No block ID is set
सावंतवाडी शहरात शनिवारी सकाळी एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली. कारिवडे येथील शाळेत दहावी इयत्तेत शिकणारी लिसा गोसावी ही विद्यार्थिनी आपली सकाळची शाळा संपवून नातेवाईकांसोबत सावंतवाडीत आली होती. यावेळी तिचा नातेवाईक रोहन गोसावी, जो मुंबईहून तिला भेटण्यासाठी आला होता, तो देखील तिच्यासोबत होता. हे सर्वजण फिरत असताना मोती तलावाच्या परिसरात पोहोचले.
सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठी बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे लोक थांबले होते. या दरम्यान, तलावाच्या कठड्यावर तलावाच्या दिशेने तोंड करून बसलेल्या लिसाने अचानक पाण्यात उडी घेतली. हे दृश्य पाहून तिच्या सोबत असलेल्या चुलत बहिणीने तातडीने रोहन गोसावी याला या घटनेची कल्पना दिली. तिला वाचवण्याच्या आवेगाने रोहनने लागलीच तलावात उडी मारली.
मात्र, या दुर्दैवी घटनेत लिसा आणि तिला वाचवण्यासाठी गेलेला रोहन या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ शोध घेतल्यानंतर युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला, तो बाहेर काढला असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर मुलीचा मृतदेह पाण्यात अडकल्याने तो शोधण्यात अडथळे निर्माण झाले होते.
या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाचे सूत्र हाती घेत सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवून काही वेळातच मुलीचा मृतदेह शोधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
विद्यार्थिनीने नक्की कोणत्या कारणास्तव हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि पोलीस हर्षद हिंगे हे प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सावंतवाडी शहरात शोककळा पसरली असून, तलाव काठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.











