उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा सुधारण्याच्या नावाखाली कोकणरेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना ‘बाहेरचा मार्ग’?

   Follow us on        

मुंबई: कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांच्या हक्काची आणि जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे आता कायमची इतिहासजमा होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, ही कोकणवासीयांची अत्यंत रास्त मागणी रेल्वे प्रशासनाने अत्यंत उद्धटपणे फेटाळून लावली आहे.

​शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी नुकतीच दिल्लीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी दादर किंवा सीएसटीएम येथून रत्नागिरीसाठी गाडी सुरू करणे ‘शक्यच नाही’ असे स्पष्टपणे सांगून कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

विशेष म्हणजे, आता ही गाडी दिवा स्थानकावरून वसईमार्गे वळवण्यात येणार आहे. म्हणजेच, मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्याला ही गाडी पकडण्यासाठी थेट दिवा किंवा वसई गाठावी लागणार आहे.

उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणासाठी कोकणकरांच्या सोयीचा बळी. 

रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा वाढविण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गे जाणार्‍या गाड्या कायमस्वरूपी पनवेल, बोरिवली येथील प्रस्तावित टर्मिनसवर शिफ्ट करण्याचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे.

एका आघाडीच्या मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या आता पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून सुटतील. या गाड्या पुढील दीड ते दोन वर्षात पूर्ण होणार्‍या नव्या रेल्वे मार्गाने म्हणजेच जुचंद्र, कमान रोड, खारबाव, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोलीमार्गे पनवेलला जातील.

एकदंरीत मध्यरेल्वे कोकणरेल्वेशी असलेली लिंक संपूर्णपणे तोडणार असून या गाड्या पाश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवासी वर्गात नाराजी. 

आधीच दादर रत्नागिरी एक्सप्रेस गाडी बंद केल्याने नाराज झालेला कोकणातील प्रवासी वर्ग या बातमीने सुन्न झाला आहे. कोकणातील जनतेचा कोणी नसल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

Facebook Comments Box

श्री क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रंगणार वार्षिक जत्रोत्सव.

   Follow us on        

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो, यंदा हा उत्सव गुरूवार दिनांक २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. श्री भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची अप्रतिम रंगरंगोटी करून मंदिर यात्रोत्सवासाठी सजविण्यात आले आहे. सदर रंगकाम ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री सतीश राव, सीपीएमसी, मुंबई यांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली ठेकेदार श्री अमित पारकर, आकार आविष्कार इन्फ्रा, मुंबई यांनी केले आहे.

चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करतील. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकरी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवून व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढवतील व प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतील. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे मागणे दिले जाईल. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जाईल. रुढी परंपरेनुसार पूजाविधी संपन्न झाल्यावर, पुजारी पालखीत *कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी* या देवतांची रुपी लावतील. शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्रपौर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो. चैत्र पौर्णिमे निमित्त पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होईल. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेल्या जातील. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होईल. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात ते दृश्य विलोभनीय असते. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्या नंतर सालाबादप्रमाणे रात्रौ मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ होतील. सदर वेळी श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाईल आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता होईल.

तरी सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: ऐन हंगामात विशेष गाडीच्या फेर्‍यांमध्ये कपात; प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

   Follow us on        

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव (गोवा) दरम्यान चालवल्या जाणाऱ्या साप्ताहिक ‘उन्हाळी विशेष’ ट्रेनच्या (०१०१९/०१०२०) वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी ५ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार होती, मात्र आता ही सेवा १२ एप्रिल २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. ही विशेष रेल्वे १२ एप्रिल ते ७ जून २०२६ या कालावधीत दर रविवारी चालवली जाणार आहे.

फेर्‍यांमध्ये केलेल्या कपातीमुळे प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याआधीच कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुरेशा गाड्यांची घोषणा केली नसल्याचा सूर होता. आता ही गाडी ऐन हंगामात जेव्हा चाकरमानी गावी जाण्याची योजना आखतात तेव्हाच रद्द केली गेली असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

​सुधारित वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई सीएसएमटीहून दर रविवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२० मडगावहून रविवारी सायंकाळी १६:०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०३:५० वाजता मुंबईत पोहोचेल. या विशेष गाडीचे बुकिंग १ एप्रिल २०२६ पासून आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तरी प्रवाशांनी या बदललेल्या तारखांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

तुकाराम मुंडे, अश्विनी भिडेसह राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या…

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारने आज, ३१ मार्च २०२६ रोजी राज्यातील दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात सर्वात चर्चिले जाणारे नाव आहे अश्विनी भिडे यांचे. १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. मुंबई मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या भिडे यांना ‘नो-नॉन्सेन्स’ प्रशासक म्हणून ओळखले जाते.

या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराविरोधात कडक भूमिका घेणारे मुंढे यांची ही २१ वर्षांच्या कारकिर्दीत २४वी बदली असल्याचे सांगितले जाते. प्रेरणा देशभ्रतार यांना मत्स्यव्यवसाय आयुक्तपद, पृथ्वीराज बी. पी. यांना वसई-विरार महानगरपालिका आयुक्तपद, तर विनिता वेद सिंघल यांना मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिवपद देण्यात आले आहे.

याशिवाय माणिक गुरसळ यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव, विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, परिमल सिंह यांची कृषी विभागाचे सचिव, लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक आणि लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. या फेरबदलांमुळे वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी प्रशासनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत नवीन गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि सुधारित करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.

 

 

 

 

Facebook Comments Box

वाडवडिलांच्या ‘तडजोडी’ ठरत आहेत आताच्या पिढीची ‘डोकेदुखी’!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोकणात वाडवडिलांच्या काळातील तोंडी केलेल्या तडजोडी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार कोणतीही लेखी कागदपत्रे न करता केवळ विश्वासावर केले जात होते. काही ठिकाणी जमिनी कायमस्वरूपी, तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दिल्या जात होत्या. तसेच अदलाबदलीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झाले होते.

मात्र, या व्यवहारांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने संबंधित व्यक्तींच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी जमीन एका व्यक्तीच्या नावावर असली तरी प्रत्यक्ष वहिवाट दुसऱ्याच्याकडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे वादाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

या पार्श्वभूमीवर गावोगावी भांडणे वाढत असून काही ठिकाणी मारामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांपर्यंत परिस्थिती पोहोचत आहे. जमीन मिळवण्यापेक्षा अहंकाराचे प्रश्न अधिक पुढे येत असल्याचेही निरीक्षण आहे. परिणामी समाजात गटबाजी वाढत असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

या वादांचा गैरफायदा समाजातील विघातक प्रवृत्तींकडून घेतला जात असल्याचीही चर्चा आहे. प्रशासनाकडून या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. न्यायालयात अशा प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.

शेतात जाण्यासाठीच्या वाटांवरूनही वाद निर्माण होत असून, ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. दोनच दिवसापूर्वी सावंतवाडी येतील ओवळीयेतील महिलेचा अशाच एका वादातून निर्दयी खून करण्यात आला. एकूणच, “कोकणाचा बिहार होत चालला आहे” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या समस्येवर ठोस उपाययोजना करून जुन्या व्यवहारांचे कायदेशीर पुनरावलोकन करण्याची गरज व्यक्त होत आहे

 

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील थांब्यावर शेडची प्रतिक्षा संपता संपेना

   Follow us on        

सावंतवाडी ::कोकण रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः वेंगुर्ले आणि शिरोडा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांब्यावर निवारा (Shed) नसल्याने प्रवाशांना भर पावसात आणि कडक उन्हात एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.

​शेडअभावी हाल

​सावंतवाडी रेल्वे स्थानकाबाहेरून वेंगुर्ले, शिरोडा आणि परिसरातील गावांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, येथे एसटी बससाठी कायमस्वरूपी निवारा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात प्रवाशांचे कपडे आणि सोबत असलेले सामान भिजण्याचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे, सावंतवाडी शहराच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी जे शेड उपलब्ध आहे, त्याची क्षमता अत्यंत कमी असून ते प्रवाशांच्या गर्दीच्या मानाने खूपच लहान पडत आहे.

​रिक्षा स्टँड आणि पार्किंगला जागा, मग बस प्रवाशांना का नाही?

​काही काळापूर्वी जेव्हा या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकासकामे करण्यात आली, तेव्हा रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र स्टँडची व्यवस्था करण्यात आली. तसेच एका बाजूला ‘पे अँड पार्किंग’साठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, शेकडो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी बससाठी साधे शेड उभारले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

​प्रवाशांची मागणी

​रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सुसज्ज बस निवारा (Bus Stand Shed) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पार्किंग आणि इतर सुविधांना प्राधान्य देताना सामान्य प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करू नये, असा सूर सध्या उमटत आहे.

Facebook Comments Box

जमिनीच्या वादात कोयत्याने हल्ला! ओवळीयेतील महिलेचा मृत्यू

   Follow us on        

सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये गावातील मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून कोयत्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (वय ६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (वय ३७) या पिता–पुत्रांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. ही घटना सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती सावंत या आपल्या मुलगा एकनाथ सावंत याच्यासोबत शेतात कामासाठी गेल्या असताना संशयितांनी तेथे येत जमिनीच्या वादातून वाद घातला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही क्षणांतच हा वाद हिंसक वळणावर गेला. संतापाच्या भरात आरोपींनी कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर वार केले. यात त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह 

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिलेने दोन दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. तरीही ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

त्यांच्या अनपेक्षित जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना डोळ्यासमोर घडल्याने त्यांचा मुलगा अजूनही या धक्क्यातून सावरला नाही आहे. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मुंबई – मडगाव दरम्यान ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई, दि. ३० मार्च २०२६ – उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी  –मडगाव–मुंबई सीएसएमटी दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई सीएसएमटी–मडगाव स्पेशल ही गाडी दर रविवारी पहाटे ००:५५ वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल. ही सेवा ०५ एप्रिल २०२६ ते ०७ जून २०२६ या कालावधीत चालणार असून, गाडी त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तसेच, गाडी क्रमांक ०१०२० मडगाव–मुंबई सीएसएमटी स्पेशल ही गाडी दर रविवारी सायंकाळी १६:०० वाजता मडगावहून सुटेल आणि पुढील दिवशी पहाटे ०३:५० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. ही सेवा देखील ०५ एप्रिल २०२६ ते ०७ जून २०२६ या कालावधीत चालवण्यात येणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

या गाडीची एकूण रचना २२ डब्यांची असून त्यात २ एसी (१), ३ एसी (६), स्लीपर (९), जनरल (४) आणि एसएलआर (२) डब्यांचा समावेश आहे.

दरम्यान, गाडी क्रमांक ०१०२० साठी आरक्षण ०१ एप्रिल २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Facebook Comments Box

पालकांना वाऱ्यावर सोडलं तर पगारातून १५% कापले जाणार! तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय!

   Follow us on        

तेलंगणाच्या विधानसभेने २९ मार्च २०२६ रोजी ‘कर्मचारी जबाबदारी आणि पालक सहाय्य निरीक्षण विधेयक’ मंजूर केले. या विधेयकानुसार, वृद्ध आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा १५ टक्के किंवा कमाल १०,००० रुपये वजा करून ते थेट त्यांच्या वृद्ध पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी जानेवारी २०२६ मध्ये प्रस्तावित केलेल्या या कायद्याचा उद्देश वृद्धांकडे होणारी दुर्लक्ष आणि त्यांना सोडून देण्याच्या वाढत्या घटना रोखणे हा आहे. हा कायदा सरकारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनाही लागू होणार आहे.

२००७ च्या पालक देखभाल कायद्याची ही अंमलबजावणी अधिक कठोर करणारा हा नवा कायदा आहे. मात्र, काही जणांच्या मते १०,००० रुपयांची मर्यादा अपुरी आहे आणि कुटुंबातील खासगी बाबींमध्ये सरकारी हस्तक्षेप वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

Facebook Comments Box

अटल सेतूचा विस्तार अलिबागपर्यंत होणार; मुंबई – अलिबाग अंतर दीड तासांवर येणार

   Follow us on        

​नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणणाऱ्या ‘अटल सेतू’चा विस्तार आता थेट अलिबागपर्यंत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते अलिबाग जाण्यासाठी लागणारा ४ ते ५ तासांचा वेळ कमी होऊन अवघ्या दीड तासात हे अंतर पार करता येणार आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे जेएनपीटी (JNPT) आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ थेट अलिबागशी जोडले जाणार असून, प्रवाशांना आणि लॉजिस्टिक क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

​सध्या उलवे भागात ७ किमी लांबीचा सहा पदरी (सिक्स लेन) कोस्टल रोड तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचा पुढील टप्पा द्रोणागिरीमार्गे रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर एक अखंड कोस्टल कॉरिडॉर तयार होईल, ज्यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, विस्तारासाठी २५०० ते ४००० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

​पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या प्रकल्पात विशेष काळजी घेण्यात आली आहे. खारफुटीच्या (मॅंग्रोव्हज) जंगलांचे नुकसान टाळण्यासाठी काही भागांत ‘एलिव्हेटेड’ रस्ता उभारण्यात येणार आहे. स्टिल्ट्सवर हा रस्ता बांधल्यामुळे जमिनीवरील पर्यावरणाची हानी टाळता येईल. या मार्गामुळे पाम बीच रोडसह इतर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अटल सेतूपासून द्रोणागिरीपर्यंतचा प्रवास ‘सिग्नलमुक्त’ झाल्याने प्रवाशांचे २० ते ३० मिनिटे वाचणार आहेत.

​या प्रकल्पामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर रेवस-करंजा पुलामुळे कोकण भाग थेट रस्त्याने जोडला जाईल. परिणामी, सध्याच्या फेरीबोटींवरील ताण कमी होईल आणि अलिबागसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search