Lanja: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी

   Follow us on        

लांजा: लांजा शहरातील सार्डळवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

​जखमी बालकेचे नाव स्वभवी समीर तानवडे (वय ४) असून, ती घराच्या अंगणात खेळत असताना आठ ते दहा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर अचानक झडप घातली. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी झाली.

​आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पळवून लावत बालकेची सुटका केली. त्यानंतर तिला प्रथम स्थानिक स्तरावर उपचारासाठी नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​या घटननंतर सार्डळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Facebook Comments Box

🌺भावपूर्ण श्रद्धांजली | बारावा दिवस🌺कु. समर्थ सीताराम गावडे

🌺भावपूर्ण श्रद्धांजली | बारावा दिवस🌺

 

कु. समर्थ सीताराम गावडे

– जन्म दिनांक: २३ जानेवारी २०११

– मृत्यू दिनांक: १५ जुलै २०२६

 

“आयुष्याच्या या क्षणभंगुर प्रवासात, तुझी ही आकस्मिक एक्झिट आम्हां सर्वांना सुन्न करून गेली. तुझा हसरा चेहरा आणि आठवणी नेहमीच आमच्या हृदयात राहतील. तुला भावपूर्ण श्रद्धांजली.”😔

 

🙏शोकाकुल परिवार:

 

– बाबा: सीताराम गावडे

– आई: सौ. संयुक्ता गावडे

– भाऊ: साईश गावडे

– काका: रामकृष्ण गावडे, प्रकाश गावडे, संतोष गावडे

– काकी: सौ. रश्मी गावडे, सौ. प्रज्ञा गावडे, सौ. सिध्दी गावडे

– वहिनी: सौ. योगिता गावडे, सौ. पवित्रा गावडे

– भाऊ: श्री. उदय गावडे, श्री. संदिप गावडे, श्री. प्रथमेश गावडे, श्री. सागर गावडे, साहिल गावडे, कु. अंश गावडे

– बहीण: कु. सुचिता गावडे, सौ. समिता सावंत, सौ. सुविधा बिरोडकर

– भाचे: कु. संकेत सावंत, कु. रियांश बिरोडकर

– भाची: कु. परी बिरोडकर, स्वानंदी सावंत

– भावोजी: सुधीर सावंत, प्रशांत बिरोडकर

– आत्या: श्रीमती महानंदा नाईक

 

*🙏समस्त गावडे, सावंत, बिरोडकर परिवार.🙏*

पत्ता: बिरोडकर टेंब, सावंतवाडी

Facebook Comments Box

धक्कादायक! टीसीने विनातिकीट प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून लाथ मारून खाली पाडल्याचा गंभीर आरोप

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकावर एका तिकिट तपासनिसाने (TTE) विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून लाथ मारून खाली पाडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एका तरुण प्रवाशाने केलेल्या या तक्रारीमुळे रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील गंभीर आरोप आणि तक्रारदाराची वेगळी शैली यामुळे हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.

ही घटना २५ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता घडली. तक्रारदार सचिन कुमार मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्थानिक ट्रेनमधून उतरत असताना त्यांनी टीटीईला एका प्रवाशाकडे तिकीट मागताना आणि चौकशी करताना पाहिले. त्या प्रवाशाकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पुरेशी रक्कम नव्हती.

मौर्य यांच्या दाव्यानुसार, प्रवाशाकडे दंडाचे पैसे नसल्याचे समजताच चिडलेल्या टीटीईने ट्रेन चालू असतानाच त्या प्रवाशाला जोरदार लाथ मारली. यामुळे तो प्रवासी थेट धावत्या ट्रेनमधून खाली रेल्वे रुळांवर जाऊन पडला. या घटनेनंतर मौर्य यांनी २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.२६ वाजता रेल्वे हेल्पलाइन नंबर १५१२ वर कॉल करून या घटनेची तात्काळ तक्रार नोंदवली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या घटनेची शहानिशा केली आणि अधिकृत निवेदन जारी केले. रेल्वेनुसार, संबंधित टीटीईने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. टीटीईला पाहताच त्या विनातिकीट प्रवाशाने घाबरून स्वतःच डब्याच्या दुसऱ्या बाजूने रुळावर उडी मारली आणि त्यानंतर टीटीई त्याच्या मागे ट्रेनमधून खाली उतरला, असा दावा रेल्वेने केला आहे.

भायखळा येथील आरपीएफ (RPF) कक्षातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, टीटीई डब्यात प्रवेश करताना दिसत आहे. मात्र, फुटेजमध्ये कोणतीही मारहाण किंवा बळजबरी केल्याचा प्रकार दिसून येत नाही. टीटीई अवघ्या ४ ते ५ सेकंदांत ट्रेनमधून खाली उतरल्याचे स्पष्ट दिसते. एवढ्या अपुऱ्या वेळेत डब्यात शिरणे, मारहाण करणे किंवा लाथ मारणे शक्य नसल्याचे सांगत रेल्वेने टीटीईवरील आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई, ठाणे, पनवेल आणि पुण्याहून सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि मडगावसाठी या विशेष गाड्या धावतील.

या विशेष रेल्वे गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि फेऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी

  • गाडी क्र. ०११०३ / ०११०४ सीएसएमटी- सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष (१६ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११०३ (सीएसएमटी ते सावंतवाडी): ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज दुपारी १५:३० वाजता सीएसएमटी वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ०४:०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११०४ (सावंतवाडी ते सीएसएमटी): १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज पहाटे ०४:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १६:४० वाजता सीएसएमटी ला पोहोचेल.
    • डबे: २२ ICF डबे (१२ स्लीपर, ६ सामान्य/अनारक्षित, २ एसी ३-टायर, २ एसएलआरडी).

 

  • गाडी क्र. ०११५१ / ०११५२ सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष (१७ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११५१ (सीएसएमटी ते सावंतवाडी): ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज मध्यरात्री ००:२५ वाजता सीएसएमटी वरून सुटेल आणि दुपारी १४:२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११५२ (सावंतवाडी ते सीएसएमटी): ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज दुपारी १५:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:३५ वाजता सीएसएमटी ला पोहोचेल.

२. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी / रत्नागिरी / मडगाव

  • गाडी क्र. ०११७१ / ०११७२ एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी दैनिक विशेष (१७ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११७१: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०८:२० वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २१:०० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११७२: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज रात्री २२:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११६७ / ०११६८ एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी (आवड्यातून ५ दिवस) (११ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११६७: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान (मंगल, बुध, गुरु, शनि, रवि) रात्री २१:०० वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:०० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११६८: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान (बुध, गुरु, शुक्र, रवि, सोम) दुपारी १५:१५ वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि मध्यरात्री ००:४० वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११२९ / ०११३० एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११२९: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ०८:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २२:१० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३०: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री २३:२० वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११३१ / ०११३२ एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी द्वि-साप्ताहिक (४ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११३१: १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार आणि रविवार) रोजी सकाळी ०८:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २२:१० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३२: १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार आणि रविवार) रोजी रात्री २३:२० वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११६५ / ०११६६ एलटीटी – मडगाव – एलटीटी एसी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११६५: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री ००:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुपारी १४:३० वाजता मडगाव जंक्शन पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११६६: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी दुपारी १६:३० वाजता मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१० वाजता एलटीटी ला पोहोचेल.
    • डबे: २२ LHB ऑल-एसी डबे (१st AC, AC २-टायर, AC ३-टायर).

 

  • गाडी क्र. ०११८५ / ०११८६ एलटीटी – मडगाव – एलटीटी LHB साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११८५: १६ आणि २३ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी रात्री ००:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुपारी १४:३० वाजता मडगाव पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११८६: १६ आणि २३ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी दुपारी १६:३० वाजता मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१० वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

३. पुणे ते रत्नागिरी विशेष गाड्या

  • गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे –  रत्नागिरी – पुणे साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०१४४५: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री ००:२५ वाजता पुण्यावरून सुटेल (कल्याण, पनवेल मार्गे) आणि दुपारी ११:५० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०१४४६: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सायंकाळी १७:५० वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता पुणे जंक्शन पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०१४४७ / ०१४४८ पुणे – रत्नागिरी – पुणे साप्ताहिक विशेष (३ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०१४४७: १२, १९ आणि २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी रात्री ००:२५ वाजता पुण्यावरून सुटेल आणि दुपारी ११:५० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०१४४८: १२, १९ आणि २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी सायंकाळी १७:५० वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता पुणे जंक्शन पोहोचेल.

 

४. दिवा येथून सुटणाऱ्या मेमू (MEMU) विशेष गाड्या

  • गाडी क्र. ०११५५ / ०११५६ दिवा – खेड – दिवा मेमू दैनिक विशेष (१६ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११५५: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०७:१५ वाजता दिव्यावरून सुटेल आणि दुपारी १४:३५ वाजता खेड पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११५६: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज दुपारी १६:०० वाजता खेडवरून सुटेल आणि रात्री २२:५० वाजता दिवा जंक्शन पोहोचेल.
    • (टीप: २२ सप्टेंबर २०२६ रोजी मेन्टेनन्समुळे ही सेवा उपलब्ध नसेल).

 

  • गाडी क्र. ०११३३ / ०११३४ दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक विशेष (१५ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११३३: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज दुपारी १३:४० वाजता दिव्यावरून सुटेल आणि रात्री २१:३० वाजता चिपळूण पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३४: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०७:३० वाजता चिपळूणवरून सुटेल आणि दुपारी १३:०० वाजता दिवा जंक्शन पोहोचेल.
    • (टीप: २३ सप्टेंबर रोजी दिव्यावरून आणि २४ सप्टेंबर रोजी चिपळूणवरून मेन्टेनन्समुळे सेवा बंद राहील).

 

या सर्व गाड्या दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, साखळी/आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबतील.

सर्व गाड्या विद्युत इंजिनावर (Electric Locomotives) चालवल्या जाणार असून, प्रवाशांनी आरक्षण आणि तिकिटांसंबंधी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा आयआरसीटीसी (IRCTC) ॲपला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे व मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

Breaking News: NEET-UG गैरव्यवहार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

   Follow us on        

​नवी दिल्ली:

​केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा सोपवला आहे. ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या NEET-UG परीक्षेमध्ये झालेल्या अनियमितता आणि गैरव्यवहाराची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारने तपास त्वरित सीबीआयकडे (CBI) सोपवला होता आणि परीक्षा रद्द करून २१ जून २०२६ रोजी ती पुन्हा सुरळीत पार पाडली होती. तसेच पुढील वर्षापासून ही परीक्षा ‘CBT’ (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. १६ जुलै रोजी घोषित झालेल्या पुनर्रचित निकालांमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाले असले, तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे मन अत्यंत व्यथित झाल्याचे प्रधान यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

​गेल्या दहा दिवसांतील घडामोडी, जंतर-मंतर येथील आंदोलने आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, राष्ट्रविरोधी शक्तींनी याचा गैरफायदा घेऊ नये आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, यासाठी पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “परीक्षेतील गैरव्यवहाराची जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून स्वीकारली असून कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही,” असा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधानांचे मार्गदर्शन व सहकाऱ्यांचे आभार मानत, भविष्यातही जगन्नाथ स्वामींच्या आशीर्वादाने देश, ओडिशाची जनता आणि युवा पिढीच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावर भीषण अपघात: दुचाकीवरील तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

सामंतवाडी:

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावरील कोलगाव मियासाब दर्ग्या जवळ (समाधीजवळ) दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुषी देसाई असे तरुणीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

​मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) आणि सावंतवाडीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH 07 AG 7801) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही उडून रस्त्यावर फेकल गेले. अपघाताच्या तीव्रतेमुळे स्विफ्ट कार रस्त्याशेजारील गटारात जाऊन कोसळली आणि कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

​घटनेनंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लाडू रायका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली, मात्र उपचारादरम्यान कार्तिक परब यांची प्राणज्योत मालवली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्विफ्ट कारच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब करत आहेत.

Facebook Comments Box

सुवर्णसंधी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची संधी; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ३६५ ग्रामपंचायत क्षेत्रे आणि ३ नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK) आयडी प्रदान करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या संदर्भातील अधिकृत जाहिरात २३ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

​या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना २९ जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेतच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची माहिती २० ऑगस्ट २०२६ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त हरकती आणि अपात्र अर्जांची छाननी केली जाईल. एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख स्वतंत्रपणे घोषित केली जाऊन अंतिम निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

​जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अर्जाचा नमुना, आवश्यक अटी व शर्ती आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (sindhudurg.nic.in) उपलब्ध आहे. तसेच, निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवाराशी फोन अथवा ई-मेलद्वारे वैयक्तिक संपर्क साधला जाणार नसल्यामुळे सर्व अपडेट्ससाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरच लक्ष ठेवावे. स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Facebook Comments Box

Sawantwadi: नव्याने मिळालेले थांबे टिकवण्याचे आव्हान

   Follow us on        

सावंतवाडी:

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन व्यावसायिक थांबे मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर प्रसिद्ध झालेल्या या निर्णयानुसार १२१३३/१२१३४ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु जंक्शन एक्सप्रेस, १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/१२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या आता सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. सावंतवाडी परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत हे थांबे देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक आणि कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​रात्रीच्या वेळा आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव ठरणार डोकेदुखी:

आनंदाची बाब ही असली तरी, मंजूर झालेल्या वेळापत्रकाचा बारकाईने अभ्यास केल्यास रात्रीच्या वेळेत थांबणाऱ्या गाड्या प्रवाशांसाठी मोठ्या गैरसोयीच्या ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सावंतवाडी स्थानक तळकोकणातील महत्वाचे स्थानक आहे. येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या (footfall) पण खूप मोठी आहे. अजून गाड्यांना थांबा मिळाल्यास त्यामधे अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या स्थानकाचे ठिकाण रात्रीच्या प्रवासासाठी काहीसे गैरसोयीचे आहे. सावंतवाडी शहर ते रेल्वे स्थानक या दरम्यान सुमारे ८ किलोमीटरचे अंतर आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दररोज सायंकाळी ७ वाजेनंतर ते सकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावर कोणतीही एसटी बस किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसते. यामध्ये विशेषतः १२२०१ एलटीटी – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस (मध्यरात्री ०२:०२ वा.), १२२०२ तिरुवनंतपुरम – एलटीटी गरीब रथ एक्सप्रेस (पहाटे ०३:२८ वा.) आणि १२१३४ मंगळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस (रात्री ११:३० वा.) या गाड्या ऐन मध्यरात्री व पहाटे सावंतवाडीत येतात. सार्वजनिक बस नसल्यामुळे या वेळेत उतरणाऱ्या किंवा ट्रेन पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

रात्रीच्या वेळेत सावंतवाडी स्थानक परिसर आणि शहराकडे जाणाऱ्या निर्जन मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था (RPF आणि स्थानिक पोलीस बंदोबस्त) असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ऐन मध्यरात्री उतरणाऱ्या महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यांमुळे ऐरणीवर आला आहे. याशिवाय, रात्रीच्या वेळी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्याचा गैरफायदा घेऊन काही रिक्षा व्यावसायिक प्रवाशांकडून मनमानी आणि अवाजवी भाडे वसूल करण्याची दाट शक्यता आहे. या कारणाने प्रवासी या गाड्यांतून प्रवास करणे टाळण्याची शक्यता आहे.

​थांबे टिकवून ठेवण्यासाठी तातडीने ‘या’ उपाययोजना करणे आवश्यक:

रेल्वे प्रशासनाने हे थांबे ५ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर दिले असून, या कालावधीत मिळणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरून (Patronage) व उत्पन्नावरून हे थांबे कायम ठेवायचे की रद्द करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या नसल्यास हे थांबे रद्द होण्याची दाट शक्यता आहे. हे थांबे कायम टिकवण्यासाठी आणि प्रवाशांची सोय होण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाने रात्रीच्या गाड्यांच्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी शहरातून स्थानकासाठी विशेष कनेक्टिंग बस फेऱ्या सुरू कराव्यात.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) आणि रिक्षा संघटनांनी रात्रीच्या प्रवासासाठी अधिकृत दरपत्रक जाहीर करून ते स्थानक परिसरात लावावे. तसेच, स्थानक परिसर व मुख्य रस्त्यावर कडक आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पहारा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी), स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रवाशांनी समन्वयाने काम केले तरच हे थांबे कायमस्वरूपी टिकून राहतील.

Facebook Comments Box

तलाठी भरती: ‘गट-क’ परीक्षेसाठी ३०८८ पदांचा समावेश; अर्ज भरण्यास मुदतवाढ

   Follow us on        

नवी मुंबई:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६’ बाबत अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असून, या भरतीमध्ये नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

​महत्त्वाचे बदल आणि ठळक मुद्दे:

​एकूण पदसंख्या: यापूर्वी २६१९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रानुसार आता एकूण ३०८८ पदांचा समावेश या परीक्षेत करण्यात आला आहे.

​अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ: उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आता ३१ जुलै, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

​परीक्षेची तारीख: सदर पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline – OMR आधारित) घेतली जाणार आहे.

​समाविष्ट करण्यात आलेली प्रमुख पदे:

​१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क: १५३९ पदे

२. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क: २५४ पदे

३. लिपिक-टंकलेखक (विविध विभाग): एकूण ९२४ पदे (नियंत्रक शिधावाटप, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास आणि महसूल व वन विभाग)

४. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३१ पदे

५. वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक: २२ पदे

​विविध संवर्गातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर अटींसाठी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) भेट देऊन अधिकृत प्रसिद्धीपत्रक तपासावे.

Facebook Comments Box

Konkan Railway: सावंतवाडी स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर

   Follow us on        

Konkan Railway Updates:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Stoppage) व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

​या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळालेल्या गाड्या, त्यांच्या वेळा आणि सुरू होण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

​१. मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (दररोज)

​गाडी क्र. १२१३३ (मुंबई सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शन):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०७:०२ / ०७:०४

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: रात्री २३:३० / २३:३२

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​२. हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – ह. निजामुद्दीन ‘राजधानी’ एक्स्प्रेस (आवड्यातून ३ दिवस)

​गाडी क्र. १२४३२ (ह. निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०६:१८ / ०६:२०

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२४३१ (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते ह. निजामुद्दीन):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: सकाळी ०९:४४ / ०९:४६

​सुरुवात: २८ जुलै २०२६ पासून

​३. लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम नॉर्थ – एलटीटी ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (आवड्यातून २ दिवस)

​गाडी क्र. १२२०१ (लोकमान्य टिळक (ट) ते तिरुवनंतपुरम नॉर्थ):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०२:०२ / ०२:०४

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२२०२ (तिरुवनंतपुरम नॉर्थ ते लोकमान्य टिळक (ट)):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०३:२८ / ०३:३०

​सुरुवात: ३० जुलै २०२६ पासून

प्रवाशांनी या बदलांची आणि सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी (सुनील बी. नारकर) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search