Author Archives: Kokanai Digital

संपादकीय: सावंतवाडीचा विकास विरुद्ध दिशेने?

   Follow us on        

संपादकीय :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जुने, इतिहासाचा वारसा असलेले, प्रसिद्ध पर्यटन स्थळ, सुंदर आणि तलावाचे शहर अशी अनेक विशेषणे असलेल्या सावंतवाडी या शहराचे वर्णन महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर अशा शब्दात केल्यास ती अतिशयोक्ती निश्चीतच ठरणार नाही.

सावंतवाडी हे शहर माहीत नसलेला व्यक्ती क्वचितच सापडेल. कधी काळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहरातूनच जात असे. मुंबई गोवा प्रवासात अनेक शहरे लागत असली तरी प्रवाशांच्या स्मृतीत राहणारे हे एकमेव शहर. पर्यटकांना आकर्षित करणारा येथील स्वच्छ आणि सुंदर तलाव म्हणा, महामार्गाला अगदी लागून असलेला राजवाडा म्हणा किंवा स्थानिक कलाकारांनी हस्तकौशल्यांने साकारलेली येथील लाकडी खेळणी म्हणा, या सर्व गोष्टी पर्यटकांना नेहेमीच आकर्षित करत आले आहेत.

दुसरे म्हणजे पाश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी महामार्ग सुद्धा सावंतवाडी शहरातून जातो,त्यामुळे मुंबई म्हणा किंवा पाश्चिम महाराष्ट्र म्हणा गोव्याला जाणारा पर्यटक सावंतवाडी शहरातून जाणार हे नक्की. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ईतर शहरांशी तुलना करता सावंतवाडी शहराचा विकास चांगला होत होता.

मात्र मागील काही वर्षांपासून चित्र बदलायला लागले. सर्व काही सुरळीत चालू असताना या शहराला कोणाची नजर लागावी तशा या शहराच्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी घडायला सुरवात झाली.

कोकणात 1998 साली कोकणरेल्वे आली. सावंतवाडी शहर हे मध्यवर्ती आणि तालुक्याचा प्रशासकीय भाग असल्याने या शहरातून किंवा शहराजवळून रेल्वे मार्ग जाणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता तो शहराच्या बाहेरून नेवून शहरापासून जवळपास आठ किलोमीटर दूर रेल्वे स्थानक बनविण्यात आले. वाहतुकींच्या अपुऱ्या सोयींमुळे तालुक्यातील नागरिकांसाठी हे रेल्वेस्थानक गैरसोयीचे बनले. जर स्थानक शहराच्या जवळपास असते तर येथील प्रवासी संख्याही जास्त असली असती आणि रेल्वेला मिळणार्‍या महसुलाच्या बाबतीतही कोकण रेल्वेच्या पाहिल्या पाच स्थानकांच्या यादीतही सावंतवाडीचा समावेश नक्किच झाला असता.

दुसरी नकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे या शहरातून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या दूर जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून बाहेरूनच वळविण्यात आला. शहराच्या विकासावर त्यामुळे नकारात्मक परिणाम झालाच मात्र सर्वात मोठा परीणाम येथील पर्यटनावर झाला. पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यावसायिक, कोकणी मेवा विक्रेते, लाकडी खेळणी दुकानदार आणि ईतर व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला. गोवा मुंबई दरम्यान चालविण्यात येणार्‍या खाजगी बसेस आता शहराच्या बाहेरून जावू लागल्याने चाकरमान्यांच्या त्रासातही वाढ झाली आहे.

या गोष्टी कमी होत्या म्हणुन की काय आता सावंतवाडी शहराच्या बाबतीत अजून एक नकारात्मक गोष्ट घडत आहे. विद्यमान सरकारचा प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा महामार्गही आता सावंतवाडी शहराबाहेरून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत. या महामार्गामुळे पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक सरळ बाहेरच्या बाहेर गोव्यात जाणार आहे. गोव्याला जायला शक्तीपीठ महामार्गाचा पर्याय मिळाल्याने सावंतवाडी शहरातून जाणार्‍या सध्याच्या निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी  महामार्गाचे महत्व कमी होणार आहे. सहाजिकच त्याचा फटका सावंतवाडी शहराच्या विकासाला बसणार आहे.

वरील गोष्टींमुळे सावंतवाडी शहराच्या तसेच संपूर्ण तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. तालुक्यातील साधनसामुग्री जमिनींच्या स्वरुपात महामार्गासाठी, रेल्वेरूळांसाठी वापरल्या गेल्या आहेत. मात्र त्याचा फायदा पाहिजे तसा तालुक्याला झाला नाही. चुका झाल्यात, मात्र त्या कोणाकडून, का आणि कशा झाल्यात यावर पण विचार करणे गरजेचे आहे. काही प्रमाणात येथील स्थानिक नागरिकही याला जबाबदार असतिल आणि येथील राजकारणीही. मात्र आता चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत नाहीतर सावंतवाडी शहर किंबहुना संपूर्ण तालुका विकासाच्या युगात खूप मागे पडेल.

महत्वाचे: उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून; अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपलब्ध

   Follow us on        

Konkan Railway News: कोकणवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 13 एप्रिल पासून सुरू होणार आहे.

एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११८७/०११८८ आणि एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११२९/०११३०   या दोन्ही गाड्यांचे आरक्षण उद्या सकाळी रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आहे.

अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपलब्ध 

एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११२९/०११३०  ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची चालविण्यात येणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने या गाडीचे काही डबे (सेकंड सिटींग) आरक्षणासाठी उपलब्ध करून दिले असल्याचे जाहीर केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा प्रवास भारतीय रेल्वेच्या ईतर विभागांपेक्षा महाग; कारण काय?

   Follow us on        
रत्नागिरी :मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार श्रेणीचे खेड ते मडगाव (341 किमी) चे एकूण प्रवासी भाडे ११८५ रुपये इतके आहे, तर मुंबई – गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्याच श्रेणीचे बोरिवली ते वडोदरा दरम्यानचे, जवळपास तेवढ्याच अंतराचे (३६२ किमी)  भाडे ९९५ रुपये एवढे आहे. म्हणजे जवळपास २०० रुपयाचा फरक आहे. एकाच देशातील दोन समान गाड्यांच्या समान श्रेणीच्या प्रवासी भाड्यात एवढा फरक का हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीतच नाही तर इतरही गाड्यांच्या प्रवासीभाड्यात हा फरक येतो. असे का? कोकण रेल्वेचा प्रवास महाग आहे का? हे प्रश्न सहाजिकच पडतात. चला मग याचे उत्तर शोधूया.
रोहा ते ठोकूर हा विभाग कोकण रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड KRCL या कंपनीच्या अखत्यारीत येतो. कोकण रेल्वे मार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात खर्च आला होता. मोठं मोठी पूल, बोगदे आणि इतर गोष्टीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. या खर्चाचा आकडा 3,555 कोटी रुपये एवढा आहे.  हा खर्च वसूल करण्यासाठी कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार रोहा ते ठोकूर दरम्यानचे अंतर प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ४०% वाढवून दाखवून त्याप्रमाणात प्रवास भाडे आकारले जाऊ लागले. प्रवासी तिकिटांवर पण हेच अंतर छापले जाऊ लागले. उदाहरणार्थ रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव हे खरे अंतर ५८१ किलोमीटर एवढे आहे. मात्र प्रवाशांकडून हे अंतर ७६५ किलोमीटर असे दाखवून त्याचप्रमाणे भाडे आकारले जात आहे. यात रोहा ते मडगाव हे अंतर ४४० किलोमीटर एवढे आहे मात्र तिकीट आकारताना हे अंतर ६१६ एवढे दाखवून भाडे आकारण्यात येते.
खरे तर एकदा प्रकल्प निर्मितीचा खर्च वसूल झाला की अशा प्रकारची अतिरिक्त भाडे आकारणी बंद करून प्रचलित दराने भाडे आकारणी सुरु करण्याची गरज होती. कोकण रेल्वे गेली २५ वर्षे हे अतिरिक्त भाडे आकारत आहे. साहजिकच कोकण रेल्वे निर्मितीचा खर्च वसूल झालाच असेल मात्र KRCL ने ही वाढीव भाडे आकारणी चालूच ठेवली आहे.  कठीण भौगोलिक स्थितीमुळे मोठा देखभाल खर्च होत असल्याने ही वाढीव आकारणी चालू ठेवली असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
सर्व गाड्यांना लागू
या कारणामुळे कोकण रेल्वे नेटवर्कमधून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे भाडे वाढलेल्या अंतरावर मोजले गेले. उदाहरणार्थ, मंगळुरु सेंट्रल ते मुंबई एलटीटी अशी मत्स्यगंधा एक्सप्रेस एकूण 882 किमी अंतर पार करते, ज्यापैकी ठोकूर आणि रोहा दरम्यानच्या 760 किमी प्रवासासाठी वाढीव भाडे आकारले जाते. जर तुम्हाला मुंबई सीएसएमटी ते कणकवली पर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मडगाव पर्यंतचे प्रवास भाडे रेल्वे ला द्यावे लागते यावरून कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास इतर विभागातील रेल्वेच्या प्रवाशांशी तुलना करता महागाच म्हणावा लागेल.

पुणेकरांसाठी खुशखबर! नागपूर – पुणे विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

   Follow us on        

पुणे, दि. ११ एप्रिल: मुलांच्या परीक्षा संपल्या की वेध लागते ते गावी जायचे. शहरातील भयंकर उकाडा सहन करण्यापेक्षा सुट्टी घेऊन ती गावीच खर्च करावी अशी जवळपास सर्वच चाकरमान्यांची इच्छा. यासाठी त्याची तीन चार महिनेच प्लॅनिंग चालू होते. त्यात गावी जाण्यासाठी रेल्वे आरक्षण करणे हे प्राधान्याने येतेच. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नियमित गाड्यांची तिकिटे मिळणे खूपच अवघड होते. अशा वेळी रेल्वेच चाकरमान्यांच्या मदतीला धावून येते. काही विशेष गाड्या सोडून किंवा आहे त्या गाड्यांच्या फेर्‍या वाढवून प्रवाशांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

याचाच एक भाग म्हणुन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एका विशेष गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते पुणे दरम्यान चालविण्यात येणार्‍या 01165/01166 गाडीच्या फेर्‍या वाढविण्यात येणार आहे. सध्या ही गाडी आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येते. मात्र दिनांक 18 एप्रिल ते 14 जून या कालावधीत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण 18 अतिरिक्त फेर्‍या होणार आहेत.

दिनांक 18 एप्रिलपासून नागपूर (01165) येथून दर गुरुवारी तर दिनांक 19 एप्रिल पासून दर शुक्रवारी पुणे(01166) येथून हा अतिरिक्त फेर्‍या सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून २ गाड्या; एकूण ३२ फेऱ्या

मुंबई,दि. ११ एप्रिल:उन्हाळी हंगामासाठी प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्यरेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ०८ एप्रिल ते ०९ जून पर्यंत या मार्गावर २ विशेष साप्ताहिक गाड्यांच्या जात येत एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
१) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११८७/०११८८
गाडी क्र. ०११८७ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी  मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११८८  थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)  
परतीच्या प्रवासात दिनांक १९ एप्रिल ते ७  जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी  पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे:
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२  एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३ , थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०२

२) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११२९/०११३० 

गाडी क्र. ०११२९  एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक २० एप्रिल ते ८ जूनपर्यंत दर शनिवारी मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११३०  थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)  
परतीच्या प्रवासात दिनांक २१ एप्रिल ते ९ जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी  पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२ आयसीएफ  कोच: सेकंड सीटिंग (जनरल) – २०, एसएलआर – ०२

 

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज: प्रागैतिहासिक काळातील रहस्ये उलगडणारी गोव्यातील कातळशिल्पे

   Follow us on        

गोवा पर्यटन :गोवा म्हंटले तर डोळ्यासमोर येतात येथील सागरी किनारे, जुनी मंदिरे आणि देशातील ईतर भागांपेक्षा येथे निर्माण झालेली एक वेगळी संस्कृती. या गोष्टींमुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र याव्यतिरिक्त गोव्यात अजून काही गोष्टी आहेत ज्यामुळे येथील पर्यटनात भर पडत आहे.

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज Usgalimal Rock Engravings म्हणजे गोव्याच्या हिरव्यागार जंगलात एक लपलेले रत्न जणूच जे प्राचीन भूतकाळातील रहस्ये उलगडत आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस मुसळधार पावसाने कुशावती नदीच्या उत्तरेकडील किनारी भागाच्या जमिनीचा वरील स्तर मोकळा होऊन लॅटराइट-स्टोन ग्राउंडच्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या शंभर कातळशिल्पांचा शोध लागला. ही कातळशिल्पे जवळ जवळ 20,000 ते 30,000 जुनी असल्याचे बोलले जाते. या कातळशिल्पांच्या अभ्यासाअंती प्राचीन काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. अशी ही दगडावर कोरलेली रहस्यमय कातळशिल्पे केवळ आपल्या पूर्वजांच्या कलात्मक क्षमतेचाच पुरावा नाही तर त्या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलकही देतात. तुमचा जर गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा बेत असेल तर ही तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात हे स्थळ समाविष्ट करायला विसरू नका.

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज 20,000 वर्षे जुनी आहेत आणि भारतातील सर्वात जुनी रॉक कला आहे, जी प्रागैतिहासिक काळापासून आहे. ते प्राणी, मानव, चिन्हे आणि नमुने दर्शवितात, बहुधा सुरुवातीच्या शिकारी-संकलक समुदायांनी तयार केले होते. ज्याचा उपयोग विधी आणि कथाकथनासाठी केला गेला असण्याची शक्यता आहे. साइटचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखक थेमिस्टोक्ल्स डिसिल्व्हा यांच्या म्हणण्यानुसार, कोरीव काम करण्यासाठी दगडी अवजारांचा वापर करण्यात आला होता. कोरीव काम समुदायासाठी महत्त्वपूर्ण होते, जे त्यांचे जग आणि त्यांच्या सभोवतालचे ज्ञान प्रतिबिंबित करते. दगड आणि खडकांवर अनुभवांची नोंद करण्याची ही प्रथा पूर्व-साक्षर काळात मानवी पूर्वजांमध्ये प्रचलित होती.हे कोरीवकाम ज्यांनी निर्माण केले त्या लोकांच्या सांस्कृतिक पद्धती, श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाबद्दल ते प्रकट करतात. प्रत्येक कोरीवकाम दीर्घकाळ गेलेल्या युगाची झलक देते, जे आम्हाला आमच्या पूर्वजांच्या जीवनावर आणि त्यांच्या नैसर्गिक जगाशी असलेल्या खोल संबंधांवर विचार करण्यास भाग पाडत आहे. डिसिल्व्हा यांनी एका वैज्ञानिक पेपरच्या स्वरूपात केलेल्या दस्तऐवजीकरणानुसार, उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज हे कोरलेल्या प्रतिमांचे वर्गीकरण आहे ज्यात साप, बैल, कुत्रे, शेळ्या, हरीण, मोर, गरुड, मासे आणि पृथ्वी माता यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. मानवी आकृत्या प्रामुख्याने पूर्वेकडे वसलेल्या आहेत. अनेक लहान प्राणी, मुख्यतः कॅप्रिड्स, खडकाळ प्लॅटफॉर्मवर विखुरलेले आहेत.

कशी भेट द्याल? 

पत्ता: 44CM+86P, Rivona VP, Goa 403704

वेळ: 24 तास उघडे

विशेष सुचना:कोरीव कामांची तोडफोड आणि इतर हानीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात नाही. तथापि, त्यांचे अन्वेषण करण्यास उत्सुक असलेले अभ्यागत स्थानिक पुरातत्व अधिकारी किंवा हेरिटेज संस्थांद्वारे मार्गदर्शित टूरची व्यवस्था करू शकतात. हे टूर सामान्यत: अभ्यागतांना विशिष्ट साइटवर घेऊन जातात जेथे ते प्रशिक्षित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खडकातील कोरीवकाम पाहू शकतात जे त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी देतात.

 

 

आता हापूसच्या नावाने अस्सल हापूसच मिळणार; आधुनिक तंत्रज्ञान फसवणुकीला आळा घालणार

   Follow us on        
रत्नागिरी, दि.१० एप्रिल: कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने येथील आंब्याला जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन मिळाले आहे. मात्र अनेकदा इतर भागातील आंबा हापूस च्या नावाने विकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. याचा फटका आंबा बागायतदारांनाही बसतो. मात्र आता अस्सल हापूस ओळखण्यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यूआर कोडचे लक्ष्य ठेवले आहे. क्यूआर कोडसाठी मीरो लॅब कंपनीबरोबर करार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
ग्राहकाला दर्जेदार हापूस मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षापूर्वी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून क्युआर कोड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात काही त्रुटी जाणवल्या होत्या. त्यामध्ये क्यूआर कोडला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पुनर्वापर करून गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. मागीलवेळच्या त्रुटी दूर करून यंदा क्यूआर कोड नव्याने निर्माण केले आहेत.
क्यूआर कोडमध्ये खालील माहिती भेटणार आहे.
१) आंबा पॅकिंगची तारीख
२)आंबा परिपक्व होण्याची तारीख
३) हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्यांची माहिती, त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल
आंब्यावरील क्यूआरकोड ६५ पैसे प्रति आंबा या दराने दिला जात असून बॉक्सवरील कोड तीन रुपये दराने दिला जाणार आहे. बागायतदारांना कोड अ‍ॅक्टिव्ह कसा करावा यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे. प्रचार, प्रसार, शिबिरे घेणे व शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने कार्यक्रम उत्पादक संस्था घेत आहे. शासनाच्या एखाद्या योजनेमधून संस्थेला अनुदान मिळाले तर संस्था दहा पट वेगाने जीआय नोंदणीचा प्रसार करू शकते व बागायतदारांना आणखीन कमी दरामध्ये मार्केटिंगसाठी क्यूआर कोड पुरवू शकेल असे संस्थेकडून सांगण्यात आले. संस्थेची स्वतःची वेबसाईट नेहमी अपडेट होत असते आणि त्यावर वेळोवेळी माहितीही दिली जाते.

अभिमानास्पद! सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला ‘जी आय’ मानांकन प्राप्त

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १० एप्रिल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जीआय मानांकन  Geographical Indication (GI)  दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला महत्व येणार आहे.

सावंतवाडीच्या राजघराण्याने हे मानांकन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. लाकडी खेळणी आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच संरक्षण दिले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या संदर्भात संस्थानचे बाळराजे आणि युवराज लखमराजे भोसले आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.

जी. आय. मानांकन म्हणजे काय?

हे एक मानांकन आहे. हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो.

जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती आहे.थोडक्यात कुठल्याही वस्तूला जीआय मानांकन मिळण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष असतात. एक म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट भौगोलिक भागात एका विशिष्ट पद्धतीने बनविली गेली असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा विशिष्ट दर्जा किंवा गुण हा ती त्या भागात बनल्यामुळे असला पाहिजे. तर आणि तरच त्या वस्तूला जी आय मानांकन दिला जातो. आणि जीआय हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. विशेषत: शेतीमाल असेल तर (आंबे, द्राक्षे, चिकू, तांदूळ इ.) किंवा हाताने बनविली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असेल तर (हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनविली जाणारी खेळणी किंवा इतर वस्तू). कारण शेतात उगवणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात त्या त्या भागातली माती, हवामान, पर्जन्यमान यांसारख्या गोष्टींमुळे. तर हाताने बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात तिथल्या कारागिरांचा अनुभव, परंपरागत कौशल्ये, पिढीजात कला यांसारख्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनच अशा काही गोष्टींबाबत त्या कुठे बनल्या हे फार महत्त्वाचे असते. आणि आपण कित्येकदा पाहतो की त्या जागेनुसार त्या वस्तूचा भाव आणि दर्जा ठरत असतो.

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

   Follow us on        

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत आरवली रोड ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) Train no. 12617 Ernakulam – H. Nijamuddin Express 

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज.  – रत्नागिरी विभागादरम्यान 1 तास 45  मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

2) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव  ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणार्‍या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे

कोकणच्या मातीचा गंध असलेली, सावंतवाडीच्या सुपुत्राने बनवलेली वेबसीरीज ‘संभ्रम’ बुधवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ट्रेलर येथे पहा

S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक कारिवडे गावच्या सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून 'संभ्रम' ही रहस्यमय कथा साकारली आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो.

   Follow us on        
सावंतवाडी, ता. ८ : तालुक्यातील कारिवडे-गोसावीवाडी येथील सागर गोसावी या युवकाने दिग्दर्शित केलेल्या सात भागांची ‘संभ्रम’ ही मराठी वेबसीरीज बुधवारी (ता.१०) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार आहे. आज  त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवलेल्या या वेबसीरीजमध्ये प्रेम प्रकरणातून मित्रांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होते, हे दाखविल्याचे निर्माता आनंद मेस्त्री आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सावंतवाडी आणि परिसरात सिरीजचे शूटिंग झाले. चार साडेचार लाख रुपये खर्च करुन हा प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. वेब सिरीजमध्ये सुरुवातीच्या भागापासून निर्माण झालेला गुंता, संभ्रम शेवटच्या भागांमध्ये उघड होतो. त्यामुळे सर्वच्या सर्व भाग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. परंतु, नव्याने काहीतरी करण्याच्या उमेदीने आणि या भागातील निसर्ग आणि कलाकार जगासमोर यावेत यादृष्टीने काम करत आहोत. आम्हाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. ही प्राथमिक सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा अधिक चांगले करू. असे यावेळी चित्रपट निर्माते सागर गोसावी यावेळी म्हणालेत.
 यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, रवी जाधव, कलाकार गायत्री रामशिंदे, राम निपाणीकर, सुहास रुके आदी उपस्थित होते.
Watch Trailer Here 👇🏻

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search