Category Archives: कोकण

एक्सप्रेस गाड्यांच्या संगमेश्वर रोड येथील थांब्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांशी बोलणार; खासदार नारायण राणे यांचे आश्वासन

   Follow us on        देवरूख: बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर देवरूख येथे पार पडलेल्या खासदारांच्या जनता दरबारात संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय अग्रक्रमाने मांडण्यासाठी सकाळी लवकरच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, सहकारी अशोक मुंडेकर , समन्वयक रुपेश मनोहर कदम लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय येथे उपस्थित होते.

संगमेश्वर स्थानकात दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या बघता ९ अतिरिक्त गाडयांना थांबा मिळावा म्हणून कोंकण रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वर जनतेच्या वतीने निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपने मागणी  केली होती त्यावेळी  कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मागणी केलेल्या ९ गाड्यांपैकी जामनगर, पोरबंदर व मडगाव एक्सप्रेस या तीन गाडयांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबे देण्यास सर्व बाबी अनुकूल असून तसा प्रस्ताव आम्ही केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवतो असे सांगितले आणि  तसा प्रस्ताव पाठवला.

या बैठकीला स्थानिक आमदार श्री शेखर निकम सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा आपली शिफारस त्यांच्या  पत्राद्वारे केली होती. 

थांबे मंजूरी हा विषय केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला स्थानिक खासदारांची शिफारस असणे क्रमप्राप्त असून त्यांचे रेल्वे मंत्र्यांना शिफारस पत्र लागेल असे कोंकण रेल्वे प्रशासनाने संगितले. त्याप्रमाणे मे २०२५ मध्ये खासदार श्री नारायण राणे यांना भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडण्यात आला आणि त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आपले शिफारस पत्र सुद्धा दिले आणि पुढील दोन दिवसात मी रेल्वे मंत्र्यांना भेटून  मंजूरी घेतो असे आश्वासनही दिले परंतू या गोष्टीला आज सहा महिने उलटले तरी या गाड्यांच्या थांब्याना मंजूरी मिळालेली नाही त्यामुळे काल खासदारांच्या देवरुख येथे झालेल्या जनता दरबारात पुन्हा हा प्रश्न त्यांच्यासामोर मांडून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली गेली. 

यावेळी उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले, “माझे मित्र असलेले केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी करून मी थांबे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो.”

परंतु थांबे मंजूर करुन घेण्यासाठी कधी कधी वजनदार व्यक्तींचा एक शब्दही कामी येतो याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यात आजूबाजूच्या जिल्ह्यात मंजूर झालेले थांबे बघता लक्षात  येते. विशेष  म्हणजे हे कोकणातील थांबे जिल्हयाबाहेरील नेत्यांनी  रेल्वे मंत्र्यांकडे आपले वजन वापरुन तातडीने मंजूर  करून घेतले मग आपल्या खासदारांच्या शिफारशीला रेल्वे बोर्ड पहात नाही कां? असा सवाल विचारला जात आहे.

Konkan Railway: दिवा–चिपळूण मेमू सेवा कायमस्वरूपी झाल्याची बातमी खोटी; रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

   Follow us on    

 

 

दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित किंवा कायमस्वरूपी मान्यता मिळाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांमध्ये पसरवल्या जात आहेत. मात्र, या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वेच्या अधिकृत माहितीपत्रकात  म्हटले आहे की, “सध्या दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवीन कायमस्वरूपी किंवा नियमित गाड्यांबाबत कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती अधिकृत माध्यमांतून देण्यात येईल.”

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, प्रेस नोट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरूनच माहिती घ्यावी.

दरम्यान, कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मेमू सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असून, अनेक प्रवाशांनी तिला नियमित करण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वेने या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

‘ओंकार’ ने रोखला मुंबई गोवा महामार्ग; दीड तास वाहतूक ठप्प

   Follow us on    

 

 
बांदा: मागील काही दिवसांपासून बांदा, माडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हैदोस माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवडेव व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.

शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.

वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुलि गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात धैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीची सावट पसरले आहे.

 

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लवकरच दिसणार ‘डिजिटल कोच इंडिकेटर’

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ वरील उघड्या जागेत तसेच शेड परिसरात दुहेरी दिशेच्या मार्गदर्शक प्रदर्शन फलक (सीजेमबीडी) पुरवठा, स्थापित करणे, चाचणी आणि कार्यान्वयनासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.

या कामासाठी निविदा क्रमांक KR-RN-S&T-07-2025-26 असून एकूण अनुमानित खर्च 19.84 लाख रुपये (जीएसटीसह) निश्चित करण्यात आला आहे. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025, दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे.

निविदेसाठी ईएमडी रक्कम 39,700 ठेवण्यात आली असून इच्छुक आणि पात्र ठेकेदारांनी अधिक माहितीसाठी www.ireps.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कोकण रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश 

२६ जानेवारी २०२५ च्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील ऑफिसमधे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सावंतवाडी येथे ही डिजिटल कोच इंडिकेटर करिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणती गाडी प्लॅटफॉर्म ला उभी आहे आणि त्या गाडीतील कोच प्लॅटफॉर्मवर कोणत्या स्थानी लागला आहे हे कळणे आता सुलभ होईल.

हे सर्व कोकणवासीयांचा एकजुटीमुळे शक्य झाले आहे. सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी प्रथम लिफ्ट आणि आता कोच इंडिकेटर सारखी कामे सावंतवाडी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर १७० मीटरची निवारा शेड देखील होईल हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली आहे.

M2M Princess: मुंबईतून समुद्रमार्गे थेट कोकणात जाणारी पहिली रो-रो सेवा

   Follow us on    

 

 

मुंबई: मुंबई ते थेट कोकणापर्यंत सागरी वाहतूक सुरू होणार असल्याने कोकणकरांमध्ये या सेवेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई ते कोकण या रो-रो सेवेचा पहिला टप्पा सध्या मुंबई ते मांडवा या मार्गावर सुरू झाला आहे. भाऊचा धक्का येथून या फेरीचं सुटणं होतं. पूर्वीप्रमाणेच जिथं जुन्या रो-रो फेरीचं तिकीट कक्ष होतं, तिथेच या नव्या सेवेसाठीसुद्धा तिकीट मिळत आहे.

‘M2M प्रिन्सेस’ असं या नव्या रो-रो फेरीचं नाव असून, या जहाजात सुमारे 50 कार आणि 30 दुचाकी पार्क करण्याची सोय आहे. ही एक ‘हाय स्पीड क्राफ्ट’ असून तिचा अधिकाधिक वेग 25 ते 30 नॉट्स इतका आहे.

मुंबई ते मांडवा हे सुमारे 10 नॉटिकल मैलांवरचं अंतर ही फेरी साधारण 35 मिनिटांत पार करते. प्रवाशांसाठी फेरीमध्ये विविध श्रेणीतील आसनव्यवस्था असून रिक्लायनर सीट आणि स्कोडा स्लाविया लाऊंजमधील बॅक आणि फूट रिकलायनर सीट्ससारखे आरामदायी पर्यायही उपलब्ध आहेत.

सध्या प्राथमिक स्तरावर मुंबई ते मांडवा या प्रवासाचं तिकीट ५५० प्रति व्यक्ती आहे, तर कोकणापर्यंतच्या प्रवासासाठीचं अपेक्षित तिकीटदर ७००० प्रति व्यक्ती इतका असेल. त्यामुळे मांडवापर्यंतचा प्रवास तुलनेनं अधिक किफायतशीर ठरतो.

दरम्यान, कोकणापर्यंतचा रो-रो प्रवास अद्याप सुरू झालेला नसून, तो पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागतील. मात्र, या प्रवासादरम्यान समुद्राच्या विशाल लाटांमधून कोकणात पोहोचण्याचा अनुभव प्रवाशांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४,९१८ शेतकऱ्यांना ६९.४८ कोटींची पिकविमा नुकसानभरपाई वितरित

  •    Follow us on    

     

     

सिंधुदुर्ग : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (अंबिया बहार, सन २०२४-२५) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा नुकसानभरपाईचे वितरण सुरू झाले आहे. या अंतर्गत आतापर्यंत २४,९१८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल ६९.४८ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये देखील नुकसानभरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यातील गरीब व कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा लाभ दिवाळीपूर्वी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत.

 

Konkan Railway: महत्वाचे! कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल.

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या दिनांक २१ ऑक्टोबर पासून कोकण रेल्वे मार्गावर बिगर पावसाळी वेळापत्रक लागु होणार असून रेल्वे गाड्या जलद धावण्यास सुरुवात होणार आहे.

पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येवून सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेवून हा निर्णय कोकण रेल्वे प्रशासना कडून घेण्यात येत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात हा वेग कमी करण्यात आला होता.

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – कोकण मार्गावरील प्रवास गतीमान होणार आहे.

दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते, परंतु यंदा पूर्व पावसाळी कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे १५ दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपविण्यात आले आहे.

त्यामुळे आता प्रवाशांना मुंबई – कोकण मार्गावर जलद प्रवास करता येणार आहे. गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी NTES या रेल्वेच्या अधिकृत अॅप वर आपण प्रवास करणार असलेल्या गाडीचे वेळापत्रक आणि सद्यस्थिती तपासावे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार गाड्यांना थांबे मंजूर

नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2025

   Follow us on    

 

 

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नवीन आदेश जाहीर करत चार महत्त्वाच्या गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Basis) देण्यात आला असून, तो लवकरच अमलात येणार आहे.

या आदेशानुसार खालील गाड्यांना थांबा मिळणार आहे:

22655/22656 Ernakulam – Hazrat Nizamuddin Express – थांबा: सिंधुदुर्ग

12977/12978 Ernakulam – Ajmer Marusagar Express – थांबा: सिंधुदुर्ग

22475/22476 Hisar – Coimbatore Express – थांबा: कणकवली

16335/16336 Gandhidham – Nagercoil Express – थांबा: कणकवली

 

 

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भिजत घोंगडे; मुंबईतील सिंधुपुत्र आमदारांचा कोकणवासियांच्या हक्कासाठी लढा.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष.

   Follow us on    

 

 

मुंबई: कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आणि कोकण रेल्वेच्या विविध गाड्यांना थांबा मिळावा, या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार श्री. अनंत (बाळा) नर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मूळचे सिंधुदुर्गातील तरळा-वारगावचे सुपुत्र असलेल्या श्री. नर यांनी थेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कोकणवासियांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे या प्रश्नासाठी लढणाऱ्या स्थानिक प्रवासी संघटनांच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले आहे.

गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस आणि कोचिंग डेपोचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हक्काच्या गाड्या सोडण्याकरिता आणि इतर टर्मिनस सुविधांसाठी त्यांना थेट मडगाव किंवा मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार बाळा नर यांनी आपल्या पत्राद्वारे या गंभीर समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यास केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील.

या पत्राद्वारे केवळ टर्मिनसच्या कामाचीच नव्हे, तर कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यामध्ये मुंबई-मंगळूरु एक्सप्रेस, संपर्कक्रांती एक्सप्रेस, निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या थांब्यांमुळे मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणी चाकरमान्यांची प्रवासाची सोय होईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

स्थानिक संघटनांचा अविरत संघर्ष

सावंतवाडी टर्मिनस आणि रेल्वे थांब्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) सातत्याने लढा देत आहे. संघटनेचे मुंबईतील पदाधिकारी श्री. संदीप गुरव, शाखाप्रमुख श्री. नंदकुमार ताम्हणकर, उपशाखाप्रमुख शैलेश बांदेलकर, श्री. केशव पांचाळ, राजापूर तालुका सहसंपर्कप्रमुख श्री. जगन्नाथ कदम आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वीच माहीमचे आमदार श्री. महेश सावंत यांनीही या विषयात पत्रव्यवहार केला होता. आता आमदार बाळा नर यांच्या पुढाकाराने या मागणीला अधिक वजन प्राप्त झाले आहे.

आमदार नर यांच्या या पत्रामुळे कोकणवासियांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, “आता कोकणच्या हक्काचे टर्मिनस मिळवूच!” असा निर्धार व्यक्त केला जात आहे. सरकार आणि रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणवासीयांना न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सावंतवाडीतील चिमुकल्या ‘नृत्या’ला जीवनदानाची गरज – उपचारासाठी १५ लाखांची आवश्यकता, समाजातील दानशूरांकडून मदतीचे आवाहन

   Follow us on    

 

 

सावंतवाडी, ता. ९ : सावंतवाडीतील अवघी तीन वर्षांची चिमुरडी ‘नृत्या’ सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. निमोनियाच्या गंभीर प्रकारामुळे तिला कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचारासाठी तब्बल १० ते १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

‘नृत्या’ ही सावंतवाडीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर महेश जांभोरे यांची कन्या आहे. जन्मापासूनच विविध आरोग्य समस्यांशी ती लढत आहे. आतापर्यंत जांभोरे यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च करून मुलीवर उपचार सुरू ठेवले, मात्र सध्याच्या परिस्थितीत उपचारांचा खर्च परवडणं कठीण झालं आहे.

आठवडाभरापूर्वी ताप व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमधून तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

त्यासाठी प्रवीण कुबल (7066415169) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दात्यांना आर्थिक मदत द्यायची असेल त्यांनी या बँक अकाउंटवर IFSC :- SBIN0000476, Account no :- 20300618631 किंवा गुगल पे महेश जांभोरे (9545472152) वर आपली मदत पाठवावी.

नृत्याच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन तिच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search