डिझेल वाचवणार्‍या एसटी चालकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; परिवहन मंत्र्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील एसटी महामंडळाने डिझेलची बचत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जे एसटी चालक योग्य ड्रायव्हिंग तंत्राचा वापर करून इंधनाची बचत करतील, त्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढणाऱ्या डिझेलच्या किमतींमुळे महामंडळावरील आर्थिक भार वाढला असून, सर्व विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना आपापल्या आगारांसाठी डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या पुणे शहरात डिझेलचा दर प्रति लीटर ९८.१५ रुपये इतका आहे.

​एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १६,००० बसेस असून, इलेक्ट्रिक बसेसचा समावेश संथ गतीने होत असल्याने अद्याप बहुतांश गाड्या डिझेलवरच चालतात. सध्या ताफ्यात केवळ ७३८ इलेक्ट्रिक बसेस असून, मार्च २०२७ पर्यंत आणखी २,३०० ई-बसेस दाखल होण्याची अपेक्षा आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळ भाडेवाढीचा विचार करत असले, तरी सध्या चालकांच्या माध्यमातून खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. परिवहन मंत्र्यांच्या मते, एक कुशल चालक महामंडळाचे लाखो रुपये वाचवू शकतो. जर प्रत्येक आगाराने दररोज केवळ ५ लीटर डिझेल वाचवले, तरी राज्यभरात रोज १,००० लीटरपेक्षा जास्त डिझेल वाचू शकते, ज्यामुळे दररोज सुमारे १ लाख रुपयांची बचत होईल.

​दुसरीकडे, ज्या चालकांच्या गाड्यांचे मायलेज (KPL – किलोमीटर प्रति लीटर) चुकीच्या ड्रायव्हिंग पद्धतीमुळे कमी येईल, अशा चालकांचे समुपदेशन केले जाईल आणि त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात योग्य गती राखणे, गिअरचा अचूक वापर, विनाकारण इंजिन चालू न ठेवणे आणि योग्य ब्रेक तंत्राचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय, वाहनांमधील तांत्रिक त्रुटी जसे की टायरमधील हवेचा कमी दाब, इंजिन ट्युनिंगमधील बिघाड किंवा ऑइल गळती यामुळेही इंधन वाया जाते; त्यामुळे आगारांना गाड्यांची दैनंदिन तांत्रिक तपासणी आणि वेळेवर दुरुस्ती करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत

Facebook Comments Box

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेने विशेष ब्लॉकचा कालावधी वाढवला; अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मेन लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे लागू करण्यात आलेल्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला रेल्वे प्रशासनाने आता १३ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत निवडक मेल/एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर आणि ठाणे स्थानकांवरच ‘शॉर्ट टर्मिनेट’ (प्रवास आधीच संपवणे) केल्या जातील.

​ब्लॉक वाढवण्याचे कारण काय?

​रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (RLDA) द्वारे सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिकीकरण आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत.

​यापूर्वी हा ब्लॉक दिनांक ०१.०२.२०२६ ते २६.०४.२०२६ पर्यंत लागू करण्यात आला होता, त्यानंतर तो १९.०५.२०२६ पर्यंत वाढवला गेला आणि आता कामाची व्याप्ती पाहता ही मुदत १३ जून २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

​या गाड्या धावणार फक्त दादर आणि ठाणे पर्यंतच

​दिनांक १३.०६.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या (JCO) खालील गाड्या सीएसएमटी पर्यंत न जाता आधीच थांबवल्या जातील:

​१. दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:

​गाडी क्र. १२११२: अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११००२: बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस

​गाडी क्र. १२८१०: हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११M२०: भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१४४: बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१०८: लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१२०: मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

​२. ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी:

​गाडी क्र. १२१३४: मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​रेल्वे प्रशासनाचे आवाहन

“पायाभूत सुविधांची देखभाल, सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी हे ब्लॉक्स अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे,” असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलांचा विचार करून करावे.

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: गोव्यातील पट्ट्यासाठी केंद्राकडून १,८८० कोटी मंजूर

   Follow us on        

गोव्याच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66) अंतर्गत कुंकळिम ते बेंडोरेडेम या टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तब्बल १,८८० कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) मंजुरी दिली आहे. या मोठ्या निधीमुळे या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे.

गोवा सरकारने केंद्राकडे सादर केलेल्या या महामार्ग प्रकल्पामध्ये केवळ रस्ता रुंदीकरणच नाही, तर इतर आधुनिक सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत कुंकळिम आणि बल्ली या भागांमध्ये आधुनिक बायपास (वळण रस्ते) उभारले जाणार आहेत. वाढती वाहतूक, स्थानिक शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवासातील विलंब लक्षात घेता, हा प्रकल्प भविष्यातील वाहतूक गरजांचा विचार करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आला आहे.

केंद्राकडून या भव्य प्रकल्पाला आणि निधीला मंजुरी मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत. केंद्र सरकारच्या या सहकार्यामुळे गोव्याच्या दळणवळण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महामार्ग प्रकल्पामुळे प्रामुख्याने दक्षिण गोव्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. नवीन रस्त्यांमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक शहरांमधील मुख्य वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास यामुळे मोठी मदत होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.

Facebook Comments Box

Mumbai Local: हार्बर मार्गावर जलद लोकलसाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी

   Follow us on        

मुंबई:मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) कंबर कसली आहे. यामध्ये कित्येक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या हार्बर रेल्वे मार्गाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ‘तिसऱ्या मुंबई’ला जलद गतीने जोडण्यासाठी हार्बर मार्गावर जलद लोकल गाड्या धावण्यासाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी केली जाणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल दरम्यान केवळ धिम्या लोकल धावत असल्याने आणि वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यावर तोडगा म्हणून ‘एमयुटीपी-४’ (MUTP-4) प्रकल्पांतर्गत एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही जलद मार्गिका कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या भागातून करता येईल, याचा अभ्यास हा सल्लागार करेल. यासोबतच ठाणे-बोरीवली आणि वांद्रे-कुर्ला या भागांत रेल्वे कनेक्टिव्हिटी शक्य आहे का, याचाही अभ्यास केला जाणार असल्याची माहिती एमआरव्हीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली.

​दुसऱ्या बाजूला, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी अत्यंत प्रगत समजली जाणारी ‘ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टम’ (TCMS) लागू करण्यात येत असून, विविध स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वेकडून लवकरच २३८ नवीन डिझाईनच्या एसी लोकल दाखल केल्या जाणार आहेत. यासाठीच्या निविदा जून महिन्यापर्यंत अंतिम केल्या जातील आणि टप्प्याटप्प्याने सध्याच्या नॉन-एसी लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर केले जाईल.

​प्रवाशांच्या सोयी-सुविधांसोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघाती मृत्यूंचे सत्र थांबवण्यासाठी ‘मिशन झीरो डेथ’ अंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १७ स्थानकांपैकी ५ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित स्थानकांच्या कामाला गती दिली जात आहे. यामध्ये दादर, घाटकोपर, वसई आणि भांडुप यांसारख्या प्रमुख आणि गर्दीच्या स्थानकांचा समावेश आहे. एकूणच, येत्या काळात मुंबईकरांना अधिक आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित रेल्वे सेवा अनुभवता येणार आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेची विशेष सोय; मडगाव – सीएसएमटी दरम्यान धावणार ‘वीकेंड स्पेशल’

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव (MAO) दरम्यान विशेष ‘टॉड’ (TOD Special) ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १-१ फेरी (01 Trip) चालवली जाणार आहे. शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी ही गाडी धावणार आहे.

​खालीलप्रमाणे या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि वैशिष्ट्ये आहेत:

​गाडी संख्या ०११७३ (सीएसएमटी ते मडगाव स्पेशल)

​दिवस: शनिवार, ३० मे २०२६

​प्रस्थान: मुंबई CSMT वरून रात्री ००:२५ वाजता (शुक्रवारची मध्यरात्र) सुटेल.

​आगमन: मडगाव (Madgaon) येथे त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता पोहोचेल.

​एकूण प्रवास वेळ: १३ तास ०५ मिनिटे.

 

​गाडी संख्या ०११७४ (मडगाव ते सीएसएमटी स्पेशल)

​दिवस: शनिवार, ३० मे २०२६

​प्रस्थान: मडगाववरून दुपारी १६:०० वाजता सुटेल.

​आगमन: मुंबई CSMT येथे रविवारी (३१ मे २०२६) पहाटे ०३:४५ वाजता पोहोचेल.

​एकूण प्रवास वेळ: १३ तास ३० मिनिटे.

​या गाडीचे थांबे 

दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सवर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी

​कोचची रचना (Composition):

या ट्रेनला एकूण २२ डबे (Coaches) असतील. यामध्ये:

​१६ GSCN (स्लीपर क्लास)

​२ GS + २ GSCN (अनारक्षित/General श्रेणीसाठी)

​२ SLR (गार्ड आणि ब्रेक व्हॅन)

​इंजिन: ही ट्रेन पूर्णपणे इलेक्ट्रिक (Electric Traction) इंजिनवर धावेल.

​महत्त्वाची नोंद: वीकेंडला कोकणात जाणाऱ्या किंवा मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रवाशांनी आरक्षणाची स्थिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी.

Facebook Comments Box

युद्धाची झळ कोकणाला; पेट्रोल पंपावर नवीन नियम, एकावेळी एवढेच पेट्रोल मिळणार

   Follow us on        

सावंतवाडी:अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात उद्भवलेल्या तीव्र युद्धजन्य परिस्थितीचे थेट पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या इंधनाच्या मोठ्या तुटवड्यामुळे सावंतवाडी शहरात पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासकीय स्तर आणि पेट्रोल पंप चालकांकडून इंधनाची मोठी काटकसर सुरू करण्यात आली असून, वाहनधारकांना मर्यादित स्वरूपातच इंधन पुरवले जात आहे.

​दुचाकींना २०० तर चारचाकींना फक्त १००० रुपयांचे पेट्रोल!

​अचानक लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, आता सावंतवाडीतील पेट्रोल पंपांवर दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपये, तर चारचाकी वाहनांना केवळ १००० रुपये किमतीचेच पेट्रोल दिले जात आहे. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे आणि प्रशासनाच्या निर्बंधांमुळे वाहनधारकांमध्ये कमालीचा गोंधळ आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने देशात महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला असून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आधीच उच्चांक गाठला आहे.

​पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन

​देशातील या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना इंधन आणि एलपीजी गॅसचा वापर अत्यंत जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे सातत्याने होणारी दरवाढ आणि दुसरीकडे आता सुरू झालेली ही इंधन कपात, या दुहेरी संकटामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार आणि व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. हा इंधनाचा तुटवडा पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण: मधु दंडवते यांचा गौरव की ऐतिहासिक ओळखीचा प्रश्न?

   Follow us on        

मुंबई, २७ मे २०२६: महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (२६ मे) मंत्रिमंडळ बैठकीत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय कोकण रेल्वेच्या शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ घेण्यात आला असून, तो कोकणवासीयांच्या दीर्घकाळाच्या मागणीचा परिपाक मानला जात आहे. मात्र, या निर्णयाने काहींमध्ये ऐतिहासिक ओळख हरवण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या (रेल्वे आणि गृह मंत्रालय) अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सावंतवाडी रोड हे नाव अधिकृतपणे बदलले जाईल.

या निर्णयाचे कोकणात मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, स्थानिक नेते आणि सामान्य जनतेकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

“कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करणाऱ्या मधु दंडवते यांना योग्य सन्मान मिळाला,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी सांगितले की, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. “कोकणवासीयांच्या हृदयातील नेत्याला त्यांच्या योगदानानुसार गौरव मिळाला,” असे मत व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी “ऐतिहासिक निर्णय”, “अभिमानाची बाब” आणि “पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा” असे शब्द वापरले.

मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या वारशाचा सन्मान मानला जातो.

काही आक्षेप: “सावंतवाडी नाव जपावे”

जरी सकारात्मक प्रतिसाद प्रबळ असला तरी, काही लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे मुख्यतः सोशल मीडियावर दिसले:

“सावंतवाडी हे नाव शतकानुशतके जुने आणि स्थानिक इतिहास, संस्कृतीशी जोडलेले आहे. त्यामुळे मूळ नाव बदलल्याने स्थानिक ओळख हरपेल,” असा आक्षेप काहींनी नोंदवला.

काहींना वाटते की मधु दंडवते यांचा जास्त संबंध राजापूरशी होता, त्यामुळे त्या स्टेशनला नाव देणे अधिक योग्य ठरले असते.

“नेत्यांचा आदर दुसऱ्या माध्यमातून करावा, पण रेल्वे स्थानकाचे मूळ नाव कायम ठेवावे,” असे मतही व्यक्त झाले.

मात्र, हे आक्षेप व्यक्तिगत पातळीवर आहेत आणि मोठ्या संघटना किंवा मुख्य माध्यमांमध्ये तीव्र विरोध दिसला नाही.

सरकारने स्पष्ट केले की, हा निर्णय कोकणातील जनभावनांचा आदर करणारा आहे. प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याने लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानक कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. नामकरणानंतर प्रवाशांना नव्या नावाची सवय होण्यास काही काळ लागेल, असे प्रवासी म्हणतात. हा निर्णय कोकण रेल्वेच्या विकासात एक नवा अध्याय ठरू शकतो.

Facebook Comments Box

ठाणे – सावंतवाडी दरम्यान धर्मवीर वंदे भारत एक्सप्रेस; प्रीमियम गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर थांबे आणि इतर सुविधांसाठी खासदार नरेश म्हस्के यांचे प्रयत्न

   Follow us on        

ठाणे: आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशात (MMR) राहणाऱ्या लाखो कोकण चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी शिवसेना खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या म्हस्के यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि गाड्यांची कमतरता या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. गणेशोत्सवासारख्या महाराष्ट्राच्या महासणात नियमित गाड्यांवरील प्रचंड ताण आणि अपुऱ्या सुविधांमुळे चाकरमान्यांचे होणारे अतोनात हाल थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

​पत्रात खासदार म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या तिकिट खिडक्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. ठाणे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थानक असून येथून दररोज हजारो कोकणवासी प्रवास करतात. मात्र, या ठिकाणी रिझर्वेशन तिकिटांसाठी काउंटरची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी ठाणे स्टेशनवर किमान दोन अतिरिक्त रिझर्वेशन काउंटर सुरू करून तिथे समर्पित कर्मचारी नेमावेत, तसेच सणासुदीच्या काळात तिकिटांचा काळाबाजार (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्यासाठी आरपीएफ व पोलिसांची विशेष नाकेबंदी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

​कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांनी दिलेल्या निदानाचा संदर्भ जोडत खासदारांनी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान ‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ ही विशेष वंदे भारत दर्जाची रेल्वे सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. ठाणे शहराचे प्रेरणास्थान आणि थोर समाजसेवक धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या लोकसेवेचा आदर म्हणून या गाडीला त्यांचे नाव देणे ही समस्त ठाणेकरांच्या भावनेला दिलेली खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. ही ट्रेन सावंतवाडी येथेच समाप्त (टर्मिनेट) केल्यास इतर राज्यांतील पर्यटकांच्या दबावापासून मुक्त राहून १००% आरक्षण कोटा स्थानिक कोकणवासीयांना आणि कामकाजी कर्मचाऱ्यांना उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या प्रलंबित पायाभूत सुविधांचा विकास करण्यावरही खासदारांनी पत्रात विशेष भर दिला आहे. टर्मिनसच्या पहिल्या चरणाचे काम पूर्ण झाले असले तरी स्वतंत्र ट्रेन संचालनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला ‘चरण २’ (Phase 2) अद्याप रखडलेला आहे. या रखडलेल्या कामात टर्मिनसची प्रशासकीय इमारत आणि ट्रेनमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था समाविष्ट आहे. ही कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आदेश द्यावेत, तसेच भविष्यातील क्षमता पाहता येथे किमान एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि एक स्टॅबलिंग लाईनचे निर्माण करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. हा प्रकल्प ‘पीएम गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान’ (PMGS-NMP) शी जोडण्याची मागणीही त्यांनी केली.

​सावंतवाडी हे एक प्रमुख पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र असूनही या स्टेशनला ‘अमृत भारत स्टेशन योजना’ (ABSS) मधून अप्रत्याशितपणे बाहेर ठेवण्यात आले आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट करणाऱ्या या योजनेत सावंतवाडीचा तातडीने समावेश करण्यात यावा, असे म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे. या मागणीला बळ देण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराचा (RTI) हवाला दिला आहे. सावंतवाडी स्टेशन दररोज सुमारे ₹४,८८,९२० एवढा मोठा तिकिट महसूल रेल्वेला मिळवून देते. विशेष म्हणजे, यातील ९५% पेक्षा जास्त महसूल ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवाशांकडून येतो, ज्यामुळे या स्टेशनची व्यावसायिक व्यवहार्यता सिद्ध होते.

​उत्पन्नाचा हा उत्तम स्रोत आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, खासदार नरेश म्हस्के यांनी सावंतवाडी स्थानकावर अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना तात्काळ थांबा (हाल्ट) देण्याची मागणी केली आहे. यामध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात रद्द करण्यात आलेले राजधानी एक्सप्रेस (१२४३१/३२) आणि गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१/०२) यांचे थांबे पूर्ववत बहाल करावेत, असे म्हटले आहे. याशिवाय सीएसएमटी-मंगळुरु एक्सप्रेस (१२१३३/३४), मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (२२२२९/३०), गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस (१२४४९/५०), तसेच एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस (२२६५५/५६) आणि तिरुवनंतपुरम-निजामुद्दीन एक्सप्रेस (२२६५३/५४) या गाड्यांना सावंतवाडी येथे अधिकृत थांबा मंजूर करावा, अशी आग्रही मागणी करत चाकरमान्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी रेल्वे मंत्रालयाला केले आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर १५ जूनपासून ‘पावसाळी वेळापत्रक’ लागू; गाड्यांच्या वेळेत मोठे बदल

नवी मुंबई (बेलापूर भवन): कोंकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार कोंकण रेल्वे मार्गावर वर्ष २०२६ चे ‘पावसाळी वेळापत्रक’ (Monsoon Time Table) लागू करण्यात येत आहे. हे नवीन वेळापत्रक १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अंमलात राहणार असून, या काळात अनेक प्रमुख गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (KRCL) वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापकांनी (माल व योजना) २२ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

सुरक्षेसाठी कालावधीत कपात, गाड्यांचा वेग मर्यादित राहणार

पूर्वी कोंकण रेल्वेवर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू केले जात असे. रेल्वे बोर्डाने यंदाही सुरुवातीला याच कालावधीसाठी मंजुरी दिली होती. मात्र, कोंकण रेल्वेने बोगदे आणि धोकादायक डोंगराळ भागांमध्ये (Cuttings/Tunnels) दरडी कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

  • बोल्डर नेटिंग (boulder netting)

  • कॅच वॉटर ड्रेन आणि साईड ड्रेन

  • रिटेनिंग वॉल आणि शॉटक्रिटिंग (shotcreting)

या सर्व उपाययोजनांमुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS – मध्य परिमंडळ, मुंबई) यांनी कागदपत्रांची पडताळणी करून यंदा पावसाळी वेळापत्रकाचा कालावधी कमी करून तो १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ असा मर्यादित ठेवण्याची परवानगी दिली आहे.

पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावर गाड्यांच्या वेगावर मर्यादा (Speed Restrictions) आणल्या जाणार असून संवेदनशील भागात गाड्या ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने चालवल्या जातील.

नवे पावसाळी वेळापत्रक

पावसाळ्याच्या काळात गाड्या सुटण्याच्या मूळ वेळेत करण्यात आलेले बदल खालीलप्रमाणे आहेत:

पावसाळ्याच्या ४ महिन्यांत काही गाड्यांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत:

  • मुंबई CSMT – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230): सध्या ही गाडी आठवड्यातून ६ दिवस धावते, परंतु पावसाळ्यात ती त्रैसाप्ताहिक (आठवड्यातून ३ दिवस) धावेल. CSMT वरून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि मडगाववरून मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी ही गाडी धावेल.

  • मुंबई CSMT – मडगाव तेजस एक्सप्रेस (22119/22120): ही गाडी देखील पावसाळ्यात त्रैसाप्ताहिक करण्यात आली आहे.

  • एलटीटी – मडगाव एक्सप्रेस (11099/11100): ही गाडी पावसाळ्यात द्विसाप्ताहिक (आठवड्यातून २ दिवस) धावेल. एलटीटीवरून शुक्रवार व रविवार, तर मडगाववरून शनिवार व सोमवार अशी ही गाडी सुटेल.

रेल्वे प्रशासनाचे कडक सुरक्षेचे आदेश

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी कोंकण रेल्वेला कडक नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत: १. सर्व पेट्रोलमन आणि वॉचमन यांना GPS ट्रॅकर्स पुरवणे अनिवार्य आहे. २. धोकादायक ठिकाणी २४ तास तैनात असणारे स्टेशनरी वॉचमन ठेवले जातील. ३. रेल्वे रुळांच्या बाजूला असणाऱ्या झाडांची छाटणी करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. ४. वेळेच्या गणितापेक्षा (Punctuality) प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची मानून गरजेनुसार आपत्कालीन गती निर्बंध (Emergency Speed Restrictions) लावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

प्रवाशांना आवाहन: पावसाळी वेळापत्रकामुळे गाड्यांच्या वेळेत तसेच धावण्याच्या दिवसांत बदल होणार असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी कोंकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.konkanrailway.com) किंवा जवळच्या रेल्वे स्थानकावर चौकशी करूनच प्रवास करावा, असे आवाहन कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Sawantwadi: ओटवणेतील अज्ञातांनी रातोरात उभारलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील गूढ कायम.

   Follow us on        

ओटवणे (प्रतिनिधी): येथील देऊळवाडीमध्ये भिवसेन गावकर यांच्या घरासमोरील जागेत अज्ञात शिवप्रेमींनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात उभारल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच आश्चर्य व्यक्त होत असतानाच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मनात असलेली इच्छा अज्ञात शिवप्रेमींनी प्रत्यक्षात उतरवली, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरताच पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मनमोहक पुतळा पाहून अनेक जण नतमस्तक झाले आणि राजांनी मानाचा मुजरा अर्पण केला.

​दरम्यान, पुतळा उभारल्याची माहिती पोलीस प्रशासनालाही मिळाल्यानंतर नियमानुसार चौकशी करण्यात आली. मात्र, हा पुतळा नेमका कोणी उभारला याचा उलगाडा होऊ शकला नाही. तरीही स्थानिक युवकांनी अज्ञात शिवप्रेमींच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुतळ्याची पुढील जबाबदारी स्वीकारण्याची ग्वाही पोलीस प्रशासनाला दिली आहे. ओटवणे येथील रावळनाथ विद्यामंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पूर्वीपासून असला तरी सार्वजनिक ठिकाणीही पुतळा असावा, ही स्थानिकांची इच्छा होती. देऊळवाडीत नव्याने पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक शिवभक्तांनी गर्दी केली. पुतळ्याचे पवित्र्य जपण्याबरोबरच त्याची संपूर्ण जबाबदारी वाडीतील युवकांनी स्वीकारली असून, ही जबाबदारी सर्व ओटवणेकरांची असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका रात्रीत उभारलेल्या या पुतळ्याची ओटवणे दशक्रोशी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील काळात येथे शिवजयंतीसह विविध कार्यक्रम जल्लोषात साजरे करण्यात येणार असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search