Railway Updates: रेल्वेच्या नियमांत बदल; विनातिकीट प्रवास करणे पडेल महागात! नवीन नियम ईथे वाचा

   Follow us on        

Railway Updates:रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या आणि रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांना आता चांगलाच दणका दिला आहे. ‘जनविश्वास (दुरुस्ती) कायदा-२०२६’ अंतर्गत रेल्वे कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांनुसार तब्बल २२ वर्षांनंतर रेल्वेने आपल्या विविध दंडांच्या रक्कमेत दुप्पट वाढ केली आहे. या नव्या नियमांनुसार, आता विना तिकीट प्रवासासाठी किमान २५० रुपयांऐवजी थेट ५०० रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. ८ एप्रिल २०२६ रोजी यासंबंधीची अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर रेल्वे मंडळाने सर्व विभागीय रेल्वेला आगाऊ सूचना जारी करत या सुधारित तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या नव्या नियमावलीनुसार केवळ विना तिकीट प्रवासच नव्हे, तर इतर अनेक प्रकारच्या नियमभंगासाठीही दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. जर कोणी महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात अनधिकृत प्रवेश केला, तर त्याला तब्बल २५०० रुपयांचा फटका बसेल. याशिवाय, दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास केल्यास किमान ५०० रुपये अतिरिक्त शुल्क, रेल्वे स्थानक किंवा परिसरात विनापरवाना फेरी मारणे अथवा भीक मागण्यासाठी २,००० रुपये दंड आणि अनधिकृत प्रवेशासाठी ५०० रुपये दंड आकारला जाईल. तसेच, सर्वाधिक दंड हा धोकादायक वस्तूंसह प्रवास करणाऱ्यांवर लावण्यात आला असून, त्यासाठी किमान १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे.

वाढती महागाई, बदललेली आर्थिक परिस्थिती आणि वंदे भारत, नमो भारत (वंदे मेट्रो), तेजस एक्सप्रेस यांसारख्या आधुनिक रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा वाढता खर्च लक्षात घेता जुना २५० रुपयांचा दंड अपुरा ठरत होता, म्हणूनच रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे की, दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित प्रवाशाविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येईल आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये थेट कारावासाची (जेलची) तरतूदही करण्यात आली आहे. अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांना जागेवरच दंड वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले असून, प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर पाऊल ठेवण्यापूर्वी हे नियम नीट जाणून घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

रेल्वेच्या सुधारित नियमांनुसार नवीन दंडाची (दंड सूची) यादी खालीलप्रमाणे आहे.

  • ​१) विना तिकीट प्रवास करणे: ₹ ५००/-

  • ​२) दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणे: ₹ ५००/-

  • ​३) बेकायदेशीर फेरीवाला (विनापरवाना विक्री करणे): ₹ २०००/-

  • ​४) दारू पिऊन गोंधळ किंवा उपद्रव निर्माण करणे: ₹ १०००/-

  • ​५) शिवीगाळ किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणे: ₹ १०००/-

  • ​६) रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे: ₹ २५००/-

  • ​७) अनधिकृत प्रवेश (अतिक्रमण करणे): ₹ ५००/-

  • ​८) वैध तिकिटाशिवाय आरक्षित डब्यातून उतरण्यास नकार देणे: ₹ २०००/-

  • ​९) चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) यांच्या आदेशांचे पालन न करणे: ₹ ५००/-

  • ​१०) पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यातून प्रवास करणे: ₹ २५००/-

  • ​११) मालाची खोटी माहिती देणे (घोषणा करणे): ₹ ५००/- प्रति क्विंटल

  • ​१२) आक्षेपार्ह किंवा धोकादायक वस्तू सोबत बाळगणे: ₹ १०,०००/-

  • ​१३) सार्वजनिक सूचनांचे विद्रुपीकरण करणे (फाडणे किंवा खराब करणे): ₹ २०००/-

  • ​१४) धूम्रपान करणे: ₹ २०००/-

Facebook Comments Box

एलटीटी स्थानकावर ५६ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक; एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे विविध पायाभूत सुविधांच्या विस्तार आणि कामांसाठी ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक बुधवार, दिनांक २४.०६.२०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून सुरू होणार असून शुक्रवार, दिनांक २६.०६.२०२६ रोजी दुपारी १६:०० वाजेपर्यंत सुरू राहील. या ५६ तासांच्या कालावधीत शंटिंग नेकचे बांधकाम, ‘सिक सायडिंग’ आणि देखभाल सायडिंग यार्डमधील बदल, तसेच पिट लाइन्सचा विस्तार आणि पाणीपुरवठा, ड्रेनेज व पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचे वळण बदलणे अशी महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत. या ब्लॉकमुळे पहिल्या ८ तासांसाठी ‘सिक कलेक्शन लाइन’ व वॉशिंग पिट लाइन क्र. ६, ७ व ८ आणि पुढील ४८ तासांसाठी वॉशिंग पिट लाइन क्र. ७ व ८ प्रभावित राहतील.

​या विशेष ब्लॉकमुळे निवडक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवांवर मोठा परिणाम होणार असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत, तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, २३ जून २०२६ रोजी प्रवास सुरू करणाऱ्या चार प्रमुख गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट (प्रवास आधीच समाप्त) केल्या जातील. यामध्ये गाडी क्र. १२६२० मंगळुरू सेंट्रल – LTT मत्स्यगंधा एक्स्प्रेस, गाडी क्र. २२१८० चेन्नई – LTT एक्स्प्रेस, गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम – LTT नेत्रावती एक्स्प्रेस आणि गाडी क्र. १५०१८ गोरखपूर – LTT एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

​याशिवाय, २४ जून २०२६ रोजीच्या रेल्वे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २४.०६.२०२६ रोजी रात्री २३:३५ वाजता सुटणारी गाडी क्र. १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्स्प्रेस आता सुधारित वेळेनुसार २५.०६.२०२६ रोजी पहाटे ०३:३० वाजता सुटेल. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी आपला प्रवास नियोजित करण्यापूर्वी सुधारित वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box

गणपतीपुळे समुद्रात ५ पर्यटक बुडाले; शोधमोहीम सुरू

   Follow us on        

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळच्या सुमारास या गटातील काही पर्यटक समुद्रात उतरले. मात्र, अचानक वाढलेल्या लाटांचा आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्यामुळे या गटातील पाच जण खोल पाण्यात वाहून गेले. अवघ्या काही क्षणांतच ते नजरेआड झाल्याने किनाऱ्यावर एकच गोंधळ आणि खळबळ उडाली.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, जीवरक्षक आणि व्यावसायिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. समुद्रातील वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अनेक अडथळे येत आहेत, तरीही बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर ही शोधमोहीम राबविली जात आहे.

​घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम वेगाने सुरू आहे. या भीषण दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: तेजस, एलटीटी-मडगाव एक्सप्रेस फेल! कोकणच्या रेल्वे गाड्यांचे Punctuality Report Card रिपोर्ट कार्ड आले समोर

   Follow us on        

मुंबई:

मुंबई आणि कोकण-गोवा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला असून, अनेक प्रमुख गाड्या तब्बल ५ ते ८ तास उशिराने धावत आहेत. एका माहिती अधिकारातून (RTI) ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवली येथील रहिवासी श्रेयस पटवर्धन यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरानुसार, या मार्गावरील गाड्यांचे वेळ पाळण्याचे प्रमाण (Punctuality rate) अवघे २०% ते ५२% दरम्यान राहिले आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​आरटीआयमधील आकडेवारीनुसार, कोकण रेल्वेची अत्यंत लोकप्रिय आणि प्रिमियम मानली जाणारी ‘मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस’ (२२१२०) १ नोव्हेंबर २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधीत १४२ फेऱ्यांपैकी तब्बल ११३ वेळा उशिराने धावली. या गाडीचे वेळ पाळण्याचे प्रमाण फक्त २०.४२% इतके नीचांकी नोंदवले गेले आहे. तर मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस (२२११९) ७८ फेऱ्यांमध्ये उशिराने आली असून तिची वेळ पाळण्याची टक्केवारी ४५.०७% आहे. याशिवाय एलटीटी-मडगाव एसी एक्सप्रेस (५२.६३%), मडगाव-एलटीटी एसी एक्सप्रेस (३०.३५%), करमाळी-एलटीटी एसी एक्सप्रेस (२५%) आणि मंगळुरू-सीएसएमटी एक्सप्रेस (३२.४८%) या गाड्यांची कामगिरीही अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

​केवळ गाड्यांच्या विलंबाचाच नव्हे, तर ट्रेनमधील अपुऱ्या सुविधांचाही फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तेजस एक्सप्रेस सारख्या महागड्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केले जाते, मात्र तरीही सुविधांचा दर्जा प्रचंड घसरला आहे. प्रवाशांच्या तक्रारींनुसार, गाडीतील इन्फोटेनमेंट सिस्टीम (स्क्रीन) बंद असून अनेक ठिकाणी सीटच्या मागे असलेल्या स्क्रीन काढून तिथे साधे प्लायवूडचे पॅनेल लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, जादा पैसे मोजूनही जर ७-८ तास उशीर होणार असेल आणि सुविधा मिळणार नसतील, तर रेल्वे प्रशासनाचा हा मनमानी कारभार थांबणार कधी? गाड्या रात्री उशिरा पोहोचत असल्यामुळे प्रवाशांना घरी जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी मिळण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत.

​गाड्यांच्या या विलंबावर कोकण रेल्वे (KR) प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा मार्ग एकेरी (सिंगल लाईन) असल्याने आणि पावसाळ्यापूर्वीची सुरक्षा कामे (Pre-monsoon works) सुरू असल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. पावसाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी ही कामे करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच गेल्या काही वर्षांत या मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये झालेली वाढ देखील या विलंबाला कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

​दरम्यान, ‘कोकण विकास समिती’ या प्रवासी संघटनेचे सदस्य अक्षय महापदी यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे. त्यांच्या मते, मडगाव एक्सप्रेस, वंदे भारत, जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस या सर्व गाड्या एकापाठोपाठ एक मडगावच्या दिशेने धावत असल्याने गाड्यांची गर्दी (bunching) होते आणि नियंत्रण करणे कठीण होते. त्यामुळे तेजस एक्सप्रेस आधीप्रमाणेच मडगावऐवजी करमाळी स्टेशनपर्यंतच चालवावी, जेणेकरून वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.

Facebook Comments Box

पुढील ४८ तासांत हवामानात बदल; मुंबई – कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज!

   Follow us on        

मुंबई: मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील पाऊसप्रेमींसाठी अखेर एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे मुंबईकर चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. मात्र, आता ही प्रतीक्षा संपणार असून पुढील ४८ तासांत (२१-२२ जून) या संपूर्ण परिसरातील हवामानात खूप मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे.

​रविवार रात्रीपासूनच वातावरणात वेगाने बदल होण्यास सुरुवात होईल. समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर वाढणार असून, हा वाढता आर्द्रतेचा प्रभाव मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पावसाच्या हालचालींना गती देईल. यामुळे रविवारच्या उत्तरार्धापासूनच मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढताना दिसेल.

​हवामान अंदाजानुसार, हा बदल केवळ एका-दोन दिवसांपुरता मर्यादित नसून मुंबईकरांसाठी येणारा संपूर्ण आठवडा जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा असण्याची दाट शक्यता आहे. संततधार आणि मुसळधार पावसामुळे वातावरणात छान गारवा निर्माण होईल, ज्यामुळे मुंबई आणि कोकण परिसरातील नागरिकांना कडक उन्हाच्या झळा आणि उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

सिंधुदुर्ग:

राज्यात सध्या ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात कमालीची वाढ झाली असून, पावसानेही ओढ दिली आहे. या बदलत्या तीव्र हवामानाचा आणि वाढत्या उन्हाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये, म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून, आता या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवार दिनांक १९ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी हा बदल लागू असेल. या काळात शाळेची वेळ सकाळी ७.०० ते ११.१५ वाजेपर्यंत असणार आहे.

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद मधुकर कामत आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खांडेकर (भा.प्र.से.) आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्वच शैक्षणिक संघटनांनी शाळांच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले असून आता शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत.

Facebook Comments Box

Sawantwadi: शेतकर्‍याच्या विहिरीत आढळल्या तब्बल १६ मगरी

   Follow us on        

सावंतवाडी:

इन्सुली क्षेत्रफळ डोबवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत चक्क १५ पिल्लांसह पडलेल्या एका ७ ते ८ फूट लांबीच्या महाकाय मगरीला वन विभागाने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. इन्सुली येथील रहिवासी संतोष नेवगी यांच्या शेतातील विहिरीत रविवारी एक मोठी मगर आणि तिच्यासोबत लहान पिल्ले असल्याचे निदर्शनास आले होते. विहिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मगरी असल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. नेवगी यांनी तातडीने या घटनेची माहिती वन विभागाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील आणि सावंतवाडी येथील आर. आर. टी. (रॅपिड रेस्क्यू टीम) तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

​विहिरीची खोली आणि मगरीचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, वन विभागाच्या पथकाने आधुनिक साधनांचा वापर करून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत शिताफीने मोहीम राबवली. त्यांनी प्रथम मोठ्या मगरीला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा तिच्या १५ लहान पिल्लांना विहिरीबाहेर काढले. अशाप्रकारे एकूण १६ मगरींना जीवनदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. या सर्व मगरींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

​या धडक मोहिमेत पथक प्रमुख बबन रेडकर, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, देवेंद्र परब, पुंडलिक राऊळ, वनरक्षक अतुल पाटील, वनरक्षक पवन तारपे आणि वनरक्षक सदाशिव मोहिते यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. वन विभागाच्या या तत्परतेबद्दल आणि धाडसी कामगिरीबद्दल इन्सुली गावकऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

आंबोली घाटात दरड कोसळली; मोठी दुर्घटना टळली, धोका मात्र कायम

   Follow us on        

आंबोली: पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध आंबोली घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अचानक दोन भलेमोठे दगड (दरड) कोसळले. मुख्य धबधब्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर घाटमाथ्यावरून हे दोन मोठे दगड अचानक खाली आले.

यातील एक भलामोठा दगड थेट मुख्य रस्त्यावरून घरंगळत खाली दरीत कोसळला, तर दुसऱ्या मोठ्या दगडाचे तुकडे होऊन ते रस्त्यावरच विखुरले. दगड थेट खाली दरीत गेल्यामुळे घाटातील संरक्षक कठडा आणि रॅलींग पूर्णपणे तुटली आहे. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.

​दरम्यान, या घटनेनंतरही आंबोली घाटातील धोका अद्याप कायम आहे. घाटाच्या माथ्यावर अजूनही असे अनेक मोठे दगड सैल अवस्थेत अडकलेले आहेत, जे कधीही खाली रस्त्यावर कोसळू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात घडणारा मोठा अनुचित प्रकार किंवा अपघात टाळण्यासाठी वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. घाटमाथ्यावरील धोकादायक ठरू शकणारे सैल दगड आधीच बाजूला करावेत आणि रस्त्यावरील पडलेले दगड हटवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.

Facebook Comments Box

दुर्दैवी घटना! आईनेच पाजले पोटच्या मुलांना विष; तिघा चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!

   Follow us on        

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथील खरवली आदिवासी वाडी येथे एका आईने आपल्या चार लहान मुलांना विषारी थंडपेय पाजल्यानंतर स्वतःही विषप्राशन केले. या दुर्दैवी आणि विदारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत विषबाधेमुळे आईसह तिच्या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला असून, इतर दोन मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आशा जाधव (वय २९) यांनी बाजारातून आणलेल्या थंडपेयामध्ये विषारी औषध मिसळले. त्यानंतर त्यांनी हे विषयुक्त थंडपेय आपल्या चार मुलांना पाजले आणि स्वतःही त्याचे प्राशन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती वेगाने बिघडू लागली. मुलांना व आईला उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान आशा जाधव यांच्यासह त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशा जाधव (वय २९), नंदिनी जाधव (वय ७) आणि दुर्वा जाधव (वय ६) यांचा समावेश आहे.

​या घटनेत इतर दोन मुलांचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. डॉक्टर या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या आईने एवढे टोकाचे पाऊल का उचलले आणि या कौटुंबिक दुर्घटनेमागचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Facebook Comments Box

चिपळुणात आढळला अत्यंत दुर्मिळ प्राणी

   Follow us on        

चिपळूण: निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणातील जंगलांनी नेहमीच अनेक दुर्मीळ वन्यजीवांना आपल्या कुशीत सामावून घेतले आहे. याचाच एक अनोखा प्रत्यय नुकताच चिपळूण शहरात आला, जिथे देशातील अत्यंत दुर्मीळ आणि आकाराने सर्वात लहान मानले जाणारे ‘माऊस डियर’ (Indian chevrotain) थेट नागरी वस्तीजवळ फिरताना आढळून आले. चिपळूण येथील प्रसिद्ध डी.बी.जे. कॉलेज परिसरातील रहिवासी बाळकृष्ण पालकर यांच्या घरामागे हा आगळावेगळा जीव अचानक अवतरला होता.

​नेहमी पाहण्यात येणाऱ्या प्राण्यांपेक्षा हा जीव खूपच वेगळा आणि लहान आकाराचा असल्याने पालकर यांचे लक्ष तिकडे गेले. त्यांनी वेळ न घालवता लगेचच या प्राण्याचे काही फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. सुरुवातीला काहीसा रहस्यमय वाटणारा हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून, अत्यंत लाजाळू मानला जाणारा ‘माऊस डियर’ असल्याचे स्पष्ट झाले. मानवी वावराची चाहूल लागताच हे छोटेसे हरिण काही वेळातच जवळच्या डोंगराच्या दिशेने पसार झाले.

​वन्यजीव अभ्यासकांच्या मते, माऊस डियर हा प्रामुख्याने निशाचर प्राणी असून तो मानवी वस्तीपासून दूर राहणे पसंत करतो. दिवसाच्या वेळी हा प्राणी दाट झाडीझुडपांमध्ये स्वतःला लपवून ठेवतो, ज्यामुळे त्याचे दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ असते. साधारणपणे एखाद्या मांजराच्या किंवा सशाच्या आकाराचे असणारे हे हरिण चपळाईसाठी ओळखले जाते. यापूर्वीही चिपळूणच्या कचरा डेपो परिसरात एका डॉक्टरांना हे हरिण दिसले होते, ज्यामुळे या भागात त्यांचे अस्तित्व कायम असल्याचे सिद्ध होते.

​आजच्या काळात शहरांचा विस्तार झपाट्याने होत असतानाही चिपळूणच्या परिघातील डोंगरांमध्ये अशा दुर्मिळ जीवांचे वास्तव्य असणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आणि अभिमानास्पद बाब आहे. बाळकृष्ण पालकर यांनी टिपलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावरील वन्यजीवप्रेमींच्या ग्रुप्समध्ये कमालीचे व्हायरल होत असून, या परिसरातील जैवविविधतेचे रक्षण करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search