”दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह कोविड काळात बंद झालेल्या गाड्या सुरू करा अन्यथा…” मनसेचा रेल्वे प्रशासनाला इशारा

   Follow us on        

मुंबई: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्र. ५०१०३/४) रद्द करून त्याऐवजी दादर-गोरखपूर गाडी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाचा विरोध केला आणि मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

​स्थानिक प्रवाशांच्या अडचणींकडे दुर्लक्ष

​नितीन सरदेसाई यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. कोविड काळात बंद झालेल्या मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस आणि पुणे-भुसावळ पॅसेंजर यांसारख्या अनेक गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अशातच आता दादर-रत्नागिरी ही कोकणवासीयांची हक्काची गाडी रद्द करून त्याऐवजी गोरखपूर गाडी सुरू करणे, हा कोकणवासीयांवर अन्याय आहे.

​प्रमुख मागण्या आणि इशारा:

​दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादर स्थानकावरूनच सोडण्यात यावी.

​कोविड काळात रद्द करण्यात आलेल्या महाराष्ट्रांतर्गत गाड्या पुन्हा त्वरित सुरू कराव्यात.

​स्थानिक प्रवाशांना डावलून परराज्यातील प्रवाशांना झुकते माप देणे रेल्वेने थांबवावे.

​”कोकणवासीयांना आणि महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा दुजाभाव रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. रेल्वेने या निर्णयाची तात्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा सज्जड दम नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.

​या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री (नवी दिल्ली) आणि कोकण रेल्वेचे व्यवस्थापक (बेलापूर) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कोकणवासीय आणि मुंबईकर प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, आता रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

Mumbai – Pune Connectivity: मुंबई पुणे महामार्गाचा भार कमी करण्यासाठी पर्यायी महामार्गाला मंजूरी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने नेरळ-शिरूर (उरण-शिरूर) चौपदरी महामार्ग प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

सुमारे १२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी एक नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. हा १२० किलोमीटर लांबीचा महामार्ग नवीन मुंबईतील नेरुळ/उरण येथून सुरू होऊन कर्जत, नेरळ, पाबळ, मलठण येथून शिरूर (पुणे-अहिल्यानगर महामार्ग) पर्यंत जाईल. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भार लक्षणीयरीत्या कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. शिवाय चाकण, तळेगाव, शिक्रापूरसारख्या औद्योगिक क्षेत्रांना चांगली जोडणी मिळेल आणि रायगड व पुणे जिल्ह्यातील रिअल इस्टेट व लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

खासदार अमोल कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले जाते. तथापि, अनेक नागरिक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत की, “घोषणा तर होतात, पण प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल?” अशा अनेक प्रकल्पांप्रमाणे या महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे वाहतुकीला नवी गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला हातभार लागेल.

 

 

Facebook Comments Box

कोकणकरांची गाडी वाचविण्यासाठी मनसे आक्रमक

   Follow us on        

मुंबई : दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन बंद करून त्याच वेळापत्रकात आणि प्लॅटफॉर्मवरून दादर-गोरखपूर एक्सप्रेस गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे.

उद्या, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांसह कोकणवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेने केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा कायमची बंद करून तिच्या जागी उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाणारी एक्सप्रेस सुरू केल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी दादरहून सुटणारी ही पॅसेंजर आता दिवा जंक्शनवरून चालवली जात असल्याने कोकणवासीयांना अतिरिक्त प्रवास आणि असुविधा भोगावी लागत आहेत. हा निर्णय कोकणातील स्थानिकांच्या हक्कांवर हल्ला असल्याचे मत मनसेने व्यक्त केले आहे.

“प्रश्न जिथे जनतेचा मार्ग, तिथे मनसेचा” या घोषणेनुसार मनसे या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत आहे. कोकणातील भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणवासी आणि महाराष्ट्र सैनिकांनी या आंदोलनात सामील होऊन आपली एकजूट दाखवावी, असे मनसेने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधावा.

Facebook Comments Box

‘ओंकार’ला महाराष्ट्रातच रोखण्यासाठी गोवा वनविभागाची अनोखी युक्ती

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमाभागात सध्या वन्य हत्तींचा वावर चिंतेचा विषय ठरत असतानाच, गोवा वनविभागाच्या एका धक्कादायक मोहिमेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘ओंकार’ नावाचा वन्य हत्ती गोव्याच्या हद्दीत येऊ नये, यासाठी गोव्याचे वन कर्मचारी चक्क महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन त्याला गुळ, केळी आणि विविध फळे खाऊ घालत असल्याचे समोर आले आहे.

गोव्याने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली असली, तरी यामुळे महाराष्ट्रातील शेती आणि बागायती धोक्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना महाराष्ट्र आणि सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वन्य हत्तीला अशा प्रकारे खाद्य देऊन एकाच भागात रोखून धरले जात असताना स्थानिक वनाधिकाऱ्यांनी याला ‘मूक संमती’ दिल्याचे चित्र दिसत आहे. डोळे उघडे असूनही गांधारीची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र वनविभागाच्या या उदासीनतेमुळे सीमाभागातील नागरिक संतप्त झाले असून, हत्तीच्या या कायमस्वरूपी वास्तव्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

Photo Credit – AI

Facebook Comments Box

Konkan Railway: लागून आलेल्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई, दि. २३ मार्च : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वेने मुंबई CSMT आणि मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे क्रमांक ०११२९ मुंबई CSMT–मडगाव विशेष गाडी ३ एप्रिल (शुक्रवार) आणि ५ एप्रिल (रविवार) रोजी मुंबई CSMT येथून रात्री १२:२० वाजता सुटणार असून त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तसेच, रेल्वे क्रमांक ०११३० मडगाव–मुंबई CSMT विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी मडगाव येथून सायं. ४:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कर्णाली या स्थानकांवर थांबणार आहेत.

गाडीची रचना एकूण २२ डब्यांची असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ५, स्लीपर – १०, जनरल – ४ आणि एसएलआर – २ डबे असतील.

या विशेष गाडीचे आरक्षण २४ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रे, इंटरनेट व IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

एप्रिल महिन्यात सुरवातीच्या आठवड्यात हनुमान जन्मोत्सव, गुड फ्रायडे आणि शनिवार – रविवार सुट्ट्या लागून आल्याने प्रवाशांची गर्दी होणे अपेक्षित असल्याने ही गर्दी कमी करण्याच्या हेतूने या गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावर टायर जळवून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रकार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावशी-घावनळे फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्याची घटना घडली आहे. आज (सोमवारी) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी महामार्गावर टायर ठेवून त्यांना आग लावली. यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात धूर आणि आग पसरली, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांची रीघ लागली.

कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आग विझवली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ही घटना नांदगाव आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडली असून, याचा त्यांच्याशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत राहिली. प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

Facebook Comments Box

मुंबई उपनगरीय लोकल सेवा संपूर्णपणे एसी करण्याच्या दिशेने प्रवास सुरू

   Follow us on        

मुंबई: मुंबईत उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, घामाघूम करणाऱ्या उकाड्यामुळे मुंबईकरांचा कल आता वातानुकूलित (AC) लोकल प्रवासाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहे. साधारणपणे मार्च महिन्यापासूनच उष्णतेने जोर धरल्याने एसी लोकलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत दररोज सरासरी १.५८ लाख असणारी प्रवाशांची संख्या मार्चमध्ये २.०५ लाखांच्या पार गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत या गर्दीत आणखी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील फेऱ्यांचा विस्तार

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ केली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १० एसी गाड्या असून त्याद्वारे दररोज १३३ फेऱ्या चालवल्या जात आहेत. २०२३ मध्ये या फेऱ्यांची संख्या केवळ ९६ होती, ज्यामध्ये आता २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, मध्य रेल्वेवरही २०२३ मध्ये असणाऱ्या ६६ फेऱ्यांची संख्या २०२६ पर्यंत ९४ वर पोहोचली आहे. जसजसे नवीन रेल्वे संच उपलब्ध होतील, तसतसे या फेऱ्यांचे नियोजन आणखी वाढवण्यात येणार आहे.

मुंबईकरांच्या सेवेत येणार २३८ नवीन एसी लोकल

मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या दिशेने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मोठे पाऊल उचलले आहे. ‘एमयूटीपी-३’ आणि ‘३-ए’ प्रकल्पांतर्गत सुमारे १९,२९३ कोटी रुपये खर्चून एकूण २३८ नवीन एसी लोकल खरेदी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या या गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, या नवीन गाड्या दाखल झाल्यामुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा होणार आहे.

एसी लोकलच्या फेऱ्या वाढवणे ही प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असली, तरी अनेक प्रवाशांनी या गाड्यांच्या वक्तशीरपणाबाबत आग्रही भूमिका मांडली आहे. फेऱ्यांची संख्या वाढवण्यासोबतच गाड्या वेळेवर धावणे गरजेचे असल्याचे मत नियमित प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन सध्या उपलब्ध संसाधनांचा वापर करून जास्तीत जास्त प्रवाशांना गारव्याचा प्रवास देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून वाढत्या उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळेल.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: पर्यटनाचा नवा ट्रेंड ठरतोय स्थानिकांची डोकेदुखी

   Follow us on        

दोडामार्ग: उन्हाळा सुरू होताच दोडामार्ग तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळताना दिसत आहे. विशेषतः गोवा तसेच आसपासच्या भागातील युवक-युवतींचा कल तिराळी नदी परिसराकडे वाढला असून, अनेक ठिकाणी बेधडकपणे पाण्यात उतरण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर फायदा होण्याऐवजी मनस्ताप आणि धोकेच अधिक वाढताना दिसत आहेत.

सासोलीतून वानोशीला जाताना तिराळी नदीवरील मधल्या बंधाऱ्यावर तसेच इतर भागात रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. या गर्दीत मद्यपी पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने परिसरातील वातावरण बिघडत आहे. मद्यधुंद अवस्थेत होणारी हुल्लडबाजी, आरडाओरड आणि अनुशासनहीन वर्तनामुळे या भागातील शांतता धोक्यात आली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक पर्यटकांना नदीच्या पाण्याचा वेग, खोली किंवा धोकादायक ठिकाणांची पुरेशी माहिती नसतानाही ते थेट पाण्यात उतरतात. सासोली व वानोशी येथील पूल सध्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, येथे फोटोसेशन करणे, पुलावरून उड्या मारणे आणि पोहणे असे धाडसी प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात. परिणामी, बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, माहितीअभावी काही पर्यटकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

या वाढत्या धोक्यांकडे लक्ष वेधत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. संबंधित ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, जीवनरक्षक कर्मचारी किंवा साधे सूचना फलकही नसल्याने अपघातांची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, मद्यपान करून येणाऱ्यांवर कारवाई करावी आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Photo Credit – AI

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व थांब्यांसाठी चाकरमान्यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना साकडे

   Follow us on        

ठाणे:​ कल्याण-उल्हासनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या “खासदार आपल्या भेटीला” या उपक्रमाला कोकणी चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सावंतवाडी रेल्वे स्थानकातील प्रलंबित प्रश्न आणि टर्मिनसच्या कामासाठी उल्हासनगर आणि डोंबिवलीतील कोकणवासीयांनी खासदारांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

​प्रमुख मागण्या आणि निवेदन

​कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मुंबई समन्वयक श्री. दर्शन विठ्ठल नाईक (उल्हासनगर) यांनी खासदारांशी संवाद साधला. तसेच डोंबिवली येथील कार्यक्रमात ऍड. विनायक राणे यांनी देखील रेल्वे प्रश्नांकडे खासदारांचे लक्ष वेधले. निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

​मंगलोर एक्सप्रेस: सावंतवाडी स्थानकात या गाडीला अधिकृत थांबा देण्यात यावा.

​थांब्यांची पुनर्स्थापना: कोविड-१९ काळात बंद करण्यात आलेल्या गरीब रथ आणि राजधानी एक्सप्रेसचे सावंतवाडी येथील थांबे पुन्हा सुरू करावेत.

​टर्मिनसचे काम: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे.

​खासदारांचे आश्वासन

​खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व मागण्या अत्यंत सकारात्मकतेने जाणून घेतल्या. “या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेईन. कोकणी चाकरमान्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि सावंतवाडीकरांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

​”कोकणवासीयांच्या रेल्वे प्रवासातील अडचणी सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

— डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार.

​सहकार्य आणि आभार

​उल्हासनगर लोकसभा संपर्क कार्यालयात श्री. अरुण तांबे यांनी हे निवेदन सादर करण्यासाठी विशेष सहकार्य केले. त्यांच्या या पुढाकाराबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि सावंतवाडी मुंबई विभागाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या रेल्वे प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Facebook Comments Box

रेल्वेच्या नव्या ‘रेलवन’ ॲपचा फज्जा; तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी हैराण

   Follow us on        

​नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केलेले नवीन ‘रेलवन’ ॲप सध्या तांत्रिक बिघाडांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. १ मार्चपासून जुने लोकप्रिय ‘यूटीएस’ (UTS) ॲप टप्प्याटप्प्याने बंद करून ‘रेलवन’ ॲप अनिवार्य करण्यात आले, मात्र तेव्हापासून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिथे यूटीएस ॲपचे पाच कोटींहून अधिक वापरकर्ते होते, तिथे तांत्रिक गोंधळामुळे रेलवन ॲप वापरणाऱ्यांची संख्या केवळ एक कोटीच्या आसपास राहिली आहे. म्हणजेच सुमारे चार कोटी प्रवाशांनी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे पाठ फिरवली आहे.

​प्रवाशांच्या तक्रारीनुसार, या नवीन ॲपमध्ये लॉग-इन करताना वारंवार अडचणी येत आहेत. अनेकदा वॉलेटमधून पैसे वजा होतात, मात्र तिकीट जनरेट होत नाही. अशा वेळी स्थानकांवर मदत करण्यासाठी कोणतेही ‘प्रवासी दूत’ किंवा मदत कक्ष उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दहिसर आणि मुलुंड येथील प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, सर्व चाचण्या पूर्ण न करताच हे ॲप अनिवार्य केल्यामुळे प्रवाशांना पुन्हा तिकीट खिडकीवरील लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

​या ॲपमध्ये खरं तर उपनगरीय रेल्वेसह मेल-एक्सप्रेसचे तिकीट काढणे, पीएनआर तपासणे, डब्यांची रचना पाहणे आणि रेल्वे प्रवासात जेवण ऑर्डर करणे अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारीचा मागोवा घेण्याची (Tracking) सोयही यात आहे. मात्र, ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’ (क्रिस) कडून विकसित करण्यात आलेल्या या ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे या सर्व सुविधा प्रवाशांसाठी कुचकामी ठरत आहेत. यासंदर्भात रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search