पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप! महाबळेश्वरचा ‘विल्सन पॉइंट’ या वेळेत राहणार बंद; ड्रोन उडवल्यास थेट जप्ती!

   Follow us on        

महाबळेश्वर:

महाबळेश्वरमधील निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘विल्सन पॉइंट’ (सनराईज पॉइंट) परिसरासाठी सातारा वन विभागाने अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. या राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता, शांतता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती (भेकवली) यांच्या वतीने संयुक्तपणे हा निर्णय घेण्यात आला असून, पर्यटकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​या नव्या नियमांनुसार, विल्सन पॉइंटचे मुख्य प्रेक्षणीय स्थळ वगळता सभोवतालच्या मुख्य गाभा वनक्षेत्रात (Core Forest Area) पर्यटकांना प्रवेश करण्यास आता पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय आणि वनसंपदेचे रक्षण म्हणून विल्सन पॉइंटचे मुख्य प्रवेशद्वार आता सूर्यास्तानंतर पूर्णपणे बंद केले जाणार असून, ते थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच उघडले जाईल. त्यामुळे संध्याकाळी मुख्य गेट बंद होण्यापूर्वीच पर्यटकांना आपली वाहने आवाराबाहेर काढून घ्यावी लागणार आहेत.

​वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा रात्रीच्या वेळी या शांत आणि संवेदनशील वनक्षेत्रात काही पर्यटकांकडून लपून-छपून दारू पिणे, हुल्लडबाजी करणे, रात्रीच्या पार्ट्या करणे किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वनक्षेत्राच्या हद्दीत असे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर थेट वन अधिनियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

​वन्यजीवांच्या सुरक्षेचा विचार करून पर्यटकांना या परिसरात आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन येण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक पर्यटक हौस म्हणून येथील माकडे किंवा इतर वन्यप्राण्यांना चिप्स, बिस्किटे यांसारखे मानवी खाद्यपदार्थ टाकतात, ज्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांना कोणतेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे आणि संपूर्ण वनक्षेत्रात प्लॅस्टिकचा कचरा न करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

​अलीकडच्या काळात विस्तीर्ण दऱ्या आणि जंगलांचे चित्रीकरण करण्यासाठी पर्यटकांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, ड्रोनच्या आवाजामुळे राखीव क्षेत्रातील वन्यप्राणी आणि दुर्मीळ पक्षी भयभीत होतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन विल्सन पॉइंट परिसरात ड्रोन उडवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम डावलून ड्रोन उडवताना आढळल्यास तो थेट जप्त केला जाईल, असा इशारा वन प्रशासनाने दिला आहे.

Facebook Comments Box

Railway Updates: ‘किसान रेल’ सेवेला अखेर हिरवा कंदील!

 

   Follow us on        

​सांगली:

दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक आणि आशादायी बातमी समोर आली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील फळे, भाजीपाला, फुले व इतर नाशवंत कृषी उत्पादनांना देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद व सुलभ वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिरज-दिल्ली किसान रेल सेवा’ सुरू करण्याच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने अखेर अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या थेट समन्वयातून या किसान रेल्वेचे पुढील नियोजन केले जाणार असून, बाजारपेठ ते शेतकरी असा थेट व्यवहार शक्य होणार आहे.

​अशोक काकडे हे सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने किसान रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रक्रियेत कृषी विभाग, रेल्वे प्रशासन, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), व्यापारी संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी अनेक बैठका घेऊन योग्य समन्वय साधण्यात आला होता.

​ही सेवा मिरज येथूनच सुरू व्हावी, अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती. यामागील मुख्य उद्देश केवळ रेल्वे सेवा सुरू करणे एवढाच नसून, मिरज-सांगली परिसरात नवीन ‘कृषी-लॉजिस्टिक आणि आर्थिक विकास केंद्र’ निर्माण करणे हा आहे. यामुळे भविष्यात वित्तीय संस्थांच्या सहकार्याने शीतगृहे (Cold Storage), पॅक हाउसेस, वेअरहाउसिंग, प्रक्रिया उद्योग, वाहतूक व रोजगाराच्या नव्या संधी या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहेत. या किसान रेलमुळे द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ व इतर कृषी उत्पादने दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होईल. परिणामी, मालाची वाहतुकीतील नासाडी टळेल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल.

Facebook Comments Box

गणेशोत्सवाआधीच चाकरमान्यांना गाठवा लागणार गाव! कारण काय?

   Follow us on        

सिंधुदुर्ग: नुकतीच उन्हाळी सुट्टी संपवून मुंबईला परतलेल्या चाकरमान्यांपैकी ज्यांना आपले नाव गावाकडील मतदार यादीत कायम ठेवायचे आहे, त्यांना यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा गावाची वारी करावी लागण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ३० जूनपासून हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत.

​तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच २००२ नंतर पहिल्यांदाच मतदार यादी संपूर्णपणे स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये आणि यादीतील मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी पूर्णपणे ‘क्लीन’ करणे हा आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती दिली.

​पुढील तीन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात व्यापक प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ९२१ ‘बीएलओ’ कार्यरत असून, त्यांच्यावर देखरेखीसाठी ९३ सुपरवायझर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मॅपिंग करण्याचे काम सध्या जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९२.४२ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

​३० जून ते २९ जुलै २०२६ या एक महिन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात सर्व बीएलओ निवडणूक आयोगाने दिलेले ‘प्रि-प्रिंटेड’ इन्फर्मेशन फॉर्म्स घेऊन प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देतील. मुंबईकर चाकरमान्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी घरात हजर असेल, तरी ती संपूर्ण कुटुंबाची माहिती देऊन फॉर्म भरू शकते. मात्र, जर एखादे घर पूर्णपणे बंद असेल, तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती नोंदवूनच नाव समाविष्ट करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

​हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य पावसाळ्याच्या दिवसांत येत असल्याने प्रशासनासमोर थोडे आव्हान नक्कीच आहे. परंतु, राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविला जात असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओना अचूक माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मांडवी एक्सप्रेसच्या डब्यामधील बंद एसीमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

   Follow us on        

खेड:

कोकण रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा मोठा फटका शनिवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक १०१११ ‘कोकण कन्या एक्सप्रेस’ला बसला. खेड रेल्वे स्थानकावर पहाटे ३:०४ वाजता येणे अपेक्षित असलेली ही गाडी तब्बल आठ तास उशिराने, सकाळी ११:१० वाजता स्थानकात दाखल झाली. यामुळे प्रवाशांना स्थानकावर ताटकळत दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.

​रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २६ जून) मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्याचा परिणाम पुढील गाड्यांच्या वाहतुकीवर झाला. मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड एसी इकॉनॉमी (3E) डब्यातील वातानुकूलन यंत्रणा (AC) खेड स्थानकापासूनच बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. एसी बंद झाल्यामुळे डब्यात घुसमट निर्माण होऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी प्रवाशांचे मोठे हाल झाले.

​दरम्यान, रत्नागिरी रेल्वे स्थानकात मांडवी एक्सप्रेसचे इंजिन बदलण्यात आले आणि सुमारे २५ मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा साखळी परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी, कोकण कन्या एक्सप्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून कोकणात जाणाऱ्या तसेच मुंबईकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Facebook Comments Box

जीव वाचवणारी एअरबॅगच ठरली जीवघेणी; २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मुंबई (मीरा रोड)

​कार खरेदी करताना आपण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. गाडीमध्ये जितक्या जास्त एअरबॅग्ज, तितकी ती अधिक सुरक्षित मानली जाते. मात्र, याच एअरबॅगमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना मुंबईनजीकच्या मीरा रोड परिसरात घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये अचानक एअरबॅगचा जोरदार स्फोट झाला, ज्यामध्ये २५ वर्षीय मोहित सोनी या तरुणाचा मृत्यू झाला.

​नेमकं काय घडलं?

​मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण मोहित सोनी हा रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या एका १५ वर्षे जुन्या होंडा कारमध्ये स्टिअरिंग व्हीलवर हात ठेवून शांतपणे बसला होता. या गाडीला समोरून कोणत्याही वाहनाने धडक दिली नव्हती, किंवा गाडी कोणत्याही झाडाला अथवा खांबाला आदळली नव्हती. कार पूर्णपणे स्थिर उभी होती. मात्र, अचानक कोणत्याही इशाऱ्याशिवाय (Alert) गाडीतील एअरबॅग प्रचंड वेगाने बाहेर आली आणि तिचा स्फोट झाला.

​गंभीर दुखापत आणि मृत्यू

​एअरबॅग उघडताना तिचे कव्हर इतक्या वेगाने आणि तीव्रतेने बाहेर आले की, त्याचा थेट फटका मोहितच्या मानेच्या डाव्या बाजूला बसला. हा आघात इतका भीषण होता की मोहित गंभीररीत्या जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु अतिरक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, कारला कोणताही अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

​उभ्या गाडीत एअरबॅग का फुटली?

​सामान्यतः कारची समोरासमोर टक्कर झाल्यास किंवा मोठा अपघात झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग ट्रिगर होते. मात्र, या प्रकरणात कार सुमारे १० ते १५ वर्षे जुनी होती. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जुन्या गाड्यांमध्ये खालील कारणांमुळे अशा दुर्घटना घडू शकतात:

​इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट किंवा सेन्सर बिघाड: गाडी जुनी झाल्यामुळे किंवा सेन्सर खराब झाल्यामुळे एअरबॅग सिस्टीम चुकीचा सिग्नल पाठवू शकते.

​गंज चढणे (Rusting): कारमध्ये पाणी शिरल्यामुळे किंवा दमट वातावरणामुळे अंतर्गत भागांना गंज चढतो, ज्यामुळे सिस्टीम अचानक ट्रिगर होऊ शकते.

​प्लास्टिक कव्हर कडक होणे: एअरबॅग बाहेर येण्याचा वेग ताशी ३०० किमी इतका प्रचंड असतो. जेव्हा स्टिअरिंगचे प्लास्टिक कव्हर जुने आणि कडक होते, तेव्हा ते एखाद्या धारदार शस्त्रासारखे काम करते आणि गंभीर इजा पोहचवू शकते.

​कार चालकांनी कोणती काळजी घ्यावी?

​अशा संभाव्य आणि जीवघेण्या दुर्घटना टाळण्यासाठी वाहनधारकांनी खालील गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे:

​एअरबॅग वॉर्निंग लाईट: कारच्या डॅशबोर्डवर ‘Airbag Warning Light’ सतत सुरू दिसत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तात्काळ मेकॅनिककडून त्याची तपासणी करून घ्या.

​जुन्या गाड्यांची तपासणी: जर तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करत असाल किंवा १० ते १५ वर्षे जुनी गाडी वापरत असाल, तर तिची एअरबॅग सिस्टीम आणि सेन्सर्स सुस्थितीत आहेत का, याची तज्ज्ञांकडून खात्री करून घ्या. कारण सुरक्षेची ही यंत्रणा देखील कालबाह्य (Expire) होऊ शकते.

​बसण्याचे अंतर: गाडी चालवताना किंवा बसताना स्टिअरिंग व्हीलपासून स्वतःमध्ये कमीत कमी १० इंचाचे अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून एअरबॅग अचानक उघडली तरी थेट शरीराला गंभीर दुखापत होणार नाही.

Facebook Comments Box

Mumbai Local Updates: मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल फेर्‍यांमध्ये सोमवार पासून वाढ.

   Follow us on        

मुंबई:

मुंबईतील वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने सोमवार, २९ जून २०२६ पासून आपल्या मुख्य मार्गावर (Main Line) आणखी १२ नवीन एसी लोकल (AC Local) फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन फेऱ्या सध्या सुरू असलेल्या १२ नॉन-एसी लोकल सेवांच्या जागी चालवल्या जाणार आहेत.

​या बदलामुळे मध्य रेल्वेवरील एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता १२० वर पोहोचणार आहे.

​महत्वाचे बदल

​एकूण फेऱ्यांमध्ये वाढ: मुख्य मार्गावरील (Main Line) साप्ताहिक (सोमवार ते शुक्रवार) एसी फेऱ्यांची संख्या ८० वरून आता ९२ होईल. हार्बर मार्गावरील २८ फेऱ्या पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. त्यामुळे एकूण एसी सेवा १२० होतील.

​कधी धावणार?: या एसी लोकल सेवा सोमवार ते शनिवार या कालावधीत एसी रेकने धावतील. रविवार आणि जाहीर सुट्ट्यांच्या दिवशी मात्र या सेवा नेहमीच्या नॉन-एसी रेकने चालवल्या जातील.

​एकूण लोकल फेऱ्या: एसी फेऱ्या वाढल्या तरी मुंबई विभागातील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या (सर्व मार्ग मिळून) १८२० इतकीच मर्यादित राहील.

​नवीन एसी लोकलचे वेळापत्रक (मुख्य स्थानके):

​अप दिशा (CSMT कडे जाणाऱ्या फेऱ्या):

​टिटवाळा ते CSMT: सकाळी ०६:४६ वा. (मॉर्निंग पीक अवर)

​घाटकोपर ते CSMT: सकाळी ०९:१६ वा. (मॉर्निंग पीक अवर)

​कुर्ला ते CSMT: दुपारी ०४:३४ वा. आणि रात्री १०:२२ वा.

​ठाणे ते CSMT: संध्याकाळी ०६:१६ वा.

​कल्याण ते कुर्ला: रात्री ०९:०४ वा.

​डाऊन दिशा (CSMT वरून सुटणाऱ्या फेऱ्या):

​ठाणे ते टिटवाळा: पहाटे ०५:३५ वा.

​CSMT ते घाटकोपर: सकाळी ०८:३७ वा.

​CSMT ते कुर्ला: सकाळी १०:०० वा.

​CSMT ते ठाणे: संध्याकाळी ०५:१२ वा. आणि रात्री ११:०० वा.

​CSMT ते कल्याण: संध्याकाळी ०७:१८ वा. (इव्हनिंग पीक अवर)

​प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला ३ वर्षे पूर्ण 

   Follow us on        

मुंबई : कोंकण रेल्वेने आज मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २२२२९/२२२३०) च्या ३ वर्षांच्या यशस्वी सेवेचा उत्सव साजरा केला. २७ जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात आलेल्या या ट्रेनने कोंकण मार्गावरील रेल्वे प्रवासात आमूलाग्र बदल घडवला आहे.

मुंबई ते गोव्याच्या मडगाव दरम्यान धावणारी ही ट्रेन भारतातील १९वी वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि कोंकण रेल्वेवरील पहिली वंदे भारत सेवा आहे. सुमारे ७६५ किलोमीटर अंतर कापणारी ही ट्रेन सध्या आठ डब्यांची (मिनी वंदे भारत) आहे. गैर-मान्सून काळात ती सुमारे ७ ते ८ तासांत प्रवास पूर्ण करते, तर मान्सूनमध्ये वेळ जास्त लागतो. ट्रेनचा सरासरी वेग ७०-७५ किमी/तास आहे. ही ट्रेन आठवड्यात सहा दिवस धावते. तर पावसाळी वेळापत्रकात ही गाडी आठवड्यात तीन दिवस चालविण्यात येते.

प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा, उच्च सुरक्षा, आरामदायक सीटिंग, वायफाय, खाद्यपदार्थ आणि वेगवान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या या ट्रेनला कोकणात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कोंकण रेल्वेच्या मते, या ट्रेनने प्रवासाला गती, सुरक्षा, आराम आणि आधुनिक अनुभव दिला आहे.

कोंकण रेल्वेने या निमित्ताने सर्व प्रवाशांचे आभार व्यक्त केले असून, भविष्यात अधिक चांगल्या आणि विस्तारित सेवेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. ही सेवा ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आली असून, कोंकणातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देणारी ठरली आहे.

 

Facebook Comments Box

शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी सवलतीच्या दरात एसटी बस मिळणार

   Follow us on        

​मुंबई:

शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी आता सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात व्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. तसेच, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

​अनेकदा शेतकरी कुटुंब लग्न किंवा इतर शुभकार्यासाठी ट्रक, डंपर किंवा इतर अवैध वाहनांचा वापर करतात, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाकडे नवीन बसचा ताफा दाखल झाल्यानंतर, शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असल्यास आणि त्यांनी एसटीकडे मागणी केल्यास, एसटी महामंडळ त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

​राज्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, मेट्रो, एसटी आणि बेस्ट यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवर ताण वाढला असून, याचा गैरफायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. काही मार्गांवर सध्या प्रत्येक तासाला, तर पुढील दोन-तीन महिन्यांत दर अर्ध्या तासाने एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Facebook Comments Box

पासपोर्ट नियमांत बदल: प्रलंबित अर्जदारांना आता अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही

   Follow us on        

मुंबई:

मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (RPO) पासपोर्ट आणि पीसीसी (पॉलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट) अर्जदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पासपोर्ट कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ज्या नागरिकांचे पासपोर्ट किंवा पीसीसी अर्ज जमा केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित आहेत, त्यांना आता कार्यालयात थेट प्रवेश दिला जाणार आहे. या विशेष सुविधेमुळे अर्जदारांना कार्यालयात जाण्यासाठी आधी कोणतीही ऑनलाईन अपॉइंटमेंट (वेळ) घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

​ही नवीन नियमावली आगामी २ जुलै २०२६ पासून लागू करण्यात येत आहे. या अंतर्गत पात्र अर्जदार वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), वांद्रे (पूर्व) येथील ‘विदेश भवन’ स्थित प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात थेट भेट देऊ शकतात. ही सुविधा बुधवार वगळता आठवड्यातील सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९:०० ते ११:०० या मर्यादित वेळेत उपलब्ध असेल. महत्त्वाचे म्हणजे, ज्या अर्जदारांनी आधीच नंतरच्या तारखेची ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केली आहे, परंतु त्यांचे अर्ज ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ रखडले आहेत, ते देखील या वॉक-इन सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

​४५ दिवसांच्या अटीव्यतिरिक्त, विशिष्ट श्रेणीतील इतर काही अर्जदारांनाही अर्जाच्या तारखेचा विचार न करता थेट वॉक-इन प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट (Diplomatic & Official passport) अर्जदार, तसेच पत्ता न सापडल्याने किंवा इतर कारणांमुळे परत आलेल्या (Undelivered) पासपोर्ट किंवा पीसीसीच्या पुनर्रचना (Redispatch) प्रक्रियेसाठीचे अर्जदार थेट कार्यालयात येऊ शकतात.

​यासोबतच, परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर आपला भारतीय पासपोर्ट जमा (Surrender) करू इच्छिणारे नागरिक आणि आपला प्रलंबित पासपोर्ट अर्ज कायमचा बंद (Closure) करण्याची विनंती करणारे अर्जदार यांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. मुंबई पासपोर्ट कार्यालयाच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे विविध कारणांमुळे रखडलेल्या अर्जांचा निपटारा वेगाने होईल आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रासापासून मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम; निष्काळजीपणा केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

सिंधुदूर्गनगरी:

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मतदार यादी अधिक अचूक, अद्यावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आता थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराने आवश्यक माहिती देऊन शुद्धीकरण अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. जर मतदाराने हा अर्ज भरला नाही, तर त्याचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळी देखील उपस्थित होते. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार यादीतील मयत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी तसेच अन्य त्रुटी दूर करून मतदार यादी अधिक विश्वासार्य बनविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ६ लाख ८८ हजार १४ मतदार नोंदणीकृत असून, त्यामध्ये ३ लाख ४० हजार ४५० पुरुष आणि ३ लाख ४७ हजार ५६४ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच मतदार नोंदणीच्या मॅपिंगचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

​या मोहिमेच्या नियोजनानुसार, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत आणि शुद्धीकरण अर्ज भरून घेऊन मतदारांची स्वाक्षरी घेतील. मतदार घरी नसल्यास कुटुंबातील प्रमुख व्यक्तीकडून आवश्यक माहिती घेऊन अर्ज भरला जाईल. जर मतदार घरी आढळला नाही, तर बीएलओ संबंधित पत्त्यावर तब्बल तीन वेळा भेट देतील. तरीही आवश्यक माहिती अथवा अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित मतदाराचे नाव यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नाव वगळले गेले तरी नियमानुसार पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध राहणार असली, तरी त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने नागरिकांनी वेळेत अर्ज भरून द्यावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर ५ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर प्राप्त होणारे दावे व हरकतींची सुनावणी करून शेवटी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘अंतिम मतदार यादी’ प्रकाशित केली जाणार आहे.

​विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

​२० ते २९ जून: कर्मचारी प्रशिक्षण व पूर्वतयारी

​३० जून ते २९ जुलै: बीएलओंच्या घरोघरी भेटी व अर्ज संकलन

​२९ जुलैपर्यंत: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

​५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर: दावे व हरकती दाखल करणे

​५ सप्टेंबर: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे

​७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search