Author Archives: Kokanai Digital

अभिमानास्पद! केंद्र सरकारच्या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये कोकणातील निर्मनुष्य बेटावरील ध्वजारोहणाला स्थान

   Follow us on        

सिंधुदुर्ग: देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या कामगिरीची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्याने ‘निवती रॉक’ या निर्मनुष्य बेटावर केलेल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा समावेश केंद्र सरकारच्या विशेष ‘कॉफी टेबल बुक’ मध्ये करण्यात आला आहे.

अडथळ्यांची शर्यत आणि जिद्द
निवती किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या बेटावर पोहोचणे अत्यंत कठीण असते. ज्या दिवशी हे ध्वजारोहण करण्यात आले, त्या दिवशी समुद्रात मोठी ओहोटी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत बोटीने प्रवास करून, उभ्या कपारीच्या खडकावर चढून पोलिसांनी राष्ट्रध्वज फडकवला. पंतप्रधान मोदी यांनी निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण करण्याबाबत मांडलेल्या संकल्पनेला अनुसरून ही मोहीम राबवण्यात आली होती.


“हा केवळ निवती पोलिसांचा सन्मान नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. केंद्र सरकारने आमच्या कष्टाची दखल घेतली, याचा खूप आनंद आहे.”
— भीमसेन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निवती पोलीस ठाणे.

या यशामुळे निवती पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नियतीपुढे जिद्द हरली! दहावीत ९९ टक्के गुण मिळवणारी कोकणची ‘नीट’ टॉपर सिद्धी भिडे हिचे वयाच्या २० व्या वर्षी निधन

 

   Follow us on        

बांदा (सिंधुदुर्ग):
एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करायची जिद्द आणि दुसरीकडे शरीराला ग्रासलेला जीवघेणा आजार, अशा द्वंद्वात अखेर मृत्यूचा विजय झाला. दहावीत ९९ टक्के गुण मिळवून आणि NEET परीक्षेत कोकणात अव्वल येऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे शुक्रवारी कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनाने संपूर्ण बांदा शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


कर्करोगावर मात करत मिळवले होते दैदिप्यमान यश


सिद्धी भिडे हिचा प्रवास कोणत्याही चित्रपटाला शोभेल असा प्रेरणादायी पण तितकाच क्लेशदायक होता. सातवीत असतानाच तिला कर्करोगाचे (Cancer) निदान झाले होते. मात्र, या संकटाने खचून न जाता तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवून सर्वांना थक्क केले होते. त्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या NEET परीक्षेतही तिने कोकण विभागातून प्रथम येत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले होते.


डॉक्टर होऊन सेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण


सिद्धीला स्वतः कॅन्सरचा त्रास होत असतानाही, भविष्यात डॉक्टर होऊन इतरांचे प्राण वाचवायचे होते. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून ती नक्कीच एक उत्तम डॉक्टर झाली असती, अशी भावना तिचे शिक्षक आणि नातेवाईक व्यक्त करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावली आणि वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली.

“समान मत, समान किंमत!” राजकीय नेत्यांना चिमटा काढणारा कणकवलीतील तो बॅनर लक्ष वेधतोय

   Follow us on    

 

 

कणकवली: निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पडतो, हे काही नवीन नाही. मात्र, याच पैशांच्या वाटपावरून आता मतदारांनी चक्क बॅनरबाजी करत राजकीय नेत्यांना चिमटा काढला आहे. कणकवली तालुक्यातील हळवल येथे लावण्यात आलेला एक बॅनर सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

​काय आहे बॅनरवर?

​हळवल ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळच ग्रामस्थांनी एक मोठा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिले आहे:

​”समान मत, समान किंमत..! शहरातील मतदारांना १५ हजार रू. देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये!”

— ग्रामीण भागातील मतदार

​नेमके प्रकरण काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना १०,००० ते २५,००० रुपयांपर्यंत वाटप झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती. याच चर्चेचा धागा पकडून ग्रामीण भागातील मतदारांनी हा उपरोधिक बॅनर लावला आहे.

​”पैशाची हाव की लोकशाहीवर घाव?” असा यक्षप्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. जर शहरात मताची किंमत एवढी मोठी असेल, तर ग्रामीण भागात भेदभाव का? असा तिरकस सवाल करत मतदारांनी राजकीय व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर उपरोधिक टीका केली आहे.

​सोशल मीडियावर व्हायरल

​या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जनगणना २०२७: लवकरच पहिल्या टप्प्याची सुरुवात, ‘या’ ३३ प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा

   Follow us on    

 

 

नवी दिल्ली:

देशातील बहुप्रतिक्षित ‘जनगणना २०२७’ बाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ एप्रिल २०२६ पासून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला अधिकृतरीत्या सुरुवात होणार असून, केंद्र सरकारने यासाठी आवश्यक असलेल्या ३३ प्रश्नांची अधिसूचना (Gazette Notification) जारी केली आहे.

​दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया

​भारत सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, जनगणना प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत पार पडणार आहे:

​१. पहिला टप्पा (एप्रिल ते सप्टेंबर २०२६): या टप्प्यात ‘घरयादी’ (House Listing) आणि ‘गृहगणना’ (Housing Census) केली जाईल.

२. दुसरा टप्पा (फेब्रुवारी २०२७): या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना (Population Enumeration) केली जाणार आहे.

​३३ प्रश्नांद्वारे गोळा केली जाणार माहिती

​केंद्र सरकारने जनगणनेसाठी ३३ प्रश्नांची एक यादी तयार केली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश असेल:

​घराची माहिती: घराचा नंबर, भिंती आणि छतासाठी वापरलेले साहित्य, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालयाची उपलब्धता.

​कुटुंबाची माहिती: कुटुंबातील सदस्यांची संख्या, प्रमुखाचे नाव, कुटुंबाकडे असलेली मालमत्ता (रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप, सायकल, कार इ.).

​डिजिटल कनेक्टिव्हिटी: इंटरनेट सुविधा, मोबाईल/स्मार्टफोनची उपलब्धता.

​इतर: स्वयंपाकाचे इंधन आणि संवादासाठी मोबाईल क्रमांक.

​’स्व-गणना’ (Self-Enumeration) चा पर्याय उपलब्ध

​यावेळी जनगणनेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला आहे. प्रगणक (Enumerator) घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिक स्वतःहून आपली माहिती ऑनलाइन नोंदवू शकतील.

​राज्यांना ३० दिवसांची मुदत

​प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या ६ महिन्यांच्या कालावधीत आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कोणताही एक कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

​महत्त्वाची टीप: जनगणनेचे हे काम ‘जनगणना अधिनियम, १९४८’ अंतर्गत केले जात असून, गोळा केलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.

​जनगणना २०२७: ३३ प्रश्नांची यादी

​१. भवन क्रमांक (नगर किंवा स्थानिक प्राधिकरण)

२. जनगणना मकान नंबर

३. घराच्या जमिनीसाठी वापरलेले साहित्य

४. घराच्या भिंतीसाठी वापरलेले साहित्य

५. घराच्या छतासाठी वापरलेले साहित्य

६. घराचा वापर (निवासी/व्यावसायिक/इतर)

७. घराची सद्यस्थिती (चांगली/जीर्ण)

८. कुटुंब क्रमांक

९. कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या

१०. कुटुंब प्रमुखाचे नाव

११. कुटुंब प्रमुखाचे लिंग

१२. जातीचा प्रवर्ग (SC/ST/इतर)

१३. घराच्या मालकीची स्थिती (स्वतःचे/भाड्याचे)

१४. राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांची संख्या

१५. कुटुंबात राहणारी विवाहित जोडपी

१६. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत

१७. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता (घरात/बाहेर)

१८. प्रकाशाचा मुख्य स्रोत (वीज/इतर)

१९. शौचालयाची सुलभता

२०. शौचालयाचा प्रकार

२१. सांडपाण्याची निचरा व्यवस्था

२२. स्नानगृहाची उपलब्धता

२३. स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शन

२४. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन

२५. रेडिओ/ट्रान्झिस्टरची उपलब्धता

२६. टेलिव्हिजन (टीव्ही)

२७. इंटरनेट सुविधा

२८. लॅपटॉप/कॉम्प्युटर

२९. टेलिफोन/मोबाईल/स्मार्टफोन

३०. सायकल/स्कूटर/मोटारसायकल

३१. कार/जीप/व्हॅन

३२. कुटुंबात उपभोगले जाणारे मुख्य धान्य

३३. मोबाईल नंबर (केवळ जनगणना माहितीसाठी)

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘स्लीपर विशेष’ एक्सप्रेस

   Follow us on    

 

 

कोकण रेल्वे: शनिवार-रविवारची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या फेऱ्यांचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:

१. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक (T) स्पेशल

​दिनांक: शनिवार, २४ जानेवारी २०२६.

​वेळ: मडगाव जंक्शनवरून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (T) – मडगाव स्पेशल

​दिनांक: रविवार, २५ जानेवारी २०२६.

​वेळ: लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

​या विशेष गाड्या खालील स्थानकांवर थांबतील:

करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.

​गाडीची रचना (Composition)

​या गाडीला एकूण २० डबे असतील, ज्यामध्ये:

​स्लीपर क्लास (Sleeper): १८ डबे

​एसएलआर (SLR): ०२ डबे

 

अखेर रेल्वे प्रशासन नरमले! चर्चेला तयार; नेमळेकर यांचे उपोषण स्थगित

२७ जानेवारीला कोकण रेल्वे मुख्यालयात तातडीची विशेष बैठक

   Follow us on    

 

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार व कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोकण रेल्वेचे उप-मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (कमर्शियल मॅनेजर) श्री. दिनेश जी. बोंडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत विशेषतः सावंतवाडी टर्मिनस, कोल्हापूर–सावंतवाडी रेल्वे मार्ग, तसेच संध्याकाळची सावंतवाडीपर्यंत धावणारी अतिरिक्त विशेष रेल्वे या महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

चर्चेदरम्यान उपस्थित सर्व मुद्दे लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आले असून, या विषयांवर कोकण रेल्वेच्या वाणिज्य (कमर्शियल) विभागातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर वाणिज्यिक चर्चा करून कायमस्वरूपी व ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. अभिजीत धुरत, कोकण रेल्वेचे अधिकारी श्री. दिनेश बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने श्री. नेमळेकर यांचे उपोषण स्थगित करण्यात आले.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत पत्राद्वारे महासंघाच्या मागण्या योग्य व विचारार्ह असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून, येत्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार महाराष्ट्राचा दिमाखदार चित्ररथ; ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ संकल्पनेचे सादरीकरण

   Follow us on    

 

 

नवी दिल्ली :भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्र राज्याचा आकर्षक आणि आशयघन चित्ररथ सज्ज झाला आहे. यंदा महाराष्ट्राच्या वतीने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार असून, राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि वाढते आर्थिक सामर्थ्य यांचे प्रभावी दर्शन या चित्ररथातून घडवण्यात येणार आहे.

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सादर होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ जागतिक स्तरावर राज्याची ओळख अधिक भक्कम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

चित्ररथाच्या मध्यवर्ती संकल्पनेत गणेशोत्सवाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, रंगकाम करणारे कलाकार, सजावट व्यावसायिक, प्रकाश व ध्वनी तंत्रज्ञ, वाहतूक, फुलव्यवसाय, पर्यावरणपूरक साहित्य निर्माते अशा असंख्य घटकांना मिळणारा शाश्वत रोजगार या संपूर्ण आर्थिक साखळीचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे.

चित्ररथावर गणपती बाप्पांची भव्य मूर्ती, पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करणारे कलाकार, लेझीम, फुगडी यांसारखे लोकनृत्यप्रकार, तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शवणारे पोशाख आणि रंगसंगती पाहायला मिळणार आहेत. या माध्यमातून ‘लोकसहभागातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना ठळकपणे मांडण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता, पर्यावरणपूरक उपक्रम, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून अधिक व्यापक स्वरूपात साजरा होत आहे. शाडू मातीच्या मूर्ती, कृत्रिम विसर्जन तलाव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचाही चित्ररथात समावेश करण्यात आला आहे.

एकूणच, महाराष्ट्राचा हा चित्ररथ परंपरा आणि प्रगती यांचा सुरेख संगम साधणारा असून, भारताच्या सांस्कृतिक वैविध्यात महाराष्ट्राचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे देशासह जगाला दाखवून देणारा ठरणार आहे.

गाबीत समाज विकास मंडळ, पुणे यांचा दिमाखदार स्नेह मेळावा संपन्न

   Follow us on    

 

 

पुणे: गाबीत समाज विकास मंडळ, पुणे यांचा दिमाखदार स्नेह मेळावा संपन्न झाला. गोवा,कारवारसह तळ कोकणातील गाबीत समाज बांधव ज्या उद्देशाने एकत्रित येऊन रोप लावले. त्यांचे रूपांतर आज वटवृक्षात झाले .असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विठोबा तथा आबा झिलू कोळंबकर यांनी चिंचवड ,पुणे येथे गाबीत समाज वार्षिक स्नेहमेळावा २०२६ आयोजित सोहळ्यात ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.

प्रारंभी दिपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, प्रा. डॉ. नंदा संतोष हरम, मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल आदी प्रभृतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष आबा कोळंबकर म्हणाले की, आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, सोबतच व्यक्त व्हावं हाच हेतू कार्यकर्त्यांनी मंडळ निर्माण केला तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद केले. प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी सांगितले की, आपलं गाव सोडून पुण्यासारख्या शहरात आलात.पण आपली संस्कृती टिकून ठेवत असताना ,सामाजाविषयी असलेली बांधिलकी अबाधित राखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहात हेच आजच्या कार्यक्रमातून अधोरेखित होतं आहे. त्यामुळे असेच जोमाने कार्यरत रहा आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा असे सांगितले. प्रा. डॉ. नंदा संतोष हरम यांनी ” लहान मुलांना वाढवताना” या विषयावर बोलताना सांगितले की,खरंच आपली मुले सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून यांचा विचार गांभीर्याने पालकांनी करण्याची वेळ आल्याचे नमूद करताना बालपणी मुलांचा व्यक्तीमत्व विकास घडतं असतो. त्यांना सोशल मीडिया पासून दूर ठेवता येणे गरजेचे असून आईवडिलांनी सुद्धा किती वेळ भ्रमणध्वनी वापरायचा यांचाही विचार व्हावा! त्यापेक्षा मुलांना इतिहासिक ठिकाणे, वारी म्हणजे काय? गड किल्ले यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यांना स्वावलंबन शिकवा तरच सजगतेने पालकत्व निभावलं जाईल असे सांगितले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून खजिनदार शशिकांत धुरी आणि प्रसाद भाबल यांना विशेष सन्मानित करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चिटणीस हेमंत आचरेकर यांनी करून आढावा घेतला. तर मागील वर्षीचा ताळेबंद वाचन खजिनदार शशिकांत धुरी यांनी केले.उपस्थित पाहुण्यांचा परिचय राजाराम गांवकर यांनी करून दिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात मालवणी दशावतार “एक लोपावत असलेली कला” आणि सौ. मेधा नंदकिशोर सनये लिखित “वय हरले जिद्द जिंकली” या दुहेरी एकांकिका सद्यस्थितीवर भाष्य करण्याऱ्या ठरल्या त्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. तर कित्येक पारितोषिके प्राप्त झाली. या कार्यक्रमासाठी लेखक कवी डॉ. उदय माळगावकर, साहित्यिक गोपाळकृष्ण तथा बाबा मुणगेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या रंगतदार स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सुदवा देऊलकर आणि शुभम नंदकिशोर सनये संयुक्तपणे केले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ व सदस्य कार्यकारी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. विविध कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.

अरण्यातून साक्षात अवतरला ‘वन विनायक’; मळगावच्या खडपकर कुटुंबाची २६ वर्षांची अनोखी भक्तीगाथा

   Follow us on    

 

 

सावंतवाडी: निसर्ग आणि मानवाच्या नात्याचे अनेक पदर आपण अनुभवतो, पण सावंतवाडीच्या माळगावात एक असा चमत्कार घडला ज्याने श्रद्धेला नवी परिभाषा दिली. एका बाजूला पितृशोक आणि दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या विसर्जनाचे दुःख अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या एका भक्ताला चक्क जंगलात ‘साक्षात देव’ भेटला. ही कथा आहे सुमन खडपकर आणि त्यांच्या घरी विराजमान असलेल्या ‘श्री वन विनायक’ या लाकडी मूर्तीची.

​जेव्हा ‘तो’ अरण्यात भेटला…

​वर्ष २००० ची ही गोष्ट. खडपकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पितृनिधनामुळे घरच्या गणपतीचे विसर्जन अवघ्या दीड दिवसात करावे लागले. लाडक्या बाप्पाला इतक्या लवकर निरोप द्यावा लागल्याची सल सुमनजींच्या मनात होती. अशातच माळगावच्या घनदाट अरण्यातून जात असताना, त्यांना निसर्गाच्या कुशीत लाकडाच्या ओंडक्याला आलेला एक नैसर्गिक आकार दिसला. तो हुबेहूब ‘एकदंती’ गणपतीसारखा होता. जणू बाप्पानेच शब्द दिला होता – “विसर्जनाचे दुःख करू नकोस, मी आता तुझ्या घरी कायमचा वास्तव्याला येतोय.”

​श्रद्धेचा ‘अडीच दशकांचा’ प्रवास

​तेव्हापासून आजतागायत, म्हणजे तब्बल २६ वर्षे, ही नैसर्गिक लाकडी मूर्ती खडपकर कुटुंबाचा अविभाज्य हिस्सा आहे. गेल्या वर्षी या मूर्तीचे ‘श्री वन विनायक’ असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी माघी गणेशोत्सवाचा सोहळा येथे एखाद्या उत्सवासारखा साजरा होतो. यंदाही सकाळी अभिषेक, पूजन आणि दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

​भक्तीचा ‘मळा’ आणि कीर्तनाची ‘सेवा’

​या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे सायंकाळची कीर्तन सेवा. स्वतः सुमन खडपकर जेव्हा आपल्या रसाळ वाणीने कीर्तन करतात, तेव्हा उपस्थित भक्त मंत्रमुग्ध होतात. यंदा त्यांना मयूर गवळी यांनी हार्मोनियमवर साथ दिली. केवळ एक धार्मिक विधी न राहता, या उत्सवाने माळगावच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

​नात्यांची वीण आणि निसर्गाची ओढ

​आजच्या काळात जिथे माणसांमधील संवाद संपत चालला आहे, तिथे या ‘वन विनायकाने’ सर्वांना एकत्र गुंफले आहे. निसर्गाने स्वतः घडवलेली ही मूर्ती आणि खडपकर कुटुंबियांची त्याप्रती असलेली निष्ठा, हे श्रद्धा आणि पर्यावरणाच्या संगमाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

जनसेवेचा ‘संदेश’ आता राजकारणात; रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणारे जिमन राजकीय आखाड्यात!

कसबा संगमेश्वर पंचायत समिती गणातून आपला “अपक्ष” उमेदवारी अर्ज दाखल केला!

   Follow us on    

 

 

रुपेश मनोहर कदम/सायले:

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम ठरवलेल्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काही दिवसांपूर्वी आपले मतप्रदर्शन करणारे संदेश जिमन यांनी जनसेवा दृष्टीपथात ठेवून हा निर्णय गांभीर्याने घेतला आहे. आजवर कोणत्याही प्रसिद्धीसाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी आपण रेल्वे संबंधित कामे केली नाहीत.तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले.

याच प्रयत्नातून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती, जामनगर, पोरबंदर, मडगाव या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसला थांबा मिळाला आहे. रेल्वे प्रवास आता पहिल्या पेक्षा कितीतरी पटीने आरामदायी झाला आहे.

हे काम करीत असताना वेळोवेळी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत होत्या.

त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींशी जवळून संपर्कात आलो असे त्यांनी म्हटले. माझी जन सेवेची तळमळ बघून सगळेच भारावून गेले असल्याचे त्यांनी म्हटले पण जेव्हा भक्कम आधारावर जनसामान्यांच्या सेवा सुविधांसाठी झटायचा विचार मनात आला.

निष्ठावंत,जवळचे, स्नेह संबंधित व्यक्तींचा लळा मला कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी अडसर ठरला आणि म्हणून हा अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा पंचायत समिती गणातील दुर्गम भागातील गावांचा विचार आपण प्रामुख्याने करणार!

आजवर गृहीत धरलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार. आजही या भागातील जनतेला,शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास, जनसामान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि हेळसांड,उपेक्षेचे दाखले देणारे रस्ते, जनतेच्या सुविधांसाठी असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटणार! जनतेच्या खऱ्या गरजा ओळखून त्यांना परिपूर्ण करण्यासाठी वेळ देणार! असे वक्तव्य पोटतिडकीने संदेश जिमन यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजांचा श्वास खेळला, शौर्याचा लाव्हा उसळला त्या छत्रपतींचे कसबा संगमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी केवळ आंतरराष्ट्रीय स्मारक झाले आणि धन्य झालो एवढ्यावर न थांबता पर्यटन आणि स्थानिकांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय कसबा गणातील महिला, पुरुष, गरजू व्यक्ती, दिव्यांग , यांच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील रहाणार असल्याचे म्हटले.

एकंदरीत एक युवा, सुशिक्षित, समाजसेवेची नाळ जाणणारा व्यक्ती या राजकीय परिघात प्रवेश करतो आहे. सद्यस्थितीत राजकारण आणि शिक्षण यांचा संबंध जवळजवळ नावालाही नसावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्लानीत असलेल्या मतदार बंधू भगिनींनी उमेदवार निवडून देताना विकास आणि विश्वासार्ह व्यक्तीमत्व यांची निवड केली तरच भविष्याचे चित्र बदलेल!

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search