इंधन बचत आणि शाश्वत विकासासाठी कोल्हापूर व कोकण विभागात प्रस्तावित तीन रेल्वेमार्ग विकसित करावेत

   Follow us on        

कोल्हापूर: देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. देशाची आर्थिक गंगाजळी वाचवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी केवळ रस्ते विकास पुरेसा नसून, रेल्वे जाळ्याचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे संघाने या पत्रात अधोरेखित केले आहे.

​प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, सध्या मुंबई-पुणे-कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांदरम्यान रोज हजारो खाजगी वाहनांमुळे लाखो लीटर पेट्रोल व डिझेल वाया जात असून अब्जावधी रुपयांचे परकीय चलन देशाबाहेर जात आहे. ‘शक्तीपीठ महामार्ग’ सारख्या प्रकल्पांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात असले, तरी त्यामुळे भविष्यात परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होणार नाही. याला उत्तम पर्याय म्हणून १) कोल्हापूर – आजरा – गडहिंग्लज – चंदगड – बेळगाव, २) सावंतवाडी – चंदगड – बेळगाव आणि ३) कोल्हापूर – वैभववाडी या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे नियोजन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जलद गतीने करून पुढील पाच वर्षांत ते प्रत्यक्ष पूर्ण करावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

​या रेल्वे मार्गांमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सीमाभागाचा आर्थिक, औद्योगिक, पर्यटन व सामाजिक विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. रेल्वे वाहतूक वाढल्यास पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल, रस्ते अपघात व पर्यावरण प्रदूषण कमी होऊन ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल, असेही पत्रात नमूद केले आहे. केंद्र व राज्य शासनाने केवळ “पेट्रोल वाचवा” असे आवाहन करण्यापुरते मर्यादित न राहता रेल्वे आणि जलमार्गासारख्या शाश्वत वाहतूक सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. या मागणीबाबत सकारात्मक विचार करून केंद्र शासन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून त्वरित योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शासन फक्त कंत्राटदार व उद्योगपतींच्या हितासाठी कार्यरत असून सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी भावना जनतेत निर्माण होईल, असा इशारा ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघा’चे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांनी दिला आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Facebook Comments Box

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद

   Follow us on        

मालवण (प्रतिनिधी):पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद मालवणमधील यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून, आगामी पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश २६ मे २०२६ पासून ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. मालवणच्या पर्यटनात सागरी व खाडीतील जलपर्यटनाचे मोठे महत्त्व असून दरवर्षी १ सप्टेंबर ते २५ मे असा हा जलपर्यटनाचा अधिकृत हंगाम असतो. सध्या मे महिन्यात या हंगामाचा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालवण बंदर निरीक्षकांनी अधिकृत पत्र काढून ही बंदी जाहीर केली आहे.

​प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या १३ मे २०२६ च्या पत्राचा संदर्भ देऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘इनलँड व्हेसल्स ऍक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना, बोटींना आणि जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा, नौकाविहार (बोटिंग) आणि स्कुबा डायव्हिंग या सेवा पूर्णपणे बंद राहतील.

​हा आदेश मालवणमधील एकूण ३९ प्रमुख संस्था, गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, चिवला जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग संघटना व वॉटर स्पोर्ट्स संस्था, तसेच स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालकांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा धोकादायक परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही आवश्यक खबरदारी घेतली जाते.

Facebook Comments Box

सुरक्षित मानल्या जाणाऱ्या LHB डब्यांची पोलखोल! ऋषिकेशमधील अपघाताने प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

   Follow us on        

ऋषिकेश: योग नागरी ऋषिकेश रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील खंड गाव परिसरामध्ये रात्री ९:३० वाजेच्या सुमारास उज्जैनी एक्सप्रेसचे तीन आधुनिक ‘एलएचबी’ (LHB) डबे अचानक पटरीवरून उतरले. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसर आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

​रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना रेल्वे यार्डमध्ये डब्यांच्या शंटिंगदरम्यान घडली. शंटिंग म्हणजेच डबे जोडण्याच्या किंवा ते बाजूला करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हे डबे रुळावरून घसरले. सुदैवाने, हे सर्व डबे पूर्णपणे रिकामे होते आणि त्यात एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणीही जखमी झाले नाही.

​घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञ आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी यंत्रणेकडून युद्धपातळीवर पुनर्स्थापना कार्य सुरू करण्यात आले आहे. या मार्गावरील इतर गाड्यांवर याचा मोठा परिणाम होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.

​या संपूर्ण अपघातात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, डब्यांचा वेग अत्यंत कमी असतानाही त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षित आणि गतिमान प्रवासासाठी पारंपरिक डब्यांऐवजी या आधुनिक एलएचबी (Linke Hofmann Busch) डब्यांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला आहे. हे डबे अपघाताच्या वेळी एकमेकांवर चढत नाहीत आणि अत्यंत सुरक्षित मानले जातात. मात्र, इतक्या कमी वेगात झालेल्या घटनेत डब्यांचे झालेले नुकसान पाहून तंत्रज्ञही चक्रावले आहेत.

​या अपघातामुळे रेल्वेच्या अंतर्गत देखभालीवर आणि तांत्रिक सुरक्षेवर पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाली आहे. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या यंत्रणेत कुठे त्रुटी राहिली, याचा शोध आता घेतला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

​’कोंकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरची ऐतिहासिक झेप; ‘कॅनस फिल्म फेस्टिवल’च्या रेड कार्पेटवर दिमाखात साकारली नऊवारी साडी!

   Follow us on        

सिंधुदुर्ग:देवबाग येथील अंकिता वालावळकर या कोंकणी मुलीने आपल्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. २०२६ च्या कॅन फिल्म महोत्सवात ती रेड कार्पेटवर चालली आणि महाराष्ट्राच्या कोंकण भूमीचा गौरव जगभरात पोहोचवला.

‘कोंकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिताने बेबी पिंक रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. या साडीवर कोंकणातील खजुर, बेटं आणि समुद्रकिनाऱ्याचे देखणे मोटिफ्स विणलेले होते, ज्याने तिच्या मुळांशी असलेला तिचा सखोल संबंध दर्शवला.

अंकिताच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या १० वर्षांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. २०१६ मध्ये मुंबईत येऊन कोणतेही संसाधन नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अंकिताने आपला प्रवास सुरू केला. अनेक अडचणी, त्याग आणि अथक मेहनतीनंतर आज ती कॅनच्या रेड कार्पेटवर पोहोचली आहे. बहिणीच्या पोस्टमध्ये अभिमान, आनंद आणि भावनिक क्षण भरलेले आहेत. कोंकणातील ग्रामीण भागातील एका मुलीने जागतिक पटलावर आपली छाप पाडल्याने महाराष्ट्रातून मोठा अभिमान व्यक्त केला जात आहे. अंकिताची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

 

 

Facebook Comments Box

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा केबल स्टेड पूल लवकरच सेवेत; अंतर ५० किमीने कमी होणार!

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी केबल स्टेड पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर तब्बल ४५ ते ५० किलोमीटरने कमी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रवाशांना पोलादपूरचा प्रदीर्घ आंबेनळी घाट पार करावा लागायचा, मात्र आता या पुलामुळे हा वेळखाऊ मार्ग वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाट मार्गावरून पलीकडे थेट तापोळा व कास रस्ते मार्गे सातारा आणि महाबळेश्वरला जाता येणे शक्य होईल. नुकतीच या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली असून, पावसाळ्यानंतर किंवा आगामी दिवाळी दरम्यान हा पूल सर्वसामान्य जनतेच्या आणि वाहतुकीच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती समोर आली आहे.

​मुंबईतील प्रसिद्ध वरळी सागरी सेतूच्या (सी-लिंक) धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा केबल स्टेड पूल पहिल्यांदाच उभारला जात आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर (गाढवली अहिर) या दरम्यान कोयना नदीच्या पात्रावर आणि जावळीच्या खोऱ्यात हा पूल साकारत आहे. सुमारे १७५ कोटी रुपये खर्चाच्या या भव्य प्रकल्पाची लांबी ५४० मीटर आणि रुंदी १४ मीटर आहे. या पुलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीवर एक अत्याधुनिक ‘व्ह्यू गॅलरी’ (Viewing Gallery) उभारण्यात आली आहे, जिथे जाण्यासाठी पर्यटकांना कॅप्सूल लिफ्टची सुविधा असेल. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंनी जिन्यांचे मार्गही तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे काम ‘टी अँड टी’ या कंपनीकडे असून, युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना हा पूल पहिल्यांदा प्रस्तावित झाला होता, परंतु पुढे या कामाला खरी गती मिळाली.

​या पुलाच्या मुख्य संरचनेचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, व्ह्यू गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना खोरे परिसरातील या पुलाबरोबरच इतर तीन पुलांची कामेही वेगात सुरू आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दरे गाव ते कोयना खोऱ्यातील बामणोली गाव यांना जोडणाऱ्या आणखी एका ३०० कोटी रुपयांच्या पुलाचा समावेश आहे. या नवीन पुलांमुळे पावसाळ्यात कोयना बॅकवॉटरमधील धोकादायक असणारी ‘बार्ज’ (नौका) सफर प्रवाशांना टाळता येईल. या पायाभूत सुविधांमुळे पावसाळ्यातही हा परिसर उर्वरित महाराष्ट्राशी जोडलेला राहील. तसेच मुनावळे बोटिंग क्लब, मुनावळे ते वासोटा किल्ला दरम्यान होणारा रोपवे आणि इतर पर्यटन सुविधांमुळे या भागात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.

Facebook Comments Box

‘दिवा-संगमेश्वर’ मेमू सेवा सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

खेड: गणेशोत्सव तसेच इतर सणासुदीच्या काळात दिवा स्थानकावरून सुटणाऱ्या विशेष ‘दिवा-चिपळूण मेमू रेल्वे’ सेवेचा विस्तार करावा आणि ती थेट दिवा ते संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेला एक रीतसर निवेदनही देण्यात आले आहे. ही मेमू सेवा भविष्यात संगमेश्वरपर्यंत सुरू झाल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कढवई तसेच परिसरातील प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

​विशेषतः गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात गावी ये-जा करताना चाकरमान्यांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा प्रवाशांना प्रचंड गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच या भागातील अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबई व उपनगरांकडे नियमित प्रवास करत असतात. त्यामुळे या मार्गावर एक स्वतंत्र मेमू सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे.

​दिवा-संगमेश्वर मेमू सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होण्यास मदत होईल. शिवाय सणासुदीच्या काळात तसेच नियमित दिवसांमध्येही या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असल्याने या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांच्या हिताचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’चे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.

Facebook Comments Box

​दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सदरम्यान दुर्घटना; अंबरनाथमधील महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मालवण: मालवण येथील प्रसिद्ध दांडी समुद्रकिनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. बनाना राईड (Banana Ride) करत असताना समुद्राच्या पाण्यात पडल्यामुळे मुंबईजवळील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात आणि पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शीतल मठकर या आपल्या पती, मुलगा, दीर आणि भावजय यांच्यासह एकूण नऊ जणांच्या कुटुंबासोबत शुक्रवारी मालवण-देवबाग येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. देवबाग येथील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर, शनिवारी त्यांनी आपल्या दिराचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी सर्व कुटुंब दांडी किनारपट्टीवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

​दांडी समुद्रात बनाना राईड करत असताना अचानक शीतल या समुद्राच्या पाण्यात पडल्या आणि त्यांची प्रकृती खालावली. त्या पाण्यात पडल्याचे लक्षात येताच स्थानिक यंत्रणा आणि कुटुंबियांनी त्यांना तातडीने पाण्याच्या बाहेर काढले. तिथे उपस्थित असलेल्या एका डॉक्टर पर्यटकाने त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार (First Aid) केले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना तातडीने मालवण येथील एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी शीतल यांची तपासणी केली, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. आनंद घेण्यासाठी आलेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे मठकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Facebook Comments Box

गोवा-कोकणात पर्यटनाचा बेत आखत असाल तर ही बातमी वाचाच

   Follow us on        

गोवा:मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये गोवा आणि कोकणात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी इंधनाचा साठा संपल्याचे फलक पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करत कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता थेट पर्यटन क्षेत्राला या इंधन टंचाईची झळ बसू लागली आहे.

​इंधन कंपन्यांकडून मागणीनुसार पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्यामुळे पेट्रोल पंप चालक हवालदिल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महामार्गावरील काही पंपांवर वाहनांना केवळ हजार ते पंधराशे रुपयांचेच मर्यादित पेट्रोल-डिझेल दिले जात आहे. दुसरीकडे, सीएनजी (CNG) गॅस भरण्यासाठी वाहनधारकांना तब्बल ३ ते ४ तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे सुट्ट्या गावी घालवण्यासाठी आलेले चाकरमानी आणि पर्यटकांचा अमूल्य वेळ रांगेतच वाया जात आहे.

​इंधनाच्या या तीव्र टंचाईमुळे पर्यटकांच्या फिरण्यावर मोठ्या मर्यादा आल्या असून, येत्या ३ ते ४ दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची आणि पेट्रोल पंप पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोकण किंवा गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल, तर प्रवासाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Facebook Comments Box

भारतीय रेल्वेत १८ व्या नवीन झोनचा समावेश; १८ स्टारच्या नवीन लोगोचे अनावरण

   Follow us on        

नवी दिल्ली:भारतीय रेल्वेच्या विस्तारामध्ये आता एका नवीन अध्यायाची भर पडली असून ‘दक्षिण किनारपट्टी रेल्वे’ (South Coast Railway – SCoR) हा देशातील १८ वा रेल्वे झोन (परिमंडळ) म्हणून अधिकृतपणे कार्यान्वित होत आहे. या नवीन झोनच्या निर्मितीमुळे भारतीय रेल्वेच्या बोधचिन्हातही (लोगो) बदल करण्यात आला असून, आता रेल्वेच्या लोगोमध्ये १८ तारे झळकणार आहेत.

​रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, राजपत्रित अधिसूचनेद्वारे (Gazette Notification) या नवीन झोनच्या कार्यान्वयनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, १ जून २०२६ पासून ‘दक्षिण किनारपट्टी रेल्वे’ पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात करेल. १८ व्या झोनचे आगमन भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक असल्याने, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CRB & CEO) यांनी या बदलाला मान्यता दिली आहे.

​या नवीन झोनच्या सन्मानार्थ, आता सर्व अधिकृत कामकाजात १८ तारे असलेला सुधारित लाल रंगाचा लोगो वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व विभागीय रेल्वे आणि सार्वजनिक उपक्रमांना १ जून २०२६ पासून या नवीन झोनचा समावेश असलेल्या लोगोचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण किनारपट्टी रेल्वेच्या निर्मितीमुळे संबंधित भागातील रेल्वे प्रशासनात अधिक सुसूत्रता येईल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वेवर उन्हाळी सुट्टीत ‘सावंतवाडी-पनवेल’ साप्ताहिक स्पेशल ट्रेन धावणार

   Follow us on        

​नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने सावंतवाडी रोड ते पनवेल दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत एकूण ४ फेऱ्या पूर्ण करेल.

​गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग:

गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी रोड – पनवेल स्पेशल दर शनिवारी सकाळी ०७:२० वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:०० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०१००७ पनवेल – सावंतवाडी स्पेशल दर शनिवारी संध्याकाळी १८:१० वाजता पनवेलहून सुटेल आणि रविवारी पहाटे ०४:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. प्रवासादरम्यान ही ट्रेन कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.

ही ट्रेन १६ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत धावणार असून दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ४ फेऱ्या होतील. या गाडीला एकूण २० एलएचबी (LHB) कोच असतील, ज्यामध्ये वातानुकूलित (AC) आणि शयनयान (Sleeper) डब्यांचा समावेश आहे. ही ट्रेन पूर्णपणे विजेवर चालणारी (Electric Traction) असेल. कोकण रेल्वेने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, स्थानकांवर या संदर्भात फलक आणि उद्घोषणांद्वारे माहिती दिली जाणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search