मुंबई:
फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या बहुप्रतीक्षित अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रीडाप्रेमींसाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. १९ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्याचा आनंद नागरिकांना घेता यावा यासाठी राज्यातील सर्व खाद्यगृहे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची विशेष परवानगी गृह विभागाने दिली आहे. राष्ट्रीय रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI), मुंबई यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून शासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेतला आहे. सह सचिव (गृह विभाग) मुग्धा नि. धुरी यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या वाढीव वेळेच्या परवानगीसोबतच शासनाने संबंधित आस्थापनांसाठी काही कडक अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हॉटेल मालकांना त्यांच्या आस्थापनेच्या आत आणि बाहेर पुरेशा प्रमाणात खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करावे लागतील. जर हॉटेल परिसरात कोणताही अनुचित प्रकार किंवा गुन्हा घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आस्थापनाधारकाची असेल आणि त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच, ही वाढीव वेळेची सवलत केवळ बंदिस्त जागा किंवा इमारतींमधील आस्थापनांसाठीच लागू असेल. या काळात ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) कायदा आणि नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच ध्वनीवर्धक यंत्रांचा वापर करावा लागेल. स्थानिक पोलीस प्रशासनाला परिस्थितीनुसार सार्वजनिक शांतता राखण्यासाठी या वेळेच्या शिथिलतेबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे किंवा ती नाकारण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले असून, राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.











