अंगणवाडी पोषण आहारात ‘न शिजणारा वाटाणा आणि अळ्या’

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये लहान मुलांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर मुद्दा जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीच्या सभेत पुढे आला आहे. या निकृष्ट दर्जावर सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

​सभेत सदस्यांनी केलेल्या आरोपानुसार, अंगणवाडय़ात पुरविण्यात येणाऱ्या पांढऱ्या वाटाण्यात अळ्या आढळत असून, हा वाटाणा नीट शिजतही नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या गंभीर समस्येवर चर्चा करताना, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहारात साखरेऐवजी गुळाचा समावेश करण्यात यावा आणि वाटाण्याऐवजी पौष्टिक पर्याय म्हणून मूग व मटकीची देण्यात यावी, असा महत्त्वाचा ठरावही सभेत संमत करण्यात आला.

​ही सभा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी पार पडली. महिला व बाल विकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठkiला प्रभारी सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, तसेच समितीचे सदस्य मिलिंद नाईक, हर्पदा वाळके, अवनी तेली, सुप्रिया मेस्त्री, आरती पाटील, क्षमा हडकर, शोभा गावडे आणि विविध तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box

कोकणात केली थायलंडच्या ‘जास्मिन राइस’ची यशस्वी लागवड

   Follow us on        

रायगड: पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी आणि नैसर्गिक अडचणींवर यशस्वी मात करत पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील प्रयोगशील ‘कृषी भूषण’ शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या थायलंडच्या ‘जस्मिन राइस’ची यंदा यशस्वी लागवड केली आहे. पूर्णपणे स्व-संशोधित सेंद्रिय द्रव्यांच्या जिरावर घेतलेला हा प्रयोग रायगडच्या कृषी क्षेत्रात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.

​गेल्या वर्षी गाडगीळ यांनी थायलंडमधून जस्मिन राइसचे बियाणे मागवले होते. पहिल्या वर्षी विविध नैसर्गिक अडचणींचा सामना करत सुमारे दोन किलो भाताचे उत्पन्न मिळाले. यंदा याच धान्यापासून पुनरुत्पादन करण्याचे नियोजन त्यांनी केले. मात्र, यंदा मुळातच मान्सून लांबल्याने पेरणी वेळेत करता आली नाही. त्यानंतर सुरू झालेल्या धोधाम पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजवला. नद्या, नाले आणि शेते तुडूंब भरल्याने अनेकांची पेरलेली धान्ये उगवली नाहीत, तर कमी प्रमाणात उगवली रोपे कुजून गेली.

​या काळात योग्य संधी साधत मिनेश गाडगीळ यांनी २२ जून रोजी पेरणी केली आणि सुरुवातीला बोरवेलच्या साहाय्याने पाणी दिले. अवघ्या चार ते पाच दिवसांत धान्य व्यवस्थित उगवून आले आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाचा रोपांना मोठा फायदा झाला. सध्या भाताची नर्सरी अत्यंत उत्तम स्थितीत असून याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

​सुगंधी आणि आरोग्यदायी तांदूळ:

जस्मिन राइस हा जगातील सर्वाधिक सुगंधी तांदळांपैकी एक मानला जातो. हा तांदूळ पूर्णपणे झिरो ग्लुटन (Zero Gluten) असून त्यात फॅट्सचे प्रमाण अत्यंत अल्प असते. याशिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स, आयरन (लोह), मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-९ (फॉलिक एसिड) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.

​योग्य नियोजन, चिकाटी आणि सेंद्रिय शेतीची जोड दिली तर प्रतिकूल हवामानातही परदेशी व उच्च दर्जाची पिके यशस्वीरीत्या घेता येतात, हे मिनेश गाडगीळ यांनी आपल्या या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या प्रयोगाबद्दल बोलताना मिनेश गाडगीळ म्हणाले, “कोणतेही रासायनिक खत न वापरता, केवळ मी स्वतः संशोधन केलेल्या सेंद्रिय द्रव्यांची फवारणी या पिकावर केली आहे. आता पुढे निसर्गाची अनुकूल साथ लाभल्यास यातून सुमारे १०० किलोपर्यंत शुद्ध बियाणे उपलब्ध होईल.”

Facebook Comments Box

कुटगिरी येथे लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना: एका बैलाचा मृत्यू, ६ जनावरे गंभीर जखमी

   Follow us on        

गुहागर शहर : तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता अचानक कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असताना त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ जनावरे पुलाखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेमध्ये दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून, अन्य ६ जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे.

​घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच पुलाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरे वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी, लोखंडी रचना हटवल्याशिवाय अनेक जनावरांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.

​घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना गुहागर आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने दुर्घटनेत मृत झालेल्या बैलासह सर्व जखमी ६ जनावरांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Facebook Comments Box

डोंबिवलीकरांसाठी खुशखबर! डोंबिवलीतून ठाणे, वसई आणि नवी मुंबईत जाण्यासाठी रो-रो जलवाहतूक सेवा सुरू होणार

  •    Follow us on        

डोंबिवली: डोंबिवलीकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाढत्या रहदारीला आणि वाहतूककोंडीला पर्याय म्हणून डोंबिवलीत रो-रो (जलवाहतूक) सेवेला विशेष प्राधान्य दिले जात असून, यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मोठागाव येथील घाट परिसरात जेटी उभारण्याचे काम सध्या अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार आगामी डिसेंबरपर्यंत ही जलवाहतूक सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

​ही सेवा सुरू झाल्यानंतर डोंबिवलीतील नागरिकांना ठाणे आणि वसई-विरार या शहरांमध्ये जलमार्गाने प्रवास करण्याचा अत्यंत सोयीस्कर व वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्ते मार्गावरील ताण यामुळे मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.

​या प्रकल्पाचा विस्तार केवळ ठाणे आणि वसई-विरारपुरता मर्यादित नसून, दुसऱ्या टप्प्यात ही जलवाहतूक सेवा थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन आहे, अशी माहिती माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

​या प्रकल्पामुळे डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांना एक पर्यायी, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध विभागांतील २०२ रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार अधिसूचना क्र. CO/P-R/02/2026 जारी केली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर, स्टेशन मास्तर, असिस्टंट लोको पायलट आणि ट्रॅक मेंटेनर यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून KRCL च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

१.एकूण पदे -२०१

 

महत्त्वाची नोंद: ट्रॅक मेंटेनर (Track Maintainer) ची सर्व ५७ पदे केवळ प्रकल्पग्रस्त (Land Losers) उमेदवारांसाठीच राखीव आहेत.

२. निवड प्रक्रियेत प्राधान्यक्रम (Preference Order)

कोकण रेल्वेने उमेदवारांच्या निवडीसाठी पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम निश्चित केला आहे:

प्रथम प्राधान्य: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त (Land Loser) उमेदवारांना.

द्वितीय प्राधान्य: कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यांमधील (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा राज्य, उत्तर कन्नड, उडुपी, दक्षिण कन्नड) रोजगार कार्यालयात नोंदणीकृत असणारे उमेदवार.

तृतीय प्राधान्य: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील डोमिसाईल (अधिवास) धारक उमेदवार व KRCL मधील नियमित कर्मचारी.

३. वयोमर्यादा (Age Limit) व शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा (०१/०८/२०२६ रोजी):

गट ‘क’ (Group C) पदे: १८ ते ३६ वर्षे.

ट्रॅक मेंटेनर (Group D) पदे: १८ ते ४५ वर्षे.

(सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल).

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार १० वी पास, ITI, अभियांत्रिकी पदविका (Diploma), B.E./B.Tech किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Graduation) आवश्यक आहे.

४. अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

परीक्षेचे शुल्क:

सामान्य व इतर प्रवर्ग: रु. १,१८०/- (रु. १००० + १८% GST).

SC / ST / महिला / माजी सैनिक / PwBD / अल्पसंख्याक / EBC: परीक्षा दिल्यानंतर नियमानुसार शुल्क बँक शुल्काची रक्कम कापून परत (Refund) केले जाईल.

अर्जाची पद्धत: अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

 

५. निवड प्रक्रिया (Selection Process)

१. संगणकावर आधारित परीक्षा (CBT): सर्व पदांसाठी संभाव्यतः सप्टेंबर २०२६ मध्ये संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल.

२. अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट / PET: स्टेशन मास्तर, ALP व सेक्शन कंट्रोलरसाठी ‘अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट’ आणि ट्रॅक मेंटेनरसाठी ‘शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)’ घेतली जाईल.

३. कागदपत्र पडताळणी (DV) व वैद्यकीय तपासणी (Medical Examination).

महत्त्वाच्या लिंक्स व अधिकृत संकेतस्थळ

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:

अधिकृत वेबसाईट: www.konkanrailway.com

 

 

Facebook Comments Box

कोकण रेल्वेसंबंधी विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटनांनी घेतली आमदार माधवी नाईक यांची भेट

   Follow us on        

ठाणे: कोकण आणि रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विधानपरिषद आमदार सौ. माधवी नाईक यांची ठाणे येथील कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत कोंकण विकास समिती, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ, ठाणे, कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) आणि महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

​यावेळी, नव्याने मान्यता मिळालेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड दैनिक एक्सप्रेसबद्दल आमदार सौ. माधवी नाईक यांच्यासह रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच, सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. याशिवाय, कोकणातील चाकरमान्यांसाठी व प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी योग्य त्या पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.

​आमदार सौ. माधवीताई नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या सर्व समस्या व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात किशोर सावंत, अक्षय मधुकर महापदी, प्रसन्न प्रकाश कलमस्टे, प्रमोद बागवे, संजय शिंदे, अशोक शिंदे, अमित शेलार, जतिन कोठारे, हेमंत गडकरी, रविंद्र साटम आणि राजेश तावडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Comments Box

खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

   Follow us on        

मुंबई:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सिंधूदूर्गातील सावंतवाडी रोड दरम्यान एका नवीन दैनिक (रोज धावणारी) एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ५१० किलोमीटरच्या या मार्गामुळे मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (PIB) प्रसिद्धीपत्रकानुसार, या नवीन सेवेमुळे पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि स्थानिक रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सोयीचा होणार आहे.

ट्रेनचा क्रमांक व मार्ग

ही नवीन एक्सप्रेस ट्रेन दररोज पुढील क्रमांकांनी धावेल:

  • ट्रेन क्र. १५०८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस

  • ट्रेन क्र. १५०८८: सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) एक्सप्रेस

 थांबे (Stoppages)

मुंबई महानगर क्षेत्र ते दक्षिण कोकणाला जोडणाऱ्या या ५१० किमीच्या प्रवासात प्रमुख शहरांना व स्थानकांना व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत:

दादर • ठाणे • पनवेल • पेण • रोहा • माणगाव • वीर • खेड • चिपळूण • सावर्डे • अरावली रोड • संगमेश्वर रोड • रत्नागिरी • अडवली • विलवडे • राजापूर रोड • वैभववाडी रोड • नांदगाव रोड • कणकवली • सिंधुदुर्ग • कुडाळ • सावंतवाडी रोड.

पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती

ही नवीन रेल्वे सेवा कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि इको-टूरिझम केंद्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामुळे पर्यटनास मोठा उत्साह मिळेल. तसेच, रोजचा प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना यामुळे थेट आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रादेशिक आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. याशिवाय, कोकण मार्गावर सातत्याने असणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या नवीन दैनिक सेवेमुळे इतर गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. एकंदरीत, भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या प्रादेशिक विकासाला आणि वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.

Facebook Comments Box

मालवण – पंढरपुर – अक्कलकोट एसटी बससेवा सुरू

   Follow us on        

मालवण: एसटी महामंडळाच्या मालवण आगारामार्फत मालवण ते अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून कोकणातील प्रवाशांना आता बस बदल न करता थेट अक्कलकोटपर्यंत प्रवास करता येणार आहे.

​ही बस मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे, तर अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान आचारा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर ही प्रमुख ठिकाणे येणार आहेत.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगारामार्फत करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Facebook Comments Box

‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेला मुदतवाढ

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील कोटीवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेत ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेला पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२३१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे ही योजना २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीतही सुरू राहणार असून, यामुळे बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.

​या महत्त्वपूर्ण योजनेसाठी केंद्र सरकारने ३,१५,६१४ कोटी रुपयांच्या विशाल निधीची तरतूद केली आहे. पुढील पाच वर्षांत एवढा मोठा खर्च करून सरकार शेतीसाठी लागणारा आर्थिकभार हलका करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक आधार मिळत राहणार आहे.

​या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य पूर्ववत मिळत राहिल. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जाते.

​शेतकऱ्यांना पेरणी आणि शेतीच्या हंगामात आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी हफ्त्याचे वेळापत्रक पीक चक्रानुसार निश्चित करण्यात आले आहे. जेव्हा शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी सर्वाधिक पैशांची गरज असते, बरोबर त्याच काळात पीएम किसान योजनेचे हफ्ते वितरित केले जातात.

​या वेळेवर मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांमधील रोकड रकमेची अडचण दूर होते. तसेच त्यांना जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज भासत नाही. यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला खर्च भागवणे अधिक सोपे होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल.

Facebook Comments Box

Railway Updates: रेल्वेच्या तात्काळ तिकिटांसाठी आजपासून सुधारित टोकन प्रणाली कार्यान्वित

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने रेल्वे स्टेशनवरील आरक्षण काउंटरवरून तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी एक ऑगस्टपासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नवीन टोकन प्रणालीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, काउंटरवरील लांब रांगा आणि अनावश्यक गर्दी आटोक्यात आणण्यास मोठी मदत होईल.

​नव्या नियमावलीनुसार, एसी (AC) तत्काळ तिकिटांसाठी सकाळी ८:३० ते ९:०० या वेळेत टोकन दिले जाईल, तर नॉन-एसी म्हणजेच स्लीपर क्लाससाठी सकाळी ९:०० ते ९:३० या वेळेत टोकन दिले जातील. प्रत्येक आरक्षण काउंटरवर एसी तिकिटांसाठी १० आणि नॉन-एसी तिकिटांसाठी १५ टोकनची निश्चित मर्यादा ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे तिकीट वितरण व्यवस्था अधिक शिस्तबद्ध झाली आहे.

​या प्रक्रियेदरम्यान स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांसाठी थेट तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. गरज भासल्यास प्रवाशांना आपले नाते सिद्ध करण्यासाठी वैध कागदपत्रे काउंटरवर सादर करावी लागतील, ज्यामुळे काळ्या बाजारात होणाऱ्या तिकिटांच्या खरेदी-विक्रीला आळा बसेल.

​तसेच, प्रवाशांनी तिकीट काउंटरवर जाताना ओळख पटवण्यासाठी वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांचे नाव, वय आणि प्रवासाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती अगोदरच तयार ठेवल्यास तिकीट बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पार पडेल.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search