कोलंबो: ICC टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान या बहुचर्चित सामन्यावरून निर्माण झालेला वाद अखेर निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याचा निर्णय मागे घेतला असून, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे हा सामना खेळवला जाणार असल्याचे वृत्त आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या भूमिकेमुळे PCB अडचणीत आले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कठोर भूमिका घेत संभाव्य कारवाईचा इशारा दिल्यानंतर PCB ने आपली भूमिका बदलली. ICC चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लाहोरमध्ये PCB सोबत प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच ICC चे CEO संजोग गुप्ता यांनी कोलंबोमध्ये PCB अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या बैठकींना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लामही उपस्थित होते. चर्चेनंतर भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता बळावली आहे. ICC ने ‘फोर्स मॅज्यूर’ कलमाचा आधार घेत सामना टाळण्याच्या PCB च्या भूमिकेवर स्पष्टीकरणही मागितले होते.
दरम्यान, बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांना स्पर्धेतून वगळून स्कॉटलंडला संधी देण्यात आली होती. पाकिस्तानने सुरुवातीला बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ICC च्या मध्यस्थीमुळे आणि खेळाच्या हिताला प्राधान्य देत पाकिस्तानने अखेर यू-टर्न घेतला आहे.
आता क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना मानला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथे रंगणार असल्याची दाट शक्यता आहे.











