तिकीट दलालांवर IRCTC चा सर्जिकल स्ट्राईक; ३ कोटींहून अधिक बोगस खाती बंद, तर ४.८६ कोटी युजर आयडींवर ‘वॉच’!

[BLOCK ID=”GOOGLE-NEWS”]

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना सहज तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. २०२५ सालात रेल्वेने तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल ३.०३ कोटी संशयास्पद युजर आयडी (User IDs) निष्क्रिय केले आहेत. दलालांची साखळी मोडून काढण्यासाठी प्रशासनाने आता ‘आधार व्हेरिफिकेशन’ (Aadhaar-linked rules) अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

बोगस खात्यांचा सुळसुळाट थांबवला

रेल्वेने केवळ ३.०३ कोटी खाती बंदच केली नाहीत, तर आणखी ४.८६ कोटी युजर आयडी पुन्हा तपासणीसाठी (Re-validation) ठेवले आहेत. सायबर सुरक्षेचा भाग म्हणून १२,८१९ संशयास्पद ईमेल डोमेन ब्लॉक करण्यात आले असून, ३.९९ लाख संशयास्पद PNR नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर नोंदवण्यात आले आहेत. यामुळे अनधिकृतपणे तिकीट पळवणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका बसला आहे.

तांत्रिक बदल आणि ‘अँटी-बॉट’ तंत्रज्ञान

दलाल अनेकदा ऑटोमॅटिक बॉट्सचा वापर करून सेकंदात तिकीट बुक करतात. हे रोखण्यासाठी IRCTC ने ‘अँटी-बॉट’ तंत्रज्ञान आणि ‘कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क’ (CDN) प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे तिकीट बुकिंगची गती वाढेल आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय होणारी बोगस बुकिंग थांबेल.

वेबसाईट आणि ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपमध्ये मोठे बदल

प्रवाशांचा अनुभव सुलभ करण्यासाठी रेल्वेने खालील सुधारणा केल्या आहेत:

  • लॉगिन कॅप्चा (Captcha) हटवला: आता प्रवाशांना अधिक वेगाने लॉगिन करता येईल.

  • सुलभ इंटरफेस: मेनू नेव्हिगेशन आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.

  • ट्रेन लिस्ट सॉर्टिंग: आता प्रवाशांना गाड्यांची यादी सुटण्याच्या वेळेनुसार (Departure Time) लावता येईल.

  • फास्टर लोडिंग: तांत्रिक सुधारणांमुळे आता वेबसाईट आणि अ‍ॅप कमी वेळात लोड होतील.

आधार व्हेरिफिकेशन आता अनिवार्य

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, ज्या दिवशी बुकिंग सुरू होते (ARP) आणि ‘तात्काळ’ बुकिंगच्या वेळेत आता केवळ ‘आधार-व्हेरिफाईड’ युजर्सच तिकीट बुक करू शकतील. या नियमामुळे दलालांकडून होणारी तिकीटांची काळाबाजारी पूर्णपणे थांबण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

पुणेकरांसाठी खुशखबर! कोकणात जाण्यासाठी नवा शॉर्टकट; अंतर ५० किमीने घटणार

   Follow us on        

पुणे: पुणे ते रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर या दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या ताम्हिणी घाट मार्गाला दोन नवीन सक्षम पर्याय प्रस्तावित करण्यात आले असून, यामुळे प्रवासाचे अंतर ३० ते ५० किलोमीटरने कमी होणार आहे. या नवीन मार्गांमुळे प्रवासाचा वेळ दीड ते दोन तासांनी वाचणार असून इंधनाची मोठी बचत होणार आहे.

​पहिला प्रस्तावित पर्याय मुळशी-ताम्हिणी बोगदा आणि पूल प्रकल्पाचा आहे. या अंतर्गत मुळशी धरण परिसरातील वाघेवाडी ते ताम्हिणी दरम्यान नवीन पूल उभारणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा खणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे पुणे-दिघी अंतर ३० किलोमीटरने कमी होईल आणि घाटातील अवघड वळणे टाळता येतील. दुसरा आणि अधिक महत्त्वाकांक्षी मार्ग म्हणजे माणगाव-कुंभे-पानशेत मार्ग. या मार्गावर कुंभे धरणाचे काम प्रगतीपथावर असून, माणगाव ते कुंभेपर्यंत रस्ता व बोगदा तयार आहे. केवळ कुंभ्याची वाडी ते घोळ दरम्यानचा ७ किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाल्यास पुण्याला जोडणारा हा मार्ग ५० किलोमीटरचे अंतर कमी करेल.

​ताम्हिणी घाटातील वाढते अपघात आणि वाहतूककोंडी पाहता हे पर्यायी मार्ग अत्यंत गरजेचे बनले आहेत. २०२३ ते २०२५ या काळात या घाटात ९५ अपघात झाले असून ३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच, अदानी समूहाच्या भागीदारीतून दिघी बंदराचा विस्तार होत असल्याने भविष्यात या मार्गावर अवजड वाहनांची आणि कंटेनरची संख्या तिप्पट होण्याची शक्यता आहे.

​सध्या पुणे-पौड रस्ता विस्तारीकरणासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी, पुणे आणि रायगड जिल्हा प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे पुढील कामे रखडली आहेत. हे मार्ग पूर्ण झाल्यास व्यापारी वाहतुकीसह पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे सरकारने या प्रकल्पांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून केली जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: शिमगोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर धावणार एलटीटी-मडगाव विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

मुंबई: होळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत:

​१. गाडी क्र. ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टर्मिनस) स्पेशल:

​दिनांक: १ मार्च २०२६ (रविवार) आणि ८ मार्च २०२६ (रविवार).

​वेळ: मडगाव जंक्शनवरून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. गाडी क्र. ०१००३ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – मडगाव जंक्शन स्पेशल:

​दिनांक: २ मार्च २०२६ (सोमवार) आणि ९ मार्च २०२६ (सोमवार).

​वेळ: लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

​गाडीचे थांबे:

​ही ट्रेन प्रवासात दोन्ही बाजूंनी खालील स्थानकांवर थांबेल:

करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.

​गाडीची संरचना (Composition):

​या विशेष ट्रेनला एकूण २० डबे असतील, ज्यामध्ये:

​शयनयान (Sleeper) – १८ डबे

​एसएलआर (SLR/D) – ०२ डबे

​गाडी क्रमांक  ०१००४ चे  आरक्षण उद्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून चालू होणार आहे.

प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

एसटी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी: सवलतीच्या प्रवासासाठी आता ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य! नोंदणी कशी कराल?

Block "goole-news" not found

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता एसटीच्या ३० हून अधिक सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) म्हणजेच नवीन स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकतीच या डिजिटल क्रांतीची घोषणा केली.

महत्त्वाचे बदल आणि नियम:

  • सवलत कोणाला मिळणार?: महिला (महिला सन्मान योजना), ज्येष्ठ नागरिक (अमृत ज्येष्ठ नागरिक), विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार यांसारख्या सर्व सवलतधारकांना आता केवळ आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही. त्यांच्याकडे हे नवीन स्मार्ट कार्ड असणे बंधनकारक आहे.

  • कार्डची किंमत: नवीन कार्डची किंमत १९९ रुपये (GST सह) असेल. मात्र, ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांना ते जमा केल्यास नवीन कार्ड १४९ रुपयांत मिळेल.

  • रिचार्ज सुविधा: हे कार्ड एक ‘प्री-पेड वॉलेट’ म्हणून काम करेल. यामध्ये किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे आवश्यक असून, ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल.

नोंदणी प्रक्रिया कशी असेल?

प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने ३००० हून अधिक अधिकृत एजंटची नियुक्ती केली आहे. तसेच:

  1. विद्यार्थी: ‘सरल’ (SARAL) क्रमांकाशी जोडलेले कार्ड मिळेल.

  2. महिला व ज्येष्ठ नागरिक: आधार कार्डशी लिंक केलेले कार्ड दिले जाईल.

  3. दिव्यांग: युडीआयडी (UDID) क्रमांकाशी संलग्न कार्ड असेल.

  4. नोंदणी केंद्र: सर्व एसटी आगार (डेपो) आणि बस स्थानकांवर नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे.

या निर्णयाचा फायदा काय?

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. यामुळे:

  • सुट्ट्या पैशांची चिंता कायमची मिटेल.

  • सवलतींच्या वितरणात होणारी फसवणूक थांबेल.

  • ‘टॅप अँड पे’ सुविधेमुळे प्रवासाचा वेळ वाचेल.

एसटी महामंडळाने या प्रकल्पासाठी मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. लवकरच सर्व आगारांमध्ये हे कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.

Facebook Comments Box

Thane Railway Accident: ठाणे स्थानकावर गाडी पकडताना अपघात; महिलेने हात गमावला

   Follow us on        

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकावर मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक अपघातात २८ वर्षीय महिलेचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाला. ही घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) मध्यरात्री सुमारे १:१५ ते १:२२ वाजण्याच्या दरम्यान घडली.

पीडित महिलेचे नाव सीमा शब्बीर शेख (वय २८, कळवा, ठाणे) असे आहे. ती २२१७७ महानगरी एक्सप्रेसमध्ये (Mahanagari Express) चढण्याचा प्रयत्न करत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर S-5 आणि S-6 डब्यांजवळ तिचा पाय घसरला आणि ती प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील अंतरात (गॅपमध्ये) पडली. ट्रेनच्या हालचालीमुळे तिचा उजवा हात खांद्यापासून कापला गेला, तसेच उजव्या गुडघ्यालाही गंभीर दुखापत झाली.

रेल्वे पोलिस (GRP), स्टेशन स्टाफ आणि पोर्टर यांनी तात्काळ मदत केली. ट्रेन थांबवून तिला ट्रेनखालून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी तिला जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Hospital) नेण्यात आले. त्यानंतर तिला लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय (सायन हॉस्पिटल) येथे हलविण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी गर्दी कमी असली तरी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतरामुळे असे अपघात होण्याची शक्यता असते. प्रवाशांनी चढताना आणि उतरताना विशेष काळजी घ्यावी, विशेषतः एक्सप्रेस गाड्यांच्या बाबतीत.

ही घटना मुंबई उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासातील सुरक्षेबाबतच्या चिंतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची अधिक तपासणी सुरू असून, पीडितेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: खुशखबर! होळीसाठी चालविण्यात येणार दिवा – चिपळूण – दिवा विशेष अनारक्षित मेमू

   Follow us on        

दिवा: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने दिवा – चिपळूण – दिवा या मार्गावर विशेष अनारक्षित मेमू (MEMU) ट्रेन चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी १ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दोन्ही दिशांनी धावणार आहे.

​गाडी क्रमांक आणि मार्ग

​गाडी क्र. ०११५९ (दिवा ते चिपळूण): ही गाडी रात्री २३:२५ वाजता दिवा स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता चिपळूणला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११६० (चिपळूण ते दिवा): ही गाडी दुपारी १५:३० वाजता चिपळूणहून सुटेल आणि रात्री २३:१० वाजता दिव्याला पोहोचेल.

​प्रवासातील सर्व थांबे (स्थानके):

​या विशेष मेमू ट्रेनला प्रवासादरम्यान खालील स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे:

​दिवा (सुरुवात), निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी आणि चिपळूण (अंतिम स्थानक).

या विशेष फेरीमुळे दिवा ते चिपळूण दरम्यानच्या अनेक छोट्या स्थानकांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, ही गाडी पूर्णपणे ‘अनारक्षित’ (General) स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची गरज नसून रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीतून थेट तिकीट काढून प्रवास करता येईल. केवळ ८ दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेली ही सेवा रात्रीच्या वेळी प्रवास करून सकाळी कोकणात पोहोचू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी अतिशय सोयीची ठरणार आहे.

​कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी आणि स्थानिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता, अत्यंत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही गाड्यांमध्ये ३-टायर इकॉनॉमी श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार असून, त्यामुळे या गाड्यांची एकूण क्षमता आता २२ ऐवजी २३ एलएचबी (LHB) डब्यांची होणार आहे.

​या बदलाची अंमलबजावणी मडगाव-मुंबई ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ (२२११२) साठी २४ फेब्रुवारी २०२६ पासून, तर मुंबई-मडगाव ‘कोकणकन्या’ (२२१११) आणि ‘मांडवी एक्सप्रेस’ (१०१०४/१०१०३) च्या दोन्ही फेऱ्यांसाठी २५ फेब्रुवारी २०२६ पासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे ३-टायर इकॉनॉमी श्रेणीतील डब्यांची संख्या आता २ वरून ३ झाली आहे. सुधारित रचनेनुसार या गाड्यांमध्ये १ कंपोझिट डबा (प्रथम श्रेणी + २-टायर वातानुकूलित), १ स्वतंत्र २-टायर वातानुकूलित डबा, ४ डबे ३-टायर वातानुकूलित, ३ डबे ३-टायर इकॉनॉमी, ७ शयनयान श्रेणीचे डबे आणि ४ सामान्य डबे असतील. याव्यतिरिक्त १ पँट्री कार, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर डबा जोडलेला असेल.

​कोकणकन्या आणि मांडवीच्या क्षमतेत झालेली ही वाढ पाहता, आता दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्सप्रेस’चेही डबे २२ पर्यंत वाढवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून, आरक्षणासाठी होणारी ओढाताण कमी होण्यास मदत होईल.

Facebook Comments Box

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या छायाचित्रांचा अपमानजनक वापर

   Follow us on        

हरियाणा: तमाम भारतीयांचे आदर स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नको त्या ठिकाणी लावून अपमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकरी (हरियाणा) येथील मिलन बॅन्केट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा शौचालयाच्या दरवाज्यांवर लिंग-सूचक चिन्हांसोबत (HE/SHE) वापर केल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, लाखो लोकांनी याला ऐतिहासिक व्यक्तींचा आणि हिंदू आस्थेचा अपमान ठरवले आहे.व्हिडीओमध्ये दिसते की, पुरुष शौचालयाच्या दरवाज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महिला शौचालयावर महाराणी पद्मिनी यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मुघलांविरुद्ध लढणारे महान योद्धा म्हणून पूजले जातात, तर महाराणी पद्मिनी (पद्मावती) या चित्तोडच्या राजपूत राणी आणि धैर्य व बलिदानाच्या प्रतीक मानल्या जातात.

सोशल मीडियावर अनेकांनी याला “निष्काळजीपणा नव्हे, तर जाणीवपूर्वक अपमान” असे म्हटले आहे. काहींनी बॅन्केट हॉल व्यवस्थापनाकडून तात्काळ प्रतिमा काढून टाकणे, सार्वजनिकरीत्या माफी मागणे आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”हा केवळ चूक नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या भावनांवर प्रहार आहे,” असे एका युजर्सने म्हटले आहे.

अद्यापपर्यंत बॅन्केट हॉलच्या व्यवस्थापनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.ही घटना फतेहपूर सिकरी किंवा जवळच्या परिसरात असल्याचे काही पोस्टमध्ये नमूद केले जात असले तरी मुख्यतः हरियाणातील सिकरी येथे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे ऐतिहासिक व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी योग्य आदराने वापर व्हावा, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

 

Facebook Comments Box

कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण; स्थानके आणि बोगद्यांची ठिकाणे निश्चित करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापूर ते वैभववाडी या महत्त्वाच्या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी करण्यात आलेले हवाई सर्वेक्षण (एरियल सर्व्हे) पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या पुढील कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधून हा रेल्वेमार्ग जाणार असल्याने अनेक मोठे बोगदे आणि उंच पूल उभारण्याचे मोठे आव्हान या प्रकल्पासमोर आहे. हवाई सर्वेक्षणातून मार्गाची अचूक आखणी, स्थानकांची संभाव्य ठिकाणे आणि बोगद्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जमिनीवरून सर्वेक्षण करणे अवघड ठरत होते. त्यामुळे आधुनिक LiDAR तंत्रज्ञानाचा वापर करून हवाई सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून जमिनीची उंची, झाडे, अडथळे आणि भूभागाचे सविस्तर मॅपिंग करण्यात आले असून त्यामुळे रेल्वेमार्गाचे ‘अलाइन्मेंट’ निश्चित करणे अधिक सुलभ झाले आहे. अंतिम अहवालानंतर भू-संपादन प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर तसेच कर्नाटकातील काही भाग थेट कोकण रेल्वेशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. साखर, गूळ आणि इतर कृषी उत्पादनांची वाहतूक जलद गतीने बंदरांपर्यंत पोहोचू शकणार असल्याने औद्योगिक व आंतरराष्ट्रीय व्यापारालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रस्तावित मार्गामुळे बाजारभोगाव आणि शाहूवाडी परिसरात नवीन स्थानके उभारली जाण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या रेल्वेमार्गामुळे कोकण, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक यांतील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार असून पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रीमियम सेवेचा बोजवारा! मडगाव–मुंबई तेजस एक्सप्रेस तब्बल ११ तास उशिरा

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीत. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता कोकणातील प्रीमियम समजल्या जाणाऱ्या २२१२० मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेसला बसला आहे. २१ फेब्रुवारी रोजी सुटलेली ही गाडी तब्बल १० तास ५७ मिनिटे (सुमारे ११ तास) उशिराने मुंबईत पोहोचली. विशेष म्हणजे, ही गाडी नियोजित CSMT टर्मिनसऐवजी दादर येथेच थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मडगाववरून सुटणारी ही हायस्पीड गाडी मूळ वेळेपेक्षा ६ तास ५५ मिनिटे उशिराने रवाना झाली होती. प्रवासादरम्यान हा उशीर वाढतच गेला आणि दादरला पोहोचेपर्यंत तो जवळपास ११ तासांवर गेला. प्रीमियम तिकीट दर मोजूनही प्रवाशांना रात्रभर स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये ताटकळत राहावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठराविक गाड्यांवर अन्यायाचा संशय

प्रवाशांनी आरोप केला आहे की, कोकण रेल्वे मार्गावरील काही ठराविक गाड्या वारंवार उशिराने धावत आहेत.

११०९९ कुर्ला–मडगाव एक्सप्रेस ही गाडी नियमितपणे रात्री १२.४५ वाजण्याऐवजी पहाटे ५ ते ६ वाजता सुटत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. दोन महिने आधी आरक्षण करूनही वेळेवर पोहोचण्याची खात्री उरलेली नसल्याने तळकोकणातील चाकरमान्यांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न

कोकणातील प्रवाशांचे हाल होत असताना स्थानिक खासदार आणि आमदार गप्प का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. “असा प्रकार इतर राज्यांत घडला असता, तर तेथील लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

रेल्वे प्रशासनावर टीका

वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. ‘प्रीमियम सेवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसचीच अशी अवस्था असेल, तर इतर गाड्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याची आणि प्रवाशांचा मानसिक छळ सुरू असल्याची टीका होत आहे.

काही प्रवाशांनी तर वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देण्यासाठी तेजस वारंवार उशिराने चालवली जाते का? असा संशयही व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search