मुंबई:यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील ४८३ गावांतील दरडींची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे कुणाला हानी पोहचणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे.
डझनभर जिल्हयातील ४८३ गावांवर धोकादायक दरडींचे संकट आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात खालापूर, कर्जत, महाड, म्हसळा, पनवेल, पोलादपूर या तालु्क्यातील सर्वाधिक १५७ गावांचा समावेश असून त्याखालोखाल रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यातील १३८ तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यातील ९३ गावांना धोकादायक दरडींपासूनच्या आपत्तीचा धोका आहे.
साताऱ्यात जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई या तालुक्यातील ८८, कोल्हापूरमधील भुदरगड, चंदगड, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील ५८, नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यील ८ , सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वैभववाडी या दोन तालुक्यातील १६,नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, सुगरणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५ गावांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.
पावसाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यात विशेषत: कोकण, मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागात दरडी कोसण्याच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई: पनवेल आणि इंदापूर दरम्यानच्या मुंबई गोवा महामार्गाच्या (NH 66) 84.6 किलोमीटरच्या भागावर सुमारे 490 कोटी रुपये एवढी रक्कम खर्च केली असल्याची माहिती ‘माहिती अधिकारातून’ (RTI) समोर आली आहे. संतापाची गोष्ट म्हणजे इतकी रक्कम खर्च करूनही रस्त्याचे काम अपूर्ण आहे तर पूर्ण झालेल्या रस्त्यातही खड्डे पडले आहेत.
माहितीचा अधिकार (RTI) कायद्याचा वापर करून केरळमधील कार्यकर्ते के गोविंदन नामपूथीरी यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल आणि इंदापूर दरम्यानच्या नवीन रस्ता तयार करण्यासाठी 316.35 कोटी खर्च केले आहेत आणि दुरुस्ती आणि देखभालीवर 173 रुपये कोटी एवढे असे एकूण 490 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
7 एप्रिल रोजी जेव्हा त्याने त्याच्या मित्रांसह महामार्गावर गाडी चालवली तेव्हा या महामार्गाच्या स्थितीमुळे नामपूथीरी हैराण झाले होते आणि तेव्हाच त्यांनी या समस्येच्या मुळावर जायचा विचार केला.
“मी महामार्गाच्या या अवस्थेसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) संपर्क साधला, रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे, सुरक्षा उपाय, पथदिवे इ.ची बसवण्याची विनंती केली,” असे नामपूथीरी म्हणाले
NHRC ला लिहिलेल्या पत्रात, नामपूथीरीनी महामार्गावरील सुरक्षिततेच्या समस्यांवर प्रकाश टाकला, ज्यात योग्य पथदिवे नसल्याचा समावेश आहे. अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर गतिरोधक आणि रेलिंग बसवण्याची सूचनाही त्यांनी केली. माहिती अधिकारात त्यांनी या प्रश्नांची उत्तरे मागितली, परंतु एनएचएआयने केवळ डिसेंबर 2024 पर्यंत सर्व काम पूर्ण होईल असे तोडके उत्तर दिले आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर दिनांक १० जून पासून पावसाळी वेळापत्रक कार्यरत झाले आहे. या वेळापत्रकानुसार या मार्गावरील काही नियमित गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कोकण विकास समिती तर्फे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस च्या वारंवारतेत कपात करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांना कोकण विकास समिती तर्फे देण्यात आले आहे.
या निवेदनात कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर लिहितात…..
कोकण रेल्वेवर 10 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू केल्यामुळे, 22229/22230 मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची वारंवारता आठवड्यातील सहा दिवसांवरून कमी करून फक्त तीन दिवसांवर केली आहे. वारंवारतेतील या कपातीमुळे आसनांची उपलब्धता कमी झाली आहे, ज्यामुळे पावसाळ्यात या ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
मात्र आम्हाला विश्वास आहे की या समस्येवर उपाय आहे. मध्य रेल्वेकडे वंदे भारतचा जो एक अतिरिक्त रेक उपलब्ध आहे त्याचा उपयोग पावसाळ्यात मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची वारंवारता वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. आठवड्यातून फक्त तीन दिवसांऐवजी सहा दिवस ट्रेन चालवून प्रवाशांची ही मागणी पूर्ण करता येणे शक्य आहे.
पावसाळ्यात वंदे भारत एक्स्प्रेसची वारंवारता वाढवल्याने प्रवाशांची सोय तर वाढेलच शिवाय कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवेची एकूण कार्यक्षमता आणि विश्वासार्हताही वाढेल. आव्हानात्मक हवामान परिस्थितीतही उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याबद्दल रेल्वेची प्रशंसाही होईल.
आम्ही आदरपूर्वक विनंती करतो की, पावसाळ्यात मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची वारंवारता वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या अतिरिक्त रेक क्षमतेचे वाटप करण्याचा विचार करावा. या कृतीशील उपायाचे निःसंशयपणे प्रवासी आणि भागधारक सारखेच कौतुक करतील.आम्ही या समस्येवर आपल्या अनुकूल प्रतिसादाची आणि जलद कारवाईची अपेक्षा करतो.
ठाणे : ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाच्या मार्फत महिला बचत गटांना ‘ई – कार्ट’ पुरविण्यात आले आहेत. या वाहनाच्या मदतीने महिलांना स्वत: पिकवलेल्या भाजीपाल्याची विक्री थेट ग्राहकांना करता येत आहे. यामाध्यमातून महिलांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले असून जिल्ह्यातील पाच महिला बचत गटांना प्रायोगिक तत्त्वावर हे वाहन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभागात पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमानी योजना अंमलात आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत काही महिला बचत गट तसेच ग्रामसंघ यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य पुरविले जाते. त्यानुसार, थेट लाभ हस्तांतरण या तत्त्वानुसार ठाणे जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात ही योजना प्रायोगिकरित्या राबविण्यास सुरुवात झाली. यात ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांनी केलेल्या उत्पादनांची थेट ग्राहकांकडे विक्री करता यावी यासाठी ई- कार्ट वाहनांचे वाटप केले जाते.
नुकतेच, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथमधील महिला बचत गटांना ई- कार्ट वाहनाचे वाटप करण्यात आले आहे. या वाहनांच्या माध्यमातून महिलांना स्वत: पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांना विकता येत आहे. यामुळे त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले असून त्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य तो मोबदला मिळत असल्याचे चित्र आहे.
या योजनेसाठी भिवंडी तालुक्यातील दोन शहापूर तालुक्यातील दोन, अंबरनाथ व कल्याण तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच महिला बचत गटांना ई – कार्ट वाहन प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिला बचत गटातील उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. या योजनेचा महिला बचत गटांना उत्तम लाभ होत आहे. – रामेश्वर पाचे, कृषि विकास अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद
‘ई कार्ट’ वाहन
‘ई – कार्ट’ वाहन हे आकाराने लहान असून त्यात भाजीपाला ठेवण्यासाठी लहान लहान कंटेनर आहेत. भाजीपाला ताजा रहावा यासाठी या वाहनात भाज्यांवर पाण्याचा फवारा करणारे यंत्रसुद्धा उपलब्ध आहे. तसेच गाडीवर ध्वनी विस्तारक यंत्रसुद्धा बसविण्यात आले आहे.
Konkan Railway Notification:कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात काहीसा बदल करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 12284 / 12283 हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस (साप्ताहिक) आणि गाडी क्रमांक 12450 / 12449 चंदीगड – मडगाव जं. – चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) या गाडीच्या एका जनरेटर कोचच्या जागी एक सेकंड स्लीपर चा डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांची प्रवासी क्षमता वाढणार आहे.
गाडी क्रमांक 12284 हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. या गाडीत दिनांक 29/06/2024 ते 28/09/2024 पर्यंत तर गाडी क्र. 12283 एर्नाकुलम जं. -हजरत निजामुद्दीन या गाडीत दिनांक 02/07/2024 ते 01/10/2024 पर्यंत हा बदल केला जाणार आहे.
गाडी क्र. 12450 चंदीगड – मडगाव जं. गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाडीत दिनांक17/06/2024 ते 16/09/2024 पर्यंत तर गाडी क्र. 12449 मडगाव जं. – चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाडीत दिनांक 19/06/2024 ते 18/09/2024 पर्यंत हा बदल केला जाणार आहे.
आंबोली: पाऊस सुरू झाल्यावर वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत पर्यटकांचा ओघ सुरू होतो. मात्र या वर्षी धबधब्याच्या परिसराची स्वच्छता तसेच शिस्त राखण्यासाठी वन विभागाकडून काही निर्णय घेतले गेले आहेत. येथील शिस्त आणि स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाणार आहे.
अनेक पर्यटक येथील माकडांना खाऊ टाकतात. मात्र त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. माकड किंवा वानरांचे माणसांवर होणारे हल्ले पण वाढताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे या असे खाद्यपदार्थ घातल्याने या प्राण्यांच्या सवयींवर परिणामी पर्यावरणावर सुद्धा परीणाम होतो. त्यामुळे या परिसरात माकडांना खाद्यपदार्थ घालण्यास मनाई केली असून,जर कोणी तसे केलेले आढळल्यास किमान 1000 रुपये एवढा दंड वसूल केला जाणार आहे. त्याविषयी या परिसरात कचरा टाकणाऱ्या बेशिस्त वर्तन करणाऱ्या पर्यटकांस कारवाईला सामोरे जावे लागेल. दिनांक 15 जून पासून ही कारवाई सुरू करण्यात असल्याची महिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वच्छता मोहीम
पावसाळा सुरू झाल्याने आंबोली घाटात लवकरच वर्षा पर्यटन सुरू होणार असल्याने वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सामूहिक स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे १० किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली.
मुंबई: बोरिवली दहिसर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकरांची वस्ती आहे. मात्र त्यांना कोकणात गावी जाण्यासाठी दादर गाठावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी बोरिवली येथून विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याबाबत आपण केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असल्याचेही ते बोलले. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना केंदीय वाणिज्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये त्यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद कार्यक्रम झाला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर, आमदार अतुल भाटखळकर, विकास भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, उत्तर मुंबईचे निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग: भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून सुद्धा त्यांना पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या मंत्रिमंडळात स्थान आणि नारायण राणे यांचा राजकारणातील अनुभव आणि वजन पाहता त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती. एनडीएने बहुमत सिद्ध केल्यावर राज्यातील सर्व न्यूज माध्यमांनी नारायण राणे यांचे नाव मंत्रिमंडळात असणार अशा बातम्या प्रसिद्धही केल्या होत्या. मात्र घडले उलटेच. नारायण राणे यांना मंत्रीपद न मिळण्यामागे काय कारण असेल याच्याही चर्चा चालू झाल्यात.
या आधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांच्यावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नारायण राणे यांच्या कारकिर्दीत सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लघु उद्योगाची निर्मिती झाली नाही. नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारण्यात हे कारण असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे राज्याच्या राजकारणात आपली चमक दाखवत आहेत. राज्यात मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असूनही विधानसभेच्या या टर्म मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही . मात्र येणाऱ्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यास नितेश राणे यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. भाजप एकाच घरात दोन मंत्रीपदे देत नसल्याने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला गेला नाही आहे अशी चर्चा राणे समर्थकांमध्ये होत आहे.
न्यूयॉर्क :वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत चालू असलेल्या यंदाच्या टी20 वर्ल्डकप मध्ये न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची ( New York Nassau County stadium ) खूप चर्चा झाली. या स्टेडियमवरील खेळपट्टी चर्चेत राहिली. या मैदानावर लो स्कोअरिंग मॅचेस झाल्या. गोलंदाजांना या मौदानावर फायदा मिळाला.हे मैदान अस्थायी स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. भारत आणि अमेरिका यांच्यातील मॅचनंतर मैदानाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे.
न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम अवघ्या पाच महिन्यांत बांधले गेले. हे स्टेडियम केवळ टी-२० विश्वचषकातील सामन्यांसाठी बांधण्यात आले होते. अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ICC ने टी-२० विश्वचषक सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय डॅलस (टेक्सास) आणि फ्लोरिडा या ठिकाणांचीही स्पर्धेतील सामन्यांसाठी निवड करण्यात आली. नासाऊ काउंटी स्टेडियम तयार करण्याबाबत अंतिम निर्णय सप्टेंबर २०२३ मध्ये झाला.
न्यूयॉर्कमधील या मैदानाच्या उभारणीचा खर्च 30 मिलियन डॉलर होता. या मैदानाची निर्मिती 8 महिन्यात करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड ओवल स्टेडियमवरुन विशेष माती मागवण्यात आली होती. हे स्टेडियम पुढील 6 आठवड्यात पूर्णपणे हटवण्यात येईल.
बुधवारपासून स्टेडियम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्कमधील आयजनहावर पार्कमध्ये बांधण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये या मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. या पार्कमधून नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिमय गायब होईल.
नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आठ मॅच खेळवण्यात आल्या. इथं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तीन संघानं विजय मिळवला. तर, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं पाचवेळा विजय मिळवला. भारतानं दोन वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक 137 धावा केल्या होत्या. कॅनडानं ती मॅच 12 धावांनी जिंकली होती.
Konkan Railway: कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. या काळात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा ताण मोठया प्रमाणात वाढतो. योग्य आणि वेळेत नियोजन केल्यास प्रवाशांची गैरसोय कमी होऊन त्यांचा प्रवास सुखकर बनू शकतो. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी कोकण विकास समितीने अभ्यास करून काही बदल आणि उपाययोजना रेल्वे प्रशासनास सुचवल्या आहेत. त्या आशयाचे निवेदन त्यांनी रेल्वे बोर्ड तसेच इतर संबंधित आस्थापानांना पाठवले आहे.
निवेदनात कोणत्या गोष्टी सुचवल्या आहेत?
गणेशोत्सवात दिवा रोहा मेमू चिपळूणपर्यंत वाढवल्याने 2022, 2023 आणि 2024 मध्ये रोहा येथे प्रवासी आंदोलन, रेल रोको आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे दिवा रोहा मेमूचा विस्तार करण्याऐवजी किंवा पनवेल ते चिपळूण दरम्यान वेगळी स्पेशल ट्रेन चालविण्या ऐवजी मुंबई सीएसएमटी ते चिपळूण दरम्यान अनारक्षित गाड्या चालवाव्यात. या गाडयांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबे देण्यात यावेत. तसेच या गाडयांना द्वितीय श्रेणी (2S) आणि AC चेअर कार (CC) कोच सोयीचे पडतील. पनवेल स्थानक बहुतेक प्रवाशांना सोयीचे नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या किमान दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत चालवणे गरजेचे आहे.
चिपळूण – रत्नागिरी दरम्यानच्या दिवसा धावणाऱ्या गाड्यांसाठी सेकंड स्लीपर SL किंवा थ्री टायर एसी 3A डब्यांचे रूपांतर सेकंड सीटिंग 2S आणि एसी चेअर कार CC कोच मध्ये केल्यास जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. (See below table)
CLASS
LHB
IRS/ICF
Second Class Seating (2S)
120 (1.5 times of 80 berths in SL)
108 (1.5 times of 72 berths SL)
Sleeper used as 2S
100 (1.25 times of 80 berths in SL)
90 (1.25 times of 72 berths in SL)
AC Chair Car (CC)
78
74
3A used as CC
90 (1.25 times of 72 berths in 3A)
80 (1.25 times of 64 berths in 3A)
3E used as CC
100 (1.25 times of 80 berths in 3E)
–
अतिरिक्त रेकचा वापर: दिवा पेण मेमूच्या अतिरिक्त रेकचा उपयोग शनिवार व रविवार रोजी मुंबई/ठाणे ते खेड दरम्यान विशेष ट्रेन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच, 10101/10102 रत्नागिरी मडगाव एक्स्प्रेस, 17613/17614 नांदेड पनवेल एक्स्प्रेसचा रेक मुंबई ते वीर/खेड/चिपळूण/रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्या चालविण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
पनवेल ऐवजी दिवा किंवा एलटीटी वरून विशेष गाड्या चालवणे: मुंबई विभागातील एकाच बोर्डिंग/डिबोर्डिंग स्टेशनमुळे पनवेल येथून सुटणाऱ्या गाडयांना प्रतिसाद कमी मिळतो (low occupancy ). तसेच, पनवेल हे बहुतांश मुंबई विभागासाठी सोयीचे नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने दिवा किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या विशेष गाड्या चालवण्याचा विचार करावा.
या स्थानकांवर थांबे द्या: पेण, करंजाडी, सापे वामणे, विन्हेरे, दिवाणखावटी, रावली, खारेपाटण रोड, आचिर्णे, सौंदळ, झाराप, मडुरे, पेरणेम, इ. या स्थानकांवर नियमित प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त, दररोज किमान दोन विशेष गाड्या (एक मध्य रेल्वे आणि एक पश्चिम रेल्वे) साठी थांबे द्या.
मालवाहतूक आणि रोरो सेवांना स्थगिती: प्रवासी गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी सणासुदीच्या काळात माल आणि RORO (रोल-ऑन रोल-ऑफ) वाहतूक तात्पुरती स्थगित ठेवण्याचा विचार करावा.
पश्चिम रेल्वेचे योगदान: सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, वलसाड, वडोदरा, उधना, सुरत, विश्वामित्री, अहमदाबाद, पुणे, मनमाड, भुवावळ, नागपूर, अशा विविध टर्मिनल्सवरून गाड्या चालवणे आवश्यक आहे. ठाणे, कल्याण आणि वसई रोडसारख्या महत्त्वाच्या मध्यवर्ती स्थानकांवर दररोज पुरेशा गाड्या उपलब्ध करून देणे. वसई रोडवर लोको रिव्हर्सल टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई प्रदेशातून कोकण रेल्वेपर्यंत अमृत भारत, मेमू किंवा वंदे भारत गाड्या चालविल्यास फायदा होईल.
FTR सेवेस वेळेचे बंधन देण्यात यावेत: FTR स्पेशल सेवेमुळे सामान्य तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे UTS आणि PRS द्वारे बुकिंगसाठी खुल्या असलेल्या सामान्य विशेष गाड्यांसाठी प्राइम स्लॉट आरक्षित केले जावेत आणि FTR स्पेशल सेवा फक्त 11:00 ते 16:00 या वेळेत मुंबईपासून चालवल्या जाव्यात.
पूर्णत: अनारक्षित स्पेशल गाड्या फक्त जास्त मागणी असलेल्या दिवसांपुरती मर्यादित ठेवा: पूर्णत: अनारक्षित स्पेशल फक्त गर्दीच्या दिवसांमध्ये चालवल्या जाव्यात किंवा त्या गाड्यांमध्ये काही आरक्षित डबे दिले जावेत.
12 कोच मेमूऐवजी 22/24 कोच ट्रेन चालवा: 12 कोच MEMU चालवल्याने मार्ग ब्लॉक होतो परंतु कमी प्रवासीक्षमता प्रदान करते. त्यामुळे, मार्गाच्या जास्तीत जास्त वापरासाठी 22 LHB/24 IRS कोच असलेल्या गाड्या चालवणे आवश्यक आहे.
खालील टेबल मध्ये दर्शविलेल्या गाडयांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान ३ स्थानकांवर अतिरिक्त तात्पुरते थांबे प्रदान करा उदा. माणगाव, वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे.