खुशखबर! मुंबई – मंगुळुरु एक्सप्रेससह सावंतवाडी स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश!

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आता ३ प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबा (Stoppage) मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील मंजुरी दिली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

‘या’ ३ गाड्यांना मिळाला थांबा:

सावंतवाडी रोड स्थानकावर आता खालील गाड्या थांबतील:

१. गाडी संख्या १२१३३/१२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस

२. गाडी संख्या १२४३१/१२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस

३. गाडी संख्या १२२०१/१२२०२: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

जनसामान्यांच्या सुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा मिळवा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून या तिन्ही गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे.

संघटनेच्या विविध माध्यमांतील प्रयत्नांना अखेर यश!

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रमुख गाड्या थांबवण्यात याव्यात, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने विविध माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली, विविध स्तरांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना मागण्यांची निवेदनेही देण्यात आली होती. यासोबतच, या मागणीला जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी समितीने सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. संघटनेच्या याच चौफेर प्रयत्नांची आणि जनभावनेची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या हितासाठी मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने परिसरातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच प्रवाशांच्या मागण्यांना यश आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या यशाबद्दल खासदार श्री. नारायण राणे साहेब, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. नरेश म्हस्के, आणि श्रीमती मेधाताई कुलकर्णी, पालकमंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. रवींद्र चव्हाण, आमदार श्रीमती सुलभा गायकवाड ताई, आमदार श्री. कुमार आयलानी, आणि आमदार श्री. बाळा नर आदींचे संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

​”आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे. भविष्यातही प्रवासी बांधवांच्या हितासाठी आणि हक्कासाठी आपले असेच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत राहील, हा विश्वास आहे.”

— कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी

​या यशस्वी प्रयत्नांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून या लोकप्रतिनिधींचे कौतुक होत आहे.

 

Facebook Comments Box

मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ

   Follow us on        

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्यात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते बुधवार सकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासांतील धुवांधार पावसामुळे सातही धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा थेट ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअर डिपार्टमेंटच्या भांडुप येथील मास्टर कंट्रोल सेंटरने (BMC) जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, गेल्या २४ तासांत एकूण पाणीसाठ्यात १२.४४ टक्क्यांची तर गेल्या ४८ तासांत तब्बल २४.४४ टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.

​या दमदार पावसामुळे मुंबईची तहान भागवणारे दोन महत्त्वाचे तलाव म्हणजेच ‘विहार’ आणि ‘तुळशी’ पूर्ण क्षमतेने भरून वाहू (ओव्हरफ्लो) लागले आहेत. प्राप्त माहितीनुसार, विहार तलाव ७ जुलै रोजी रात्री ९:०० वाजता, तर तुळशी तलाव त्याच रात्री ११:४३ वाजता ओव्हरफ्लो झाला. याशिवाय अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या इतर प्रमुख जलाशयांमध्येही पाण्याची आवक अत्यंत वेगाने सुरू असून त्यांच्या पाणीपातळीत मोठी सुधारणा झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत तानसा तलावात ३१९ मिमी, अप्पर वैतरणामध्ये ३०९ मिमी आणि मोडक सागरमध्ये २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

​जलाशयांमधील या समाधानकारक वाढीमुळे आगामी काळात मुंबईकरांवर ओढवणारे पाणीटंचाईचे संकट आणि चिंता मोठ्या प्रमाणावर दूर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना दिलासा दिला असला, तरी सध्या सुरू असलेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करून सावध राहावे, असे आवाहनही केले आहे.

​एकूण उपयुक्त पाणीसाठा: सातही जलाशयांमध्ये मिळून सध्या ५,९८,५८९ दशलक्ष लिटर म्हणजेच ४१.३६% पाणीसाठा उपलब्ध आहे.

​गेल्या २४ आणि ४८ तासांतील वाढ: गेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात १२.४४% तर गेल्या ४८ तासांत २४.४४% इतकी मोठी वाढ झाली आहे.

​पूर्ण भरलेले तलाव (ओव्हरफ्लो): ‘विहार’ तलाव (७ जुलै रोजी रात्री ९.०० वाजता) आणि ‘तुळशी’ तलाव (७ जुलै रोजी रात्री ११.४३ वाजता) पूर्ण १००% भरून वाहू लागले आहेत.

​प्रमुख तलावांमधील उपयुक्त साठा (टक्केवारी):

​मोडक सागर: ७२.१४%

​तानसा: ६९.३५%

​भातसा: ३५.५९%

​मध्य वैतरणा: ३४.६८%

​अप्पर वैतरणा: २०.६६%

​गेल्या २४ तासांतील मुख्य पाऊस: तानसा तलाव क्षेत्रात सर्वाधिक ३१९ मिमी, अप्पर वैतरणा येथे ३०९ मिमी आणि मोडक सागर येथे २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे

Facebook Comments Box

Konkan Railway: पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; प्रवाशांचे मोठे हाल

   Follow us on        

Konkan Railway:गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश एक्सप्रेस गाड्या तीन ते सहा तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विलंबाचा सर्वाधिक फटका ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ला बसला आहे. ही गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल सात तास उशिराने पोहोचली असून, गेल्या आठ दिवसांपासून तिचे उशिरा धावणे सुरूच आहे. याव्यतिरिक्त तुतारी एक्सप्रेस (५ तास), मांडवी एक्सप्रेस (५ तास) आणि दिवा एक्सप्रेस (६ तास) या गाड्याही मोठ्या विलंबाने धावत आहेत. या गाड्या रात्री उशिरा कोकणातील स्थानकांवर पोहोचणार असल्याने, पुढील प्रवासासाठी प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

या प्रमुख गाड्यांसोबतच वंदे भारत, जनशताब्दी, कोचुवेली, नेत्रावती, आणि मंगला एक्सप्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही अडीच ते साडेपाच तासांचा विलंब होत आहे. मात्र, या सर्व गोंधळात प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला असणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईकडे जाणारी तुतारी, जनशताब्दी, कोकणकन्या, मडगाव-एलटीटी आणि दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसारच धावत आहेत.

Facebook Comments Box

निसर्गाचा अनोखा चमत्कार! रायगडमध्ये अतिदुर्मिळ पांढऱ्याशुभ्र ‘चंचू वाळा’ सापाचे दर्शन

   Follow us on        

पाली : रायगड जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जमिनीखाली राहणारे अनेक साप आणि जीव आसरा शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पांढराशुभ्र ‘अल्बिनो चंचू वाळा’ हा बिनविषारी साप आढळून आला आहे.

बिळात पाणी शिरल्याने बाहेर पडला

गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून सापांची बिळे पाण्याने भरली आहेत. परिणामी, हा साप सुरक्षित आणि कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडला होता. माणगावमधील स्थानिक नागरिक योगेश तुपट यांनी या सापाचे अनोखे रूप पाहून वन्यजीव अभ्यासकांशी संपर्क साधला. माणगावमधील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी या सापाची पाहणी केली आणि तो ‘अल्बिनो चंचू वाळा’ असल्याची माहिती देत त्याची ओळख पटवली.

काय आहे ‘चंचू वाळा’?

‘चंचू वाळा’ (शास्त्रीय नाव: Grypotyphlops acutus) हा सापाचा एक बिनविषारी प्रकार आहे. हे साप प्रामुख्याने जमिनीखाली, मातीत किंवा कुजलेल्या पानांच्या ढिगाऱ्याखाली राहतात. वाळवी आणि मुंग्यांची अंडी हे त्यांचे मुख्य अन्न आहे. हे आकाराने लहान असतात. त्यांचे डोळे आणि तोंड पाहताना चोचीसारखा आकार दिसतो, म्हणून त्यांना ‘चंचू वाळा’ म्हणतात.

जनुकीय बदलामुळे पांढरा रंग

सामान्यतः हा साप गडद रंगाचा असतो. मात्र, ‘अल्बिनो’ ही एक दुर्मिळ जनुकीय अवस्था आहे, ज्यामध्ये सापाच्या शरीरातील रंगद्रव्ये पूर्णपणे नष्ट होतात. या जनुकीय बदलामुळे तो चकाकणारा पांढरा किंवा फिकट गुलाबी रंगाचा दिसतो. ही अवस्था निसर्गात खूप दुर्मिळ असते आणि अशा प्राण्यांना निसर्गात तग धरून राहणे व जगणे अवघड असते, असे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी सांगितले.

वन्यजीव अभ्यासकांचे आवाहन

पावसामुळे अनेक जीव बाहेर पडत असल्याने वन्यजीव अभ्यासकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणताही अनोखा जीव आढळून आल्यास त्यांना मारू नये; तर त्वरित वनविभाग किंवा स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधावा.

Facebook Comments Box

Landslide in Amboli Ghat: आंबोली घाटात मोठे दगड रस्त्यावर; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी: आंबोली घाटातील मुख्य रस्त्यावर चार नंबर धबधब्याजवळ मंगळवारी (७ जुलै) रात्री दोन ते तीन मोठे दगड थेट रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती, मात्र सुदैवाने दगड कोसळले त्यावेळेस तिथे कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे.

घाटात पूर्वी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्या जागेपासून काही अंतरावरच ही घटना घडली. सध्या हे मोठे दगड रस्त्यावरच असल्यामुळे तिथून केवळ दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांची एकेरी (वन-वे) वाहतूक सुरू आहे.

पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल:

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील दगड तातडीने बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते आणि पथक घटनास्थळी रवाना झाले असून, दगड हटवण्यासाठी जेसीबी पाचारण करण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

Facebook Comments Box

धक्कादायक! धावत्या एसटी बसचा मागचा भाग निखळला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

   Follow us on        

गडचिरोली: एटापल्ली शहरात सोमवारी संध्याकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी भरलेली बस धावत असताना अचानक बसचा मागील भाग निखळून रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या अपघातावेळी बसचा वेग कमी होता, तसेच बसच्या मागे कोणतेही इतर वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे मात्र एसटीच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकी घटना काय?

गडचिरोलीहून मुलचेरा-बोलेपल्ली मार्गे एटापल्लीकडे येणारी अहेरी आगाराची ‘मानव विकास मिशन’ अंतर्गत चालवली जाणारी बस सोमवारी सायंकाळी एटापल्ली शहरात दाखल झाली होती. बसस्थानकाकडे जात असताना गोटूलसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक बसच्या मागील भागाचा पत्रा आणि संरचना (स्ट्रक्चर) तुटून रस्त्यावर पडली. मोठा आवाज झाल्याने चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखून बस थांबवली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे बसमधील सुमारे ३० प्रवासी प्रचंड घाबरले आणि तातडीने खाली उतरले.

नागरिकांचा संताप आणि प्रशासनाची कारवाई

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या मागील भागावरील पत्रा अत्यंत जुना, कमकुवत आणि तात्पुरत्या स्वरूपात जोडलेला होता. एसटी महामंडळाच्या या भोंगळ आणि जीर्ण कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासणीमध्ये बसच्या देखभाल-दुरुस्तीत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्याने, अहेरी आगारातील संबंधित सहाय्यक कारागिराला (Assistant Artisan) तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

गडचिरोली जिल्ह्यात एसटीच्या दुरवस्थेबाबत प्रश्न निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गडचिरोली-घोट मार्गावरील बसच्या छतामधून पावसाचे पाणी गळल्याने प्रवाशांचे हाल झाले होते, तर अहेरी आगाराच्याच एका धावत्या बसचे छत उडाल्याची घटनाही घडली होती. या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळून अशा जीर्ण बस रस्त्यावर का उतरवल्या जात आहेत, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

 

Facebook Comments Box

या महिलेच्या धैर्याला सलाम! चावा घेतलेल्या जिवंत सापालाच हातात धरून महिला दवाखान्यात उपचारासाठी दाखल

   Follow us on        

लोहा:माणूस समोर साप पाहताच भीतीने थरथर कापायला लागतो. त्यात जर सापाने दंश केला आणि अंगाला विळखा घातला, तर भल्याभल्यांची बोबडी वळते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील एका ६० वर्षीय महिलेने जे केले, ते ऐकून संपूर्ण जिल्हा त्यांच्या धैर्याचे कौतुक करत आहे. सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता, चक्क जिवंत विषारी सापाचे मुंडके हातात घट्ट पकडून रुग्णालय गाठणाऱ्या या माऊलीचे नाव आहे—सुशीलाबाई श्रीरंग वाघमारे.

​नेमकी घटना काय घडली?

​मिळालेल्या माहितीनुसार, सुशीलाबाई वाघमारे या गोलेगाव येथील आपल्या शेतातील झोपडीत काम आटोपून विश्रांती घेत होत्या. त्याच वेळी एका लांबलचक आणि अत्यंत विषारी सापाने त्यांच्या झोपडीत प्रवेश केला. सुशीलाबाईंना काही समजण्याच्या आतच त्या सापाने त्यांच्या हाताच्या बोटाला जोरदार दंश केला. एवढेच नव्हे, तर सापाने त्यांच्या अंगाला विळखा घालण्यास सुरुवात केली.

​भीतीवर मात आणि अंगावर शहारे आणणारा प्रवास

​अशा अत्यंत कठीण आणि जीवघेण्या प्रसंगात कोणतीही सामान्य व्यक्ती शुद्ध हरपली असती किंवा मोठ्याने ओरडली असती. मात्र, सुशीलाबाईंनी कमालीचे धैर्य दाखवले. त्यांनी कसलाही विचार न करता, सापाच्या विषापेक्षा स्वतःच्या आत्मबळावर विश्वास ठेवला आणि सापाचे मुंडके आपल्या हाताने घट्ट पकडले.

​साप हातात असतानाच आणि शरीराला त्याचा विळखा पडलेला असतानाच, त्यांनी शेतातून मुख्य रस्त्यापर्यंत पायी प्रवास केला. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी एका रिक्षाला थांबवले. हातात जिवंत साप पाहून रिक्षाचालक सुरुवातीला प्रचंड घाबरला आणि त्याने नकार देण्याचा प्रयत्न केला. पण सुशीलाबाईंच्या चेहऱ्यावरील दृढ निश्चय पाहून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने त्यांना रिक्षात बसवले.

​रुग्णालयात जिवंत सापासह एन्ट्री; डॉक्टरही अवाक!

​सुशीलाबाईंनी त्याच अवस्थेत कंधार येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. जेव्हा ६० वर्षांची ही महिला हातात जिवंत साप घेऊन रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा तेथील डॉक्टर, परिचारिका आणि उपस्थित रुग्ण क्षणभरासाठी अवाक झाले.

​योग्य उपचारांसाठी दाखवली हुशारी

ग्रामीण भागात बऱ्याचदा सापाची ओळख न पटल्यामुळे नेमके कोणते ‘अँटी-व्हेनम’ (Anti-venom) द्यायचे, यावर डॉक्टरांचा वेळ जातो. सुशीलाबाईंनी सापच सोबत आणल्यामुळे डॉक्टरांना त्याची प्रजाती ओळखणे सोपे झाले. डॉक्टरांनी तात्काळ सापाची ओळख पटवून सुशीलाबाईंवर तातडीने उपचार सुरू केले.

​प्रकृती स्थिर, अंधश्रद्धेला चपराक

​वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे सुशीलाबाईंची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून त्या धोक्याबाहेर आहेत.

​ग्रामीण भागामध्ये आजही सर्पदंश झाल्यास लोक देवाधर्माच्या नावाने मांत्रिकाकडे किंवा भोंदूबाबांकडे धाव घेतात, ज्यात अनेकदा रुग्णाचा जीव जातो. अशा काळात सुशीलाबाईंनी मांत्रिकाच्या नादी न लागता थेट शासकीय रुग्णालय गाठले. त्यांच्या या कृतीने अंधश्रद्धा पाळणाऱ्या समाजाला एक मोठा संदेश दिला आहे. सुशीलाबाईंच्या या अभूतपूर्व आणि अंगावर काटा आणणाऱ्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी पुणे स्थानकापर्यंत न्यावी

   Follow us on        

नांदेड:

नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी पूर्ववत पुणे शहरातील मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत चालवावी आणि आगामी काळात सुरू होणारी मुंबई-हैदराबाद ‘वंदे भारत स्लिपर’ रेल्वे पुणे-सोलापूरऐवजी मनमाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या मराठवाडा मार्गावरून चालवावी, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या नांदेड विभागातील खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते. हडपसर स्थानक प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीचे असून, गाडी पहाटे तिथे पोहोचत असल्याने पुणे शहरात जाण्यासाठी प्रवाशांचे मोठे हाल होतात, याकडे त्यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.

​या बैठकीत खासदार चव्हाण यांनी मराठवाड्यातील पायाभूत सुविधा, प्रवाशांची सुरक्षा आणि शेतकरी-व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. मुंबई-हैदराबाद वंदे भारत स्लिपर मराठवाड्यातून नेल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागांना प्रीमियम रेल्वे सेवा मिळेल, असा महत्त्वाचा प्रस्ताव त्यांनी मांडला. यासोबतच, लातूर-दौंड मार्गे नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही नवीन रेल्वे आणि नांदेड-छत्रपती संभाजीनगर पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. नांदेड-लातूर, नांदेड-बिदर आणि बोधन-मुखेड-लातूर या रेल्वे मार्गांच्या कामांना रेल्वेने पहिली प्राथमिकता द्यावी, असे सांगतानाच बिदर प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुदखेड येथील फुल उत्पादकांसाठी माल चढवण्या-उतरवण्यासाठी पुरेसा वेळ आणि थांबे देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, खतांच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून नांदेड जिल्ह्यात ३-४ ठिकाणे निश्चित करण्याची सूचना केली. रेल्वेचे उड्डाणपूल आणि सदोष भुयारी मार्गांमुळे साचणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे त्यांनी फोटोंसह लक्ष वेधले आणि तिथे फूट ओव्हर ब्रिज अनिवार्य करण्याची मागणी केली. याशिवाय, ‘वन डिस्ट्रिक्ट, वन डिव्हिजन’ धोरण राबवून महाराष्ट्राच्या हद्दीतील सर्व स्थानके नांदेड डिव्हिजनमध्येच ठेवावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. या बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर, रवींद्र चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, बंडू जाधव यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Facebook Comments Box

अवघ्या काही सेकंदांत होणार जमीन मोजणी! अत्याधुनिक ‘रो्अर’ मशिन्स दाखल

   Follow us on        

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता कमालीची गती मिळणार आहे. भूमिअभिलेख विभागाच्या दिमतीला तब्बल ७८ अत्याधुनिक ‘रो्अर’ (ROVER) मशिन्स दाखल झाल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघ्या ३ ते १० सेकंदांत जमिनीचे अचूक रीडिंग मिळून अक्षांश-रेखांशासह जमिनीचा नकाशा (मॅप) स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. यामुळे मोजणीतील मानवी त्रुटी दूर होऊन जमिनीचे वाद मिटण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय शासनाने मोजणी शुल्कात मोठी कपात केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘भाऊ हिस्सा’ वेगळा करण्याचे शुल्क दोन हजार रुपयांवरून थेट २०० रुपयांवर आणले गेले आहे, ज्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या वार्षिक महसुलात काहीशी घट झाली आहे.

​भूमिअभिलेख विभागाने मोजणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी पूर्वीचे क्लिष्ट प्रकार बंद करून आता केवळ ‘साधी मोजणी’ आणि ‘जलद मोजणी’ असे दोनच प्रकार ठेवले आहेत. नवीन नियमांनुसार, १० हेक्टर जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यापुढील प्रत्येक हेक्टरसाठी नियमानुसार शुल्क वाढणार आहे. जिल्ह्यात मोजणी कामांसाठी पुरेसे सर्व्हेअर (भूमापक) नियुक्त करण्यात आले असून मनुष्यबळाचा कोणताही प्रश्न सध्यातरी प्रलंबित नाही. या नवीन रो्अर मशीनमुळे आता प्रत्यक्ष बांधावर होणारी कलाई आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.

​दुसरीकडे, जिल्ह्यात अजूनही जमीन मोजणीची ३५० प्रकरणे प्रलंबित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक जमिनींचे खातेदार नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मोजणीच्या वेळी सर्व संबंधित भागधारकांची सांगड घालणे प्रशासनाला कठीण जात असून, सर्व खातेदार वेळेत एकत्र येत नसल्यामुळेच ही मोजणी रखडल्याचे चित्र आहे. मात्र, मुंबई-पुण्यातील खातेदारांनी सहकार्य केल्यास ही प्रलंबित ३५० प्रकरणेही काही दिवसांत निकाली निघतील, असा विश्वास भूमिअभिलेख विभागाने व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

हवामान विभागाचे चार रंगांचे अलर्ट कसे काम करतात? जाणून घ्या सविस्तर

   Follow us on        

​विशेष प्रतिनिधी, मुंबई:

पावसाळ्यात किंवा बदलत्या हवामानामध्ये हवामान विभागाकडून अनेकदा विविध रंगांचे अलर्ट जारी केले जातात. मात्र, या अलर्टचा नक्की अर्थ काय आणि कोणत्या अलर्टला किती पाऊस पडतो, याबाबत नागरिकांमध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. हाच संभ्रम दूर करण्यासाठी हवामान विभागाच्या या चार प्रमुख अलर्टची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

​हवामानाचा पहिला टप्पा म्हणजे ‘ग्रीन अलर्ट’ होय. जेव्हा एखाद्या भागात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस असतो, तेव्हा हवामान विभागाकडून हा अलर्ट दिला जातो. याचा साधा अर्थ असा की, संबंधित ठिकाणी कुठलाही धोका नाही आणि सर्व काही ठीक आहे.

यानंतरचा टप्पा म्हणजे ‘येलो अलर्ट’ असून हा ६५ ते ११५ मिमी पावसासाठी जारी केला जातो. पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी यासाठी हा इशारा दिला जातो.

​परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला जातो, जो ११५ ते २०४ मिमी इतक्या मुसळधार पावसासाठी असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाने तयार राहावे, म्हणून हा अलर्ट दिला जातो.

सर्वात शेवटचा आणि अत्यंत धोकादायक टप्पा म्हणजे ‘रेड अलर्ट’ होय. २०४ मिमी पेक्षा जास्त अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असताना हा अलर्ट जारी होतो. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्यासाठी आणि स्वतःसह इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा इशारा दिला जातो. त्यामुळे हवामान खात्याच्या या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवून नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search