Follow us on 

सिंधुदर्गनगरी, दि. ३०:
केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक (स्वतंत्र) ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करण्याची विशेष मोहीम सध्या सिंधुदुर्ग जिल्हाभर राबविण्यात येत आहे. आगामी हंगामापासून शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकरी बांधवांनी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि महिला बचत गटांनी या मोहिमेत शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे आणि गावातील १००% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
‘फार्मर आयडी’ शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे?
हा डिजिटल आयडी तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय प्रक्रिया आणि योजनांचा लाभ मिळवणे अत्यंत सोपे होणार आहे:
सर्व योजना एकाच ठिकाणी: पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह शासनाच्या सर्व आर्थिक योजनांचा लाभ या एकाच आयडीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा होईल.
नोंदणी प्रक्रियेत सुलभता: पीक विमा, केसीसी (KCC) कर्ज, फळबाग अनुदान, तसेच कोकणातील विशेष आंबा-काजू प्रक्रिया योजनांसाठी लागणारी नोंदणी प्रक्रिया यामुळे अधिक सोपी होईल.
डिजिटल जोडणी: शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’, ७/१२ (सातबारा) आणि ८अ चा उतारा ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे या आयडीशी डिजिटली जोडली जाणार आहेत.
कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्ती: एकदा हा आयडी तयार झाल्यानंतर, भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज पडणार नाही.
कोकणासाठी विशेष लाभ: कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा व काजू उत्पादकांसाठी येणाऱ्या विशेष योजनांचा लाभ थेट आणि गतीने मिळेल.
थेट नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट आणि कोणत्याही विलंबाशिवाय प्राप्त होईल.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
१. आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर.
२. जमिनीचा अद्ययावत ७/१२ आणि ८अ उतारा.
नोंदणी कुठे आणि कशी करावी?
शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
सीएससी केंद्र: आपल्या गावातील जवळच्या ‘महा-ई-सेवा केंद्रात’ (CSC Center) जाऊन शेतकरी ही नोंदणी करू शकतात.
स्वयं-नोंदणी: शेतकरी स्वतः मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने https://agristack.gov.in या अधिकृत शासकीय पोर्टलला भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.
शासकीय योजनांचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी विनाविलंब आपली नोंदणी पूर्ण करावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.