कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध विभागांतील २०२ रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार अधिसूचना क्र. CO/P-R/02/2026 जारी केली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर, स्टेशन मास्तर, असिस्टंट लोको पायलट आणि ट्रॅक मेंटेनर यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून KRCL च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

१.एकूण पदे -२०१

 

महत्त्वाची नोंद: ट्रॅक मेंटेनर (Track Maintainer) ची सर्व ५७ पदे केवळ प्रकल्पग्रस्त (Land Losers) उमेदवारांसाठीच राखीव आहेत.

२. निवड प्रक्रियेत प्राधान्यक्रम (Preference Order)

कोकण रेल्वेने उमेदवारांच्या निवडीसाठी पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम निश्चित केला आहे:

प्रथम प्राधान्य: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त (Land Loser) उमेदवारांना.

द्वितीय प्राधान्य: कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यांमधील (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा राज्य, उत्तर कन्नड, उडुपी, दक्षिण कन्नड) रोजगार कार्यालयात नोंदणीकृत असणारे उमेदवार.

तृतीय प्राधान्य: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील डोमिसाईल (अधिवास) धारक उमेदवार व KRCL मधील नियमित कर्मचारी.

३. वयोमर्यादा (Age Limit) व शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा (०१/०८/२०२६ रोजी):

गट ‘क’ (Group C) पदे: १८ ते ३६ वर्षे.

ट्रॅक मेंटेनर (Group D) पदे: १८ ते ४५ वर्षे.

(सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल).

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार १० वी पास, ITI, अभियांत्रिकी पदविका (Diploma), B.E./B.Tech किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Graduation) आवश्यक आहे.

४. अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

परीक्षेचे शुल्क:

सामान्य व इतर प्रवर्ग: रु. १,१८०/- (रु. १००० + १८% GST).

SC / ST / महिला / माजी सैनिक / PwBD / अल्पसंख्याक / EBC: परीक्षा दिल्यानंतर नियमानुसार शुल्क बँक शुल्काची रक्कम कापून परत (Refund) केले जाईल.

अर्जाची पद्धत: अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

 

५. निवड प्रक्रिया (Selection Process)

१. संगणकावर आधारित परीक्षा (CBT): सर्व पदांसाठी संभाव्यतः सप्टेंबर २०२६ मध्ये संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल.

२. अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट / PET: स्टेशन मास्तर, ALP व सेक्शन कंट्रोलरसाठी ‘अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट’ आणि ट्रॅक मेंटेनरसाठी ‘शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)’ घेतली जाईल.

३. कागदपत्र पडताळणी (DV) व वैद्यकीय तपासणी (Medical Examination).

महत्त्वाच्या लिंक्स व अधिकृत संकेतस्थळ

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:

अधिकृत वेबसाईट: www.konkanrailway.com

 

 

Facebook Comments Box

कोकण रेल्वेसंबंधी विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटनांनी घेतली आमदार माधवी नाईक यांची भेट

   Follow us on        

ठाणे: कोकण आणि रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विधानपरिषद आमदार सौ. माधवी नाईक यांची ठाणे येथील कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत कोंकण विकास समिती, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ, ठाणे, कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) आणि महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

​यावेळी, नव्याने मान्यता मिळालेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड दैनिक एक्सप्रेसबद्दल आमदार सौ. माधवी नाईक यांच्यासह रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच, सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. याशिवाय, कोकणातील चाकरमान्यांसाठी व प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी योग्य त्या पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.

​आमदार सौ. माधवीताई नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या सर्व समस्या व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात किशोर सावंत, अक्षय मधुकर महापदी, प्रसन्न प्रकाश कलमस्टे, प्रमोद बागवे, संजय शिंदे, अशोक शिंदे, अमित शेलार, जतिन कोठारे, हेमंत गडकरी, रविंद्र साटम आणि राजेश तावडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Comments Box

खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

   Follow us on        

मुंबई:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सिंधूदूर्गातील सावंतवाडी रोड दरम्यान एका नवीन दैनिक (रोज धावणारी) एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ५१० किलोमीटरच्या या मार्गामुळे मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (PIB) प्रसिद्धीपत्रकानुसार, या नवीन सेवेमुळे पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि स्थानिक रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सोयीचा होणार आहे.

ट्रेनचा क्रमांक व मार्ग

ही नवीन एक्सप्रेस ट्रेन दररोज पुढील क्रमांकांनी धावेल:

  • ट्रेन क्र. १५०८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस

  • ट्रेन क्र. १५०८८: सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) एक्सप्रेस

 थांबे (Stoppages)

मुंबई महानगर क्षेत्र ते दक्षिण कोकणाला जोडणाऱ्या या ५१० किमीच्या प्रवासात प्रमुख शहरांना व स्थानकांना व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत:

दादर • ठाणे • पनवेल • पेण • रोहा • माणगाव • वीर • खेड • चिपळूण • सावर्डे • अरावली रोड • संगमेश्वर रोड • रत्नागिरी • अडवली • विलवडे • राजापूर रोड • वैभववाडी रोड • नांदगाव रोड • कणकवली • सिंधुदुर्ग • कुडाळ • सावंतवाडी रोड.

पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती

ही नवीन रेल्वे सेवा कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि इको-टूरिझम केंद्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामुळे पर्यटनास मोठा उत्साह मिळेल. तसेच, रोजचा प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना यामुळे थेट आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रादेशिक आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. याशिवाय, कोकण मार्गावर सातत्याने असणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या नवीन दैनिक सेवेमुळे इतर गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. एकंदरीत, भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या प्रादेशिक विकासाला आणि वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.

Facebook Comments Box

मालवण – पंढरपुर – अक्कलकोट एसटी बससेवा सुरू

   Follow us on        

मालवण: एसटी महामंडळाच्या मालवण आगारामार्फत मालवण ते अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून कोकणातील प्रवाशांना आता बस बदल न करता थेट अक्कलकोटपर्यंत प्रवास करता येणार आहे.

​ही बस मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे, तर अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान आचारा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर ही प्रमुख ठिकाणे येणार आहेत.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगारामार्फत करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Facebook Comments Box

‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेला मुदतवाढ

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील कोटीवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेत ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेला पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२३१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे ही योजना २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीतही सुरू राहणार असून, यामुळे बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.

​या महत्त्वपूर्ण योजनेसाठी केंद्र सरकारने ३,१५,६१४ कोटी रुपयांच्या विशाल निधीची तरतूद केली आहे. पुढील पाच वर्षांत एवढा मोठा खर्च करून सरकार शेतीसाठी लागणारा आर्थिकभार हलका करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक आधार मिळत राहणार आहे.

​या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य पूर्ववत मिळत राहिल. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जाते.

​शेतकऱ्यांना पेरणी आणि शेतीच्या हंगामात आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी हफ्त्याचे वेळापत्रक पीक चक्रानुसार निश्चित करण्यात आले आहे. जेव्हा शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी सर्वाधिक पैशांची गरज असते, बरोबर त्याच काळात पीएम किसान योजनेचे हफ्ते वितरित केले जातात.

​या वेळेवर मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांमधील रोकड रकमेची अडचण दूर होते. तसेच त्यांना जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज भासत नाही. यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला खर्च भागवणे अधिक सोपे होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल.

Facebook Comments Box

Railway Updates: रेल्वेच्या तात्काळ तिकिटांसाठी आजपासून सुधारित टोकन प्रणाली कार्यान्वित

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने रेल्वे स्टेशनवरील आरक्षण काउंटरवरून तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी एक ऑगस्टपासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नवीन टोकन प्रणालीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, काउंटरवरील लांब रांगा आणि अनावश्यक गर्दी आटोक्यात आणण्यास मोठी मदत होईल.

​नव्या नियमावलीनुसार, एसी (AC) तत्काळ तिकिटांसाठी सकाळी ८:३० ते ९:०० या वेळेत टोकन दिले जाईल, तर नॉन-एसी म्हणजेच स्लीपर क्लाससाठी सकाळी ९:०० ते ९:३० या वेळेत टोकन दिले जातील. प्रत्येक आरक्षण काउंटरवर एसी तिकिटांसाठी १० आणि नॉन-एसी तिकिटांसाठी १५ टोकनची निश्चित मर्यादा ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे तिकीट वितरण व्यवस्था अधिक शिस्तबद्ध झाली आहे.

​या प्रक्रियेदरम्यान स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांसाठी थेट तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. गरज भासल्यास प्रवाशांना आपले नाते सिद्ध करण्यासाठी वैध कागदपत्रे काउंटरवर सादर करावी लागतील, ज्यामुळे काळ्या बाजारात होणाऱ्या तिकिटांच्या खरेदी-विक्रीला आळा बसेल.

​तसेच, प्रवाशांनी तिकीट काउंटरवर जाताना ओळख पटवण्यासाठी वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांचे नाव, वय आणि प्रवासाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती अगोदरच तयार ठेवल्यास तिकीट बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पार पडेल.

Facebook Comments Box

रेल्वे आरक्षणातील ‘व्हीआयपी’ तिकिटांचा घोटाळा उघड; ७ जणांना अटक

   Follow us on        

मुंबई: सण-उत्सवांच्या काळात लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही दलालांनी थेट राज्याच्या राज्यपाल कार्यालयाच्या (लोकभवन) नावाचा गैरवापर करून व्हीव्हीआयपी (VVIP) तिकिटे मिळवण्याचे मोठे रॅकेट चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी राज्यपाल कार्यालयाच्या नावाचे बनावट लेटरहेड, तसेच बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून रेल्वे प्रशासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे ५०० हून अधिक दलालांच्या सिंडिकेटने व्हीव्हीआयपी इमर्जन्सी कोट्याच्या नावाखाली रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. गेल्या ५ महिन्यांपासून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मलबार हिल पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अंबरीश ठक्कर याच्यासह एकूण ७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

राज्यात अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘लोकभवन’च्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करून रेल्वेच्या डोळ्यात धूळफेकणारा अंबरीश ठक्कर अत्यंत हुशारीने हे काळे जाळे चालवत होता. त्याचे एजंट लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना गाठून त्यांचे पीएनआर (PNR) नंबर मिळवायचे आणि ते अंबरीशकडे पाठवायचे. त्यानंतर अंबरीश उच्चपदस्थांच्या नावाचे बनावट लेटरहेड, सही आणि शिक्के वापरून व्हीव्हीआयपी इमर्जन्सी कोट्यातून तिकिटे कन्फर्म करून घेत असे. या काळ्या धंद्यातून आलेला पैसा तपास यंत्रणांच्या नजरेस येऊ नये, म्हणून तो ही रक्कम आपल्या पत्नीच्या आणि कपड्याच्या दुकानातील कामगारांच्या बँक खात्यावर वळवत होता.

​हे सिंडिकेट केवळ लोकभवनपुरते मर्यादित नव्हते, तर अंबरीशने रेल्वेतील उच्चपदस्थांच्या नावानेही बनावट लेटरहेड बनवून तिकिटांचा काळाबाजार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अंबरीश ठक्कर हा यापूर्वीही अशा गुन्ह्यांत सहभागी होता. एप्रिल २०२५ मध्ये पश्चिम रेल्वे आणि कुर्ला येथे तिकिटांचा काळाबाजार करताना रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले होते. मात्र, दोन्ही प्रकरणांत तो अटकपूर्व जामीन मिळवून बाहेर आला होता. यावेळी मात्र थेट राज्याच्या कार्यालयाच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

​राज्यपाल कार्यालयाचा गैरवापर करून चालवल्या जाणाऱ्या या कोट्यवधी रुपयांच्या रॅकेटमध्ये पोलीस आता संपूर्ण पाळेमुळे खणून काढणार का? तसेच यात अंबरीश ठक्कर हाच मुख्य सूत्रधार आहे की यामागे आणखी मोठे मासे लपले आहेत, याचा शोध घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नामांतरणाच्या प्रक्रियेला वेग; केंद्र सरकारने मागवले अभिप्राय

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस’ चे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, नामवंत संसदपटू आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री स्व. मधू दंडवते यांनी कोकणाच्या विकासात, विशेषतः कोकण रेल्वेच्या उभारणीत दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनसला त्यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती.

या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नामकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाच्या २६ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सावंतवाडी टर्मिनसचे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. या मान्यतेनंतर राज्याचे अप्पर मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) संजय सेठी यांनी १६ जून २०२६ रोजी केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवून नामकरणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती.

महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावावर केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहेत. गृह मंत्रालयाचे अवर सचिव कुंदन कुमार यांनी २७ जुलै २०२६ रोजी एक कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे. या ज्ञापनाद्वारे केंद्र सरकारच्या नियमांनुसार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या या प्रस्तावाची प्रत संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने या प्रस्तावावर रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड), विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया) आणि टपाल विभागाकडून अधिकृत मते व अभिप्राय मागवले आहेत. या सर्व संबंधित विभागांकडून मंजुरी व अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नव्या नामकरणाची अंतिम आणि अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल.

Facebook Comments Box

हिल गँग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कसारा-इगतपुरी घाटात संभाव्य दरड दुर्घटना टळली

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या अतिशय मोक्याच्या आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कसारा-इगतपुरी (थाळ घाट) विभागात एक मोठी दुर्घटना टळली आहे. या भागात नियमित गस्त आणि सुरक्षा तपासणी करणाऱ्या ‘इगतपुरी हिल गँग’च्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

​धोकादायक खडकाचा शोध आणि तत्परता

थाळ घाट विभागातील टीजीआर २ ते टीजीआर १ दरम्यानच्या डोंगराळ भागात नियमित तपासणी सुरू असताना हिल गँगच्या कर्मचाऱ्यांना एक मोठा धोका निदर्शनास आला. मुख्य खडकापासून अंदाजे ३.९ मीटर लांब, १.८ मीटर रुंद आणि १.६ मीटर उंच आकाराचा एक प्रचंड खडकाचा ढीग सुटा होऊन वेगळा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा महाकाय खडक रेल्वे ट्रॅकच्या थेट १५ मीटर उंचीवर कटिंगच्या कडेवर अत्यंत धोकादायक स्थितीत लटकलेला होता.

​नियोजित ट्रॅफिक ब्लॉक आणि सुरक्षित कारवाई

डोंगराच्या कडेवर असलेला हा भलामोठा खडक कधीही खाली कोसळून मोठी जीवित वा वित्तहानी घडवू शकला असता. याची गांभीर्याने दखल घेत इगतपुरी हिल गँगच्या टीमने कोणत्याही विलंब न करता तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करून एका नियोजित ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान अत्यंत कौशल्याने व काळजीपूर्वक हा मोठा खडक ट्रॅकवर सुरक्षितपणे खाली सोडण्यात आला.

​पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने ट्रॅक मोकळा

खडक खाली पाडल्यानंतर तो रेल्वे मार्गावर अडथळा ठरत होता. हा महाकाय खडक तातडीने बाजूला सारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पावले उचलण्यात आली. ‘बाऊलडर स्पेशल ट्रेन’वरील आधुनिक पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने या भल्यामोठ्या खडकाचे तुकडे करण्यात आले आणि संपूर्ण ट्रॅक तातडीने साफ करून पूर्ववत मोकळा करण्यात आला.

हिल गँगच्या कार्याचे कौतुक

इगतपुरी हिल गँगच्या या अत्यंत साहसी, समयसूचक आणि कौतुकास्पद कार्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेची आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मंडल रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) संपूर्ण हिल गँग टीमची उघडपणे प्रशंसा केली असून त्यांच्या पाठीवर कौतुुकी थाप दिली आहे.

Facebook Comments Box

धक्कादायक! शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले कोसळली

   Follow us on        

बांदा: बांदा-सटमठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले विद्यार्थ्यांसमोर अचानक खाली कोसळली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मुख्याध्यापिका आत्लेषा कांबळी या विद्यार्थ्यांना शिकवत असताना ही घटना घडली असून, काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या गंभीर घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, प्रसाद वीर, राकेश विरनोडकर, प्रदीप कळंगुटकर, राजदीप पावसकर आणि महेंद्र मांजेरकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. गेल्या पंधरा दिवसांत बांदा परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या छातासंदर्भातील ही तिसरी गंभीर घटना असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा छप्पर दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप साईप्रसाद काणेकर यांनी केला. विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी केली. शिक्षण विभागाने तातडीने छप्पर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दूरवस्था आणि खेळणी साहित्यांची झालेली मोडतोड निदर्शनास आणून दिली असून, ऋतिका नाईक यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search