



सिंधुदुर्ग: जेएसडब्लू कंपनीने तळकोकणातील आजगाव ग्रामपंचायतीला पत्र देऊन खनिज उत्खननाच्या सोमवारपासून गावातील ८४० हेक्टर भागात सोमवार पासून ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आजगाव ग्रामपंचायत कडे गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी सहा वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले होते. त्यांनी आपण सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्रामपंचायत ला कळवीत आहोत असे सांगितले. सदरील पत्रात ८४० हेक्टर एवढी आजगाव ब्लॉक मधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनी ला मायनींग साठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबत चे हे पत्र आहे. त्या पत्रात असे नमूद आहे की, मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत. मात्र या सर्व्हे साठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.
याआधीही येथे मायनींग विषयक चाचणी करण्याचे प्रयत्न झाले होते मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांकडून त्याला विरोध केला गेला होता. मायनिंग मुळे या क्षेत्रातील जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर संबंधित खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला त्यावेळी होता. आता पुन्हा मायनिंगसाठी प्रयत्न चालू झाल्याने येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.




मुंबई:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणुन ओळखला जाणारा गणेशचतुर्थी सण अवघ्या दोन महिन्यांवर आला. यंदा गणेश भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः एसटीचे आरक्षण एक महिना अगोदर सुरू होते, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
अॅप किंवा वेबसाईटवरुनही करता येईल बुकींग
कोकणातील अनेक चाकरमानी हे गावी जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांचे एकत्रित आरक्षण करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाईल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठी नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.




मुंबई:कोकणरेल्वेच्या सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण करावे या कोकणकरांच्या मागणीला महाराष्ट्र शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या स्थानकाचे लवकरच नामकरण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
या स्थानकाच्या नामांतराची मागणी झाली तेव्हा एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावरून मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण केल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.




मुंबई:राज्यातल्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे.
या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली होती त्यामध्ये आता काहीसा बदल केला गेला आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत.
नव्या नियमा नुसार कोणात्या महिला पात्र?
आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. जा महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्यांदा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात आता बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पर्यंता आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवी तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे. जमिनीबाबतची अट आता वगळण्यात आली आहे. या योजनेत पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
सदर योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होता. आता हा कालावधी 2 महिने केला असून दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे निवेदन.. 👇🏻




मुंबई :मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या न पाळलेल्या तारखा, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी पोकळ आश्वासने आणि नेहमीप्रमाणे पाहिल्याच पावसात महामार्गाची होणारी दयनीय अवस्था यामुळे वैतागलेला कोकणकर जनआक्रोश समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
रखडलेला महामार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. कोकणातील बहुतेक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षात असूनही ही अवस्था आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री महाराष्ट्रातील असूनही ही परिस्थिती आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेले महामार्ग बनवण्याच्या अट्टहास धरला आहे. त्यांना मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीबद्दल देणे घेणे नाही. या सर्वांना वैतागून पुन्हा एकदा जनआक्रोश समिती आक्रमक झाली आहे. शनिवार दिनांक २९ जून रोजी समितीची निर्धार सभा मुंबई येथे पार पडली. या सभेत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले.
प्रशासनाला जागे करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे २८ जुलै २०२४ रोजी जनआक्रोश समितीतर्फे होमहवन घालण्यात येणार आहे. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. कोकणातील लोकप्रतिनिधी महामार्ग संदर्भात आवाज उठवीत नसल्याने त्यांच्या घरासमोर निदर्शन करून त्यांना जागे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
निवडणुकीवर बहिष्कार टाकणे
लोकसभेला ३७००० कोकणकरांनी नोटाला मतदान केले. विधानसभेला देखील कोकणातील उमेदवार यांच्या विरोधात NOTA मतदान करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला.
आरक्षित डब्यांतील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचं मोठं पाऊल.
Waiting list passenger not allowed: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील Waiting List तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीत होत आहे. गर्दीमुळे तिकीटधारक प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करता येत नाही. डब्यात प्रवेश केल्यानंतर आरक्षित आसनापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. प्रतीक्षायादीतील प्रवाशांमुळे होणार्या गर्दीच्या सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओंची व्हिडीओची गंभीर दखल रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.
तिकीट खिडक्यांवर काढलेले तिकीट रद्द प्रवाशांना रद्द करावे लागणार.
ऑनलाईन प्रतीक्षायादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो. तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेले तिकीट प्रवाशांना रद्द करावे लागणार आहे. रेल्वेगाडीचा चार्ट साधारण चारतास आधी तयार होतो. त्याचवेळी तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती प्रवाशांना समजते. गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी प्रतीक्षायादीतील तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्याचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. गाडी गेल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.
प्रतीक्षायादीतील तिकीट असलेले प्रवासी आरक्षित डब्यांतून प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना पुढील स्टेशन आल्यावर त्या डब्यातून उतरविण्यात येत आहे. .‘गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक २८२ प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.(११०६१) जयानगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ३१ मेल-एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे १,६०० प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिसूचना GR प्रसिद्ध केली नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुंबई उपनगरीय स्थानकावर याबाबत अनॉसमेंट होत आहे.
वाचकांचा प्रतिसाद
अशी कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कित्येकदा आरक्षित तिकीट भेटत नसल्याने नाईलाजाने वेटिंग तिकीट काढून प्रवास करावा लागतो. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने त्या त्या गाडीच्या वेटिंग तिकिटांच्या संख्येवर मर्यादा घातल्या पाहिजेत.-प्राजक्ता परब, भांडुप
जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल. आपल्याकडे जनरल डब्यांची खूपच खराब आहे. डब्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट प्रवासी या डब्यांतून प्रवास करतात. हा त्रास काही प्रमाणात वाचविण्यासाठी प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटांवरुन प्रवास करतात. आता सुद्धा पर्याय नाहीसा झाल्याने प्रवाशांकडे जनरल कोचमधून प्रवास करण्याचा पर्याय राहिल्याने जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल.-राजेश धुरी, विरार