Category Archives: कोकण

Konkan Railway: मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत बदल

   Follow us on        

चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या मान्सूनपूर्व (Non-Monsoon) वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला असून, याची अंमलबजावणी त्वरित  लागू करण्यात आली आहे. यामध्ये गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारित वेळापत्रकानुसार, चिपळूण स्थानकावर या गाडीची जुनी वेळ १९:४६ / १९:४८ अशी होती. आता ही गाडी चिपळूण स्थानकावर ६ मिनिटे आधी म्हणजे १९:४० वाजता पोहोचेल आणि १९:४२ वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे की, प्रवाशांनी इतर स्थानकांवरील अधिकृत वेळापत्रकासाठी ‘नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम’च्या (NTES) संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिकृत अपडेट्ससाठी ‘कोकण रेल्वे मिरर’ (KR Mirror) या ॲपचा वापर करावा जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

“… जर गाड्याच थांबत नसतील, तर पर्यटक कोकणात येणार कसे?” – दीपक केसरकर

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुरवस्थेवर आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत आवाज उठवत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये लवकरात लवकर विलिनीकरण करावे, जेणेकरून या भागातील रेल्वे प्रश्नांचा कायमस्वरूपी मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

​केसरकर यांनी भाषणादरम्यान नमूद केले की, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांच्या बाह्य सुशोभीकरणाचे काम झाले असले, तरी अंतर्गत प्रवासी सुविधा अद्यापही अपूर्ण आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने पुढाकार घेऊन या सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी सभागृहात केली.

​कोकणच्या पर्यटनावर भाष्य करताना केसरकर यांनी रेल्वे थांब्यांचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. “जर गाड्या स्थानकांवर थांबणारच नसतील, तर पर्यटक कोकणात कसे येणार?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन प्रमुख स्थानकांवर सध्या न थांबणाऱ्या जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. केसरकर यांच्या या पाठपुराव्यामुळे आतातरी कोकणचे हक्काचे सावंतवाडी टर्मिनस पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि प्रवाशांचे हाल थांबतील, अशी आशा कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर रविवारी धावणार ‘विकेंड स्पेशल’ एक्सप्रेस

   Follow us on        

मडगाव: आठवडा अखेरीस होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​गाडी क्र. ०१००४ / ०१००३ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष

​गाडी क्र. ०१००४ (मडगाव – LTT): ही गाडी २२ मार्च २०२६ (रविवार) रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​गाडी क्र. ०१००३ (LTT – मडगाव): ही गाडी २३ मार्च २०२६ (सोमवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल

थांबे: मडगाव जंक्शन, करमळी, थिविम, सावंतवाडी टर्मिनस, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.

​डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ स्लीपर क्लास आणि २ एसएलआर).

​आरक्षण: गाडी क्र. ०१००४ साठीचे आरक्षण १९ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होईल.

​कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दादर – रत्नागिरी पॅसेंजरने ‘स्लॉट’ गमावला! मुंबई-कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी

   Follow us on        

मुंबई : मुंबई आणि कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या स्लॉटवर आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी दिली आहे. हा मोठा धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार रवी किशन यांना दिलेल्या अधिकृत पत्रातून ही माहिती समोर आली आहे. विशेष गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ ला नियमित दर्जा देऊन ती आता ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर एक्सप्रेस म्हणून चालवली जाणार आहे. या निर्णयामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

या निर्णयावर माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कोकणातील प्रवाशांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विशेषतः कामगार वर्ग आणि स्थानिक प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दादर-रत्नागिरी गाडीचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आता ही सेवा दिवा कायमस्वरूपी स्थानकावरून चालवली जाणार आहे. ही गाडी दादर पर्यंत पूर्ववत होण्याची आशाही आता नष्ट झाली आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोरोनापूर्वी दादर ते रत्नागिरी दरम्यान चालविण्यात येत होती. मात्र कोरोना काळात ‘झिरो टाइमटेबल’ च्या नावाखाली दिवा स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनही आजतागायत तिची सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. ही गाडी दादर पर्यंत नेण्यासाठी स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी देण्यात येत होते. मात्र त्याच स्लॉटवर विशेष गाडी ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर ही चालविण्यात आली. याविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या विरोधात मोर्चाही काढण्यात आला होता आणि दादर – रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र आता हा स्लॉट कायमस्वरूपी दादर-गोरखपूर एक्सप्रेसला दिल्याने त्या मागणीला केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेने ऑपरेशनल कार्यक्षमतेचा दाखला देत हा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या सोयींचा विचार न केल्याची टीका होत आहे. आपली हक्काची गाडी मुंबई बाहेर नेवून त्याजागी ही लांब पल्ल्याची गाडी कायम केल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कोकण रेल्वे विलीनीकरणाचा चेंडू कर्नाटक आणि केरळ सरकारच्या कोर्टात

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि गोवा सरकारने कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, कर्नाटक आणि केरळ सरकारने अद्याप यावर आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही किंवा संमती दिलेली नाही. जोपर्यंत ही दोन राज्ये सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही असे विधान लोकसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केले.

लोकसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोकण रेल्वेच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील विस्तार योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यांनी विशेषतः कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा (Doubling) सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) कधी पूर्ण होईल आणि या मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त वंदे भारत गाड्या कधी सुरू होतील, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

खासदार वायकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मधील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या इतर विभागांप्रमाणे नसून ती एक स्वतंत्र कॉर्पोरेशन आहे, ज्यामध्ये भारत सरकारसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये भागधारक (Shareholders) आहेत. यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना या सर्व राज्यांची संमती आवश्यक असते.

कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणाबाबत बोलताना रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली की, महाराष्ट्र आणि गोवा सरकारने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, कर्नाटक आणि केरळ सरकारने अद्याप यावर आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही किंवा संमती दिलेली नाही. जोपर्यंत ही दोन राज्ये सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी या राज्यांना वैयक्तिक हित बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, ७४० किमी लांबीच्या या मार्गावरील काही महत्त्वाच्या ‘चोक पॉइंट्स’ (जिथे वाहतूक कोंडी होते) च्या दुपदरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत रेल्वेचे बजेट लक्षणीयरीत्या वाढवण्यात आले असून, तांत्रिक बाबींची पूर्तता होताच या कामाला गती दिली जाईल. तसेच सुरक्षितता आणि वेग वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेवटी, वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्यांच्या मागणीवर बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासोबतच प्रवाशांची गरज लक्षात घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन केले जाईल. कोकण रेल्वे हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दळणवळणाचा कणा आहे, त्यामुळे या मार्गावरील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे.

कोकण रेल्वे संबधित प्रलंबित मागण्यांसाठी १ मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ ‘जल फाउंडेशन कोकण विभाग’ आणि ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’ आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या ३० एप्रिल २०२६ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास, १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​प्रशासकीय दिरंगाईचा प्रवाशांना फटका

​या संदर्भात १० सप्टेंबर २०२५ रोजी बेलापूर कार्यालयात जल फाउंडेशनच्या प्रतिनिधींची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

​”आम्ही गेल्या सहा वर्षांपासून रेल्वेकडे विविध मागण्या केल्या आहेत. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी विभाजनासाठी काही उपायही सुचवले आहेत. परंतु रेल्वेकडून दाद मिळत नसल्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येत आहे.”

— अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र.

​प्रमुख मागण्या:

​रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३/०४): या गाडीतील आरक्षित डबे पुन्हा सुरू करणे.

​मुंबई-चिपळूण नवीन गाडी: मुंबई (CSMT/दादर/LTT) ते चिपळूण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देणारी दैनंदिन गाडी सुरू करणे.

​खेड रेल्वे स्थानक थांबा: जनशताब्दी, गरीब रथ, गोवा संपर्क क्रांती यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांना खेड येथे थांबा देणे.

​कोटा (GN Quota): मडगाव-एलटीटी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसमधील सर्व स्थानकांसाठी असलेला मूळ स्टेशन कोटा पूर्ववत करणे.

​गाड्यांचे पुनरुज्जीवन: रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी कोविडपूर्व स्थितीप्रमाणे पुन्हा सुरू करणे.

​अंतिम इशारा

​जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी स्पष्ट केले की, १० सप्टेंबरच्या बैठकीनंतर रेल्वेकडून कोणतेही अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही. जर ३० एप्रिलपर्यंत ठोस निर्णय झाला नाही, तर १ मे रोजी नाईलाजाने उपोषण सुरू करावे लागेल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी कोकण रेल्वे प्रशासन जबाबदार असेल.

चीपी विमानतळाला १००% VGF मंजूर! मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार;

चीपी विमानतळाला १००% व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर!

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळ (Chipi Airport) ला १००% Viability Gap Funding (VGF) मंजूर झाली आहे. यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग (चीपी) ही हवाई सेवा आता आठवड्यातील सातही दिवस नियमितपणे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानभवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, “चीपी विमानतळाला पूर्ण VGF सुविधा मिळाल्यामुळे आता ही सेवा खंडित होणार नाही. कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक नागरिकांच्या प्रवासासाठी ही मोठी सुविधा ठरेल.”

VGF म्हणजे काय?

VGF चा पूर्ण अर्थ Viability Gap Funding असा होतो.

मराठीत याचा अर्थ व्यवहार्यता अंतर निधी किंवा व्यवहार्यता अंतर अनुदान असा होतो. काही महत्त्वाच्या प्रकल्प (उदा. विमानतळ, रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी) आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आणि समाजासाठी खूप गरजेचे असतात. पण खासगी कंपनीसाठी ते पूर्णपणे नफा कमावणारे (financially viable) नसतात – म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असते.अशा प्रकल्पांना खासगी भागीदार (Private sector) पुढे येण्यासाठी सरकार VGF म्हणून एकदा किंवा टप्प्याटप्प्याने अनुदान (ग्रँट) देते. हे अनुदान कर्ज (loan) नाही, तर थेट मदत असते. यामुळे प्रकल्पाची “व्यवहार्यता अंतर” (viability gap) भरून काढली जाते आणि प्रकल्प सुरू होऊ शकतो.

चीपी विमानतळासाठी १००% VGF मंजूर झाल्याचा अर्थ – विमानतळ चालवण्यासाठी लागणारा निधीचा मोठा भाग सरकार देईल, जेणेकरून विमान कंपनीला तोटा होणार नाही आणि मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान रोजची विमानसेवा सुरू राहू शकेल.

 

 

 

 

 

 

 

लोकसभेत खासदार अरविंद सावंत यांचा रेल्वे प्रश्नांवर जोरदार आवाज; कोकण रेल्वे दुहेरीकरणाची मागणी

   Follow us on        

नवी दिल्ली: लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. सरकार एकीकडे बुलेट ट्रेन आणि हाय-स्पीड कॉरिडॉरच्या योजना जाहीर करत असताना सामान्य रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे रेल्वे मंत्रालयाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा उभारण्यास प्रशासनाने नकार दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केवडिया रेल्वे स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर सीएसएमटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास ‘नीती’चे कारण देऊन नकार का दिला जातो, असा सवाल करत प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीका केली.

तसेच मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या काळात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स आणि चर्नी रोड या स्थानकांची नावे बदलल्याचे बॅनर लावण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात आजही ही नावे बदललेली नाहीत. याबाबत सरकार प्रत्यक्ष कृती कधी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. तसेच मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असतानाही मुंबईकरांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचे सांगत लोकल रेल्वेची वाढती गर्दी कमी करण्यासाठी ४ मार्गिकांचे ६ मार्गिकांमध्ये रूपांतर आणि ‘एलिव्हेटेड ट्रेन’ प्रकल्पावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकण रेल्वेबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचा वारंवार होणारा विलंब आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे आणि संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. कोकणच्या विकासासाठी बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे दुहेरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील सपाडे परिसरातील घरांना तडे गेल्याचा मुद्दाही त्यांनी लोकसभेत मांडला. टनलसाठी होणाऱ्या स्फोटांमुळे १०० ते १५० घरांना मोठ्या भेगा पडल्या असून कंत्राटदारांकडून मिळणारी मदत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली.

याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुंबईतील मोटरमन मोठ्या मानसिक तणावाखाली काम करत असून अनेक जण राजीनामे देत असल्याचे सांगत त्यांच्या केबिनमधील आवाजाची समस्या, कामाचे तास आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच रेल्वे ट्रॅकची सुरक्षा राखणाऱ्या गँगमन आणि खलाशी यांच्या समस्यांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटणाऱ्या दोन प्रमुख विशेष गाड्यांचा समावेश आहे.

पहिली विशेष गाडी (ट्रेन क्र. ०११७१/०११७२) मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी धावेल. ही गाडी मुंबईहून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाव येथून ही गाडी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडीची रचना (Composition): एकूण २२ कोच – २ टियर एसी (१), ३ टियर एसी (६), स्लीपर (९), जनरल (४) आणि एसएलआर (२).

दुसरी विशेष गाडी (ट्रेन क्र. ०१११९/०११२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान १७ एप्रिल ते १२ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी धावेल. ही गाडी LTT वरून मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाववरून ही गाडी शुक्रवारी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता LTT ला पोहोचेल.

या गाडीला एकूण २१ आधुनिक LHB कोच जोडण्यात आले आहेत. गाडीची रचना (Composition): एकूण २१ एलएचबी कोच – फर्स्ट एसी (१), २ टियर एसी (३), ३ टियर एसी (७), स्लीपर (८) आणि जनरेटर कार (२).

दोन्ही गाड्यांचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

या विशेष गाड्या दादर (केवळ CSMT गाडीसाठी), ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबतील.

विशेष म्हणजे, ट्रेन क्र. ०११७२ आणि ०११२० साठीचे बुकिंग उद्या, १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत; उपाध्यक्षपदी शिंदे सेनेचे दादा साईल यांची वर्णी

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा तिढा अखेर सुटला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांची, तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे सेनेचे पावशी जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य दादा साईल यांची निवड निश्चित झाली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली असून, महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

​निवडणूक प्रक्रियेनुसार, आज दुपारी ३.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेवर भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीचे वर्चस्व अधिक घट्ट झाले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी ही नवी कार्यकारिणी सज्ज झाली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search