सावधान! कोकण रेल्वे प्रवासादरम्यान विक्रेत्यांकडून वडापाव विकत घेत असाल तर ही बातमी वाचाच

रत्नागिरी : कोकण रेल्वेमधून प्रवास करताना चिपळूण – रत्नागिरी ही स्थानके आली कि खास करून वडापाव विकणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गाडीत चढून वडापाव विक्री करतात. प्रवासी पण रास्त किंम्मत आणि गरम असल्याने हे वडापाव खरेदी करतात. मात्र हे फेरीवाले प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.  
समाज माध्यमांवर एक फोटो  मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एक वडापाव विक्रेता विक्रीस आणलेल्या वडापाव च्या ट्रे वर पाय ठेवून झोपला असल्याचा हा किळस आणणारा हा फोटो आहे.  हा फोटो चिपळूण स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे. 
या प्रकारामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. रेल्वे कॅन्टीन च्या विक्रेत्यांकडून असे किळसदायक प्रकार घडल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यामुळे प्रवासी वर्ग या बाहेरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत असे. मात्र इथेही असे अनुभव येत असल्याने प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ घ्यावे कि न घ्यावे हा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आहे. हे विक्रेते बहुतेक करून परप्रांतीय आहेत. विकताना ते असे किळसवाणे प्रकार करत असतील तर हे खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेचे किती मापदंड पाळत असतील हा प्रश्न समोर आला आहे.  

Facebook Comments Box

अभिमानास्पद! युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्राकडून मराठ्यांच्या १२ किल्यांना मिळाले नामांकन; कोकणातील ‘या’ किल्ल्यांचा समावेश

जाने. ३० : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली. मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
Suvarnadurg-Fort.jpg
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
Sindhudurg Fort
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरण केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
Panhala Fort
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
Lohagadh fort
Vijaydurg Fort
Raigad Fort
Facebook Comments Box

वाशी: जानेवारी महिन्यात बाजारात हापूसची विक्रमी आवक; पेटीची किंमत किती?

वाशी, २९ जानेवारी : कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे. यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार या आंब्याला प्रतिपेटी सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.

अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला दरही चांगला मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंब्याचा मोहराची गळ झाली होता. तसेच बुरशीजन्य रोग आणि रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे मोहर गळ झाल्याने पुनर्मोहराची प्रकिया लांबली. परिणामी फळ तयार होण्याच्या प्रक्रियेलाही उशीर झाला. परंतु काही भागात अवकाळीचा फटका बसूनही योग्य व्यवस्थापनामुळे फळ वेळेत तयार झाले आहे.

मागील वर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे चांगल्या प्रमाणत उत्पादन राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांना होता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचा मोहर काळा पडला. याशिवाय रसशोषक कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

Facebook Comments Box

भारतीय रेल्वे मंडळात ५६९६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचे २ दिवस बाकी

 RRB Bharti 2024: भारतीय रेल्वे मंडळने असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदांसाठी ५६९६ जागांसाठी भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यासंबंधी जाहिरात सुध्दा प्रसिदध करण्यात आली आहे.  योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी  २०२४ आहे. 
  • अर्ज करण्याचे माध्यम -ऑनलाइन
  • एकूण पदसंख्या – ५६९६ पदे
  • संस्था – भारतीय रेल्वे मंडळ
  • नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
  • शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२४
  • जाहिरात दिनांक – जानेवारी २०२४
  • भरती प्रकार – सरकारी
  • निवड मध्यम (Selection Process) –
  • अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.इन
  • पद- असिस्टंट लोको पायलट (ALP)
  • पदसंख्या – ५६९६
  • शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria: – असिस्टंट लोको पायलट (ALP): १० वी उत्तीर्ण आणि ITI.
  • वेतन/ पगार/ Pay Scale: -असिस्टंट लोको पायलट (ALP): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • वय मर्यादा/ Age Limit: या तारखेप्रमाणे: 2024 रोजी.
  • कमीत कमी: १८ वर्ष.
  • जास्तीत जास्त: ३० वर्ष.
  • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

 

भरतीची जाहिरात

Facebook Comments Box

“तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला..” – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

नवी मुंबई :तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला. अशी विनंती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला केले. आज नवी मुंबईत भरलेल्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते. 

काय म्हणालेत राज ठाकरे? 

मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो. 

ह्या जूनमध्ये मला अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या संमेलनाला आमंत्रित केलं आहे. ह्या संमेलनाचे अध्यक्ष मला भेटले. ते मला म्हणाले की अमेरिकेत आम्ही शंभरहून अधिक मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होणं हे काय कमी आहे का? 

पण सध्या आपण महाराष्ट्राकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या मराठी लोकांनी मराठीची, महाराष्ट्राची श्रीमंती जरूर इतर लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. पण आपल्याच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये जेंव्हा मराठीची उपेक्षा होते, जेंव्हा तिकडे सर्रास हिंदी कानावर पडते तेंव्हा मात्र त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही देशातल्या इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. ह्या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधीच झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ह्यांच्यातील व्यवहारासाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा वापरल्या जातात इतकंच. बाकी हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. पण जेंव्हा मी हे १५,२० वर्षांपूर्वी बोललो तेंव्हा माझ्या अंगावर सगळे धावून गेले. जेंव्हा ते अंगावर आले तेंव्हा त्यांना मी गुजरात हायकोर्टाचा निर्णय दाखवला. 

मराठी लोकंच एकमेकांशी बोलताना हिंदी का वापरतात हे मला कळत नाहीये. आणि आपलीच मराठी भाषा जेंव्हा राजकीय दृष्ट्या दुय्यम लेखण्याचा प्रयत्न जेंव्हा होतो तेंव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. 

माझी श्री. दीपक केसरकारांना विनंती आहे की ह्या राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मग त्या कुठल्याही असोत तिकडे पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. सध्या सीबीएएससी, आयसीएस्सी शाळांमध्ये ज्या राज्यात राहताय तिथली भाषा शिकवायची आणि शिकायची सोडून परदेशी भाषा का शिकवताय? परदेशी भाषा हव्या तितक्या शिका पण त्याच वेळेस मराठी पण शिकलीच पाहिजे, बोलता आलीच पाहिजे. 

ह्या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल प्रेम वाटतं. गिफ्ट सिटी असो की हिऱ्यांचा व्यापार जर गुजरातमध्ये न्यावीशी वाटते किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षा मोठा पुतळा गुजरातमध्ये उभारावासा वाटतो, थोडक्यात काय जर त्यांना त्यांच्या राज्याबद्दलचं आणि भाषेबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर आपण का लवपतोय, का मागे राहतोय ?

जेंव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला जैन माणूस घर नाकारतो तेंव्हा काय करायचं? हे गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ ह्या राज्यात करून दाखवा. पैसे असून सुद्धा मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते कारण आमच्या सरकारांचं बोटचेपं धोरण. 

मराठी माणसाकडे पैसे असताना त्याला घर नाकारलं जात असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि मराठी माणसाकडे कुठे आहे पैसा असं म्हणणारे गल्लीच्या बाहेर पण गेलेले नाहीत. त्यांना काय माहिती की महाराष्ट्रभर मराठी लोकांनी किती अफाट कर्तृत्व दाखवून पैसा उभा केलाय. 

भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही आमच्याच राज्यात दुसऱ्या भाषेमध्ये गोट्यांसारखे घरंगळत का जातो. माझी आज तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला.

Facebook Comments Box

कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल; स्लीपर डब्यांमध्ये कपात. येत्या गुरुवारपासून अंमलबजावणी

Konkan Railway News: कोकणात गावी जाण्यासाठी कोकणवासीयांची आणि गोवेकरांची पहिली पसंद असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. या गाड्यांचे २ स्लीपर डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी २ थ्री टायर एसी डबे जोडले जाणार आहेत. हा बदल कायमस्वरूपासाठी करण्यात येणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १०१०४/१०१०३ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “मांडवी” एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. २०११२ /२०१११ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांत हा बदल दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवारपासून पासून अमलांत आणला जाणार आहे.

श्रेणी सध्याची संरचना सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त ) 01 01 बदल नाही
टू टियर एसी 01 01 बदल नाही
थ्री टायर एसी 04 04 बदल नाही
इकॉनॉमी थ्री टायर एसी 00 02 02 डबे वाढवले
स्लीपर 09 07 02 डबे कमी केले
जनरल 04 04 बदल नाही
एसएलआर 01 01 बदल नाही
पेन्ट्री कार 01 01 बदल नाही
जनरेटर कार 01 01 बदल नाही
एकूण 22 LHB 22 LHB

 

कोकणातील प्रवाशांकडून नाराजीचे सूर 
या गाड्यांचे सेकंड स्लीपर डबे कमी केल्याने कोकणातील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या आधी या गाडीला ११ स्लीपर डबे होते त्यानंतर ते ९ वर आणलेत. आता तर त्यातही कपात करून ७ वर आणले आहेत. याचा खूप मोठा तोटा कोकणातील सामान्य प्रवाशांना सोसावा लागणार आहे. कारण त्यावरील श्रेणीचे तिकीट त्यांना परवडणारे नाही. आधीच तिकीट मिळणे खूप कठीण त्यात हे डबे कमी केल्याने अधिकच कठीण झाले आहे. 
गोवा आणि दक्षिणेकडील प्रवाशांचे हित नजरेसमोर ठेवून असे बदल होत असतील तर कोकण रेल्वे नक्की कोणासाठी हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.  
Facebook Comments Box

“…अन्यथा पुढील महिन्यात…” सावंतवाडीत उपोषणकर्त्यांचा प्रशासनाला इशारा..

सावंतवाडी दि. २७: विविध मागण्यांसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने काल झालेलया लाक्षणिक उपोषणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक तसेच मुंबईहून चाकरमानी पण मोठ्या संख्येत आले होते. हजारो नागरिकांनी उपोषणास उपस्थिती दर्शविली. 
कोकण रेल्वे कडून समाधानकारक उत्तरे नाहीत 
दरम्यान, कोंकण रेलवे कॉपर्पोरेशन लि. रत्नागिरीचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रविंद्र कांबळे यांच पत्र घेऊन कोकण रेल्वेचे कणकवली येथील अधिकारी घनश्याम उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी रेल्वे प्रशासनान दिलेलं हे पत्र म्हणजे प्रवाशांची केवळ फसवणूक करण्याचा प्रकार आहे. आमच्या मागण्यांबाबत यात कोणतीही स्पष्टता नाही. यात सूरु असणाऱ्या रेल्वे गाड्यांचीच माहिती आहे. आमच्या इतर मागण्या तुमच्या अधिकारात नाही तर हे पत्र घेऊन तरी का आलात ? रेल्वे प्रशासन आम्हाला मुर्ख समजत का ? असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला. 
केंदीय मंत्री नारायण राणे यांचे आश्वासन 
माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी भ्रमणध्वनीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद साधून दिला. नारायण राणे यांनी फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवड्यात संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घालून देवून काही प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने उपोषण स्थगित केले.
लाक्षणिक उपोषण की ‘रेल रोको’? 
रेल्वे प्रशासनाने या उपोषणाला ‘रेल रोको’ असे नाव देण्याचा कुटील खेळ खेळल्याचा प्रकार घडला. आंदोलनास ‘लाक्षणिक उपोषण’ च्या जागी ‘रेल रोको’ आंदोलन असे नाव दिल्यास नागरिक घाबरून या आंदोलनास उपस्थिती दाखवणार नाही असा या मागे हेतू होता. मात्र रेल्वे प्रशासनाचा हा हेतू साध्य झाला नाही. उलट या उपोषणास अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी जमली होती. 
मुळात उपोषणाची माहिती अगोदर एक महिना आगाऊ सूचना देऊन पोलीस खात्याला फक्त उपोषण आहे असे सांगितले होते मात्र कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सुद्धा रेल रोको आणि रस्ता रोको आंदोलन होणार आहे अशी दिशाभूल करणारी माहिती दिली तसेच एवढ्यावरती न थांबता तेच पत्र उपोषण करताना मंडपात आणून दिले आमच्या मागण्या काय होत्या कशा होत्या त्या विकृतपणे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्या मनाने लिहिल्या असा आरोप कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी केला आहे.
आमरण उपोषणचा इशारा 
उपोषण स्थगित केले असले तरीही मागण्या मान्य न झाल्यास २३ फेब्रुवारी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष  अॅड संदीप निंबाळकर यांनी दिला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, सावंतवाडीकरांच्या हक्काची रेल्वे आहे‌. यासाठी माजी आमदार जयानंद मठकर, डी.के.सावंत यांसह सावंतवाडीकरांनी योगदान दिलं आहे‌. आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. त्यामुळे कोकण रेल्वे व सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस उभारणी एका टप्प्याच काम पूर्ण झालेले असताना दुसऱ्या टप्प्याच काम निधी अभावी रखडलं आहे‌‌. लोकांची फसवणूक करण्याच काम स्थानिक आमदारांकडून केलं जातं आहे अशी टीका त्यांनी केली. तर रेल्वे रोको पेक्षा जिल्ह्यातील मंत्र्यांची गाड्या रोखा असं विधान माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी केल. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे शांताराम नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, प्रवासी संघटनेचे राजू कांबळे, सुनील उतेकर,कमलताई परूळेकर, युसुफ आर्ते, अँड देवदत्त परूळेकर, रमेश बोंद्रे, अभिमन्यू लोंढे, अँड नकुल पार्सेकर सागर तळवडेकर,सागर नाणोसकर,सिमा मठकर,आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील गावांचे सरपंच यांसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. रेल्वे टर्मिनस पूर्ण झालच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, प्रमुख राजू कांबळे, संजय सावंत, रुपेश दर्गे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, श्वेता शिरोडकर, अण्णा केसरकर, यशवंत जडयार, प्रमोद गावडे,अभिमन्यू लोंढे, शेखर पाडगांवकर, भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, अँड. नकुल पार्सेकर, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, रविंद्र ओगले, प्रमोद गावडे,विहंग गोठोस्कर, देव्या सुर्याजी, वजराठ ग्राम पंचायत सरपंच अन्यण्या पुराणिक, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, दीपेश परब,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नेमळे सरपंच.सौ भैरे,,निरवडे सरपंच.सुहानी गावडे आरोंदा उपसरपंच ,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, गुरू गावकर, श्री तानावडे,किरण मातोंडकर, समीर मातोंडकर, राधा तळवडेकर, सुधीर राऊळ, हिदायतुल्ला खान, निलेश कुडव, स्नेहल जामदार, सुधीर पराडकर, सीमा मठकर, कल्पना बांदेकर, सायली दुभाषी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, बाळा गावडे, सिद्धेश सावंत, विनायक गांवस, राज पवार, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, सुरेश गावडे, गुणाजी गावडे, गुरुप्रसाद गवंडे, समीर वंजारी, रफिक मेमन,मुंबईतून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे शेखर बागवे,बाळ वेळकर,दिपक चव्हाण,सुभाष लाड,श्रीकांत सावंत,अभिषेक अनंत शिंदे,राजाराम कुंडेकर,सुरेंद्र पवार,प्रशिल लाड,अतुल चव्हाण,अशोक देवरूखकर,संदेश लाड,पराग लाड,संजना पालव,मनोज पिंपळकर,रंजन पाळेकर, शेखर पाडगावकर, प्रमोद गावडे, चंद्रकांत कासार,बाळा गावडे,वसंत धुरी, जगन्नाथ पंडित, उदय पारीपत्ते, शांताराम (बाबू) पंडित, शिवराम पंडित आदी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले होते.
Facebook Comments Box

मोठी बातमी : मराठा आंदोलनाचा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला

नवी मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.
सर्व मागण्या मान्य, अध्यादेश मिळाला
मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
गुन्हे मागे घेतले जाणार
राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला
समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही.
Facebook Comments Box

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकवून देण्यासाठी आपले मत महत्वाचे; ‘असे’ देता येईल मत

मुंबई: कर्तव्यपथावरील संचलनात आज अनेक नेत्रदीपक चित्ररथ समाविष्ट झाले होते. या सर्व चित्ररथातील विजेता चित्ररथ निवडण्यासाठी जनतेकडून मते मागविण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यातर्फे ‘छत्रपतीशिवाजीमहाराज : लोकशाहीचे जनक’ या विषयावर अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर असा चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे सर्वानी आपले मत नोंदवून या राज्याच्या चित्ररथाला जिंकवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालय तर्फे काण्यात आले आहे.
उद्या २७ जानेवारी सायं. ५.३० पर्यंत हे मतदान आपणास करता येणार आहे.
कसे नोंदवाल मत?
👇मार्ग पहिला :-
स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL(स्पेस)344521(comma) 9 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा.
म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल
MYGOVPOLL 344521,9 
👇मार्ग दुसरा :-
प्रथमत: https://mygov.in/group-poll/vote-your-favourite-tableau-republic-day-2024/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.
Facebook Comments Box

कोल्हापूर ते कोकण प्रवास एका तासात शक्य; आंबोली घाटाला छेदून येणार ‘हा’ महामार्ग

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान लागणाऱ्या आंबोली घाटाखालून हा महामार्ग येणार आहे. आंबोली घाटातून मोठा बोगदा खोदला जाऊन तेथून हा महामार्ग जाणार असल्याने कोल्हापूर ते कोकण अंतर १ तासात गाठणे शक्य होणार आहे. 
सध्या आंबोली घाटातून वाहतूक खूप धीम्या गतीने होते. पावसाळ्यात अनेकदा वाहतूक धोक्याची होते. दरी कोसळल्याने वाहतूक कित्येकदा बंद होते. मात्र शक्तीपीठ महामार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकण जवळ येणार आहे. 
समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. 
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search