शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळ पावमध्ये आढळले झुरळ; FDA कडून उपहारगृह सील.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उपहारगृहातील मिसळ पावमध्ये मृत झुरळ आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने धाड टाकून तपासणी केली आणि संबंधित उपहारगृह सील केले.

विशेष म्हणजे, या उपहारगृहाचा करार तब्बल दोन वर्षांपूर्वीच संपला असूनही ते विनापरवाना सुरू असल्याचा गंभीर प्रकार तपासात समोर आला आहे.

सिंधुदुर्ग:

​रुग्णांच्या आरोग्याची आणि उपचारांची काळजी घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातील उपहारगृहात अन्नसुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाने मागवलेल्या मिसळ पावमध्ये मृत झुरळ मिळाल्यानंतर, याप्रकरणी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​या गंभीर घटनेची दखल घेत संतप्त नागरिकाने थेट अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी (२८ ऑगस्ट) संबंधित उपहारगृहाची अचानक पाहणी आणि झाडाझरती घेतली.

​तपासणीदरम्यान उपहारगृहातील अस्वच्छता पाहून अधिकारीही चक्रावले. अन्नपदार्थ आणि साहित्यामध्ये झुरळांचा वावर आढळला, तर साखरेच्या गोदामात मुंग्या फिरत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही स्वच्छता किंवा कीटक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था तेथे नव्हती, तसेच काम करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्‍याचेही तपासात स्पष्ट झाले.

​या कारवाईदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली ती म्हणजे, या उपहारगृहाचा अधिकृत करार तब्बल दोन वर्षांपूर्वीच संपुष्टात आला होता. असे असतानाही सुनील जाधव आणि पराग नलावडे यांच्या माध्यमातून हे उपहारगृह बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली, ज्यामुळे मुदत संपल्यानंतरही ते कसे सुरू होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

​अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उपहारगृहातून विविध अन्नपदार्थांचे आणि साहित्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवालात ते दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व आणखी कठोर कारवाई केली जाणार असून, त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुधारणा होईपर्यंत उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

Facebook Comments Box

सुभाष चंद्रा दिवाळखोरी प्रकरणात ९९% ‘हेअरकट’? विरोधात मानवता विकास परिषद आक्रमक; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

   Follow us on        

रत्नागिरी: देशातील बँकिंग व्यवस्था, कर्जवसुलीची विश्वासार्हता आणि सामान्य ठेवीदारांच्या हितासंदर्भात एका अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्यावर मानवता विकास परिषद तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर निवेदन पाठवले आहे. सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक इन्व्हॉल्व्हन्सी (Insolvency) प्रकरणात NCLT ने मंजूर केलेल्या अत्यंत कमी परतफेडीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत.

​काय आहे नेमके प्रकरण?

सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक इन्व्हॉल्व्हन्सी प्रकरणातील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) मंजूर योजनेनुसार, तब्बल ₹२२,००६.५७ कोटींच्या admitted creditor claims विरुद्ध कर्जाऊ देणाऱ्या संस्थांसाठी (creditors) केवळ ₹६.२५ कोटींची परतफेड निश्चित करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे तब्बल ९९.९७% इतका प्रचंड मोठा ‘हेअरकट’ (Haircut – कर्जमाफी/तूट) झाल्याने देशभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

​या संपूर्ण प्रक्रियेत ८०.८१४% मतदान हिस्सा असलेल्या creditors ने योजनेला समर्थन दिले असले, तरी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance) यांसारख्या प्रमुख वित्तीय संस्थांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. HDFC बँकेने या निर्णयाविरुद्ध NCLAT मध्ये अपील करण्याचे संकेत दिले असून, या मोठ्या तफावतीमुळे बँकिंग क्षेत्राच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​मानवता विकास परिषदेचे प्रमुख मुद्दे व मागण्या:

​समान न्यायाचा अभाव: शेतकरी किंवा लहान व्यावसायिक काही लाखांचे कर्ज फेडू शकला नाही तर त्याच्यावर जप्तीची कठोर कारवाई होते, मग हजारो कोटींच्या प्रकरणात एवढा मोठा हेअरकट कसा काय मंजूर होतो, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

​ठेवीदारांच्या कष्टाचा पैसा: बँकांमध्ये असलेला पैसा हा केवळ बँकेचा नसून तो शेतकरी, कामगार, नोकरदार आणि सामान्य जनतेच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई व बचतीचा पैसा आहे.

​स्वतंत्र चौकशीची मागणी: ₹२२,००६ कोटी आणि ₹६.२५ कोटी यांमधील प्रचंड तफावतीची आणि सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक मालमत्ता, हमी व करारांची स्वतंत्र फॉरेन्सिक/फायनान्शियल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

​कायदेशीर लढाईला सहकार्य: HDFC बँक आणि LIC Housing Finance सारख्या dissenting creditors (विरोध करणाऱ्या बँका) यांनी घेतलेल्या कायदेशीर भूमिकेचा निष्पक्षपणे विचार करून त्यांना योग्य ती संधी मिळावी.

​पारदर्शक राष्ट्रीय माहिती प्रणाली: ₹१०० कोटी किंवा त्यापेक्षा मोठ्या कर्जप्रकरणांसाठी बँकांना झालेली प्रत्यक्ष वसुली, हेअरकट आणि सेटलमेंटची माहिती देणारी एक पारदर्शक प्रणाली तयार करावी.

​जबाबदारी निश्चित करणे: मोठ्या प्रमाणावर कर्ज मंजूर करताना रिस्क असेसमेंट करणाऱ्या आणि कर्ज बुडीत होण्यास कारणीभूत ठरलेल्या उच्च पातळीवरील निर्णयकर्त्यांची जबाबदारी निश्चित करावी.

​जनतेच्या विश्वासाची लढाई

हे निवेदन केवळ एका व्यक्तीविरुद्धची लढाई नसून भारतीय बँकिंग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठीची एक नैतिक व सामाजिक मोहीम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “जनतेचा पैसा हा जनतेचा विश्वास आहे; तो वाचवणे ही केवळ आर्थिक जबाबदारी नसून राष्ट्राप्रती असलेली नैतिक जबाबदारी आहे,” अशी ठाम भूमिका श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी मांडली आहे.

​या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित सक्षम संस्थांकडून कायदेशीर चौकटीत योग्य ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, ३ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) मार्फत पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठित आणि संगणकीकृत पद्धतीने राबवली जाणार आहे.

   Follow us on        

​सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नव्याने मंजूष मिळालेल्या ६७ लिपिक जागांसाठी देशपातळीवरील नामांकित आणि विश्वासू संस्था असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) कडे या नवीन भरतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी बँक आपली भरती प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) मार्फत पार पाडत असे आणि निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊन ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. आता नव्या टप्प्यात टीसीएससोबत अधिकृत करार करून पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे, ज्याचे वेळापत्रक अधिकृतपणे निश्चित झाले आहे.

​बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांना ३ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत असणार आहे, तर या भरतीसाठीची संगणकाधारित परीक्षा १८ ऑक्टोबर २०२६ च्या दरम्यान घेतली जाईल. टीसीएसला विविध बँका, वित्तीय संस्था आणि शासकीय उपक्रमांच्या परीक्षा आयोजित करण्याचा मोठा अनुभव असल्याने ही परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

​ग्राहकांना उत्तम आणि आधुनिक बँकिंग सुविधा देण्याच्या उद्देशाने तसेच वाढत्या व्यावसायिक विस्ताराला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेकडून ही भरती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बँकेच्या शाखांमधील कामकाजात अधिक कार्यक्षमता यावी आणि ग्राहकोपयोगी सेवा अधिक परिणामकारक ठराव्यात, यासाठी लिपिक वर्गाची ही पदे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गसह परिसरातील नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र तरुणांसाठी ही एक उत्तम व सुवर्णसंधी मानली जात आहे.

​या संपूर्ण भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात, पदांसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम यांसारख्या सर्व महत्त्वपूर्ण अटी-शर्ती लवकरच बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी १ सप्टेंबर २०२६ नंतर बँकेची ही वेबसाईट नियमितपणे तपाजत राहावी, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची सूचना किंवा अद्ययावत माहिती हुकणार नाही आणि वेळेत अर्ज करता येईल.

​बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्ह्यातील तमाम पात्र व इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि निश्चित केलेल्या मुदतीत आपले ऑनलाइन अर्ज सादर करावेत. सर्व प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्याने उमेदवारांनी कोणतीही गैरसमजुती न बाळगता केवळ आपल्या अभ्यास व योग्य तयारीवर भर देऊन या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी

गणपतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वे तिकिटांची कमतरता लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी अहमदाबाद-मंगळुरु साप्ताहिक विशेष ट्रेनला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.

   Follow us on        

​कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये सध्या क्षमतेपेक्षा बरीच जास्त प्रवासी संख्या दिसून येत आहे. विशेषतः गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, लाखो इच्छुकांना अजूनही रेल्वेची तिकिटे मिळालेली नाहीत. या प्रचंड गर्दीला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने आधीच शेकडो विशेष फेऱ्या सुरू केल्या आहेत.

​याच पार्श्वभूमीवर, कोकण आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आणखी एक नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अहमदाबाद-मंगळुरू-अहमदाबाद साप्ताहिक विशेष ट्रेनला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.

​ही विशेष प्रवासी सुविधा येत्या २८ ऑगस्ट २०२६ पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. यामुळे डहाणू आणि पालघर परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

​वेळापत्रकानुसार, अहमदाबाद-मंगळुरू साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक ०१९२४) पालघरला रात्री १० वाजून २ मिनिटांनी पोहोचेल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर रात्री १० वाजून ४ मिनिटांनी मंगळुरूच्या दिशेने रवाना होईल. तसेच परतीच्या प्रवासात, मंगळुरु-अहमदाबाद विशेष गाडी (क्रमांक ०१९२३) पालघर येथे संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पोहचून ७ वाजून १२ मिनिटांनी अहमदाबादकडे सुटेल.

​ही विशेष ट्रेन अहमदाबाद येथून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता निघून पालघर, वसई रोड, रत्नागिरी आणि मडगाव मार्गे दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी मंगळुरूहून सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल, जी विशेष भाडे आकारणीसह धावणार असून प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box

‘ओंकार हत्ती कोणाला मारतो तर मारू दे… ‘ वनरक्षकांचे बेजबाबदार वक्तव्य

दोडामार्गात ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने धुमाकूळ घातला असून, त्याला नियंत्रित करण्याऐवजी वनरक्षकाने अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील वक्तव्य केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

   Follow us on        

​दोडामार्ग तालुक्यात रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीमुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या वन्यप्राण्याला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याऐवजी घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका वनरक्षकाने अत्यंत बेजबाबदार आणि बेफिकीर भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे.

​गुरुवारी संध्याकाळी ‘ओंकार’ हत्ती मोरगाव-हाटीकडे जाणाऱ्या मार्गावर आल्याची बातमी पसरताच नागरिकांनी तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली, ज्यामुळे तिथे वाहतूक कोंडी झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी वनरक्षकांना हत्तीला सुरक्षितपणे जंगलात हाकलून लावण्यासाठी विनंती केली असता, संबंधित कर्मचाऱ्याने ‘हत्ती कोणाला मारतो तर मारू दे, गाडी फोडतो तर फोडू दे; आपल्याला काही फरक पडत नाही’ अशा प्रकारचे अत्यंत असंवेदनशील उद्गार काढले.

​वनरक्षकाच्या या अरेरावी आणि निगरगट्ट वक्तव्यामुळे संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात संतापाची मोठी लाट उसळली असून, वनविभाग नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल किती उदासीन आहे, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तक्रार करायची असेल तर खुशाल करा, असे उद्धटपणे बोलून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे.

​सध्या या तालुक्यात सुमारे सहा हत्तींचा वावर असून तिळारी खोरे, कोलझर पंचक्रोशी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतीचे आधीच अतोनात नुकसान होत आहे. त्यातच ‘ओंकार’ हत्तीने थेट मानवी वस्त्या, वाहने आणि नागरिकांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यामुळे येथील एकूणच परिस्थिती अधिकच स्फोटक आणि गंभीर बनत चालली आहे.

​यापूर्वी मंगळवारी रात्री कलोणे-फॉंडिये परिसरात ‘ओंकार’ने एका चारचाकी वाहनावर अचानक हल्ला करत सुले कारमध्ये घुसून मोठे नुकसान केले होते. या सलग घडणाऱ्या उपद्रवामुळे आणि वनविभागाच्या असहकार व बेजबाबदार भूमिकेमुळे परिसरातील ग्रामस्थ, वाहनचालक आणि शेतकरी वर्गात पुन्हा एकदा तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

Facebook Comments Box

ओरोस पिट ढवळ नदीत नारळी पौर्णिमेच्या संध्याकाळी युवक वाहून गेला

नारळी पौर्णिमेच्या आनंदाच्या सणाला ओरोस येथील पिट ढवळ नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात एक युवक वाहून गेला असून, अंधारामुळे थांबवलेले बचावकार्य आज सकाळी पुन्हा युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

   Follow us on        

सिंधुदुर्ग: नारळी पौर्णिमेचा सण संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जात असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या आनंदाच्या वातावरणाला गालबोट लावत ओरोस जवळील पिट ढवळ नदीच्या पात्रात एक तरुण अचानक पाय घसरून किंवा प्रवासाच्या तीव्रतेमुळे पडल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा सर्व प्रकार नारळी पौर्णिमेच्या संध्याकाळच्या सुमारास घडला. संबंधित युवक नदी पात्राच्या अगदी जवळ असताना पाण्याचा अंदाज चुकल्याने किंवा तोल गेल्याने तो थेट पात्रात कोसळला आणि नदीच्या वेगात वाहणाऱ्या तीव्र प्रवाहाशी मुकाबला न करू शकल्यामुळे झपाट्याने पुढे निघून गेला.

​ही दुर्देवी बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरताच स्थानिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि अंधार व पाण्याचा धोका लक्षात घेता, रात्रीच्या सुमारास एनडीआरएफ (NDRF) ची विशेष पथक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले.

​मात्र, रात्रीच्या वेळी असलेला गडद अंधार, सभोवतालचा विस्तार आणि नदीच्या पाण्याचा प्रचंड व वेगवान प्रवाह यामुळे रात्रीच्या वेळेस पाहिजे तसे प्रभावी शोधकार्य राबवणे अशक्य बनले. त्यामुळे प्रशासनाने रात्रीच्या वेळी सुरक्षेचा उपाय म्हणून बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला, परंतु आज सकाळी उजाडताच हे युद्धपातळीवर शोधमोहीम पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे.

​सणाच्या दिवशीच ओरोस आणि लगतच्या परिसरात घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. लवकरात लवकर त्या तरुणाचा शोध लागून तो सुखरूप किंवा किमान त्याची माहिती मिळावी, या प्रतीक्षेत सध्या सर्व ग्रामस्थ आणि त्याचे नातेवाईक डोळे लावून बसले आहेत.

Facebook Comments Box

डेगवेत प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात हरकती

 

​डेगवे येथे पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत घेतलेल्या सुनावणीत बाधित शेतकऱ्यांनी प्रकल्पाविरोधात लेखी हरकती नोंदवल्या.

​दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत महामार्गामुळे होणाऱ्या नुकसानाची पाहणी करून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला होता.

   Follow us on        

​डेगवे येथील भक्त निवासामध्ये पवनार ते पत्रादेवी या नियोजित शक्तीपीठ महामार्गाकरिता आवश्यक असलेल्या भूसंपादनासंदर्भात दाखल झालेल्या हरकती अर्जांवर नुकतीच सुनावणी पार पडली. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेदरम्यान परिसरातील बाधित जमीन मालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला.

​महाराष्ट्र महामार्ग भूमिसंपादन प्रक्रियेअंतर्गत डेंगवे गावातील एकूण १४८ खातेदारांना प्रांताधिकारी कार्यालयाकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्या प्राप्त झालेल्या नोटिसीनुसार १८ संबंधित खातेदार प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी हजर राहून आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित झाले होते.

​या सुनावणीच्या कामकाजादरम्यान सावंतवाडीचे प्रांताधिकारी विरसिंह वसावे, डेंगवेचे सरपंच राजन देसाई, सहायक महसूल अधिकारी पंकज मांजरेकर, तलाठी भक्ती सावंत यांच्यासह ‘मोनाज’ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रांताधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित सर्व खातेदार तसेच ग्रामस्थांचे म्हणणे अत्यंत शांतपणे ऐकून घेत त्यांच्या हरकती नोंदवून घेतल्या.

​पूर्वी घेतलेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी शेतजमिनी, बागायती आणि पर्यावरणाचे होणारे अपरिमित नुकसान गांभीर्याने लक्षात घेतले होते. याच मुद्द्याच्या आधारे डेंगवे येथील ग्रामस्थांनी या महामार्गाला संपूर्णपणे विरोध करणारा ठराव एकमुखाने मंजूर केला होता, ज्याचा प्रत्यय या सुनावणीत प्रकर्षाने आला.

​सुनावणी सुरू असताना उपस्थित असलेल्या जमीन मालकांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडत भूसंपादनाबाबतची आपली मते लेखी स्वरूपात प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केली. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, राजेश्वर देसाई, मंगेश देसाई, प्रेमानंद देसाई, आत्माराम देसाई, महेश देसाई आणि जयवंत देसाई यांच्यासह अनेक बाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box

गणेशोत्सवासाठी दोन दिवस धावणार ‘मोदी एक्सप्रेस’

 

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबर रोजी विशेष ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन धावणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान ्यांना गावाकडे घेऊन जाणाऱ्या या विशेष रेल्वेची यावर्षीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही गाडी ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दादर येथील फलाट क्रमांक १४ वरून सकाळी १०:३० वाजता कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.

​मुंबईहून सुटणारी ही विशेष रेल्वे गाडी रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी येथे पोहोचणार असून प्रवाशांसाठी प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्षाेशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे. यामध्ये कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील चाकरमान्यांनी भाजप मंडाध्यक्षांशी, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

​गेल्या १४ वर्षांपासून ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांना गावात पोहोचवत असताना प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहून मनापासून आनंद होतो, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यंदाही सर्व चाकरमानी नाчыत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’साठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली हक्काची मोदी एक्सप्रेस पकडावी आणि बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात गावाकडे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मुंबई – मडगाव मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी विशेष गाड्या जाहीर!

Konkan Railway: 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

​या विशेष गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​गाडीचे वेळापत्रक आणि फेऱ्या:

​गाडी क्रमांक 01007 (CSMT – मडगांव विशेष):

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १२:४० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ०३:३० वाजता मडगांव येथे पोहोचेल.

​दिनांक: ११.०९.२०२६ (शुक्रवार) आणि १३.०९.२०२६ (रविवार). (एकूण २ फेऱ्या)

​गाडी क्रमांक 01008 (मडगांव – CSMT विशेष):

​मडगांव येथून सायंकाकाळी ०४:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

​दिनांक: ११.०९.२०२६ (शुक्रवार) आणि १३.०९.२०२६ (रविवार). (एकूण २ फेऱ्या)

​गाडीची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनमध्ये एकूण २२ आयसीएफ (ICF) कोच असतील, ज्यामध्ये २ वातानुकूलित तृतीय (3AC), १२ शयनयान (Sleeper), ६ सामान्य द्वितीय श्रेणी (GS) आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन (SLRD) समाविष्ट आहेत.

या गाडीचे थांबे

  • ​दादर
  • ​ठाणे
  • ​पनवेल
  • ​पेण
  • ​रोहा
  • ​माणगाव
  • ​वीर
  • ​खेड
  • ​चिपळूण
  • ​सावर्डे
  • ​आरवली रोड
  • ​संगमेश्वर रोड
  • ​रत्नागिरी
  • ​आडवली
  • ​विलवडे
  • ​राजापूर रोड
  • ​वैभववाडी रोड
  • ​नांदगाव रोड
  • ​कणकवली
  • ​सिंधुदुर्ग
  • ​कुडाळ
  • ​सावंतवाडी रोड
  • ​थिवी
  • ​करमळी

​आरक्षण आणि तिकीट बुकिंग

​आरक्षण सुरू होण्याची तारीख: शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून आयआरसीटीसी (IRCTC) आणि RailOne वर आरक्षण सुरू होईल.

​महत्त्वाची टीप: या गाडीच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा RailOne अथवा NTES ॲप डाऊनलोड करा. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ॲपचा वापर केल्यास अधिकृत माहिती मिळेलच याची शाश्वती नाही.

Facebook Comments Box

राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; सह्याद्री अतिथीगृहावर त्रिपक्षीय सामंजस्य करार

मुंबई (प्रतिनिधी):

वाढत्या स्क्रीन टाईममुळे (Screen Time) अनेक विद्यार्थ्यांना शालेय वयातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. योग्य वयात याचे निदान झाल्यास, भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. ही बाब लक्षात घेऊन महायुती सरकारने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्याबाबत आणि दृष्टीदोष असलेल्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी ‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

करारातील प्रमुख भागीदार आणि उपस्थित मान्यवर

हा करार शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिल्लार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात पार पडला.

या प्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता, वनसाईट एस्सिल्लार लक्सोटिका फाउंडेशनचे संचालक वेणू अंबाती यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी:

लाभार्थी: राज्यातील शासकीय शाळांमधील ५ वी ते १० वी च्या तब्बल २० लाख विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोफत चष्मे वाटप: तपासणीनंतर ज्या विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष आढळेल, अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोफत चष्मे दिले जातील.

  • जबाबदारीचे विभाजन:

रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट: प्रकल्प अंमलबजावणी भागीदार (Implementation Partner) म्हणून काम करेल.

वनसाईट एस्सिल्लार लक्सोटिका फाउंडेशन: तांत्रिक भागीदार (Technical Partner) म्हणून जबाबदारी सांभाळेल.

शालेय शिक्षण विभाग: प्रकल्पाची संपूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करेल.

  • कालावधी आणि स्वरूप: हा करार ३६ महिन्यांच्या (३ वर्षे) कालावधीसाठी असणार आहे. या काळात राज्यभरात व्यापक स्तरावर डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाईल.

पारदर्शकता आणि डेटा सुरक्षा: प्रकल्पाच्या पारदर्शकतेसाठी त्रैमासिक (Quarterly) प्रगती अहवालाच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जाईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती वैज्ञानिक पद्धतीने गोळा करतानाच त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेची (Privacy) आणि डेटा संरक्षणाची पूर्ण काळजी घेतली जाईल.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search