Category Archives: देशभरातील बातम्या

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक; महाराष्ट्रातील ७ खासदारांचा कार्यकाळ संपणार

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठीनि वडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरवलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे अनिवार्य असेल.

​या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ. (श्रीमती) फौजिया तहसीन अहमद खान, प्रियांका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंधू आठवले हे सदस्य निवृत्त होत आहेत. याशिवाय, ओडिशा राज्यातून ममता मोहंता, मुजीबुल्ला खान, सुजीत कुमार आणि निरंजन बिशी हे ४ सदस्य, तर तामिळनाडूमधून एन.आर. इलांगो, पी. सेल्वारासू, एम. थंबीदुराई, तिरुची शिवा, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू आणि जी.के. वासन हे ६ सदस्य निवृत्त होत आहेत.

​पश्चिम बंगालमधील साकेत गोखले, ऋतब्रत बॅनर्जी, विकास रंजन भट्टाचार्य, सुब्रत बक्षी आणि ५ जानेवारी २०२६ पासून रिक्त झालेली मौसम नूर यांची जागा अशा एकूण ५ जागांसाठी निवडणूक होईल. बिहारमधून अमरेंद्र धारी सिंग, प्रेमचंद गुप्ता, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाहा आणि हरिवंश नारायण सिंग हे ५ सदस्य निवृत्त होत आहेत. आसाममधील रामेश्वर तेली, भुवनेश्वर कलिता आणि अजित कुमार भुयान यांच्या ३ जागांसाठी मतदान होईल. तसेच छत्तीसगडमधून कवी तेजपाल सिंग तुलसी व फुलोदेवी नेताम, हरियाणातून किरण चौधरी व राम चंदर जांगडा आणि तेलंगणातून डॉ. अभिषेक मनू सिंघवी व के.आर. सुरेश रेड्डी या प्रत्येकी दोन सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. हिमाचल प्रदेशमधून इंदू बाला गोस्वामी या एकमेव सदस्या निवृत्त होत आहेत. या सर्व ३७ जागांसाठी २० मार्च २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Holi Special Trains: होळी सणासाठी रेल्वेकडून १,४१० विशेष गाड्यांचे नियोजन

   Follow us on        

नवी दिल्ली: होळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी संख्येने होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी देशभरात १,४१० हून अधिक होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून ही संख्या वाढवून तब्बल १,५०० पर्यंत नेण्यात येणार आहे. या सर्व विशेष गाड्या मार्च महिन्यात धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात प्रमुख मार्गांवरील प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी होळी २०२५ दरम्यान एकूण १,१४४ विशेष गाड्यांचे संचालन करण्यात आले होते. यंदा त्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

विभागनिहाय गाड्यांचे नियोजन

मध्य रेल्वे (CR) कडून २०९ होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून पश्चिम रेल्वे (WR) २३१ विशेष गाड्या चालवणार आहे. सर्वाधिक २८५ विशेष गाड्या पूर्व मध्य रेल्वे (ECR) कडून धावणार आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण मध्य रेल्वे (SCR) १६०, उत्तर रेल्वे (NR) १०८ तर उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) ७१ विशेष गाड्या चालवणार आहे.

याशिवाय उत्तर मध्य रेल्वे (NCR) ६६, उत्तर पूर्व रेल्वे (NER) आणि पूर्व किनारा रेल्वे (ECOR) प्रत्येकी ६२ गाड्या चालवणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ४७, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ४३, दक्षिण रेल्वे (SR) ३९ आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) १५ विशेष गाड्या चालवणार आहे. कोकण रेल्वेकडून ९ तर ईशान्य सीमांत रेल्वे (NFR) कडून २ विशेष गाड्यांचे संचालन होणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षितता आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

धक्कादायक: ऑनलाईन गेमच्या नादात तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींची नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

   Follow us on        

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे बुधवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. भारत सिटी या निवासी संकुलात राहणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पाखी (१२), प्राची (१४) आणि विशिका (१६) अशी त्यांची नावे असून त्या चेतन कुमार यांच्या मुली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणी कोविड काळात ऑनलाइन गेम्समध्ये गुंतल्या होत्या आणि एका कोरियन टास्क-बेस्ड गेममध्ये व्यसनाधीन झाल्या होत्या. त्यांनी स्वतःला कोरियन नावे दिली होती आणि शाळेत जाणे त्यांनी कमी केले होते. घटनेच्या वेळी मुलींनी खोली आतून बंद करून एकामागोमाग खिडकीतून उडी मारली. आवाज ऐकून सुरक्षा रक्षक व शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मुली खाली पडल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेपूर्वी मुलींनी आठ पानांचे आत्महत्येचे पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी पालकांची माफी मागितली आणि डायरी वाचण्याची विनंती केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही घटना ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे होणाऱ्या मानसिक परिणामांचा गंभीर इशारा मानली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search