Konkan Railway: कुडाळ स्थानकावर बेकायदा तिकीट विक्री करणाऱ्या दलालाला अटक

   Follow us on        

कुडाळ: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) पथकाने ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत कुडाळ रेल्वे स्थानकावर धडक कारवाई करत एका तिकीट दलालाला (टाउट) रंगेहात पकडले आहे. या कारवाईत दलालाकडे ३,५८० रुपये किमतीचे एक अवैध ‘तत्काळ’ तिकीट सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. हे तिकीट काळ्या बाजारात चढ्या दराने विकण्याच्या उद्देशाने काढण्यात आले होते. अशा अवैध विक्रीमुळे सामान्य प्रवाशांना हक्काची तिकिटे मिळवण्यात अडचणी येत होत्या.

​स्थानकावर नियमित तपासणी सुरू असताना आरपीएफला या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला. प्राथमिक चौकशीत तो बेकायदेशीरपणे तिकीट विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कलमांतर्गत रेल्वे तिकिटांची अनधिकृत खरेदी-विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जातो.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी ‘ऑपरेशन उपलब्ध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रवाशांना पारदर्शक पद्धतीने आणि योग्य किमतीत तिकिटे मिळावीत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कोकण रेल्वे मार्गावर आरपीएफ पूर्णपणे सतर्क असून, प्रवाशांनीही कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करू नये आणि काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ आरपीएफला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

मुंबई-गोवा महामार्गावर मे महिन्यापासून टोल वसुली सुरू

   Follow us on        

​मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या टोल वसुलीसाठी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या असून, २३ एप्रिल ही निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे. २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जातील आणि त्यानंतर ठेकेदार निश्चित केला जाईल. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास मे २०२६ पासून प्रत्यक्ष टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​जानवली पूल ते पत्रादेवी या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ही टोल वसुली केली जाणार आहे. यामध्ये दुचाकी आणि तीन आसनी वाहनांना सवलत देण्यात आली असून, उर्वरित सर्व वाहनांना टोल भरावा लागणार आहे. या मार्गावरून वार्षिक सुमारे ५७.८८ कोटी रुपयांचा टोल जमा होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

​विशेष म्हणजे, यापूर्वी जून २०२३ मध्ये हा टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, टोल विरोधी कृती समिती आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे ही वसुली बंद करावी लागली होती. गेल्या तीन वर्षांपासून या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नव्हती, परंतु आता महामार्गाचे चौपदरीकरण पूर्णत्वाकडे जात असल्याने प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा टोलवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Facebook Comments Box

दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेचा मध्य रेल्वेला १० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

   Follow us on        

मुंबई:कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. मंगळवारी त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी मध्य रेल्वेने कोकणच्या प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी:

या भेटीदरम्यान खासदार सावंत यांनी केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील इतरही बंद असलेल्या गाड्यांचा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, मुंबई-सावंतवाडी ट्रेन आठवड्यातून फक्त एकदाच चालवली जाते, ती दररोज सुरू करणे आवश्यक आहे तसेच, मराठवाड्यातून सुटणारी नांदेड-पुणे गाडी पुण्याऐवजी हडपसरला थांबवली जाते, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गाडी हडपसर ऐवजी थेट पुणे स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

​रेल्वेच्या ‘मराठीद्वेषा’वर संताप:

खासदार सावंत यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत ‘मराठीद्वेष’ थांबवण्याचे आवाहन केले. ‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसाच्या वेळी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करणे आणि ‘रेल वन ॲप’मध्ये मराठी भाषेचा समावेश न करणे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि शिवडीतील एंड-टू-एंड पुलाचे रखडलेले काम या प्रश्नांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला रेल्वेचे अधिकारी आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Comments Box

वास्को-पटना एक्सप्रेस: कोकणी जनतेला नको असलेली गाडी

   Follow us on        

मळगाव : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी वास्को-पटना सुपरफास्ट एक्सप्रेस सध्या कोकणातील स्थानिक प्रवाशांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे. ही गाडी दर बुधवारी धावते, परंतु ती गोवा राज्यातील वास्को आणि मडगाव स्थानकावरूनच इतकी तुडुंब भरून येते की, सावंतवाडी रोड स्थानकावर गाडीत पाऊल ठेवणेही अशक्य झाले आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव थांबा दिला असला, तरी त्याचा उपयोग येथील जनतेपेक्षा परप्रांतीयांच्या प्रवासासाठीच अधिक होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

​या गाडीतील प्रवासादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गाडीमध्ये नेहमीच परप्रांतीयांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे स्थानिक प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले आहे. विशेषतः आपल्या कुटुंबाला आणि महिलांना घेऊन या गाडीने प्रवास करणे आता धोकादायक वाटू लागले आहे. सुरक्षित प्रवासाची कोणतीही खात्री रेल्वे प्रशासन देऊ शकत नसल्याने, प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून संतापाची लाट उसळली आहे.

​रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आरक्षित डब्यांची (Reserved Coaches) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या डब्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांमुळे आरक्षित डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत झाले आहे. ज्या प्रवाशांनी आधीच आरक्षण केले आहे, त्यांनाही स्वतःच्या जागेवर बसणे कठीण झाले आहे. या गर्दीमुळे सावंतवाडी स्थानकावरून गाडीत चढणे शक्य नसल्याने अनेक प्रवाशांना आपले तिकीट रद्द करावे लागते, परिणामी रेल्वेला दर आठवड्याला हजारो रुपयांचा परतावा द्यावा लागत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

​सावंतवाडी स्थानकावरील या गाडीचा थांबा केवळ तांत्रिक किंवा नावापुरताच मर्यादित राहिला आहे. या गाडीमुळे कोकणात परप्रांतीयांची संख्या तर वाढत आहेच, पण स्थानिक कोकणी माणसाला मात्र या सेवेचा कोणताही लाभ मिळत नाही. परप्रांतीयांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानिक प्रवाशांच्या सोयीकडे आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. आरक्षित डब्यातही नियमांची पायमल्ली होत असल्याने प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

“ज्या गाड्यांचा फायदा कोकणातील जनतेला नाही, त्या गाड्या आमच्या मार्गावर कशासाठी?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. वास्को-पटना सारख्या गाड्यांमुळे स्थानिक प्रवाशांना कोणताही दिलासा मिळत नसून, त्याऐवजी कोकणच्या हक्काच्या गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

​पुणे आणि कल्याणसाठी हव्यात स्वतंत्र गाड्या

सध्या कोकणातून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. परंतु, रेल्वे प्रशासन या गरजेकडे डोळेझाक करत आहे. वास्को-पटना सारखी गाडी अव्यवस्थितपणे चालवण्यापेक्षा, पुणे-सावंतवाडी आणि कल्याण-सावंतवाडी या मार्गांवर नियमित गाड्या सुरू केल्यास त्याचा थेट फायदा येथील स्थानिक जनतेला आणि चाकरमान्यांना होईल. पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरदारांची संख्या मोठी असतानाही पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सचे दर प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत.

Facebook Comments Box

शक्तीपीठ महामार्ग रधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ जर राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणला नाही, तर या जिल्ह्याला महामार्गाचा ‘बगल’ मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन आणि स्थानिक व्यापारावर होईल, असा इशारा माजी आमदार संदेश पारकर यांनी दिला आहे.

​पारकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारकडे मागणी केली आहे की, सध्या आखण्यात येत असलेल्या महामार्गाच्या आराखड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला योग्य स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा महामार्ग जिल्ह्याबाहेरून गेला, तर कोकणातील आर्थिक चक्रावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

पर्यटनाला मिळणार मोठी चालना

​महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेल्यास गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक मजबूत होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवासाची सोय होईल. राधानगरी मार्गे जोडणी मिळाल्यास खालील पर्यटन स्थळांना मोठा फायदा होऊ शकतो:

​किल्ले: सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग आणि रांगणा किल्ला.

​किनारे: तारकर्ली आणि देवबाग.

​थंड हवेची ठिकाणे: आंबोली आणि सावंतवाडी.

धार्मिक स्थळांचा विकास

​केवळ निसर्ग पर्यटनच नाही, तर धार्मिक पर्यटनालाही यामुळे गती मिळेल. कुणकेश्वर, आंगणेवाडी, मांगरूर दत्त मंदिर आणि वालावल लक्ष्मीनारायण मंदिर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर भाविकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही पारकर यांनी नमूद केले.

​जर महामार्गाने सिंधुदुर्गला वळसा घातला, तर जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आराखड्यात बदल करून राधानगरी मार्गे सिंधुदुर्गचा समावेश करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांकडून केली जात आहे.

Facebook Comments Box

मल्टीमोडल कॉरिडोर की ‘मल्टीमोडल’ लूट? विरार-अलिबागसाठी भारी टोल

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरसाठी पूर्ण १२६ किलोमीटर अंतरासाठी ₹७६५ इतका टोल आकारण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. इन्फ्रा न्यूज इंडियाने यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, प्रति किलोमीटर ₹६.०७ इतका टोल दर अत्यंत जास्त आहे. प्रकल्प अद्याप सुरूही झालेला नसताना इतका उच्च दर निश्चित करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत MSRDCकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.

१२६ किलोमीटर लांबीचा मल्टीमोडल कॉरिडोर विरार ते अलिबाग दरम्यान थाणे आणि नवी मुंबई मार्गे जोडणारा असेल. यात रस्ता, रेल्वे आणि बससाठी वेगवेगळ्या समर्पित लेन असतील. भूमी संपादन प्रक्रिया सुरू असून, BOT मॉडेलवर टेंडर प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्याप बांधकाम सुरू नसताना टोल दर ₹७६५ ते ₹१००० पर्यंत असल्याच्या बातम्यांमुळे लोक संतापले आहेत.

काहींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा उल्लेख करत याची तुलना केली आहे.नागरिक आणि सोशल मीडियावर या उच्च टोल दरावर टीका होत आहे. MSRDCने याबाबत लवकरात लवकर अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

 

 

Facebook Comments Box

एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या दोन लोकल; मुंबईत मोठा अपघात थोडक्यात टळला

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे घडली. तांत्रिक चुकीमुळे एकाच ट्रॅकवर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सुमारे १३० मीटर अंतरावर गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

​मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरकडून सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येणे अपेक्षित होते. मात्र, सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी किंवा मानवी चुकीमुळे ही गाडी चुकीच्या पद्धतीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर वळवण्यात आली. विशेष म्हणजे, याच प्लॅटफॉर्मवर आधीच दुसरी एक लोकल उभी होती. जेव्हा बदलापूर लोकल प्लॅटफॉर्म ५ च्या ट्रॅकवर शिरली, तेव्हा मोटरमनच्या लक्षात आले की होम सिग्नल लाल आहे आणि समोर दुसरी गाडी उभी आहे. त्याने त्वरित आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली, ज्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर राहिले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म ५ ते ८ पर्यंतची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आणि दोन्ही गाड्या सुरक्षितरीत्या मागे घेण्यात आल्या. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु सध्या सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी परिसरातच एक दिवसापूर्वी डिरेलमेंटची (रुळावरून डबा उतरणे) घटना घडली होती, त्यापाठोपाठ हा प्रकार घडल्याने रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेवर टीका होत आहे. रेल्वे प्रशासनाने या ‘रॉग रुटिंग’ प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

Facebook Comments Box

डोंबिवली लोकल अपघात: रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप

   Follow us on        

डोंबिवली: डोंबिवली स्थानकाजवळ सोमवारी सकाळी रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, रविवारीच या भागात ‘मेगा ब्लॉक’ घेऊन देखभालीची कामे करण्यात आली होती आणि त्यानंतर काही तासांतच हा अपघात झाल्याने रेल्वेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ही घटना सकाळी ८:०९ वाजता घडली जेव्हा ही ट्रेन कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. ट्रेन रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘मुंबई रेल प्रवासी संघ’चे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी सांगितले की, रविवारी मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली दरम्यान फलाट विस्तार आणि रुळांशी संबंधित महत्त्वाची कामे करण्यात आली होती. मेगा ब्लॉक संपल्यानंतर लगेचच अशा प्रकारे ट्रेन रुळावरून घसरणे हे देखभालीच्या कामातील निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जा दर्शवते. तसेच, कडक उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कामाच्या नियोजनाचा अभावही यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

​रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सकाळी १०:१० वाजेपर्यंत रेल्वे डबा पुन्हा रुळावर चढवण्याचे काम पूर्ण झाले आणि १०:४५ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत १२ गाड्या वळवण्यात आल्या आणि ९ गाड्या रद्द कराव्या लागल्या. प्रवाशांनी आणि तज्ज्ञांनी मागणी केली आहे की, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या ट्रॅकवर काम सुरू असते, तिथे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात यावेत जेणेकरून कामाचा दर्जा राखला जाईल.

Facebook Comments Box

सरकारचा मोठा निर्णय! आपसातील जमीन वाटपासाठी लागणारे नोंदणी शुल्क माफ

   Follow us on        

मुंबई:महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतजमीन वाटपाच्या नोंदणीसाठी लागणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आता वारसाहक्काने किंवा आपापसातील सहमतीने होणाऱ्या शेतजमीन वाटपासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यासंदर्भात महसूल विभागाकडून सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आवश्यक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

​पूर्वी शेतजमिनीचे वाटप करताना जमिनीच्या एकूण किमतीच्या १ टक्के नोंदणी शुल्क आकारले जात होते. ही रक्कम मोठी असल्याने अनेक शेतकरी अधिकृत दस्तनोंदणी करणे टाळत असत. यातूनच पुढे कुटुंबात जमिनीच्या मालकीवरून वादाचे प्रसंग निर्माण व्हायचे आणि शेतकऱ्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागायचा. मात्र, आता शुल्कमाफी झाल्यामुळे दस्तनोंदणी करणे सोपे होणार असून, यामुळे जमिनीचे वाद कमी होण्यास मदत होईल.

​महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार, शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून दस्त तयार केले जातात. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार असून, जमिनीच्या अधिकृत नोंदणीच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाच्या या पावलामुळे ग्रामीण भागातील जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Facebook Comments Box

देवगड: कुणकेश्वर येथे प्राचीन ‘गंगाकुंड’ सापडले; २५० ते ३०० वर्षे जुने असण्याचा अंदाज

   Follow us on        

देवगड:दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरात एका प्राचीन ‘गंगाकुंडाचा’ शोध लागला आहे. मंदिरापासून साधारण १ ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कुणकेश्वर-खालचीवाडी येथील ओहोळाजवळ हे पुरातन कुंड असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. हे गंगाकुंड सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

​स्थानिक ग्रामस्थ संतोष लब्दे, संतोष लाड आणि शरद वाळके यांनी राबवलेल्या शोधमोहिमेमुळे हे दुर्लक्षित कुंड पुन्हा समोर आले आहे. अनेक वर्षांपासून झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि गाळ साचल्यामुळे हे कुंड पूर्णतः बुजून गेले होते. या शोधानंतर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आणि कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

​या कुंडाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून ते जांभ्या दगडात कोरलेले आहे. हे कुंड साधारण ६ बाय ६ फूट आकाराचे असून, त्यात विहिरीसारखी खोदाई करण्यात आली आहे. त्याच्या आत पुन्हा ३ बाय ३ फुटांचा एक खोल भाग असून त्याची खोली अंदाजे ५ ते ६ फूट आहे. विशेष म्हणजे, या कुंडात एका चौकोनी पारावर जांभ्या दगडात कोरलेले देखणे शिवलिंगही आहे. सध्या या कुंडात सुमारे तीन फूट खोलीपर्यंत काचेसारखे स्वच्छ पाणी साचलेले दिसत आहे.

​कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांनी माहिती दिली की, १९९२ मध्ये श्रीदेव कुणकेश्वर मंदिराच्या ‘वज्रलेपा’साठी याच गंगाकुंडातील पवित्र पाण्याचा वापर करण्यात आला होता. हे गंगाकुंड प्राचीन काळातील उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे. स्वच्छता केल्यामुळे या ऐतिहासिक वारशाला आता पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली असून, या शोधामुळे कुणकेश्वरच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search