वेंगुर्ले येथील निबंधक कार्यालयात शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था, इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड (ताज) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्यादरम्यान अंतिम त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या होऊन नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ताज हॉटेल प्रकल्पाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या कराराच्या नोंदणीमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून, सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला एक नवी दिशा मिळणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव मंगेश डोंगरे यांनी दिली.
या ऐतिहासिक क्षणी सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संस्थेचे अध्यक्ष शरद उर्फ नंदू कांबळी, संचालक जगन्नाथ डोंगरे, लक्ष्मीकांत उर्फ विनू नाईक, संतान पावलो सोझ, सल्लागार तज्ज्ञ संचालक जनार्दन पडवळ, एमटीडीसीचे जिल्हास्तरीय अधिकारी दीपक माने तसेच ताज कंपनीच्या (इंडियन हॉटेल कंपनी लि.) प्रतिनिधी संवीओ डीमेलो व सिंथीयाल नरोना हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या कराराचे स्वागत करत प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी आनंद व्यक्त केला.
प्रकल्पाची अधिकृत नोंदणी पूर्ण झाल्यामुळे संबंधित शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा मार्ग सुकर झाला आहे. कंपनी प्रशासनाने आगामी गणेशोत्सव सणापूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या हाती सोपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी लागणारे कायदेशीर कागदपत्रे, बॉण्ड्स आणि आजारी असलेल्या शेतकऱ्यांची प्राधिकृत पत्रे (ऑथॉरिटी) गोळा करण्याचे काम वेगाने सुरु आहे. ही सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करून बाधितांना गणपतीपूर्वीच दिलासा देण्याचा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या भव्य प्रकल्पाला प्रत्यक्ष आकार मिळण्यासाठी आणि त्रिपक्षीय कराराची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी या विषयात सुरुवातीपासूनच विशेष लक्ष घालून सहकार्य केले. या राजकीय आणि प्रशासकीय पाठिंब्यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर मार्गी लागला असल्याचे सांगत संस्थेच्या वतीने सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
विशेषतः पालकमंत्री नितेश राणे यांनी हा त्रिपक्षीय करार यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे सिंधूदुर्ग जिल्ह्यात रोजगाराचे मोठे दालन खुले होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले जात आहे. ताज समूहाचा हा भव्य हॉटेल प्रकल्प लवकरच सुरु होऊन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देईल, असा ठाम विश्वास शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्थेने व्यक्त केला आहे.











