Sawantwadi: ओटवणेतील अज्ञातांनी रातोरात उभारलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील गूढ कायम.

   Follow us on        

ओटवणे (प्रतिनिधी): येथील देऊळवाडीमध्ये भिवसेन गावकर यांच्या घरासमोरील जागेत अज्ञात शिवप्रेमींनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात उभारल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच आश्चर्य व्यक्त होत असतानाच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मनात असलेली इच्छा अज्ञात शिवप्रेमींनी प्रत्यक्षात उतरवली, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरताच पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मनमोहक पुतळा पाहून अनेक जण नतमस्तक झाले आणि राजांनी मानाचा मुजरा अर्पण केला.

​दरम्यान, पुतळा उभारल्याची माहिती पोलीस प्रशासनालाही मिळाल्यानंतर नियमानुसार चौकशी करण्यात आली. मात्र, हा पुतळा नेमका कोणी उभारला याचा उलगाडा होऊ शकला नाही. तरीही स्थानिक युवकांनी अज्ञात शिवप्रेमींच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुतळ्याची पुढील जबाबदारी स्वीकारण्याची ग्वाही पोलीस प्रशासनाला दिली आहे. ओटवणे येथील रावळनाथ विद्यामंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पूर्वीपासून असला तरी सार्वजनिक ठिकाणीही पुतळा असावा, ही स्थानिकांची इच्छा होती. देऊळवाडीत नव्याने पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक शिवभक्तांनी गर्दी केली. पुतळ्याचे पवित्र्य जपण्याबरोबरच त्याची संपूर्ण जबाबदारी वाडीतील युवकांनी स्वीकारली असून, ही जबाबदारी सर्व ओटवणेकरांची असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका रात्रीत उभारलेल्या या पुतळ्याची ओटवणे दशक्रोशी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील काळात येथे शिवजयंतीसह विविध कार्यक्रम जल्लोषात साजरे करण्यात येणार असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook Comments Box

मुंबईतील ४ लाख पगडी भाडेकरूंची चिंता वाढली

   Follow us on        

मुंबई:मुंबईतील तब्बल ९३५ जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पगडी पद्धतीमधील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. म्हाडाच्या (MHADA) कार्यकारी अभियंत्यांना ‘कलम ७९-अ’ अंतर्गत नोटिसा बजावण्याचा अधिकार आहे की नाही, यावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यामुळे मुंबईतील सुमारे ४ लाख पगडी रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यात तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काय आहे मुख्य वाद?

​धोकादायक किंवा उपकरप्राप्त (Cessed) इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगणे आणि पुनर्विकास प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘कलम ७९-अ’ अंतर्गत नोटीस बजावणे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांना ही नोटीस बजावण्याचा अधिकार आहे का, यावरून घरमालक आणि म्हाडा यांच्यात वाद सुरू आहे.

​डिसेंबर २०२४: अनेक घरमालकांनी या अधिकाराला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

​जुलै २०२५: मुंबई उच्च न्यायालयाने या नोटिसांच्या वैधतेची आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली.

​समितीचा निष्कर्ष: समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, म्हाडाच्या २००१ मधील ठरावानुसार आणि ऑक्टोबर २०२३ च्या शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कार्यकारी अभियंत्यांनाच सक्षम प्राधिकरण मानले गेले आहे. त्यांना किमान ५१ टक्के भाडेकरूंच्या संमतीने पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी घरमालकांना नोटीस देण्याचा अधिकार आहे.

​समितीच्या अहवासानंतर या समस्येवर तोडगा निघेल अशी आशा असतानाच, घरमालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने हा पेच अधिकच वाढला आहे.

​”आम्हाला मरायला सोडले आहे का?” — रहिवाशांची आर्त हाक

​पावसाळा तोंडावर आलेला असताना पुनर्विकास रखडल्याने आणि कायदेशीर लढाईमुळे इमारतींची दुरुस्तीही करता येत नसल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व भीती व्यक्त केली आहे:

​निनद शिवणेकर (परळ रहिवासी): “आमचे घर खूप छोटे असल्याने मी, माझी पत्नी आणि ५ वर्षांची मुलगी गच्चीवर झोपतो. वृद्ध पालकांना बाहेरचे शौचालय वापरणे कठीण जाते. छप्पर कधीही कोसळू शकते, म्हणून मी छपराला आधार देण्यासाठी लाकडे आणि होर्डिंग्ज शोधत आहे. या शहरात घरमालकांसारखी अमानुष माणसेही राहतात, हे मुंबईचे कडू सत्य आहे.”

​दिनेश लोके (दादर रहिवासी): “मुंबईत लवकरच मुसळधार पाऊस सुरू होईल. इमारत न्यायालयात अडकल्याने दुरुस्ती किंवा पुनर्विकास काहीच होत नाहीये. म्हाडाच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह असल्याने यंदा पावसाळापूर्व स्ट्रक्चरल ऑडिटही होणार नाही. प्रशासन आम्ही मरण्याची वाट पाहत आहे का?”

​सुमेधा तावडे (गिरगाव रहिवासी): “आधी घरमालकांनी भाडे घेणे बंद केले, मग दुरुस्ती नाकारली आणि नंतर भाडे दिले नाही म्हणून घर खाली करण्याची धमकी दिली. आता पुनर्विकास लांबणीवर टाकण्यासाठी ते न्यायव्यवस्थेचा वापर करत आहेत. आजच्या महागाईत आम्ही दुसरीकडे घर घेऊ शकत नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मॅटर गेल्यामुळे आमची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.”

कायद्यात बदलाची गरज

​या परिस्थितीवर बोलताना सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी सांगितले की, समितीच्या अहवालानंतर आता ‘महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा’ आणि ‘म्हाडा कायद्यात’ त्वरित सुधारणा करण्याची गरज आहे. तरच लाखो पगडी रहिवाशांना खरा न्याय मिळू शकेल.

Facebook Comments Box

Sawantwadi: ‘एका’ चे नाही तर ‘एकी’ चे यश! सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामकरणाच्या निर्णयानंतर शहरात पेढे वाटून जल्लोष

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या टर्मिनसचे नाव आता “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे होणार असून, राज्य सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. कोकणातील जनतेची आणि रेल्वे प्रवासी संघटनेची ही अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने सावंतवाडीत प्रचंड आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे वृत्त समजताच सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने शहरात व रेल्वे स्थानकावर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला, तर सावंतवाडी येथील ऐतिहासिक गांधी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

​हा ऐतिहासिक निर्णय मिळवून देण्यासाठी ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’च्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने रस्त्यावरील आंदोलनापासून ते मंत्रालयापर्यंत मोठा संघर्ष केला गेला. संघटनेने जानेवारी २०२४ मध्ये स्थानक नामकरण व टर्मिनसच्या रखडलेल्या कामासाठी २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत सावंतवाडीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला तातडीने पत्र पाठवले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट २०२४ रोजी रेल्वे प्रशासनाने हा विषय राज्य शासनाचा असल्याचे स्पष्ट केल्यावर संघटनेने आपला मोर्चा राज्य सरकारकडे वळवला. आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे ४ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रालयात या विषयावर उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये संघटनेच्या वतीने सागर तळवडेकर, मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी प्रवाशांची बाजू भक्कमपणे मांडली.

​या संपूर्ण लढ्यात लोकप्रतिनिधींचा आणि विविध शासकीय स्तरावरील बैठकांचा मोठा वाटा राहिला. मागील आठवड्यात १८ मे रोजी संघटनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष विनोद नाईक यांनी मंत्रालयात जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली होती, ज्यावर त्यांनी अवघ्या चार दिवसांत सकारात्मक निर्णय मिळवून दिला. तसेच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. याशिवाय माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. हा लढा केवळ कागदपत्रांपुरता मर्यादित न ठेवता संघटनेने एक्स (Twitter), फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर ‘ई-मेल आणि तक्रार मोहीम’ राबवून डिजिटल जनआंदोलन उभे केले, ज्यामुळे सरकारला याची दखल घेणे भाग पडले.

​हे यश कोणा एकाचे नसून सर्वांच्या एकीचे फळ असल्याचे सांगत संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी ‘कोकण विकास समिती’चे जयवंत दरेकर, अक्षय महापदी तसेच ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ’ व ‘जनजागृती सेवा संस्था’ यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय खासदार, आमदार आणि पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. प्रा. मधु दंडवते साहेबांचे नाव स्थानकाला मिळाल्याने सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, आगामी काळात सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करणे, नवीन कामे समाविष्ट करणे आणि कोरोना काळात बंद झालेले थांबे व गाड्या पूर्ववत करण्यासाठी संघटना आपला लढा अविरत सुरू ठेवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Facebook Comments Box

रेल्वेचा मोठा निर्णय: ५ विशेष गाड्या आता धावणार नियमित; प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्तम निर्णय घेतला आहे. रेल्वे विभाग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जवळपास सर्वच लांब पल्ल्याच्या विशेष (Special) गाड्या आता नियमित (Regular) करणार आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांना होणारे फायदे:

  • प्रवाशांना विशेष भाड्याऐवजी आता नियमित रेल्वे भाडेतक्त्यानुसारच तिकीट दर द्यावे लागतील, ज्यामुळे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडणार नाही.

  • गाड्या नियमित झाल्यामुळे यामध्ये ‘तत्काळ कोटा’ (Tatkal Quota) यासह इतर सर्व आरक्षित कोटे लागू होतील.

नियमित होणाऱ्या ५ जोड्या गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. ट्रेन क्र. १९४१९/२० अहमदाबाद – तिरुचिरापल्ली – अहमदाबाद साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०९४१९/२० चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • १९४१९ एक्सप्रेस: प्रत्येक गुरुवारी सकाळी ०९:३० वाजता अहमदाबादहून सुटेल आणि शनिवारी पहाटे ०३:३५ वाजता तिरुचिरापल्ली येथे पोहोचेल.

    • १९४२० एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक रविवारी सकाळी ०५:४५ वाजता तिरुचिरापल्लीहून सुटेल आणि सोमवारी रात्री २१:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे (Stoppages): अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, वसई रोड, कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदानी, गुंटकल, तादिपत्री, कडापा, रेनिगुंटा, अरकोणम, पेरंबूर, चेन्नई एगमोर, तांबरम, चेंगलपट्टू, विल्लुपुरम, कड्डलोर, चिदंबरम, सिरकाझी, वैतीस्वरणकोईली, मैलादुथुराई, कुंभकोणम, पापनासम, तंजावर, तिरुचिरापल्ली.

  • कोच रचना (Coach Composition): ०१ वातानुकूलित टू-टियर (2AC), ०३ वातानुकूलित थ्री-टियर (3AC), १२ स्लीपर (Sleeper), ०४ द्वितीय श्रेणी साधारण (General) आणि ०२ एसएलआर (SLR) – एकूण २२ ICF कोच.

२. ट्रेन क्र. १९५२५/२६ हापा – नाहारलगुन – हापा साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०९५२५/२६ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • १९५२५ एक्सप्रेस: प्रत्येक बुधवारी मध्यरात्रीनंतर (अल-सुबह) ००:४० वाजता हापाहून सुटेल आणि शुक्रवारी दुपारी १६:०० वाजता नाहारलगुन येथे पोहोचेल.

    • १९५२६ एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक शनिवारी सकाळी ०९:४० वाजता नाहारलगुनहून सुटेल आणि मंगळवारी मध्यरात्रीनंतर ००:३० वाजता हापा येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: हापा, राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, छायापुरी, गोधरा, रतलाम, नागदा, उज्जैन, मक्सी, शाजापूर, ब्यावरा राजगड, रुठियाई, गुणा, शिवपुरी, ग्वाल्हेर, भिंड, इटावा, गोविंदपुरी, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर रोड, बनारस, वाराणसी जंक्शन, गाझीपूर सिटी, बलिया, छप्रा, हाजीपूर, शाहपूर पटोरी, बरौनी, बेगुसराय, खगरिया, नौगाछिया, कटिहार, बारसोई, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, बारपेटा रोड, रंगिया, उदलगुरी, न्यू मिसामारी, रँगापारा नॉर्थ, हरमुती, नाहारलगुन.

  • कोच रचना: ०१ वातानुकूलित टू-टियर, ०३ वातानुकूलित थ्री-टियर, १२ स्लीपर, ०४ द्वितीय श्रेणी साधारण आणि ०२ एसएलआर – एकूण २२ ICF कोच.

३. ट्रेन क्र. ११६६५/६६ राणी कमलापती – अगरतळा – राणी कमलापती साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०१६६५/६६ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • ११६६५ एक्सप्रेस: प्रत्येक गुरुवारी दुपारी १५:२० वाजता राणी कमलापतीहून सुटेल आणि शनिवारी संध्याकाळी १८:५५ वाजता अगरतळा येथे पोहोचेल.

    • ११६६६ एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक रविवारी संध्याकाळी १७:२० वाजता अगरतळाहून सुटेल आणि मंगळवारी संध्याकाळी १६:३५ वाजता राणी कमलापती येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी, पिपरिया, गाडरवाडा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सातना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगरिया, नौगाछिया, कटिहार, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, न्यू बोंगाईगाव, रंगिया, गुवाहाटी, चापरमुख, न्यू हाफलाँग, बदरपूर, न्यू करीमगंज, धर्मनगर, कुमारघाट, आंबासा, तेलियामुरा, अगरतळा.

  • कोच रचना: ०१ वातानुकूलित टू-टियर, ०५ वातानुकूलित थ्री-टियर, ११ स्लीपर, ०४ द्वितीय श्रेणी साधारण आणि ०२ एसएलआर – एकूण २३ ICF कोच.

४. ट्रेन क्र. २०१६०/५९ जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस

(गाडी क्र. ०२१९८/९७ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • २०१६० सुपरफास्ट: प्रत्येक शुक्रवारी रात्री २३:५० वाजता जबलपूरहून सुटेल आणि रविवारी दुपारी १४:३० वाजता कोईम्बतूर येथे पोहोचेल.

    • २०१५९ सुपरफास्ट (परतीचा प्रवास): प्रत्येक सोमवारी संध्याकाळी १७:०५ वाजता कोईम्बतूरहून सुटेल आणि बुधवारी सकाळी ०८:४५ वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: जबलपूर, नरसिंगपूर, गाडरवाडा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, बिंदूर मूकंबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरू, कासारगोड, कण्णूर, वडाकरा, कोझिकोड मेन, तिरूर, शोराणूर, पालक्काड, कोईम्बतूर.

  • कोच रचना: ०१ वातानुकूलित प्रथम श्रेणी (1AC), ०२ वातानुकूलित टू-टियर, ०६ वातानुकूलित थ्री-टियर, ०९ स्लीपर, ०४ द्वितीय श्रेणी साधारण आणि ०२ एसएलआर – एकूण २४ ICF कोच.

५. ट्रेन क्र. १५३०२/०१ लालकुवा – क्रांतीवीर सांगोली रायाण्णा बेंगळुरू सेंट्रल – लालकुवा साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०५MD७३/७४ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • १५३०२ एक्सप्रेस: प्रत्येक शनिवारी संध्याकाळी १७:४५ वाजता लालकुवा येथून सुटेल आणि सोमवारी दुपारी १५:२५ वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल.

    • १५३०१ एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक मंगळवारी सकाळी ०७:१५ वाजता बेंगळुरूहून सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०९:०५ वाजता लालकुवा येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: लालकुवा, किच्छा, बहेडी, भोजीपुरा, इज्जतनगर, बरेली सिटी, बरेली जंक्शन, बदायूं, कासगंज, हाथरस सिटी, मथुरा कॅंट, मथुरा जंक्शन, आग्रा कॅंट, ग्वाल्हेर, राणी लक्ष्मीबाई झाशी, राणी कमलापती, इटारसी, बैतुल, नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बलहारशाह, सिरपूर कागजनगर, मंचरियाल, पेदापल्ली, वरंगल, महबुबाबाद, खम्मम, विजयवाडा, तेनाली, ओंगोल, नेल्लोर, गुडूर, रेनिगुंटा, काटपाडी, जोलारपेट्टई, कुप्पम, बांगरपेट, कृष्णराजपुरम, बेंगळुरू कॅंट, केएसआर बेंगळुरू सेंट्रल.

रेल्वे मुख्यालयाने संबंधित विभागीय रेल्वे प्रशासनाला वरील सर्व गाड्यांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नामकरण; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

   Follow us on        
मुंबई: कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली असून, याबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे कोकणातील जनतेची आणि विविध प्रवासी संघटनांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर मार्गी लागली आहे. यासाठी  कोकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ आदी संघटनांनी प्रयत्न केले होते.
स्व. मधु दंडवते साहेबांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे, यासाठी कोकण विकास समितीने विशेष प्रयत्न केले होते. समिती मार्च २०२१ पासून सातत्याने पाठपुरावा करत होती. सुरुवातीला कोकण रेल्वे प्रशासनाने हे प्रकरण राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट केल्यावर, समितीने जून २०२३ मध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला. त्यानंतर हा प्रस्ताव परिवहन विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सावंतवाडी पंचायत समिती आणि मळगाव ग्रामपंचायत अशा प्रशासकीय स्तरातून सकारात्मक अहवालांसह पुढे सरकला. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अखेर आज, २६ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी या नामकरणाच्या प्रस्तावावर मंजुरीची मोहोर उमटवली. कोकणाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेसाठी स्व. मधु दंडवते यांनी दिलेले अमूल्य योगदान अतुलनीय आहे. अखंड कोकणवासीयांच्या मनातील भावनांचा आदर करत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय आणि कोकण विकास समितीचा यशस्वी पाठपुरावा, ही संपूर्ण कोकणसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
Facebook Comments Box

पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आज प्रत्यक्ष पाहणी

   Follow us on        

मावळ लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाकांक्षी पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याने खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आज मंगळवार, २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

पनवेल रेल्वे स्थानकापासून सुरू होणारा हा पाहणी दौरा चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत रेल्वे स्थानकांवर थांबून पूर्ण होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) मार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (MUTP-3) अंतर्गत २,७८२ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येत असलेल्या या २९.६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गामुळे पनवेल आणि कर्जत या दोन महत्त्वाच्या शहरांना थेट जोड मिळणार आहे. या नवीन मार्गामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील रेल्वे वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, पर्यायी लोकल सेवा सुरू होईल आणि कल्याणमार्गे धावणाऱ्या गाड्यांवरील गर्दीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे यांसारखी बहुतांश कामे पूर्ण झाली असून, कर्जत येथे रुळ जोडणी आणि पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरात लवकर हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे.

 

 

 

Facebook Comments Box

आंबेनळी दाभिळटोंक – ‘मृत्यूचा घाट’

   Follow us on        

पोलादपूर: निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक असलेल्या दाभिळटोक घाटात काल रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. या घाटातून प्रवास करणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने, कार थेट १२०० ते १९०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेत कारमधील सर्व ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या ताज्या अपघातामुळे दाभिळटोक परिसराला स्थानिकांनी दिलेले “मृत्यूचा घाट” हे नाव पुन्हा एकदा दुर्दैवाने खरे ठरले आहे.

​या घाटाचा इतिहास पाहिला  येथे अपघातांची मालिकाच सुरू आहे. जुलै २०१८ मध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात ३३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, जो या घाटाच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा डाग आहे. त्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. अगदी अलीकडे, मार्च २०२६ मध्ये मारुती वॅगनआर कारचा अपघात होऊन ५ जण गंभीर जखमी झाले होते, तर एप्रिल २०२६ मध्ये एका दांपत्याच्या बाईकचा अपघात होऊन दोघांचा ७०० फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला होता. आणि आता मे २०२६ मधील या ताज्या दुर्घटनेने या घाटातील मृत्यूचे सत्र अजूनही थांबले नसल्याचे दाखवून दिले आहे.

​स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, या घाटातील अत्यंत तीव्र व धोकादायक वळणे, रस्त्याच्या कडेला असलेली हजारो फूट खोल दरी, दाट झाडी आणि धुके यामुळे समोरचे वाहन न दिसणे आणि रस्त्याची झालेली अत्यंत दुरवस्था ही या अपघातांची मुख्य कारणे आहेत. “प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. आम्ही वारंवार मागणी करूनही इथे साधे सुरक्षा रक्षक किंवा रेलिंग बसवले गेलेले नाही,” असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​या घाटातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु, प्रत्येक अपघातानंतर केवळ चौकशीचे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाकडून अजूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता तरी या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल का? आणि घाटात रस्त्याचे रुंदीकरण, मजबूत सुरक्षा रेलिंग (Safety Railings) व धुके संकेत यंत्रणा (Fog Indicators) बसवली जाईल का? असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्गातील पर्यटकांना गोव्यात मारहाण; महाराष्ट्र-गोवा सीमेवर युवासेनेचे तीव्र आंदोलन

   Follow us on        

बांदा: गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधुदुर्गातील महिला, लहान मुले आणि तरुणांना स्थानिक मद्यपींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २५ मे रोजी युवासेनेने महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे तीव्र आंदोलन छेडले. युवासेना पदाधिकारी सुरज परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्य महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही राज्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे.

​मारहाणीच्या या गंभीर घटनेनंतर गोवा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडूनही कोणतीही दाद मिळाली नाही. प्रशासनाच्या आणि गोवा पोलिसांच्या याच उदासीनतेमुळे आंदोलकांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, असा आरोप सुरज परब यांनी केला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे गोव्याच्या बाजूने पेडणेपर्यंत तर महाराष्ट्राच्या बाजूने बांद्यापर्यंत वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. “गोव्याची गाडी पुढे जाऊ देणार नाही” या भूमिकेवर आंदोलक ठाम असल्याने आता या प्रकरणात गृहखात्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Photo Credit – AI

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणारी विशेष गाडी आता नियमित धावणार; थांबे आणि वेळापत्रक ईथे पहा

   Follow us on        

​Konkan Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोईम्बतूर आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष ट्रेन (०२१९८/०२१९७) आता अधिकृतपणे नियमित (Regularize) करण्यात आली आहे. या ट्रेनला आता २०१६०/२०१५९ जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर एक्सप्रेस म्हणून चालवले जाईल. या निर्णयामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे नवीन क्रमांक आणि वेळापत्रक:

​१. गाडी क्रमांक २०१६० (जबलपूर ते कोईम्बतूर एक्सप्रेस):

​दिवस: दर शुक्रवारी रात्री २३:५० वाजता ही ट्रेन जबलपूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: शनिवारी सकाळी ०६:४२ वाजता खंडवा, दुपारी १६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि रविवारी दुपारी १४:३० वाजता कोईम्बतूरला पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक २०१५९ (कोईम्बतूर ते जबलपूर एक्सप्रेस):

​दिवस: दर सोमवारी संध्याकाळी १७:०५ वाजता ही ट्रेन कोईम्बतूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: बुधवारी पहाटे ०२:३२ वाजता खंडवा आणि सकाळी ०८:४५ वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

​महाराष्ट्रातील प्रमुख थांबे (Commercial Stoppages):

​कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या या ट्रेनला महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

​भुसावळ

​नाशिक रोड

​पनवेल

​रोहा

​खेड

​चिपळूण

​रत्नागिरी

​कणकवली

​कुडाळ

​इतर राज्यातील प्रमुख थांबे: नर्सिंगपूर, गाडरवारा, पिपारीया, इटारसी, हरदा, खंडवा, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, पालक्काड इत्यादी.

​गाड्यांची रचना (Coach Composition):

​या एक्सप्रेसला एकूण २४ डबे (Coaches) असणार आहेत, ज्यामध्ये प्रवाशांच्या सर्व श्रेणींचा विचार करण्यात आला आहे:

​स्लीपर क्लास (WGSCN): ९ कोच

​थर्ड एसी (WGACCN): ६ कोच

​सेकंड एसी (WGACCW): २ कोच

​फर्स्ट एसी (WGFAC): १ कोच

​सामान्य डबे (GS): ४ कोच

​इतर (GSLR/GSLRD): २ कोच

​कधीपासून होणार सुरू?

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून लवकरच एका सोयीस्कर तारखेपासून ही ट्रेन नियमित सेवा म्हणून रुळावर धावणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास सुरुवातीला ही गाडी विशेष उद्घाटनात्मक सेवा म्हणूनही चालवली जाऊ शकते. प्रवाशांनी तिकीट बुकिंग आणि अधिकृत तारखेसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

राज्यात उन्हाचा तडाखा कायम; शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार सुरू

   Follow us on        

नागपूर: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, हा उष्णतेचा कहर लवकर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विदर्भ, मराठवाड्यासह इतर ग्रामीण आणि शहरी भागांतही सूर्य जणू आग ओकत आहे. या तीव्र उष्णतेमुळे आणि असह्य उकाड्यामुळे लहान मुलांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या काही भागांत उष्माघातामुळे नागरिकांचा बळी गेल्याच्या नोंदीही झाल्या आहेत. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकार शाळा सुरू होण्याचा दिवस पुढे ढकलण्याच्या हालचाली करत आहे. त्यानुसार, शाळा १५ जूनऐवजी २६ जून रोजी सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शनिवारी नागपूर येथे ही महत्त्वाची माहिती दिली.

​दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अतिशय तीव्र झाली असून पुढील दोन दिवस येथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आज तब्बल ४७ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या हंगामात वर्ध्यात दुसऱ्यांदा एवढे प्रचंड तापमान नोंदवले गेले आहे. दिल्लीतही उष्णतेचा पारा इतका वाढला आहे की, पत्रकार परिषदेसाठी आलेले अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना असह्य उकाड्यामुळे आपली पीसी (पत्रकार परिषद) अर्धवट आटोपती घ्यावी लागली. त्यांनी दिल्लीतील उष्णता सहन होत नसल्याचे जाहीरपणे सांगितले.

​दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारी सकाळपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण पाहायला मिळाले. मुंबईचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असले, तरी हवेत ८० टक्क्यांपर्यंत वाढलेली आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे मुंबईकरांना प्रचंड आणि असह्य उकाडा सहन करावा लागला. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी स्पष्ट केले असून, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search