मुंबईत साकारणार हायटेक मासळी बाजार; मरोळच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला केंद्राची मंजुरी!

   Follow us on        

मुंबई अंधेरी-मरोळ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता!

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सन 2025-26 च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये मुंबईतील मरोळ (अंधेरी) येथे ₹१३८ कोटींच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच मासेमारी बंद कालावधीत पारंपरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुमारे २,८१६ लाभार्थ्यांना उपजीविका व पोषण सहाय्य देण्याचाही समावेश आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, याचे आज फलित झाल्याचे समाधान वाटते.

मुंबईसारख्या महानगरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार उभारणे ही काळाची गरज होती. या प्रकल्पामुळे केवळ व्यापार सुलभ होणार नाही, तर हजारो मासेमार व संबंधित घटकांना रोजगार आणि स्थैर्य मिळेल. महाराष्ट्रात ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा ठाम विश्वास वाटतो.

 

Facebook Comments Box

राज्य सरकारचा मोठा निर्णय: ५,०१२ सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता

   Follow us on        

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बुधवारी ५,०१२ सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीला अधिकृत मान्यता देणारा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

​एकूण पदे: राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या अनुदानित महाविद्यालयांमधील एकूण रिक्त पदांपैकी ५,०१२ पदे भरली जाणार आहेत.

​कार्याभारानुसार वाटप: १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार परिगणित केलेल्या कार्यभारानुसार ही पदे भरली जातील.

​NEP ची अंमलबजावणी: नवीन शैक्षणिक धोरणामुळे वाढलेला शैक्षणिक कार्यभार पाहता, गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

​भरती प्रक्रियेसाठी अटी व शर्ती:

​शासनाने ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी काही कडक अटी घातल्या आहेत:

१. कालबद्ध प्रक्रिया: उच्च शिक्षण संचालकांनी या पदभरतीची निश्चित कालमर्यादा ठरवून ती प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

२. पारदर्शकता: भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागीय सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालक यांची असेल.

३. NAAC मानांकन: ज्या महाविद्यालयांकडे NAAC मान्यता नाही, त्यांना नवीन पदनिर्मिती करता येणार नाही. मात्र, ज्यांचे मूल्यांकन कमी आहे, त्यांना सुधारणेसाठी ३ वर्षांचा ‘सवलतीचा कालावधी’ (Grace Period) देण्याबाबत धोरण तयार केले जाणार आहे.

४. आचारसंहिता: राज्यात निवडणूक किंवा अन्य कारणाने आचारसंहिता लागू असल्यास, निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

​विद्यार्थी हिताचा निर्णय

​गेल्या अनेक दिवसांपासून प्राध्यापक भरतीची मागणी होत होती. सेवानिवृत्ती, राजीनामा आणि मृत्यू यांमुळे महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. या निर्णयामुळे आता महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राध्यापक मिळतील, ज्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: गोव्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रकचा विचित्र अपघात

   Follow us on        

ओटवणे : कोल्हापूरहून बांदा-गोव्याच्या दिशेने लोखंडी प्लेट्स आणि स्टील ट्यूब्स घेऊन जाणारा एक कॅन्टर (MH 09 BA 9279) विलवडे तिठ्यावर पहाटे एका विचित्र अपघाताचा बळी ठरला. रस्त्यावरील मोठी चढण, खड्डे आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेला लोखंडी माल यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

​चढणीवर गाडी आवरताना कॅन्टरची पुढची दोन्ही चाके जमिनीपासून तब्बल १० ते १५ फूट हवेत उडाली. गाडी अशा विचित्र अवस्थेत हवेत लटकलेली पाहून परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने, मागच्या बाजूला असलेला जड माल जमिनीला टेकल्यामुळे गाडी मागे सरकली नाही किंवा उलटली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​या घटनेत चालक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, जी जेसीबीच्या मदतीने पूर्ववत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक चढणीची आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

 

Facebook Comments Box

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवर १९ फेब्रुवारीपासून १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू!

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १९ फेब्रुवारी २०२६ पासून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १२ नवीन एसी (AC) लोकल सेवा आणि ३ नवीन नॉन-एसी सेवांची भर पडणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचणार असून, एकूण दैनंदिन सेवांची संख्या १४१४ इतकी होईल. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी धावणाऱ्या एसी फेऱ्यांमध्येही मोठी वाढ करण्यात आली असून, आता ७७ ऐवजी १०६ एसी फेऱ्या चालवल्या जातील. या निर्णयामुळे एसी लोकलच्या वाढत्या लोकप्रियतेला प्रतिसाद देण्यासोबतच सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

​प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या १२ नवीन एसी सेवांपैकी ११ फेऱ्या सध्याच्या नॉन-एसी फेऱ्यांच्या जागी चालवल्या जातील, तर १ फेरी पूर्णपणे नवीन असेल. या बदलांमुळे चर्चगेट, बोरिवली, भाईंदर आणि विरार दरम्यानच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, भाईंदर ते वांद्रे दरम्यान चालणारी धिम्या गतीची लोकल आता विरारपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे, ज्यामुळे विरार-वसई पट्ट्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या महत्त्वाच्या पावलामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि सुखद होण्यास मदत होईल.

Facebook Comments Box

Mumbai:‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ देणार्‍या ‘पॉड टॅक्सी’ सेवा सुरू करण्याबाबत मोठी अपडेट

   Follow us on        

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (MMR) मध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मेट्रो-लोकलसारख्या मुख्य सार्वजनिक वाहतुकीला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत MMR क्षेत्रातील महापालिकांना पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश प्रवाशांना घरापासून थेट कामाच्या ठिकाणापर्यंत सुलभ आणि जलद पोहोच उपलब्ध करून देणे आहे. सध्या मेट्रो किंवा लोकलने उतरल्यानंतर ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी रिक्षा, बस किंवा इतर वाहनांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वाहतूक कोंडी वाढते आणि प्रवाशांना त्रास होतो. पॉड टॅक्सी ही अत्याधुनिक, ड्रायव्हरलेस आणि इलेक्ट्रिक आधारित सेवा असून, ती उन्नत मार्गावर (elevated track) धावेल. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल आणि प्रदूषण नियंत्रणातही मदत होईल.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले की, पॉड टॅक्सी सेवा मेट्रोच्या वापराला प्रोत्साहन देईल आणि खासगी वाहनांची संख्या रस्त्यावर कमी होईल. त्यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या शहरांमध्ये या सेवेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यावर भर दिला. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) भागात आधीच पॉड टॅक्सीचा प्रकल्प मंजूर झाला असून, त्याचा विस्तार MMR क्षेत्रात करण्याचे नियोजन आहे.

एमएमआरडीए (Mumbai Metropolitan Region Development Authority) या प्रकल्पाची प्रमुख संस्था असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलअंतर्गत तो राबवला जाणार आहे.नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्य सरकारने ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर जोडणारी भारतातील पहिली पॉड टॅक्सी नेटवर्क मंजूर केली होती. या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना जलद, पर्यावरणस्नेही आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळेल.

या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे. लवकरच आराखडे तयार होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Facebook Comments Box

कोकण मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसच्या क्षमतेत वाढ; तब्बल ६ कोच वाढवले!

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा ओघ प्रचंड असतो, मात्र अनेक गाड्या कमी डब्यांच्या (उदा. १६ किंवा १८ डबे) चालवल्या जात होत्या. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना आरक्षण मिळणे अशक्य व्हायचे. मात्र कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तिरुनेलवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)  (२२६३० / २२६२९) एक्सप्रेसच्या प्रवाशांना कोकण रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. या गाडीची क्षमता आता १६ डब्यांवरून २२ डब्यांपर्यंत वाढवण्यात आली असून, दक्षिण रेल्वेने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.

नवीन डब्यांची रचना (Coach Composition):

डब्याचा प्रकार पूर्वीची स्थिती (Existing)
आताची सुधारित स्थिती (Revised)
एसी २ टायर (2 Tier AC) ०१ डबा ०२ डबे
एसी ३ टायर (3 Tier AC) ०२ डबे ०६ डबे
एसी ३ टायर इकॉनॉमी (3E) ०१ डबा
०१ डबा (बदल नाही)
स्लीपर क्लास (Sleeper) ०६ डबे ०७ डबे
जनरल क्लास (General) ०४ डबे
०४ डबे (बदल नाही)
जनरेटर कार / एसएलआर ०२ डबे
०२ डबे (बदल नाही)
एकूण डबे (Total Coaches) १६ एलएचबी (LHB)
२२ एलएचबी (LHB)

 

बदल कधीपासून लागू होणार?

  • गाडी क्र. २२६३० (तिरुनेलवेली येथून): १५ एप्रिल २०२६ पासून.

  • गाडी क्र. २२६२९ (लोकमान्य टिळक टर्मिनस येथून): १६ एप्रिल २०२६ पासून.

या निर्णयामुळे तिरुनेलवेली – एलटीटी एक्सप्रेसच्या प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. रेल्वेने केलेल्या बदलांनुसार, एसी ३ टायरच्या डब्यांमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली असून, त्यांची संख्या आता २ वरून थेट ६ करण्यात आली आहे. तसेच, एसी २ टायरची संख्या १ वरून २ करण्यात आली असून, स्लीपर क्लासचा १ डबा वाढवून आता एकूण ७ स्लीपर डबे या गाडीला जोडले जातील. अशा प्रकारे या ट्रेनमध्ये एकूण ६ नवीन डबे कायमस्वरूपी वाढवण्यात आले आहेत. डब्यांच्या या लक्षणीय वाढीमुळे विशेषतः उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी होण्यास आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे.

कोकण विकास समितीचा पाठपुरावा:

कोकण विकास समितीचा पाठपुरावा: काही काळापूर्वी या गाडीचे टर्मिनल दादरवरून लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे हलवण्यात आले होते. दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या मर्यादेमुळे या गाडीला जास्त डबे जोडण्यात अडचणी येत होत्या. टर्मिनल बदलल्यामुळे हा तांत्रिक अडथळा दूर झाला होता. याच संधीचा फायदा घेत कोकण विकास समितीने ही गाडी २२ डब्यांची करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. समितीच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

Facebook Comments Box

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांचा मालवण – कणकवली ‘विशेष दौरा’ उत्साहात पार

   Follow us on        
सिंधुदुर्ग: मानवता विकास परिषद अध्यक्ष, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- कणकवली दौरा संपन्न झाला. या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी  मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला भेट दिली. त्यांनी श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व उपस्थितांशी भेटी घेत चर्चा केली. श्रीकांत सावंत यांनी या दौर्यात राजकीय नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा केली.
त्यांनी मालवण येथे नगरपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी यांची भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. वेरली सरपंच धनंजय परब यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल श्रीकांत सावंत यांनी क्षमा हडकर यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत भय्यु प्रभुगावकर व संदीप हडकर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्याबद्दल देखिल श्रीकांत सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, श्रीकांत सावंत यांनी वरीष्ठ वकिल श्री. समीर गवाणकर व मसुरे येथे डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे, हाॅटेल व्यावसायिक संजय गावडे यांचीही सदिच्छा भेट घेतली.
श्रीकांत सावंत यांनी या दौऱ्यातील गाठी भेटी अत्यंत सकारात्मक होत्या असे सांगितले आणि समाजाला  मानवता, धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रती जागृतीसाठी राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगांवकर महाराजांना अभिप्रेत कार्य करत रहायचा आग्रह सुरू ठेवायचे आवाहन केले. यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित तसेच श्रीकांत सावंत मुख्य संपादक असलेला संचारेश्वर विशेषांक सदिच्छा भेट स्वरुपात दिला.
Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावपळ थांबणार; ‘डिजिटल कोच इंडिकेटर’चे काम अखेर सुरू!

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘डिजिटल कोच इंडिकेटर’ बसवण्याचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे. गेल्या वर्षी २६ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि १७ मार्च २०२५ रोजी कोकण रेल्वे महामंडळाच्या बेलापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या सुविधेबाबत ठोस निर्णय घेण्यात आला होता.

या कामाची टेंडर प्रक्रिया २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या डिजिटल इंडिकेटरमुळे प्रवाशांना आपली गाडी स्थानकात आल्यावर आपला डबा (कोच) नेमका कोणत्या ठिकाणी येणार आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी धावपळ थांबणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे. स्थानकावर यापूर्वी लिफ्टची सुविधा उपलब्ध झाली असून, आगामी काळात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १७० मीटरची निवारा शेड देखील उभी राहील, असा विश्वास संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सागर तळवडेकर यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिल्या ‘५-स्टार हॉटेल’ प्रकल्पाला गती देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक

   Follow us on        

मुंबई​: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ताज समूहाकडून (IHCL) प्रस्तावित असलेल्या पहिल्या पंचतारांकित रिसॉर्ट प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबईत एक विशेष बैठक पार पडली. सिंधुदुर्गचे आमदार मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत ही बैठक झाली.

​या प्रकल्पाची प्रक्रिया २०२५ मध्ये वेगाने सुरू झाली होती. २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर, प्रशासकीय स्तरावर कामात सुसूत्रता आणण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय परवानग्या आणि स्थानिकांचा सहभाग यावर सखोल चर्चा करण्यात आली.

​वेंगुर्ळा तालुक्यातील शिरोडा-वेलाघर परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

​आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास:

​”सिंधुदुर्ग हा निसर्गसंपन्न जिल्हा असून पर्यटनाच्या दृष्टीने यात मोठी क्षमता आहे. ताज सारखा जागतिक ब्रँड शिरोडा-वेलाघर येथे आल्यास सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवीन उंची मिळेल. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास होईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

​या बैठकीला पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गला ‘लक्झरी पर्यटन डेस्टिनेशन’ म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Facebook Comments Box

तिलारी वनक्षेत्रात वाघिणीसह दोन बछड्यांचा वावर

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील तिलारी वनक्षेत्रातून निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या भागात पहिल्यांदाच एका वाघिणीसह तिच्या दोन लहान बछड्यांच्या पाऊलखुणा वनविभागाला आढळून आल्या आहेत. या शोधामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वाघांचे केवळ वास्तव्यच नाही, तर तिथे वाघांचे नैसर्गिक प्रजनन होत असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. तिलारीचा हा परिसर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असून तो वन्यजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा ‘कॉरिडॉर’ मानला जातो. वाघिणीसोबत बछड्यांचे अस्तित्व असणे हे या जंगलातील पोषक पर्यावरणाचे लक्षण आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने सतर्कता वाढवली असून, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात शंभरहून अधिक ‘कॅमेरा ट्रॅप्स’ लावण्यात आले आहेत. व्याघ्र गणनेच्या कामात गुंतलेल्या पथकाला या पाऊलखुणा आढळल्या असून, वनविभागाने या क्षेत्रातील गस्त अधिक कडक केली आहे. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे तिलारी वनक्षेत्राला अधिकृतपणे ‘व्याघ्र राखीव क्षेत्र’ किंवा संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळण्याच्या मागणीला आता पुन्हा बळ मिळाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनाही सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, या वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search