अखेर प्रतिक्षा संपली! मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा १ मार्चपासून सुरू; पहा पूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर.

   Follow us on        

मुंबई: कोकण किनारपट्टीवरील प्रवासाला अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्रालयाने ‘मुंबई ते विजयदुर्ग’ थेट रो-पॅक्स फेरी सेवा सुरू केली आहे. ‘M2M Princess’ या अत्याधुनिक जहाजाद्वारे ही सेवा पुरवली जाणार असून, यामुळे प्रवाशांना रस्ते मार्गाच्या त्रासातून सुटका मिळून आरामदायी समुद्र सफारीचा आनंद घेता येणार आहे.

​या फेरी सेवेचे उद्घाटन रविवार, १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता मुंबई (फेरी व्हार्फ) येथून होणार आहे.

​फेरीचे वेळापत्रक

​नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे:

​मुंबई ते विजयदुर्ग: प्रत्येक बुधवार आणि शनिवार सकाळी ८:०० वाजता.

​विजयदुर्ग ते मुंबई: प्रत्येक गुरुवार आणि रविवार दुपारी १२:०० वाजता.

​प्रवासी आणि वाहनांचे भाडे दर

​प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणी आणि वाहनांसाठी वेगवेगळे दर आकारले जाणार आहेत:

१. प्रवासी वर्ग:

​इकोनॉमी: रु. ३,२००

​प्रीमियम इकोनॉमी: रु. ५,०००

​बिझनेस: रु. ७,०००

​फर्स्ट क्लास: रु. ९,०००

​२. वाहन दर (कार प्रकार):

​लहान (S): रु. ६,०००

​मध्यम (M): रु. ७,०००

​मोठी (L): रु. ८,०००

​अतिरिक्त मोठी (XL): रु. ९,०००

​दुचाकी (बाईक): रु. १,०००

​सायकल: रु. ६००

​टीप: बुकिंग आणि अधिक माहितीसाठी प्रवासी www.m2mferries.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

​कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक रहिवाशांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार असून, पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Facebook Comments Box

Railway Recruitment: पश्चिम रेल्वेकडून ५,१४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती; अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू 

   Follow us on        

मुंबई: भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे (Western Railway) विभागात आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मुंबई यांनी २०२५-२६ या वर्षासाठी ५,१४९ apprentis उमेदवारांच्या अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

​महत्त्वाचे तपशील:

​एकूण पदे: ५,१४९

​विभाग: मुंबई (BCT), वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, भावनगर, रत्नागिरी आणि विविध कार्यशाळा (Workshops).

​प्रमुख पदे (Trades): फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पेंटर, स्टेनो आणि इतर.

​पात्रतेचे निकष:

​१. शैक्षणिक पात्रता: किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र आवश्यक.

२. वयोमर्यादा: २१ मार्च २०२६ रोजी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. (SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षे वयात सवलत असेल).

​निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क:

​निवड पद्धत: या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. १० वीचे ५०% गुण आणि ITI मधील ५०% गुण यांच्या सरासरीवर आधारित गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.

​अर्ज शुल्क: १०० रुपये (SC/ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे).

​अर्जाची मुदत आणि पद्धत:

​इच्छुक उमेदवारांनी https://www.rrc-wr.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

​अर्ज सुरू होण्याची तारीख: २१ फेब्रुवारी २०२६

​अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ मार्च २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)

​विशेष टीप: रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी (Apprentice) यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना भविष्यात रेल्वेच्या ‘लेव्हल १’ मधील कायमस्वरूपी भरतीमध्ये २०% जागा राखीव ठेवल्या जातात, ज्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

Facebook Comments Box

वारसा की भंगार? मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्याचा प्रयत्न फसतो आहे

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील मोटार बस सेवेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असतानाच, दक्षिण मुंबईतील जे.जे. उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या तीन नॉन-एसी डबल डेकर बसेसवरून नवा वाद उफाळून आला आहे. सन २०२१ मध्ये सुमारे ६९ लाख रुपये खर्च करून या बसेसचे रूपांतर कॅफे, ग्रंथालय आणि आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले होते. मात्र, आजच्या घडीला या बसेस कुलूपबंद असून त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. या स्थितीमुळे स्थानिक रहिवासी आणि बस प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​स्थानिक रहिवाशांच्या मते, या बसेसमुळे परिसरातील पार्किंगमध्ये अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी लागणारा रस्ताही या बसेसमुळे रोखला जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. दुसरीकडे, बस प्रेमी आणि इतिहासकारांनी या बसेसच्या दुरवस्थेवर बोट ठेवले आहे. चुकीचा रंग आणि निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे या बसेसचे ऐतिहासिक मूल्य नष्ट झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही उत्साही नागरिकांनी तर या बसेस विकत घेऊन त्या पुन्हा पर्यटन मार्गावर चालवण्याची तयारी दर्शवली आहे. एकीकडे ऐतिहासिक वारसा जतन करण्याची ओढ आणि दुसरीकडे व्यावहारिक अडचणी, अशा कात्रीत या ऐतिहासिक बसेस सध्या अडकल्या आहेत.

PC: Sayyed Sameer Abedi

 

 

Facebook Comments Box

लोकल गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीवर उपाय! दोन मेट्रो मार्गांचा अंबरनाथ- बदलापूरपर्यत विस्तार होणार

   Follow us on        

अंबरनाथ: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांसाठी तब्बल ४,८९७.१९ कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या या अर्थसंकल्पात मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो मार्ग १४ (कांजूरमार्ग-बदलापूर) या प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या निर्णयामुळे कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील लाखो नागरिकांना मुंबईशी थेट, वेगवान आणि आरामदायी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेट्रो मार्ग ५ अंतर्गत ठाणे ते भिवंडी ते कल्याण असा २४.९ किमी लांबीचा आणि १५ स्थानकांचा मूळ मार्ग असून, त्याचा विस्तार कल्याणहून दुर्गाडी, उल्हासनगर, अंबरनाथ (मेट्रो ५अ) पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो ५ साठी १,३०९.३० कोटी रुपये तर मेट्रो ५अ साठी १८३.३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विस्तारामुळे अंबरनाथ शहर थेट मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून, उल्हासनगरमार्गे चिखलोलीपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. परिणामी, लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीतून सुटका होऊन नागरिकांना वातानुकूलित मेट्रोमधून सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मेट्रो मार्ग १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर दरम्यान सुमारे ३८ ते ४५ किमी लांबीचा प्रस्तावित मार्ग असून तो देशातील सर्वात लांब मेट्रो मार्गांपैकी एक ठरणार आहे. या मार्गावर कांजूरमार्ग, विक्रोळी, शिळफाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर अशी महत्त्वाची स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काटई नाका ते बदलापूरपर्यंतचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार असून, या मार्गामुळे बदलापूर आणि अंबरनाथला मुंबईच्या पूर्व उपनगरांशी थेट जोडणी मिळेल. सध्या रस्त्याने १.५ ते २ तास लागणारा प्रवास केवळ ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे कर्जत-कसारा लोकलमधील गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रवास वेळेत ३० ते ४० टक्क्यांनी घट होऊ शकते. मध्यमवर्गीय चाकरमान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार असून, रोजच्या प्रवासासाठी एसी मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच बदलापूरच्या निसर्गरम्य परिसरात आणि अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक वाढून रिअल इस्टेट आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळेल.

हे सर्व प्रकल्प २०३० पर्यंत पूर्णत्वास जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि MMRDA च्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यातील विकासाला नवी गती मिळणार असून, मुंबई महानगर प्रदेश अधिक सुसंगत, आधुनिक आणि वेगवान होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

Facebook Comments Box

Railway Updates: ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमांत बदल होण्याची शक्यता

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवासाचे मुख्य स्टेशन म्हणजेच ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमात मोठी सवलत देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मांडला आहे.

सध्याच्या नियमानुसार, प्रवाशांना केवळ पहिल्या आरक्षण चार्टची (First Reservation Chart) तयारी होईपर्यंतच आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, आता हा बदल दुसऱ्या आरक्षण चार्टची (Second Reservation Chart) तयारी होईपर्यंत करण्याची परवानगी देण्याबाबत रेल्वे बोर्डाने ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम’ (CRIS) कडे तांत्रिक व्यवहार्यतेची विचारणा केली आहे.

​रेल्वे बोर्डाचे संचालक संजय मनोचा यांनी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रवाशांना अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. जर या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली, तर प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या साधारण ३० मिनिटे आधीपर्यंत (दुसरा चार्ट तयार होईपर्यंत) आपले बोर्डिंग स्टेशन बदलता येईल. वंदे भारत सारख्या वेगवान गाड्यांच्या बाबतीत ही वेळ मर्यादा १५ मिनिटे असू शकते. सध्या पहिला चार्ट गाडी सुटण्याच्या १० ते २० तास आधी तयार केला जात असल्याने प्रवाशांना ऐनवेळी स्टेशन बदलण्यात अडचणी येतात. नवीन बदल लागू झाल्यास ऐनवेळी प्रवास नियोजन बदलणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Facebook Comments Box

धक्कादायक! NCERT च्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशाच गायब..

   Follow us on        

नवी दिल्ली: एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात असलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला असून राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली एनसीईआरटीने हा खोडसाळपणा केल्याचा आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे.

ऐन शिवजयंती दिवशीच मुधोजीराजांनी एनसीईआरटीने केलेला खोडसाळपणा उघडकीस आणल्यामुळे आता नव्या वादळाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुस्तकातून हटवलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी मुधोजीराजांनी नागपुरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना केली आहे.

​NCERT च्या पाठ्यपुस्तकात १७५९ सालातील मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट होता. या नकाशामध्ये उत्तरेत पेशावर (आजचे पाकिस्तान) पासून ते दक्षिणेत तंजावरपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते. ‘अटक ते कटक’ असा हा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांच्या मनातून पुसून टाकण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप मराठा इतिहासप्रेमींकडून केला जात आहे.

​RTI मधून झालेला धक्कादायक खुलासा

​या प्रकरणावर माहितीच्या अधिकाराखाली (RTI) प्रश्न विचारण्यात आले होते की, हा नकाशा हटवण्यासाठी कोणते ऐतिहासिक पुरावे वापरले किंवा कोणत्या तज्ज्ञांनी हा सल्ला दिला? यावर उत्तर देताना NCERT ने म्हटले आहे की, “यासंबंधीची कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे त्यांच्या फाईल्समध्ये उपलब्ध नाहीत.” कोणत्याही पुराव्याशिवाय हा नकाशा का हटवला गेला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

​या प्रकरणातील आरोपांचे स्वरूप अत्यंत गंभीर असून प्रामुख्याने दबावाचे राजकारण आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष यांवर बोट ठेवण्यात आले आहे. आंदोलकांचा असा दावा आहे की, काही तक्रारदार गट आणि तथाकथित राजघराण्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून NCERT ने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा हा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यातच, ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानंतर NCERT च्या समितीवर एकाही तज्ज्ञ मराठा इतिहासकाराची नियुक्ती करण्यात आली नाही, ज्यामुळे समितीमध्ये इतर प्रादेशिक लॉबींचा प्रभाव वाढला आणि मराठा इतिहासाला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू झाले, असा आरोप केला जात आहे. हा केवळ तांत्रिक किंवा शैक्षणिक बदल नसून, मराठ्यांनी संपूर्ण भारतावर मिळवलेले प्रभुत्व विद्यार्थ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकण्याचा आणि पर्यायाने मराठा अस्मितेवर घाला घालण्याचा हा एक मोठा राजकीय कट असल्याचे अभ्यासकांचे आणि इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे.

​या निर्णयाच्या विरोधात समाज माध्यमांवर #SaveMarathaHistory ही मोहीम जोरात सुरू झाली आहे. खासकरून मराठी एकीकरण समितीने यावर मोठा आक्षेप घेतला आहे. मराठा साम्राज्याने देशाला परकीय आक्रमकांपासून वाचवले, तोच इतिहास पाठ्यपुस्तकातून गायब करणे हे ऐतिहासिक सत्याचा अपलाप करणारे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

NCERT ने हा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा आणि इतिहासाची छेडछाड थांबवावी, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

Facebook Comments Box

Mumbai Local: ‘बंगाली बाबा’च्या जाहिरातींविरुद्ध रेल्वेची मोठी कारवाई

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील लोकल गाड्यांच्या डब्यांमध्ये अवैधपणे लावल्या जाणाऱ्या ‘बंगाली बाबा’ आणि कथित तांत्रिक-मांत्रिकांच्या जाहिरातींविरुद्ध मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम रेल्वेने (WR) विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची दिशाभूल करणाऱ्या आणि रेल्वेच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्या या पोस्टर्सना हटवण्यासाठी सुरक्षा दलांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. या मोहिमेअंतर्गत गेल्या काही दिवसांत हजारो अवैध पोस्टर्स काढून टाकण्यात आले असून, हे पोस्टर्स चिटकवणाऱ्या टोळ्यांचा शोध घेतला जात आहे.

​रेल्वे पोलिसांनी केवळ जाहिराती काढण्यावरच भर दिला नाही, तर या पोस्टर्सवर असलेल्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासही सुरुवात केली आहे. अनेकदा अशा जाहिरातींच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची फसवणूक केली जाते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, डब्यांमध्ये कोणीही अशा प्रकारे अनधिकृत पोस्टर्स लावताना आढळल्यास प्रवाशांनी तातडीने रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून या प्रकारांना कायमचा आळा घालता येईल.

Facebook Comments Box

मध्य रेल्वेच्या ७२ लोको पायलट्सचा स्वेच्छानिवृत्तीसाठी सामूहिक अर्ज; कारण काय?

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ७२ मेल आणि एक्सप्रेस लोको पायलट्सनी (रेल्वे चालक) सामूहिकपणे स्वेच्छानिवृत्तीसाठी (VRS) अर्ज सादर केल्याने खळबळ उडाली आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्या आणि कामाच्या ठिकाणची असुरक्षित परिस्थिती यामुळे आता सेवा सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या अशक्य असल्याचे या चालकांनी म्हटले आहे. मंगळवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) आणि महाव्यवस्थापक कार्यालयाकडे हे अर्ज सुपुर्त करण्यात आले असून, यात प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या सुमार सुविधा, विश्रांतीगृहांची दुरवस्था आणि प्रशासकीय दबावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

​लोको पायलट्सनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ड्युटीदरम्यान मिळणारे जेवण अत्यंत निकृष्ट आणि अस्वच्छ असते, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, धावत्या ड्युटीनंतर विश्रांतीसाठी असलेल्या ‘रनिंग रूम्स’मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून तिथे स्वच्छता राखली जात नाही. रेल्वेच्या पायाभूत सुविधांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, रात्रीच्या वेळी लोबी आणि शेड्सपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने अपघाताची भीती व्यक्त केली आहे. याशिवाय, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणारा मानसिक त्रास आणि कामाच्या वाढत्या दबावामुळे वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर ताण येत असल्याचे या अर्जात म्हटले आहे.

​नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (NRMU) या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे. युनियनचे सरचिटणीस वेणू पी. नायर यांनी म्हटले आहे की, ही घटना म्हणजे रेल्वे प्रशासनासाठी एक धोक्याची घंटा असून, सुरक्षिततेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होणे हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेसाठी घातक ठरू शकते. युनियनने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. वारंवार दाद मागूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच कर्मचाऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

Facebook Comments Box

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सुरुवातीला अवजड वाहनांना ‘नो एंट्री’ ची मागणी

   Follow us on        

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीचे सहा महिने केवळ प्रवासी वाहनांनाच या मार्गावरून वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) चे उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड यांना पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक मार्गावर सुरक्षेची संपूर्ण खात्री होईपर्यंत जड वाहने व मालवाहतूक तात्पुरती बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकी दृष्ट्या जटिल प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असून बोर घाटातील वळणावळणाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र या मार्गावर बोगदे, उंच पूल, खोल दऱ्या तसेच हवामानातील बदल यांसारख्या संवेदनशील बाबी लक्षात घेता सुरुवातीच्या काळात वाहतुकीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने नव्या मार्गावरील सर्व तांत्रिक यंत्रणा, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन सेवा, तसेच रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती यांची चाचणी प्रत्यक्ष वापरातून होणे आवश्यक असते. त्यामुळे सुरुवातीच्या सहा महिन्यांत केवळ हलकी व प्रवासी वाहने चालू दिल्यास मार्गाची क्षमता, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचे प्रभावी मूल्यमापन करता येईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः जड मालवाहतूक किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे संभाव्य अपघातांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे त्यांना तात्पुरती परवानगी देऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.

या मागणीमागील मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे आणि नव्या मार्गावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणे हा आहे. संबंधित यंत्रणांनी या सूचनेचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली असून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रारंभासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्गातील चार ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांच्या संशोधनासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

   Follow us on        

मालवण, १९ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार प्रमुख समुद्री किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, दस्तावेजीकरण आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र (Study Centre) उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हे केंद्र मालवणात स्थापन होणार असून, शिवकालीन व्यापार, आरमार व्यवस्था, या किल्ल्यांच्या रणनीतिक महत्त्व आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा वैज्ञानिक अभ्यास होईल. यामुळे युवा संशोधकांना मार्गदर्शन, व्याख्याने, संशोधन प्रकल्प आणि या वारशाचे जागतिक स्तरावर प्रसार होण्यास मदत होईल.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८व्या वर्धापन दिनी या केंद्राची घोषणा करण्यात आली होती. आता निधी मंजुरीमुळे प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

या केंद्रामुळे शिवरायांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि सिंधुदुर्गच्या सागरी वारशाला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, स्थानिक इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदेशीर ठरेल.

 

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search