महाराष्ट्र शासनकडून विविध उपयुक्त आणि सुरक्षित मोबाईल अॅप्सची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई, २८ जुलै: सामान्य नागरिकांची शासकीय कामे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावीत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) विविध उपयुक्त मोबाईल अॅप्सची माहिती जाहीर केली आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत उचलण्यात आलेल्या या पाऊलामुळे नागरिकांची कागदपत्रांची बचत होऊन प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

​यादीतील प्रमुख अॅप्समध्ये UMANG, DigiLocker, Aaple Sarkar, PM Kisan, ABHA, mParivahan, BHIM UPI, FASTag आणि DigiYatra यांचा समावेश आहे. या डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने नागरिकांना आता दस्तऐवज सुरक्षितपणे साठवणे, विविध बिल भरणे, शेतीविषयक अनुदान मिळवणे, आरोग्य सेवांचा लाभ घेणे तसेच वाहन व प्रवासासंबंधित महत्त्वाची माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे. हे सर्व अॅप्स Google Play Store आणि Apple App Store वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

Facebook Comments Box

सावंतवाडी: ४५ प्रवासी असलेली कदंबा बस कलंडली; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी : गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगावकडून दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली, ज्यामध्ये ४५ प्रवासी बालबाल बचावले असून चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी हानी टळली आहे. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडाच्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली. या वेळी मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ही बस खोलदूरीच्या काही फूट अंतरावर कलंडली.

​या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते, ज्यांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तसेच या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना वाचवण्यात मदत केली.

या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता. बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे बस अलिकडेच कलंडली आणि दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे ४५ प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Facebook Comments Box

Konkan Railway: गणपती विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर..

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (CR) विशेष शुल्कावर  ‘टीओडी’ (TOD) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, या विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११५३ / ०११५४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ या कालावधीत ही गाडी दररोज धावणार असून याचे तिकीट आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​पुणे – रत्नागिरी(RN):

​गाडी क्रमांक ०१४४५ / ०१४४६: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०१४४७ / ०१४४८: १२/०९/२०२६, १९/०९/२०२६ आणि २६/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (शनिवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११६७ / ०११६८: १२/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १३/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार व सोमवार या वारांमध्ये धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव (MAO):

​गाडी क्रमांक ०११६५ / ०११६६: १५/०९/२०२५ व २२/०९/२०२५ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११८५ / ०११८६: १६/०९/२०२६ व २३/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (बुधवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११०३ / ०११०४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२: ११/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११२९ / ०११३०: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

Facebook Comments Box

मुंबई – मंगळुरू एक्सप्रेसचे सावंतवाडी स्थानकावर जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २७ जुलै:

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या बहुप्रतिक्षित मंगळुरू एक्सप्रेसच्या थांब्यामुळे येथील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

​रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. १६ वर्षे या गाडीसाठी प्रयत्न सुरू होते. गेली ४ वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर आज मोठं यश आम्हाला मिळालं आहे. सुपरफास्ट एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाला. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, मंत्री व सर्व जनप्रतिनिधींचे आभार मानतो. तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार लोकनेते मधू दंडवते टर्मिनस असं नाव या स्थानकाला मिळालं आहे. त्यामुळे त्या नावासा शोभेल असं टर्मिनस जनप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून निर्माण व्हावं, अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सावंतवाडीकर उपस्थित होते.

​यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव श्री. मिहीर मठकर, उपाध्यक्ष श्री. सागर तळवडकर, मुंबई विभागाचे श्री. गणेश चमणकर, श्री. मिहीर गावडे, श्री. नंदू तारी, श्री. देवेंद्र मातोंडकर, श्री. सुभाष शिरसाट, ॲड. तेजस परब, श्री. नरसु रेडकर, श्री. शेखर पाडगावकर, सौ. सान्वी तळवडकर, कु. राशी परब, कु. प्रेरणा पोकळे, श्री. बसवराज गुरव, श्री. अश्वैफ गवस, श्री. भावेश भिसे, तसेच सर्व रिक्षाचालक आदी उपस्थित होते.

Facebook Comments Box

Railway Updates: अजून दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर कवच प्रणाली कार्यान्वित

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने आपल्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच ४.०’ च्या अंमलबजावणीमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या उच्च घनतेच्या मार्गांवर २,४९० रूट किलोमीटर अंतरावर हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ११,२५३ किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल, १,६६८ टेलिकॉम टॉवर्स आणि ९५८ स्टेशन डेटा सेंटर्स उभारण्यात आले असून, ७,७२१ रूट किलोमीटरवर ट्रॅकसाइड उपकरणे बसवण्यात आली आहेत. याशिवाय गोल्डन क्वाड्रिलॅटरल, गोल्डन डायगोनल आणि उच्च घनता नेटवर्कवरील २४,४२७ रूट किलोमीटरवर काम वेगाने सुरू असून, रेल्वे आपल्या ७,४३५ लोकोमोटिव्ह्स आणि १,२०० ईएमयू/मेमू ट्रेनसेट्स या प्रणालीने सुसज्ज करत आहे. जून २०२६ पर्यंत या प्रकल्पावर ३,८७४.९ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, ९४,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

​कवच ४.० तंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली

​कवच ४.० ही भारतीय रेल्वेची अत्यंत प्रगत अशी स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ही प्रणाली ट्रेनची गती, सिग्नल आणि इतर ट्रेनची स्थिती सतत मॉनिटर करते. ट्रॅकवर दर एक किलोमीटर अंतरावर RFID टॅग्स बसवलेले असतात, ज्यावरून ट्रेनचे नेमके स्थान ओळखले जाते. स्टेशन आणि ट्रॅकसाइड युनिट्स सिग्नल आणि ट्रॅकच्या उपलब्धतेची माहिती गोळा करतात, तर लोकोमोटिव्हमधील कवच युनिट (Loco Kavach) आणि ड्रायव्हर मशीन इंटरफेस (DMI) स्क्रीनद्वारे लोको पायलटला पुढील सिग्नल, अनुमत गती आणि लक्ष्याबद्दलची रिअल-टाइम माहिती मिळते.

​स्वयंचलित सुरक्षा आणि प्रमुख सुधारणा

​ही प्रणाली मानवी चुका टाळून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय प्रभावी ठरते. लोको पायलटने लाल सिग्नल ओलांडल्यास (SPAD) किंवा ट्रेन निर्धारित गतीपेक्षा जास्त वेगाने गेल्यास कवच स्वयंचलितपणे ब्रेक लावून ट्रेन नियंत्रित करते. तसेच, दोन कवच-युक्त ट्रेन्स समोरासमोर आल्यास त्या आपोआप थांबवल्या जातात. धुक्यात, पावसात किंवा कमी दृश्यता असतानाही केबिनमध्ये सिग्नलची अचूक माहिती उपलब्ध राहते. LTE-R आधारित संवाद, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगशी उत्तम एकत्रीकरण आणि सुरक्षेचा सर्वोच्च SIL-4 स्तर यामुळे ही आवृत्ती अत्यंत विश्वासार्ह बनली असून, भारतीय रेल्वेच्या व्यस्त मार्गांवर अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

Facebook Comments Box

रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद

   Follow us on        

सातारा: सततच्या मुसळधार पावसामुळे ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा करंजाळे गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खचला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीची खबरदारी घेत माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

​रस्ता खचल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित मार्गाची दुरुस्ती पूर्ण होऊन तो सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत हा बंदी आदेश कायम राहणार आहे.

​दरम्यान, अहिल्यानगर व पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून, वाहनचालकांसाठी आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकतानुसार इतर पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

​माळशेज घाट परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ओतुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी ही माहिती देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box

कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घर सोडलेल्या प्रेमी युगालाचा अवघ्या ४८ तासांत शोध

   Follow us on        

कुडाळ: तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणीने घर सोडून थेट पुण्यात आपल्या प्रियकराकडे धाव घेतल्याची घटना समोर आली होती. मुलगी अचानक गायब झाल्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुडाळ पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. सुरुवातीला दोन्ही तरुण-तरुणींचे मोबाईल फोन बंद असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते, तसेच पालकांकडेही युवकाबाबत कोणतीच ठोस माहिती नव्हती.

​परंतु, कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत वेगाने पावले उचलत तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. या तांत्रिक तपासाच्या आधारे दोघेही पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. कुडाळ पोलिसांनी तत्काळ स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधून सविस्तर माहिती आणि मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे सुपूर्द केला.

दोन्ही पोलीस दलांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे अवघ्या ४८ तासांच्या आत या प्रेमीयुगुळाचा शोध घेण्यात यश आले आणि त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या पालकांसमोर या तरुण-तरुणींनी आपण स्वेच्छेने आणि परस्पर संमतीने एकत्र येऊन लग्नाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मुलीचा सुरक्षित शोध लागल्याने पालकांनी कुडाळ पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

Facebook Comments Box

Lanja: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी

   Follow us on        

लांजा: लांजा शहरातील सार्डळवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

​जखमी बालकेचे नाव स्वभवी समीर तानवडे (वय ४) असून, ती घराच्या अंगणात खेळत असताना आठ ते दहा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर अचानक झडप घातली. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी झाली.

​आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पळवून लावत बालकेची सुटका केली. त्यानंतर तिला प्रथम स्थानिक स्तरावर उपचारासाठी नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​या घटननंतर सार्डळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Facebook Comments Box

🌺भावपूर्ण श्रद्धांजली | बारावा दिवस🌺कु. समर्थ सीताराम गावडे

🌺भावपूर्ण श्रद्धांजली | बारावा दिवस🌺

 

कु. समर्थ सीताराम गावडे

– जन्म दिनांक: २३ जानेवारी २०११

– मृत्यू दिनांक: १५ जुलै २०२६

 

“आयुष्याच्या या क्षणभंगुर प्रवासात, तुझी ही आकस्मिक एक्झिट आम्हां सर्वांना सुन्न करून गेली. तुझा हसरा चेहरा आणि आठवणी नेहमीच आमच्या हृदयात राहतील. तुला भावपूर्ण श्रद्धांजली.”😔

 

🙏शोकाकुल परिवार:

 

– बाबा: सीताराम गावडे

– आई: सौ. संयुक्ता गावडे

– भाऊ: साईश गावडे

– काका: रामकृष्ण गावडे, प्रकाश गावडे, संतोष गावडे

– काकी: सौ. रश्मी गावडे, सौ. प्रज्ञा गावडे, सौ. सिध्दी गावडे

– वहिनी: सौ. योगिता गावडे, सौ. पवित्रा गावडे

– भाऊ: श्री. उदय गावडे, श्री. संदिप गावडे, श्री. प्रथमेश गावडे, श्री. सागर गावडे, साहिल गावडे, कु. अंश गावडे

– बहीण: कु. सुचिता गावडे, सौ. समिता सावंत, सौ. सुविधा बिरोडकर

– भाचे: कु. संकेत सावंत, कु. रियांश बिरोडकर

– भाची: कु. परी बिरोडकर, स्वानंदी सावंत

– भावोजी: सुधीर सावंत, प्रशांत बिरोडकर

– आत्या: श्रीमती महानंदा नाईक

 

*🙏समस्त गावडे, सावंत, बिरोडकर परिवार.🙏*

पत्ता: बिरोडकर टेंब, सावंतवाडी

Facebook Comments Box

धक्कादायक! टीसीने विनातिकीट प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून लाथ मारून खाली पाडल्याचा गंभीर आरोप

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकावर एका तिकिट तपासनिसाने (TTE) विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून लाथ मारून खाली पाडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एका तरुण प्रवाशाने केलेल्या या तक्रारीमुळे रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील गंभीर आरोप आणि तक्रारदाराची वेगळी शैली यामुळे हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.

ही घटना २५ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता घडली. तक्रारदार सचिन कुमार मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्थानिक ट्रेनमधून उतरत असताना त्यांनी टीटीईला एका प्रवाशाकडे तिकीट मागताना आणि चौकशी करताना पाहिले. त्या प्रवाशाकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पुरेशी रक्कम नव्हती.

मौर्य यांच्या दाव्यानुसार, प्रवाशाकडे दंडाचे पैसे नसल्याचे समजताच चिडलेल्या टीटीईने ट्रेन चालू असतानाच त्या प्रवाशाला जोरदार लाथ मारली. यामुळे तो प्रवासी थेट धावत्या ट्रेनमधून खाली रेल्वे रुळांवर जाऊन पडला. या घटनेनंतर मौर्य यांनी २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.२६ वाजता रेल्वे हेल्पलाइन नंबर १५१२ वर कॉल करून या घटनेची तात्काळ तक्रार नोंदवली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या घटनेची शहानिशा केली आणि अधिकृत निवेदन जारी केले. रेल्वेनुसार, संबंधित टीटीईने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. टीटीईला पाहताच त्या विनातिकीट प्रवाशाने घाबरून स्वतःच डब्याच्या दुसऱ्या बाजूने रुळावर उडी मारली आणि त्यानंतर टीटीई त्याच्या मागे ट्रेनमधून खाली उतरला, असा दावा रेल्वेने केला आहे.

भायखळा येथील आरपीएफ (RPF) कक्षातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, टीटीई डब्यात प्रवेश करताना दिसत आहे. मात्र, फुटेजमध्ये कोणतीही मारहाण किंवा बळजबरी केल्याचा प्रकार दिसून येत नाही. टीटीई अवघ्या ४ ते ५ सेकंदांत ट्रेनमधून खाली उतरल्याचे स्पष्ट दिसते. एवढ्या अपुऱ्या वेळेत डब्यात शिरणे, मारहाण करणे किंवा लाथ मारणे शक्य नसल्याचे सांगत रेल्वेने टीटीईवरील आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search