भालावलीत जंगली हत्तीचा ‘रात्रीस खेळ चाले’; गाड्यांचे नुकसान करत उच्छाद

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सावंतवाडी  तालुक्यातील भालावल परिसरात काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका जंगली हत्तीने जोरदार एन्ट्री करत भीतीचे वातावरण निर्माण केले. या हत्तीने गावात प्रवेश केल्यानंतर आपला मोर्चा थेट उभ्या असलेल्या गाड्यांकडे वळवला.
स्थानिक रहिवासी विकास गुयेकर यांच्या गाडीचे या हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे. सुमारे अर्धा तास हा हत्ती गाडीसोबत खेळत होता; त्याने गाडी चहूबाजूंनी फिरवून अक्षरशः उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर हत्तीने आपला मोर्चा शेजारच्या बागांकडे वळवला. तिथे असलेल्या फणसाच्या झाडाला जोरात हलवून त्याने फणस पाडले आणि फस्त केले. एवढ्यावरच न थांबता, हत्ती पुन्हा परतला आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या एका गाडीचीही तोडफोड केली.
हा हत्ती आकाराने मध्यम असला तरी तो एकटाच फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हत्तीचा नेमका ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने हवेतून हत्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा हत्ती तांबोळीच्या दिशेने गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Facebook Comments Box

भारतीय रेल्वेची डिजिटल झेप; ऑनलाइन तिकीट बुकिंगचा वाटा ८८% वर

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या आरक्षण व्यवस्थेत मोठे तांत्रिक बदल करण्यात येत असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी नव्या आरक्षण प्रणालीच्या संक्रमण प्रक्रियेचा आढावा घेतला. सुमारे ४० वर्षांपासून वापरात असलेल्या जुन्या प्रणालीऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन आरक्षण प्रणाली लागू करण्यात येत आहे. या बदलादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. रेल भवन येथे झालेल्या बैठकीला रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि रवनीत सिंह बिट्टू उपस्थित होते.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, १९८६ मध्ये सुरू झालेली आरक्षण प्रणाली आता पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात आली आहे. २००२ मध्ये भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा सुरू केली होती आणि सध्या देशातील जवळपास ८८ टक्के तिकीट बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत आहे. रेल्वेचे ‘RailOne’ हे मोबाईल अ‍ॅप गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आले असून, एका वर्षातच या अ‍ॅपचे ३.५ कोटी डाउनलोड्स झाले आहेत.

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, RailOne अ‍ॅपमुळे सामान्य प्रवाशांना रेल्वेशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी मिळत असून, तिकीट बुकिंग, रद्द करणे, परतावा, लाईव्ह ट्रेन स्टेटस, कोच पोझिशन, प्लॅटफॉर्म माहिती, रेल मदत सेवा तसेच खाद्यपदार्थ ऑर्डर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, अ‍ॅपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन अंदाज सुविधा देण्यात आली असून, तिची अचूकता पूर्वीच्या ५३ टक्क्यांवरून आता ९४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे.

दररोज सुमारे ९.२९ लाख तिकीटे RailOne अ‍ॅपद्वारे बुक केली जात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली. त्यामध्ये ७.२ लाख अनारक्षित आणि २.०९ लाख आरक्षित तिकिटांचा समावेश आहे. तसेच, भारतीय रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रवासी तिकिटांवर तब्बल ६०,२३९ कोटी रुपयांची अनुदान मदत दिली असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, एखाद्या सेवेसाठी प्रत्यक्ष खर्च १०० रुपये येत असला तरी प्रवाशांकडून सरासरी फक्त ५७ रुपयेच आकारले जातात.

Facebook Comments Box

महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

   Follow us on        

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. निकालापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जाहीर केली जाईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक निकालाची प्रत ऑनलाईन पाहता येईल.

​यावर्षी राज्याच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बोर्डाने बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच दहावीचा निकाल लावून आपली ‘विक्रमी वेळेत निकाल’ लावण्याची परंपरा कायम ठेवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मदत होणार आहे.

​निकाल कुठे पाहाल?

​विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात:

​sscresult.mahahsscboard.in

​mahahsscboard.in

​results.digilocker.gov.in

​results.targetpublications.org

​results.navneet.com

Facebook Comments Box

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार १० नवीन ओपन-डेक बसेस

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट (BEST) उपक्रमाने शहराच्या पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पर्यटकांना मुंबईची ऐतिहासिक वास्तू आणि विलोभनीय समुद्रकिनाऱ्यांचा आनंद खुल्या आकाशाखाली घेता यावा, यासाठी बेस्ट लवकरच १० नवीन ओपन-डेक (खुल्या छताच्या) बसेस आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे. या बसेस प्रामुख्याने शहरातील पर्यटन स्थळांच्या सफारीसाठी वापरल्या जाणार असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मुंबईची सुंदरता जवळून अनुभवता येईल.

​सध्या मुंबईत सुरू असलेल्या ‘हेरिटेज बस’ आणि ‘ओपन-टॉप बस’ सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हेच यशस्वी मॉडेल डोळ्यासमोर ठेवून बेस्ट प्रशासनाने या नवीन १० बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. या बसेस दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि इतर प्रमुख वारसा स्थळांच्या मार्गावर चालवल्या जाण्याची शक्यता आहे. नियमित बस मार्गांच्या तुलनेत या पर्यटन बसेसमधून बेस्टला अधिक चांगला महसूल मिळत असल्याचे दिसून आले आहे.

​आर्थिक आव्हानांचा सामना करणाऱ्या बेस्ट उपक्रमासाठी ही नवी सेवा उत्पन्नाचा एक मोठा स्रोत ठरू शकते. नियमित प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यटनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे बेस्टच्या तिजोरीत भर पडण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे केवळ पर्यटकांची सोय होणार नाही, तर मुंबईच्या जागतिक पर्यटन आकर्षणात भर पडून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा बेस्ट अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लवकरच या रंगीबेरंगी आणि आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसतील.

Facebook Comments Box

रेल्वेमध्ये करिअरची मोठी संधी: ‘सहाय्यक लोको पायलट’ भरती प्रक्रियेला १५ मे पासून सुरुवात

   Follow us on        

मुंबई: भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे भरती विभागामार्फत ‘सहाय्यक लोको पायलट’ (ALP) पदासाठी २०२४ ची मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरू होत आहे. रेल्वेमध्ये आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ITI, डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगमधील पदवी (Degree) असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली असून नियमानुसार वयामध्ये सवलतही दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना उत्कृष्ट सरकारी वेतन आणि भत्ते मिळणार आहेत.

​या भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त मराठी तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघा’तर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक मराठी तरुण सरकारी सेवेत असावा, या उद्देशाने महासंघाने पुढाकार घेतला आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी, अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी आणि संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी महासंघातर्फे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

​ज्यांना अर्ज भरायचे आहेत किंवा अधिक माहिती हवी आहे, त्यांनी पवन सुनील पांचाळ (उपाध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ सोशल मीडिया सेल) यांच्या 8097391278 या क्रमांकावर किंवा गणेश बाबाजी परब (अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ ठाणे ते पनवेल युनिट) यांच्या 7045086960 या क्रमांकावर व्हॉट्सअँपद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त तरुणांनी आपला उत्साह दाखवून या संधीचा लाभ घ्यावा, असेही महासंघाने नमूद केले आहे.

Facebook Comments Box

आडीवरे येथील श्री नगरेश्वर महादेव मंदिरात सापडला १२५ वर्षांपूर्वीचा ताम्रपट

   Follow us on        

राजापूर (प्रतिनिधी): कोकणातील सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. राजापूर तालुक्यातील आडीवरे येथील श्री नगरेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात सुमारे १२५ वर्षांपूर्वीचा (सन १९०० चा) ऐतिहासिक ताम्रपट सापडला आहे. या शोधामुळे मंदिराचा प्राचीन इतिहास आणि तत्कालीन जीर्णोद्धाराची माहिती समोर आली असून, इतिहासप्रेमींमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे ताम्रपटात?

सापडलेला ताम्रपट हा शके १८२२ (ई.स. १९००) मधील असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. यावर कोरलेल्या मजकुरात मंदिराच्या तत्कालीन व्यवस्थापनाबद्दल आणि जीर्णोद्धाराबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेषतः मंदिराच्या बांधकामासाठी ज्यांनी योगदान दिले, त्या व्यक्तींची नावे आणि तत्कालीन सामाजिक स्थितीचे संदर्भ यात आढळतात.

जीर्णोद्धाराचा इतिहास समोर

नगरेश्वर महादेव मंदिर हे आडीवरे परिसरातील एक जागृत देवस्थान मानले जाते. या ताम्रपटामुळे हे स्पष्ट झाले आहे की, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मंदिराच्या संवर्धनासाठी स्थानिक भाविकांनी आणि मानकऱ्यांनी मोठा पुढाकार घेतला होता. या दस्तऐवजातून मंदिरातील धार्मिक विधी, उत्सव आणि जमिनीच्या दानाबद्दलचे महत्त्वाचे तपशीलही उघड झाले आहेत.

इतिहास संशोधकांसाठी मोठी पर्वणी

कोकणात अनेक ठिकाणी प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट दडलेले आहेत. आडीवरे येथे सापडलेला हा ताम्रपट स्थानिक इतिहासाचा एक महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. हा ताम्रपट सध्या मंदिर समितीच्या देखरेखीखाली असून, त्याचे अधिक सखोल वाचन करण्यासाठी इतिहास संशोधकांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

या शोधामुळे आडीवरे गावाच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, भाविक आणि पर्यटकांची पावले आता नगरेश्वर मंदिराकडे वळू लागली आहेत.

Facebook Comments Box

गोवा-महाराष्ट्र सीमेवर आता अत्याधुनिक ‘गोवा प्रणाली’ द्वारे वाहन तपासणी

   Follow us on        

बांदा: गोवा राज्याच्या सीमेवरील पत्रादेवी चेकपोस्टवर ‘गोवा’ (Government Automated Vehicle Documentation Check) या अत्याधुनिक वाहन तपासणी प्रणालीची सध्या प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप अधिकृतपणे बाकी असली, तरी वाहनधारक आणि पर्यटकांमध्ये याबाबत सध्या मोठी चर्चा रंगली आहे. सीमेवर होणारी वाहनांची गर्दी आणि तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या नवीन तंत्रज्ञानांतर्गत चेकपोस्टवर उच्च क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत, जे वाहनांची नंबर प्लेट (ANPR) स्वयंचलितपणे स्कॅन करतात. अवघ्या काही सेकंदांतच संबंधित वाहनाचा नोंदणी तपशील, विम्याची वैधता, प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि फिटनेस सर्टिफिकेट यांसारखी महत्त्वाची माहिती सिस्टिममध्ये उपलब्ध होते. यामुळे वाहनधारकांना आता कागदपत्रे प्रत्यक्ष स्वरूपात दाखवण्याची गरज उरणार नसून तपासणी प्रक्रिया अधिक अचूक आणि वेगवान होणार आहे.

सध्या ही प्रणाली चाचणीच्या टप्प्यात असून प्रशासन कॅमेऱ्यांची अचूकता आणि डेटाबेसच्या संकलनावर लक्ष केंद्रित करत आहे. एकदा ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाली की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. इतकेच नाही तर, वाहनाच्या कागदपत्रांमध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्यास, संबंधित वाहनधारकांना गोव्यात प्रवेश नाकारण्याचा कठोर निर्णयही प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो.

भविष्यातील कडक अंमलबजावणी पाहता, सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे वेळेत अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सीमेलगत ही प्रणाली कार्यान्वित झाल्यापासून, ज्या वाहनांकडे वैध प्रदूषण प्रमाणपत्र नाही अशा काही चालकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. मानवी हस्तक्षेप कमी करून पारदर्शकता वाढवण्यासाठी या आधुनिक सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.

Facebook Comments Box

अफवांवर विश्वास ठेवू नका! सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल पुरवठा सुरळीत

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम जोरात सुरू असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. या वाढत्या मागणीमुळे मध्यंतरी इंधन पुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेतली असून इंधन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सातत्याने समन्वय साधला जात असून, जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा स्थिर करण्यात येत आहे.

​घाबरून गर्दी करू नका

इंधन टंचाईबाबत जिल्ह्यात सध्या काही चुकीच्या अफवा पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या अफवांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होत आहे. अशा प्रकारची अनावश्यक गर्दी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करू शकते, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांनी इंधन खरेदीसाठी संयम बाळगावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

​सावंतवाडीतील इंधन स्थिती आणि नवीन साठा

जिल्ह्यातील विविध भागांत इंधन उपलब्ध असून, विशेषतः सावंतवाडी परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. सध्या आरोंदा (१), तळवडे (१), सावंतवाडी शहर (४), मळगाव (२), आंबोली (२) आणि कारिवडे (१) अशा विविध ठिकाणी पेट्रोल पंप कार्यान्वित आहेत. सावंतवाडी शहरातील दोन पंपांवर सध्या साठा संपला असला तरी, त्यापैकी बी.जी. भांगले पेट्रोल पंपावर आज रात्री १० हजार लिटर पेट्रोल, ५० हजार लिटर पॉवर पेट्रोल आणि ५ हजार लिटर डिझेलचा साठा प्राप्त होणार आहे. तसेच भट पेट्रोल पंपानेही साठ्याची मागणी नोंदवली असून लवकरच तिथेही पुरवठा उपलब्ध होणार आहे.

​एकूणच जिल्ह्याचा इंधन पुरवठा नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

देशातील पहिल्या विना-एसी ‘स्वयंचलित दरवाजा’ लोकलची चाचणी मुंबईत न होता उत्तर प्रदेशात होणार; कारण काय?

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या विना-एसी (Non-AC) पण स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल ट्रेनची चाचणी मुंबईत न होता थेट उत्तर प्रदेशात घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दी आणि गाड्यांची सततची वर्दळ यामुळे चाचणीसाठी पुरेसा वेळ आणि मार्ग उपलब्ध होत नसल्याने हा बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील झाशी विभागांतर्गत येणाऱ्या खजुराहो-महोबा या ६३.२७ किलोमीटरच्या मार्गावर या अत्याधुनिक लोकलची सखोल तांत्रिक चाचणी सध्या सुरू आहे.

​मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये या लोकलचा पहिला रेक प्राथमिक तपासणीसाठी आधीच दाखल झाला आहे. मात्र, दुसऱ्या रेकची सविस्तर चाचणी करण्यासाठी रेल्वेने उत्तर भारतातील कमी रहदारीच्या मार्गाची निवड केली. मुंबईत दिवसा लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमुळे चाचणी घेणे अशक्य असते, तर रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा मर्यादित वेळ तांत्रिक निरीक्षणांसाठी अपुरा पडतो. याउलट, खजुराहो-महोबा मार्ग तांत्रिक चाचण्यांसाठी अधिक अनुकूल असून तिथे सलग आणि निर्बाधपणे रेल्वेच्या सर्व प्रणाली तपासणे सोपे जात आहे.

​या चाचणी दरम्यान प्रामुख्याने स्वयंचलित स्लायडिंग दरवाजांची अचूकता, इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली (ज्यामुळे दरवाजे बंद झाल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही) आणि दरवाजे उघडण्या-बंद होण्याचा वेळ यांचे बारकाईने परीक्षण केले जात आहे. विना-एसी डब्यांमध्ये दरवाजे बंद असताना हवा खेळती राहण्यासाठी छतावरील ब्लोअर्स आणि ‘फोर्स्ड व्हेंटिलेशन’ प्रणाली किती प्रभावी ठरते, यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच पावसाळ्यात पाणी डब्यात शिरू नये यासाठी ‘अँटी-वॉटर इन्ग्रेस’ प्रणालीचीही चाचणी घेतली जाणार आहे. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा रेक पुन्हा मुंबईत आणला जाईल आणि त्यानंतरच प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

Facebook Comments Box

नवीन शैक्षणिक वर्षात चार इयत्तांचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार.

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीपाठोपाठ आता इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यालाही मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. यामुळे येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात आता इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी अशा चारही वर्गांचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.

​राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत राहून, विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी आणि अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) लक्षात घेऊन हा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या बैठकीला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह शिक्षण विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी आणि सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.

​या नवीन आराखड्याला आता अभ्यासक्रम समन्वय समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, ‘बालभारती’मार्फत या वर्गांची पाठ्यपुस्तके तातडीने तयार केली जाणार आहेत. ही पुस्तके नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. दरम्यान, नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) याच महिन्यात मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले असून, त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search