बांदा: भर वस्तीत आढळले मगरीचे पिल्लू

   Follow us on        

बांदा, दि. ३०:

बांदा शहरात सोमवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या धुवाँधार पावसामुळे येथील बांदा सोसायटीसमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोखाली मगरीचे पिल्लू आढळून आले. भर शहरात मगरीचे पिल्लू दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ओहोळात आलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर हे मगरीचे पिल्लू थेट रस्त्यावर आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत या मगरीच्या पिल्लाला सुखरूप पकडले आणि तात्काळ वन विभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

​बांदा शहराच्या जवळून वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रात मगरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पावसामुळे मगरी नदीपात्राबाहेर पडून मानवी वस्तीत शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाचे दिवस अजून पुढे असल्याने नदीकाठच्या आणि ओहोळाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Facebook Comments Box

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेकडून ५४ विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई:

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ५४ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या नागपूर, नवी अमरावती, खामगाव, लातूर, भुसावळ, पुणे आणि कोल्हापूर येथून पंढरपूर व मिरजसाठी धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना थेट पंढरपूर गाठणे अत्यंत सोयीचे होणार असून त्यांचा प्रवास अधिक सुकर होईल.

​या ५४ गाड्यांपैकी २० आरक्षित विशेष गाड्या असतील. यामध्ये नागपूर-मिरज दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या चालवल्या जातील. ट्रेन क्रमांक ०१२०५ ही गाडी २३ व २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक ०१२०६ ही गाडी २४ व २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. याशिवाय नवी अमरावती-पंढरपूरसाठी ४, खामगाव-पंढरपूरसाठी ४ आणि लातूर-पंढरपूर दरम्यान ८ फेऱ्यांच्या आरक्षित गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

​सामान्य आणि अनारक्षित प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने ३४ अनारक्षित विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये भुसावळ-पंढरपूर दरम्यान ४, कोल्हापूर-कुर्डूवाडी दरम्यान १६ आणि पुणे-मिरज दरम्यान १४ फेऱ्या चालवल्या जातील. या आरक्षित विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग बुधवार, १ जुलै २०२६ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’च्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तसेच, अनारक्षित गाड्यांची तिकिटे ‘यूटीएस’ (UTS) प्रणालीद्वारे मिळतील. आषाढी यात्रेदरम्यान प्रवाशांची गर्दी वाढल्यास गरजेनुसार आणखी गाड्या वाढवल्या जातील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: आता ‘गुगल मॅप’ सांगणार मुंबई-गोवा महामार्गावरील धोक्याची ठिकाणे!

   Follow us on        

रत्नागिरी:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी वापर सुरू केला आहे. ‘ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ (Welcome to Ratnagiri) या विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा पोलिसांनी थेट गुगल कंपनीशी समन्वय साधून एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना गुगल मॅपवर धोक्याच्या ठिकाणांचे ‘रिअल-टाईम ऍलर्ट’ मिळणार आहेत.

अशा प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केला आहे.

 

असे काम करणार हे तंत्रज्ञान:

या नव्या उपक्रमांतर्गत, वाहनचालक जसेही मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतील, तसा त्यांच्या गुगल मॅपवर ‘Welcome to Ratnagiri’ असा संदेश (Notification) दिसेल. त्यानंतर पुढील प्रवासादरम्यान रस्त्यात येणारे धोकादायक घाट, तीव्र वळणे, शाळा, मानवी वस्ती, अंडरपास तसेच अपघातप्रवण क्षेत्रांची (Black Spots) माहिती आगाऊ ऍलर्टद्वारे चालकाला दिली जाईल. यामुळे वाहनचालकांना वेळेतच वाहनाचा वेग नियंत्रित करणे आणि संभाव्य धोका ओळखून सावधपणे वाहन चालवणे सोपे होणार आहे.

१० महत्त्वाचे ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित:

महामार्गावरील ज्या भागात आजवर वारंवार अपघात घडले आहेत, अशा साधारण एक ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यातील १० महत्त्वाचे अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भोस्ते घाट, हातखंबा, निवळी आणि लांजा आदी भागांचा समावेश असून, या परिसराची अचूक माहिती गुगल मॅपवर अपडेट करण्यात आली आहे. पोलिसांच्या या आधुनिक पाऊलामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: कुडाळमध्ये ‘पुरुषांची वटपौर्णिमा’ उत्साहात साजरी

 

गेली १८ वर्ष अखंड जपली जातेय परंपरा

   Follow us on        

कुडाळ | प्रतिनिधी:स्त्री आणि पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, कधी मैत्रीण तर कधी कुटुंबाचा मुख्य आधार बनून अहोरात्र कष्ट करणाऱ्या पत्नीप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये एक अनोखा आणि कौतुकास्पद सोहळा पार पडला. कुडाळ मध्ये गवळदेव मंदिरात उमेश गाळवणकर मित्र मंडळ आणि  डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काल पुरुषांची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

विशेष म्हणजे, सामाजिक रूढी-परंपरांना नवा सकारात्मक दृष्टिकोन देणारे हे व्रत गेल्या १८ वर्षांपासून इथं अविरतपणे सुरू आहे.

आपल्या सुख-दुःखात सावलीसारखी सोबत देणाऱ्या पत्नीला दीर्घायुष्य लाभाव आणि ‘जन्मोजन्मी हीच पत्नी आपणास सहचारिणी म्हणून मिळावी’ या कृतज्ञतेपोटी आणि श्रद्धेपोटी या अनोख्या वटपौर्णिमेचे आयोजन करण्यात आल होत. सकाळी गवळदेव मंदिरात पुरोहितांच्या  मंत्रोच्चारात आणि उपस्थित पतींच्या शुभहस्ते वटवृक्षाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व पुरुषांनी वडाला सात फेऱ्या मारून पत्नीच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

Facebook Comments Box

Konkan Railway :अहमदाबाद-मंगळुरू विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

प्रतिनिधी, मुंबई:

प्रवाशांची वाढती गर्दी आणि अतिरिक्त मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने (अहमदाबाद मंडळ) अहमदाबाद – मंगळुरू वीकली स्पेशल ट्रेन (गाडी संख्या ०९४२४) च्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही विशेष ट्रेन ३१ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि तपशील:

​गाडी क्रमांक: 09424 (अहमदाबाद ते मंगळुरू)

​दिवस आणि वेळ: ही ट्रेन दर शुक्रवारी १६:०० वाजता अहमदाबादहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:०० वाजता मंगळुरूला पोहोचेल.

​वाढविण्यात आलेला कालावधी: ३ जुलै २०२६ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत.

​कोचची रचना (Coach Composition):

​या विशेष ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी एसी २-टियर (AC 2-Tier), एसी ३-टियर (AC 3-Tier), स्लीपर क्लास (Sleeper Class), आणि जनरल सेकंड क्लास (General Second Class) कोच समाविष्ट असणार आहेत.

​प्रमुख थांबे (Stops):

​ही ट्रेन प्रवासादरम्यान नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकंबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबेल. कोकण रेल्वे मार्ग आणि महाराष्ट्रातील प्रमुख स्थानकांवरून जात असल्याने या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​बुकिंग कधीपासून?

​या वाढीव फेऱ्यांसाठीचे बुकिंग ३० जून २०२६ पासून सुरू झाले आहे. प्रवासी सर्व पीआरएस (PRS) काउंटर्सवर तसेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले तिकीट बुक करू शकतात.

​या ट्रेनच्या अद्ययावत माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: महामार्गाच्या अपुर्ण कामांमुळे माभळे गावातील घरांना धोका

   Follow us on        

संगमेश्वर:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (एनएच-६६) सध्या सुरू असलेले रुंदीकरणाचे काम या मार्गानजीक राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मोठ्या प्रमाणावर माती उघडी पडली असून, जमिनीचे उतार अस्थिर झाले आहेत. संगमेश्वर नजीक असलेल्या माभळे गावात या कमकुवत झालेल्या भागांची आता मोठ्या प्रमाणावर धूप होऊ लागली आहे. यामुळे या भागात केव्हाही मोठी दरड कोसळण्याची आणि स्थानिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

​या परिस्थितीमुळे येथील रहिवासी वसंत सोमा खापरे यांच्या घराला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या मोठ्या खोदकामामुळे त्यांच्या घराच्या खालचा बराचसा मातीचा भाग आधीच खचला आहे. घराचा पाया कमकुवत झाल्यामुळे हे घर आता पूर्णपणे असुरक्षित झाले आहे. विशेषतः सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे हे घर कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशी तीव्र भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. संभाव्य दुर्घटना आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्या पातळीवर उघड्या पडलेल्या भागावर प्लास्टिकचा कागद टाकणे आणि दगड रचणे यासारखे तात्पुरते उपाय केले आहेत. मात्र, प्रशासनाने यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Facebook Comments Box

​कोकणातील हजारो वर्षांचा ऐतिहासिक ठेवा आता शालेय अभ्यासक्रमात

   Follow us on        

विशेष प्रतिनिधी :

हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन मानवी जीवनाचा आणि संस्कृतीचा जिवंत साक्षीदार असलेला कोकणातील कातळशिल्परूपी अमूल्य ऐतिहासिक वारसा आता शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मुख्य भाग होणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे तसेच मंडळातील इतिहास समितीचे सदस्य, समीक्षक, लेखक आणि संयोजकांच्या विशेष प्रयत्नांमुळे या विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल इतिहासप्रेमी आणि संशोधकांकडून मंडळाचे तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

​कातळशिल्प हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ या प्राचीन शिल्पांची माहितीच मिळणार नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या आदिम मानवाची जीवनशैली, त्यांचे विचारविश्व आणि त्यांची कलात्मक अभिव्यक्ती यांची सखोल ओळख होणार आहे. आपल्या स्वतःच्या परिसरातच जागतिक दर्जाचा सांस्कृतिक वारसा दडलेला आहे, याची जाणीव यामुळे नवीन पिढीला होईल. इतिहास हा केवळ पुस्तकातील निर्जीव विषय नसून आपल्या आजूबाजूच्या भूमीत तो जिवंत स्वरूपात उभा आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या जाणीवेतून विद्यार्थ्यांच्या मनात ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान, जतनाची जबाबदारी आणि संशोधक वृत्ती या मूल्यांची बीजे रोवली जातील.

​कोकणातील कातळशिल्पांचा पाठ्यपुस्तकात समावेश होणे हा केवळ अभ्यासक्रमातील एक भाग नसून, तो महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ कोकणातील कातळशिल्पांचा शोध घेणे, त्यांचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय दस्तऐवजीकरण करणे, स्थानिक लोकांमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि शासनापर्यंत हा विषय पोहोचवणे यासाठी संशोधकांनी आपले तन, मन आणि धन अर्पण करून अविरतपणे कार्य केले आहे. दीर्घ आणि अत्यंत खडतर अशा या प्रवासानंतर आज जेव्हा या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात अधिकृतपणे समावेश होत आहे, तेव्हा या अथक प्रयत्नांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाल्याची भावना मनात दाटून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

​कातळावर कोरलेल्या त्या आदिम रेषांनी हजारो वर्षांचा प्रवास करून आज पाठ्यपुस्तकात स्थान मिळवले आहे. आता त्या केवळ पुस्तकाच्या पानांवर न राहता प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुतूहलात, विचारांत आणि संवेदनशील मनात कोरल्या जाव्यात; त्यातून भविष्यातील संशोधक, संवर्धक आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणारा सजग नागरिक घडावा, हीच या संपूर्ण प्रवासाची खरी कमाई आहे, असा विश्वास या मोहिमेत सातत्याने कार्यरत असणारे कोकणातील ज्येष्ठ संशोधक सुधीर (भाई) रिसबूड आणि धनंजय (दादा) मराठे यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलिसांची विशेष बॅग चेकिंग ड्राईव

   Follow us on        

वसई: मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २२ वर्षीय युवक मयंक लोहार याची लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून हत्या झाल्याच्या घटनेनंतर वसई रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत मीरा रोड ते विरार दरम्यान विशेष बॅग चेकिंग ड्राईव सुरू केली आहे. या मोहिमेत पोलिस कर्मचारी प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

२३ जून रोजी चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. पावसामुळे डब्याचे दार बंद करण्याच्या मुद्द्यावरून मयंक लोहार आणि ३० वर्षीय आरोपी रोशन सुवर्ण यांच्यात वाद झाला. वाद चिघळल्याने आरोपीने चाकू काढून मयंकवर वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहिल्या वर्गातील डब्यात घडली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्येही ती कैद झाली आहे.

वसई रेल्वे पोलिसांच्या या विशेष ड्राईवमध्ये प्लॅटफॉर्मवर आणि गाड्यांमध्ये बॅग तपासणी केली जात आहे. पोलिसांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

या उपायामुळे प्रवाशांमध्ये थोडासा दिलासा निर्माण झाला आहे, मात्र दीर्घकालीन उपायांचीही मागणी होत आहे.मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अनेक प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवेशद्वारावर स्कॅनर, सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणे आणि अल्कोहोल चाचणी यासारख्या उपाययोजनांची मागणी करत आहेत. केवळ तात्पुरती ड्राईव न करता कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे.

मयंक लोहार यांच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा द्यावी किंवा पोलिस एनकाउंटर करावा, अशी मागणी केली आहे. या घटनेने संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली असून, रेल्वे प्रशासन आणि सरकारकडून अधिक सक्षम सुरक्षा व्यवस्था अपेक्षित आहे. प्रवाशांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Facebook Comments Box

​ठाणे-देवगड थेट एसटी बस सेवा लवकरच सुरू होणार

आमदार रवींद्र फाटक यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून दखल!

   Follow us on        

देवगड | प्रतिनिधी:

ठाणे ते देवगड या मार्गावर नवीन थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. या मागणीची तातडीने दखल घेत परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सदर बसफेरी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

​आमदार रवींद्र फाटक यांनी परिवहन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाणे ते देवगड या मार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक, तसेच कोकणात नियमितपणे ये-जा करणारे चाकरमानी प्रवास करत असतात. मात्र, या मार्गावर थेट एसटी बससेवेची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक अडचणींना व त्रासाला सामोरे जावे लागते. ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी नागरिकांची बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. ही सेवा सुरू झाल्यास नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येईल आणि कोकणातील नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होईल.

​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट हे राज्यातील जनतेला नियमित व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे हेच आहे. त्यामुळे नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे ते देवगड अशी नवीन एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आमदार फाटक यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. या रास्त मागणीची दखल घेत परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला ही बसफेरी त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Facebook Comments Box

महाराष्ट्रात उभारले जाणार देशातील पहिले ‘ऑफशोर विमानतळ’

   Follow us on        

मुंबई: भारतातील पहिल्या ‘ऑफशोर’ (समुद्रातील किंवा किनारपट्टीवरील) विमानतळाची निर्मिती महाराष्ट्रात होणार असून, यामुळे देशाच्या विमान वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्ह्यातील कोरे बीच (Kore Beach) जवळ या प्रस्तावित विमानतळासाठी ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (DPR) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची पाहणी केली असून, या विमानतळाला थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘उत्तन-विरार सी लिंक’चा विस्तार करण्याची चाचपणी करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे विमानतळ जमिनीऐवजी समुद्रात जमीन संपादन करून किंवा कृत्रिम बेट तयार करून बांधले जाईल; अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये यशस्वी झाला आहे.

​हे विमानतळ वार्षिक सुमारे ९० दशलक्ष (९ कोटी) प्रवाशांची हाताळणी करण्यासाठी डिझाइन केले जात आहे. पालघर भागात होऊ घातलेले वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि इतर मोठ्या वाहतूक प्रकल्पांसह हे विमानतळ मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) आर्थिक चेहरामोहरा बदलून टाकेल. वाढवण बंदरामुळे लॉजिस्टिक्स, शिपिंग आणि वाहतूक क्षेत्रात सुमारे १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असून, या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वसई-विरार आणि पालघर हे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयास येतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

​या प्रकल्पामुळे उत्तर मुंबईच्या पट्ट्यात रिअल इस्टेट आणि गुंतवणुकीला प्रचंड मोठा वेग मिळणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांच्या मते, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीवेळी ज्याप्रमाणे उलवे, पनवेल आणि खारघरमधील मालमत्तांचे भाव विमाने उडण्यापूर्वीच वाढले होते, तसाच काहीसा ट्रेंड आता पालघर आणि विरार पट्ट्यात पाहायला मिळू शकतो. कोरे बीचच्या या प्रस्तावित जागेमुळे आणि नियोजित सी-लिंकमुळे हा प्रकल्प थेट मुंबईशी जोडला जाणार असून, हा संपूर्ण परिसर आगामी काळात महाराष्ट्राचा एक नवा आर्थिक कॉरिडॉर म्हणून नावारूपास येणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search