Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वेचा ‘फुकट्या प्रवाशांना’ दणका: एका महिन्यात २.३३ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल!

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम (Ticket Checking Drive) मोठ्या प्रमाणात तीव्र करण्यात आली असून, विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नोव्हेंबर २०२५ या एका महिन्यात, या मोहिमेतून २.३३ कोटी रुपये दंड आणि भाड्यापोटी वसूल करण्यात आले आहेत.

मोहिमेतील प्रमुख आकडेवारी (नोव्हेंबर २०२५)

​कोकण रेल्वेने नोव्हेंबर २०२५ मध्ये केलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​विशेष तिकीट तपासणी मोहिमा: १,०७०

​अनधिकृत/अनियमित प्रवासी: ४२,९६५

​वसूल झालेली एकूण रक्कम (भाडे आणि दंड): २.३३ कोटी रुपये

​कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भाडे आणि दंड अशा स्वरूपात ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

KRCL चा प्रवाशांना इशारा

​रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी योग्य तिकीट किंवा पास सोबत ठेवावा, अन्यथा तिकीट तपासणी दरम्यान कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा कोकण रेल्वेने दिला आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

​प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी कोकण रेल्वेची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार वडोदरा – कोट्टायम विशेष एक्सपेस

   Follow us on        

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

१) गाडी क्र. 09124 / 09123 वडोदरा जं. – कोट्टायम विशेष गाडी (विशेष भाड्यावर):

गाडी क्र. 09124 (वडोदरा जं. – कोट्टायम स्पेशल)

​प्रस्थान: ही गाडी वडोदरा जं. येथून दर शनिवारी सकाळी ०६:०५ वाजता सुटेल.

​आगमन: कोट्टायम येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:५० वाजता पोहोचेल.

​धावण्याच्या तारखा:

​डिसेंबर २०२५: २० आणि २७

​जानेवारी २०२६: ०३ आणि १०

गाडी क्र. 09123 (कोट्टायम – वडोदरा जं. स्पेशल)

​प्रस्थान: ही गाडी कोट्टायम येथून दर रविवारी रात्री २१:०० वाजता सुटेल.

​आगमन: वडोदरा जं. येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता पोहोचेल.

​धावण्याच्या तारखा:

​डिसेंबर २०२५: २१ आणि २८

​जानेवारी २०२६: ०४ आणि ११

महत्वाचे थांबे (दोन्ही दिशांना):

​सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुरुडेश्वर, भटळ, मूकांबिका रोड बायंदूर (ह), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळूर जं., कासारगोड, कन्नूर, तेलिचेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर जं., त्रिशूर, आलुवा आणि एरणाकुलम टाऊन स्थानकांवर गाडी थांबेल.

गाडीची रचना (Composition):

​गाडीमध्ये एकूण २१ एलएचबी (LHB) डबे असतील, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​प्रथम श्रेणी वातानुकूलित (First AC) – ०१ डबा

​द्वितीय श्रेणी वातानुकूलित (2 Tier AC) – ०२ डबे

​तृतीय श्रेणी वातानुकूलित (3 Tier AC) – ०६ डबे

​शयनयान (Sleeper) – ०६ डबे

​सामान्य (General) – ०४ डबे

​एसएलआर/डी (SLR/D) – ०१ डबा

​जनरेटर कार (Generator Car) – ०१ डबा

सावंतवाडी टर्मिनस प्रकरणी कोकण रेल्वे सीएमडींच्या वक्तव्याने नव्याने वाद

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याच्या दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पात आता नव्याने वाद निर्माण झाला आहे. कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत “हे स्थानक टर्मिनस नसून फक्त वे-साईड स्टेशन आहे. ‘टर्मिनस’ हे नाव कसे पडले? याचा पुरावा द्या,” अशी थेट मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

सावंतवाडी टर्मिनसच्या कामातील विलंब आणि सुविधांबाबत सतत पाठपुरावा करणारे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे नेते मिहीर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच संतोष कुमार झा यांची भेट घेतली होती. या चर्चेदरम्यान स्थानकाच्या दर्जा, कामातील उशीर आणि पुढील कार्यवाही यावर बोलताना झा यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यामुळे स्थानकाच्या नावाचा दर्जा, प्रकल्प रेंगाळण्याची कारणे आणि प्रशासकीय दृष्टिकोनावरून नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करत मिहीर मठकर यांनी म्हटले आहे, “वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवाव्या? हा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला आहे, आणि आता दर्जाच नाकारला जातोय.” तसेच, पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पार्श्वभूमी:

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची योजना २०१५ पासून आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भूमिपूजनही झाले होते. मात्र, भूसंपादन, निधी आणि इतर कारणांमुळे काम रखडले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी अतिरिक्त थांबे, मेंटेनन्स सुविधा आणि इतर सोयी अपेक्षित आहेत. कोकण रेल्वेच्या काही अधिकृत जुन्या घोषणांमध्ये याला ‘टर्मिनस’ म्हणून उल्लेख आहे, पण सध्याच्या विकासात ते मधले स्थानक (मिड-स्टेशन) म्हणूनच विकसित झाल्याचे सांगितले जाते.

हा वाद आता रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्थानिक खासदार-आमदार आणि संघटनांकडून पाठपुरावा वाढवला जाणार असून, लवकरच आंदोलनाची रूपरेषा आखली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सावंतवाडी टर्मिनससाठीच्या तक्रार मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

   Follow us on        सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार मागणी नोंदवण्याबद्दल आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कालच्या एका दिवसात टर्मिनस साठीच्या तब्बल 264 तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती संघटनेचे संपर्कप्रमुख तसेच उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी दिली.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व्हावे यासाठी डिजिटल पद्धतीने लढाई करताना सुरवातीला इमेल मोहीम, त्यानंतर तक्रार मोहीम, त्यात महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार, माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे तक्रार, मुख्यमंत्री श्रीमान देवाभाऊ, रेल्वे मंत्रालय (रेल मदद) आणि कोकण रेल्वे कडे हजारो तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर असणारे मंत्री महोदयांचे जनता दरबारात देखील तक्रारींचा पाऊस पाडला होता. आणि आज देखील त्याचा प्रत्यय आला.

सोबतच सुरू असलेल्या डिजिटल सह्यांची मोहिमेला कोकणवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता देखील देत आहात याचा अर्थ कोकणवासी आपल्या हक्काच्या लढाईसाठी नक्कीच जागा झालाय. कोकणवासी आपल्या हक्कासाठी डिजिटली साक्षर होतोय यात मी समाधानी आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे काम त्वरित सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी नोंदवावी यात वेबसाईट www.pratapsamaik.com Grievances ( तक्रार) सेक्शन Public Transport ( सार्वजनिक वाहतूक) निवडा Describe your issue मध्ये पेस्ट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसमुळे कोकणी प्रवाशांचे हाल होत आहेत.निधी परत जाणे आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकल्प ठप्प आहे.हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी व प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तो तातडीने राज्य शासनाच्या मित्रा ( MlTRA ) संस्थेकडे वर्ग करावा.मागणी नोंदवल्यानंतर येणाऱ्या पोचपावतीला स्क्रीनशॉट संबधित ग्रुपवर अपलोड करा.या संदेशात सांगितल्याप्रमाणे आपण सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती देण्यासाठी आपली मागणी नोंदवू शकता आणि हा संदेश इतर कोकणवासीयांपर्यत पोहोचवावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे.

 

हिवाळी विशेष गाड्यांना थांबे द्या – रेल्वे प्रवासी सेवा समितीचे निवेदन

   Follow us on    

 

 

► खेड (ता.) कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हिवाळी विशेष गाड्यांच्या थांब्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे तालुके पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्याचा आरोप करत अखिल कोंकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांनी मध्य रेल्वेला निवेदन दिले आहे. ०११४१/०११४२ मुंबई-करमळी, ०१४५१/०१४५२ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम उत्तर तसेच भविष्यात जाहीर होणाऱ्या सर्व हिवाळी विशेष गाड्यांना माणगाव, महाड, खेड, राजापूर, वैभववाडी व सावंतवाडी या तालुक्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी मागणी समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.

 

अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य…

समितीने नमूद केले आहे की, ख्रिसमस व नवनव्या वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान गेल्यावर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठी वर्दळ असेल. त्याचबरोबर शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण भरलेले असल्याने प्रवाशांची अपेक्षा विशेष गाड्यांवर होती; मात्र महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांना थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे समितीने सांगितले.

रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या पट्ट्यात एकाही विशेष गाडीला थांबा नाही. या गाड्या नेमक्या कोणासाठी सोडल्या जातात? असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे. तिरअनंतपुरम विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे १५-२० किमी अंतरावर थांबे घेते, परंतु महाराष्ट्र कोकणातील अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे.

त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त

कोकणातील पर्यटक, व्यापारी, शिक्षण आणि रोजगारासाठी हे तालुके महत्त्वाचे असून विशेष गाड्या थांबा नसल्यामुळे स्थानिकांना मोठी गैरसोय होते. अनेकांनी तिकिटे रद्द केली आहेत. समितीने वैयक्तिक राजकारण सोडून, खेडवाडी रोड आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर तातडीने थांबे सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवासी सेवा समिती रेल्वे प्रशासनाकडून याबाबत त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Konkan Railway: डिजिटल तक्रार प्रणालीमुळे हरवलेले ७५ वर्षीय आजोबा कुटुंबीयांकडे सुखरूप परत

   Follow us on    

 

 
५ डिसेंबर, २०२५

दिनांक ४ डिसेंबर रोजी तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १९५७७) ने प्रवास करणारे ७५ वर्षीय वृद्ध प्रवासी चुकीने चिपळूण येथे उतरल्याने हरवले होते. मात्र त्यांच्या मुलाने ‘रेल मदद’वर तात्काळ तक्रार नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) जलद आणि समन्वयित शोधमोहीम राबवली.

चिपळूण स्थानकात गस्त घालत असताना RPF पथकाच्या लक्षात एक वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्मवर भांबावलेल्या अवस्थेत फिरताना दिसले. पथकाने त्यांच्याशी संवाद साधला असता, ते चुकून गाडीतून उतरल्याचे आणि स्वतःचे गंतव्य नीट सांगू न शकण्याच्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर ‘रेल मदद’वरील तक्रारीतील तपशीलांची पडताळणी करून RPF पथकाने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व त्या वृद्ध प्रवाशाला सन्मानपूर्वक त्यांच्या परिवाराकडे सुरक्षितपणे सोपवले.

कुटुंबीयांनी RPF चे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेतून कोकण रेल्वेची डिजिटल तक्रार नोंद, वेगवान प्रतिसाद आणि मैदानातील समन्वयित कार्यप्रणाली वृद्ध व असुरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किती प्रभावी ठरते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे घरातून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लागला

   Follow us on        

रत्नागिरी │ २० नोव्हेंबर २०२५
कोकण रेल्वे महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कता, तात्काळ निर्णयक्षमता आणि समन्वयाच्या मदतीने रेल्वेतून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लावण्यात येऊन त्याला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस (क्र. १२६१९) मध्ये प्रवास तपासणी करताना मुख्य प्रवासी तिकीट तपासनीस (एचडी टीई) श्री. प्रदीप झेड. शिरके यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) जनरल कोचमध्ये तिकीटाविना प्रवास करणारा विद्यार्थी वेशातील अल्पवयीन मुलगा आढळला. त्याच्याकडे शाळेची पिशवी असल्याने संशय निर्माण झाला. चौकशीदरम्यान मुलगा घरातून पळून आल्याची माहिती मिळताच श्री. शिरके यांनी तातडीने कमर्शियल कंट्रोलला कळवून रत्नागिरी स्थानकात रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) सहाय्याची मागणी केली.

काही वेळातच RPF पथकाने रत्नागिरी येथे हजर राहून मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. पुढील पडताळणीत संबंधित मुलगा गोवा येथील वास्को-द-गामा येथील शाळेतून बेपत्ता झाल्याचे उघड झाले असून, त्याच्या पालकांनी शोधासाठी माहिती सर्वत्र प्रसारित केली होती.

मुख्य तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची जागरूकता, कमर्शियल कंट्रोल विभागाचा तातडीचा प्रतिसाद आणि RPF च्या समन्वयातून मुलाचा शोध लागला व त्याचे कुटुंबीयांशी सुरक्षित पुनर्मिलन शक्य झाले, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिली.

Konkan Railway: कोकण रेल्वेवर 5Gचा वेग – रेल्वे स्थानकांवर लवकरच सेवा उपलब्ध

दि. 19 नोव्हेंबर 2025 | नवी मुंबई

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स लिमिटेड (BCSSL) यांनी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला असून, कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सेवा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. हा करार 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे करण्यात आला.

या संयुक्त उपक्रमाअंतर्गत, प्रारंभी तीन स्टेशन — मडगाव जंक्शन, रत्नागिरी आणि उडुपी — येथे सेवा चाचणी तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. ब्ल्यू क्लाउड कंपनी अत्याधुनिक 5G तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर व सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी अग्रणी संस्था असून या सहकार्याद्वारे स्टेशन परिसर आणि रेल्वे डब्यांमध्ये 5G Fixed Wireless Access (FWA) सेवा तसेच इन-स्टेशन आणि इन-ट्रेन डिजिटल मनोरंजन प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना जलद इंटरनेट सेवा, वास्तविक वेळेतील माहिती आणि उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करणे आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आधुनिक होण्याची अपेक्षा आहे.

POC (Proof of Concept) दरम्यान दोन्ही संस्थांकडून तांत्रिक व कार्यप्रणालीची क्षमता तपासली जाईल, तसेच भविष्यात सेवा विस्ताराचे नियोजन सुलभ होईल. मॉडेल यशस्वी ठरल्यास या सुविधांचा विस्तार कोकण रेल्वेच्या इतर स्थानकांवरही करण्यात येईल. तसेच हा प्रकल्प दीर्घकालीन महसूल-वाटप (Revenue Sharing) पद्धतीवर व्यावसायिक स्वरूपात राबवला जाईल.

या प्रसंगी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा म्हणाले:

“ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्ससोबतची भागीदारी आमच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन प्रणालींच्या माध्यमातून कोकण रेल्वेला आधुनिक करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत. या सहकार्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक समृद्ध होईल आणि भारतीय रेल्वे क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला जाईल.”

नांदेड–पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाची खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे मागणी

बदलापूर, १०: मुंबई–कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड–पनवेल एक्सप्रेसचा मार्ग कल्याणमार्गे सावंतवाडी रोडपर्यंत वाढवण्याची मागणी बदलापूर येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाने खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे केली.

या मंडळाच्या प्रतिनिधींनी खासदारांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कल्याण आणि कोकणदरम्यान थेट दैनंदिन रेल्वेसेवेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड–पुणे–पनवेल एक्सप्रेसला कल्याण जंक्शनमार्गे वळवून ती सावंतवाडीपर्यंत वाढवणे अत्यावश्यक आहे. या निर्णयामुळे पुणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध होईल.

तसेच सावंतवाडी टर्मिनसचे दुसऱ्या टप्प्याचे काम अपुऱ्या निधीअभावी थांबले असून, ते अमृत भारत स्टेशन योजनाअंतर्गत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नवीन प्लॅटफॉर्म, शेड, पाण्याची आणि बसण्याची सुविधा तसेच फूटओव्हर ब्रिजचा विस्तार करावा, अशी सूचना देण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतावृद्धीचा कोणताही सक्रिय प्रकल्प सध्या अस्तित्वात नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक खुलासा

कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ म्हणून अस्तित्व हेच तिच्या विकासातील मुख्य अडथळा

   Follow us on    

 

 

Konkan Railway: अखंड रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तराच्या आधारे कोकण रेल्वेच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतेवृद्धीचा कोणताही सक्रिय प्रकल्प अस्तित्वात नाही.

२३ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जास कोकण रेल्वे महामंडळाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या उत्तरानुसार पुढील बाबी स्पष्ट झाल्या :

  • रोहा–वीर हा सुमारे ४७ किमीचा भाग वगळता इतर कोणत्याही विभागाच्या दुपदरीकरणास मान्यता नाही.

  • ठोकुर–मुकांबिका रोड आणि वैभववाडी–माजोर्डा विभागांचे व्यवहार्यता परीक्षण सुरू असून, कोणताही सक्रिय प्रस्ताव तयार नाही.

  • नवीन स्थानक बांधणीसाठी कोकण रेल्वेकडे निधी उपलब्ध नाही.

  • २०२३ नंतर दुपदरीकरणासाठी राज्य सरकारांसोबत रेल्वे मंत्रालयाचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.

या उत्तरानुसार सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण किंवा क्षमतेवृद्धीचा कोणताही प्रत्यक्ष प्रकल्प प्रगतीपथावर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७-१८ मध्ये तयार केलेला क्षमतावृद्धीचा प्रस्ताव २०२३ मध्ये आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरल्याने नामंजूर करण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

महापदी यांनी नमूद केले की, कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ म्हणून अस्तित्व हेच तिच्या विकासातील मुख्य अडथळा ठरत आहे. स्वतंत्र रचनेमुळे या महामंडळाला केंद्रीय अर्थसंकल्पातून थेट निधी मिळत नाही. त्यामुळे दुपदरीकरण, सिग्नलिंग आणि नवीन स्थानके उभारणीसारख्या भांडवली प्रकल्पांना पुरेसा वित्तपुरवठा करणे शक्य होत नाही.

समितीने सुचवले आहे की, कोकण रेल्वे मार्गाचा भारतीय रेल्वेत समावेश करूनच या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होऊ शकते.
यासाठी –

  • रोहा–मडूरे विभाग : मध्य रेल्वेत

  • पेडणे–ठोकुर विभाग : दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) रेल्वेत
    अशा प्रकारे विलीनीकरण करण्याची मागणी समितीने केली आहे.

विलीनीकरणानंतर दुपदरीकरणासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून थेट निधी उपलब्ध होईल, कोकण मार्गाला राष्ट्रीय व्यस्त मार्ग (High Density Route) दर्जा मिळेल तसेच स्थानकांचा विकास, प्रवासी सुविधा आणि गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

महापदी यांनी पुढे म्हटले की, “कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. स्वतंत्र अभ्यासांवर आणि पुनर्परीक्षणांवर वायफळ खर्च करण्याऐवजी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.”

शेवटी त्यांनी नमूद केले की, कोकण रेल्वे हा देशाच्या पश्चिम किनारपट्टीचा धोरणात्मक दुवा आहे. मात्र सध्याच्या रचनेत दीर्घकालीन विकास शक्य नाही. त्यामुळे भारतीय रेल्वेशी विलीनीकरण हा अनिवार्य, व्यावहारिक आणि शाश्वत मार्ग आहे, असे मत अखंड रेल्वे प्रवासी सेवा समितीने व्यक्त केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search