठी मनसेचे इंजिन रूळावर उतरणार

   Follow us on        

मुंबई : दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन बंद करून त्याच वेळापत्रकात आणि प्लॅटफॉर्मवरून दादर-गोरखपूर एक्सप्रेस गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे.

उद्या, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (दादर) येथे रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांसह कोकणवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेने केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा कायमची बंद करून तिच्या जागी उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाणारी एक्सप्रेस सुरू केल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी दादरहून सुटणारी ही पॅसेंजर आता दिवा जंक्शनवरून चालवली जात असल्याने कोकणवासीयांना अतिरिक्त प्रवास आणि असुविधा भोगावी लागत आहेत. हा निर्णय कोकणातील स्थानिकांच्या हक्कांवर हल्ला असल्याचे मत मनसेने व्यक्त केले आहे.

“प्रश्न जिथे जनतेचा मार्ग, तिथे मनसेचा” या घोषणेनुसार मनसे या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत आहे. कोकणातील भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणवासी आणि महाराष्ट्र सैनिकांनी या आंदोलनात सामील होऊन आपली एकजूट दाखवावी, असे मनसेने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधावा.

‘ओंकार’ला महाराष्ट्रातच रोखण्यासाठी गोवा वनविभागाची अनोखी युक्ती

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमाभागात सध्या वन्य हत्तींचा वावर चिंतेचा विषय ठरत असतानाच, गोवा वनविभागाच्या एका धक्कादायक मोहिमेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘ओंकार’ नावाचा वन्य हत्ती गोव्याच्या हद्दीत येऊ नये, यासाठी गोव्याचे वन कर्मचारी चक्क महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन त्याला गुळ, केळी आणि विविध फळे खाऊ घालत असल्याचे समोर आले आहे.

गोव्याने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली असली, तरी यामुळे महाराष्ट्रातील शेती आणि बागायती धोक्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना महाराष्ट्र आणि सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वन्य हत्तीला अशा प्रकारे खाद्य देऊन एकाच भागात रोखून धरले जात असताना स्थानिक वनाधिकाऱ्यांनी याला ‘मूक संमती’ दिल्याचे चित्र दिसत आहे. डोळे उघडे असूनही गांधारीची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र वनविभागाच्या या उदासीनतेमुळे सीमाभागातील नागरिक संतप्त झाले असून, हत्तीच्या या कायमस्वरूपी वास्तव्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

Photo Credit – AI

Konkan Railway: लागून आलेल्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई, दि. २३ मार्च : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वेने मुंबई CSMT आणि मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे क्रमांक ०११२९ मुंबई CSMT–मडगाव विशेष गाडी ३ एप्रिल (शुक्रवार) आणि ५ एप्रिल (रविवार) रोजी मुंबई CSMT येथून रात्री १२:२० वाजता सुटणार असून त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तसेच, रेल्वे क्रमांक ०११३० मडगाव–मुंबई CSMT विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी मडगाव येथून सायं. ४:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कर्णाली या स्थानकांवर थांबणार आहेत.

गाडीची रचना एकूण २२ डब्यांची असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ५, स्लीपर – १०, जनरल – ४ आणि एसएलआर – २ डबे असतील.

या विशेष गाडीचे आरक्षण २४ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रे, इंटरनेट व IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

एप्रिल महिन्यात सुरवातीच्या आठवड्यात हनुमान जन्मोत्सव, गुड फ्रायडे आणि शनिवार – रविवार सुट्ट्या लागून आल्याने प्रवाशांची गर्दी होणे अपेक्षित असल्याने ही गर्दी कमी करण्याच्या हेतूने या गाड्या चालविण्यात येणार आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर टायर जळवून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रकार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावशी-घावनळे फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्याची घटना घडली आहे. आज (सोमवारी) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी महामार्गावर टायर ठेवून त्यांना आग लावली. यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात धूर आणि आग पसरली, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांची रीघ लागली.

कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आग विझवली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ही घटना नांदगाव आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडली असून, याचा त्यांच्याशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत राहिली. प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

सिंधुदुर्ग: पर्यटनाचा नवा ट्रेंड ठरतोय स्थानिकांची डोकेदुखी

   Follow us on        

दोडामार्ग: उन्हाळा सुरू होताच दोडामार्ग तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळताना दिसत आहे. विशेषतः गोवा तसेच आसपासच्या भागातील युवक-युवतींचा कल तिराळी नदी परिसराकडे वाढला असून, अनेक ठिकाणी बेधडकपणे पाण्यात उतरण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर फायदा होण्याऐवजी मनस्ताप आणि धोकेच अधिक वाढताना दिसत आहेत.

सासोलीतून वानोशीला जाताना तिराळी नदीवरील मधल्या बंधाऱ्यावर तसेच इतर भागात रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. या गर्दीत मद्यपी पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने परिसरातील वातावरण बिघडत आहे. मद्यधुंद अवस्थेत होणारी हुल्लडबाजी, आरडाओरड आणि अनुशासनहीन वर्तनामुळे या भागातील शांतता धोक्यात आली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक पर्यटकांना नदीच्या पाण्याचा वेग, खोली किंवा धोकादायक ठिकाणांची पुरेशी माहिती नसतानाही ते थेट पाण्यात उतरतात. सासोली व वानोशी येथील पूल सध्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, येथे फोटोसेशन करणे, पुलावरून उड्या मारणे आणि पोहणे असे धाडसी प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात. परिणामी, बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, माहितीअभावी काही पर्यटकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

या वाढत्या धोक्यांकडे लक्ष वेधत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. संबंधित ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, जीवनरक्षक कर्मचारी किंवा साधे सूचना फलकही नसल्याने अपघातांची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, मद्यपान करून येणाऱ्यांवर कारवाई करावी आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Photo Credit – AI

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व थांब्यांसाठी चाकरमान्यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना साकडे

   Follow us on        

ठाणे:​ कल्याण-उल्हासनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या “खासदार आपल्या भेटीला” या उपक्रमाला कोकणी चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सावंतवाडी रेल्वे स्थानकातील प्रलंबित प्रश्न आणि टर्मिनसच्या कामासाठी उल्हासनगर आणि डोंबिवलीतील कोकणवासीयांनी खासदारांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

​प्रमुख मागण्या आणि निवेदन

​कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मुंबई समन्वयक श्री. दर्शन विठ्ठल नाईक (उल्हासनगर) यांनी खासदारांशी संवाद साधला. तसेच डोंबिवली येथील कार्यक्रमात ऍड. विनायक राणे यांनी देखील रेल्वे प्रश्नांकडे खासदारांचे लक्ष वेधले. निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

​मंगलोर एक्सप्रेस: सावंतवाडी स्थानकात या गाडीला अधिकृत थांबा देण्यात यावा.

​थांब्यांची पुनर्स्थापना: कोविड-१९ काळात बंद करण्यात आलेल्या गरीब रथ आणि राजधानी एक्सप्रेसचे सावंतवाडी येथील थांबे पुन्हा सुरू करावेत.

​टर्मिनसचे काम: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे.

​खासदारांचे आश्वासन

​खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व मागण्या अत्यंत सकारात्मकतेने जाणून घेतल्या. “या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेईन. कोकणी चाकरमान्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि सावंतवाडीकरांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

​”कोकणवासीयांच्या रेल्वे प्रवासातील अडचणी सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

— डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार.

​सहकार्य आणि आभार

​उल्हासनगर लोकसभा संपर्क कार्यालयात श्री. अरुण तांबे यांनी हे निवेदन सादर करण्यासाठी विशेष सहकार्य केले. त्यांच्या या पुढाकाराबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि सावंतवाडी मुंबई विभागाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या रेल्वे प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

किरण बेदी यांचा कोकण रेल्वेच्या ‘मॅनेजमेंट इनसाइट’ कार्यक्रमात सहभाग

   Follow us on        

नवी मुंबई: पहिल्या महिला आयपीएस (IPS) अधिकारी तसेच पुद्दुचेरीच्या माजी उपराज्यपाल किरण बेदी यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) च्या कॉर्पोरेट कार्यालयात आयोजित ‘मॅनेजमेंट इनसाइट प्रोग्राम’मध्ये सहभाग घेतला. या विशेष सत्रात त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

​आपल्या प्रशासकीय अनुभवाचा आणि नेतृत्व प्रवासाचा संदर्भ देत किरण बेदी यांनी ‘प्रेरणा’ (Motivation) या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शिस्त, सचोटी आणि उद्देशाची जाणीव असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, एक सक्षम संस्था उभी करण्यासाठी नैतिक नेतृत्व, उत्तरदायित्व आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

​दैनंदिन कामकाजात आव्हाने स्वीकारून उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. त्यांच्या या सत्राने उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. याच कार्यक्रमात कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनीही आपले विचार मांडले. संस्थेच्या प्रगतीत महिलांच्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sawantwadi Terminus: कोचिंग टर्मिनलपाठोपाठ आता ‘वॉटरिंग’ सुविधाही निसटली!

कोकणकरांच्या नशिबी फक्त स्थानके ‘स्किप’ करणाऱ्या गाड्या!

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यातील जनतेला कोकण रेल्वेवरील त्यांचे हक्काचे टर्मिनस म्हणुन प्रतिक्षेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडली आहे. सावंतवाडीला ‘कोचिंग टर्मिनस’चा दर्जा मिळण्याची आस लावून बसलेल्या कोकणी चाकरमान्यांना आता मोठा धक्का बसला असून, टर्मिनस तर लांबच पण आता गाड्यांमध्ये पाणी भरण्याची (Coach Watering Facility) सुविधाही सावंतवाडीच्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाले आहे.

​मडगाव आणि उडुपीचे कल्याण, सावंतवाडीचे काय?

​रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, गोव्यातील मडगाव स्थानकाचा समावेश देशातील पहिल्या ४८ प्रमुख स्थानकांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे २०३० पर्यंत मडगाव येथील कोचिंग फॅसिलिटी दुप्पट करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कर्नाटकच्या उडुपी स्थानकावर आता ‘कोच वॉटरिंग’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने (KRCL) घेतला आहे. या दोन मोठ्या हालचालींमुळे सावंतवाडीचे महत्त्व तांत्रिकदृष्ट्या कमी होत असून, येथे भविष्यात प्रवासी टर्मिनल दर्जाच्या सुविधा मिळणे कठीण होणार आहे.

कर्नाटकचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी आणि खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी संसदेत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच केआरसीएलने १० फेब्रुवारी रोजी उडुपी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पाणीपुरवठ्याबाबत हमी मागितली आहे.

​भविष्यातील धोके आणि परिणाम

गाड्यांना थांबे नाहीत: या सुविधा असल्यास सावंतवाडी स्थानकावर दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्यांना थांबे मिळवणे सोपे झाले असते. आता या सुविधा दक्षिणेकडे गेल्याने या गाड्या या स्थानकास स्किप करून पुढे जातील.

​गाड्यांच्या विस्तारीकरणावर मर्यादा: सावंतवाडीत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने येथून नवीन गाड्या सोडणे किंवा सध्याच्या गाड्यांचा विस्तार करणे तांत्रिकदृष्ट्या ‘फिजिबल’ नसल्याचे कारण रेल्वे प्रशासन पुढे करू शकते.

​पर्यटनावर गदा: सावंतवाडी हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, रेल्वे सुविधांचा अभाव राहिल्यास पर्यटकांच्या संख्येत घट होऊन स्थानिक व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होईल.

​कोकणी माणसावर अन्याय: सावंतवाडीकडे याच पद्धतीने दुर्लक्ष झाले, तर भविष्यात प्रवाशांना केवळ ‘थ्रू’ (जाणाऱ्या-येणाऱ्या) गाड्यांवर अवलंबून राहावे लागेल.

​काय आहे ‘कोच वॉटरिंग’ सुविधेचे महत्त्व?

​रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी स्वच्छ पाणी भरण्याची ही प्रक्रिया आहे. ज्या स्थानकावर ही सोय असते, तेथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणे सोपे होते. राज्य सरकारने पाण्याचा स्रोत आणि पाइपलाईन उपलब्ध करून दिल्यास रेल्वे प्रशासन स्वतःचा प्लांट उभारते. मात्र, सावंतवाडीत अशा हालचाली दिसत नसल्याने स्थानक केवळ नावापुरतेच उरते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वेवर दक्षिणेकडील खासदारांचा ‘होल्ड’ 

यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की गोवा आणि दक्षिणेकडील लोकप्रतिनिधींचा कोकण रेल्वे प्रशासनावर वर्चस्व आहे. त्यामुळे ते आपल्या भागातील प्रवाशांना सोयीच्या असणार्‍या गोष्टी सहजपणे करताना दिसत आहेत. कोकणातील खासदारांना या विषयाचे गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होत असून, येथील रेल्वे प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

Konkan Railway: मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत बदल

   Follow us on        

चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या मान्सूनपूर्व (Non-Monsoon) वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला असून, याची अंमलबजावणी त्वरित  लागू करण्यात आली आहे. यामध्ये गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारित वेळापत्रकानुसार, चिपळूण स्थानकावर या गाडीची जुनी वेळ १९:४६ / १९:४८ अशी होती. आता ही गाडी चिपळूण स्थानकावर ६ मिनिटे आधी म्हणजे १९:४० वाजता पोहोचेल आणि १९:४२ वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे की, प्रवाशांनी इतर स्थानकांवरील अधिकृत वेळापत्रकासाठी ‘नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम’च्या (NTES) संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिकृत अपडेट्ससाठी ‘कोकण रेल्वे मिरर’ (KR Mirror) या ॲपचा वापर करावा जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

“… जर गाड्याच थांबत नसतील, तर पर्यटक कोकणात येणार कसे?” – दीपक केसरकर

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुरवस्थेवर आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत आवाज उठवत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये लवकरात लवकर विलिनीकरण करावे, जेणेकरून या भागातील रेल्वे प्रश्नांचा कायमस्वरूपी मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

​केसरकर यांनी भाषणादरम्यान नमूद केले की, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांच्या बाह्य सुशोभीकरणाचे काम झाले असले, तरी अंतर्गत प्रवासी सुविधा अद्यापही अपूर्ण आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने पुढाकार घेऊन या सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी सभागृहात केली.

​कोकणच्या पर्यटनावर भाष्य करताना केसरकर यांनी रेल्वे थांब्यांचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. “जर गाड्या स्थानकांवर थांबणारच नसतील, तर पर्यटक कोकणात कसे येणार?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन प्रमुख स्थानकांवर सध्या न थांबणाऱ्या जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. केसरकर यांच्या या पाठपुराव्यामुळे आतातरी कोकणचे हक्काचे सावंतवाडी टर्मिनस पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि प्रवाशांचे हाल थांबतील, अशी आशा कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search