Author Archives: Kokanai Digital

Mumbai Trans Harbour Link (MTHL): वेग मर्यादा 100 किमी/तास, बाईक आणि ऑटो साठी ‘नो एन्ट्री’; ‘हे’ असतील टोलचे दर

Mumbai Transharbour Link Road :देशाचे पंत्रपधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उदघाटन होणाऱ्या देशातील सर्वात लांब समुद्री महामार्ग अशा ‘मुंबई ट्रान्सहार्बर लिंक ’ अर्थात अटल बिहारी वाजपेयी सेवरी न्हावा शेवा अटल सेतूवर  कमाल १०० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा राहणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार चार चाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा १०० किलोमीटर प्रतितास राहणार आहे. तर पुलाच्या सुरवातीला चढणीला आणि शेवटी उतरताना ताशी 40 किलोमीटरपर्यंत मर्यादित असेल. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी या महामार्गावर प्रवेश असणार नाही.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष).

अबब! मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवासासाठी कोकणकरांना मोजावे लागणार ‘एवढे’ रुपये

Mumbai : राज्य सरकारने गुरुवारी बहुचर्चित देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर  (MTHL) वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या टोल रकमेची निश्चिती केली आहे.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत. ठाणे खाडीवरील शिवडी (Shivdi) ते नवी मुंबई (New Mumbai) या 22 किमी लांबीच्या पुलाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष).
या महामार्गाच्या टोलच्या दरांवरून समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिकिया मिळत आहे. काहींच्या मते सरकारने टोल चे दर कमी करावेत. मात्र काहींच्या मते या महामार्गामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे त्यामुळे हे दर रास्त आहेत.   

Swadesh Darshan 2.0 योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश. पर्यटन व्यावसायिकांना नोंदणी करण्याचे जिल्हाधीकाऱ्यांचे आवाहन; ‘या’ वेबसाईटवर करता येईल नोंदणी

सिंधुदुर्ग : पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन २.० योजनेमध्ये ४८ अधिसूचित पर्यटनस्थळी राज्यातील सिंधुदुर्ग या एकमेव पर्यटनस्थळाचा समावेश झाला आहे. ही कोकणकरांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे. केंद्राच्या या योजनेमुळे पर्यटनात वाढ होणार असून पायभुत सुविधांचा देखील विकास होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील सर्व निवास युनिट्स हॉटेल, ब्रेड आणि ब्रेकफास्ट रिसॉर्ट्, फार्मस्टे, होमस्टे, टूर ऑपरेटर, पर्यटक गाईड्स, ट्रॅव्हल एजंट आणि पर्यटन उद्योगातील इतर भागधारकांनी https://nidhi.tourism.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून ‘ट्रॅव्हल फॉर लाइफ’ प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तावडे यांनी केले आहे. नोंदणी केल्यावर युनिक NIDHI ID (NID) द्वारे विविध सेवा आणि फायदे यांच्या इलेक्ट्रॉनिक वितरणाचा लाभ या व्यावसायिकांना मिळणार आहेत. 
‘स्वदेश दर्शन २.०’ उपक्रमाअंतर्गत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पर्यटनस्थळ व्यवस्थापन समिती देखील स्थापन केली आहे. विविध पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापन उपक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती जबाबदार आहे. पहिली डेस्टिनेशन मॅनेजमेंट समितीची बैठक जिल्हाधिकारी तावडे यांच्या अध्यक्षतेखाली डेस्टिनेशन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती.  यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
स्वदेश दर्शन २.० योजनेमधील अधिसूचित पर्यटनस्थळांची यादी 

शेवाळ शेती: कोकणकरांसाठी अर्थजनाचा नवीन पर्याय

मालवण: कोकणातील मच्छीमार व्यावसायिकांना लवकरच अर्थाजनाचा एका चांगला स्रोत मिळणार आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या धर्तीवर प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत कोकणातील किनार पट्ट्यांवर मच्छीमारांना शेवाळी शेती करता येणार आहेत. 
आचरा येथील जामडूल खाडीत या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात होत आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छीमारांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे .यासाठी मच्छीमारांना समुद्र शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे दाभोळ भीव बंदर येथे या प्रकारचे प्रशिक्षण मच्छीमारांना देण्यात आले आहे त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या मच्छीमार शेतकऱ्यांनी तो प्रकल्प सुरू केला आहे .आचरा येथे जामडूल खाडपात्रात या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली आहे. याचा शुभारंभ बुधवारी आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस यांच्या हस्ते झाला. यावेळी गुजरात येथील सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे,ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम,आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विवेक ताम्हणकर, प्रमोद वाडेकर,अर्जुन बापर्डेकर,सौ प्रतिक्षा वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
समुद्र शेवाळाला जगभरातून औषध उत्पादक कंपन्यांकडून मागणी आहे सौंदर्यप्रसाधन विविध औषधे तसेच याच्या पासून बनवलेल्या लिक्विड खताला सेंद्रिय शेतीत महत्वाचे स्थान आहे.यामुळे याला खूप मागणी आहे. खारया पाण्यातील या शेतीमुळे मच्छीमारांना अर्थार्जनाचे एक नवीन दालन खुले होणार आहे. 
असा हा प्रकल्प महाराष्ट्र फिशरी डिपार्टमेंट मार्फत महाराष्ट्रात आलेला आहे अशी माहिती मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या गुजरात येथील सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे यांनी दिली आहे या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही माशांना ते खाद्य म्हणून खूप उपयुक्त ठरते त्यामुळे माशांची पैदासही वाढते आणि मच्छीमारांचा फायदा होतो अतिशय अकुशल असणाऱ्या लोकांना या व्यवसाय करता येतो या प्रकल्पासाठी महिलांचा सहभाग फारच उपयुक्त ठरतो आणि महिलांच्या हाताला काम मिळते.  
समुद्र शेवाळ्याची शेती करताना बीज समुद्रात टाकले की 30 किंवा 45 दिवसांमध्ये ती शेती तयार होते हे उत्पादन विकत घेण्याकरता उद्योजक ,मोठ्या कंपन्यांना बोलावले जाते आणि हे उद्योजक हे शेवाळ विकत घेतात यातून मच्छीमारांना चांगला आर्थिक फायदा होतो .अतिशय उपयुक्त अशा या प्रकल्पाचा जिल्ह्यात आचरा येथे प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ झाला आहे .तामिळनाडू गुजरात या ठिकाणी हे प्रकल्प यशस्वी ठरले आहेत. याबाबत माहिती देताना मोनिका कवळे यांनी सांगितले की प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत हा प्रोजेक्ट सुरु केला जात असून पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत दहा जागा शोधून शेवाळ शेती करायची आहे. सध्या महाराष्ट्रात रत्नागिरी दाभोळ भीव येथे, देवगड आणि मालवण तालुक्यातील आचरा येथे ही शेवाळ शेती केली जाणार आहे. शेवाळपासून केरीटीन आणि आगार आगार अशी दोन केमिकल्स मिळतात.यांचा वापर खाद्य,सौंदर्य, फार्माक्यूटीकल इंडस्ट्रीज मध्ये केला जात आहे. या शेवाळाची लागवड तीन प्रकारे केली जाते तामिळनाडू भागात पाणी शांत असल्याने बांबू तराफा पद्धतीने लागवड केली जाते. पण आपल्या कडे महाराष्ट्रात पाणी उथळ असल्याने यथे प्लोटीन मोनोलाईन पद्धतीने शेवाळ शेती केली जात आहे. आचरे मध्ये पण याच पद्धतीने शेती केली जात आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; २ गाड्या उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर आज दिनांक  ०४ जानेवारी रोजी कोकण रेल्वे च्या कारवार ते भटकल  या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण तीन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १२:०० ते १५:००  या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 06076 Panvel – Nagarcoil Jn. Special
दिनांक ०३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते कारवार या स्थानकांदरम्यान  २ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक ०३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी भटकल स्थानकावर २० मिनिटे थांबवून  ठेवण्यात येणार आहे.

कोकणातील पहिला भुयारी मार्ग मंजूर; लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली-खामदेव नाका व झाराप झिरो पॉईंट येथे दोन ठिकाणी प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी ६४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने यासाठी वर्षभरापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला होता.
इन्सुली येथे २ भुयारी मार्ग प्रस्तावित असून हे एक किलोमीटर लांबीचे आहेत. झाराप येथील भुयारी मार्ग हा दीड किलोमीटर लांबीचा आहे. बांदा बसस्थानक येथे ८० कोटी रुपये खर्चून ६०० मिटर लांबीचे उड्डाणपूल बांधण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या दोन्ही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने या कामांना देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. महामार्गवर सटमटवाडी येथे देखील २० कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग बनविण्यात येत आहे. वरील नव्याने मंजूर केलेल्या दोन्ही कामांची ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून ती पूर्ण देखील झाली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
इन्सुली खामदेव नाका हा सातत्याने वर्दळीचा आहे. याठिकाणी महामार्गवरून सावंतवाडी तसेच मडुरा, शेर्ले, आरोस, रेडी येथे जाण्यासाठी रस्ते एकत्र येतात. त्यामुळे याठिकाणी सातत्याने वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी बरेच छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल व्हावे, अशी मागणी तत्कालीन रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, निगुडे उपसरपंच गुरूदास गवंडे, मोहन गवस, वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने याठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी सर्वेक्षण देखील केले होते. प्रारूप आराखडा तयार करून अंतिम मंजुरीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. सर्वेक्षण केल्यानंतर याठिकाणी उड्डाणपूल न उभारता भुयारी मार्गाना प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार या कामांचा प्रारूप आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पत या दोन्ही कामांना मंजुरी दिल्याने लवकरच याठिकाणीही कामांना प्रारंभ होणार आहे.

कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातला जाणार

सिंधुदुर्ग: कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असून, पुढील महिन्यात होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारविरुद्ध संतप्त भावना आहे.
गुजरात सरकारने माझगाव डॉकसोबत यासाठी करार केला आहे. यानुसार 35 टन वजनाची आणि 24 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित केली जाणार आहे. या पाणबुडीमध्ये 24 प्रवासी दोन रांगेत बसतील. प्रत्येक सीटला काचेची विंडो असेल. त्यामुळे समुद्रातील 300 फूट खाली असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल. दरम्यान, माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी 2018च्या अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार होता.
केंद्राने अलीकडेच मालवणमध्ये ‘नौदल दिन’ साजरा केला. त्यातून सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न दाखवले. मात्र काही दिवसांतच या आनंदावर पाणी फेरले. पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसेच 100 ते 150 कोटींची उलाढाल करण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हिसकावण्यात आला.
कोकणात रिफायनरी सारखे निसर्गाला हानिकारक प्रकल्प लादले जात आहेत असे प्रकल्पाला विरोधकांचे म्हणणे आहे. कोकणाला  विध्वंसकारी प्रकल्प न देता पर्यटनाला चालना देतील असे प्रकल्प देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. मात्र प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात येत असल्याने कोकणवासीय नाराज झाले आहेत.

देवगड: एसटीवरचा ताबा सुटून अपघात; चालक ठार, तिघेजण जखमी

मुणगे : आचऱ्याहून देवगडला (Devgad) जाणाऱ्या बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात (Bus Accident) चालक बापू लक्ष्मण काळे (वय ५४, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात काल (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी : आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.

मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव व प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (वय २१) व मिताली प्रवीण मुणगेकर (१९, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.

Accident: ताम्हिणी घाटात खाजगी बसला मोठा अपघात, २ महिलांचा मृत्यू; ५५ प्रवासी जखमी

रायगड: पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत, तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला आहे.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोकणकरांच्या सहनशक्तीचा अंत? मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यास अजून एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार

Mumbai Goa Highway: गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम नेमके पूर्ण होणार कधी आणि प्रकल्पपूर्तीच्या डेडलाइन नेमक्या संपणार कधी? या प्रश्नाने सर्व कोकणवासीयांना भंडावून सोडले आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे वारंवार डेडलाइन बदलल्या जात असून, आता नवीन ”डेडलाइन” ३१ डिसेंबर २०२४ अशी देण्यात आली आहे.
पनवेल ते झाराप-पत्रादेवी अशा सुमारे ४५० किमी लांबीच्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरू आहे. या प्रकल्पाच्या रखडपट्टी विरोधात जनहित याचिका करून अॅड. पेचकर यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. एकूण ११ टप्प्यांतील या कामापैकी दहा टप्प्यांची (८४ किमी ते ४५० किमीचा मार्ग) जबाबदारी ही राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. शून्य ते ८४ किमी (पनवेल ते इंदापूर) या टप्प्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर (एनएचएआय) आहे. या महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने न्यायालयाने काही वर्षांपूर्वी अत्यंत गंभीर दखल घेतली होती. त्या वेळी ”एनएचएआय”ने जून २०१९ पर्यंत, तर ”पीडब्ल्यूडी”ने ३१ जानेवारी २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी हमी न्यायालयात दिली होती. ती हमी दोन्ही प्रशासनांना पाळता आली नाही. त्यामुळे पेचकर यांनी २०२१ मध्ये अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर ”एनएचएआय”ने प्रकल्पपूर्तीसाठी ३१ मार्च २०२२ तर पीडब्ल्यूडी”ने ३१ डिसेंबर २०२२ अशा नव्या ”डेडलाइन”ची हमी दिली; मात्र ती हमीही दोन्ही प्रशासनांना पाळता आली नाही. इतकेच नव्हे, तर लेखी हमीचे पालन करता आले नसतानाही मुदत वाढवून मिळण्यासाठी या प्रशासनांनी न्यायालयात रितसर अर्जही केला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने ५ जुलै २०२३ ला या दोन्ही प्रशासनांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही लावला होता. आता २१ डिसेंबर २०२३ ला दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पुन्हा ”डेडलाइन” बदलण्यात आली असून, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची हमी न्यायालयात देण्यात आली आहे. शिवाय आजही आरवली ते कांटे या टप्प्याचे काम अवघे ३५.१४ टक्के आणि कांटे ते वाकेड या टप्प्याचे काम केवळ ३०.९५ टक्क्यांपर्यंत झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यःस्थिती
पनवेल (पळस्पे ) ते इंदापूर (शून्य ते ८४ कि.मी.)- ६८ टक्के
इंदापूर ते वडपाळे (८४ ते १०८ कि.मी.)- ६८ टक्के
वडपाळे ते भोगाव खुर्द (१०८ ते १४८ कि.मी.)- ९९ टक्के
भोगाव खुर्द ते खवटी (१४८ ते १६१ कि.मी.)- ८८ टक्के
कशेडी ते परशुराम घाट (१६१ ते २०५ कि.मी.)- ९९ टक्के
परशुराम घाट ते आरवली (२०५ ते २४१ कि.मी.)- ९३ टक्के

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search