उन्हाळी हंगामासाठी रेल्वेकडून अठरा हजारांहून अधिक गाड्यांचे नियोजन

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने यंदाच्या उन्हाळी सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीला सामोरे जाण्यासाठी १८,२६२ विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत ही विशेष ट्रेन सेवा सुरू राहणार असून, यापैकी ११,२९४ फेऱ्यांची आधीच सूचना देण्यात आली आहे. या उपायामुळे नियमित गाड्यांवरील तिकिटांची प्रतीक्षा यादी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय रेल्वेने सर्वाधिक ३,०८२ विशेष फेऱ्या चालवण्याचे ठरवले आहे. त्यानंतर पूर्व मध्य रेल्वेने २,७११ आणि उत्तर-पश्चिम रेल्वेने २,२४५ फेऱ्या चालवणार आहे. इतर रेल्वे विभाग देखील आपल्या प्रमुख मार्गांवर अतिरिक्त गाड्या सोडण्यात व्यस्त आहेत. या सर्व गाड्या मुख्यतः उच्च मागणी असलेल्या शहरांमधील प्रवासासाठी नियोजित करण्यात आल्या आहेत.

शाळा-कॉलेजच्या सुट्ट्या आणि सुट्टीच्या काळात देशभरात रेल्वे प्रवासाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे सामान्य गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्या चालवून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवास मिळेल. गर्दी कमी होऊन प्लॅटफॉर्म आणि गाड्यांमधील गर्दीचे प्रमाण नियंत्रित राहील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकिटे लवकर बुक करण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे बोर्डने सांगितल्याप्रमाणे, या उन्हाळी विशेष गाड्या योजना यशस्वी झाल्यास भविष्यात अशा योजनांना अधिक विस्तार देण्यात येईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे विभाग सतत प्रयत्नशील असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल; प्रवाशांनी नोंद घ्यावी

   Follow us on        

कल्याणम: ध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शन ते कसारा स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी (प्री-नॉन इंटरलॉकिंग) ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला असून, प्रामुख्याने १२६१७ एर्नाकुलम जंक्शन ते निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी ही गाडी तिच्या नियमित मार्गाऐवजी आता पनवेल, वसई रोड आणि सुरत मार्गे वळवण्यात आली आहे.

​या बदलामुळे मंगला एक्सप्रेस कल्याण जंक्शनवर थांबणार नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गाडीला भिवंडी रोड स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने, विशेषतः उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक आणि गाडीचा मार्ग तपासून घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवासी लिफ्ट कोसळली

   Follow us on        

नवी मुंबई: पनवेल रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील एका लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ती अचानक खाली कोसळली. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्यावेळी ही लिफ्ट कोसळली, तेव्हा त्यामध्ये चार प्रवासी अडकले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुरक्षित बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

​मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की देखभालीतील निष्काळजीपणामुळे, याचा तपास केला जाणार आहे. पनवेल रेल्वे स्थानक हे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे जंक्शन असून, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी ते जोडले जाणार आहे. अशा गजबजलेल्या स्थानकावर झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाने लिफ्ट आणि इतर सुविधांची कडक तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Facebook Comments Box

डोंबिवली स्थानकावर लोकल रूळांवरून घसरली

   Follow us on        

मुंबई, २० एप्रिल २०२६: आज सकाळी ८.०९ वाजता डोंबिवली स्थानकावर एका रिकाम्या लोकल रेकचा एक डबा रुळांवरून घसरल्याची घटना घडली. कळवा कार शेडवरून कल्याणकडे जाणाऱ्या या रिकाम्या रेकमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप दिशेने जाणाऱ्या  लोकल गाड्या थांबल्या.

अपघात  तात्काळ हाताळण्यासाठी तंत्रज्ञांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मध्य रेल्वेने दिवा ते कल्याणदरम्यान डाउन स्लो लाईनवरील सेवांना फास्ट लाईनवरून वळवल्या आहेत. परिणामी, या मार्गावर प्रवासी सेवांवर परिणाम झाला असून, काही गाड्या उशिराने धावत आहेत. सद्यस्थितीत रुळांवरून घसरलेला डबा उचलण्याचे काम सुरू असून, लवकरच सामान्य वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

Facebook Comments Box

ड्रायव्हरशिवाय बस चालू झाली; भांडुपमध्ये मोठी दुर्घटना टळली, CCTV फुटेज व्हायरल

   Follow us on        

मुंबई: १९ एप्रिल २०२६ रोजी भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना घडली. पार्क केलेली BEST इलेक्ट्रिक बस (क्रमांक MH-01 CV 8736) ड्रायव्हरशिवाय मागे घसरली आणि जवळच्या खाद्य स्टॉलला धडकली. या घटनेत एक महिला कसाबसा बचावली, तिला शेवटच्या क्षणी ओढून सुरक्षित ठिकाणी नेले गेले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही बस पूर्णपणे स्थिर अवस्थेत होती, तरीही अचानक रिव्हर्स गिअरमध्ये घसरली. बसने स्टॉलला जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली, फक्त स्टॉलचे नुकसान झाले.

ही घटना तीन महिन्यांपूर्वी (डिसेंबर २०२५) याच भागात घडलेल्या भीषण अपघाताची आठवण करून देते, ज्यात reversing बसने पादचाऱ्यांना चिरडले होते आणि चार जणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, BEST प्रशासनाकडून बसची तपासणी सुरू करण्यात आली आहे. हँडब्रेक किंवा यांत्रिक दोष यामागे असल्याची शक्यता तपासली जात आहे. नागरिकांनी बस पार्किंग आणि देखभालीबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी: सोनू उर्फ अमित निवजेकर तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परिसरातील गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोंदा येथील रहिवासी सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१) याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध अनेक नॉन-कॉग्निजेबल (NC) तक्रारींचीही नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कडक कारवाई केली आहे.

​या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर, दोन पोलीस अंमलदारांच्या कडक देखरेखीखाली त्याला गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. गोव्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याला हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी पूर्ण करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षे त्याला या तीन जिल्ह्यांत प्रवेश करण्यास बंदी असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

मुंबई उपनगरीय लोकल गाड्या जमिनीखालून धावणार! भुयारी मार्गांची चाचपणी सुरू

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये आता क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वेने (CR) शहरातील सर्वात व्यस्त अशा चर्चगेट-विरार आणि सीएसएमटी-कल्याण या दोन मार्गांवर भुयारी रेल्वे कॉरिडॉर उभारण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास (Feasibility Study) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी मागितली असून, मध्य रेल्वेदेखील लवकरच या प्रक्रियेत सामील होणार आहे.

जमिनीवरील विस्ताराच्या मर्यादा

रेल्वे प्रशासनानुसार, सध्याच्या रेल्वे मार्गांच्या बाजूला जमिनीवर नवीन मार्गिका (Tracks) तयार करणे आता जवळपास अशक्य झाले आहे. प्रचंड वाढलेले भूसंपादन खर्च, दाट नागरी वस्ती आणि कायदेशीर वाद यामुळे जमिनीवरील विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी आणि रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी ‘अंडरग्राउंड’ मार्ग हाच एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गर्दीतून सुटका आणि वेगवान प्रवास

मुंबईतील स्थानिक गाड्यांमध्ये सध्या ‘सुपर डेन्स क्रश लोड’ची स्थिती आहे, जिथे एका चौरस मीटरमध्ये सुमारे १६ प्रवासी प्रवास करतात. प्रस्तावित भुयारी मार्गांमुळे उपनगरीय रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईल, ज्यामुळे गाड्यांची वारंवारता वाढेल. हे मार्ग पूर्णपणे वातानुकूलित असतील आणि यामुळे तांत्रिक बिघाड किंवा रुळांवरील अतिक्रमणांमुळे होणारा विलंब टाळता येईल, परिणामी प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वक्तशीर होईल.

मेट्रोच्या यशातून प्रेरणा

मुंबईत ‘अ‍ॅक्वा लाईन’ सारख्या मेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी भुयारी कामाने रेल्वे प्रशासनाचा आत्मविश्वास वाढवला आहे. दाट वस्ती असलेल्या भागातही प्रगत इंजिनीअरिंगच्या सहाय्याने बोगदे तयार करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. लंडन आणि टोकियो यांसारख्या शहरांच्या धर्तीवर मुंबईतही बहुस्तरीय रेल्वे जाळे उभारण्याचे स्वप्न आता या अभ्यासातून साकार होण्याची चिन्हे आहेत.

भविष्यातील आव्हाने आणि गुंतवणूक

भुयारी रेल्वे प्रकल्प हे अत्यंत खर्चिक असतात. मुंबईत जमिनीखालील मेट्रो मार्गिकेचा खर्च साधारण १,१०० कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे, जो जमिनीवरील मार्गापेक्षा ३-४ पटीने अधिक आहे. एमआरव्हीसी (MRVC) सध्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या ५ किमीच्या भुयारी मार्गाचा अभ्यास करत आहे. या सर्व अभ्यासांचे निष्कर्ष आल्यानंतरच रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार या प्रकल्पांच्या आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यतेवर अंतिम शिक्कामोर्तब करतील.

Facebook Comments Box

ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा ‘मुहूर्त’ हुकला; १ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा

   Follow us on        

ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असतानाच, प्रशासनाच्या संथ कार्यपद्धतीमुळे आता संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित बांधकामांवर हातोडा पडत नसल्याने, “सरकारी बाबू नेमके कोणावर मेहरबान आहेत?” असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या दिरंगाईच्या निषेधार्थ आता थेट १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या काजुवाडी, दत्त मंदिर परिसर आणि नाचरे चाळ येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाढीव बांधकामे झाली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने ७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित व्यक्ती, श्री. महेश रमेश बागवे यांना नोटीस बजावली होती. २४ तासांच्या आत हे बांधकाम स्वतःहून हटवावे, अन्यथा महापालिका कारवाई करेल असे त्यात स्पष्ट नमूद होते. मात्र, या नोटिशीला दोन आठवडे उलटूनही पालिकेचा एकही कर्मचारी कारवाईसाठी फिरकला नसल्याने ही नोटीस केवळ कागदी घोडा ठरली आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

​मंत्रालयाचे आदेशही धाब्यावर?

विशेष म्हणजे, या अनधिकृत बांधकामाविरोधात केवळ पालिकेतच नव्हे, तर थेट मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात आली होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले होते. १६ मार्च २०२४ पासून यासंदर्भात लेखी पाठपुरावा सुरू असूनही, वरिष्ठ स्तरावरील आदेशांना स्थानिक प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

​१ मे पासून बेमुदत उपोषण

प्रशासकीय दिरंगाई आणि अनधिकृत बांधकामांना मिळणारे कथित अभय यांविरोधात तक्रारदार श्री. सुरेश जिमन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर ते बेमुदत शांततापूर्ण उपोषणाला बसणार आहेत.

​पालिकेत धाकधूक वाढली

या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाची डोकेदुखी वाढली आहे. उपोषणादरम्यान जर उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात ठणकावून सांगण्यात आले आहे. आता १ मे पूर्वी महापालिका प्रशासन आपली ‘मेहरबानी’ सोडून कारवाई करणार की उपोषणाची नामुष्की ओढवून घेणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

​ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल मधून पडल्याने देवगडच्या तरुणाचा मृत्यू

   Follow us on        

दिवा: काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या आपल्या काकांच्या दिवसकार्यासाठी जात असताना देवगड तालुक्यातील रामेश्वर कोलवाडी येथील ३० वर्षीय तेजस उदय पवार याचा ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल मधून पडल्याने मृत्यू झाला.

​तेजस हा आपल्या पत्नीसह गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला रेल्वेत महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरीत्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून रेल्वे सुटत असताना अचानक डब्यात गर्दी वाढली. या गर्दीत त्याला धक्का लागला आणि तो धावत्या लोकल मधून बाहेर फेकला गेला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

​प्राप्त माहितीनुसार, तेजस हा मुंबई येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले असून तो सध्या पत्नीसोबत राहण्यासाठी मुंबईतील रहिवासी होता.

​तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता आणि त्याचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच रामेश्वरसह गीर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.

​तेजस हा देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सल्लागार उदय पवार यांचा मुलगा होता.

Facebook Comments Box

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; वाहनांना धडक देऊन ट्रक विहिरीत कोसळला

   Follow us on        

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात आज पहाटे एक भीषण अपघात घडला. स्टीलने भरलेल्या एका भरधाव मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने त्याने महामार्गावरील चार वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर हा ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक ट्रकखालीच दबला गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अद्याप त्याच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या अपघातात इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने इतर कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या परिसरात वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search