Railway Updates: मध्य रेल्वेकडून ९६८ विशेष गाड्यांना मुदतवाढ!

   Follow us on        

मुंबई: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने तब्बल ९६८ विशेष गाड्यांच्या (Special Trains) कालावधीत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या ९६८ विशेष गाड्यांमध्ये दैनंदिन, साप्ताहिक, द्वि-साप्ताहिक आणि आठवड्यातून ५ दिवस धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.

गाड्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

  • ७७० दैनंदिन विशेष गाड्या (Daily Special Trains)

  • ११० विशेष गाड्या (आठवड्यातून ५ दिवस धावणाऱ्या)

  • ४४ साप्ताहिक विशेष गाड्या (Weekly Special Trains)

  • ४४ द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या (Bi-weekly Special Trains)

    मुदतवाढ देण्यात आलेल्या सर्व गाड्यांची यादी

    १. साप्ताहिक विशेष गाड्या (४४ सेवा)

  • गाडी क्र. 01435 सोलापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष: पूर्वी १४.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता २१.०७.२०२६ ते २९.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).

  • गाडी क्र. 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस – सोलापूर साप्ताहिक विशेष: पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता २२.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).

  • गाडी क्र. 01477 सोलापूर – अनाकापल्ले साप्ताहिक विशेष: पूर्वी १०.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता १७.०७.२०२६ ते २५.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).

  • गाडी क्र. 01478 अनाकापल्ले – सोलापूर साप्ताहिक विशेष: पूर्वी ११.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता १८.०७.२०२६ ते २६.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).

    २. आठवड्यातून ५ दिवस धावणाऱ्या गाड्या (११० सेवा)

    (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार)

  • गाडी क्र. 01421 दौंड – कलबुरगी अनारक्षित विशेष: पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत धावणार होती, तिला आता १७.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ (५५ सेवा).

  • गाडी क्र. 01422 कलबुरगी – दौंड अनारक्षित विशेष: पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत धावणार होती, तिला आता १७.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ (५५ सेवा).

    ३. आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाड्या / द्वि-साप्ताहिक (४४ सेवा)

    (गुरुवारी आणि रविवारी)

  • गाडी क्र. 01425 दौंड – कलबुरगी अनारक्षित विशेष: पूर्वी १२.०७.२०२६ पर्यंत धावणार होती. आता १६.०७.२०२६ ते २७.०९.२०२६ या कालावधीत धावणार (२२ सेवा).

  • गाडी क्र. 01426 कलबुरगी – दौंड अनारक्षित विशेष: पूर्वी १२.०७.२०२६ पर्यंत धावणार होती. आता १६.०७.२०२६ ते २७.०९.२०२६ या कालावधीत धावणार (२२ सेवा).

    ४. दैनिक विशेष गाड्या (७७० सेवा)

    या सर्व दैनंदिन गाड्या पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत अधिसूचित होत्या, आता त्यांना १६.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे (प्रत्येकी ७७ सेवा):

  • गाडी क्र. 01024 कोल्हापूर – पुणे आरक्षित दैनिक विशेष

  • गाडी क्र. 01023 पुणे – कोल्हापूर आरक्षित दैनिक विशेष

  • गाडी क्र. 01487 हडपसर – हरंगुळ आरक्षित दैनिक विशेष

  • गाडी क्र. 01488 हरंगुळ – हडपसर आरक्षित दैनिक विशेष

  • गाडी क्र. 01461 सोलापूर – दौंड अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)

  • गाडी क्र. 01462 दौंड – सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)

  • गाडी क्र. 01465 सोलापूर – कलबुरगी अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)

  • गाडी क्र. 01466 कलबुरगी – सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)

  • गाडी क्र. 01211 बडनेरा – नाशिक अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)

  • गाडी क्र. 01212 नाशिक – बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)

बुकिंग आणि आरक्षणाची माहिती:

या विशेष गाड्यांचे (गाडी क्र. ०१४३५, ०१४३६, ०१४७७, ०१४७८, ०१०२४, ११०२३, ०१४८७ आणि ०१४८८) आरक्षण ५ जुलै २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) सुरू होणार आहे.

तसेच सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे बुकिंग प्रवासी ‘युटीएएस’ (UTS) प्रणालीद्वारे करू शकतात. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी व सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES / ‘रेल वन’ (Rail One) ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

अपघाताला आमंत्रण! आंबोली घाटात दरड कोसळून तीन दिवस उलटले तरी ढिगारा तसाच

   Follow us on        

आंबोली: निसर्गसौंदर्याने नटलेल्या आंबोली घाटातील सनसेट पॉईंट परिसरामध्ये तीन दिवसांपूर्वी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. डोंगरकड्यावरून अचानक एक अजस्र कडा आणि सोबतीला मातीचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर येऊन कोसळला. हा दगड अगदी रस्त्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीच्या शेजारी पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. परंतु, या  घटनेला तीन दिवस उलटून गेले, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला ही दरड हटवण्यास वेळ मिळालेला नाही. प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​सध्या हा भलामोठा दगड रस्त्याच्या कडेलाच असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाचा जोर आणि धुक्याचं साम्राज्य यामुळे रात्रीच्या वेळी समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही, अशा वेळी एखादे वाहन या ढिगाऱ्यावर आदळून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत, पण अशा संवेदनशील आणि धोकादायक ब्लॅक स्पॉटची वेळेत दखल न घेण्याच्या प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

​सध्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक दररोज आंबोलीत हजेरी लावत आहेत. जर मुख्य रस्त्यावरील हा अडथळा तातडीने दूर केला नाही, तर पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडू शकते आणि आंबोलीच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे संबंधित विभागाने आता तरी सुस्तपणा झटकून हा रस्ता तातडीने मोकळा करावा आणि संपूर्ण घाटाची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे स्थानकात ‘गरीब रथ’सह इतर गाड्यांना थांबा द्या; खासदार श्रीकांत शिंदे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) धावणाऱ्या ‘गरीब रथ एक्सप्रेस’सह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा, असे साकडे खासदार शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांना घातले आहे.

​कोकणातील हजारो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी रोड स्थानकावर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा थांबा नसल्यामुळे सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना ऐनवेळी लांबच्या अन्य स्थानकांवर जाऊन रेल्वे पकडावी लागते. यामुळे कोकणवासीयांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत असल्यामुळे खासदार शिंदे यांनी सविस्तर पत्राद्वारे नागरिकांच्या या व्यथा रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

​खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पत्रात सावंतवाडी रोड स्थानकाचे वाढते महत्त्व, कोकणातील वाढती प्रवासी संख्या आणि पर्यटनाला मिळणारी चालना याबाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या आहेत. विशेषतः मुंबई आणि कोकणदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी गरीब रथ एक्सप्रेस व इतर प्रमुख गाड्यांचा थांबा उपलब्ध झाल्यास, त्यांचा प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी पत्रात व्यक्त केला.

​या न्याय्य मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाला सावंतवाडी रोड स्थानकावर या रेल्वेगाड्यांचा थांबा देण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता (Feasibility) तपासण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रस्तावाचा व्यवहार्यता अहवाल रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर, नियमानुसार त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

​सावंतवाडी रोड स्थानकावर गरीब रथ एक्सप्रेससह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना अधिकृत थांबा मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणपट्टीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग प्रवाशांना प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल. तसेच, कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांनाही यामुळे मोठी चालना मिळून सकारात्मक फायदा होईल.

Facebook Comments Box

धक्कादायक! धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून चिमुकल्यासह तिघांची उडी, महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मडगावहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून एका पुरुषाने त्याच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिला आणि त्यांच्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलासह धावत्या रेल्वेतून उडी मारली. खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या भीषण अपघातात शुभ्रा अतिश दिवेकर नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

​पोलीस तपास आणि पुढील कारवाई:

घटनेची माहिती मिळताच रेल्वेतील प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले असून सध्या त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेल्या सचिन आणि त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांनी धावत्या रेल्वेतून एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक ताणतणाव किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे हा आत्महत्येचा प्रयत्न असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. खेड पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Facebook Comments Box

आंबेनळी घाट वाहतुकीसाठी चार दिवस पूर्णपणे बंद

   Follow us on        

रायगड: अतिवृष्टीचा इशारा आणि सातत्याने दरडी कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट शुक्रवार (३ जुलै) ते मंगळवार (७ जुलै) या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.

सह्याद्री पर्वतरांगेतील हा घाटमार्ग तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अस्थिर बेसॉल्ट खडकांमुळे पावसाळ्यात अत्यंत धोकादायक ठरतो. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने आणि गेल्या आठवड्यात दोनदा दरडी कोसळल्यामुळे, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. घाट बंद असताना नागरिकांनी पुणे किंवा सातारा बाजूकडे जाण्यासाठी महाड-माणगाव-ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर-चिपळूण-कराड या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Facebook Comments Box

Red Alert: पुढील तीन दिवस महत्वाचे; हवामान विभागाचा मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांना अतिवृष्टीचा इशारा

   Follow us on        

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने ३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ४ जुलै (शनिवार) आणि ५ जुलै (रविवार) रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसांत काही भागात अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, रायगड जिल्ह्यासाठी ३ जुलै ते ५ जुलै या सलग तीन दिवसांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​हवामान विभागाच्या या इशाऱ्याची गंभीर दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून मुंबईकरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पालिकेने सर्व नागरिकांना या काळात पूर्णपणे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. अतिवृष्टीमुळे शहरात कोणतीही आणीबाणीची किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ मदतीसाठी पालिकेचा अधिकृत हेल्पलाइन क्रमांक १९१६ (1916) कार्यान्वित करण्यात आला असून, त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​या हवामान अंदाजानुसार केवळ मुंबई परिसरच नव्हे, तर संपूर्ण कोकण किनारपट्टी पावसाच्या प्रभावाखाली राहणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून तेथे यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ३ आणि ४ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनचा हा जोर पाहता, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित स्थानी राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: मुंबई – पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर परशुराम घाटात तरंगत्या पुलासाठी हालचाली सुरू

   Follow us on        

चिपळूण:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साडेपाच किलोमीटर अंतराच्या परशुराम घाटात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा आणि खंडाळा घाटाच्या धर्तीवर आता परशुराम घाटातही आधुनिक ‘व्हाया डक्ट’ (उड्डाणपूल) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. घाटातील गॅबियन वॉलचा भराव खचल्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, यासाठी ‘थॉट कन्सल्टन्सी’ या नामांकित एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही एजन्सी पुलाचा सविस्तर आराखडा तयार करणार असून, मंजुरीसाठी तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.

​पावसामुळे गॅबियन वॉल ठरतेय डोकेदुखी

​परशुराम घाटातील सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली गॅबियन वॉल गेल्या काही काळापासून प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गतवर्षी मे महिन्याच्या मध्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील कामाचे नियोजन कोलमडले होते आणि अर्धवट अवस्थेत असलेली गॅबियन वॉल ठिकठिकाणी कोसळली होती. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक एकेरी करण्यात आली होती. यंदा या भिंतीच्या रचनेत काही किरकोळ बदल करून अत्यंत घाईघाईने काम पूर्ण करण्यात आले, परंतु पहिल्याच पावसाने या कामाची पोलखोल केली. गॅबियन वॉलच्या पायथ्याशी असलेला मातीचा भराव वाहून गेला असून, नव्याने केलेले काँक्रिटीकरणही खचले आहे. सद्यस्थितीत तातडीची उपाययोजना म्हणून कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात येत आहे.

​मूळ बांधकामाला धोका नाही: महामार्ग विभाग

​घाटातील या धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे अधिकारी पंकज गोसावी यांनी नागरिकांना धीर दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, गॅबियन वॉलच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागलेला नाही आणि ती पूर्णपणे मजबूत आहे. केवळ वरचा मातीचा भराव वाहून गेला असून घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला यामुळे कोणताही धोका निर्माण झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या घाटातील दुहेरी वाहतूक पूर्ववत सुरू ठेवण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत ‘व्हाया डक्ट’ पुलाचा अंतिम आराखडा उपलब्ध झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

​’लालपरी’ झाली जलपरी! चालत्या बसमध्ये छत्री उघडून बसण्याची प्रवाशांवर नामुष्की!

   Follow us on        

सावंतवाडी:

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) कारभार चौकुळ-कुंभवडे मार्गावर मात्र प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणारी एकमेव एसटी बस पूर्णपणे गळकी झाली असून, प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना चक्क बसमध्ये बसूनही छत्र्या उघडाव्या लागत आहेत. या गंभीर समस्येमुळे हैराण झालेल्या उल्हास पनवेलकर, स्वरांगी गावडे, समिक्षा गावडे, कमलेशकुमार गावडे, सुनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रकाश जाधव, राहुल चव्हाण, ऋतुराज गावडे, सुरेश गावडे आदी नागरिकांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी निवेदन देऊन ही बस तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

​या मार्गावरील एसटीवर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि नोकरदार वर्ग रोजच्या प्रवासासाठी पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, बसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे कपडे, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि नोकरदारांची महत्त्वाची कागदपत्रे भिजून नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षित बनला आहे. प्रवाशांनी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

​”महामंडळाकडे नवीन बसेस उपलब्ध आहेत, मग चौकुळ-कुंभवडे मार्गावरील प्रवाशांच्या नशिबीच ही गळकी बस का? ग्रामीण भागातील नागरिक एसटी प्रशासनासाठी दुय्यम आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. महामंडळाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, अन्यथा “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य केवळ फलकापुरतेच उरेल, अशी टीकाही केली जात आहे. प्रशासन आता तरी खडबडून जागे होऊन चौकुळ-कुंभवडे मार्गावरील गळकी एसटी तातडीने बदलणार की प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी टर्मिनस इमारत कामाची निविदा जारी; ईमेल मोहीम व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजन सोहळ्याला तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, तरीही टर्मिनसची कामे रखडलेलीच होती. या अन्यायाविरुद्ध ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांच्या वतीने नुकतीच एक व्यापक ईमेल मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि निर्माण झालेल्या दबावामुळे अवघ्या ५ दिवसांत रेल्वे प्रशासनाला जाग आली असून, सावंतवाडी टर्मिनस टप्पा-२ अंतर्गत रखडलेल्या मुख्य टर्मिनस इमारतीच्या कामाची अधिकृत निविदा (Tender) अखेर जारी करण्यात आली आहे.

१००० पेक्षा जास्त ईमेल आणि डिजिटल मीडियाचा खंबीर पाठिंबा

या मोहिमेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळ, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाला रखडलेल्या कामांच्या तपशिलासह तब्बल १००० पेक्षा जास्त ईमेल पाठवण्यात आले होते. या जनआंदोलनाला ‘दैनिक पुढारी’सह विविध वृत्तपत्रे आणि डिजिटल मीडियाने खंबीर साथ दिल्यामुळे शासन व प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर ही निविदा काढण्यात आली. टर्मिनस प्रेमींनी हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय असल्याचे म्हटले आहे.

कोकणातील आमदारांना साकडे

सध्या राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने, मुंबई आणि कोकणातील सर्व विधानसभा व विधानपरिषद आमदारांना संघटनेने भावनिक साकडे घातले आहे. राज्य शासनाच्या अधीन असलेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरणातून पाणी पुरवठा योजना’ आणि ‘रत्नसिंधू समृद्धी योजनेतून’ होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसच्या कामांना या अधिवेशनात तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला असून दरवर्षी मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच ठोस पावले उचलावीत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि समस्त कोकणवासीयांनी केले आहे.

लढा अद्याप संपलेला नाही; प्रमुख मागण्या कायम

रेल्वेने केवळ इमारतीच्या कामाची निविदा काढली असली, तरी प्रवाशांच्या खऱ्या सोयीसाठी पुढील मागण्यांवर कोकण रेल्वे महामंडळाने त्वरित विचार करून निधीची तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे:

प्लॅटफॉर्मवर संपूर्ण शेड: पावसाळी व उन्हाळी संरक्षणासाठी प्लॅटफॉर्मवर ‘संपूर्ण शेड’ उभारणे.

नवा प्लॅटफॉर्म: गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘अजून एक नवीन प्लॅटफॉर्म’ तयार करणे.

अतिरिक्त रेल्वे रुळ: अतिरिक्त रेल्वे रुळांची (ट्रॅक) निर्मिती करणे.

या सर्व प्रमुख मागण्या आणि कामे मार्गी लावण्याचा लढा यापुढेही कायम राहील, असा निर्धार कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्गातील ६,७१० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; ५३.८३ कोटींची कर्जमाफी मंजूर

   Follow us on        

​सिंधुदुर्ग नगरी:

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना एकूण ५३ कोटी ८३ लाख २० हजार ४९१ रुपयांच्या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

​या कर्जमाफी योजनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची २० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांमधील २,७०२ शेतकऱ्यांना एकूण ३३ कोटी १३ लाख ६३ हजार ४९१ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याशिवाय, जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पात्र यादी तयार केली जाणार आहे.

​दुसरीकडे, शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीची कर्जे असणे, तसेच काही कर्जदार विविध शासकीय किंवा इतर पदांवर कार्यरत असणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकीत कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. सर्व माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ‘आधार प्रमाणीकरणासाठी’ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्रांमार्फत आपले आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search