दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत होण्याची आशा पल्लवित

   Follow us on        

मुंबई: कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दादर-रत्नागिरी रेल्वे गाडीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. कोव्हिड काळात बंद झालेली आणि सध्या दिवा स्थानकावरून सुटणारी ही गाडी पुन्हा एकदा दादरहून चालवण्यात यावी, या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवली असून, यासंदर्भात तांत्रिक बाबींची (Operational Feasibility) तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

​गेल्या अनेक दिवसांपासून मध्य आणि पश्चिम उपनगरातील चाकरमानी या गाडीसाठी पाठपुरावा करत आहेत. सध्या ही गाडी दिवा टर्मिनल येथून सुटत असल्याने मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या या भावना लक्षात घेऊन खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर पत्र दिले होते. तसेच प्रत्यक्ष भेटीत त्यांनी ही गाडी केवळ दादरहूनच नाही, तर दादर, अंधेरी, बोरिवली आणि वसई मार्गे कोकणात नेण्याबाबतही सविस्तर चर्चा केली. पश्चिम उपनगरातील प्रवाशांना थेट कोकणात जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

​या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी वायकर यांना पत्राद्वारे कळवले आहे की, रेल्वे प्रशासन या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत आहे. गाड्यांचे वेळापत्रक आणि रेल्वे मार्गावरील उपलब्ध जागा यांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. “कोकणवासीयांची ही मागणी रास्त असून, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करू आणि ही गाडी लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असा विश्वास खासदार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे आता पुन्हा एकदा दादरहून रत्नागिरीसाठी गाडी धावण्याची आशा पल्लवित झाली आहे.

Facebook Comments Box

मुंबई: मध्य रेल्वे स्थानकांवर मिळणार किराणा माल; दुकानांसाठी लवकरच निविदा निघणार

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर किराणा (किराणा) दुकाने उभारण्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहेत. यासंदर्भातील सूचना रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर ‘कमिंग सून’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानकांवर किराणा दुकाने, स्टॉल्स आणि किरकोळ विक्रीसाठीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने स्थानिक मराठी व्यावसायिकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मराठी बांधवांना आवाहन केले आहे की, टेंडर जाहीर झाल्यावर तात्काळ अर्ज करावे आणि या दुकानांचा ताबा घ्यावा. सध्या रेल्वे प्रशासनाकडून मुंबई विभागातील विविध स्थानकांवर किराणा किऑस्क, स्टॉल्स यांच्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्याची तयारी असल्याचे समजते.

मात्र, काहींनी चिंता व्यक्त केली आहे की, डी-मार्ट, जिओ मार्ट सारख्या मोठ्या कंपन्या या टेंडरमध्ये भाग घेऊ शकतात आणि स्थानिक छोट्या व्यावसायिकांना संधी मिळणार नाही. टेंडरसाठी मोठी डिपॉझिट रक्कम (अंदाजे २५ लाखांपेक्षा जास्त) लागू शकते, त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट (cr.indianrailways.gov.in) वरून माहिती घ्यावी आणि वेळेवर अर्ज करावा, असे सांगितले जात आहे. ही योजना मुंबईकर प्रवाशांना स्थानकांवरच किराणा खरेदीची सोय उपलब्ध करून देणारी ठरेल.

 

 

 

Facebook Comments Box

धक्कादायक! आकाशातून पडला ५ किलोचा बर्फाचा गोळा; घराचे छप्पर फोडून घरात कोसळल्याने खळबळ

   Follow us on        

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली-परबवाडी येथे एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना घडली आहे. भर उन्हाळ्यात विजय मधुकर देऊळकर यांच्या घराच्या छपरावर आकाशातून सुमारे ५ किलो वजनाचा बर्फाचा एक भलामोठा तुकडा कोसळला. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देऊळकर कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. हा बर्फाचा गोळा इतक्या वेगाने आणि शक्तीने पडला की, त्याने घराच्या छपराची कौले आणि लाकडी रिप तोडून थेट स्वयंपाकघरात प्रवेश केला.

​ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील महिला अर्चना देऊळकर या स्वयंपाकघरातच होत्या. सुदैवाने, बर्फाचा हा तुकडा त्यांच्या अंगावर न पडता बाजूला पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांची मोठी धावपळ उडाली आणि ग्रामस्थांनी देऊळकर यांच्या घराकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हा परिसरात कोणत्याही प्रकारचे ढगाळ वातावरण नव्हते किंवा पावसाचे कोणतेही संकेत नव्हते. घरच्या आजूबाजूला कोणताही उंच भागही नाही होता. रखरखत्या उन्हात अचानक आकाशातून एवढा मोठा बर्फाचा तुकडा पडल्याने हे नेमके काय गौडबंगाल आहे, यावर गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच देवली गावचे सरपंचांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा तुकडा नैसर्गिक गारांचा प्रकार आहे की विमानातून पडलेला साचलेला बर्फ (Blue Ice), याचा उलगडा होणे आवश्यक आहे. या रहस्यमय घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुराव्यासाठी देऊळकर यांनी तो बर्फाचा तुकडा सुरक्षितपणे फ्रीजमध्ये जतन करून ठेवला असून, सध्या संपूर्ण जिल्ह्यात या ‘आस्मानी’ संकटाचीच चर्चा रंगली आहे.

Facebook Comments Box

Shaktipeeth Expressway: सुधारित आराखडा तयार; पण भूसंपादन मोबदल्याचे गणित काय?

   Follow us on        

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या बहुचर्चित शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, आता हा मार्ग ८५५ किलोमीटर लांबीचा होणार आहे. पूर्वी हा प्रकल्प १२ जिल्ह्यांसाठी प्रस्तावित होता, मात्र सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतील ४० तालुके आणि सुमारे ४०० गावांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांवर येणे अपेक्षित आहे.

​या प्रकल्पामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतून हा मार्ग सुमारे २७० कि.मी. धावणार आहे. यवतमाळ, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये या महामार्गाची लांबी प्रत्येकी १०० किलोमीटरपेक्षा जास्त असेल.

​दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘समृद्धी महामार्गा’च्या धर्तीवरच जमीन मालकांना मोबदला देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. जुन्या आखणीनुसार काही गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली असली, तरी नव्या बदलांमुळे आणि मोबदल्याच्या अनिश्चिततेमुळे पेच कायम आहे.

Facebook Comments Box

कोकणसाठी सुरू झालेल्या दोन्ही रो-रो सेवा बंद; नियोजनातील त्रुटींमुळे अपयश

   Follow us on        

कोकणासाठी मोठ्या अपेक्षांनी सुरू करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या Ro-Ro (Roll-on/Roll-off) सेवांना अल्पावधीतच ब्रेक लागला आहे. मुंबई–विजयदुर्ग फेरी बोट सेवा तसेच कोकण रेल्वे मार्गावरील कार Ro-Ro सेवा या दोन्ही प्रकल्पांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या सेवा सुरू होऊन एक महिनाही पूर्ण झाला नव्हता.

या सेवांमागचा उद्देश प्रवास सुलभ करणे, वेळ आणि इंधनाची बचत करणे असा होता. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वात मोठी अडचण म्हणजे भाडे जास्त असणे. मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी हे दर परवडणारे नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात आली. याशिवाय प्रतीक्षा कालावधी (लोडिंग टाइम) मोठा असल्याने वेळ वाचवण्याऐवजी उलट वेळ वाया जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली.

तसेच निवडलेली बंदरे आणि स्थानके गैरसोयीची असल्याचा मुद्दाही पुढे आला. शहराच्या मुख्य भागांपासून दूर असलेल्या ठिकाणी सेवा सुरू केल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत होता. परिणामी, या सेवांचा वापर करण्याऐवजी पारंपरिक रेल्वे किंवा रस्ते मार्ग अधिक सोयीस्कर वाटू लागले.

तज्ज्ञांच्या मते, या प्रकल्पांचे नियोजन करताना मुख्यतः उच्चभ्रू किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रवाशांचा विचार करण्यात आला. मात्र मुंबईसारख्या शहरातील मोठा मध्यमवर्गीय वर्ग हा या सेवांचा प्रमुख वापरकर्ता असू शकतो, याकडे दुर्लक्ष झाले. सेवा किचकट आणि महाग असल्याने सर्वसामान्य प्रवासी दूर राहिले.

या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा प्रकल्पांचे नियोजन करताना मध्यमवर्गीयांच्या गरजा, परवडणारे दर, सोयीची स्थानके आणि कमी प्रतीक्षा वेळ यांचा विचार करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, चांगल्या उद्देशाने सुरू केलेले प्रकल्पही अशाच प्रकारे अल्पावधीत बंद पडण्याचा धोका कायम राहणार आहे.

Facebook Comments Box

रेल्वेच्या ‘रेल-वन’ ॲपमधील तांत्रिक त्रुटीमुळे विनातिकीट प्रवासाला चालना

   Follow us on        

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या नवीन ‘रेल्वे-वन’ (RailOne) या तिकीट बुकिंग ॲपमध्ये एक मोठी तांत्रिक त्रुटी समोर आली असून, यामुळे विनातिकीट प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक, रेल्वेच्या नियमांनुसार ‘जिओ-फेन्सिंग’ प्रणालीमुळे धावत्या ट्रेनमध्ये किंवा स्टेशनच्या बाहेरून तिकीट काढता येत नाही; मात्र या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी आता ट्रेनमध्ये चढल्यानंतरही सहज तिकीट बुक करत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून हा प्रकार सुरू असून, यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः कल्याणकडे जाणाऱ्या एसी (AC) लोकलमध्ये तिकीट तपासणी दरम्यान अनेक प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी तिकीट बुक करताना आढळले आहेत, ज्यामुळे रेल्वेच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

​या तांत्रिक त्रुटीचा थेट परिणाम मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर, विशेषतः मध्य आणि हार्बर मार्गावर होत आहे. ‘डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी’चे सदस्य राजीव सिंघल यांनी सांगितले की, या त्रुटीमुळे एसी लोकलमध्ये होणारी गर्दी वाढली असून गाड्यांच्या वक्तशीरपणावरही परिणाम झाला आहे. सध्या मुंबईत पीक अवर्समध्ये लोकल गाड्या सरासरी १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मते, सिग्नलसाठी वापरल्या जाणाऱ्या लहरींची व्याप्ती स्टेशन परिसराबाहेरही जात असल्याने जिओ-फेन्सिंग मर्यादित ठेवणे कठीण होत आहे.

​’रेल्वे-वन’ ॲपमधील ही त्रुटी दूर करणे तातडीचे बनले आहे, जेणेकरून विनातिकीट प्रवासाला आळा बसेल आणि रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल.

Facebook Comments Box

कांजुरमार्ग – बदलापूर मेट्रोच्या कामाला वेग येणार; नव्याने निविदा प्रसिद्ध

   Follow us on        

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या कामाला आता वेग येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या प्रकल्पाच्या पुनरावलोकनासाठी आणि तांत्रिक कामांसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

प्रकल्पाचे पुनरुज्जीवन

यापूर्वी मेट्रो १४ चा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला होता, मात्र तांत्रिक कारणांमुळे डिसेंबर २०२५ मध्ये सल्लागार करार रद्द करण्यात आला होता. आता एमएमआरडीएने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), अंदाजपत्रक आणि सर्वेक्षणासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला आहे.

मेट्रो १४ मार्गिकेची वैशिष्ट्ये

बदलापूर आणि अंबरनाथमधील प्रवाशांना थेट मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणारी ही मार्गिका अनेक अर्थांनी खास ठरणार आहे:

एकूण लांबी:४३.६९ किमी

स्थानकांची संख्या: २४ (यात कांजुरमार्ग येथे एक भूमिगत स्थानक असेल).

वेग: डिझाइन गती ९० किमी/तास, तर सरासरी ५५ किमी/तास वेग असेल.

कनेक्टिव्हिटी:ही मार्गिका मेट्रो ४, मेट्रो ६, मेट्रो १२ आणि मेट्रो ५ ला जोडली जाणार आहे.

प्रवाशांना होणारे फायदे

सध्या बदलापूर-अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना मुंबई किंवा नवी मुंबईला जाण्यासाठी पूर्णपणे मध्य रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. या नवीन मेट्रो मार्गिकेमुळे:

१. रेल्वेवरील प्रवाशांचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.

२. घणसोली येथे ट्रान्स-हार्बर रेल्वेची जोडणी मिळाल्याने नवी मुंबईचा प्रवास सुखकर होईल.

३. कल्याण-शिळफाटा आणि तळोजा भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.

महत्त्वाचे इंटरचेंज पॉइंट्स

कांजुरमार्ग: मेट्रो ४ आणि ६ शी जोडणी.

हेदुटणे: मेट्रो १२ (कल्याण-तळोजा) शी जोडणी.

बदलापूर: मध्य रेल्वे आणि मेट्रो ५ अ (प्रस्तावित) शी जोडणी.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा हा सर्वात मोठा मेट्रो प्रकल्प ठरणार असून, यामुळे एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुसह्य होण्याची चिन्हे आहेत.

 

Facebook Comments Box

धक्कादायक! सिग्नल यंत्रणेत बिघाड करून सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा

   Follow us on        

कराड: कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ शनिवारी सकाळी सह्याद्री एक्सप्रेस (कोल्हापूर-पुणे) गाडीवर चोरट्यांनी मोठा दरोडा टाकला. चोरट्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी अचानक थांबवली आणि प्रवाशांवर धाड घातली. त्यांनी प्रवाशांच्या मोबाइल फोन, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने प्रवासी घाबरले होते.रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सिग्नल बिघडवून गाडी थांबवल्याची ही पहिलीच घटना नाही, मात्र एक्सप्रेस गाडीवर अशा पद्धतीने दरोडा टाकणे ही दुर्मीळ आणि अतिशय धोकादायक घटना आहे. चोरांनी गाडी थांबताच काही मिनिटांतच लूट केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांची संख्या चार ते पाच होती.मिरज रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रवाशांच्या जबानी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणेच्या कमकुवतपणामुळे ही घटना घडल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रवाशांनी अशा घटनांपासून सावध राहावे, मौल्यवान वस्तू जवळ ठेवू नयेत आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Facebook Comments Box

“सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करा, अन्यथा….” प्रवासी संघाचा रेल्वेला इशारा

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापूर आणि मुंबईला जोडणारी अत्यंत महत्त्वाची आणि जुनी रेल्वे सेवा ‘सह्याद्री एक्सप्रेस’ तातडीने पूर्ववत करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघातर्फे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन, रेल्वे रोको किंवा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. १९९० पासून सुरू असलेली ही रेल्वे सेवा कोविड-१९ महामारीच्या काळात बंद करण्यात आली होती. सध्या ही रेल्वे केवळ कोल्हापूर ते पुणे या मर्यादित स्वरूपात धावत असल्याने मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

​प्रवासी संघाने निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातून दररोज सुमारे २० ते २५ हजार प्रवासी खासगी बस किंवा कारने मुंबईकडे प्रवास करतात. रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना महागड्या खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. तसेच इंधनाचा वापर वाढल्याने पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) येथे प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात असले, तरी प्रत्यक्षात तिथे नवीन प्लॅटफॉर्मची सुविधा निर्माण झाली आहे. एकीकडे कोल्हापूर ते पनवेल विमान सेवा सुरू करण्यात आली असताना, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी रेल्वे सेवा मात्र अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे, याबद्दल प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.

​या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई (किंवा पर्यायी स्वरूपात पनवेलपर्यंत) तात्काळ सुरू करावी, अशी विनंती अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, कोल्हापूरचे खासदार आणि मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. हजारो कामगार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रवासी संघाने स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

मुंबईहून धावणार्‍या पाहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनला मंजुरी

   Follow us on        

नवी दिल्ली: देशातील दोन प्रमुख आर्थिक केंद्रे असलेल्या मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान आता नवीन ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अधिकृतपणे मंजुरी दिली असून, यामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.

​खासदार पी. सी. मोहन यांच्या मागणीला यश:

बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार पी. सी. मोहन यांनी मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी पत्राद्वारे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे कळवले आहे. लोकहिताच्या दृष्टीने आणि वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

​प्रमुख स्थानके आणि मार्ग:

मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन बेंगळुरूचे ‘क्रांतिवीर संगोळी रायाण्णा’ (KSR) स्टेशन आणि मुंबईचे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) या दोन ऐतिहासिक स्थानकांदरम्यान चालवली जाईल. या मार्गावर सध्या धावणाऱ्या इतर गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत स्लीपरचा वेग अधिक असल्याने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

​आधुनिक सुविधांचा संगम:

आतापर्यंत धावणाऱ्या वंदे भारत गाड्या प्रामुख्याने ‘चेअर कार’ स्वरूपाच्या होत्या, ज्या अल्प अंतराच्या प्रवासासाठी सोयीस्कर होत्या. मात्र, मुंबई-बेंगळुरू दरम्यानचा प्रवास लांब पल्ल्याचा असल्याने प्रथमच अत्याधुनिक ‘स्लीपर’ कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. यात आरामदायी शयनिका, सुरक्षितता यंत्रणा, वातानुकूलित कोच आणि जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा प्रवाशांना मिळतील.

या ट्रेनच्या मंजुरीमुळे दक्षिण भारत आणि पश्चिम भारत यांच्यातील व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. आयटी हब बेंगळुरू आणि आर्थिक राजधानी मुंबई यांमधील संवाद या जलद रेल्वेसेवेमुळे अधिक सुलभ होईल अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. लवकरच या ट्रेनचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष धावण्याची तारीख रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search