पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आज प्रत्यक्ष पाहणी

   Follow us on        

मावळ लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाकांक्षी पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याने खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आज मंगळवार, २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

पनवेल रेल्वे स्थानकापासून सुरू होणारा हा पाहणी दौरा चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत रेल्वे स्थानकांवर थांबून पूर्ण होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) मार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (MUTP-3) अंतर्गत २,७८२ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येत असलेल्या या २९.६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गामुळे पनवेल आणि कर्जत या दोन महत्त्वाच्या शहरांना थेट जोड मिळणार आहे. या नवीन मार्गामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील रेल्वे वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, पर्यायी लोकल सेवा सुरू होईल आणि कल्याणमार्गे धावणाऱ्या गाड्यांवरील गर्दीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे यांसारखी बहुतांश कामे पूर्ण झाली असून, कर्जत येथे रुळ जोडणी आणि पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरात लवकर हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे.

 

 

 

Facebook Comments Box

आंबेनळी दाभिळटोंक – ‘मृत्यूचा घाट’

   Follow us on        

पोलादपूर: निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक असलेल्या दाभिळटोक घाटात काल रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. या घाटातून प्रवास करणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने, कार थेट १२०० ते १९०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेत कारमधील सर्व ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या ताज्या अपघातामुळे दाभिळटोक परिसराला स्थानिकांनी दिलेले “मृत्यूचा घाट” हे नाव पुन्हा एकदा दुर्दैवाने खरे ठरले आहे.

​या घाटाचा इतिहास पाहिला  येथे अपघातांची मालिकाच सुरू आहे. जुलै २०१८ मध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात ३३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, जो या घाटाच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा डाग आहे. त्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. अगदी अलीकडे, मार्च २०२६ मध्ये मारुती वॅगनआर कारचा अपघात होऊन ५ जण गंभीर जखमी झाले होते, तर एप्रिल २०२६ मध्ये एका दांपत्याच्या बाईकचा अपघात होऊन दोघांचा ७०० फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला होता. आणि आता मे २०२६ मधील या ताज्या दुर्घटनेने या घाटातील मृत्यूचे सत्र अजूनही थांबले नसल्याचे दाखवून दिले आहे.

​स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, या घाटातील अत्यंत तीव्र व धोकादायक वळणे, रस्त्याच्या कडेला असलेली हजारो फूट खोल दरी, दाट झाडी आणि धुके यामुळे समोरचे वाहन न दिसणे आणि रस्त्याची झालेली अत्यंत दुरवस्था ही या अपघातांची मुख्य कारणे आहेत. “प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. आम्ही वारंवार मागणी करूनही इथे साधे सुरक्षा रक्षक किंवा रेलिंग बसवले गेलेले नाही,” असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​या घाटातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु, प्रत्येक अपघातानंतर केवळ चौकशीचे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाकडून अजूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता तरी या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल का? आणि घाटात रस्त्याचे रुंदीकरण, मजबूत सुरक्षा रेलिंग (Safety Railings) व धुके संकेत यंत्रणा (Fog Indicators) बसवली जाईल का? असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्गातील पर्यटकांना गोव्यात मारहाण; महाराष्ट्र-गोवा सीमेवर युवासेनेचे तीव्र आंदोलन

   Follow us on        

बांदा: गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधुदुर्गातील महिला, लहान मुले आणि तरुणांना स्थानिक मद्यपींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २५ मे रोजी युवासेनेने महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे तीव्र आंदोलन छेडले. युवासेना पदाधिकारी सुरज परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्य महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही राज्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे.

​मारहाणीच्या या गंभीर घटनेनंतर गोवा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडूनही कोणतीही दाद मिळाली नाही. प्रशासनाच्या आणि गोवा पोलिसांच्या याच उदासीनतेमुळे आंदोलकांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, असा आरोप सुरज परब यांनी केला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे गोव्याच्या बाजूने पेडणेपर्यंत तर महाराष्ट्राच्या बाजूने बांद्यापर्यंत वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. “गोव्याची गाडी पुढे जाऊ देणार नाही” या भूमिकेवर आंदोलक ठाम असल्याने आता या प्रकरणात गृहखात्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Photo Credit – AI

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणारी विशेष गाडी आता नियमित धावणार; थांबे आणि वेळापत्रक ईथे पहा

   Follow us on        

​Konkan Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोईम्बतूर आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष ट्रेन (०२१९८/०२१९७) आता अधिकृतपणे नियमित (Regularize) करण्यात आली आहे. या ट्रेनला आता २०१६०/२०१५९ जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर एक्सप्रेस म्हणून चालवले जाईल. या निर्णयामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे नवीन क्रमांक आणि वेळापत्रक:

​१. गाडी क्रमांक २०१६० (जबलपूर ते कोईम्बतूर एक्सप्रेस):

​दिवस: दर शुक्रवारी रात्री २३:५० वाजता ही ट्रेन जबलपूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: शनिवारी सकाळी ०६:४२ वाजता खंडवा, दुपारी १६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि रविवारी दुपारी १४:३० वाजता कोईम्बतूरला पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक २०१५९ (कोईम्बतूर ते जबलपूर एक्सप्रेस):

​दिवस: दर सोमवारी संध्याकाळी १७:०५ वाजता ही ट्रेन कोईम्बतूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: बुधवारी पहाटे ०२:३२ वाजता खंडवा आणि सकाळी ०८:४५ वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

​महाराष्ट्रातील प्रमुख थांबे (Commercial Stoppages):

​कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या या ट्रेनला महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

​भुसावळ

​नाशिक रोड

​पनवेल

​रोहा

​खेड

​चिपळूण

​रत्नागिरी

​कणकवली

​कुडाळ

​इतर राज्यातील प्रमुख थांबे: नर्सिंगपूर, गाडरवारा, पिपारीया, इटारसी, हरदा, खंडवा, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, पालक्काड इत्यादी.

​गाड्यांची रचना (Coach Composition):

​या एक्सप्रेसला एकूण २४ डबे (Coaches) असणार आहेत, ज्यामध्ये प्रवाशांच्या सर्व श्रेणींचा विचार करण्यात आला आहे:

​स्लीपर क्लास (WGSCN): ९ कोच

​थर्ड एसी (WGACCN): ६ कोच

​सेकंड एसी (WGACCW): २ कोच

​फर्स्ट एसी (WGFAC): १ कोच

​सामान्य डबे (GS): ४ कोच

​इतर (GSLR/GSLRD): २ कोच

​कधीपासून होणार सुरू?

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून लवकरच एका सोयीस्कर तारखेपासून ही ट्रेन नियमित सेवा म्हणून रुळावर धावणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास सुरुवातीला ही गाडी विशेष उद्घाटनात्मक सेवा म्हणूनही चालवली जाऊ शकते. प्रवाशांनी तिकीट बुकिंग आणि अधिकृत तारखेसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

राज्यात उन्हाचा तडाखा कायम; शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार सुरू

   Follow us on        

नागपूर: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, हा उष्णतेचा कहर लवकर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विदर्भ, मराठवाड्यासह इतर ग्रामीण आणि शहरी भागांतही सूर्य जणू आग ओकत आहे. या तीव्र उष्णतेमुळे आणि असह्य उकाड्यामुळे लहान मुलांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या काही भागांत उष्माघातामुळे नागरिकांचा बळी गेल्याच्या नोंदीही झाल्या आहेत. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकार शाळा सुरू होण्याचा दिवस पुढे ढकलण्याच्या हालचाली करत आहे. त्यानुसार, शाळा १५ जूनऐवजी २६ जून रोजी सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शनिवारी नागपूर येथे ही महत्त्वाची माहिती दिली.

​दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अतिशय तीव्र झाली असून पुढील दोन दिवस येथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आज तब्बल ४७ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या हंगामात वर्ध्यात दुसऱ्यांदा एवढे प्रचंड तापमान नोंदवले गेले आहे. दिल्लीतही उष्णतेचा पारा इतका वाढला आहे की, पत्रकार परिषदेसाठी आलेले अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना असह्य उकाड्यामुळे आपली पीसी (पत्रकार परिषद) अर्धवट आटोपती घ्यावी लागली. त्यांनी दिल्लीतील उष्णता सहन होत नसल्याचे जाहीरपणे सांगितले.

​दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारी सकाळपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण पाहायला मिळाले. मुंबईचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असले, तरी हवेत ८० टक्क्यांपर्यंत वाढलेली आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे मुंबईकरांना प्रचंड आणि असह्य उकाडा सहन करावा लागला. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी स्पष्ट केले असून, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Facebook Comments Box

पर्यायी रस्ता नसल्याने रुळांवरून चालताना एक्सप्रेसची धडक; नाधवडे येथील तरुणाचा जागीच मृत्यू

   Follow us on        

वैभववाडी:रेल्वेची जोरदार धडक बसल्याने नाधवडे-हेलकरवाडी येथील अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६) या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भीषण घटना सकाळी साडेआठच्या सुमारास शुकनदी पुलाजवळ घडली. अमोल खांडेकर हे मुंबईतील चिंचपाडा परिसरात आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह राहत होते आणि एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ते आपल्या मालकीच्या जमिनीत काजू लागवडीची पूर्वतयारी करण्यासाठी गावी आले होते.

रविवारी सकाळी ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरले आणि तिथून पायीच घराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शुकनदी पुलाजवळ पोहोचताच गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या निस्सार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संबंधित एक्सप्रेस सुमारे तासभर घटनास्थळी थांबवण्यात आली होती, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

​लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच अपघात; ग्रामस्थांचा आरोप

​या भीषण अपघातानंतर हेलकरवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या वाडीत जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. रस्त्याअभावी येथील लोकांना जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून किंवा पुलावरूनच ये-जा करावी लागते आणि याच मुख्य कारणामुळे हा भीषण अपघात घडला आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे हक्काच्या पर्यायी रस्त्यासाठी वारंवार तक्रारी व मागण्या करण्यात आल्या आहेत, मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या याच उदासीनतेमुळे आज एका निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

​पोलिसांकडून तपास सुरू

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी वैभववाडी पोलिसांना तात्काळ कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनलवलकर, पोलीस हवालदार धनाजी धडे व उद्धव साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अपघाताची माहिती मिळताच अमोल खांडेकर यांचे मुंबईतील नातेवाईक गावी रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक जाण्याने हेलकरवाडी परिसरात आणि खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातून पर्यायी रस्त्याची मागणी आता अधिक आक्रमकपणे केली जात आहे.

Facebook Comments Box

पेट्रोलच्या किमतीत चौथी वाढ; तुमच्या राज्यातील नवीन दर येथे पाहा

   Follow us on        

नवी दिल्ली:गेल्या १० दिवसांत देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग चौथी मोठी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि इतर जागतिक घडामोडींमुळे तेल कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. या चौथ्या दरवाढीनंतर देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आहे.

सध्या देशात सर्वाधिक महाग पेट्रोल आंध्र प्रदेश (₹११७.८८ प्रति लिटर) मध्ये मिळत आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान आणि निकोबार (₹८८.६६ प्रति लिटर) या केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध आहे.

खाली देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आजचे पेट्रोलचे प्रति लिटर दर दिले आहेत:

🔴 सर्वाधिक दर असलेली राज्ये (₹११० पेक्षा जास्त)

राज्य / केंद्रशासित प्रदेश पेट्रोलचा दर (प्रति लिटर)
आंध्र प्रदेश ₹११७.८८
तेलंगणा ₹११५.६९
केरळ ₹११५.४९
मध्य प्रदेश ₹११४.५४
पश्चिम बंगाल ₹११३.४७
बिहार ₹११३.३५
राजस्थान ₹११२.६६
महाराष्ट्र ₹१११.१८
सिक्कीम ₹११०.९५
कर्नाटक ₹११०.९३
लडाख ₹११०.८८

🟡 मध्यम-उच्च दर असलेली राज्ये (₹१०५ ते ₹१०९.९९)

राज्य / केंद्रशासित प्रदेश पेट्रोलचा दर (प्रति लिटर)
ओडिशा ₹१०९.२२
छत्तीसगड ₹१०८.०६
तमिळनाडू ₹१०७.७७
लक्षद्वीप ₹१०७.५०
मंणिपूर ₹१०६.९ canvas५
झारखंड ₹१०५.९३
आसाम ₹१०५.८५
पंजाब ₹१०५.५६
मिझोराम ₹१०५.५२
त्रिपुरा ₹१०५.१७

🟢 ₹१०५ पेक्षा कमी दर असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेश

राज्य / केंद्रशासित प्रदेश पेट्रोलचा दर (प्रति लिटर)
नागालँड ₹१०४.३९
जम्मू आणि काश्मीर ₹१०४.३३
गोवा ₹१०४.१९
पॉंडिचेरी ₹१०३.५८
हरियाणा ₹१०३.२८
हिमाचल प्रदेश ₹१०२.५५
मेघालय ₹१०२.२६
दिल्ली ₹१०२.१२
उत्तर प्रदेश ₹१०२.०५
गुजरात ₹१०१.९६
चंदीगड ₹१०१.५१
उत्तराखंड ₹१००.५४
अरुणाचल प्रदेश ₹९७.७०
अंदमान आणि निकोबार ₹८८.६६
Facebook Comments Box

आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ७०० फूट खोल दरीत कोसळली; ८ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रायगड: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीचे नियंत्रण सुटल्याने ती जवळपास ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अत्यंत भीषण दुर्घटनेत गाडीतील आठ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

​अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री १० वाजल्यापासून पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि येथील भूप्रदेश कठीण असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. मृतदेह वर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. सध्या दोरीला स्ट्रेचर बांधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते रुग्णवाहिकेने पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

​अपघातातील मृतांची नावे:

१. महेश अनिल पवार (वय २५)

२. आदित्य अशोक साळुंखे (वय २१)

३. रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५)

४. सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०)

५. अंश समीर चव्हाण (वय १८)

६. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१)

७. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५)

८. नितीन किसन नायकॉंडे (वय ३५)

Facebook Comments Box

Konkankanya Express: ‘सुपरफास्ट’ शुल्काच्या नावाखाली प्रवाशांची लूट!

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अत्यंत लाडकी आणि महत्त्वाची समजली जाणारी ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ (गाडी क्र. २०१११ / २०११२) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमालीची उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’चा दर्जा असलेल्या या गाडीकडून प्रवाशांकडून तिकिटासोबत जादा सुपरफास्ट शुल्क वसूल केले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही गाडी दररोज २ ते २.५ तास उशिराने धावत असल्याने, “रेल्वे प्रशासन सुपरफास्टच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लूट करत आहे का?” असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणारी ही गाडी प्रत्येक स्थानकावर वेळेचे उल्लंघन करत आहे. मुंबईकडे येणारी गाडी असो वा गोव्याकडे जाणारी, प्रवाशांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मडगावकडे जाणारी २०१११ कोकणकन्या एक्सप्रेस खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथे तब्बल २ ते २.५ तास उशिराने पोहोचली. रत्नागिरीत सकाळी ५:०० वाजता येणारी गाडी थेट ७:५४ वाजता पोहोचल्याने प्रवाशांचे हाल झाले. एवढेच नव्हे तर २१, २२ आणि २३ मे रोजी मडगावला पोहोचताना देखील या गाडीला २ तासांपेक्षा जास्त उशीर झाला होता.

​दुसरीकडे, मडगावहून मुंबईकडे येणाऱ्या २०११२ कोकणकन्या एक्सप्रेसची स्थितीही वेगळी नाही. २२ मे च्या प्रवासात ही गाडी पनवेल, ठाणे आणि दादर येथे तब्बल २ तास ४० मिनिटे उशिराने धावत होती. तर २३ मे रोजी सुटलेली गाडीही १ तास १० मिनिटे उशिराने धावत मुंबईला पोहोचली. कोकण रेल्वेच्या या सावळागोंधळामुळे प्रवाशांचे कामाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या गाडीला सुपरफास्ट वर्गात समाविष्ट करण्यात आले असले तरी ही गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याने प्रवाशी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘सुपरफास्ट’चे पैसे घ्यायचे आणि सेवा मात्र ‘पॅसेंजर’पेक्षाही संथ द्यायची, या रेल्वेच्या कारभारावर आता प्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतला असून, कोकण रेल्वे प्रशासनाने यावर तात्काळ सुधारीत पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Facebook Comments Box

त्र्यंबकेश्वर देवस्थानचा मोठा निर्णय; व्हीआयपी दर्शनासाठी २,५०० रुपयांची ‘ब्रेक दर्शन योजना’

   Follow us on        

त्र्यंबकेश्वर :भाविकांना तीन हजार रुपये घेऊन बेकायदेशीरपणे त्र्यंबकेश्वर दर्शन घडवण्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. हा ताजा प्रकार लक्षात घेता, दर्शन तिकिटांचा काळा बाजार थांबवण्यासाठी आता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने स्वतःच एक मोठा निर्णय घेतला आहे. देवस्थानतर्फे लवकरच ‘ब्रेक दर्शन योजना’ (Break Darshan Yojana) राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत भाविकांना अडीच हजार रुपयांचे (२,५०० रुपये) तिकीट देऊन अवघ्या पाच मिनिटांत थेट दर्शन घडवले जाणार आहे. दररोज ५०० भाविकांना या ब्रेक दर्शन सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

​अशी असेल ‘ब्रेक दर्शन’ पद्धत:

सध्या त्र्यंबकेश्वरच्या मुख्य मंदिरात मोफत धर्मदर्शन आणि २०० रुपयांची देणगी दर्शन अशा दोन्ही रांगांचा संगम होतो. या दोन्ही रांगांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते, ज्यामुळे धर्मदर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ लागतो. नवीन योजनेनुसार, अडीच हजारांचे तिकीट घेणाऱ्या दर्शनार्थीला थेट दर्शन देण्यासाठी या दोन्ही रांगांचा संगम होणारी मुख्य रांग ५ मिनिटांसाठी थांबवली जाईल (ब्रेक केली जाईल) आणि त्या काळात व्हीआयपी भाविकांना दर्शन घडवले जाईल. तिकीट घेऊन दर्शन घेतलेले हे भाविक अवघ्या ८ मिनिटांत मंदिराबाहेर पडतील.

​सर्वसामान्यांचे दर्शनही राहणार सुरू:

देवस्थानने स्पष्ट केले आहे की, जरी ही नवीन ब्रेक दर्शन योजना सुरू होणार असली, तरी सर्वसामान्य भाविकांसाठी असणारे मोफत धर्मदर्शन आणि २०० रुपयांचे देणगी दर्शन पूर्ववत सुरूच राहणार आहे. या नवीन सुविधेसाठी मंदिरात स्वतंत्र तिकीट काउंटर उघडले जाणार आहे. आता ही नवीन योजना प्रत्यक्षात कशा पद्धतीने राबवली जाते आणि यामुळे सर्वसामान्य भाविकांना काही त्रास होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search