नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी पुणे स्थानकापर्यंत न्यावी

   Follow us on        

नांदेड:

नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी पूर्ववत पुणे शहरातील मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत चालवावी आणि आगामी काळात सुरू होणारी मुंबई-हैदराबाद ‘वंदे भारत स्लिपर’ रेल्वे पुणे-सोलापूरऐवजी मनमाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या मराठवाडा मार्गावरून चालवावी, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या नांदेड विभागातील खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते. हडपसर स्थानक प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीचे असून, गाडी पहाटे तिथे पोहोचत असल्याने पुणे शहरात जाण्यासाठी प्रवाशांचे मोठे हाल होतात, याकडे त्यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.

​या बैठकीत खासदार चव्हाण यांनी मराठवाड्यातील पायाभूत सुविधा, प्रवाशांची सुरक्षा आणि शेतकरी-व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. मुंबई-हैदराबाद वंदे भारत स्लिपर मराठवाड्यातून नेल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागांना प्रीमियम रेल्वे सेवा मिळेल, असा महत्त्वाचा प्रस्ताव त्यांनी मांडला. यासोबतच, लातूर-दौंड मार्गे नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही नवीन रेल्वे आणि नांदेड-छत्रपती संभाजीनगर पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. नांदेड-लातूर, नांदेड-बिदर आणि बोधन-मुखेड-लातूर या रेल्वे मार्गांच्या कामांना रेल्वेने पहिली प्राथमिकता द्यावी, असे सांगतानाच बिदर प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुदखेड येथील फुल उत्पादकांसाठी माल चढवण्या-उतरवण्यासाठी पुरेसा वेळ आणि थांबे देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, खतांच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून नांदेड जिल्ह्यात ३-४ ठिकाणे निश्चित करण्याची सूचना केली. रेल्वेचे उड्डाणपूल आणि सदोष भुयारी मार्गांमुळे साचणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे त्यांनी फोटोंसह लक्ष वेधले आणि तिथे फूट ओव्हर ब्रिज अनिवार्य करण्याची मागणी केली. याशिवाय, ‘वन डिस्ट्रिक्ट, वन डिव्हिजन’ धोरण राबवून महाराष्ट्राच्या हद्दीतील सर्व स्थानके नांदेड डिव्हिजनमध्येच ठेवावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. या बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर, रवींद्र चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, बंडू जाधव यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Facebook Comments Box

अवघ्या काही सेकंदांत होणार जमीन मोजणी! अत्याधुनिक ‘रो्अर’ मशिन्स दाखल

   Follow us on        

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता कमालीची गती मिळणार आहे. भूमिअभिलेख विभागाच्या दिमतीला तब्बल ७८ अत्याधुनिक ‘रो्अर’ (ROVER) मशिन्स दाखल झाल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघ्या ३ ते १० सेकंदांत जमिनीचे अचूक रीडिंग मिळून अक्षांश-रेखांशासह जमिनीचा नकाशा (मॅप) स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. यामुळे मोजणीतील मानवी त्रुटी दूर होऊन जमिनीचे वाद मिटण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय शासनाने मोजणी शुल्कात मोठी कपात केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘भाऊ हिस्सा’ वेगळा करण्याचे शुल्क दोन हजार रुपयांवरून थेट २०० रुपयांवर आणले गेले आहे, ज्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या वार्षिक महसुलात काहीशी घट झाली आहे.

​भूमिअभिलेख विभागाने मोजणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी पूर्वीचे क्लिष्ट प्रकार बंद करून आता केवळ ‘साधी मोजणी’ आणि ‘जलद मोजणी’ असे दोनच प्रकार ठेवले आहेत. नवीन नियमांनुसार, १० हेक्टर जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यापुढील प्रत्येक हेक्टरसाठी नियमानुसार शुल्क वाढणार आहे. जिल्ह्यात मोजणी कामांसाठी पुरेसे सर्व्हेअर (भूमापक) नियुक्त करण्यात आले असून मनुष्यबळाचा कोणताही प्रश्न सध्यातरी प्रलंबित नाही. या नवीन रो्अर मशीनमुळे आता प्रत्यक्ष बांधावर होणारी कलाई आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.

​दुसरीकडे, जिल्ह्यात अजूनही जमीन मोजणीची ३५० प्रकरणे प्रलंबित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक जमिनींचे खातेदार नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मोजणीच्या वेळी सर्व संबंधित भागधारकांची सांगड घालणे प्रशासनाला कठीण जात असून, सर्व खातेदार वेळेत एकत्र येत नसल्यामुळेच ही मोजणी रखडल्याचे चित्र आहे. मात्र, मुंबई-पुण्यातील खातेदारांनी सहकार्य केल्यास ही प्रलंबित ३५० प्रकरणेही काही दिवसांत निकाली निघतील, असा विश्वास भूमिअभिलेख विभागाने व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

हवामान विभागाचे चार रंगांचे अलर्ट कसे काम करतात? जाणून घ्या सविस्तर

   Follow us on        

​विशेष प्रतिनिधी, मुंबई:

पावसाळ्यात किंवा बदलत्या हवामानामध्ये हवामान विभागाकडून अनेकदा विविध रंगांचे अलर्ट जारी केले जातात. मात्र, या अलर्टचा नक्की अर्थ काय आणि कोणत्या अलर्टला किती पाऊस पडतो, याबाबत नागरिकांमध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. हाच संभ्रम दूर करण्यासाठी हवामान विभागाच्या या चार प्रमुख अलर्टची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

​हवामानाचा पहिला टप्पा म्हणजे ‘ग्रीन अलर्ट’ होय. जेव्हा एखाद्या भागात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस असतो, तेव्हा हवामान विभागाकडून हा अलर्ट दिला जातो. याचा साधा अर्थ असा की, संबंधित ठिकाणी कुठलाही धोका नाही आणि सर्व काही ठीक आहे.

यानंतरचा टप्पा म्हणजे ‘येलो अलर्ट’ असून हा ६५ ते ११५ मिमी पावसासाठी जारी केला जातो. पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी यासाठी हा इशारा दिला जातो.

​परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला जातो, जो ११५ ते २०४ मिमी इतक्या मुसळधार पावसासाठी असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाने तयार राहावे, म्हणून हा अलर्ट दिला जातो.

सर्वात शेवटचा आणि अत्यंत धोकादायक टप्पा म्हणजे ‘रेड अलर्ट’ होय. २०४ मिमी पेक्षा जास्त अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असताना हा अलर्ट जारी होतो. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्यासाठी आणि स्वतःसह इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा इशारा दिला जातो. त्यामुळे हवामान खात्याच्या या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवून नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

Facebook Comments Box

Vaibhavwadi Kolhapur Railway Line: डेडलाईन धोक्यात; भूसंपादन अजूनही कागदावरच!

   Follow us on        

विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर:

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्प’ सध्या प्रशासकीय लालफितीच्या कारभारामुळे पूर्णपणे रखडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून साकारल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या डिसेंबर अखेरीस दिले होते. मात्र, या आदेशाला तब्बल सात महिने उलटून गेले तरी प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाची २०२८ ची डेडलाईन केवळ कागदावरच राहणार का, असा संतप्त सवाल स्थानिक जनतेतून विचारला जात आहे.

​ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि निधीची मंजुरी:

या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा विचार कोकण रेल्वेच्या उभारणीच्या काळापासूनच सुरू होता. २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मिरज येथील परिषदेत या मार्गावर एकमत झाले. त्यांनी ३,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची घोषणा करत २०१७ च्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूदही केली होती. त्यानंतर अनेक वर्षे हा प्रकल्प थंड बस्त्यात होता. अखेर २०२३ मध्ये ‘पीएम गतिशक्ती’ उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी ३,४११ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली. मात्र, निधी आणि मंजुरी उपलब्ध होऊनही प्रशासकीय पातळीवरील कमालीच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प पुढे सरकलेला नाही.

​रेल्वे मार्गाचे स्वरूप आणि स्थानके:

१०७ किलोमीटर लांबीचा हा नियोजित रेल्वेमार्ग सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा आहे. हा मार्ग वैभववाडी रेल्वे स्थानक, सोनाळी, कुसूर, कुंभारी, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी या सिंधुदुर्गातील गावांमधून पुढे सैतवडे, कळे, भुये, कसबा बावडा, मार्केटयार्ड मार्गे कोल्हापूर असा असेल. या संपूर्ण मार्गावर एकूण १० स्थानके, ५ उड्डाणपूल आणि २६ बोगदे असणार आहेत. परंतु, रेल्वेमार्ग नेमका कुठून जाणार आणि स्थानके कुठे असतील, याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता न मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

​आर्थिक क्रांतीला ब्रेक आणि विकासाला फटका:

हा लोहमार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची आवक स्वस्त होईल. तसेच कोकणातील हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि मत्स्य उत्पादनांची थेट व जलद वाहतूक पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत करणे सुलभ होणार आहे. यामुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या व्यापार-उदीमात मोठी क्रांती घडू शकते आणि पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. परंतु, सध्याच्या कूर्मगती कारभारामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मोठी खीळ बसली असून, प्रशासनाने आता वेळ न घालवता तातडीने भूसंपादन सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Facebook Comments Box

महाराष्ट्रात रेड अलर्ट; खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

   Follow us on        

मुंबई:

मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस म्हणजेच ८ जुलैच्या रात्रीपर्यंत राज्यामध्ये मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व खासगी कंपन्या आणि आस्थापनांना अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. खासगी कंपन्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (Work From Home) सवलत द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जे कोणी या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

​राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना आणि आपत्कालीन यंत्रणांना २४ तास अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत भूस्खलनाच्या (Landslide) दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही (Mumbai Pune Expressway) मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून समुद्रातील हायटाईडचा धोका लक्षात घेता NDRF आणि SDRF च्या तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

​दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मंगळवारी तब्बल ३०० मिलिमीटरहून अधिक म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन स्थळांवर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ९ जणांचा बळी गेला असून खडकवासला धरणातूनही कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Facebook Comments Box

रायगड: सावित्री आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

उल्हास, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

   Follow us on        

रायगड: जिल्ह्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांनी आज सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी सावित्री आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर उल्हास, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या स्थितीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अहवालानुसार, महाड तालुक्यातील सावित्री नदी (भोईरवाडी महिकावती मंदिराजवळ) ची सध्याची पाणी पातळी ६.४२ मीटर इतकी आहे, जी धोक्याची पातळी ६.४० मीटरपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे रोहा तालुक्यातील अंबा नदी (नागोठणे बंधारा) ची पातळी ९.२८४ मीटरवर पोहोचली आहे, जी धोक्याची ९.०० मीटरपेक्षा अधिक आहे. या दोन्ही नद्यांमुळे आसपासच्या खालच्या भागात पूर येण्याची मोठी शक्यता आहे. कुंडलिका नदी (झोलवखाली बंधारा) २३.९० मीटर, पाताळगंगा नदी (मौजे लोहोप) २१.१० मीटर आणि उल्हास नदी (दहीवली बंधारा) २८.८० मीटर पातळीवर असून, या सर्व नद्यांनी आपापल्या इशारा पातळ्या ओलांडल्या आहेत. गाडी नदीची पातळी मात्र इशारा पातळीपेक्षा कमी आहे.

जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत, प्रभावित तालुक्यांतील रहिवाशांना नद्यांच्या काठावरील भाग सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना दिली आहे. पूर नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आला असून, आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज आहेत. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. शेतकरी, पर्यटक आणि नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनचा संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

 

 

Facebook Comments Box

मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय

   Follow us on        

मुंबई: मुंबई महानगर परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याने जारी केलेल्या ‘ऑरेंज अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, मुंबई विद्यापीठाने आज (सोमवार, ६ जुलै) होणाऱ्या आपल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि आसपासच्या परिसरात अत्यंत मुसळधार पावसासह तीव्र वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या बिकट हवामानाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये आणि त्यांचा प्रवास सुरक्षित राहावा, या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने तातडीने हा पाऊल उचलले आहे.

​मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, सोमवारी नियोजित असलेल्या सर्व शाखांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाइट) प्रसिद्ध केले जाईल. अचानक उद्भवलेल्या या पावसाळी परिस्थितीमुळे मुंबईतील शैक्षणिक वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. तरी सर्व परीक्षार्थी, संबंधित महाविद्यालये आणि प्राध्यापकांनी या सूचनेची नोंद घ्यावी, तसेच पुढील अपडेट्ससाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली; सतर्क कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला!

   Follow us on        

पुणे: ​मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील मध्य रेल्वे विभागात सोमवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना घडली. कर्जत, लोणावळा आणि आसपासच्या भागात ताशी ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने डोंगरी भागातून माती आणि खड्यांचे ढीग रेल्वे रुळांवर कोसळले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे भूस्खलन वेळीच ओळखून संबंधित विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे सर्व प्रवासी आणि मालगाड्या सुरक्षित राहिल्या असून मोठा अनर्थ टळला आहे, अशी अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर पुनर्स्थापना कार्य सुरू केले असून, आवश्यक यंत्रसामग्री आणि पुरेसे कर्मचारी घटनास्थळी रवाना केले आहेत. दरम्यान, नेरळ, कर्जत, लोणावळा आणि महाड या स्थानकांच्या परिसरात रात्रीच्या वेळी पावसाने विक्रमी पातळी ओलांडली. लोणावळ्यात एका तासात ५४ मिलिमीटर, तर इतर ठिकाणी ४० ते ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भागात सध्या सातत्याने पाऊस सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामात काही प्रमाणात अडथळे येत आहेत.

​पावसाळी हंगामात पश्चिम घाटातील या घाट आणि डोंगरी मार्गांवर भूस्खलनाचा धोका नेहमीच असतो. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रवाशांनी गाड्यांच्या सद्यस्थितीची आणि वेळापत्रकाची अचूक माहिती घेण्यासाठी मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा संपर्क केंद्रांचा वापर करावा, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन सर्व साधनांचा वापर करत असून, वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था देखील तपासली जात आहे

Facebook Comments Box

Rain Updates: कर्जत – खोपोली रेल्वे वाहतुक ठप्प

   Follow us on        

मुंबई:

मुसळधार पावसामुळे कर्जत आणि खोपोली दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील ‘बॅलास्ट’ (ट्रॅकखालील खडी) वाहून गेल्याची घटना घडली आहे. या गंभीर नुकसानामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या मार्गावरील लोकल ट्रेन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेने आज, सोमवार (६ जुलै) रोजी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली.

​रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असून गाळ साचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे असुरक्षित बनला आहे. सुदैवाने, रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी ट्रॅकचे झालेले हे नुकसान वेळेत ओळखून पुढील मोठा धोका टाळला आहे. हा विस्कळीत झालेला रेल्वे विभाग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आवश्यक संसाधने गोळा करून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

​संबंधित परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा नेमकी कधी सुरू होईल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही निश्चित वेळ किंवा स्पष्टता देण्यात आलेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच गाड्या पुन्हा धावू शकतील.

​या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, म्हणून रेल्वे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपला भेट देऊन लोकल सेवेच्या सद्यस्थितीबाबतचे अपडेट्स तपासून घ्यावेत, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: महिला राखीव डब्यात हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांवर खेड स्थानकावर आरपीएफची कारवाई

   Follow us on        

Konkan Railway: एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या (गाडी क्रमांक १२६१८) महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करून हुल्लडबाजी करणाऱ्या हुल्लडबाज तरुणांविरोधात कोकण रेल्वे प्रशासनाने खेड रेल्वे स्थानकावर तातडीने मोठी धडक कारवाई केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने संबंधित तरुणांना डब्यातून बाहेर काढून त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​प्राथमिक माहितीनुसार, काही तरुणांनी महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. हे तरुण डब्यात सिगारेट ओढत होते आणि गुटखा खाऊन धूर व दुर्गंधी पसरवत होते. या हुल्लडबाजीमुळे आणि त्रासामुळे डब्यातील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रकार समोर आला.

​या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी तातडीने दखल घेत रेल्वे सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. ट्रेन रोहा स्थानक पार करून पुढे निघून गेल्यामुळे, पुढील प्रमुख स्थानक असलेल्या खेड रेल्वे स्थानकावर कारवाईची आखणी करण्यात आली. गाडी खेड स्थानकात दाखल होताच तेथे आधीपासूनच सज्ज असलेल्या रेल्वे पोलिसांच्या पथकाने महिला डब्याला चहुबाजूने वेढा घातला.

​पोलिसांना पाहताच डब्यातील काही हुल्लडबाजांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी सर्वांना जागीच ताब्यात घेतले. या वेळेवर झालेल्या धडक कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला असून, तत्परतेने पावले उचलणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search