मुंबई:भारतीय रेल्वेच्या इतिहासात महिला-केंद्रित उपनगरीय प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला गेला आहे. जगातील पहिल्या ‘लेडीज स्पेशल’ ट्रेन सेवेने आपल्या यशस्वी संचालनाची ३४ वर्षे पूर्ण केली आहेत. ५ मे १९९२ रोजी सुरू झालेली ही सेवा मुंबईतील नोकरीपेशा महिलांच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवासाच्या वाढत्या गरजेला दिलेले उत्तर होते. सुरुवातीला ही सेवा केवळ चर्चगेट ते बोरीवली दरम्यान होती, परंतु महिलांच्या प्रतिसादानंतर १९९३ मध्ये तिचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला.
१९९० च्या दशकात दक्षिण मुंबईत झालेली औद्योगिक वाढ आणि नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या वाढत्या संख्येमुळे ‘लेडीज स्पेशल’ची संकल्पना उदयास आली. या गाड्यांमुळे महिलांना गर्दीच्या वेळी नियमित लोकलच्या डब्यात चढण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कमी झाला. कालांतराने, या गाड्या केवळ प्रवासाचे साधन न राहता महिलांच्या सामाजिकीकरणाचे केंद्र बनल्या. या प्रवासात विविध वयोगटातील आणि समाजातील महिलांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले असून, अनेक प्रवाशांसाठी हा वेळ दैनंदिन अनुभव शेअर करण्याची हक्काची जागा बनली आहे.
सध्या पश्चिम रेल्वेद्वारे दररोज १० ‘लेडीज स्पेशल’ सेवा चालवल्या जातात. या सेवा सकाळ आणि संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी (Peak Hours) दोन्ही दिशांना उपलब्ध आहेत. सकाळी विरार, बोरीवली, भाईंदर आणि वसई रोड येथून चर्चगेटसाठी ६ सेवा धावतात, तर संध्याकाळी चर्चगेटवरून बोरीवली आणि विरारसाठी ४ परतीच्या सेवा उपलब्ध आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ही सेवा वरदान ठरली आहे.
गेल्या तीन दशकांत या सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. २००६ मध्ये वांद्रे यार्ड ते चर्चगेट अशी सेवा सुरू झाली होती, जिचे पुढे २०१८ मध्ये विरार-चर्चगेट सेवेत रूपांतर करण्यात आले. तसेच २०१३ मध्ये सुरू झालेल्या वांद्रे उपनगरीय सेवांचाही विस्तार २०१६ आणि २०१८ मध्ये विरारपर्यंत करण्यात आला. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील हा एक महत्त्वाचा घटक असून, तो महिलांच्या कार्यक्षेत्रातील वाढत्या सहभागाचे प्रतीक मानला जातो.











