सावंतवाडी: सोनू उर्फ अमित निवजेकर तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परिसरातील गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोंदा येथील रहिवासी सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१) याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध अनेक नॉन-कॉग्निजेबल (NC) तक्रारींचीही नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कडक कारवाई केली आहे.

​या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर, दोन पोलीस अंमलदारांच्या कडक देखरेखीखाली त्याला गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. गोव्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याला हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी पूर्ण करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षे त्याला या तीन जिल्ह्यांत प्रवेश करण्यास बंदी असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

मुंबई उपनगरीय लोकल गाड्या जमिनीखालून धावणार! भुयारी मार्गांची चाचपणी सुरू

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये आता क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वेने (CR) शहरातील सर्वात व्यस्त अशा चर्चगेट-विरार आणि सीएसएमटी-कल्याण या दोन मार्गांवर भुयारी रेल्वे कॉरिडॉर उभारण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास (Feasibility Study) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी मागितली असून, मध्य रेल्वेदेखील लवकरच या प्रक्रियेत सामील होणार आहे.

जमिनीवरील विस्ताराच्या मर्यादा

रेल्वे प्रशासनानुसार, सध्याच्या रेल्वे मार्गांच्या बाजूला जमिनीवर नवीन मार्गिका (Tracks) तयार करणे आता जवळपास अशक्य झाले आहे. प्रचंड वाढलेले भूसंपादन खर्च, दाट नागरी वस्ती आणि कायदेशीर वाद यामुळे जमिनीवरील विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी आणि रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी ‘अंडरग्राउंड’ मार्ग हाच एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गर्दीतून सुटका आणि वेगवान प्रवास

मुंबईतील स्थानिक गाड्यांमध्ये सध्या ‘सुपर डेन्स क्रश लोड’ची स्थिती आहे, जिथे एका चौरस मीटरमध्ये सुमारे १६ प्रवासी प्रवास करतात. प्रस्तावित भुयारी मार्गांमुळे उपनगरीय रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईल, ज्यामुळे गाड्यांची वारंवारता वाढेल. हे मार्ग पूर्णपणे वातानुकूलित असतील आणि यामुळे तांत्रिक बिघाड किंवा रुळांवरील अतिक्रमणांमुळे होणारा विलंब टाळता येईल, परिणामी प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वक्तशीर होईल.

मेट्रोच्या यशातून प्रेरणा

मुंबईत ‘अ‍ॅक्वा लाईन’ सारख्या मेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी भुयारी कामाने रेल्वे प्रशासनाचा आत्मविश्वास वाढवला आहे. दाट वस्ती असलेल्या भागातही प्रगत इंजिनीअरिंगच्या सहाय्याने बोगदे तयार करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. लंडन आणि टोकियो यांसारख्या शहरांच्या धर्तीवर मुंबईतही बहुस्तरीय रेल्वे जाळे उभारण्याचे स्वप्न आता या अभ्यासातून साकार होण्याची चिन्हे आहेत.

भविष्यातील आव्हाने आणि गुंतवणूक

भुयारी रेल्वे प्रकल्प हे अत्यंत खर्चिक असतात. मुंबईत जमिनीखालील मेट्रो मार्गिकेचा खर्च साधारण १,१०० कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे, जो जमिनीवरील मार्गापेक्षा ३-४ पटीने अधिक आहे. एमआरव्हीसी (MRVC) सध्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या ५ किमीच्या भुयारी मार्गाचा अभ्यास करत आहे. या सर्व अभ्यासांचे निष्कर्ष आल्यानंतरच रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार या प्रकल्पांच्या आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यतेवर अंतिम शिक्कामोर्तब करतील.

Facebook Comments Box

ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा ‘मुहूर्त’ हुकला; १ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा

   Follow us on        

ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असतानाच, प्रशासनाच्या संथ कार्यपद्धतीमुळे आता संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित बांधकामांवर हातोडा पडत नसल्याने, “सरकारी बाबू नेमके कोणावर मेहरबान आहेत?” असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या दिरंगाईच्या निषेधार्थ आता थेट १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या काजुवाडी, दत्त मंदिर परिसर आणि नाचरे चाळ येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाढीव बांधकामे झाली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने ७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित व्यक्ती, श्री. महेश रमेश बागवे यांना नोटीस बजावली होती. २४ तासांच्या आत हे बांधकाम स्वतःहून हटवावे, अन्यथा महापालिका कारवाई करेल असे त्यात स्पष्ट नमूद होते. मात्र, या नोटिशीला दोन आठवडे उलटूनही पालिकेचा एकही कर्मचारी कारवाईसाठी फिरकला नसल्याने ही नोटीस केवळ कागदी घोडा ठरली आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

​मंत्रालयाचे आदेशही धाब्यावर?

विशेष म्हणजे, या अनधिकृत बांधकामाविरोधात केवळ पालिकेतच नव्हे, तर थेट मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात आली होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले होते. १६ मार्च २०२४ पासून यासंदर्भात लेखी पाठपुरावा सुरू असूनही, वरिष्ठ स्तरावरील आदेशांना स्थानिक प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

​१ मे पासून बेमुदत उपोषण

प्रशासकीय दिरंगाई आणि अनधिकृत बांधकामांना मिळणारे कथित अभय यांविरोधात तक्रारदार श्री. सुरेश जिमन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर ते बेमुदत शांततापूर्ण उपोषणाला बसणार आहेत.

​पालिकेत धाकधूक वाढली

या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाची डोकेदुखी वाढली आहे. उपोषणादरम्यान जर उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात ठणकावून सांगण्यात आले आहे. आता १ मे पूर्वी महापालिका प्रशासन आपली ‘मेहरबानी’ सोडून कारवाई करणार की उपोषणाची नामुष्की ओढवून घेणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

​ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल मधून पडल्याने देवगडच्या तरुणाचा मृत्यू

   Follow us on        

दिवा: काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या आपल्या काकांच्या दिवसकार्यासाठी जात असताना देवगड तालुक्यातील रामेश्वर कोलवाडी येथील ३० वर्षीय तेजस उदय पवार याचा ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल मधून पडल्याने मृत्यू झाला.

​तेजस हा आपल्या पत्नीसह गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला रेल्वेत महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरीत्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून रेल्वे सुटत असताना अचानक डब्यात गर्दी वाढली. या गर्दीत त्याला धक्का लागला आणि तो धावत्या लोकल मधून बाहेर फेकला गेला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

​प्राप्त माहितीनुसार, तेजस हा मुंबई येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले असून तो सध्या पत्नीसोबत राहण्यासाठी मुंबईतील रहिवासी होता.

​तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता आणि त्याचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच रामेश्वरसह गीर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.

​तेजस हा देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सल्लागार उदय पवार यांचा मुलगा होता.

Facebook Comments Box

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; वाहनांना धडक देऊन ट्रक विहिरीत कोसळला

   Follow us on        

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात आज पहाटे एक भीषण अपघात घडला. स्टीलने भरलेल्या एका भरधाव मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने त्याने महामार्गावरील चार वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर हा ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक ट्रकखालीच दबला गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अद्याप त्याच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या अपघातात इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने इतर कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या परिसरात वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

४८ तासांत ७ भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथे ‘मृत्यूचा सापळा’

   Follow us on        

संगमेश्वर:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील ‘ड्राईव्ह-इन’ हॉटेलसमोरील रस्ता सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या अवघ्या ४८ तासांत या ठिकाणी सहा ते सात भीषण अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महामार्गावर करण्यात आलेल्या डायव्हर्शनच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने हे अपघात होत असल्याचे समोर आले असून, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​या ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आले असले तरी, तिथे आवश्यक मार्गदर्शन फलक किंवा रात्रीच्या वेळी दिसतील असे रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, योग्य बॅरिकेड्स लावण्याऐवजी रस्त्यावर थेट मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना हे अडथळे वेळेत दिसत नाहीत, त्यामुळे वाहने थेट मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून अपघात होत आहेत.

​गुरुवारी रात्री पुण्यातील एका प्रवाशाची कार अशाच प्रकारे मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली, ज्यामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एअरबॅग उघडल्याने मोठी जीवितहानी टळली. याच दरम्यान दोन दुचाकीस्वारही जखमी झाले. या घटनांनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. परिणामी, शुक्रवारी रात्री पुन्हा अपघातांची मालिका सुरूच राहिली. यामध्ये एक इनोव्हा कार, रुग्णवाहिका आणि दोन-तीन दुचाकी या सापळ्यात अडकल्या. आरवली ते कांते दरम्यान सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Facebook Comments Box

रुळांवर मानवनिर्मित अडथळ्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच’ मोहीम सुरू

   Follow us on        

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागात रेल्वे रुळांवर लोखंडी सामान, लाकूड किंवा दगड ठेवणे आणि धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. खेळण्याच्या उत्सुकतेपोटी किंवा कुतूहलामुळे हे प्रकार होत असल्याचे आरपीएफच्या तपासात समोर आले आहे. यामुळे मोठ्या रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होत असून, प्रवाशांच्या जीवितास आणि रेल्वे मालमत्तेला मोठे नुकसान होऊ शकते.

रुळाजवळील शाळा, गावे आणि वस्त्यांतील मुलांमध्ये हे प्रकार अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, ज्यांना याची गंभीरता कळत नाही.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे आरपीएफ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. तपासणीतून उघडकीस आले की, बहुतेक घटनांमागे स्थानिक मुलांचा सहभाग असतो आणि त्यांना रेल्वे रुळांवर खेळणे किंवा दगड फेकण्याचे परिणाम समजत नाहीत. यामुळे आरपीएफने विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या मोहिमेत आरपीएफचे अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभाग घेत आहेत.‘कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच’ या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील आरपीएफ निरीक्षक आणि प्रभारी अधिकारी रेल्वे रुळांलगतच्या शाळा, गावे आणि वस्त्यांमध्ये नियमित भेटी देत आहेत. विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, पालकांशी आणि ग्रामप्रमुखांशी थेट संवाद साधून रेल्वे रुळांवर खेळणे, दगड ठेवणे किंवा फेकण्याच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. यातून मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित रेल्वे वातावरणाची महत्त्वता समजावून सांगितली जाते.

या जनजागृती मोहिमेमुळे रेल्वे सुरक्षा वाढवणे आणि अपघात टाळणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. आरपीएफने यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलांना सावध केले आहे, परंतु सध्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबत प्रशिक्षण देऊन जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Facebook Comments Box

उन्हाळा-पावसाळ्यात अखंड वीजपुरवठ्यासाठी एआयवर भर

   Follow us on        

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली.

उन्हाळा व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीचे व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करून कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

रूफटॉप सौर ऊर्जेमुळे वीज वितरण यंत्रणेला फायदा होत असून, वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धता आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. यासह आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळेस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: दिनांक १८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसीलदार दीक्षात देशपांडे, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.

 

कारवाईदरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला. आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ला पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.*

रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत, अगदी ३ वाजेपर्यंत कारवाई सुरू राहिली. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित तहसीलदार आणि त्यांच्या पथकांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वी करून दाखवली. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अशा प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

Facebook Comments Box

राज्यात २०-२२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता

   Follow us on        

मुंबई: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search