खासदार अरविंद सावंत यांचा लोकसभेत प्रश्न
Follow us onनवी दिल्ली: मध्य रेल्वेच्या धोरणांवर पक्षपातीपणाचे आरोप करत महाराष्ट्रातील, विशेषतः कोकण आणि मराठी जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष गाड्यांच्या घोषणेमध्ये बिहारसाठी ४५०, उत्तर प्रदेशसाठी ३३२ गाड्या देण्यात आल्या असताना कोकणाच्या वाट्याला केवळ ३६ गाड्या आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच दादर-रत्नागिरी ही महत्त्वाची गाडी बंद केल्याने कोकणवासीयांमध्ये असंतोष अधिक वाढला आहे. आधीच हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून नाराजी असताना, आता गाड्यांच्या वाटपातही भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेतील शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. सीएसएमटी-गोरखपूर ही गाडी दररोज धावत असताना सीएसएमटी-मडगाव गाडी आठवड्यातून केवळ एकदाच का चालवली जाते, असा सवाल त्यांनी केला. तसेच कोकणातील दादर-रत्नागिरी गाडी बंद करण्यामागील कारण काय, पुणे-नांदेड आणि नांदेड-हडपसर यांसारख्या गाड्यांची क्षमता का कमी करण्यात आली, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. कोकण रेल्वेसाठी लढा देणाऱ्या कोकणवासीयांवरच अन्याय का केला जात आहे, असा सवालही त्यांनी सरकारला विचारला. “मध्य रेल्वे ही खरोखर ‘मध्य रेल्वे’ आहे की ‘उत्तर भारतीय रेल्वे’?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. दादर-रत्नागिरी गाडी तात्काळ पुन्हा सुरू करावी, कोकणासाठी गाड्यांची संख्या वाढवावी आणि हडपसर येथे मर्यादित केलेल्या गाड्या पुन्हा पूर्ण क्षमतेने चालवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











