राज्यांतर्गत ​रेल्वेगाड्यांना ‘ब्रेक’, उत्तर भारतासाठी मात्र ‘ग्रीन सिग्नल’!

   Follow us on        

मुंबई : रेल्वे विभागाच्या शून्य-आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्गही रद्द करण्यात आले आहेत. राज्यांतर्गत सेवा कमी केल्या जात असताना उत्तर भारतासाठी मात्र मुंबईहून अधिक रेल्वेगाड्या सोडल्या जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रेल्वे प्रशासनाने कमी प्रवासीसंख्या आणि समांतर मार्गावरील गाड्या यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. कोरोना काळानंतर अनेक गाड्या पूर्ववत सुरू झाल्या नसून काही सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. विशेषतः दादर–रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याच स्लॉटमध्ये दादर–गोरखपूर एक्सप्रेस कायम करण्यात आल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, दादर ते गोरखपूर, दादर ते बलिया, एलटीटी ते सहारसा अमृत भारत, पनवेल ते अलीपुरद्वार अशा उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच होळी व उन्हाळी हंगामासाठी विशेष गाड्यांची संख्या वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या मते, राज्यांतर्गत रेल्वेगाड्या या सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असून शैक्षणिक, व्यावसायिक आणि धार्मिक कारणांसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अशा गाड्या बंद करून प्रवाशांना अडचणीत टाकले जात असल्याची टीका होत आहे.

Facebook Comments Box

मुंबई विमानतळावर ६४ कोटींचे ड्रग्ज जप्त; चार जणांना अटक

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. बँकॉकमधून आणलेले सुमारे ६४ कोटी ३९४ लाख रुपये मूल्याचे ‘हायड्रोपोनिक कॅनाबिस’ (उच्च दर्जाचा गांजा) जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी एका परदेशी नागरिकासह तीन भारतीय अशा एकूण चार प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विमानतळ प्रशासनाने मंगळवारी एक विशेष शोध मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत बँकॉकमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. याच दरम्यान संशयास्पद हालचालींवरून चार प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

​तपास अधिकाऱ्यांनी या चारही आरोपींच्या सामानाची झडती घेतली असता, त्यात ६४ किलो ३९४ ग्रॅम हायड्रोपोनिक कॅनाबिस लपवून ठेवल्याचे आढळले. चौकशीत असे समोर आले की, आरोपींनी हे अमली पदार्थ बँकॉकमध्ये मिळवले होते आणि ते मुंबईतील त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहोचवणार होते. या कामाच्या बदल्यात त्यांना विमानाची तिकिटे आणि ठराविक कमिशनचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, विमानतळाच्या आवारातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

​या कारवाईनंतर चारही प्रवाशांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना बुधवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांची गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Facebook Comments Box

किरण बेदी यांचा कोकण रेल्वेच्या ‘मॅनेजमेंट इनसाइट’ कार्यक्रमात सहभाग

   Follow us on        

नवी मुंबई: पहिल्या महिला आयपीएस (IPS) अधिकारी तसेच पुद्दुचेरीच्या माजी उपराज्यपाल किरण बेदी यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) च्या कॉर्पोरेट कार्यालयात आयोजित ‘मॅनेजमेंट इनसाइट प्रोग्राम’मध्ये सहभाग घेतला. या विशेष सत्रात त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

​आपल्या प्रशासकीय अनुभवाचा आणि नेतृत्व प्रवासाचा संदर्भ देत किरण बेदी यांनी ‘प्रेरणा’ (Motivation) या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शिस्त, सचोटी आणि उद्देशाची जाणीव असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, एक सक्षम संस्था उभी करण्यासाठी नैतिक नेतृत्व, उत्तरदायित्व आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

​दैनंदिन कामकाजात आव्हाने स्वीकारून उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. त्यांच्या या सत्राने उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. याच कार्यक्रमात कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनीही आपले विचार मांडले. संस्थेच्या प्रगतीत महिलांच्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box

Railway Updates: ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी रेलवन अ‍ॅपमध्ये ‘भारत टॅक्सी’ ची जोड मिळणार

   Follow us on        

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून RailOne अ‍ॅपमध्ये Bharat Taxi सेवा एकत्रित करण्याची योजना आखली आहे. रेलटेलच्या सहकार्याने विकसित होणारा हा उपक्रम सुरवातीला नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरील गोंधळ कमी करण्यासाठी प्रवाशांना शेवटच्या टप्प्यातील (last-mile) प्रवासासाठी विश्वासार्ह पर्याय उपलब्ध देण्यासाठी राबवला जाणार आहे. R

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, RailOne अ‍ॅप हे एक ‘सुपर अ‍ॅप’ असून यामध्ये आरक्षित, अनारक्षित तसेच प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगसह विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. आता Bharat Taxi ची जोड मिळाल्याने रेल्वेने प्रवास केल्यानंतर लगेचच टॅक्सी सेवा बुक करण्याची सोय प्रवाशांना मिळणार आहे.

Bharat Taxi ही देशातील पहिली सहकारी तत्वावर आधारित टॅक्सी सेवा असून ती पारदर्शक व किफायतशीर सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले होते.

दरम्यान, RailOne अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून १५ मार्च २०२६ पर्यंत या अ‍ॅपचे २.५७ कोटी डाउनलोड झाले आहेत. दररोज सुमारे ७.६४ लाख तिकिटांची बुकिंग या अ‍ॅपद्वारे केली जात आहे. यामध्ये लाईव्ह ट्रेन स्टेटस, पीएनआर तपासणी, कोच पोझिशन, प्लॅटफॉर्म माहिती, तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’सारख्या सेवाही उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली येथे यश आल्यानंतर देशातील ईतर स्थानकावर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Facebook Comments Box

भाविकांसाठी खुशखबर! मालवण – पंढरपुर – अक्कलकोट बससेवा सुरू

   Follow us on        

मालवण: भाविकांची आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली असून, मालवण-आचरा-अक्कलकोट या नवीन बस फेरीचा बुधवारी सायंकाळी मालवण येथून मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. ही बस आचरा मार्गे जाणार असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे.

​मालवणहून सुटलेली बस आचरा येथे पोहोचताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी बसचे जल्लोषात स्वागत केले. आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते नारळ वाढवून या बस फेरीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘स्वामी समर्थांच्या’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

​वेळापत्रक आणि मार्ग

​आचरा बस नियंत्रक दिनेश साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बस फेरीचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:

​मालवणहून सुटण्याची वेळ: दुपारी ३:४५ वाजता.

​आचरा येथून सुटण्याची वेळ: सायंकाळी ४:३० वाजता.

​प्रवास मार्ग: कणकवली, गगनबावडा, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर मार्गे अक्कलकोट.

​परतीचा प्रवास: दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:३० वाजता अक्कलकोट येथून ही बस पुन्हा मालवणच्या दिशेने रवाना होईल.

​या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच चंदन पांगे, संतोष मिराशी, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, अशोक कांबळी, अशोक बागवे, दिलीप कावले, प्रवीण आचरेकर, निवृत्ती आचरेकर उपस्थित होते. तसेच बसचे चालक ए. एन. गव्हाणे, वाहक एस. डी. कांबळे आणि आचरा कंट्रोलर दिनेश साळकर यांचाही सत्कार करण्यात आला.

​ही बस सेवा सुरू करण्यासाठी माजी सरपंच चंदन पांगे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना निवृत्ती आचरेकर, प्रवीण आचरेकर, महेंद्र मांजरेकर, नरेश तारकर, विजय पांगे आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी मोलाचे सहकार्य केले.

​या नवीन बस सेवेमुळे आता मालवण आणि आचरा परिसरातील भाविकांना पंढरपूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी थेट प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

Facebook Comments Box

Mumbai Water Metro: १० जलमार्ग, २१ स्थानके आणि २२१ किमी लांबी.. मुंबईची ‘वॉटर मेट्रो’ अशी असेल

   Follow us on        

मुंबई: कोची वॉटर मेट्रोच्या जागतिक यशानंतर आता मुंबई महानगर क्षेत्रातही (MMR) जलवाहतुकीचे मोठे जाळे निर्माण होणार आहे. मुंबईच्या अथांग किनारपट्टीचा आणि खाड्यांचा वापर करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) स्वीकारला असून, या कामाला आता वेग आला आहे. बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाची माहिती दिली. हा प्रकल्प सुमारे २,४०० कोटी रुपयांचा असून, यामुळे मुंबईकरांना रेल्वे आणि रस्त्यांव्यतिरिक्त एक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संपूर्ण मुंबई आणि उपनगरांना जोडणारे १० जलमार्ग (Routes) विकसित केले जाणार आहेत. या जलमार्गांचे एकूण जाळे सुमारे २१५ किलोमीटर लांबीचे असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण २१ आधुनिक टर्मिनल्स (स्थानके) उभारली जाणार असून, ७० पेक्षा जास्त बोटींचा ताफा या मार्गांवर धावणार आहे. यामध्ये वसई-मीरा भाईंदर-ठाणे-वाशी-नवी मुंबई विमानतळ, बोरीवली-मार्वे-वर्सोवा-वांद्रे आणि गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या दुव्यांचा समावेश आहे. तसेच दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी वांद्रे-वरळी-नरिमन पॉईंट असा जलमार्गही प्रस्तावित आहे.

​या प्रकल्पामुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल ट्रेनवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित २१ स्थानकांमध्ये वसई, मीरा भाईंदर, गायमुख (ठाणे), कोलशेत, मुंब्रा, कल्याण (गणेश घाट), ऐरोली, वाशी, बेलापूर, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, वांद्रे, वरळी आणि वर्सोवा यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला असून, हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जर या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली, तर मुंबईची किनारपट्टी ही शहराच्या वाहतुकीची नवीन ‘लाईफलाईन’ ठरू शकते.

 

Facebook Comments Box

रेल्वे प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी असलेल्या सवलती सुरू करा- खासदार संजय दीना पाटील

   Follow us on        

​नवी दिल्ली: ​रेल्वे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत पुन्हा चालू करावी अशी मागणी खासदार संजय दीना पाटील यांनी काल लोकसभेत केली.

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आता प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताना खासदार संजय दीना पाटील यांनी लोकसभेत मुंबई आणि उपनगरातील लोकल गाड्यांच्या फेऱ्या तातडीने वाढवण्याची मागणी केली. प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध गाड्यांचे प्रमाण यात मोठी तफावत असल्याने सामान्य मुंबईकरांचे हाल होत असून, रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

​रेल्वे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केल्याबद्दल खासदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना काळापासून ही सवलत बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. ही सवलत केवळ आर्थिक मदत नसून तो त्यांचा सन्मान आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कोणताही विलंब न लावता ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे सवलत तात्काळ बहाल करावी, जेणेकरून त्यांना या उतारवयात आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

​सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार करून रेल्वेने तीर्थक्षेत्रांसाठी विशेष योजना आखावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी मांडली. अयोध्या, वाराणसी आणि वैष्णोदेवी यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने ‘स्वस्त दरातील विशेष टुरिस्ट पॅकेज’ सुरू केल्यास सामान्य नागरिकांना कमी खर्चात आणि सुरक्षितपणे देवदर्शन करणे शक्य होईल, असे पाटील यांनी नमूद केले.

​शेवटी, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ घोषणा न करता जमिनीवर प्रत्यक्ष बदल दिसायला हवेत, तरच मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि सुखाचा होईल. रेल्वे अर्थसंकल्पात आणि नियोजनात मुंबईच्या लोकल प्रवाशांच्या मागण्यांना प्राधान्य मिळावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

Facebook Comments Box

Sawantwadi: मळगाव घाटीत रस्त्यावर डिझेल सांडल्याने अपघात; ५ ते ६ दुचाकीस्वार जखमी

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २० : सावंतवाडी–रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्याची घटना समोर आली आहे. डी. के. टुरिझमच्या परिसरापासून ते मुख्य वळणाखालील भागापर्यंत रस्त्यावर डिझेल पसरल्याने संपूर्ण मार्ग अत्यंत घसरडा बनला आहे.

या घसरड्या रस्त्यामुळे पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्यावर सांडलेले डिझेल वेळेत साफ करण्यात आले नसल्याने आणि रात्रीच्या अंधारामुळे धोका अधिक वाढला होता. विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणी वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघात होण्याची शक्यता कायम आहे.

दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, वाहनांचा वेग कमी ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्यावर सांडलेले डिझेल साफ करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.

Facebook Comments Box

Sawantwadi Terminus: कोचिंग टर्मिनलपाठोपाठ आता ‘वॉटरिंग’ सुविधाही निसटली!

कोकणकरांच्या नशिबी फक्त स्थानके ‘स्किप’ करणाऱ्या गाड्या!

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यातील जनतेला कोकण रेल्वेवरील त्यांचे हक्काचे टर्मिनस म्हणुन प्रतिक्षेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडली आहे. सावंतवाडीला ‘कोचिंग टर्मिनस’चा दर्जा मिळण्याची आस लावून बसलेल्या कोकणी चाकरमान्यांना आता मोठा धक्का बसला असून, टर्मिनस तर लांबच पण आता गाड्यांमध्ये पाणी भरण्याची (Coach Watering Facility) सुविधाही सावंतवाडीच्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाले आहे.

​मडगाव आणि उडुपीचे कल्याण, सावंतवाडीचे काय?

​रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, गोव्यातील मडगाव स्थानकाचा समावेश देशातील पहिल्या ४८ प्रमुख स्थानकांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे २०३० पर्यंत मडगाव येथील कोचिंग फॅसिलिटी दुप्पट करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कर्नाटकच्या उडुपी स्थानकावर आता ‘कोच वॉटरिंग’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने (KRCL) घेतला आहे. या दोन मोठ्या हालचालींमुळे सावंतवाडीचे महत्त्व तांत्रिकदृष्ट्या कमी होत असून, येथे भविष्यात प्रवासी टर्मिनल दर्जाच्या सुविधा मिळणे कठीण होणार आहे.

कर्नाटकचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी आणि खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी संसदेत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच केआरसीएलने १० फेब्रुवारी रोजी उडुपी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पाणीपुरवठ्याबाबत हमी मागितली आहे.

​भविष्यातील धोके आणि परिणाम

गाड्यांना थांबे नाहीत: या सुविधा असल्यास सावंतवाडी स्थानकावर दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्यांना थांबे मिळवणे सोपे झाले असते. आता या सुविधा दक्षिणेकडे गेल्याने या गाड्या या स्थानकास स्किप करून पुढे जातील.

​गाड्यांच्या विस्तारीकरणावर मर्यादा: सावंतवाडीत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने येथून नवीन गाड्या सोडणे किंवा सध्याच्या गाड्यांचा विस्तार करणे तांत्रिकदृष्ट्या ‘फिजिबल’ नसल्याचे कारण रेल्वे प्रशासन पुढे करू शकते.

​पर्यटनावर गदा: सावंतवाडी हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, रेल्वे सुविधांचा अभाव राहिल्यास पर्यटकांच्या संख्येत घट होऊन स्थानिक व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होईल.

​कोकणी माणसावर अन्याय: सावंतवाडीकडे याच पद्धतीने दुर्लक्ष झाले, तर भविष्यात प्रवाशांना केवळ ‘थ्रू’ (जाणाऱ्या-येणाऱ्या) गाड्यांवर अवलंबून राहावे लागेल.

​काय आहे ‘कोच वॉटरिंग’ सुविधेचे महत्त्व?

​रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी स्वच्छ पाणी भरण्याची ही प्रक्रिया आहे. ज्या स्थानकावर ही सोय असते, तेथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणे सोपे होते. राज्य सरकारने पाण्याचा स्रोत आणि पाइपलाईन उपलब्ध करून दिल्यास रेल्वे प्रशासन स्वतःचा प्लांट उभारते. मात्र, सावंतवाडीत अशा हालचाली दिसत नसल्याने स्थानक केवळ नावापुरतेच उरते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वेवर दक्षिणेकडील खासदारांचा ‘होल्ड’ 

यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की गोवा आणि दक्षिणेकडील लोकप्रतिनिधींचा कोकण रेल्वे प्रशासनावर वर्चस्व आहे. त्यामुळे ते आपल्या भागातील प्रवाशांना सोयीच्या असणार्‍या गोष्टी सहजपणे करताना दिसत आहेत. कोकणातील खासदारांना या विषयाचे गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होत असून, येथील रेल्वे प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

Facebook Comments Box

एसटी संगे तीर्थाटन: पाहिल्या फेरीच्या यशानंतर अष्टविनायक यात्रेची पुण्याहून दुसरी फेरी जाहीर

   Follow us on        

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) तर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना” अंतर्गत पुण्यातून अष्टविनायक यात्रेची दुसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ही दुसरी यात्रा आयोजित करण्यात येत असून, ४ व ५ एप्रिल २०२६ (शनिवार व रविवार) या दोन दिवसांच्या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे.

या यात्रेदरम्यान प्रवाशांना सर्व सुखसोयींसह अष्टविनायकाचे दर्शन घडवण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी विशेष किटचीही व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांमार्फत प्रवाशांची काळजी घेतली जाणार असून सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची हमी दिली जात आहे.

या यात्रेसाठी प्रति व्यक्ती पॅकेज दर जाहीर करण्यात आले आहेत. पुरुषांसाठी ३,५०० रुपये, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३,००० रुपये, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी २,४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. इच्छुक प्रवाशांनी त्वरित नोंदणी करून या धार्मिक यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाकडून करण्यात आले आहे. बुकिंगसाठी संबंधित आगाराशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search