सावंतवाडी टर्मिनसचा ‘पाणी प्रश्न’ सुटणार! वेंगुर्ला – चिपी पाणीपुरवठा-२ योजनेत पाणी मिळण्याची शक्यता

   Follow us on        

सावंतवाडी : पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व त्यांच्या उपस्थितीत तिलारी प्रकल्पावरून आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा – २ पाणीपुरवठा योजना व तिलारी पाणीपुरवठा योजना ही सौर उर्जवेर कार्यान्वित करण्यासह टप्पा -१ या योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा समावेश यात करण्यावरही सकारात्मक चर्चा झाली.

​या योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. या आदेशानुसार योजनेचे प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याच्या अनुषंगाने आज पाणीपुरवठा मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला आम. दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव वित्त विभाग, अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि प सिंधुदुर्ग, मुख्य अभियंता,जीवन प्राधिकरण ठाणे, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल, सहायक महाप्रबंधक, नाबार्ड पुणे, कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,सिंधुदुर्ग व इतर अधिकारी उपस्थित होते.

​या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष सर्वक्षण करून येत्या पंधरा दिवसात नाबार्ड योजने अंतर्गत मंजुरीसाठी शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ब्राह्मणपाट,कुंभाली सोनुर्ली व न्हावेली इत्यादी व सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित योजनांबाबत सदर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. या गावांना व सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा समावेश वेंगुर्ला ते चिपी टप्पा २ अंतर्गत समावेश करून येत्या १५ दिवसात तसा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

​या योजनेमुळे या भागातील विविध उद्योगधंदे, हॉटेल व्यवसायिक पर्यटन व्यावसायिक यांना पाण्याची पुरेशी सोय होणार आहे. पर्यटनाला चालना मिळणार असून भविष्यात चिपी विमानतळ चा विस्ताराचा अनुषंगाने फायदा होणार आहे. तसेच मार्च ते मे मध्ये किनारपट्टी भागातील गावांना पाण्याची फार मोठ्या प्रमाणात कमतरता असते. या योजनेमुळे त्या गावाचीही पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. तसेच या योजनेमुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता होणार आहे.

Facebook Comments Box

१० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर अंक वाढवून प्रवाशाची ५०० रुपयांची फसवणूक

   Follow us on        

कल्याण:

कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दिशाभूल करून फसवणूक केल्याची एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. सोलापूर येथील रहिवासी असलेल्या अतुल अडलिंगे नावाच्या व्यक्तीने एका साध्या प्लॅटफॉर्म तिकीटचा गैरवापर करत प्रवाशाची आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत आरोपीच्या आवडीच्या गैरप्रकाराला आळा घातला आहे.

​ही घटना कल्याण रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक १ वरील तिकीट काउंटर परिसरात घडली. सारिकुल दिल मोहम्मद शेख हा प्रवासी हावडा जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या प्रतीक्षेत असताना आरोपी अतुल त्याच्या संपर्कात आला. आरोपीने गोड बोलून त्या प्रवाशाचा विश्वास संपादन केला आणि त्याला रेल्वे तिकीट काढून देण्याचे आश्वासन दिले.

​विश्वास बसल्यानंतर आरोपीने प्रवाशाला रेल्वे प्रवासाचे खरे तिकीट न देता केवळ १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट आणून दिले. त्यानंतर अत्यंत चलाखीने त्या १० रुपयांच्या तिकिटावर मार्कर पेनच्या साहाय्याने ‘५’ हा अंक लिहून ते एकूण ५१० रुपयांचे अधिकृत रेल्वे तिकीट असल्याचे भासवले. या बनावट चलाखीमुळे प्रवाशाची दिशाभूल झाली.

​आरोपीने त्या बनावट तिकिटाच्या बदल्यात प्रवाशाकडून ५०० रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित प्रवासी सारिकुल शेख यांनी तात्काळ कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन याविषयीची सविस्तर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला.

​कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी अतुल अडलिंगे याला अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने व पोलिसांनी प्रवाशांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीकडून तिकीट न घेता नेहमी अधिकृत काउंटरवरून किंवा ‘यूटीएस’ मोबाईल ॲपवरूनच तिकीट खरेदी करावे, असे सांगण्यात आले आहे.

Facebook Comments Box

गॅस सिलिंडर बुकिंगची ४५ दिवसांची अट शिथिल करावी

   Follow us on        

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत असून ही अट शिथिल करून पूर्ववत १५ ते २१ दिवसांवर आणावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

   Follow us on        

सिंधुदुर्ग: ​ग्रामीण आणि शहरी भागांमधील अनेक कुटुंबांकडे केवळ एकच गॅस सिलिंडर उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत, घरगुती गॅस संपल्यानंतर पुढील बुकिंगसाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने गृहिणींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

​सध्या आगामी काळात श्रावण महिना आणि गणेशोत्सव सण जवळ येत असल्यामुळे घरात पाहुणचार, नैवेद्य तसेच विविध धार्मिक विधींचे प्रमाण वाढते. परिणामी, या सण-समारंभाच्या दिवसांमध्ये गॅसचा नियमित वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो.

​नियोजित वेळेत गॅस उपलब्ध न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण लाकूड किंवा कोळशाचा पर्याय शोधावा लागतो. यामुळे विशेषतः महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक तसेच आर्थिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

​ही सर्व गंभीर परिस्थिती लक्षात घेता, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतील यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द केले आहे. या निवेदनाद्वारे, ४५ दिवसांची ही जाचक अट तात्काळ कमी करून ती पूर्वीप्रमाणे १५ ते २१ दिवसांवर आणावी आणि नागरिकांना गरजेनुसार गॅस पुरवावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

​तसेच या कालमर्यादेचा गैरफायदा घेऊन अतिरिक्त दर आकारणाऱ्या, काळाबाजार करणाऱ्या किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आक्रमक भूमिकाही या प्रसंगी मांडण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच बाळू सावंत, युवा मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश कांबळी, योगेश देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Comments Box

कुडाळमध्ये तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची साडेतीन लाखांची फसवणूक

Three Electrical Businessmen Cheated of Rs 3.5 Lakh in Kudal

 

कुडाळमध्ये एका भामट्याने बनावट धनादेश आणि ऑनलाइन पेमेंटचा बनावट मेसेज दाखवून तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांकडून तब्बल ३ लाख ४२ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले आहे.

   Follow us on        

कुडाळ: ​कुडाळमधील गणेश नगर येथे एक मोठी इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून एका संशयित आरोपीने तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्रुत भालचंद्र नवाथे असे या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, त्याने अत्यंत शिताफीने व्यावसायिकांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्याने स्वतःला एका मोठ्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी करण्याची मागणी केली.

​या भामट्याने सुरुवातीला व्यावसायिकांना कामाचे स्वरूप आणि साहित्याची यादी पाठवून कोटेशन मागवले. त्यानंतर त्याने प्रत्यक्ष दुकानात येऊन विश्वासार्हता निर्माण केली आणि सर्व साहित्य तातडीने पुरवण्याची विनंती केली. व्यावसायिकांनी यादीतील सर्व साहित्य उपलब्ध करून दिल्यावर, त्याने पेमेंटसाठी चक्क बनावट धनादेश दिले. या धनादेशांमुळे व्यावसायिकांचा तात्पुरता विश्वास बसला, परंतु नंतर ते धनादेश वटलेच नाहीत.

​केवळ एकाच व्यावसायिकाला नव्हे, तर अन्य दोन दुकानदारांनाही या भामट्याने आपली शिकार बनवले. आदिनारायण इलेक्ट्रिकल्स आणि के. वाय. इलेक्ट्रिकल्स या दुकानांमधूनही त्याने लाखो रुपयांचे साहित्य लांबवले. यात त्याने पेमेंट झाल्याचे दाखवण्यासाठी चक्क बनावट ऑनलाइन ट्रान्झॅक्शन मेसेजचा वापर केला. मात्र, खात्यात प्रत्यक्षात रक्कम जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकांच्या लक्षात आले.

​जेव्हा संबंधित व्यावसायिकांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा मोबाईल फोन सतत बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच, पीडित व्यावसायिकांनी या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. एकूण ३ लाख ४२ हजार रुपयांच्या या आर्थिक फसवणुकीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

​सध्या कुडाळ पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून, संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस; गट आरक्षण या तारखेपासून सुरू

   Follow us on        

मुंबई:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठी वाहतूक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान कोकणातील विविध मार्गांवर एसटीच्या तब्बल ५,२२० जादा बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच गर्दीच्या काळात पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने यंदा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.

जादा बससेवेचे आरक्षण १० ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. तसेच गट आरक्षणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडेसवलत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सुविधा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करता येणार असून बसस्थानकांवरील गर्दी आणि तिकीट मिळविण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षीच्या अनुभवाचा विचार करून यंदा गणेशोत्सवासाठी अधिक प्रमाणात जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या भाविक व चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, उत्सवाच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

Facebook Comments Box

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

   Follow us on        

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती मागणी नोंदविण्यात आली आहे.

​या भरती प्रक्रियेसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) -२०२५ ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत पार पडली होती. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार प्रविष्ट झाले असून १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपली स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.

​प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिक्त पदांच्या तपशिलानुसार, जिल्हा परिषदांच्या १३,३५१, महानगरपालिकांच्या १,९५४, नगर पालिका/परिषदांच्या २८०, खाजगी संस्थांच्या १२,१४८, आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधील २,४२१ आणि शासकीय विद्यानिकेतनांच्या ५६ पदांचा यामध्ये समावेश आहे. यातील १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय तर १०,३२८ पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.

​वर्गनिवार विचार केल्यास, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १४,३२०, सहावी ते आठवीसाठी १०,०१२, नववी व दहावीसाठी ५,५१३ आणि अकरावी व बारावीसाठी ३६४ पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना पदभरतीसाठी ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ६ ऑगस्ट २०२६ पासून प्राधान्यक्रम निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​सर्व पात्र उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत अनिवार्यपणे लॉक करणे आवश्यक आहे, त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांची गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित काही सूचना किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी ठरवून दिलेल्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

Facebook Comments Box

भाजप पक्षातर्फे चाकरमान्यांसाठी ‘गणपती स्पेशल’ गाडीची घोषणा

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवाचा सण आनंदात जावा आणि मुंबईतील चाकरमान्यांचा कोकण प्रवास सुकर व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने एक  पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष उपक्रम राबवला जात असून, याद्वारे प्रवाशांना कोणत्याही शुल्काशिवाय प्रवास करण्याची पर्वणी मिळणार आहे.

​ही विशेष मोफत रेल्वे गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून कोकणातील प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होईल. नियोजित वेळापत्रकानुसार ही ट्रेन शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

​प्रवाशांच्या सुविधेचा सखोल विचार करून या गाडीचे  प्रमुख स्थानकांवर थांबण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ही रेल्वे खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.

​या मोफत रेल्वे सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पाडली जाईल. नागरिकांनी या मुदतीत दररोज दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाजप कोकण विकास आघाडीच्या मुंबई कार्यालयात जाऊन आपला आरक्षण फॉर्म जमा करणे अनिवार्य आहे.

​अर्ज करताना प्रशासनाकडून नियमांची पूर्तता स्पष्ट सांगण्यात आली असून, प्रत्येक अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार कार्डची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

Facebook Comments Box

‘नारळ लढविणे’ खेळाला ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ दर्जा मिळावा

   Follow us on        

कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला ‘नारळ लढविणे’ हा खेळ आजही ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात खेळला जातो. मात्र, आधुनिकतेच्या ओघात हा प्राचीन खेळ काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या खेळाला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळावी आणि त्याचे जतन व्हावे, या उद्देशाने या खेळाला राज्याच्या वारसा यादीत स्थान मिळावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

​या संदर्भात रवीकिरण तोरस्कर यांनी पुढाकार घेत राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्याकडे अधिकृतपणे लेखी मागणी केली आहे. या मागणीला माजी आमदार अतुल काळसेकर यांनीही खंबीर पाठिंबा दर्शविला असून, या पारंपरिक खेळाला वाचवण्यासाठी आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

​हा खेळ केवळ एक करमणुकीचा प्रकार नसून, तो कोकणच्या लोकसंस्कृतीचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. नारळाच्या कडकपणावर आधारित असलेल्या या खेळामध्ये स्थानिक लोकांचे विशिष्ट कौशल्य आणि परंपरा दिसून येते. जर या खेळाला शासनाने संरक्षित केले, तर पुढील पिढीपर्यंत ही माहिती आणि हे कौशल्य टिकून राहील आणि स्थानिक संस्कृती अधिक समृद्ध होण्यास मदत होईल.

​राज्य सरकारने या विषयाची गंभीर दखल घेऊन या खेळाला ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ जाहीर करावा, जेणेकरून स्थानिक स्तरावर या खेळाच्या स्पर्धा पुन्हा उत्साहाने आयोजिल्या जातील. यामुळे केवळ खेळाचे जतन होणार नाही, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी भावना स्थानिक क्रीडा प्रेमी आणि संस्कृती जपणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

​आता ही मागणी शासनापर्यंत पोहोचली असल्याने, सरकार याकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर या विषयावर सकारात्मक निर्णय झाल्यास कोकणची एक ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा कायमस्वरूपी जिवंत राहण्यास मोठी मदत होईल. या खेळाला राज्यस्तरावर मान्यता मिळाल्यास, तो अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

Facebook Comments Box

शालेय वेळेत शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचे आदेश

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची मासिक स्थायी समितीची बैठक नुकतीच आंबोली ग्रामपंचायत सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबदकर, विविध समित्यांचे सभापती तसेच सर्व संबंधित खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​बैठकीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सरकारी मराठी शाळांमधील खालावत चाललेल्या पटसंख्येवर आणि शिक्षकांच्या बेजबाबदारपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अध्यापनाच्या वेळेस शिक्षक मुलांकडे लक्ष न देता सतत मोबाईलवर व्हॉट्सअॅपमध्ये मग्न राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार, अशी खंत त्यांनी मांडली.

​या गंभीर तक्रारीची तत्काळ दखल घेत अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शालेय वेळेत शिक्षकांकडून होणाऱ्या मोबाईल वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे कडक आदेश दिले व त्याबाबतचे परिपत्रक काढण्यास सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबदकर यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारची कसूर किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला.

​याशिवाय, वर्गातील कौशल्य प्रकरणांवरून निर्माण झालेल्या विषयावरही सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. याप्रकरणी संबंधितांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देऊन प्रशासकीय शिस्त अधिक कडक करण्याचे संकेत देण्यात आले.

​तसेच ग्रामीण भागातील अपुऱ्या एसटी फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि गोव्याच्या बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी ‘सिंधुदुर्ग कक्ष’ व अतिरिक्त अधिकारी नेमण्याची मागणी सदस्यांनी केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Facebook Comments Box

नोकरीसाठी मुंबई पुण्याला जायची गरज नाही! देशातील सर्वात मोठे ‘आयटी हब’ कोकणात प्रस्तावित

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणामध्ये १.४३ लाख कोटी रुपयांची महाकाय गुंतवणूक करून देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारले जाणार असून, यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन या भागाचा कायापालट होणार आहे.

​महाराष्ट्रातील निसर्गरम्य कोकण किनारपट्टी आता तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर एका नवीन ओळखीसह झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या डेटा सेंटर प्रकल्पासाठी कोकणची निवड करण्यात आली असून, या प्रकल्पात तब्बल १.४३ लाख कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक प्रस्तावित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणचा औद्योगिक आणि आर्थिक चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, या क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे.

​महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) अनेक नामवंत देशी आणि जागतिक कंपन्यांनी या डेटा सेंटर प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. सध्याच्या नियोजनानुसार, सावंतवाडीजवळील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून इतर योग्य जागांचा शोधही प्रशासनाकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे.

​आजच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल युगात क्लाउड कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या तंत्रज्ञानासाठी डेटा सेंटर्सची गरज प्रचंड वाढली आहे. कोकणची भौगोलिक रचना या प्रकल्पासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मुंबई शहराच्या जवळ असणे, उत्तम दळणवळण व्यवस्था, विकसित बंदरांची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय सबमरीन डेटा केबल्सशी थेट जोडणी करण्याची सोय यामुळे उद्योजकांनी या भागाला गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे.

​या महाकाय प्रकल्पामुळे केवळ पायाभूत सुविधांचा विकास होणार नाही, तर स्थानिकांसाठी रोजगाराचे मोठे दालन खुले होणार आहे. डेटा सेंटर उभारणीपासून ते आयटी सेवा, तांत्रिक देखरेख, सुरक्षा व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांमध्ये हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी होणारे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यास मोठी मदत होणार आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होईल.

​सध्या मुंबई, पुणे आणि ठाणे ही शहरे डेटा सेंटर हब म्हणून ओळखली जातात, पण आता कोकणच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचे डिजिटल अर्थव्यवस्थेतील अग्रस्थान अधिक भक्कम होईल. पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेला कोकण प्रदेश भविष्यात ‘हाय-टेक डिजिटल हब’ म्हणून नावारूपाला येईल. हा प्रकल्प केवळ कोकणच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search