म्हाडामध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; २६ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

   Follow us on        

मुंबई:

महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या ‘महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळा’तर्फे (Maha Housing Corporation) विविध पदांसाठी कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महामंडळामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर, नागपूर, बारामती येथे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत असून, आगामी काळात राज्यातील विविध ठिकाणी नवीन प्रकल्प नियोजित आहेत. या पार्श्वभूमीवर पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

१. पदांचा तपशील आणि एकूण संख्या:

महामंडळातील एकूण ३३ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:

  • ​संचालक (तांत्रिक) – ०१ पद
  • ​संचालक (लेखा व वित्त) – ०१ पद
  • ​कनिष्ठ अधिकारी (जमीन) (नायब तहसीलदार) – ०१ पद
  • ​सहाय्यक / कनिष्ठ अधिकारी (प्रशासन / जमीन) – ०२ पदे
  • ​कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – ०१ पद
  • ​उपअभियंता (स्थापत्य) – ०१ पद
  • ​कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ०७ पदे
  • ​कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ०१ पद
  • ​सहाय्यक नगररचनाकार – ०१ पद
  • ​वास्तुविशारद – ०१ पद
  • ​आरेखक (Draftsman) – ०१ पद
  • ​लेखाधिकारी – ०१ पद
  • ​सहाय्यक विपणन अधिकारी – ०१ पद
  • ​लिपिक-टंकलेखक – ०८ पदे
  • ​शिपाई – ०५ पदे

२. नियुक्तीचे स्वरूप व कालावधी:

  • सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी: शासकीय कार्यालये, शासकीय उपक्रम, संविधिक संस्था, मंडळे, महामंडळे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात १ वर्षाच्या कालावधीकरिता पदे भरली जातील.
  • खाजगी क्षेत्रातील उमेदवार: खाजगी क्षेत्रातून प्राप्त अर्जांमधून पात्रता व अनुभवाच्या आधारे कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या कालावधीकरिता नियुक्ती केली जाईल.

३. अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, आपल्या आवश्यक शैक्षणिक व अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह दि. २६.०७.२०२६ पर्यंत जाहिरातीत नमूद पत्त्यावर (३रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१) किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावे.

४. मानधन आणि अधिकृत संकेतस्थळ:

उमेदवारांची गुणवत्ता व अनुभव विचारात घेऊन दरमहा ठोक पारिश्रमिक (मानधन) निश्चित करण्याचे अधिकार महामंडळास राहतील. या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती, पात्रता निकष, अटी व शर्ती तसेच अर्जाचा विहित नमुना https://mahahousing.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Facebook Comments Box

बाजारपेठांत नैसर्गिक अळंब्यांचे आगमन; किंमत ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ!

सिंधुदुर्ग/गोवा :

पावसाने काहीशी विश्रांती घेताच तळकोकणात आणि गोव्यात जंगलातील वारुळांवर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या चवदार ‘अळंब्यांची’ (रानमशरूम) वेध लागतात. या हंगामातील अळंब्यांचे गोव्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बाजारपेठेत जोरदार आगमन झाले आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात या अळंब्यांचे दर गगनाला भिडले असून, अवघ्या १०० अळंब्यांसाठी ग्राहकांना तब्बल १५०० रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातून विक्रीसाठी आणलेली ही अळंबी महाग असली, तरी त्यांच्या खरेदीसाठी खवय्यांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

​साधारणपणे पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात निर्माण होणाऱ्या उकाड्यामुळे वारुळांवर ही अळंबी नैसर्गिकरित्या उगवतात. ठराविक आकाराची झाली की स्थानिक लोक ती शोधून बाजारात विक्रीसाठी आणतात. साखळी आणि डिचोली भागात प्रामुख्याने ही अळंबी मोठ्या प्रमाणात मिळतात. पूर्वी ही अळंबी नगाप्रमाणे किंवा विशिष्ट संख्येने विकली जायची, परंतु आता बाजारात त्यांची विक्री ‘वाट्यांच्या’ (हिश्श्यांच्या) स्वरूपात केली जात आहे. एका वाट्यात नेमकी किती अळंबी आहेत याचा अंदाज येत नसला, तरी विक्रेते त्याचे ठरलेले पैसे मात्र एक रुपयाही कमी न करता वसूल करत आहेत.

निसर्गाकडून मिळणाऱ्या या रानमेव्याची चव प्रत्येक गोमंतकीयाला हवीहवीशी वाटते. अत्यंत चवदार असल्यामुळे अळंबी सर्वांचीच आवडती असतात, म्हणूनच महाग असूनही लोक वर्षातून एकदा तरी ती आवर्जून खरेदी करतात. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे आणि कडक ऊन पडल्यामुळे अळंब्यांचे पीक चांगले आले असले, तरी वाढत्या महागाईमुळे ते सामान्य लोकांच्या बजेटबाहेर गेले आहे. येत्या काही दिवसांत बाजारात अळंब्यांची आवक वाढेल आणि त्यानंतर त्यांचे दर कमी होतील, अशी आशा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडीत धर्मप्रचार करण्याचा प्रयत्न; गोव्यातील मिशनरी जेरबंद

   Follow us on        

सावंतवाडी:

येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या धर्माचा प्रचार आणि शिकवण देणाऱ्या काही मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा प्रकार सुरू होता. हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, प्राथमिक तपासात हे मिशनरी गोवा राज्यातील असल्याचे समोर आले आहे. विशिष्ट उद्देशाने (मिशन) आपण हा प्रचार करत होतो, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.

​बजरंग दलाची सतर्कता अन् कारवाई

उद्यानात कॉलेजच्या सुट्टीदरम्यान हा प्रकार घडत असताना, एका जागृत विद्यार्थ्याने या प्रकरणाची माहिती फोनवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिली. तसेच या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. स्वतःचे चित्रीकरण होत असल्याचे पाहून मिशनरींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून जाब विचारला असता, आपण विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत असल्याचे त्यांनी कबूल केले.

​नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलीस ठाण्यात त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाविद्यालयीन तरुण आणि नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषांना किंवा धार्मिक प्रचाराला बळी पडू नये, तसेच असा संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासन किंवा हिंदू संघटनांशी संपर्क साधावा, असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

मेट्रो १४ प्रकल्पाला गती! बदलापूर-कांजूरमार्ग मार्गिका टप्प्याटप्प्याने उभारणार, ठाणे खाडीखालून धावणार मेट्रो

   Follow us on        

ठाणे/बदलापूर:

मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही काळापासून रखडलेल्या मेट्रो १४ (बदलापूर ते कांजूरमार्ग) प्रकल्पाला आता पुन्हा एकदा वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महत्त्वाकांक्षी मार्गिकेची अंमलबजावणी आता टप्प्याटप्प्याने (Phase-wise) करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. सुमारे १८,००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, यामुळे पूर्व उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि थेट बदलापूरपर्यंतचा प्रवास वेगवान आणि सुलभ होणार आहे.

प्रकल्प आता ‘ईपीसी’ (EPC) मॉडेलवर होणार?

​यापूर्वी हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच ‘पीपीपी’ (PPP) तत्त्वावर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्याला कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता हा प्रकल्प इंजिनियरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन (EPC) म्हणजेच अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पद्धतीने राबवण्याचा नवीन पर्याय प्रशासनाने पुढे आणला आहे.

प्रकल्पाचे टप्पे कसे असणार?

​पहिला टप्पा (शीळफाटा ते बदलापूर): पहिल्या टप्प्यात शीळफाटा ते बदलापूर दरम्यान सुमारे २५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग विकसित केला जाईल. या मार्गाचा काही भाग मेट्रो १२ अ मार्गिकेसोबत समांतर असणार आहे.

​दुसरा टप्पा (शीळफाटा ते कांजूरमार्ग): दुसऱ्या टप्प्यात मेट्रो कांजूरमार्गपर्यंत जोडली जाईल. मात्र, यासाठी ठाणे खाडीखालून भुयारी मार्ग (Under-creek Tunnel) तयार करावा लागणार आहे. पर्यावरणीय मंजुरी आणि तांत्रिक आव्हानांमुळे या टप्प्यासाठी प्रवाशांना थोडी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

​चिखलोलीत साकारणार ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’

​या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चिखलोली येथे एक भव्य आणि एकात्मिक वाहतूक केंद्र (Integrated Transport Hub) उभारण्याची योजना आहे. या ठिकाणी:

१. मध्य रेल्वेची लोकल सेवा

२. मेट्रो ५ आणि मेट्रो १४

३. रस्ते वाहतूक

या तिन्हींची एकत्र जोडणी केली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना एका वाहनातून दुसऱ्या वाहनात प्रवास करणे अगदी सोपे होईल.

सल्लागार नियुक्ती अंतिम टप्प्यात

​मेट्रो १४ च्या या ४३ किलोमीटरच्या प्रवासात कांजूरमार्ग, घणसोली, महापे, शीळफाटा, निळजे आणि बदलापूर ही महत्त्वाची स्थानके असतील. या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता, प्रवाशांची संभाव्य संख्या आणि तांत्रिक बाजूंचा नव्याने अभ्यास करण्यासाठी सल्लागार समिती (Consultant) नेमण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर प्रकल्पाचा अंतिम आराखडा निश्चित केला जाईल.

​प्रवाशांना फायदा: बदलापूर, निळजे, घणसोली, महापे आणि शीळफाटा या वेगाने विकसित होणाऱ्या भागांतील लाखो चाकरमान्यांना या मेट्रोमुळे थेट आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे.

Facebook Comments Box

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळवणे सोपे होणार; मच्छिमारांना दिले जाणार सॅटेलाईट फोन!

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये किनाऱ्याशी सातत्याने संपर्क साधता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने मच्छिमारांना हवामान बदलाची माहिती मिळणे किंवा आपत्कालीन मदत मिळवणे कठीण होते. या समस्येचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून, मच्छिमारांना ‘बीएसएनएल ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस’ (GSPS) उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

​या संदर्भात माहिती देताना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील मच्छिमारांचे प्राण आणि त्यांची उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सॅटेलाईट फोनच्या सुविधेमुळे दुर्गम भागातही सातत्यपूर्ण संपर्क व्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे खराब हवामान, यांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या काळात तात्काळ बचावकार्य राबवणे शक्य होणार आहे.

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत तंत्रज्ञानाची कार्यपद्धती, उपकरणांची वैशिष्ट्ये आणि कव्हरेजचे सादरीकरण केले. राज्य शासनाच्या ‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणांतर्गत ही अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था कार्यान्वित झाल्यास राज्यातील खोल समुद्रात काम करणाऱ्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार असून, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मत्स्यव्यवसाय अधिक आधुनिक व सुरक्षित होण्यास मदत होईल.

Facebook Comments Box

जोगेश्वरी जंक्शनवरून जानेवारी २०२७ पासून सुटणार बाहेरगावासाठी गाड्या

   Follow us on        

मुंबई:

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पाण्डेय यांच्यात रेल्वेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, जोगेश्वरी जंक्शनच्या कामाला मोठी गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून महाराष्ट्रासह इतर राज्यांत जाणाऱ्या गाड्यांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणाऱ्या जोगेश्वरी जंक्शनचे काम सध्या वेगाने सुरू असून, जानेवारी २०२७ पासून येथून बाहेरगावासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात येतील, असे आश्वासन महाव्यवस्थापक रामाश्रय पाण्डेय यांनी दिले. या जंक्शनचा विकास ‘आधुनिक मल्टीमोडल ट्रान्झिट हब’ म्हणून केला जात असून, रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक साधनांची जोडणी केली जाईल. पहिल्या टप्प्यात कार आणि दुचाकी पार्किंगची सोय असेल, तर आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या शक्य झाल्यास दुसऱ्या टप्प्यात येथे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हॉटेल आणि मॉलची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

​याच बैठकीत उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवणाऱ्या गोरेगाव ते बोरीवली हार्बर लाईन विस्तार प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. ७.०८ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ८९८.२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, हे काम मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वेचा संकल्प आहे. या विस्तारीकरणादरम्यान गोरेगाव स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची सुविधा करण्यात आली आहे. तसेच, बांद्रा ते अंधेरी दरम्यानच्या धीम्या मार्गावरील स्थानकांच्या लांबीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, जानेवारी २०२७ पासून या मार्गावरून १५ डब्यांच्या गाड्या धावू शकतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी अंधेरी आणि जोगेश्वरी स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत. अंधेरी स्थानकावर ऑक्टोबर २०२६ पर्यंत १ नवीन लिफ्ट सुरू होईल, तर जून २०२७ पर्यंत आणखी २ सरकते जिने (एस्केलेटर) बसवले जातील. जोगेश्वरी स्थानकावरही जून २०२७ पर्यंत १ अतिरिक्त सरकता जिना कार्यान्वित केला जाईल, ज्याला मार्च २०२६ मध्ये मंजुरी मिळाली आहे. याशिवाय, स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सुभाष नगर फूट ओव्हर ब्रिजवरील एस्केलेटरचे कामही जून २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

​रेल्वे स्थानकांवरील इतर सोयी-सुविधांबाबत चर्चा करताना, स्थानकांवर स्वच्छता, वेटिंग रूम आणि स्तनपान कक्ष बांधण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या खासदार निधीतून मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. सद्यस्थितीत देशासाठी १३९ ही एकमेव हेल्पलाइन कार्यरत असून, त्याद्वारे तक्रारींचे निवारण केले जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. सुरक्षेच्या दृष्टीने, आरपीएफ जवानांच्या ४८५ जागा रिक्त असल्या तरी उपलब्ध जवानांच्या माध्यमातून प्रवाशांना व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा पुरवली जात आहे. आरोग्य सुविधेचा भाग म्हणून अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांवर राज्य शासनाची रुग्णवाहिका तैनात असून, जोगेश्वरी स्थानकावरही अशी सेवा सुरू करण्याचा विचार आहे. दरम्यान, खासदार वायकर यांनी अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांनी वेळ दिल्यास तात्काळ ही पाहणी केली जाईल, असे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले आहे. या बैठकीला डीजीएम (जी) उज्ज्वल देव, सचिव सचिन शर्मा, उपनेते दिलीप शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

Facebook Comments Box

शक्तीपीठ महामार्ग संबंधित शंका निरसन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे ‘सह्याद्री’ वाहिनीवर प्रसारण

   Follow us on        

वर्धा / सिंधुदुर्ग:

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वी वर्धा येथे अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘शक्तीपीठ महामार्ग शेतकरी संवाद’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या संवाद कार्यक्रमात महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. मिश्रा सर, वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महामंडळाचे मुख्य अभियंता यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसन केले. या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार, १५ जुलै २०२६ आणि गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता ‘दूरदर्शन सह्याद्री’ वाहिनीवर करण्यात येत आहे. महामार्गाबाबतची अधिकृत माहिती आणि शासकीय भूमिका समजून घेण्यासाठी सर्व नागरिकांनी व विशेषतः शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​हा महामार्ग ज्या गावांतून जात आहे, त्या सर्व गावांमधील संबंधित शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, फुकेरी, झोळंबे तसेच सावंतवाडी तालुक्यातील केगद, उडेली, नेने, फणसवडे, डेगवे, बांदा, घारपी, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव आणि पडवे या गावांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित गावांमधील स्थानिक सुजाण नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना हा संवाद कार्यक्रम पाहण्याची विनंती करावी, जेणेकरून थेट प्रशासनाकडून मिळणारी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल.

Facebook Comments Box

परेल-सीएसएमटी जलद लोकल मार्गिका जमिनी खालून नेणार?

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका प्रकल्पात रेल्वे प्रशासनाकडून मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. दक्षिण मुंबईतील जागेची टंचाई, दाट लोकवस्ती आणि जवळपास ५५० प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान लक्षात घेता, आता परळ ते सीएसएमटी दरम्यानची जलद उपनगरी (लोकल) मार्गिका थेट भूमिगत करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार, भायखळा हे एकमेव स्थानक भूमिगत केले जाण्याची शक्यता असून मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) सध्या या पर्यायाची व्यवहार्यता तपासण्यासाठी सर्वेक्षण करत आहे. या तांत्रिक अभ्यासासाठी जपानच्या ‘पाडेको’ (PADECO) या नामांकित अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

​या १७.५ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील कुर्ला ते परळ (१०.१ किमी) या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे, मात्र परळ ते सीएसएमटी (७.४ किमी) या दुसऱ्या टप्प्यातील काम जागेच्या अनुपलब्धतेमुळे रखडले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित जागेत केवळ एकच अतिरिक्त मार्गिका उभारणे शक्य आहे. त्यामुळे नव्या नियोजनानुसार, विद्यमान तिसरी आणि चौथी जलद मार्गिका दादरपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी राखीव ठेवली जाईल आणि जलद लोकल मार्गिका भूमिगत केली जाईल. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी लोकल वाहतुकीचे अधिक प्रभावी विभाजन करणे शक्य होणार आहे.

​मेल-एक्स्प्रेस गाड्या जड असल्याने त्यांना तीव्र चढ-उतारांवरून धावणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते, तर लोकल गाड्यांमध्ये मल्टिपल मोटर डबे असल्याने त्या तीव्र चढ सहज पार करू शकतात; म्हणूनच लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी केवळ लोकल मार्गिकाच भूमिगत करणे तांत्रिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य मानले जात आहे. भूसंपादनाचा तिढा सुटण्यास यामुळे मदत होणार असली, तरी जलद मार्गिका भूमिगत केल्यास या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च मूळ अंदाजाच्या तुलनेत थेट अडीच ते तीन पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सल्लागार कंपनीचा अंतिम आराखडा आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Facebook Comments Box

Mumbai Local: एसी लोकलची एसी बंद पडल्याने गुदमरून प्रवासी बेशुद्ध

   Follow us on        

मुंबई:

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि रेल्वेच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ऐन गर्दीच्या (रश अवर) वेळी टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित (AC) लोकल ट्रेनमध्ये एक मोठी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ट्रेन प्रवाशांनी तुडुंब भरलेली असताना अचानक या गाडीतील एअर कंडिशनिंग (AC) यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली. यामुळे बंद डब्यांमध्ये हवेची कोंडी होऊन गुदमरल्यासारखे गंभीर वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

​सकाळच्या वेळी नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांमुळे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. अशातच अचानक थंडावा बंद झाल्याने डब्यांमधील तापमान वेगाने वाढले. हवेअभावी डब्यात असलेले शेकडो प्रवासी घामाघूम झाले. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही प्रवाशांना चक्कर आली, तर काही जण क्षणभर बेशुद्ध पडले. यामध्ये एका प्रवाशाची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या घटनेमुळे संपूर्ण ट्रेनमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

​ट्रेन मुलुंड ते कुर्ला स्थानकादरम्यान असताना प्रवाशांचा जीव गुदमरू नये आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्काळ सुरक्षेचा उपाय म्हणून एसी डब्यांची स्वयंचलित दारे उघडी ठेवून ट्रेन पुढे नेण्याचा निर्णय घेतला. अखेर ही ट्रेन कुर्ला स्थानकावर पोहोचल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुढील प्रवास रद्द केला. सर्व प्रवाशांना तेथेच उतरवून ट्रेन रिकामी करण्यात आली आणि ती तांत्रिक दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. यामुळे प्रवाशांना उतरून दुसऱ्या लोकलचा आसरा घ्यावा लागला, ज्यामुळे मध्य रेल्वेच्या इतर लोकल फेऱ्यांवरही काही काळ परिणाम झाला.

​या गंभीर प्रकारानंतर नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महागडे तिकीट किंवा पास काढल्यानंतरही प्रवाशांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. “आणीबाणीच्या प्रसंगी किंवा एसी बंद पडल्यास डब्यांमध्ये पर्यायी हवा खेळती राहण्यासाठी (Ventilation) कोणतीही सक्षम व्यवस्था का नाही?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, एसी यंत्रणा निकामी होण्यामागच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असल्याचे स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

धक्कादायक! १५ फुटी अजगराने गिळला कुत्रा आणि चार पिल्ले

   Follow us on        

दोडामार्ग:

तालुक्यातील मोर्ले गावात रविवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी पंकज गवस यांच्या मांगरात (गोठ्यात) अन्नाच्या शोधात शिरलेल्या सुमारे १५ फूट लांबीच्या एका अवाढव्य अजगराने एका कुत्र्याला आणि त्याच्या चार निष्पाप पिल्लांना जिवंत गिळल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण मोर्ले परिसरात भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले होते.

​मिळालेल्या माहितीनुसार, पंकज गवस यांच्या मांगरामध्ये नेहमीप्रमाणे एक कुत्रा आणि त्याची चार पिल्ले राहत होती. रविवारी सकाळी ही पिल्ले अचानक दिसेनाशी झाल्याने गवस यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. मांगरामध्ये शोध घेत असताना त्यांना एक भलामोठा अजगर निपचित पडलेला दिसला. त्या अजगराचे पोट कमालीचे फुगलेले होते, ज्यावरून त्याने मोठी शिकार केल्याचे स्पष्ट होत होते. अन्नाच्या शोधात आलेल्या या अजगराने कुत्रा आणि त्याच्या चारही पिल्लांना एकामागून एक गिळंकृत केले होते.

​ही बातमी वाऱ्यासारखी सबंध गावभर पसरताच, अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मांगराबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत सावधगिरी बाळगत अजगराचे सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. यानंतर त्या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुखरूप सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण असले, तरी वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search