Author Archives: Kokanai Digital

Mumbai Goa Highway | “सरकारकडे रस्ता पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत, एक दोन रुपये तरी द्या” म्हणत आंदोलकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

Mumbai Goa Highway News: महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव जाऊ नये या उद्देशाने खड्डे भरण्यासाठी तसेच शासनाला व निद्रस्त असलेल्या प्रशासनाल जागे करण्यासाठी आज मुंबई गोवा महामार्गावर ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान, सोबती संस्था व पेण पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर आज रविवारी (ता.१३) रोजी वाशी नाका येथे ‘भीक मागो’ आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा देत सहभाग नोंदविला.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांकडून भीक मागून सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी वर्गाने शासानाबद्दल असणारा रोष गांधीगीरी करीत व्यक्त केला. भीक दो भीक दो महामार्गासाठी भीक दो अशी घोषणा देत आणि रस्त्यासाठी एक दोन रुपये तरी द्या अशी विनंती करत मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तसेच महामार्ग पुर्ण करण्यासाठी भिकेचे दान मागण्यात आले.
या आंदोलनात सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो मावळे, सोबती संस्थेचे बापू साहेब नेने, ॲड. मंगेश नेने, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, पेण पत्रकार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील, उपतालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदिश ठाकुर, तालुका समन्वयक दिलिप पाटील, शिवदूत रविंद्रनाथ पाटील, जिवन पाटील, प्रवीण पाटील, कांचन थळे, चेतन मोकल, राकेश मोकल, राहुल पाटील, वसंत म्हात्रे, विनोद म्हात्रे, प्रदीप वर्तक, सोबती संस्थेचे सदस्य आणि विविध सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. भीक मागून जमा झालेलु रक्कम नॅशनल हायवे कार्यालयांत जमा करण्यात येणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी जाहीर केले.

Loading

आंबोली | मंत्री येण्याअगोदरच ग्रामस्थांनी केले धबधब्याचे उदघाटन; नेमका प्रकार काय?

आंबोली |काल आंबोली येथील ‘बाहुबली’ या धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मंत्री दीपक केसरकर आणि इतर पाहुणे मंडळी  येण्याच्या अगोदरच पारपोली येथील ग्रामस्थांनी या धबधब्याचे उदघाटन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक,इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक यांच्याशी संवाद साधला आता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हा धबधबा आंबोली गावच्या हद्दीत न येत पारपोली या गावच्या हद्दीत येत असून सुद्धा उदघाटनपत्रिकेवर पारपोली गावचे किंवा या गावच्या सरपंचाचे नाव कुठेही नमूद केले नाही आहे किंवा उदघाटनाचे आमंत्रण दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पारपोली ग्रामपंचायतीने उदघाटनाला शुभेच्छा देणारा बॅनर आंबोलीकरांनी फाडून टाकण्याचा निंदनीय प्रकार पण घडला आहे. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या विषयात आंबोली ग्रामपंचायच्या बाजूने असून हा पारपोली ग्रामस्थांवर अन्याय करताना दिसत आहेत. मतांच्या राजकारणामुळे परपोली गावावर अन्याय होत आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आहे. धबधबा आमच्या गावाच्या हद्दीत येत असून त्याची संगोपनाची जबाबदारी आणि इतर हक्क आमच्या गावचे असायला पाहिजेत. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू विशेष गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये बदल

Konkan Railway News: कोकणरेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा बदल केला गेला असून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे काण्यात आले आहे.
अतिरिक्त थांबे 
०११५३/०११५४ दिवा रत्नागिरी दिवा संपूर्ण अनारक्षित गणपती विशेष मेमू वीर ते खेड ह्या ५१ किलोमीटर अंतरात कुठेही थांबत नसल्याने या गाडीला किमान दोन वाढीव थांबे देण्याची मागणी कोकण विकास समितीने तसेच इतर संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार या गाडीला करंजाडी आणि अंजनी या दोन स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटांचे थांबे देण्यात आले आहेत.
०११५३ दिवा रत्नागिरी मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सकाळी १०:४० असून अंजनी स्थानकावरची वेळ ११:४५ आहे.
०११५४ रत्नागिरी दिवा मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सायंकाळी  १८:३० असून अंजनी स्थानकावरची वेळ १७:३२ आहे.
हा बदल या गाडीच्या सुरवातीपासून म्हणजे १३/०९/२०२३ पासून अमलात आणला जाणार आहे.
वेळापत्रकात बदल 
०११५६ चिपळूण दिवा मेमू या गाडीच्या चार स्थानकांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी
  • चिपळूण या स्थानकावर १३:१० वाजता (पूर्वीची वेळ १३:००),
  • अंजनी स्थानकावर १३:२६ (पूर्वीची वेळ १३:१५),
  • खेड स्थानकावर १३:३९ (पूर्वीची वेळ १३:३१)
  • कळंबणी बुद्रुक १३:४७ (पूर्वीची वेळ १३:४३)
या वेळेस या स्थानकांवर येणार आहे. हा बदल दिनांक १४ सप्टेंबर २०२३ पासून अमलांत आणला जाणार आहे.

Loading

Mumbai Goa Highway | सहनशील कोकणवासियांना अजून किती त्रास देणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल…..

मुंबई: अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविषयी शिवसेना (UBT) नेते आणि विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली नाराजी ट्विटरमध्ये व्यक्त केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत …..
गणेशोत्सव जवळ आलाय, कोकणचा चाकरमानी बांधव कोकणात जायला निघणार आणि रस्त्यांची अवस्था मात्र चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी! प्रवास सुखकर होणं अशक्य!
पालकमंत्री पदासाठी आपापासात भांडत बसलेल्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही? पाठीशी असलेली महाशक्तीही मदतीला येत नाही? अश्या भामट्यांना कोकणी माणूस इंगा दाखवणार!

Loading

आंबोली येथील अजून चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले

आंबोली बाहुबली धबधबा
आंबोली: आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध राज्यांसह विदेशातील पर्यटकही भेट देणार आहेत. विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी या निमित्ताने केले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता यावी, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे यासाठी वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास पर्यटकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद प्रेरणादायी आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे
यावेळी आंबोली येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बाहुबली धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक यांच्या हस्ते करण्यात आले. आंबोलीतील पर्यटन वाढावे, यासाठी तब्बल पाच नव्या धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती आले असून त्यापैकी चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुशांत पानवेकर आदींसह शिवसेना व भाजपचे विविध पदाधिकारी, पर्यटक उपस्थित होते.

Loading

महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान धावणार

कोल्हापूर :कोल्हापूरकरांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसचे गिफ्ट मिळणार आहे. राज्याला पाचवी वंदे भारत लवकरच मिळणार असून ती कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणार आहे. यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.  कोल्हापूरकरांना वंदे भारतसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी वेगवान प्रवासाच्या आशा नक्की पल्लवित झाल्या आहेत.

महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरांमधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. मात्र, प्रवासात खूप वेळ जात असल्याने मोठी कुचंबणा होत आहे.

वंदे भारत सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असल्या, तरी तत्काळ सुरू होईल याची शक्यता कमी आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलं आहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे, जेव्हा आमची कामं पूर्ण होतील, त्यावेळी वंदे भारत ट्रेन सुरु करणं शक्य होईल, अशी भूमिका विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी अलीकडेच मांडली होती.

दुसरीकडे, मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे. मात्र, ट्रेनला लागणाऱ्या वेळेमुळे अनेकजण कोल्हापूरला येण्याचे टाळतात. कोल्हापुरातूनही देशभर पर्यटक जात असतात, त्यांच्यासाठी देखील ही ट्रेन खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत 25 वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये चार मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मुंबईहून कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद देखील प्रचंड असणार आहे.

 

Loading

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागण्याची आशा पल्लवित

Railway News : मागच्या ७ वर्षांपासून रखडलेल्या वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत तीन हजार ४११ कोटी १७ लाखांच्या खर्चास शिफारस देण्यात आली आहे. त्यामुळे वैभववाडी -कोल्हापूर या १०७ किलोमीटरचा रेल्वेमार्गाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
पीएम गतीशक्ती अंतर्गत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. याचा मुख्य उद्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग हा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कच्चा, पक्का अशा दोन्ही प्रकारचे शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूकीसाठी मदत होणार असल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक होते.
कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. शिवाय कोकणातील मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
काय आहे ‘पीएम गति शक्ती’ योजना ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी ओक्टोम्बर २०२१ रोजी  ‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू केली. मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. सरकारच्या मते, ही योजना भारताच्या पायाभूत सुविधांसाठी गेम चेंजर ठरेल. सरकार या कार्यक्रमात 107 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकारने म्हटले की, गती शक्ती योजना ही मंत्रालयाच्या सर्व विद्यमान आणि नियोजित उपक्रमांचा समावेश असलेला एक मास्टर प्लॅन आहे. यामध्ये आर्थिक क्षेत्र आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. सरकारच्या मते, यामुळे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये प्रादेशिक आणि क्षेत्रीय असंतुलन दूर करण्यास मदत होईल. यासह मुख्य क्षेत्रांच्या जलद वाढीसह रोजगार निर्माण होईल. सरकारचे सर्व पायाभूत प्रकल्प गती शक्ती योजनेत समाकलित केले जातील. सरकारच्या मते, या योजनेमुळे पायाभूत सुविधांच्या विकासातील सर्व अडथळे दूर होतील.

Loading

चाकरमान्यांसाठी खुशखबर | यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार ‘भाजपा एक्सप्रेस’

सिंधुदुर्ग :चाकरमान्यांना भारतीय जनता पक्षाकडून एक खुशखबर आहे. सालाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी, “भाजपा एक्सप्रेस” हि रेल्वेगाडी पक्षातर्फे चालविण्यात येणार आहे.

ही गाडी दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून कुडाळ – मालवण साठी सोडण्यात येईल. इच्छुक कोकणवासीयांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत (सोमवार ते शनिवार) कार्यालयात येवून आपली सीट बुक करावी असे आवाहन भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटर द्वारे केले आहे.

बुकिंग साठी संपर्क –
+९१- ८६५७ ६७६४०४
+९१- ८६५७ ६७६४०५

Loading

मेमू स्पेशल दादरपर्यंत विस्तारित करा; चाकरमान्यांची रेल्वेकडे मागणी

Konkan Railway News : पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला लाखो मुंबईकर चाकरमानी कोकण रेल्वेने कोकणात दाखल होतात. यासाठी मध्यरेल्वेच्या सहकार्याने मेमू स्पेशल गाडी दिव्यावरून सोडण्यात येणार आहे. ही गाडी रत्नागिरीपर्यंत धावणार आहे. ही गाडी दिव्याऐवजी दादरवरून सोडावी, अशी मागणी कोकणवासी प्रवाशांनी केली आहे. यासाठी रेल्वेला पत्रही पाठवण्यात आले आहे.
कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या १५६ फेऱ्या जाहीर नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्यरेल्वेने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यानुसार २०२३ मधील गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. या आधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या; मात्र येत्या सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावणार आहे. रेल्वेने यंदा गणेशोत्सवासाठी दिवा येथून चिपळूण तसेच रत्नागिरीसाठी मेमू स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत; मात्र मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांचा विचार करता तसेच यापूर्वी अनेक वर्षे सुरू असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून दिव्यातूनच रत्नागिरीला येत असल्यामुळे पश्चिम उपनगरातील कोकणवासीय जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे खास गणेशोत्सवासाठी रत्नागिरीपर्यंत चालवण्यात येणारी मेमू स्पेशल गाडी दिव्याऐवजी दादरवरून रत्नागिरीपर्यंत चालवावी, अशी मागणी आहे. ही गाडी दिव्यावरून सोडल्यामुळे त्याचा उपयोग दादर आणि त्या परिसरातील चाकरमान्यांना होत नाही. त्यांना ही गाडी पकडण्यासाठी दिव्यापर्यंत यावे लागते. ही गाडी सुटण्याची वेळ सकाळची असल्यामुळे दादरवरून प्रवाशांना एक ते दीड तासआधी बाहेर पडावे लागते. साहित्य घेऊन बाहेर पडणाऱ्या या चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

मेमू स्पेशल गाडीच्या ३९ फेऱ्यांचे नियोजन

यंदा प्रथमच धावणारी दिवा ते रत्नागिरी मेमू स्पेशल गाडीच्या ३९ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीला ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण १२ डबे जोडले जाणार आहेत.

Loading

गणपती विशेष गाडीचे १० डबे ठाणेसाठी राखीव ठेवण्यात यावेत; जलफाऊंडेशनचे मध्यरेल्वे महाव्यवस्थापकांना निवेदन

मुंबई: गणेशोत्सव काळात कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाडीमधील २४ पैकी १० डबे ठाणे स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता या स्टेशनकरीता राखीव ठेवावेत, अशी आग्रही मागणी करणारे निवेदन जल फाउंडेशनच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व व्यवस्थापक, मुंबई विभाग यांना दिले आहे, अशी माहिती जल फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सणांच्या काळात कोकणात कोकण रेल्वेने जाताना आणि परतीच्या प्रवासात खूपच गर्दी असते. गणेशोत्सव हा तर कोकणी माणसाचा आत्मा आहे. गणपती उत्सवाला प्रत्येक कोकणी माणूस गावाकडे मिळेल त्या वाहनाने जातो. कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ दरम्यान अनारक्षित विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी १३ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत सोमवार, बुधवार व शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२ नंतर सुटणार आहे. या गाडीला २४ डब्बे पूर्णपणे अनारक्षित आहेत.घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागातून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांची संख्या लक्षणीय आहे. ते ठाणे येथून प्रवास करतात. त्यांना या गाडीत बसण्यासाठी जागा मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन या गाडीचे २४ पैकी १० डब्बे ठाणे स्टेशनला राखीव ठेवावेत आणि ते ठाणे स्टेशनवर उघडले जावेत, अशी अपेक्षा आहे.
या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचे प्रमुख महाव्यवस्थापक व रेल्वे व व्यवस्थापन -मुंबई विभाग यांना हे निवेदन दिले आहे. दिनांक ९ रोजी मुंबई येथील कार्यालयात ते फाऊंडेशन मार्फत पोचले आहे, असेही श्री. जाधव यांनी सांगितले.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search