सावंतवाडी (प्रतिनिधी):
प्रादेशिक विमान वाहतूक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘फ्लाय ९१’ या विमान सेवेकडून प्रवाशांसाठी ‘स्मार्टबॅग ९१’ ही नवीन ग्राहक-केंद्रित सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना सोबत अतिरिक्त सामान (Excess Baggage) नेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक, त्रासमुक्त आणि परवडणारी व्हावी, या उद्देशाने ही विशेष सुविधा आणली गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही सुविधा केवळ आंतरराष्ट्रीय कनेक्टिंग प्रवासापुरती मर्यादित नसून संपूर्ण फ्लाय ९१ नेटवर्कवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रादेशिक विमान वाहतुकीत ग्राहकांसाठी अशा प्रकारची सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे.
’कनेक्टिंग भारत’ या ध्येयातून सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रादेशिक हवाई सेवा देण्याचा फ्लाय ९१ चा प्रयत्न असून, अतिरिक्त सामानाशी संबंधित अनिश्चितता आणि जास्त शुल्क या प्रवाशांच्या मोठ्या समस्येवर ‘स्मार्टबॅग ९१’ हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या वेळीच ५ किलो ते ३० किलोपर्यंत जादा सामानाचे विविध पर्याय निवडता येतील. यासाठीचे दर केवळ १,००० रुपयांपासून सुरू होऊन कमाल ३० किलो जादा सामानासाठी फक्त ३,००० रुपयांपर्यंत असतील. त्यामुळे घरगुती प्रवासी, स्थलांतर करणारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबासह लांबच्या प्रवासाला निघणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठी आर्थिक निश्चितता आणि लवचिकता मिळणार आहे.
या नवीन सुविधेबाबत बोलताना फ्लाय ९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले की, “‘स्मार्टबॅग ९१’ द्वारे आम्ही आमच्या ग्राहकांचे प्रवासविषयक निर्णय अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि त्रासमुक्त बनवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः हैदराबाद आणि बेंगळुरू सारख्या महत्त्वाच्या हवाई मार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा अधिक उपयुक्त ठरेल.” ही सेवा जागतिक विमानवाहतूक धोरणांशी सुसंगत असून विमानतळावर शेवटच्या क्षणी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत करेल.
डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनाचा भाग म्हणून फ्लाय ९१ कडून ग्राहकांना व्हॉट्सॲपद्वारे ऑटो चेक-इन, यूपीआय (UPI) आधारित क्यूआर-सक्षम इनफ्लाइट सेवा आणि सुलभ प्रवासी प्रक्रिया यांसारख्या आधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. गोव्यात मुख्यालय असलेली फ्लाय ९१ कंपनी सध्या भारतातील १२ प्रमुख शहरांना जोडते. यामध्ये गोवा (मोपा), पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, कोची, अगत्ती, राजामुंद्री, विजयवाडा आणि हुबळी या शहरांचा समावेश आहे.












