Author Archives: Kokanai Digital

Konkan Tourism: सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला

सिंधुदुर्ग : या महिन्यात मालवणला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या अग्रस्थानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. समुद्र किनारा ते किल्ला वाहतुक होडी सेवा उद्यापासून चालू होणार आहे. 

पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. 

दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.

 

Loading

‘नेरुळ’ च्या जागी ‘नेरूल’; ”सुधारणा न केल्यास…” मराठी एकीकरण समितीचा रेल्वेला इशारा

ठाणे : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात अनेक मराठी शहरांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर सरकारी कार्यालयात, कागदोपत्री आणि सार्वजनिक ठिकाणांच्या दर्शक फलकांवर ही चुकीची नावे वापरून तीच कायम करण्यात आल्याचे प्रकारही घडत आहेत. 

रेल्वे प्रशासना सुद्धा या गोष्टीत मागे नाही आहे. रेल्वेमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा जास्त भरणा असल्याने रेल्वेत असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. 

ठाणे ते पनवेल लोकल रेल्वे प्रशासनाने असाच एक प्रकार केल्याचा  नेरुळ या स्थानकाच्या नावाच्या बाबतीत घडला आहे. या स्थानकाचे नाव ‘नेरूळ’ असताना ते वेळापत्रक दर्शिकेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे ‘नेरूल’ असे दाखविण्यात आले आहे.

याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. नेरूळ गंतव्य स्थानकाच्या नावाचा अचूक मराठी देवनागरी लिपीत वापर करण्यात यावा.विहीत मुदतीत बदल न केल्यास पीजी पोर्टलवर तक्रार नोंद करण्यात येईल. असा इशारा या समितीने दिला आहे 

Loading

उद्या कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; मत्स्यगंधा एक्स्प्रेससह एका गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम

रत्नागिरी :  कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटक मध्ये कुमठा ते कुंदापुरा सेक्शन दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 10 मिनिटे ते 4 वाजून 10 मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक 31 ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी क्र. 16333 – वेरावल – तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस रोहा ते कुमठा दरम्यान सुमारे तीन तास उशिराने धावणार आहे.
2) दिनांक 1 सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्र. 12620 मंगलूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरतकल ते कुंदापुरा दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे  

Loading

तळकोकणात मुंबई-गोवा महामार्गावर साकारले गेले आधुनिक दर्जाचे सिनेमागृह; येत्या शुक्रवारी उदघाटन

सिंधुदुर्ग:सावंतवाडी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय उदय पारळे यांच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे आराध्य सिनेमा नावाचे आधुनिक दर्जाचे सिनेमागृह साकारण्यात आले आहे. प्रकल्पात एकाच ठिकाणी सिनेमा पाहण्यासोबत हॉटेल, थिएटर आणि ओपन लॉनचा आनंद घेता येणार आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यासह बांदा, शिरोडा या महत्त्वाच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला लागून झाराप झिरो पॉईंट येथे बांधकाम व्यवसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. आराध्य सिनेमा सोबतच याठिकाणी दर्जेदार असा सुसज्ज हॉल, हॉटेल, राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना जेवणासह राहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. 
येत्या शुक्रवारी १ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आराध्य सिनेमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या रेणु गावसकर व सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पै यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुळात सावंतवाडी, वेंगुर्ला व कुडाळ तालुक्याचा विचार करता दर्जेदार अश्या सिनेमा थिएटरची कमतरता श्री. पारळे यांनी ओळखून येथील जनतेसाठी ते उपलब्ध करुन दिले आहे. याठिकाणी नवनवीन सिनेमा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अन्य आवश्यकत्या सर्व सोयी सुद्धा ठेवण्यात येणार.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीला गणेशोत्सवादरम्यान अतिरिक्त डबा

Konkan Railway News :प्रवाशांच्या सोयीसाठी गणेशोत्सवा दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्स्प्रेसला अतिरिक्‍त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 

22475/22476 हिस्सार – कोईमतूर – हिस्सार वीकली एक्सप्रेस या गाडीला एक टू टियर एसी Two Tier AC कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

गाडी क्रमांक 22475 हिस्सार – कोईमतूर दर बुधवारी धावणारी ही गाडी दिनांक 06 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत या अतिरिक्त डब्यासहित धावणार आहे. 

गाडी क्रमांक 22476 कोईमतूर-हिस्सार दर शनिवारी धावणारी ही गाडी दिनांक 09 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत या अतिरिक्त डब्यासहित धावणार आहे. 

या सोयीमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पोरबंदर-कोचुवेली-पोरबंदर एक्सप्रेसला उद्यासाठी अतिरिक्त स्लीपर कोच.

गाडी क्रमांक 20910 पोरबंदर-कोचुवेली या एक्सप्रेसला उद्या दिनांक 31 ऑगस्ट रोजी तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20909 कोचुवेली – पोरबंदर या एक्सप्रेसला उद्या दिनांक 03 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे.

 

Loading

अबब! गोव्यात सापडला तब्बल दीड फुट लांब आणि सव्वा किलो वजनाचा बांगडा

गोवा वार्ता : स्वस्तात मस्त आणि मुबलक मिळणारा बांगडा मत्स्यखवय्ये कोकणकरांच्या ताटाची चव वाढवत असतो. बांगडा सहसा १५ ते 20 सेंटिमीटर लांबीचा असतो. मात्र कर्लीसारखा हातभर लांबलचक बांगडाही असू शकतो, असे सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारवारजवळील समुद्रात तब्बल दीड फुटांपेक्षा (४८ सेंटीमीटर) लांब आणि १२ सेंटीमीटर रुंद बांगडा सापडला आहे.

कारवारजवळील समुद्रात भला मोठा बांगडा सापडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कारण या बांगड्याची लांबी तब्बल ४८ सेंटीमीटर, आणि रुंदी पाहिली तर १२ सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजे याचे वजन साधारणपणे १ किलो २३० ग्रॅम एवढे आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा बांगडा सापडणे ही पहिलीच घटना आहे.

हा बांगडा मच्छीमार युवा नेते विनायक हरीकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर तो पुढील अभ्यासासाठी समुद्री जीवशास्त्र पीजी सेंटरकडे पाठवण्यात आला आहे. जेणेकरून जिज्ञासूंना हा बांगडा आता पाहता येणार आहे. सेंट्रल मरीन फिशरी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ बांगड्याची पाहणी केली.

Loading

देवरुख आगाराच्या एसटी बसला बोरसूत अपघात; ‘त्या’ बस चालकाचा दावा खरा?

देवरुख : देवरुख आगाराच्या एका एसटी बसला येथील बोरसू येथे काल अपघात झाला. बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बस गाडी रस्त्याच्या बाजुच्या गटारात गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र देवरुख आगाराच्या एसटी बसेसच्या दुरावस्थेमूळे या बसेस मधुन प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

व्हायरल चित्रफिती मधील चालकाचा दावा खरा?
गेल्याच आठवडय़ात याच आगारातील चालक अमित आपटे याने आगारातील बसेसच्या दुरावस्थेविषयी एक विडिओ बनवून तो समाजमाध्यमातून व्हायरल केला होता. ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन त्याने या विडिओ मध्ये केले होते. मात्र आगार व्यवस्थापनाने या चालकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याला निलंबित करण्यात होते. या सर्व प्रकारामुळे देवरुख आगार वादात सापडले होते. देवरुखमधील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली होती.

तर मोठा अपघात झाला असता…
या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर घाट रस्त्यावर असा प्रकार घडला असता तर बस कित्येक फुटावरून दरीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असती. या प्रकरणी एसटी महामंडळाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Loading

“…तरीही गॅस सिलेंडर १७९.५० रुपयाने महागच; याला म्हणतात जुमला!”; दरकपातीनंतर विरोधकांनी मांडला पूर्ण हिशोब

मुंबई :विद्यमान सरकारने आजच घरगुती गॅस सिलिंडर दरात २०० रुपयाने मोठी कपात करण्याचा सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी जाणते कडून तसेच विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ३१ मार्च २०१४ ला सिलिंडर ४१० रुपये होती. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खुश करण्यासाठी या निर्णय घेण्यात आला आहे.  खरेतर ही दरकपात यापूर्वीच करायला हवी होती. रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल दिले. त्याचा फायदा ग्राहकाला मिळाला नाही. फेब्रुवारी २०२१ पासून सिलिंडर दारात १३ वेळा वाढ करण्यात आली. एकूण वाढ ३७९.५० झाली; त्यामुळे दरकपात होऊनही सिलिंडर १७९.५० रुपयाने महागच आहे. 

Loading

सर्वसामान्यांना दिलासा; घरगुती गॅस सिलेंडर उद्यापासून २०० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होण्याती शक्यता आहे. उद्यापासूनच हे नवे दर लागू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्या आहेत त्यामुळे हे दर कमी  होण्याची शक्यता आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी निवडणुका. डिसेंबरमध्ये ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तसंस एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदींची यंदा तिसरी लोकसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार महागाईबाबत कुठलाच धोका पत्करण्याच्या तयारीत नसल्याचं सूत्रांकडून कळतंय. 
LPG गॅस सिलेंडरचे सध्याचे दर
ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ११०३ रुपये इतके होते. तर मुंबईत सिलेंडरचे दर ११०२ रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून भजन मंडळांना साहित्य वाटप; अर्ज करण्यासाठी उद्याचा अखेरचा दिवस

सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे बजेट करताना भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याकरिता २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. अशी तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. एका भजन मंडळाला १० ते १२ हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. या निर्णयाचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भजनप्रेमी मंडळींकडून जोरदार स्वागत होत आहे. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. त्याप्रमाणे वाडीवाडीत भजन मंडळे सक्रिय होऊन या कालावधीत घरोघरी जाऊन गणपती समोर आरती, भजने सादर करीत असतात. जिल्ह्यात प्रत्येक वाडीचे स्वतंत्र भजन मंडळ आहे. काही वाड्यांमध्ये तर एकापेक्षा अनेक भजन मंडळे कार्यरत आहेत. अलीकडे महिला भजन मंडळ, लहान मुलांचे भजन मंडळ हा सुद्धा ट्रेंड मोठ्या स्वरुपात सुरू झाला आहे. एवढी रसिकता व लोकप्रियता भजन या पारंपरिक कलेची जिल्ह्यात आढळून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या मूलभूत विषयाला प्राधान्य देताना अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तजवीज करीत असते; मात्र यावर्षी यात वेगळीकता जिल्हा परिषदेने दाखविली आहे. जिल्हा परिषदेत प्रशासक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी यावर्षी भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही संकल्पना मांडली आहे. पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांना जिल्हा परिषद वाद्य साहित्य पुरविते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने यासाठी मंडळ रजिस्टर असण्याची अट ठेवलेली नाही. 
सध्या यासाठी प्रस्ताव घेण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामीण भागातील भजन मंडळांची झुंबड उडालेली दिसत आहे. जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती असल्या, तरी भजन मंडळांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. त्यामुळे कोणाला प्राधान्य दिले जाईल, हे निश्चित समजलेले नाही; मात्र ”पहिला प्रस्ताव, पहिले प्राधान्य” असा निकष असण्याची शक्यता आहे. उपलब्ध प्रस्तावांतून लॉटरी काढून लाभ दिला जाण्याचीही शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. एका मंडळाला दहा ते बारा हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. यामध्ये एक मृदंग, पाच ते सहा टाळ, एक झांज या साहित्य संचाचा समावेश आहे. 
प्रस्ताव सादर करताना ग्रामसभा, मासिक सभेचा ठराव आवश्यक आहे. मंडळाची कार्यकारिणी यादी जोडणे गरजेचे आहे. मंडळ गावात कार्यरत असल्याबाबत ग्रामपंचायतीचा दाखला आवश्यक असून, पुरविण्यात येणारे साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत मंडळाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. पुरविण्यात येणाऱ्या साहित्याची देखभाल दुरुस्ती करण्यास तयार असल्याचा भजन मंडळाने दाखला जोडायचा असून, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे. मंडळाचे किमान १० ते १५ सदस्य असल्याची कार्यकारिणी यादी जोडायची आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search