राजापूर: पन्हाळे परिसरात सापडले अश्मयुगीन चार फूट उंच मानवाकृती कातळशिल्प

   Follow us on        

राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. तालुक्यातल्या पन्हाळे तर्फे सौंदळ येथील पन्हाळे माळवाडी परिसरातील जांभ्या दगडाच्या विस्तीर्ण सड्यावर अश्मयुगीन (प्रागैतिहासिक) कालखंडाशी संबंधित एक वैशिष्ट्यपूर्ण मानवाकृती कातळशिल्प (Petroglyph) शोधण्यात यश आले आहे. इतिहास अभ्यासक तथा पत्रकार विनोद पवार यांनी हा अभूतपूर्व शोध लावला असून, यामुळे राजापूर तालुक्याच्या समृद्ध प्रागैतिहासिक ऐतिहासिक वारशात आणखी एका महत्त्वपूर्ण स्थळाची मोलाची भर पडली आहे.

​आढळून आलेले हे कातळशिल्प सुमारे चार फूट उंच आणि तीन फूट रुंद आकाराचे असून, ते एका मानवाकृतीच्या स्वरूपात आहे. या आकृतीचे दोन्ही हात बाजूला पसरलेल्या अवस्थेत कातळात कोरलेले असून, दगडात अंदाजे एक इंच खोलीपर्यंत हे खोदकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दुरून पाहिल्यास एखाद्या व्यक्तीची हुबेहूब सावलीच कातळावर उमटली असल्याचा अनोखा भास या आकृतीमुळे होतो. प्राथमिक शोध लागल्यानंतर या परिसराची पद्धतशीर पाहणी, स्वच्छता आणि प्राथमिक दस्तऐवजीकरण (Documentation) करण्यात आले. या संशोधन मोहिमेमध्ये विनोद पवार यांना स्थानिक इतिहासप्रेमी पराग पारकर, वरद पवार, वरुण जाधव, यश इंगळे आणि समर्थ आबवले यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

​कोकणच्या किनारपट्टीवर आढळणारी कातळशिल्पे ही प्रागैतिहासिक मानवाच्या जीवनशैली, त्यांच्या तत्कालीन श्रद्धा आणि आदिम ज्ञानपरंपरेची जिवंत साक्ष देणारी मानली जातात. पन्हाळे तर्फे सौंदळ येथे मिळालेली ही मानवाकृती देखील अशाच एका प्राचीन मानवी संस्कृतीच्या वारशाचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या नवीन स्थळाचा पुरातत्त्वीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास होण्याची नितांत आवश्यकता व्यक्त होत आहे. इतिहासप्रेमी आणि संशोधकांनी या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन व्यापक संशोधन करावे, तसेच शासनाच्या पुरातत्त्व व सांस्कृतिक विभागाने या प्राचीन अश्मयुगीन वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी रास्त अपेक्षा आता कोकणातील इतिहास वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

पुणे-मिरज मार्गावर तब्बल २१ दिवसांचा मेगाब्लॉक; वंदेभारत एक्सप्रेससह अन्य गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

पुणे: मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुपदरीकरण (Doubling Project) प्रकल्पांतर्गत ‘निरा यार्डाच्या’ नूतनीकरणाचे काम आणि इतर अत्यंत आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मध्य रेल्वेने तब्बल २१ दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. हा ‘प्री-नॉन्-इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन्-इंटरलॉकिंग’ ब्लॉक ५ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत घेतला जात आहे. रेल्वे सुरक्षा आणि आधुनिकीकरणाच्या या कामांमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

​या ब्लॉकचा सर्वाधिक फटका हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बसणार आहे. १९ जून रोजी धावणारी हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस केवळ सातारा स्टेशनपर्यंतच चालवली जाईल. या दिवशी सातारा ते पुणे दरम्यानची वंदे भारतची सेवा पूर्णपणे रद्द राहणार आहे. याशिवाय, २४ जून रोजी सुटणारी हजरत निजामुद्दीन-वास्को एक्सप्रेस तिच्या नियमित मार्गावरून न धावता, मनमाड-दौंड-कुर्डूवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने चालवली जाणार आहे.

​या २१ दिवसांच्या कालावधीत अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत. यामध्ये बेंगळुरू-एलटीटी मुंबई एक्सप्रेस आणि मैसूर-अजमेर एक्सप्रेस यांसह अनेक प्रमुख ट्रेनचा समावेश आहे, ज्यांना वेगवेगळ्या तारखांना विलंबाचा (Delays) सामना करावा लागेल. या काळात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अधिकृत रेल्वे माध्यमांवरून आणि चॅनेल्सवरून अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box

राज्याला रेल्वे फाटकमुक्त करण्याचा निर्धार; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘महारेल’ची उच्चस्तरीय बैठक

   Follow us on        

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात ‘महारेल’ संदर्भात महत्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) मार्फत राबविण्यात येणाऱ्या एकूण १३१ रेल्वे प्रकल्पांपैकी पहिल्या टप्प्यातील ६५ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्याला रेल्वे फाटकमुक्त करण्याच्या उद्देशाने हे प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यामुळे रेल्वे सुरक्षितता वाढणार आहे आणि वाढत्या शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले की, मान्यता दिलेल्या ६५ प्रकल्पांमधील उच्च-घनता (हाय ट्रॅफिक) मार्गावरील कामांना प्राधान्य द्यावे. विशेषत: ज्या रस्त्यांवर २५ हजार ते १ लाख ट्रेन व्हेईकल युनिट (टीव्हीयू) दररोज वाहतूक होते, अशा मार्गांवर किमान भूसंपादन करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. वाढत्या शहरीकरणामुळे शहरांमध्ये ८० रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प नियोजित करण्यात आले असून, या प्रकल्पांसाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने विशेष समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीत महारेलने कामांचे प्राधान्यक्रमानुसार टप्पे पाडून अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. पायाभूत सुविधांच्या कामांसाठी HUDCO (हुडको) कडून कर्ज उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, महारेल या महामंडळाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आणण्यासाठी कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. महारेलमार्फत पूर्ण झालेल्या कामांचे देयक राज्य शासनाकडून तातडीने अदा करण्याचीही सूचना करण्यात आली.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रसाद लाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, हुडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय कुलश्रेष्ठ, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, सचिव (नियोजन) शैला ए आदी उपस्थित होते. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी बैठकीत प्रकल्पांबाबत सविस्तर सादरीकरण केले.या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा विकासाला मोठी गती मिळणार असून, नागरिकांना सुरक्षित आणि सुसूत्रित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. राज्य सरकार रेल्वे क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यातून दिसून येते.

 

 

Facebook Comments Box

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये! मान्सून दाखल पण…

   Follow us on        

मुंबई, दि. ८: मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.

विजांच्या कडकडाटावेळी झाड, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.

Facebook Comments Box

‘फ्लाय९१’ च्या दोन मार्गावरील विमानसेवा तीन महिन्यांसाठी बंद! कारण काय?

   Follow us on        

गोवा: सोलापूर, गोवा आणि परिसरातील हवाई प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रादेशिक विमान वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘फ्लाय९१’ (Fly91) या विमान कंपनीने आगामी २० जूनपासून सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद या दोन्ही मार्गांवरील आपली विमान सेवा पुढील तीन महिन्यांसाठी तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

मॉन्सूनच्या काळात सोलापूर विमानतळावर वारंवार कमी होणारी दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) आणि रात्रीच्या वेळी विमानांच्या सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या पुरेशा सुविधांचा अभाव, या मुख्य तांत्रिक कारणांमुळे कंपनीने सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

​गेल्या वर्षी सुरू झालेल्या या प्रादेशिक उड्डाणांना सोलापूरसह लातूर, धाराशिव आणि शेजारील जिल्ह्यांतील प्रवाशांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र, पावसाळ्यात खराब वातावरणामुळे उड्डाणांमध्ये वारंवार येणारा व्यत्यय आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही सेवा काही काळासाठी थांबवण्यात येत आहे.

फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थगिती केवळ तात्पुरती असून, ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर महिन्यापासून या दोन्ही मार्गांवरील उड्डाणे पुन्हा पूर्ववत नियमित सुरू केली जातील. या काळात प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवर तपासणी करून पर्यायी व्यवस्था करावी, असे आवाहन विमान कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

राज्यभर प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर १९५ धाडी; १९२ जणांना अटक

   Follow us on        

मुंबई, दि. ७ : राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. 1 ते 5 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यभर १९५ धाडी टाकण्यात आल्या असून या कारवाईत 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय न्याय संहिताचे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३०(२) (a) आणि कलम ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेत 3 जून 2026 रोजी सोनगीर, जि. धुळे येथे टाकण्यात आलेल्या धाडीत 23 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

4 जून 2026 रोजी समृद्धी महामार्गावर सावंगी टोल नाका येथे करण्यात आलेल्या कारवाईत 60 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन तर नांदेड येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत 17 लाख 52 हजार 450 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन जप्त करण्यात आले. तसेच मोशी, पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आलेल्या कारवाईत 6 लाख 19 हजार 982 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करून सहा व्यक्तींविरुद्ध चिखली, पिंपरी-चिंचवड या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 जून 2026 रोजी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या कारवाईत 1 कोटी 2 लाख 67 हजार 263 रुपये किंमतीचा साठा परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव येथे जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात 30 धाडीमध्ये 3 लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 30 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पुणे क्षेत्रात 79 धाडीमध्ये 8 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 78 व्यक्तींना अटक केली आहे, असे सह आयुक्त (अन्न) महेश ना. चौधरी यांनी कळविले आहे.

Facebook Comments Box

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मान्सूनपूर्व ‘जंगल सफारी’चे आयोजन; निसर्गप्रेमींसाठी सुवर्णसंधी!

   Follow us on        

मुंबई: मुंबईकर सध्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असताना, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने (SGNP) निसर्गप्रेमींसाठी खास मान्सूनपूर्व जंगल सफारीचे (निसर्गभ्रमंती) आयोजन केले आहे. उद्यानातील निसर्ग व्याख्या केंद्राने जून २०२६ या महिन्यात विविध विशेष निसर्गभ्रमंती मोहिमा आखल्या असून, वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार, ट्रॅकर्स आणि कुटुंबांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून काही काळ दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

​हजारो हेक्टर परिसरात पसरलेल्या या उद्यानात समृद्ध वनस्पती, प्राणीसंपदा, दाट जंगले, प्राचीन लेणी आणि विविध पक्षी-फुलपाखरांचा वास्तव्य आहे. पावसाळ्यापूर्वी जंगल हिरवाईने बहरत असतानाचा हा काळ निसर्गभ्रमंतीसाठी सर्वोत्तम मानला जातो.

​निसर्गभ्रमंतीचे प्रमुख मार्ग (Trails)

​या उपक्रमांतर्गत उद्यानात खालील ६ वेगवेगळ्या मार्गांवरून सफारी आयोजित केली जाईल:

​कान्हेरी लेणी ते गायमुख: इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असणारा हा मार्ग आहे. प्राचीन कान्हेरी लेणी आणि निसर्गरम्य गायमुख परिसराला जोडणाऱ्या वनमार्गातून ही भ्रमंती होते.

​बांबू हट ते गायमुख: शांत आणि निवांत जंगलभ्रमंतीचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा मार्ग योग्य असून, दाट बांबूच्या जंगलातून जाणारा हा ट्रेल निसर्गाचा एक वेगळाच अनुभव देतो.

​ठाकूरपाडा: हा तुलनेने कमी परिचित मार्ग असून, याद्वारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विविध परिसंस्था आणि नैसर्गिक भूभागांची जवळून ओळख होते.

​शिलॉन्डा: उद्यानातील सर्वाधिक लोकप्रिय ट्रेल्सपैकी हा एक असून, दाट हिरवळ, समृद्ध जैवविविधता आणि अत्यंत शांत वातावरणासाठी तो ओळखला जातो.

​मालाड ट्रेल: पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या पश्चिम भागातील पर्यावरणीय समृद्धी या मार्गावर अनुभवता येते.

​काशीमिरा: या मार्गावर जंगलातील नैसर्गिक अधिवासात विविध वनस्पती आणि प्राण्यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळते.

दिनांक आणि वेळ

​कालावधी: जून २०२६ महिन्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवार.

​वेळ: सर्व सहभागींनी सकाळी ६:४५ वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरीवली येथील मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

​नोंदणी शुल्क आणि सुविधा

​या निसर्गभ्रमंतीसाठी प्रति व्यक्ती सहभाग शुल्क १,००० रुपये आहे. या शुल्कामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:

​SGNP प्रवेश तिकीट

​निसर्गभ्रमंतीसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या

​उद्यानातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था

​सकाळचा नाश्ता

​एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह

​तज्ज्ञ निसर्गतज्ज्ञ मार्गदर्शकाची सेवा

​रजिस्ट्रेशन कसे कराल?

​व्हॉट्सॲप नोंदणी: इच्छुकांनी +91 ८६५५२ ०२९०३ या क्रमांकावर मेसेज पाठवून आपली नोंदणी पूर्ण करावी.

​ई-मेल संपर्क: अधिक माहितीसाठी तुम्ही [email protected] या ई-मेलवर संपर्क साधू शकता.

​मदत वेळ: नोंदणी संदर्भातील माहिती किंवा मदतीसाठी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत संपर्क साधावा.

Facebook Comments Box

​‘मांडवी एक्सप्रेस’चा २७ वा वाढदिवस उत्साहात साजरा!

   Follow us on        

मडगाव:

कोकण किनारपट्टीच्या निसर्गरम्य मार्गावरून धावणारी आणि लाखो प्रवाशांच्या गळ्यातील ताईत बनलेली ‘मांडवी एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १०१०३/१०१०४) ७ जून २०२६ रोजी आपल्या सेवेची यशस्वी २७ वर्षे पूर्ण करून २८ व्या वर्षात प्रविष्ट झाली आहे. मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या या ऐतिहासिक गाडीचा वर्धापन दिन कोकण रेल्वेचे अधिकारी, प्रवासी संघटना आणि रेल्वेप्रेमींच्या (रेलफॅन्स) उपस्थितीत अत्यंत उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

​मडगाव स्थानकावर रेल्वेप्रेमींचा उत्साह

​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण मडगाव स्थानकावर पाहायला मिळाले. रविवार, ७ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ‘रेलफॅन क्लब’ आणि विविध प्रवासी संघटनांच्या वतीने येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला (लोकोमोटिव्ह) फुलांच्या सुंदर माळा, केळीची पाने आणि ‘२७ वर्षे’ अशा सुशोभित फलकांनी आकर्षकपणे सजवण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रेल्वेप्रेमी आणि प्रवाशांच्या एका मोठ्या समूहाने स्थानकावर एकत्र येत गाडीसमोर सामूहिक छायाचित्रे (ग्रुप फोटोज) काढून हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

​रत्नागिरीत धावत्या प्रवासात छोटेखानी सोहळा

​मडगावप्रमाणेच रत्नागिरी स्थानकावरही या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. रेल्वे प्रवाशांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने गाडीच्या नियोजित थांब्यादरम्यान इंजिनजवळ एक छोटेखानी केक कापण्याचा सोहळा पार पडला. रेल्वेच्या वाहतुकीला आणि वेळापत्रकाला कोणताही अडथळा किंवा विलंब न आणता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबवण्यात आल्यामुळे रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

​२७ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास:

७ जून १९९९ रोजी सुरू झालेल्या मांडवी एक्सप्रेसने गेल्या २७ वर्षांत मुंबई, कोकण आणि गोवा यांना जोडण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. कोकणातील निसर्गरम्य दृश्ये खिडकीतून अनुभवण्यासाठी पर्यटकांची ही नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. या दीर्घ कालावधीत लाखो प्रवाशांना सुखद आणि स्मरणीय प्रवास देण्यासोबतच, कोकणच्या प्रादेशिक व आर्थिक विकासात आणि पर्यटनाला चालना देण्यात मांडवी एक्सप्रेसचे योगदान अतुलनीय आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

Facebook Comments Box

Konkan Railway: उद्याची जनशताब्दी एक्सप्रेस थिवीपर्यंतच

   Follow us on        

Konkan Railway: ​कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस थिवीम स्थानकावर ‘शॉर्ट टर्मिनेट’ (अंशतः रद्द) आणि ‘शॉर्ट ओरिजिनेट’ केली जाणार आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या तात्पुरत्या बदलाची माहिती दिली आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी ट्रेन क्रमांक १२०५१ मुंबई CSMT – मडगाव जं. जनशताब्दी एक्सप्रेस ही मडगावपर्यंत न जाता थिवीम स्थानकावरच आपली सेवा समाप्त करेल. त्यामुळे ही गाडी थिवीम ते मडगाव जंक्शन दरम्यान अंशतः रद्द राहील. याचप्रमाणे, परतीच्या प्रवासातील ट्रेन क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT जनशताब्दी एक्सप्रेस ही मडगावऐवजी थेट थिवीम स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेनुसार मुंबईसाठी मार्गस्थ होईल. म्हणजेच, ही गाडी मडगाव ते थिवीम स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

​या बदलांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित मार्गावरील प्रवाशांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊनच आपला प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेमार्फत करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती व अपडेट्ससाठी प्रवाशांना ‘केआर मिरर’ (KR Mirror) ॲप डाउनलोड करण्याचे सुचवण्यात आले आहे.

Facebook Comments Box

वातानुकूलित लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत भर

   Follow us on        

मुंबई: मे महिन्यात मुंबईमध्ये प्रचंड उकाडा आणि तीव्र उष्णता जाणवत असल्यामुळे मुंबईकरांनी गारेगार प्रवासासाठी वातानुकूलित (AC) लोकल गाड्यांना मोठी पसंती दिली आहे. प्रवाशांच्या या उदंड प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल मधील प्रवासी संख्या आणि दैनंदिन महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ११ मे २०२६ रोजी एकाच दिवसात तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त तिकीट आणि पास विक्रीची ऐतिहासिक नोंद झाली असून हा पश्चिम रेल्वेच्या इतिहासातील एक नवा विक्रम ठरला आहे.

​११ मे २०२६ रोजी वातानुकूलित लोकलसाठी एकूण ५० हजार ६६३ तिकीट आणि पासेसची विक्री झाली. या एकाच दिवसाच्या प्रवासातून रेल्वे प्रशासनाला १ कोटी ६० लाख ५८ हजार ८९५ रुपये इतका विक्रमी महसूल मिळाला. यापूर्वी, ४ मे २०२६ रोजी देखील ४७ हजार ४७५ तिकीट आणि पासची विक्री झाली होती, ज्यातून रेल्वेला १ कोटी ६० लाख २१ हजार २४० रुपये महसूल मिळाला होता.

​महिनाभरात ५८ लाख ८९ हजार जणांचा प्रवास:

मुंबईतील तीव्र उष्णतेमुळे एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात एसी लोकल मधील गर्दीत मोठी वाढ झाली. १ ते ३१ मे २०२६ या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ५८ लाख ८९ हजार ७३७ प्रवाशांनी वातानुकूलित लोकल मधून प्रवास केला. या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेला २८ कोटी १० लाख ८१ हजार ९५५ रुपये इतका मोठा महसूल मिळाला आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या (२०२५ च्या) मे महिन्याच्या तुलनेत २८.६७ टक्क्यांनी अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

​प्रवाशांचा हा वाढता प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेता येत्या काळात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या आणखी वाढवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज १४५ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवल्या जातात, तर शनिवार आणि रविवारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ११८ फेऱ्या चालवल्या जातात.

​पाच महिन्यांत १११ कोटींचा महसूल:

दुसरीकडे, चालू वर्षातील दीर्घकालीन आकडेवारीचा विचार केला असता, जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत वातानुकूलित लोकलसाठी एकूण ५२ लाख ४६ हजार ३६७ तिकीट आणि पासेसची विक्री झाली आहे. यातून पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत तब्बल १११ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच जानेवारी ते मे २०२५ या समान कालावधीत ४० लाख ७७ हजार २९४ तिकीट आणि पास विक्रीतून ९७ कोटी रुपये महसूल मिळाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्या आणि महसूल या दोन्हीत कमालीची वाढ झाली आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search