Follow us on
मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत स्पेशल ट्रेन (०९०५७ / ०९०५८) आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन आता नवीन क्रमांकासह म्हणजेच ट्रेन क्रमांक १९०५७ / १९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत (बाय-वीकली) एक्सप्रेस म्हणून आठवड्यातून दोनदा धावणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण भारत, कोकण आणि गुजरातला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि निश्चित होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १९०५७ सुरत – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस दिनांक ३ जून २०२६ पासून दर बुधवार आणि रविवारी सुरत स्थानकावरून संध्याकाळी १९:३५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू जंक्शन – सुरत एक्सप्रेस दिनांक ४ जून २०२६ पासून दर गुरुवार आणि सोमवारी मंगळुरू जंक्शनवरून रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरत स्थानकावर पोहोचेल.
या एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय गुजरात आणि गोव्यातील प्रमुख स्थानकांसह कर्नाटकच्या किनारपट्टीवरील मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी यांसारख्या ३0 हून अधिक स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. यामुळे कोकण पट्ट्यातील आणि इतर भागांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या ट्रेनची रचना एकूण २० डब्यांची असणार आहे, ज्यामध्ये २ टायर एसीचा १ कोच, ३ टायर एसीचे ७ कोच, स्लीपर क्लासचे ६ कोच, जनरलचे ४ कोच आणि एसएलआर/डी चे २ डबे समाविष्ट असतील. प्रवाशांना या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती मिळवण्यासाठी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.











