रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात; रिक्षाचालकांचा दुर्दैवी मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

   Follow us on        

संगमेश्वर: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, सोमवारी सायंकाळी नाणीज येथील जुन्या मठाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास दाभोळे परिसरातून रत्नागिरीच्या दिशेने रिक्ष (एमएच-०८ एक्यू ८८६६) जात होती. याच वेळी समोरून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाने अचानक ब्रेक लावले. मागून भरधाव वेगाने येणारी रिक्षा या ट्रॅक्टरवर थेट जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षेचा चक्काचूर झाला आणि चालक प्रकाश कांबळे यांचा जागीच प्राण गेला.

​या भीषण अपघातात रिक्षेतील दोन महिला प्रवासी देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महामार्गाच्या कामामुळे आणि वाहनांच्या वेगामुळे झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

Mumbai Rail Connectivity: महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशाला झुकते माप; गाड्यांच्या संख्येत विरोधाभास

   Follow us on        

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातून विविध राज्यांत जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आकडेवारीवरून एक रंजक आणि तितकाच विरोधाभासी निष्कर्ष समोर आला आहे. रेल्वे अभ्यासक एन.एस. आदित्य यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या मुख्य स्थानकांवरून (पनवेल वगळून) इतर राज्यांशी थेट जोडणाऱ्या एकूण २१३ जोडी गाड्या धावतात. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, ज्या राज्यात मुंबई वसलेली आहे त्या महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशासाठी सर्वाधिक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. उत्तर प्रदेशासाठी ३२ जोडी गाड्या धावत असून, त्याखालोखाल महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी ३१ जोडी गाड्यांची सोय आहे. ही तफावत मुंबईच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमधील एक मोठा विरोधाभास अधोरेखित करते.

उत्तर प्रदेशपाठोपाठ गुजरातसाठी २८, राजस्थानसाठी १९ आणि बिहारसाठी १५ जोडी गाड्यांची सेवा उपलब्ध आहे. याउलट, दक्षिण भारताशी मुंबईची थेट जोडणी उत्तर भारताच्या तुलनेत बरीच कमी असल्याचे दिसते. तामिळनाडूसाठी १०, कर्नाटकासाठी ७ तर केरळसाठी अवघ्या ५ जोडी गाड्या धावत आहेत. दिल्ली आणि पश्चिम बंगालसाठी प्रत्येकी ९, गोव्यासाठी ८ आणि उत्तराखंडसाठी ५ जोडी गाड्यांची कनेक्टिव्हिटी आहे. इतर राज्यांचा विचार करता तेलंगणा, पंजाब, ओडिशा आणि झारखंडसाठी प्रत्येकी ४, आंध्र प्रदेश आणि आसामसाठी ३, तर हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसाठी प्रत्येकी २ जोडी गाड्या उपलब्ध आहेत. त्रिपुरा आणि चंदीगढ या भागांसाठी केवळ १ जोडी थेट गाडी धावते.

​मुंबईच्या रेल्वे जाळ्यावर प्रकाश टाकणाऱ्या या विशेष मालिकेतील हा तिसरा भाग असून, यातून रेल्वे प्रशासनाचे प्राधान्यक्रम स्पष्टपणे दिसून येत आहेत. मुंबईतून होणाऱ्या स्थलांतराचा ओघ आणि प्रवाशांची मागणी पाहता उत्तर भारतीय राज्यांसाठी सर्वाधिक गाड्या सोडल्या जातात, मात्र महाराष्ट्रांतर्गत कनेक्टिव्हिटी उत्तर प्रदेशच्या तुलनेत मागे पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे..

मुंबईच्या मुख्य स्थानकांवरून (पनवेल वगळून) विविध राज्यांशी थेट रेल्वे जोड्या (Train Pairs):

उत्तर प्रदेश → ३२

महाराष्ट्र → ३१

गुजरात → २८

राजस्थान → १९

बिहार → १५

तामिळनाडू → १०

दिल्ली → ९

पश्चिम बंगाल → ९

गोवा → ८

कर्नाटक → ७

मध्य प्रदेश → ५

केरळ → ५

उत्तराखंड → ५

तेलंगणा → ४

पंजाब → ४

ओडिशा → ४

झारखंड → ४

आंध्र प्रदेश → ३

आसाम → ३

हरियाणा → २

जम्मू आणि काश्मीर → २

पुदुच्चेरी → २

त्रिपुरा → १

चंदीगढ → १

एकूण: २१३ जोड्या

 

 

 

Facebook Comments Box

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या; नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​अनेक वर्षांपूर्वी जमिनी देऊनही अद्याप अनेक प्रकल्पग्रस्त रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, ही बाब नितेश राणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे प्रशासनाने तातडीने अशा नागरिकांची एक स्वतंत्र यादी तयार करावी आणि त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. केवळ थेट नोकरीच नव्हे, तर रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सचे वाटप आणि अनुकंपा तत्त्वावरील भरतीमध्येही प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना प्राधान्याने संधी मिळावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली असून, यामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Facebook Comments Box

वैभववाडी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि रस्ते काँक्रिटीकरण कधी होणार?


   Follow us on        

वैभववाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात रेल्वे स्टेशन सुशोभीकरण आणि मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक ओंकार लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कार्यालय आणि कोकण रेल्वे प्रशासनाला टॅग करत सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत वैभववाडी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था स्पष्ट दिसत आहे. खड्डे, गाळ, खडी आणि पाण्याचे डबके यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

“आम्ही आयुष्यभर हाच त्रास सहन करायचा का? अशा रस्त्यावरून प्रवास म्हणजे तालुक्यातील लोकांचा अपमान आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

सद्यस्थितीत कोकणातील आंबा महोत्सव आणि शेतकऱ्यांच्या विकासावर चर्चा सुरू असताना, स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांबाबतची ही तक्रार वैभववाडीतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उभे करते. नागरिक आता प्रशासनाकडून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा करत आहेत.

 

 

Facebook Comments Box

धक्कादायक! मुंबई-गोवा महामार्गावर कासरडे येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

   Follow us on        

कणकवली:मुंबई-गोवा महामार्गावरील कासरडे ठिठा येथे शनिवारी (९ मे २०२६) उड्डाणपुलाच्या मधल्या भागातील काँक्रीट स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे पुलाच्या बांधकामातील लोखंडी सळ्या (रॉड) उघड्या पडल्या असून, पुलाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

​विशेष म्हणजे, यापूर्वीही याच पुलाचा स्लॅब दोनदा कोसळल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार प्रमोद जठार यांनी तत्काळ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

​मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच अशा प्रकारे उड्डाणपूल कमकुवत ठरत असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागाची तातडीने दुरुस्ती करावी आणि वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: ‘समर स्पेशल’ गाड्या पनवेल पर्यंतच का?

   Follow us on        

पनवेल:उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान ‘समर स्पेशल’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या फायद्याऐवजी डोकेदुखीचाच अधिक ठरल्याचा आरोप कोकणी चाकरमान्यांकडून केला जात आहे.

गाडी क्रमांक ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल) या गाडीच्या वेळेवरून प्रवाशांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या गाड्यांपासून प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळाला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही गाडी पनवेल स्थानकावरून पहाटे ०५:४५ वाजता सुटणार आहे. प्रवाशांच्या मते मुंबई आणि उपनगरातून इतक्या पहाटे पनवेल स्थानकावर पोहोचणे सामान्य प्रवाशांसाठी जवळपास अशक्य आहे. पहाटेच्या वेळी लोकल सेवांची उपलब्धता कमी असल्याने आणि टॅक्सी किंवा रिक्षाचा प्रवास खर्चिक असल्याने प्रवाशांना अशा गाड्यांचा लाभ घेणे कठीण जात आहे.

“कोकणी चाकरमान्यांना सवयीने पनवेल स्थानकापर्यंत मर्यादित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का?” असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

जर ही विशेष ट्रेन पनवेल ऐवजी दादर किंवा सीएसएमटी (CSMT) पर्यंत नेली असती, तर त्याचा फायदा मुंबईतील मुख्य भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाला असता. तसेच, यामुळे सकाळच्या वेळी सुटणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’मधील प्रचंड गर्दी विभागण्यास मोठी मदत झाली असती. मात्र, गाडी केवळ पनवेलपर्यंतच मर्यादित ठेवल्यामुळे तिचा काहीच फायदा झाला नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

अलीकडे मध्य रेल्वे राज्यांतर्गत प्रवासी सेवेला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

प्रशासनाने अशा ‘स्पेशल’ गाड्यांचे नियोजन करताना प्रवाशांच्या सोयीचा आणि कनेक्टिव्हिटीचा विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

Facebook Comments Box

विनातिकीट प्रवाशांना चाप: मुंबईत आता रात्रीही फिरणार ‘बॅटमॅन’ पथक

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील लोकल गाड्यांमधून रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आता धाबे दणाणले आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरुद्ध एक विशेष मोहीम उघडली असून, आता रात्रीच्या वेळीही ‘टीएसी’ (Ticket Checking) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने हा कठोर पाऊल उचलले आहे.

​या विशेष मोहिमेअंतर्गत रात्री ९ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत चर्चगेट ते विरार दरम्यान लोकल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाणार आहे. यासाठी ‘बॅटमॅन’ (Be Aware TTE Manning At Night) नावाची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके रात्रीच्या शेवटच्या लोकलपासून ते सकाळच्या पहिल्या लोकलपर्यंत डब्यांमध्ये गस्त घालतील. एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने विक्रमी कारवाई करत ३ लाख ६० हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडले होते. या पार्श्वभूमीवर, तिकीट तपासणीची ही प्रक्रिया आता चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी तिकीट तपासणी होत नसल्याचा फायदा घेऊन विशेषतः एसी लोकलमध्येही विनातिकीट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. दिवसा होणारी गर्दी पाहता तिकीट तपासणीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी रात्रीची स्वतंत्र पथके अधिक प्रभावी ठरतील. पश्चिम रेल्वेवर दररोज १४१४ फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात; या प्रवासादरम्यान शिस्त पाळली जावी आणि रेल्वेचा महसूल बुडू नये, यासाठी ही ‘बॅटमॅन’ टीम आता रात्रीच्या अंधारातही सक्रिय राहणार आहे.

Facebook Comments Box

रेल्वेच्या ‘विदेशी पर्यटक कोट्याचा’ गैरवापर; मध्य रेल्वेकडून मोठी कारवाई

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक (FT) कोट्याचा गैरवापर करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसतानाही अनेक प्रवाशांनी या राखीव कोट्यातून प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे. ३१ गाड्यांमधील १७४ पीएनआर (PNR) तपासल्यानंतर रेल्वेने ३९ संशयास्पद बुकिंगवर कारवाई केली असून, सुमारे ३.५६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या प्रकरणामागे एजंटांचे संघटित जाळे असण्याची शक्यता असून रेल्वेने आता त्यादिशेने तपास सुरू केला आहे.

​ही बाब सर्वप्रथम ‘संघमित्रा एक्सप्रेस’मधील नियमित तिकीट तपासणीदरम्यान उघड झाली. विदेशी कोट्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे जेव्हा तपासणी पथकाने कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा अनेक प्रवासी विदेशी पासपोर्ट किंवा वैध व्हिसा दाखवू शकले नाहीत. विदेशी पर्यटकांना रेल्वे प्रवासात प्राधान्य मिळावे यासाठी हा विशेष कोटा असतो, मात्र त्याचा वापर भारतीय प्रवाशांना कन्फर्म सीट मिळवून देण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.

​या प्रकारानंतर रेल्वेने २४ एप्रिल ते ११ जून या कालावधीतील सर्व संशयास्पद बुकिंगची बारकाईने तपासणी केली. ज्या प्रवाशांकडे वैध कागदपत्रे नव्हती, त्यांना बर्थवरून उतरवण्यात आले आणि त्या जागा आरएसी (RAC) तसेच वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना देण्यात आल्या. या संपूर्ण गैरप्रकारात आयआरसीटीसी (IRCTC) कडून तांत्रिक माहिती मागवण्यात आली असून, अधिकृत एजंट किंवा मध्यस्थांचा यामध्ये सहभाग आहे का, याचा शोध रेल्वे सुरक्षा दल आणि वाणिज्य विभाग घेत आहे. आगामी काळात अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबवून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत

Facebook Comments Box

सातबारा उतारा बंद होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने जमिनीच्या नोंदींबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या गावांचा समावेश नव्याने नगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या हद्दीत झाला आहे, त्या भागांतील जमिनींसाठी आता ‘सातबारा उतारा’ (7/12 Extract) बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी, संबंधित जमिनींच्या मालकी हक्कासाठी आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ (Property Card) म्हणजेच ‘मालमत्ता पत्रक’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून, लवकरच याचे अधिकृत आदेश जारी केले जाणार आहेत.

​ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणाऱ्या गावांचे स्वरूप पूर्णपणे बदलते. शेती जमिनीचा वापर हळूहळू निवासी, व्यावसायिक किंवा नागरी कारणांसाठी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, शहरी मालमत्ता व्यवस्थापनासाठी सातबारा उताऱ्यापेक्षा प्रॉपर्टी कार्ड हे अधिक कायदेशीर आणि सोयीचे मानले जाते. या निर्णयामुळे जमीन नोंदींमधील गुंतागुंत कमी होऊन कामकाजात सुसूत्रता आणि स्पष्टता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भविष्यातील जमिनींचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

​या नवीन प्रणालीचा शेतकऱ्यांना आणि शहरी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रॉपर्टी कार्ड लागू झाल्यामुळे मालमत्तेचे हस्तांतरण करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होईल. तसेच, बँकांकडून कर्ज घेताना कागदपत्रांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक आणि सुसंगत पद्धतीने ठेवल्या जाणार असल्याने, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाला या निर्णयामुळे अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती; २४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

   Follow us on        

नवी मुंबई: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध विभागांमधील ज्युनिअर स्केल एक्झिक्युटिव्ह (गट-ब) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे सिव्हिल इंजिनीअरिंग, मेडिकल, आयटी, आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन यांसारख्या विभागांत पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:
भरती प्रक्रियेत खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:

असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल)- १ जागा. पात्रता: किमान ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि २०२३, २०२४ किंवा २०२५ चा वैध GATE स्कोअर आवश्यक.

असिस्टंट मेडिकल ऑफिसर: ३ जागा. पात्रता: MBBS पदवी आणि राज्य वैद्यकीय परिषदेची नोंदणी.

 

असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर (ऑपरेटिंग आणि कमर्शियल): ४ जागा. पात्रता: पदवी आणि किमान ६०% गुणांसह MBA/MMS. उमेदवाराकडे २०२३ नंतरचा किमान ८० पर्सेंटाईल असलेला CAT स्कोअर असणे आवश्यक आहे.

 

इतर पदे: यामध्ये असिस्टंट मॅनेजर (IT), असिस्टंट मेकॅनिकल इंजिनीअर, असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनीअर, असिस्टंट सिग्नल आणि टेलिकॉम इंजिनीअर, असिस्टंट फायनान्शिअल ॲडव्हायझर, असिस्टंट पर्सनल ऑफिसर आणि असिस्टंट डेप्युटी जनरल मॅनेजर या पदांचा समावेश आहे

इतर अटी

  • उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • SC उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि OBC-NCL उमेदवारांसाठी ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
  • कोकण रेल्वेच्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादेत ४५ वर्षांपर्यंत (प्रवर्गानुसार अधिक) सवलत आहे.

निवड प्रक्रिया

AMO आणि AFA पदांसाठी:: लेखी परीक्षा (७०% वेटेज), सादरीकरण (१०%) आणि वैयक्तिक मुलाखत (२०%).
इतर पदांसाठी: GATE किंवा CAT स्कोअरला ५०% वेटेज दिले जाईल, तर सादरीकरण आणि मुलाखतीला प्रत्येकी २५% वेटेज असेल.
उमेदवारांना सादरीकरण आणि मुलाखतीत किमान ६०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ मे २०२६, संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत.

अर्ज पद्धती: उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज (Annexure-A) सर्व आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने पाठवायचा आहे.

अर्ज जमा करण्याचा पत्ता: सिनियर पर्सनल ऑफिसर/भरती आणि स्थापना, ४ था मजला, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूर भवन, प्लॉट नं. ६, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.

अर्ज शुल्क: ५९० रुपये (GST सह). SC, ST, महिला आणि अल्पसंख्याक उमेदवारांना प्रक्रियेनंतर ५०० रुपये शुल्क परत केले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी कोकण रेल्वेच्या **www.konkanrailway.com** या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1Ik6Ckdp_ylzK5KCK2J1VzVhUxKdy0Hkl/view?usp=drive_link

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search