सिंधुदुर्गातील ६,७१० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; ५३.८३ कोटींची कर्जमाफी मंजूर

   Follow us on        

​सिंधुदुर्ग नगरी:

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना एकूण ५३ कोटी ८३ लाख २० हजार ४९१ रुपयांच्या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

​या कर्जमाफी योजनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची २० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांमधील २,७०२ शेतकऱ्यांना एकूण ३३ कोटी १३ लाख ६३ हजार ४९१ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याशिवाय, जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पात्र यादी तयार केली जाणार आहे.

​दुसरीकडे, शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीची कर्जे असणे, तसेच काही कर्जदार विविध शासकीय किंवा इतर पदांवर कार्यरत असणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकीत कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. सर्व माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ‘आधार प्रमाणीकरणासाठी’ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्रांमार्फत आपले आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Facebook Comments Box

राजापूर: रेल्वेच्या धडकेत ४ दुभत्या म्हशींचा मृत्यू; संरक्षक फेन्सिंगची मागणी

   Follow us on        

राज्यापूर: तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तातडीने मिळालेल्या माहितीनुसार, तळगाव येथील एका गरीब शेतकऱ्याच्या चार दुभत्या म्हशी चाऱ्याच्या शोधात मोसम परिसरातील रेल्वे मार्गाजवळ गेल्या होत्या. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात चारही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुभती जनावरे दगावल्याने संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या अनेक संवेदनशील भागांमध्ये आजही रेल्वे प्रशासनाने कोणतीही संरक्षक फेन्सिंग (कुंपण) उभारलेली नाही. त्यामुळे जनावरे सहजपणे रेल्वे रुळांवर पोहोचतात आणि अशा अपघातांना बळी पडतात. या भागात डिसेंबर महिन्यानंतर गुरे मोकाट सोडण्याची प्रथा असल्याने, जनावरे चाऱ्याच्या शोधात रेल्वे मार्गाकडे आकर्षित होतात. फेन्सिंगचा अभाव असल्यामुळे यापूर्वीही अनेक बैल, गाई आणि म्हशींचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही.

​सर्वात खेदाची बाब म्हणजे, अशा अपघातांमध्ये जनावरे दगावल्यानंतर शेतकऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसानभरपाई मिळत नाही. शेतीसोबतच दुग्धव्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दुभत्या जनावरांचा मृत्यू हा एक दुहेरी आर्थिक फटका ठरतो. या गंभीर परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना भक्कम संरक्षक फेन्सिंग बसविण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वेत २३ लाख रुपयांचा गैरव्यवहार; प्रकरण न्यायालयात

   Follow us on        

मडगाव:

मडगाव आणि वेर्णा येथील कोकण रेल्वेच्या रनिंग रूमच्या देखभालीच्या कामात सुमारे २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने कोकण रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांसह दोन कंत्राटदारांविरुद्ध दक्षिण गोव्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये मडगाव विभागाचे तत्कालीन वरिष्ठ प्रादेशिक यांत्रिक अभियंता मंजनाथ क्षेत्रपाल, तत्कालीन मुख्य लोको निरीक्षक गोर्धनलाल बलई आणि कंत्राटदार एम. के. बेलवाडी व उदय के. बेलवाडी यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

​दक्षिण गोवा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी २९ जून २०२६ रोजी या प्रकरणातील काही आरोपांमध्ये अंशतः बदल करण्यास परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आणि खोटी कागदपत्रे वापरणे अशा विविध कलमांखाली हे आरोपपत्र सादर केले आहे.

​सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीत मडगाव आणि वेर्णा येथील रनिंग रूमच्या देखभालीसाठी सादर करण्यात आलेल्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. कंत्राटदारांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) संदर्भातील बनावट कागदपत्रे जोडून खर्च फुगवून दाखवला होता. तपासात असे समोर आले आहे की, प्रत्यक्षात कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन, ईपीएफ आणि ईएसआयसी योगदानाचा खोटा खर्च दाखवून सुमारे २३ लाख रुपयांचा आर्थिक लाभ उठवण्यात आला. या गैरव्यवहारामुळे कोकण रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी विशेष न्यायालयात होणार आहे.

Facebook Comments Box

ट्रान्स हार्बर रेल्वे स्थानकांच्या चुकीच्या नावांची दुरुस्तीची प्रतिक्षाच

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने वर्ष २००५ मध्ये मध्य रेल्वेला पाठवलेल्या एका महत्त्वाच्या पत्रात ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गिकेवरील स्थानकांची नावे गंभीरपणे चुकीची लिहिण्यात आली आहेत. ५ फेब्रुवारी २००५ रोजीच्या या पत्रात (क्रमांक No. RLY 1002/1766/CR-253/TRA-5) ठाणे-तुर्भे नवीन रेल्वे मार्गावरील स्थानकांची मंजूर नावे देताना ‘ऐरोली’ ऐवजी ‘ऐरावली’ (AIRAVALI), ‘रबाळे’ ऐवजी ‘राबाडा’ (RABADA) आणि ‘कोपरखैरणे’ ऐवजी ‘कोपर खैर्ना’ (KOPAR KHAIRNA) अशी अशुद्ध नावे अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहेत.

 

या चुका स्थानिक नागरिकांच्या भौगोलिक ओळखीला धक्का पोहोचवणाऱ्या आहेत आणि रेल्वे प्रवाशांना दररोज गोंधळात टाकत आहेत.सुभाष जगताप यांनी सोशल मीडियावर या पत्राची प्रत शेअर करत या चुकीकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह विभागाला टॅग करून तातडीने या नावांमध्ये सुधारणा करण्याची नम्र विनंती केली आहे. ट्रान्स हार्बर लाइन ही मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी महत्त्वाची रेल्वे प्रकल्प आहे. या मार्गावरून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. अशा स्थितीत चुकीची नावे अधिकृत दस्तऐवजात राहिल्याने प्रवाशांना तिकिट बुकिंग, प्लॅटफॉर्म ओळख आणि स्थानिक सल्ला यामध्ये अडचणी येत आहेत.या पत्रात इंग्रजी, हिंदी आणि मराठी (देवनागरी) अशा तीनही भाषांमध्ये चुकीची नावे दिली गेली आहेत.

 

२१ वर्षे उलटूनही या अशुद्धींमध्ये सुधारणा न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली असून, अधिकृत सुधारणेसाठी लवकरच पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Facebook Comments Box

आंबोलीत विजेच्या तारेचा धक्का लागून गाभण म्हशीसह रेडकाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली:

येथील मुळवंदवाडी भागात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीच्या (वीज तारेच्या) संपर्कात आल्याने एका गाभण म्हशीसह रेडकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गुरे शेतात चरण्यासाठी गेली असता हा अपघात झाला. या घटनेत शेतकरी सरमळकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, परिसरातील नागरिक गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखत इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

​घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने मृत गुरांचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, बाधित शेतकरी सरमळकर यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने गुरांचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, आंबोलीतील नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल धोकादायक स्थितीत असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Facebook Comments Box

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाच्या २ जुलै २०२६ रोजीच्या अहवालानुसार, मुंबईच्या प्रमुख धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ७.१८% वरून ८.१२% पर्यंत वाढला आहे. गेल्या २४ तासांत ०.९४% इतकी वाढ नोंदवली गेली आहे.

अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, विहार आणि तुलसीसह विविध धरणांमध्ये पाऊस पडल्याने ही वाढ झाली. येत्या काही दिवसांत आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी ही चांगली बातमी असली तरी, सध्याची पातळी अद्याप अतिशय कमी आहे. गेल्या वर्षी याच काळात साठा ४३% च्या आसपास होता. नागरिकांनी पाण्याचा जागरूक वापर करावा आणि वर्षाव संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

कुडाळमध्ये बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

कुडाळ:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वन विभागाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. येथील प्रसिद्ध ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वन विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३० जून २०२६ रोजी सावंतवाडीच्या वनक्षेत्रपालांना या बेकायदेशीर काळ्याबाजाराविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष या दुकानाची अचानक झडती घेतली. या कारवाईदरम्यान दुकानातून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी उघडकीस आल्या.

​दुकानाच्या झडतीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून तयार केलेले अनेक अवयव हस्तगत करण्यात आले. यामध्ये बिबट्याची ६ अस्सल नखे, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली ६ बनावट नखे, बिबट्यांच्या नखांचे इतर २० अवयव आणि बिबट्याचे २ सुळे (दात) यांचा समावेश आहे. शिकार करून हे अवयव केवळ विक्रीच्या उद्देशाने दुकानात बेकायदेशीरपणे बाळगण्यात आले होते. वनविभागाने हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

​या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आणि दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला वन विभागाने तात्काळ अटक केली आहे. आरोपीने बिबट्याची नखे आणि अवयव विक्रीसाठी बाळगल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्याला कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी (Forest Custody) सुनावली आहे. ही धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.

Facebook Comments Box

कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’

   Follow us on        

रत्नागिरी:

गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ व्यक्ती आणि ५ संस्था यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने यावर्षी आपल्या वर्धापनदिनी एक कौतुकास्पद व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन २०२६ च्या वर्धापनदिनानिमित्त कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’ देण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. महिला सक्षमीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून हा विशेष सन्मान केला जाणार आहे. सेवा काळात या महिला स्टेशन मास्तरांनी दाखवलेले कमालीचे प्रसंगावधान, चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रवाशांचे संरक्षण, रस्ता चुकलेल्यांची त्यांच्या घरच्यांशी घडवून आणलेली पुनर्भेट, रोखलेल्या संभाव्य आत्महत्या आणि कसोटीच्या वेळी दाखवलेले धैर्य व तत्परता याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

​बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्षेत्रातील दिवाणखावटी ते मडूरे या २६ स्थानकांपैकी १७ स्थानकांवर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांना या पुरस्कारांतर्गत व्यक्तिगत सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक देऊन गौरविण्यात येणार आहे. ३१ मे २०२६ अखेर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांसाठी हा एकच निकष लावून ही निवड करण्यात आली आहे. या सन्मानमूर्तींमध्ये ७ महिला स्टेशन मास्तर रत्नागिरी जिल्ह्यातील असून १० जणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. कोकण रेल्वेच्या सेवा नियमांचे पालन करून या उपक्रमांतर्गत गौरविमूर्तींना कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक लाभ दिला जाणार नाही. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी कोकण रेल्वेचे रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट आणि जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी विशेष सहकार्य केले आहे.

​पुरस्कार जाहीर झालेल्या १७ महिला स्टेशन मास्तरांचा सेवाकालावधी ४ वर्षे ते ३० वर्षे असा व्यापक आहे. यामध्ये मडूरे स्टेशनच्या प्रतीक्षा लक्ष्मण गावकर या सर्वात सेवाज्येष्ठ आहेत, तर रत्नागिरी स्टेशनच्या चैताली राजेंद्र कल्याणकर या सर्वात तरुण स्टेशन मास्तर आहेत. एकूण १७ पैकी १५ महिला स्टेशन मास्तर मुळच्या कोकणातीलच रहिवासी आहेत. यापैकी सौ. अनुराधा रितेश पवार या सावंतवाडी स्थानकावरून जून २०२६ मध्ये २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ९ महिला स्टेशन मास्तर या रेल्वेसाठी जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त गटातील आहेत, २ जणी अनुकंपा तत्त्वावर लागून पदोन्नती झालेल्या आहेत, तर उर्वरित ६ महिला थेट स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यातील ३ जणींचे पतीसुद्धा कोकण रेल्वेमध्येच कार्यरत आहेत. तसेच सौ. अनघा राजाराम नाटेकर यांनी १९९५ मध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी रोजंदारीवर देखील काम केले होते, ही एक गौरवास्पद बाब आहे.

​या गौरविमूर्तींपैकी ५ जणींना विविध वर्षी कोकण रेल्वेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या (CMD) पुरस्काराने आधीच सन्मानित करण्यात आलेले आहे. २ जणींना रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे १००० रुपयांचे विशेष रोख पारितोषिक, तर २ जणींना रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक यांचे विशेष प्रमाणपत्र आणि १००० रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच चैताली राजेंद्र कल्याणकर यांना त्यांच्या कार्यमूल्यमापनात प्रथम आल्यामुळे ‘केआरए’ पुरस्कार प्राप्त आहे, तर सौ. मनीषा हरिश्चंद्र तटकरी यांना दोन वेगवेगळ्या वर्षी दोन वेगवेगळ्या स्थानकांवर दोन वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.

​पुरस्कार प्राप्त १७ महिला स्टेशन मास्तरांमध्ये मनीषा हरिश्चंद्र तटकरी (कळंबणी बुद्रुक), अस्मिता तुकाराम सावंत (खेड), श्रद्धा समीर चिले (खेड), शिल्पा शंकर दपके (चिपळूण), निकिता निलेश पवार (कडवाई), अनघा राजाराम नाटेकर (रत्नागिरी), चैताली राजेंद्र कल्याणकर (रत्नागिरी), प्राजक्ता प्रदीप कांबळे (खारेपाटण), अंजली श्रीराम चाळके (नांदगाव), मनस्वी सुभाष कदम (नांदगाव), विशालम दिनेश बेटकर (कणकवली), रंजना दीपक माने (कणकवली), सुविधा इमानवेल स्वामी (सिंधुदुर्ग), मेघा कमलाकर नागवेकर (सिंधुदुर्ग), प्रज्ञा भालचंद्र नाईक (झारप), अनुराधा रितेश पवार (सावंतवाडी) आणि प्रतीक्षा लक्ष्मण गावकर (मडूरे) यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील पहिल्या १० दिवसांत एकूण १२ महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान त्यांच्या सेवेच्या ठिकाणी प्रत्यक्ष केला जाणार असून, उर्वरित ५ महिला स्टेशन मास्तरांचे सन्मान साहित्य त्यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठविले जाईल, अशी माहिती बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड. सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी दिली आहे.

Facebook Comments Box

Heavy Rainfall Alert for Palghar: उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

   Follow us on        

पालघर:

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, म्हणजेच २ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. इंदू राणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत अधिकृत आदेश जारी करून ही माहिती दिली आहे.

​या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था उद्या पूर्णपणे बंद राहतील. मात्र, या सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

​’एसटी’च्या तीर्थाटन योजनेत खाजगी भागीदारीला हिरवा कंदील

   Follow us on        

मुंबई, १ जुलै २०२६:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) महत्त्वाकांक्षी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी खाजगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील हजारो भाविकांना सुरक्षित, सुसूत्र, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, यामुळे एसटी महामंडळाला अतिरिक्त महसुलाचा नवा स्रोत निर्माण होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

​या नव्या धोरणानुसार, तीर्थाटन व धार्मिक सहलींचे नियोजन, निवास, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक (गाइड), टोल, पार्किंग आणि प्रवेश शुल्क यांसारख्या सर्व पूरक सुविधा खाजगी पर्यटन संस्थांमार्फत पुरविल्या जातील. मात्र, बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवासभाड्याचे संपूर्ण उत्पन्न हे पूर्णपणे एसटी महामंडळाकडेच राहणार आहे. यामुळे भाविकांना सर्व आवश्यक सुविधा ‘वन-स्टॉप’ पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि एसटीच्या उत्पन्नालाही मोठी चालना मिळणार आहे.

​या योजनेअंतर्गत बस आरक्षणासाठी प्रत्येक बसमध्ये बसच्या आसनक्षमतेनुसार प्रवासी असणे बंधनकारक राहील. विशेष म्हणजे, शासनाच्या विविध सामाजिक घटकांना लागू असलेल्या सर्व प्रवास सवलती या योजनेतही कायम राहतील, ज्यामुळे खाजगी पर्यटन संस्थांच्या इतर पॅकेजेसच्या तुलनेत या योजनेतील प्रवास खर्च अत्यंत कमी आणि सर्वसामान्यांना परवडणारा असेल. निवास, भोजन, पिण्याचे पाणी, चहा-नाष्टा, पर्यटनस्थळांचे प्रवेश शुल्क, मार्गदर्शक, पार्किंग आणि टोल या सर्व सुविधा वाजवी दरात आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खाजगी संस्थांची असेल. तसेच, या सुविधांमधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी किमान १० टक्के हिस्सा एसटी महामंडळाला देणे या संस्थांना बंधनकारक राहील.

​योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निविदा (RFP) प्रक्रियेद्वारे राज्यातील सहा प्रदेशांसाठी प्रत्येकी एका पर्यटन संस्थेची, अशी एकूण सहा नामांकित संस्थांची निवड केली जाणार आहे. संबंधित संस्थांना पर्यटन क्षेत्रातील अनुभव, शासनमान्य नोंदणी तसेच आवश्यक पात्रता असणे अनिवार्य असेल. सुरुवातीला हा प्रकल्प दोन वर्षांच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे पुढील विस्ताराचा निर्णय घेतला जाईल. याशिवाय, तीर्थाटन योजनेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी खाजगी पर्यटन संस्थांना एसटीचा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगी देखील दिली जाणार आहे.

​”भाविकांच्या श्रद्धेला सेवाभावाची जोड आणि एसटीच्या आर्थिक बळकटीला नवा आधार” या दुहेरी उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देण्याबरोबरच एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search