मराठी भाषेला दुय्यम स्थान; मध्य रेल्वेला शिवसेनेचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील सूचनाफलकांवरून मराठी भाषा गायब झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असूनही रेल्वे स्थानकांवर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करून स्थानिक मराठी भाषेला डावलले जात असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मध्य रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले व या प्रकाराचा जाब विचारला.

​सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेल्वे ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, तिथे स्थानिक भाषेला प्राधान्य देणे घटनात्मक आणि शासकीय धोरणानुसार आवश्यक आहे. असे असतानाही मराठीला डावलणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. जर रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व सूचनाफलकांवर मराठी भाषेचा समावेश केला नाही, तर शिवसेना आपल्या ‘परंपरागत’ पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संतोष शिंदे यांनी यावेळी दिला.

​या प्रसंगी विभाग संघटक युगंधरा साळेकर, युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या विषयावर सकारात्मक कार्यवाही न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला रेल्वे प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

तुतारी एक्सप्रेसमधून दारूची अवैध वाहतूक; रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सध्या विशेष सतर्क झाले आहे. याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि सी अँड आय (C&I) कर्मचाऱ्यांनी एका मोठी कारवाई केली. ट्रेन क्रमांक ११००४, म्हणजेच तुतारी एक्सप्रेसमध्ये ३५ दारूच्या बाटल्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका एसी कोच अटेंडंटला पथकाने रंगेहात पकडले आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नियमित तपासणी (Routine Checking) करत असताना त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने तुतारी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये जाऊन झाडाझडती घेतली असता, कोच अटेंडंटकडे विदेशी दारूचा अवैध साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ३५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याचाच अशा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे.

​या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कडक आवाहन केले आहे. रेल्वेतून दारू, ज्वलनशील पदार्थ किंवा इतर कोणतेही प्रतिबंधित अंमली पदार्थ वाहून नेणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रेल्वेने दिला आहे.

Facebook Comments Box

सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ पडली महागात! विर्डीच्या जंगलात अडकलेल्या ५ विद्यार्थ्यांची थरारक सुटका.

   Follow us on        

दोडामार्ग (प्रतिनिधी): सोशल मीडियावरील माहिती पाहून विर्डी परिसरातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गोव्यातील पाच पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात जाणे चांगलेच महागात पडले. मात्र, दोडामार्ग पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे या पाचही विद्यार्थ्यांची मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय? गोव्यातील पणजी-आक्षी येथील चार मुले आणि एक मुलगी असे पाच जण विर्डी गावातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत धबधब्याचा आनंद लुटल्यानंतर, परतीचा मार्ग शोधताना हे विद्यार्थी रस्ता चुकले. मोबाईलचे कमकुवत नेटवर्क, सभोवताली घनदाट जंगल आणि हिंस्र वन्यप्राण्यांचे आवाज यामुळे हे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते.

पोलिसांची धाडसी मोहीम: घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी ७:१५ वाजता ‘११२’ क्रमांकावर कॉल करून मदतीची विनंती केली. नागपूर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांना तातडीने सूचना दिल्या. दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक मानसी गावडे आणि पोलीस हवालदार बाळकृष्ण गवस यांनी विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली.

जंगलात वाहन जाण्यास मार्ग नसल्याने पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन पायी शोधमोहीम सुरू केली. हा परिसर अस्वल, वाघ आणि कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर असलेला भाग असल्याने ही मोहीम अत्यंत जोखमीची होती.

चार तासांनंतर लागला शोध: सुमारे चार तास उपाशीपोटी आणि भीतीपोटी नदीकाठी थरथरत बसलेल्या या विद्यार्थ्यांना अखेर रात्री १०:४५ च्या सुमारास शोध पथकाने शोधून काढले. पोलिसांचा आवाज ऐकताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “आम्ही प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परतलो,” अशी भावना सुटका झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या पर्यटकांना जंगलाबाहेर काढून त्यांच्या दुचाकींपर्यंत सुरक्षित पोहोचवले.

प्रशासनाचे आवाहन: विर्डीचे जंगल निसर्गाने समृद्ध असले तरी तेवढेच धोकादायक आहे. त्यामुळे पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाताना खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेचे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

ॲप आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात टॅक्सी चालकांचा पुण्याहून मुंबईपर्यंत पायी प्रवास

   Follow us on        

मुंबई: अॅप-आधारित टॅक्सी कंपन्यांकडून होणारी पिळवणूक आणि अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील तीन कॅब चालकांनी सुमारे १५० किलोमीटरचा पायी प्रवास करून मुंबई गाठली आहे. परमेश्वर घोंगे, संतोष दुर्गे आणि वैभव भेगडे या ‘महाराष्ट्र कामगार सभे’शी संबंधित चालकांनी १० एप्रिल रोजी पुण्याहून या ‘न्याय पदयात्रे’ला सुरुवात केली होती. तळपत्या उन्हात, पायाला फोड येऊनही केवळ निर्धाराच्या जोरावर लोणावळा, खालापूर, पनवेल आणि वाशीमार्गे त्यांनी बुधवारी मुंबईत प्रवेश केला. हे चालक १५ एप्रिल रोजी आझाद मैदानावर पोहोचून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत.

​या आंदोलनाचा मुख्य उद्देश कंपन्यांच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करणे हा आहे. आंदोलक चालकांच्या म्हणण्यानुसार, ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या सरकारनं ठरवून दिलेल्या भाडेदरांचे पालन करत नाहीत. याशिवाय, ‘पॅनिक बटण’च्या नावाखाली चालकांकडून वारंवार केली जाणारी कपात, कमिशनमधील पारदर्शकतेचा अभाव आणि मुंबई-नागपूर सारख्या शहरांत विनापरवाना सुरू असलेल्या ‘बाईक टॅक्सी’मुळे होणारे नुकसान यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, हा लढा चालकांच्या हक्कासाठी असून जोपर्यंत शासन यावर ठोस पाऊल उचलत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील. दरम्यान, परिवहन विभागाने या कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश वारंवार दिले असल्याचे सांगत, कंपन्या एकमेकांवर बोट ठेवून जबाबदारी टाळत असल्याचा दावा केला आहे.

Facebook Comments Box

सावधान! राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

   Follow us on        

मुंबई, दि. १५ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,

मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी सूचना

उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ORS घ्यावे, हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घेणे व घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक व मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रशासनाची तयारी

प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जिल्हास्तरावर Heat Action Plan कार्यान्वित करणे तसेच रुग्णालयांत आवश्यक औषध साठा ठेवणे यावर भर दिला आहे. शाळांना सूचना देणे, गरजेनुसार वेळेत बदल करणे आणि माध्यमांद्वारे जनजागृती करणे यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येत आहेत.

 

विशेष सूचना

जनसमूह कार्यक्रमांसाठी सावली व पाण्याची सोय करावी, वैद्यकीय मदत व ORS उपलब्ध ठेवावे तसेच कार्यक्रमाचा वेळ शक्यतो बदलावा, असे सांगण्यात आले आहे. कामगार, शेतकरी व बाहेर काम करणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे, नियमित पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत.

नागरिक, स्थानिक संस्था व उद्योग क्षेत्राने दिलेल्या सूचनांचे पालन करून उष्णतेच्या लाटेमुळे होणारे धोके कमी करावेत, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा कोकणवर अन्याय करणारा!

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा असल्याची भूमिका माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी मांडली आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडला जात असताना, त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले असून, सद्यस्थितीतील आराखड्यामुळे कोकणातील स्थानिक विकासाला खीळ बसण्याची भीती व्यक्त केली आहे.

​केसरकर यांच्या मते, नागपूरहून येणारा पर्यटक जर थेट गोव्याला निघून गेला, तर कोकणच्या पर्यटनाला त्याचा कोणताही लाभ होणार नाही. कोकणात उत्कृष्ट समुद्रकिनारे आणि बंदरे असताना महाराष्ट्रातील माल निर्यातीसाठी गोव्याच्या बंदराचा वापर का व्हावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराला जोडल्यास त्याचा मोठा फायदा होईल. तसेच, कोकण कोस्टल रोड विरारपासून या मार्गाला जोडला जाणार असल्याने, पर्यटकांना पत्रादेवीमार्गे जाणे सहज शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.

​शक्तीपीठ महामार्ग केवळ चंदगडवरून गोव्याला जोडला जाऊ नये, असे स्पष्ट करत केसरकर यांनी सुचवले की, त्याचा एक फाटा तिलारी मार्गे उत्तर गोव्याला आणि दुसरा फाटा दक्षिण गोव्याला जोडला जाऊ शकतो. यामुळे चंदगड आणि दोडामार्ग तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसेच, हा फोरलेन हायवे चंदगड-दोडामार्गे नेल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि आंबोली, फणसवडे, केसरी यांसारख्या ‘इको सेन्सिटिव्ह’ भागातून बोगदा काढल्यास निसर्गाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या विषयावर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि चंदगडच्या आमदारांशीही चर्चा केली असल्याचे सांगितले.

 

Facebook Comments Box

मुंबई लोकलमध्ये गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवासादरम्यान गर्भवती महिलांना होणारा त्रास आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली असून, गर्भवती महिलांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र राखीव डब्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

​सध्या मुंबई लोकलमध्ये महिलांसाठी विशेष डबे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहेत. रेल्वेच्या नियमांनुसार, गर्भवती महिलांना दिव्यांग डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रभाकर शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, दिव्यांग डबा हा केवळ गर्भवती महिलांसाठी राखीव नसल्याने तेथेही प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळे गर्भवती महिलांना धक्काबुक्की सहन करावी लागते, ज्याचा त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

​मुंबईतील गर्दीच्या वेळी (पीक अवर्स) लोकलमध्ये चढणे आणि उतरणे हे कोणत्याही सामान्य प्रवाशासाठी मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. “गर्भवती महिलांना सध्याच्या व्यवस्थेत सन्मानाने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येत नाही. त्यांना मिळणारी दिव्यांग डब्यातील मुभा पुरेशी नाही, कारण तिथेही प्रवाशांची संख्या मोठी असते,” असे शिंदे यांनी आपल्या मागणीत नमूद केले आहे.

​रेल्वे स्थानकांवर किंवा चालत्या गाडीत वैद्यकीय आणीबाणीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. अनेकदा गर्दीमुळे गुदमरल्यासारखे होणे किंवा धक्काबुक्कीमुळे दुखापत होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर, गर्भवती महिलांसाठी जर स्वतंत्र डबा राखीव ठेवला, तर त्यांना सुरक्षित बसण्याची जागा मिळेल आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तातडीने मदत मिळणे सोपे होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

​प्रभाकर शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाला या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. “मुंबई लोकलचा प्रवास हा सर्वसमावेशक आणि सुरक्षित असायला हवा. माता आणि बालकांच्या आरोग्याचा विचार करून स्वतंत्र डब्याचा निर्णय घेतल्यास, हा लाखो महिलांसाठी मोठा दिलासा ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Facebook Comments Box

सावंतवाडी बस स्थानकाचे आधुनिकीकरण होणार

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या सावंतवाडी येथील एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे भव्य बसस्थानक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, येत्या दोन महिन्यांत याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना काळामुळे रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता पुन्हा गती मिळाली आहे. सुमारे चार एकर जागेत ‘बीओटी’ (BOT) तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, सावंतवाडीची ओळख राज्यातील एक ‘आदर्श बसस्थानक’ म्हणून निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

​या नवीन बसस्थानकात प्रवाशांसाठी अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रस्ते आणि बसच्या सुलभ हालचालीसाठी आवश्यक रुंदीकरण करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी विविध सुविधांसोबतच, येथे व्यावसायिक संधी निर्माण करून महसूल वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून सावंतवाडी आणि वेंगुर्ला बसस्थानक परिसरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तरतूद करण्यात आल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुनर्विकासाच्या आराखड्यात जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य जागेत येत असल्याने निर्माण झालेला तांत्रिक अडथळा आता दूर करण्यात आला असून, विशेष बैठकीद्वारे यावर तोडगा काढण्यात आला आहे.

​या प्रकल्पासाठी कोणालाही विस्थापित न करता सर्वांच्या सहकार्याने काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन आमदार केसरकर यांनी दिले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांशी यावर सविस्तर चर्चा झाली असून, पुढील दोन वर्षांत या प्रकल्पाचे भव्य स्वरूप प्रत्यक्षात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे सांगत, शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. आधुनिक बसस्थानक आणि सक्षम आरोग्य सुविधा यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Facebook Comments Box

मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा सिंधुदुर्ग दौरा संपन्न

   Follow us on        

मालवण: मानवता विकास परिषद व रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच राष्ट्रसंत श्री पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्री. श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष श्री. राजन गिरप यांच्यासह उद्योजक उमेश बिरमोळे, मोहन वराडकर, सागर हडकर, परशुराम पाटकर आणि सामाजिक क्षेत्रातील विलास मेस्त्री, यतीन खोत यांसारख्या मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटींमध्ये ‘मसुरे सर्वांगीण विकास परिषद’ स्थापनेबाबत आणि स्थानिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या दौऱ्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देताना श्रीकांत सावंत यांनी स्पष्ट केले की, कोकणच्या प्रत्येक गावाचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील कार्यांचे नियोजन जर एकात्म आणि सहकार्यपूर्ण पद्धतीने झाले, तर कोकणच्या विकासाची घोडदौड कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, येत्या १४ मे २०२६ रोजी मालवणच्या लीलांजली सभागृहात आयोजित ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा ‘विशेष दिशादर्शक’ ठरणार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

Facebook Comments Box

अवघ्या चार महिन्यांतच ​नवी मुंबई विमानतळ बनले देशातील ९ वे सर्वात व्यस्त विमानतळ

   Follow us on        

मुंबई: २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिकरीत्या सुरू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांच्या आत, अदानी समूहाद्वारे संचालित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIAL) भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. ‘ओएजी’ (OAG) या जागतिक ट्रॅव्हल डेटा संस्थेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये ३,९३,८१९ प्रवासी क्षमतेसह हे विमानतळ देशातील ९वे सर्वात व्यस्त देशांतर्गत विमानतळ ठरले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) वाढता ताण कमी करण्याच्या उद्देशाने या विमानतळाची निर्मिती करण्यात आली असून, अल्पावधीतच याने प्रवाशांची पसंती मिळवली आहे.

​१९,६५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला या विमानतळाचा पहिला टप्पा सध्या कार्यरत असून, त्यात एक धावपट्टी आणि एका टर्मिनलचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला २ कोटी प्रवाशा हाताळण्याची याची क्षमता आहे. विस्तारीकरणाच्या योजनेनुसार, २०३२ पर्यंत हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा त्याची क्षमता वर्षाला ९ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचेल आणि तिथे एकूण चार टर्मिनल्स असतील. विमान कंपन्यांच्या वाढत्या विस्तार योजनांमुळे हे विमानतळ आगामी काळात अधिक वेगाने प्रगती करेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search