सिंधुदुर्ग: सावंतवाडी ते मुंबई रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रेत्याकडून प्रवाशांना चक्क वास मारणारे, खराब झालेले ‘फ्रुट सॅलड’ विकण्यात आले. या सॅलडमधील कलिंगड पूर्णपणे सडलेले होते आणि त्याला दुर्गंधी येत होती. हा प्रकार लक्षात येताच रेल्वेतील प्रवासी प्रचंड आक्रमक झाले.
संबंधित विक्रेत्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणत्याही कंपनीचे किंवा ठेकेदाराचे नाव व संपर्क क्रमांक नव्हता. तसेच रेल्वेचे टी-शर्ट घालून फिरणाऱ्या या विक्रेत्यांकडे साधे ओळखपत्रही नव्हते. यावरून ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य ॲड. नकुल पार्सेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. “अशा खराब अन्नपदार्थांमुळे प्रवाशांना विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी रेल्वे निरीक्षकांना विचारला.
या घटनेची दखल घेत रेल्वे टीसी आणि निरीक्षकांनी संबंधित कंपनीला केवळ १,००० रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, प्रवाशांनी या किरकोळ कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी ठेकेदारांना मोठा दंड करून त्यांचे थेट कंत्राट (ठेके) रद्द करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली. कोकण रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ट्रेनमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रकाराबाबत आता काही जागरूक प्रवासी ऑनलाइन तक्रार देखील दाखल करणार आहेत.











