मुंबई: मे महिन्यात मुंबईमध्ये प्रचंड उकाडा आणि तीव्र उष्णता जाणवत असल्यामुळे मुंबईकरांनी गारेगार प्रवासासाठी वातानुकूलित (AC) लोकल गाड्यांना मोठी पसंती दिली आहे. प्रवाशांच्या या उदंड प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल मधील प्रवासी संख्या आणि दैनंदिन महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ११ मे २०२६ रोजी एकाच दिवसात तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त तिकीट आणि पास विक्रीची ऐतिहासिक नोंद झाली असून हा पश्चिम रेल्वेच्या इतिहासातील एक नवा विक्रम ठरला आहे.
११ मे २०२६ रोजी वातानुकूलित लोकलसाठी एकूण ५० हजार ६६३ तिकीट आणि पासेसची विक्री झाली. या एकाच दिवसाच्या प्रवासातून रेल्वे प्रशासनाला १ कोटी ६० लाख ५८ हजार ८९५ रुपये इतका विक्रमी महसूल मिळाला. यापूर्वी, ४ मे २०२६ रोजी देखील ४७ हजार ४७५ तिकीट आणि पासची विक्री झाली होती, ज्यातून रेल्वेला १ कोटी ६० लाख २१ हजार २४० रुपये महसूल मिळाला होता.
महिनाभरात ५८ लाख ८९ हजार जणांचा प्रवास:
मुंबईतील तीव्र उष्णतेमुळे एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात एसी लोकल मधील गर्दीत मोठी वाढ झाली. १ ते ३१ मे २०२६ या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ५८ लाख ८९ हजार ७३७ प्रवाशांनी वातानुकूलित लोकल मधून प्रवास केला. या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेला २८ कोटी १० लाख ८१ हजार ९५५ रुपये इतका मोठा महसूल मिळाला आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या (२०२५ च्या) मे महिन्याच्या तुलनेत २८.६७ टक्क्यांनी अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांचा हा वाढता प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेता येत्या काळात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या आणखी वाढवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज १४५ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवल्या जातात, तर शनिवार आणि रविवारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ११८ फेऱ्या चालवल्या जातात.
पाच महिन्यांत १११ कोटींचा महसूल:
दुसरीकडे, चालू वर्षातील दीर्घकालीन आकडेवारीचा विचार केला असता, जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत वातानुकूलित लोकलसाठी एकूण ५२ लाख ४६ हजार ३६७ तिकीट आणि पासेसची विक्री झाली आहे. यातून पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत तब्बल १११ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच जानेवारी ते मे २०२५ या समान कालावधीत ४० लाख ७७ हजार २९४ तिकीट आणि पास विक्रीतून ९७ कोटी रुपये महसूल मिळाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्या आणि महसूल या दोन्हीत कमालीची वाढ झाली आहे.












