Category Archives: कोकण

Konkan Railway: प्रवाशांच्या जिवाशी खेळ! विक्रेत्याकडून सडक्या कलिंगडाचे ‘फ्रूट सॅलड’ विकण्याचा प्रकार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी ते मुंबई रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रेत्याकडून प्रवाशांना चक्क वास मारणारे, खराब झालेले ‘फ्रुट सॅलड’ विकण्यात आले. या सॅलडमधील कलिंगड पूर्णपणे सडलेले होते आणि त्याला दुर्गंधी येत होती. हा प्रकार लक्षात येताच रेल्वेतील प्रवासी प्रचंड आक्रमक झाले.

संबंधित विक्रेत्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणत्याही कंपनीचे किंवा ठेकेदाराचे नाव व संपर्क क्रमांक नव्हता. तसेच रेल्वेचे टी-शर्ट घालून फिरणाऱ्या या विक्रेत्यांकडे साधे ओळखपत्रही नव्हते. यावरून ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य ॲड. नकुल पार्सेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. “अशा खराब अन्नपदार्थांमुळे प्रवाशांना विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी रेल्वे निरीक्षकांना विचारला.

​या घटनेची दखल घेत रेल्वे टीसी आणि निरीक्षकांनी संबंधित कंपनीला केवळ १,००० रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, प्रवाशांनी या किरकोळ कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी ठेकेदारांना मोठा दंड करून त्यांचे थेट कंत्राट (ठेके) रद्द करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली. कोकण रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ट्रेनमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रकाराबाबत आता काही जागरूक प्रवासी ऑनलाइन तक्रार देखील दाखल करणार आहेत.

​कोकणातील एसटी स्थानकांचा कायापालट! कणकवलीसह प्रमुख ठिकाणी ‘बस पोर्ट’ उभारले जाणार

   Follow us on        

कणकवली: कोकणातील एसटी प्रवाशांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कणकवली, विभागीय कार्यालय तसेच सावंतवाडी येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर विमानतळाच्या धर्तीवरील अत्याधुनिक ‘बस पोर्ट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. कणकवली बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी स्थानक परिसराची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्यासह एसटी महामंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

​एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्याची घोषणा केली असून, या स्थानकांची दर चार तासांनी स्वच्छता केली जाईल, असे स्पष्ट केले. याशिवाय, बसगाड्या यांत्रिक पद्धतीने स्वच्छ करूनच मार्गावर सोडल्या जातील. प्रवाशांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा, तर चालक व वाहकांसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणखी एक मोठी घोषणा करताना त्यांनी सांगितले की, राज्यभरात ८ हजार नवीन बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी ६५ नवीन बसेस पुढील तीन महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहेत. तसेच, पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात असलेल्या सुमारे ९०० रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्टपर्यंत कंत्राटी तत्त्वावर चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, तर १८ हजार कायमस्वरूपी पदांच्या भरतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी बसस्थानक परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली, ज्यावर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे

मान्सून अद्याप दूर; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन

   Follow us on        

मुंबई:राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होण्यास सुरुवात झाली असून, १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण भागातही काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. या बदलांमुळे मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होणार असली, तरी पूर्व विदर्भासह विदर्भातील काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नसल्यामुळे, सद्यस्थितीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

​या पार्श्वभूमीवर, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संभाव्य वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये पेरणीची घाई करू नये, असा स्पष्ट सल्ला प्रशासनाने दिला आहे.

तसेच, विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असताना नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या व आपल्या पाळीव जनावरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी अशा वेळी कोणीही झाडाखाली, टिनशेडखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पश्चिम घाटात वनस्पतींच्या नव्या प्रजातीचा शोध

   Follow us on        

पालक्कड: दक्षिण पश्चिम घाटात वनस्पती शास्त्रज्ञांच्या एका पथकाने वनस्पतींच्या एका अत्यंत दुर्मिळ आणि नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. सूर्यफूल कुटुंबातील (Sunflower Family) असलेल्या या नव्या प्रजातीचे ‘अॅनाफॅलिस सह्याद्रिका’ (Anaphalis sahyadrica) असे नामकरण करण्यात आले आहे. पश्चिम घाटातील अनामुडी आणि मीसापुलीमाला यांसारख्या अति-उंचावरील डोंगराळ गवताळ प्रदेश (Montane Grasslands) आणि ‘शोला’ जंगलांच्या कडेला ही वनस्पती आढळून आली आहे. पालक्कड येथील गव्हर्नमेंट व्हिक्टोरिया कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधक ‘एस. रेम्या’ यांच्या पीचएडी (Doctoral Research) संशोधनाचा हा एक भाग आहे.

​या महत्त्वपूर्ण संशोधनाचे मार्गदर्शन थोलाणूर येथील गव्हर्नमेंट आर्ट्स अँड सायन्स कॉलेजच्या प्राचार्या डॉ. माया सी. नायर आणि लखनऊ येथील नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (NBRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एम. प्रभूकुमार यांनी केले असून, वनस्पतिशास्त्र संशोधक जी. कनाकांबिका यांनीही या शोधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वनस्पतींच्या वर्गीकरणाशी संबंधित ‘नोव्हॉन’ (Novon) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकाच्या ३४ व्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

​डॉ. नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वनस्पती प्रामुख्याने समुद्रसपाटीपासून २,२०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आढळणारे एक लहान झुडूप (Subshrub) आहे. या वनस्पतीची पाने अतिशय गुळगुळीत आणि केसविरहित असून, पानांवर तीन ठळक शिरा असणे हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे झुडूप साधारणपणे एक मीटर उंचीपर्यंत वाढते आणि याला सुमारे ९० ते १२० पांढऱ्या रंगाची, अर्धगोलाकार फुलांची डोकी (Flower Heads / Capitula) येतात. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

“काळ आला होता पण…” अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर झाड कोसळले; २१ जण थोडक्यात वाचले

   Follow us on        

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील  २१ प्रवासी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना आकेरी येथे त्यांच्या धावत्या गाडीवर अचानक एक मोठे आकाशिचे झाड कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व २१ प्रवासी सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. या घटनेत गाडीचा चालक आणि अन्य एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ गुढीपूर येथील रहिवासी राजेश सिंगनाथ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (एकूण २१ प्रवासी) ‘टेम्पो ट्रॅव्हलर’ (क्र. MH 48 K 1171) या गाडीने अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. ही गाडी सावंतवाडीजवळील आकेरी येथे पोहोचली असता, रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे आकाशिचे झाड अचानक चालत्या गाडीवर कोसळले.

झाड थेट गाडीवर पडल्याने वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आणि मोठे नुकसान झाले. मात्र, गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघात घडताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या चालकाला तातडीने उपचारासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांची समयसूचकता

अपघाताचा भीषण आवाज ऐकताच आकेरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी कटरच्या साहाय्याने रस्त्यावर आणि गाडीवर पडलेले झाड वेगाने कापून बाजूला केले आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे आणि मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वणव्यांमुळे झाडे होताहेत पोकळ

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण आणि डोंगरभागात मोठ्या प्रमाणावर वणवे पेटवले जातात. या वणव्यांच्या आगीमुळे रस्त्याशेजारील अनेक झाडे मुळापासून जळतात आणि आतून पोकळ होतात. वरून हिरवीगार दिसणारी ही झाडे आतून कमकुवत झालेली असतात, ज्यामुळे मे महिन्यातील वादळी वाऱ्यात ती अचानक उन्मळून पडतात. आजचा अपघातही अशाच एका जळालेल्या झाडामुळे घडल्याचे समोर आले आहे.

हे वणवे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागल्याने त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे. या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली, तरी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याशेजारील अशी धोकादायक व जळालेली झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी आता नागरिक आणि प्रवाशांमधून केली जात आहे.

Konkan Railway: फुकट्या प्रवाशांची आता खैर नाही; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तपासणी तीव्र

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आपल्या मार्गावर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नुकत्याच संपलेल्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात कोकण रेल्वेने ९३४ तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या कारवाई दरम्यान तब्बल ३७,००० विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २.९० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच, आर्थिक वर्ष २०२५-२६ या संपूर्ण वर्षभरात रेल्वेने एकूण ११,३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या वर्षभराच्या मोहिमेत ४,९९,६७५ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २७.६८ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आगामी उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता, कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त समन्वयाने ही मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि त्रासमुक्त होईल. कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकिटासह सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror App’ डाऊनलोड करावे, असेही रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

 

मडगाव-पनवेल स्पेशल गाडीच्या डब्याला भीषण आग; घातपाताचा संशय

   Follow us on        

मडगाव, ता. २९: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी एका मोठ्या दुर्घटनेत मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाडीच्या एका डब्याला दुपारी २:५० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही गाडी पनवेलच्या दिशेने रवाना होणार असल्याने स्थानकाच्या आउटर ट्रॅकवर उभी करण्यात आली होती. अचानक इंजिनलागतच्या डब्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत १४ अग्निशमन सिलिंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की ती काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि यात रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने, घटना घडली तेव्हा गाडीत एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

​आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलत आग लागलेला डबा इतर डब्यांपासून वेगळा केला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे मार्गावरील २५ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी तात्काळ बंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानक परिसरात अग्निशमन बंबाला थेट आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. अखेर जवानांनी ईएसआय इस्पितळासमोरील जागेत अग्निशमन बंब उभे केले आणि तेथून लांब पाईप्स जोडून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.

​दरम्यान, प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसून, ती कोणीतरी मुद्दामहून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेत घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची कोकण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल.

प्रवाशांना खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावरील अजून एक गाडी नियमितपणे धावणार


   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत स्पेशल ट्रेन (०९०५७ / ०९०५८) आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन आता नवीन क्रमांकासह म्हणजेच ट्रेन क्रमांक १९०५७ / १९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत (बाय-वीकली) एक्सप्रेस म्हणून आठवड्यातून दोनदा धावणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण भारत, कोकण आणि गुजरातला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि निश्चित होणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १९०५७ सुरत – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस दिनांक ३ जून २०२६ पासून दर बुधवार आणि रविवारी सुरत स्थानकावरून संध्याकाळी १९:३५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू जंक्शन – सुरत एक्सप्रेस दिनांक ४ जून २०२६ पासून दर गुरुवार आणि सोमवारी मंगळुरू जंक्शनवरून रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरत स्थानकावर पोहोचेल.

​या एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय गुजरात आणि गोव्यातील प्रमुख स्थानकांसह कर्नाटकच्या किनारपट्टीवरील मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी यांसारख्या ३0 हून अधिक स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. यामुळे कोकण पट्ट्यातील आणि इतर भागांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या ट्रेनची रचना एकूण २० डब्यांची असणार आहे, ज्यामध्ये २ टायर एसीचा १ कोच, ३ टायर एसीचे ७ कोच, स्लीपर क्लासचे ६ कोच, जनरलचे ४ कोच आणि एसएलआर/डी चे २ डबे समाविष्ट असतील. प्रवाशांना या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती मिळवण्यासाठी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेने विशेष ब्लॉकचा कालावधी वाढवला; अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मेन लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे लागू करण्यात आलेल्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला रेल्वे प्रशासनाने आता १३ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत निवडक मेल/एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर आणि ठाणे स्थानकांवरच ‘शॉर्ट टर्मिनेट’ (प्रवास आधीच संपवणे) केल्या जातील.

​ब्लॉक वाढवण्याचे कारण काय?

​रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (RLDA) द्वारे सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिकीकरण आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत.

​यापूर्वी हा ब्लॉक दिनांक ०१.०२.२०२६ ते २६.०४.२०२६ पर्यंत लागू करण्यात आला होता, त्यानंतर तो १९.०५.२०२६ पर्यंत वाढवला गेला आणि आता कामाची व्याप्ती पाहता ही मुदत १३ जून २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

​या गाड्या धावणार फक्त दादर आणि ठाणे पर्यंतच

​दिनांक १३.०६.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या (JCO) खालील गाड्या सीएसएमटी पर्यंत न जाता आधीच थांबवल्या जातील:

​१. दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:

​गाडी क्र. १२११२: अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११००२: बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस

​गाडी क्र. १२८१०: हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११M२०: भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१४४: बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१०८: लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१२०: मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

​२. ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी:

​गाडी क्र. १२१३४: मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​रेल्वे प्रशासनाचे आवाहन

“पायाभूत सुविधांची देखभाल, सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी हे ब्लॉक्स अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे,” असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलांचा विचार करून करावे.

Konkan Railway: चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेची विशेष सोय; मडगाव – सीएसएमटी दरम्यान धावणार ‘वीकेंड स्पेशल’

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव (MAO) दरम्यान विशेष ‘टॉड’ (TOD Special) ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १-१ फेरी (01 Trip) चालवली जाणार आहे. शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी ही गाडी धावणार आहे.

​खालीलप्रमाणे या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि वैशिष्ट्ये आहेत:

​गाडी संख्या ०११७३ (सीएसएमटी ते मडगाव स्पेशल)

​दिवस: शनिवार, ३० मे २०२६

​प्रस्थान: मुंबई CSMT वरून रात्री ००:२५ वाजता (शुक्रवारची मध्यरात्र) सुटेल.

​आगमन: मडगाव (Madgaon) येथे त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता पोहोचेल.

​एकूण प्रवास वेळ: १३ तास ०५ मिनिटे.

 

​गाडी संख्या ०११७४ (मडगाव ते सीएसएमटी स्पेशल)

​दिवस: शनिवार, ३० मे २०२६

​प्रस्थान: मडगाववरून दुपारी १६:०० वाजता सुटेल.

​आगमन: मुंबई CSMT येथे रविवारी (३१ मे २०२६) पहाटे ०३:४५ वाजता पोहोचेल.

​एकूण प्रवास वेळ: १३ तास ३० मिनिटे.

​या गाडीचे थांबे 

दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सवर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी

​कोचची रचना (Composition):

या ट्रेनला एकूण २२ डबे (Coaches) असतील. यामध्ये:

​१६ GSCN (स्लीपर क्लास)

​२ GS + २ GSCN (अनारक्षित/General श्रेणीसाठी)

​२ SLR (गार्ड आणि ब्रेक व्हॅन)

​इंजिन: ही ट्रेन पूर्णपणे इलेक्ट्रिक (Electric Traction) इंजिनवर धावेल.

​महत्त्वाची नोंद: वीकेंडला कोकणात जाणाऱ्या किंवा मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रवाशांनी आरक्षणाची स्थिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search