भारतीय रेल्वेच्या लॉजिस्टिक्स क्रांतीचा नवा अध्याय: वंदे भारत कार्गो ट्रेनने गाठला विक्रमी वेग

   Follow us on        

भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक क्षेत्रात एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली आहे. देशातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयू (Vande Bharat Freight EMU) ट्रेनने नुकतीच एका महत्त्वपूर्ण मैलाचा दगड पार केला आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात सुरू असलेल्या हाय-स्पीड चाचण्यांदरम्यान (Speed Trials) या अत्याधुनिक ट्रेनने तब्बल १४५ किलोमीटर प्रति तास इतका उच्चांकी वेग गाठला आहे.

​या महत्त्वकांक्षी ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील प्रसिद्ध इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) करण्यात आली आहे. या संपूर्ण १६ कोचांच्या रेकमध्ये मालवाहतूक सुलभ व्हावी यासाठी विशेष पार्सल कोच आणि नाशवंत मालासाठी रेफ्रिजरेटेड व्हॅन्सची (Refrigerated Vans) रचना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही ट्रेन रेल्वे लॉजिस्टिक्सच्या प्रवासात एक नवी दिशा देणारी ठरणार आहे.

​ई-कॉमर्स उत्पादने, जीवनावश्यक औषधे, तसेच भाजीपाला आणि फळे यांसारख्या नाशवंत वस्तूंची वाहतूक अधिक जलद गतीने करण्यासाठी ही ट्रेन विशेष डिझाइन करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकची पेलोड क्षमता ३९७ टन एवढी प्रचंड आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक कमी वेळेत करणे आता शक्य होणार असून यामुळे व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

​सध्या कोटा-नागदा-सवाई माधोपुर रेल्वे खंडावर या ट्रेनची कसून चाचणी सुरू आहे. आगामी एक महिना चालणाऱ्या या चाचण्यांच्या टप्प्यात या ट्रेनचा वेग आणखी वाढवून १८० किमी/तास पर्यंत नेण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने केले आहे. या उच्चांकी चाचण्यांमुळे ट्रेनच्या विविध तांत्रिक क्षमतांची कसून परीक्षा घेतली जात आहे.

​या सर्व स्पीड ट्रायल्स यशस्वी ठरल्यास ही देशातील सर्वात वेगवान मालगाडी म्हणून इतिहास रचेल. या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेची एक्सप्रेस पार्सल सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम होईल, ज्यामुळे देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती घडवून येईल यात शंका नाही.

Facebook Comments Box

‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्यातील प्रकल्पांच्या मंजुरीसाठी नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्याने प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन पत्र दिले आणि विशेष पाठपुरावा केला आहे.

​मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने ‘सागरमाला २.०’ कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, हे प्रकल्प २.० अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव आहेत. हे प्रकल्प ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

​या प्रकल्पांमुळे राज्यातील बंदराधारित विकासाला चालना मिळणार असून बहुविध लॉजिस्टिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल, मत्स्य बंदरांचे आधुनिकनीकरण होईल, किनारी भागातील पायाभूत सुविधा उन्नत होतील तसेच किनारी जलवाहतूक, अंतर्गत जलमार्ग आणि सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. याशिवाय किनारी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव सादर केले आहेत.

​केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्रातील बंदर विकास, सागरी पायाभूत सुविधा, किनारी अर्थव्यवस्था आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठी प्रगती होईल. असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Facebook Comments Box

चिरेकापणीच्या मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू

   Follow us on        

देवगड:

तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.

​ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

​या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

Facebook Comments Box

‘शक्तीपीठ’ तीन महामार्गांना जोडेल! – आमदार दीपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी: ‘शक्तीपीठ’ महामार्ग तीन महामार्गांना जोडला जाईल आणि याद्वारे पर्यटन विकास घडवला जाईल असे विधान सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी काल केले,. दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथे काही निर्बंध आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. या भागातील वृक्षतोट रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी एनजीओच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे.

​मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या आमसभा गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नव्हत्या, मात्र आता त्या होत असल्याची आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली. वेळापत्रकानुसार सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची आमसभा ७ ऑगस्टला होणार असून, सावंतवाडी व दोडामार्गपाठोपाठ पुढील आठवड्यात वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. भविष्यात या भागात अजून जास्त गाड्या उपलब्ध करून देण्याच्या आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी शेवटी सांगितले.

Facebook Comments Box

पाश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका गाडीचा समावेश

   Follow us on        

Railway Updates: स्वातंत्र्य दिनी लागून आलेल्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यात ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष या कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाडीचा समावेश असल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.

मुंबई, २९ जुलै २०२६:

अतिरिक्त प्रवासी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासाची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनेक लोकप्रिय विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासारख्या आगामी सणांच्या काळात चाकरमानी आणि प्रवाशांना होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

महत्त्वाच्या गाड्यांचे तपशील व फेऱ्यांचा विस्तार:

| ट्रेन क्रमांक | गाडीचे नाव (मार्ग) | फेरीचा वार (Frequency) | वाढीव कालावधी / विस्तार

| ०९००५ / ०९००६ | बांद्रा टर्मिनस – भिवानी सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / गुरुवार) | २६.०८.२०२६ / २७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९००१ / ०९००२ | मुंबई सेंट्रल – भिवानी सुपरफास्ट विशेष | द्वि-साप्ताहिक (मंगळवार-शुक्रवार / बुधवार-शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९१८५ / ०९१८६ | मुंबई सेंट्रल – कानपूर अनवरगंज सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (रविवार / सोमवार) | ३०.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४४७ / ०९४४८ | अहमदाबाद – पाटणा सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / शुक्रवार) | ०५.०८.२०२६ / ०७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९३ / ०९०९४ | उधना – अयोध्या धाम / अयोध्या कॅन्ट – उधना विशेष | साप्ताहिक (शनिवार इ.) | २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९७ / ०९०९८ | उधना – अयोध्या कॅन्ट विशेष | साप्ताहिक (मंगळवार / बुधवार) | २५.०८.२०२६ / २६.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०३३ / ०९०३४ | उधना – मालदा टाउन विशेष | साप्ताहिक (गुरुवार / रविवार) | २७.०८.२०२६ / ३०.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४५१ / ०९४५२ | गांधीधाम – भागलपूर विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / सोमवार) | २८.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

आरक्षण आणि महत्त्वाची माहिती:

आरक्षण सुरू: या सर्व वाढीव फेऱ्यांचे आरक्षण आजपासून म्हणजेच २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सर्व पीआरएस (PRS) काऊंटर्स आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे.

या सर्व गाड्या विशेष भाड्याने (Special Fare) चालवल्या जातील आणि त्यांचा कालावधी ऑगस्ट २०२६ च्या अखेरपर्यंत राहील.

वेळापत्रक व थांबे: गाड्यांच्या वेळा, थांबे आणि रचनेसंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

​१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारी सुरू!

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मच्छिमारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापुढील खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

​पावसाळा हा अधिकांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावे, यासाठी दरवर्षी या कालावधीत मासेमारीवर बंदी घातली जाते. यंदा महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत, म्हणजेच एकूण ७६ दिवसांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापर्यंतच्या समुद्रात या कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त, केंद्र शासनाने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) ३१ जुलैपर्यंत म्हणजेच ६१ दिवसांची बंदी लागू केली होती, त्यामुळे १ ऑगस्टपासून EEZ क्षेत्रात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे.

​मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना या मर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सागरी मत्स्यव्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

Facebook Comments Box

तब्बल सहा वर्षानी राजधानी एक्सप्रेस सावंतवाडीत थांबली; जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी रोड (लोकनेते मधू दंडवते टर्मिनस) रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला पुन्हा एकदा थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही गाडी स्थानकात दाखल होताच, कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक रेल्वेप्रेमींनी तिचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. यावेळी रेल्वेची विधिवत पूजा करण्यात आली, तसेच गाडीच्या दोन्ही चालकांचा श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून हा आनंदोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.

​या कार्यक्रमादरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी कोरोना काळातील अडचणींना उजाळा दिला. कोरोना काळात राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेसचा थांबा बंद करण्यात आला होता, मात्र संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता राजधानी एक्सप्रेससह गरीब रथ आणि मंगळूरू एक्सप्रेसचा थांबा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या यशामागे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या मोलाच्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच सावंतवाडी स्थानकाला ‘लोकनेते मधू दंडवते टर्मिनस’ हे नाव प्राप्त झाले असून, या नामासाजेसा प्रवाशांचा विकास व सुविधा भविष्यात येथे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

​या स्वागताच्या सोहळ्याला संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजीनदार भूषण बांदिवडेकर यांच्यासह सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, तसेच मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रेल्वेप्रेमी उपस्थित होते.

Facebook Comments Box

पनवेल: एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांना सुरक्षितपणे हलवले

   Follow us on        

बुधवारी पनवेल रेल्वे स्थानकावर एर्नाकुलम-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२१४९) बी-१ या डब्यात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ट्रेन पनवेल स्थानकावर पोहोचल्यानंतर डब्यातील कंट्रोल आर्म तुटल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचलली.

​ही तांत्रिक अडचण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित बी-१ डबा मुख्य ट्रेनपासून वेगळा करण्याचा निर्णय घेतला. या डब्यात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणतीही जोखीम न पत्कता इतर डब्यांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरीत करण्यात आले. या सुयोग्य आणि तत्पर नियोजनामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची घटना घडली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​डबा वेगळा करणे आणि प्रवाशांची सुरक्षित सोय करण्याच्या या प्रक्रियेमुळे ट्रेनच्या वेळेत सुमारे तीन तासांचा विलंब झाला. सर्व आवश्यक तांत्रिक पडताळणी आणि सुरक्षेची खात्री केल्यानंतर ट्रेन आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. या अनपेक्षित बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल व असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने जाहीर दिलगीर व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचे जीवन, राष्ट्रसेवा आणि समाजप्रबोधन

   Follow us on        

परभणी:

राष्ट्रधर्म, समाजप्रबोधन आणि मानवतेचे महान उपासक म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाणारे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे जीवन आणि कार्य हे खऱ्या अर्थाने “भूतो न भविष्यति” असेच प्रेरणादायी आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता राष्ट्रप्रेम, समाजसेवा, सामाजिक समता, धर्मरक्षण आणि मानवकल्याण यांचा एक अनोखा संगम ठरले आहे. त्यांनी धर्म, राष्ट्र आणि मानवतेच्या सेवेसाठी आपले आयुष्य पूर्णपणे अर्पण केले होते.

​जन्म व ऐतिहासिक कर्मभूमी

​राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१२ रोजी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे झाला. या पवित्र भूमीत जन्मलेल्या महाराजांमध्ये बालपणापासूनच अध्यात्म, राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जाज्वल्य वृत्ती होती. धर्मरक्षण आणि राष्ट्रसेवेचा वसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी स्वतः “हिंदू राष्ट्र सेना” उभारली. मुक्तेश्वर दरी हे त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचे प्रमुख केंद्र राहिले. अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच निर्भीडपणे आवाज उठवला, ज्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकार आणि निजामशाही या दोघांचाही रोष सहन करावा लागला. मात्र, सत्य, स्वाभिमान आणि राष्ट्रहिताचा मार्ग त्यांनी कधीही सोडला नाही.

​सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता

​रत्नागिरी येथील ऐतिहासिक ‘पतितपावन मंदिर’ — ज्याची उभारणी प्रसिद्ध समाजसेवक भागोजी कीर यांनी केली होती — त्याच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज, डॉ. कुर्तकोटी, चौंडे महाराज आणि संत गाडगेबाबा यांसारखे महान संत एकत्र उपस्थित होते. ही ऐतिहासिक घटना सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा एक अत्यंत संदेश देणारी ठरली.

​राष्ट्रीय नेत्यांचे मार्गदर्शक

​राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज हे केवळ संत नव्हते, तर राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी मार्गदर्शक होते. देशातील अनेक दिग्गज व मान्यवर नेते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असत. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, वि. स. पागे, रासू गवई, गुलजारीलाल नंदा, शिवराज पाटील आणि नानाजी देशमुख यांसारख्या राष्ट्रसेवकांचा व नेत्यांचा समावेश होता.

​१९८५ मधील ऐतिहासिक प्रदर्शन

​जानेवारी १९८५ मध्ये दिल्ली येथे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्रीकांत (बाळा) सावंत यांच्या वतीने राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित एका भव्य चित्रमय जीवन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमास स्वतः राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, गृहमंत्री शंकरराव चव्हाण, संरक्षणमंत्री शिवराज पाटील आणि केंद्रीय मंत्री वसंत साठे आदी दिग्गज नेत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती. हा कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करणारा एक सुवर्णटप्पा ठरला.

​आजच्या काळाची गरज: राष्ट्रसंतांचे विचार

​आजच्या काळात राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्याने, विचारमंथन सत्रे, चित्रप्रदर्शने, समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आणि युवा प्रेरणा उपक्रम आयोजित करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. त्यांचे विचार, आदर्श आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा आगामी अनेक पिढ्यांना सदैव योग्य मार्गदर्शन करत राहील.

Facebook Comments Box

१० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांना केंद्राची मंजुरी; जुन्या नोटांचे काय होणार?

   Follow us on        

​नवी दिल्ली: आरबीआयच्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) प्रस्तावाला केंद्र सरकारने नुकतीच अधिकृत मंजुरी दिली असून, त्यानुसार देशात लवकरच १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर (प्लॅस्टिक) नोटांच्या फील्ड ट्रायल्स (प्रत्यक्ष चाचण्या) घेतल्या जाणार आहेत. या प्रयोगांतर्गत १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी एक अब्ज पॉलिमर नोटा चलनात आणून त्यांची कार्यक्षमता तपासली जाईल. या ट्रायल्स यशस्वी ठरल्यास भविष्यात या दोन्ही मूल्यांच्या नोटा नियमितपणे चलनात आणण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

​पारंपरिक कागदी चलनाच्या तुलनेत पॉलिमर किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेल्या या नोटा अधिक मजबूत आणि टिकाऊ असणार आहेत, ज्यामुळे त्या लवकर खराब होणार नाहीत. मात्र, या प्राथमिक चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पसरू शकणाऱ्या गैरसमजांवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सध्यातरी कागदी नोटा पूर्णपणे बदलण्याची कोणतीही योजना नाही किंवा कोणत्याही कागदी नोटा चलनातून मागे घेतल्या जाणार नाहीत.

​हा संपूर्ण प्रकल्प सध्या अगदी प्राथमिक टप्प्यात असून, चाचणीच्या काळात पॉलिमर आणि सध्याच्या कागदी नोटा दोन्ही एकत्रच समांतर चलनात राहणार आहेत. या चाचण्यांच्या निष्कर्षावरूनच भविष्यातील चलन धोरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search