Category Archives: कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वेचा प्रवास भारतीय रेल्वेच्या ईतर विभागांपेक्षा महाग; कारण काय?

   Follow us on        
रत्नागिरी :मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार श्रेणीचे खेड ते मडगाव (341 किमी) चे एकूण प्रवासी भाडे ११८५ रुपये इतके आहे, तर मुंबई – गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्याच श्रेणीचे बोरिवली ते वडोदरा दरम्यानचे, जवळपास तेवढ्याच अंतराचे (३६२ किमी)  भाडे ९९५ रुपये एवढे आहे. म्हणजे जवळपास २०० रुपयाचा फरक आहे. एकाच देशातील दोन समान गाड्यांच्या समान श्रेणीच्या प्रवासी भाड्यात एवढा फरक का हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीतच नाही तर इतरही गाड्यांच्या प्रवासीभाड्यात हा फरक येतो. असे का? कोकण रेल्वेचा प्रवास महाग आहे का? हे प्रश्न सहाजिकच पडतात. चला मग याचे उत्तर शोधूया.
रोहा ते ठोकूर हा विभाग कोकण रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड KRCL या कंपनीच्या अखत्यारीत येतो. कोकण रेल्वे मार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात खर्च आला होता. मोठं मोठी पूल, बोगदे आणि इतर गोष्टीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. या खर्चाचा आकडा 3,555 कोटी रुपये एवढा आहे.  हा खर्च वसूल करण्यासाठी कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार रोहा ते ठोकूर दरम्यानचे अंतर प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ४०% वाढवून दाखवून त्याप्रमाणात प्रवास भाडे आकारले जाऊ लागले. प्रवासी तिकिटांवर पण हेच अंतर छापले जाऊ लागले. उदाहरणार्थ रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव हे खरे अंतर ५८१ किलोमीटर एवढे आहे. मात्र प्रवाशांकडून हे अंतर ७६५ किलोमीटर असे दाखवून त्याचप्रमाणे भाडे आकारले जात आहे. यात रोहा ते मडगाव हे अंतर ४४० किलोमीटर एवढे आहे मात्र तिकीट आकारताना हे अंतर ६१६ एवढे दाखवून भाडे आकारण्यात येते.
खरे तर एकदा प्रकल्प निर्मितीचा खर्च वसूल झाला की अशा प्रकारची अतिरिक्त भाडे आकारणी बंद करून प्रचलित दराने भाडे आकारणी सुरु करण्याची गरज होती. कोकण रेल्वे गेली २५ वर्षे हे अतिरिक्त भाडे आकारत आहे. साहजिकच कोकण रेल्वे निर्मितीचा खर्च वसूल झालाच असेल मात्र KRCL ने ही वाढीव भाडे आकारणी चालूच ठेवली आहे.  कठीण भौगोलिक स्थितीमुळे मोठा देखभाल खर्च होत असल्याने ही वाढीव आकारणी चालू ठेवली असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
सर्व गाड्यांना लागू
या कारणामुळे कोकण रेल्वे नेटवर्कमधून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे भाडे वाढलेल्या अंतरावर मोजले गेले. उदाहरणार्थ, मंगळुरु सेंट्रल ते मुंबई एलटीटी अशी मत्स्यगंधा एक्सप्रेस एकूण 882 किमी अंतर पार करते, ज्यापैकी ठोकूर आणि रोहा दरम्यानच्या 760 किमी प्रवासासाठी वाढीव भाडे आकारले जाते. जर तुम्हाला मुंबई सीएसएमटी ते कणकवली पर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मडगाव पर्यंतचे प्रवास भाडे रेल्वे ला द्यावे लागते यावरून कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास इतर विभागातील रेल्वेच्या प्रवाशांशी तुलना करता महागाच म्हणावा लागेल.

Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून २ गाड्या; एकूण ३२ फेऱ्या

मुंबई,दि. ११ एप्रिल:उन्हाळी हंगामासाठी प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्यरेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ०८ एप्रिल ते ०९ जून पर्यंत या मार्गावर २ विशेष साप्ताहिक गाड्यांच्या जात येत एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
१) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११८७/०११८८
गाडी क्र. ०११८७ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी  मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११८८  थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)  
परतीच्या प्रवासात दिनांक १९ एप्रिल ते ७  जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी  पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे:
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२  एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३ , थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०२

२) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११२९/०११३० 

गाडी क्र. ०११२९  एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक २० एप्रिल ते ८ जूनपर्यंत दर शनिवारी मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११३०  थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)  
परतीच्या प्रवासात दिनांक २१ एप्रिल ते ९ जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी  पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२ आयसीएफ  कोच: सेकंड सीटिंग (जनरल) – २०, एसएलआर – ०२

 

आता हापूसच्या नावाने अस्सल हापूसच मिळणार; आधुनिक तंत्रज्ञान फसवणुकीला आळा घालणार

   Follow us on        
रत्नागिरी, दि.१० एप्रिल: कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने येथील आंब्याला जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन मिळाले आहे. मात्र अनेकदा इतर भागातील आंबा हापूस च्या नावाने विकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. याचा फटका आंबा बागायतदारांनाही बसतो. मात्र आता अस्सल हापूस ओळखण्यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यूआर कोडचे लक्ष्य ठेवले आहे. क्यूआर कोडसाठी मीरो लॅब कंपनीबरोबर करार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
ग्राहकाला दर्जेदार हापूस मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षापूर्वी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून क्युआर कोड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात काही त्रुटी जाणवल्या होत्या. त्यामध्ये क्यूआर कोडला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पुनर्वापर करून गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. मागीलवेळच्या त्रुटी दूर करून यंदा क्यूआर कोड नव्याने निर्माण केले आहेत.
क्यूआर कोडमध्ये खालील माहिती भेटणार आहे.
१) आंबा पॅकिंगची तारीख
२)आंबा परिपक्व होण्याची तारीख
३) हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्यांची माहिती, त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल
आंब्यावरील क्यूआरकोड ६५ पैसे प्रति आंबा या दराने दिला जात असून बॉक्सवरील कोड तीन रुपये दराने दिला जाणार आहे. बागायतदारांना कोड अ‍ॅक्टिव्ह कसा करावा यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे. प्रचार, प्रसार, शिबिरे घेणे व शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने कार्यक्रम उत्पादक संस्था घेत आहे. शासनाच्या एखाद्या योजनेमधून संस्थेला अनुदान मिळाले तर संस्था दहा पट वेगाने जीआय नोंदणीचा प्रसार करू शकते व बागायतदारांना आणखीन कमी दरामध्ये मार्केटिंगसाठी क्यूआर कोड पुरवू शकेल असे संस्थेकडून सांगण्यात आले. संस्थेची स्वतःची वेबसाईट नेहमी अपडेट होत असते आणि त्यावर वेळोवेळी माहितीही दिली जाते.

अभिमानास्पद! सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला ‘जी आय’ मानांकन प्राप्त

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १० एप्रिल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जीआय मानांकन  Geographical Indication (GI)  दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला महत्व येणार आहे.

सावंतवाडीच्या राजघराण्याने हे मानांकन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. लाकडी खेळणी आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच संरक्षण दिले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या संदर्भात संस्थानचे बाळराजे आणि युवराज लखमराजे भोसले आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.

जी. आय. मानांकन म्हणजे काय?

हे एक मानांकन आहे. हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो.

जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती आहे.थोडक्यात कुठल्याही वस्तूला जीआय मानांकन मिळण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष असतात. एक म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट भौगोलिक भागात एका विशिष्ट पद्धतीने बनविली गेली असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा विशिष्ट दर्जा किंवा गुण हा ती त्या भागात बनल्यामुळे असला पाहिजे. तर आणि तरच त्या वस्तूला जी आय मानांकन दिला जातो. आणि जीआय हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. विशेषत: शेतीमाल असेल तर (आंबे, द्राक्षे, चिकू, तांदूळ इ.) किंवा हाताने बनविली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असेल तर (हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनविली जाणारी खेळणी किंवा इतर वस्तू). कारण शेतात उगवणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात त्या त्या भागातली माती, हवामान, पर्जन्यमान यांसारख्या गोष्टींमुळे. तर हाताने बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात तिथल्या कारागिरांचा अनुभव, परंपरागत कौशल्ये, पिढीजात कला यांसारख्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनच अशा काही गोष्टींबाबत त्या कुठे बनल्या हे फार महत्त्वाचे असते. आणि आपण कित्येकदा पाहतो की त्या जागेनुसार त्या वस्तूचा भाव आणि दर्जा ठरत असतो.

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

   Follow us on        

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत आरवली रोड ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) Train no. 12617 Ernakulam – H. Nijamuddin Express 

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज.  – रत्नागिरी विभागादरम्यान 1 तास 45  मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

2) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव  ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणार्‍या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे

कोकणच्या मातीचा गंध असलेली, सावंतवाडीच्या सुपुत्राने बनवलेली वेबसीरीज ‘संभ्रम’ बुधवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ट्रेलर येथे पहा

S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक कारिवडे गावच्या सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून 'संभ्रम' ही रहस्यमय कथा साकारली आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो.

   Follow us on        
सावंतवाडी, ता. ८ : तालुक्यातील कारिवडे-गोसावीवाडी येथील सागर गोसावी या युवकाने दिग्दर्शित केलेल्या सात भागांची ‘संभ्रम’ ही मराठी वेबसीरीज बुधवारी (ता.१०) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार आहे. आज  त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवलेल्या या वेबसीरीजमध्ये प्रेम प्रकरणातून मित्रांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होते, हे दाखविल्याचे निर्माता आनंद मेस्त्री आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सावंतवाडी आणि परिसरात सिरीजचे शूटिंग झाले. चार साडेचार लाख रुपये खर्च करुन हा प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. वेब सिरीजमध्ये सुरुवातीच्या भागापासून निर्माण झालेला गुंता, संभ्रम शेवटच्या भागांमध्ये उघड होतो. त्यामुळे सर्वच्या सर्व भाग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. परंतु, नव्याने काहीतरी करण्याच्या उमेदीने आणि या भागातील निसर्ग आणि कलाकार जगासमोर यावेत यादृष्टीने काम करत आहोत. आम्हाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. ही प्राथमिक सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा अधिक चांगले करू. असे यावेळी चित्रपट निर्माते सागर गोसावी यावेळी म्हणालेत.
 यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, रवी जाधव, कलाकार गायत्री रामशिंदे, राम निपाणीकर, सुहास रुके आदी उपस्थित होते.
Watch Trailer Here 👇🏻

अपघात: मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; तीन प्रवाशांचा मृत्यू

   Follow us on        
माणगाव दि. ०७ एप्रिल: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही बसचा आज भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक वृत्तानुसार, ठाण्याहून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावजवळ आली असता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेत रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मानगाव येथील मानस हॉटेलजवळ हा अपघात झाला.
दत्तात्रय वरांडेकर, प्रवीण मालसुरे आणि अन्य एक  प्रवासी अशी रिक्षात प्रवास करताना झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस सध्या अपघाताच्या घटनास्थळाचा तपास करत आहेत. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाल्यामुळे धडकेची तीव्रता स्पष्ट होत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपस करत आहेत.

सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणार तोच आमचा उमेदवार- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना

लोकसभा निवडणुकीचा जो उमेदवार प्रवासी संघटनेच्या मागण्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

   Follow us on        
सावंतवाडी दि. ०७ एप्रिल: कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत, टर्मिनस व्हावे, टर्मिनस ला प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशा प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी लोकसभा निवडणुकीतील जो उमेदवार जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल. आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुतोंडी भुमिका मांडली आहे यापुढे तशी भूमिका चालणार नाही असा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी दिला आहे.
आता लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनस ला उघड पाठिंबा देणार्‍या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं, जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा. टर्मिनस साठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनस ला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत. रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे..
कोणतीही निवडणूक असली तर कोकणातून राजकारणी लोकांना चाकरमान्यांची आठवण येते. मग काय गावातून फोनवर फोन जातात कि तुझे नाव येथील वोटिंग लिस्ट वर आहे, मतदानाला येऊन आम्हाला सहकार्य कर. मात्र त्याच चाकरमान्यांच्या कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या खडतर प्रवासाशी राजकारणी लोकांना देणे घेणे नाही. अशा वेळी निवडणुकीतच आपल्या मागण्या पूर्ण करण्याची संधी चाकरमान्यांनी सोडू नये,

Konkan Tourism | येथे समुद्र अंधारात चमकतो, कोकणातील ‘या’ बीचला भेट देऊन अनुभवा निसर्गाचा अविष्कार

   Follow us on        

Konkan Tourism:भारतामध्ये असे अनेक समुद्रकिनारे आहेत जिथे तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता, जिथे बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनच्या उपस्थितीमुळे समुद्र अंधारात चमकताना दिसतो. भारतामध्ये असे चमकणारे एकूण पाच समुद्र किनारे आहेत. कोकण पर्यटनासाठी गौरवाची बाब म्हणजे सिंधुदुर्गातील मालवणचा समुद्र किनारा या चमकणाऱ्या समुद्र किनाऱ्यामध्ये येतो.

Continue reading

लांजा | रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; मंगळसूत्र असलेली पर्स पोलिसांकडे सुपूर्त

लांजा: लांजा येथील रिक्षा व्यावसायिक रोहिदास उर्फ बाबा राणे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. लांजा बसस्थानक परिसरात सापडलेले मंगळसूत्र असलेली छोटी पर्स प्रामाणिकपणे लांजा पोलिस ठाण्यात जमा केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.
लांजा बसस्थानक परिसरात ४ एप्रिलला सायंकाळी रिक्षास्टॅण्डजवळ त्यांना सोन्याचे एक सिंगल सर असलेले मंगळसूत्र असलेली छोटी पर्स सापडली होती. रिक्षा व्यावसायिक रोहिदास राणे यांनी हे सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स लांजा पोलिसांच्या ताब्यात दिली. लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
पोलिसांचे आवाहन
ज्या कोणाचे हे मंगळसूत्र हरवले असेल त्यांनी लांजा पोलिस ठाण्याशी संपर्क करून ओळख पटवून घेऊन जावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search