कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासाठी ‘नियम ३७७’ चे अस्त्र! खासदार वायकरांचा लोकसभेत पाठपुरावा

   Follow us on        

नवी दिल्ली: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत ‘नियम ३७७’ अंतर्गत ही महत्त्वाची मागणी लावून धरली असून, या प्रक्रियेला गती देण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. १९९० च्या दशकात स्थापन झालेली कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वे आणि संबंधित राज्यांचा संयुक्त उपक्रम होता. मूळ करारानुसार, १० वर्षांच्या आत या संस्थेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे अपेक्षित होते, मात्र तीन दशके उलटूनही ही प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने कोकण रेल्वेच्या विकासाला खीळ बसत असल्याचे वायकर यांनी निदर्शनास आणून दिले.

​खासदार वायकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोकण रेल्वे आपल्या क्षमतेच्या १७५% पेक्षा जास्त वापर करत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या एक वेगळे कॉर्पोरेशन असल्याने, इतर रेल्वे झोनप्रमाणे कोकण रेल्वेला केंद्राकडून थेट ‘अर्थसंकल्पीय साहाय्य’ मिळत नाही. निधीच्या प्रचंड टंचाईमुळे सुमारे ३५० किमी मार्गाचे दुहेरीकरण (Doubling) आणि भूस्खलन रोखण्यासारखी महत्त्वाची सुरक्षा कामे रखडली आहेत. पुरेशा पायाभूत सुविधांअभावी या मार्गावर नवीन गाड्या सुरू करणेही आता अशक्य झाले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

​विलीनीकरणाच्या प्रक्रियेत राज्यांच्या सहमतीचा मुद्दाही आता मार्गी लागला आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या विलीनीकरणाला अधिकृत मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने केवळ एकच अट घातली आहे की, विलीनीकरणानंतरही या ऐतिहासिक ब्रँडचे नाव ‘कोकण रेल्वे’ असेच कायम ठेवण्यात यावे, ज्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. सर्व संबंधित राज्यांची संमती मिळाल्यामुळे आता विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

​शेवटी, केंद्र सरकारने ही विलीनीकरण प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी रवींद्र वायकर यांनी केली आहे. विलीनीकरण झाल्यास कोकण रेल्वेला आवश्यक तो निधी उपलब्ध होईल, ज्यामुळे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होऊन कोकणच्या विकासाला नवी गती मिळेल. कोकण रेल्वे हा या भागाचा कणा असून, या प्रदेशातील जनतेचा हा हक्क असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.

नियम ३७७ काय आहे? 

लोकसभेतील नियम ३७७ हा खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील किंवा देशपातळीवरील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वापरता येणारा नियम आहे. या नियमांतर्गत खासदार सभागृहात तोंडी चर्चा न करता लिखित स्वरूपात निवेदन सादर करतो. या निवेदनावर कोणतीही चर्चा होत नाही तसेच संबंधित मंत्र्यांना तात्काळ उत्तर देणे बंधनकारक नसते. मात्र, हा विषय लोकसभेच्या अधिकृत नोंदीत समाविष्ट होतो आणि संबंधित मंत्रालय किंवा विभागाच्या लक्षात अधिकृतपणे आणला जातो. रेल्वे, रस्ते, पाणीपुरवठा, नैसर्गिक आपत्ती, विकासकामे रखडणे, स्थानिक समस्या अशा अनेक विषयांसाठी नियम ३७७ चा वापर केला जातो. त्यामुळे हा नियम थेट निर्णयासाठी नसला, तरी सरकारवर लक्ष केंद्रित करून पुढील कारवाईसाठी दबाव निर्माण करणारा महत्त्वाचा संसदीय उपाय मानला जातो.

Facebook Comments Box

त्रि-भाषा सूत्राचा अंतिम अहवाल तयार; मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होणार.

   Follow us on        

मुंबई | १० फेब्रुवारी, २०२६

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणामध्ये त्रि-भाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या आठ सदस्यीय समितीने आपला अंतिम अहवाल सोमवारी (९ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने भाषा धोरणासोबतच इयत्ता पहिलीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (ICT) सुरू करण्याबाबतचा एक पूरक अहवालही सादर केला आहे.

​अहवालाचे स्वरूप: मुख्य अहवाल ६५ पानांचा असून त्यासोबत ६० पानांची परिशिष्टे आहेत. तर, शालेय शिक्षणात AI च्या वापराबाबतचा अहवाल २५ पानांचा आहे.

अंमलबजावणी: नरेंद्र जाधव यांनी या शिफारशी आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याची सूचना केली आहे.

​मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया: “आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालावर सविस्तर चर्चा करू. शिफारसींमध्ये काही बदलांची गरज आहे का, हे तपासून त्यानंतरच अहवालातील तपशील जाहीर केले जातील,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

​पार्श्वभूमी आणि वाद:

​२०२५ मध्ये महाराष्ट्र सरकारने प्राथमिक स्तरावर त्रि-भाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्राथमिक शिक्षणात ‘हिंदी’ सक्तीची करण्याला राजकीय आणि सामाजिक स्तरातून मोठा विरोध झाला. सध्या राज्यात पाचवीपासून तीन भाषा शिकवल्या जातात. प्राथमिक स्तरावर तिसरी भाषा लादल्यास मुलांवर ओझे वाढेल आणि मराठी भाषेवर अन्याय होईल, असा पवित्रा अनेक संघटनांनी घेतला होता.

​जनतेचा वाढता विरोध पाहून सरकारने तो निर्णय रद्द केला होता आणि रघुनाथ माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही नवीन समिती नेमली होती.

​पुढील पाऊल:

​हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच त्रि-भाषा सूत्र आणि AI च्या वापराबाबतचे नेमके धोरण स्पष्ट होईल.

Facebook Comments Box

Cricket: शुभमन, बुमराह ग्रेड A मध्ये, तर रोहित-कोहली ग्रेड B मध्ये! बीसीसीआयने जाहीर केले वार्षिक करार

   Follow us on        

नवी दिल्ली: बीसीसीआयकडून २०२५–२६ साठी टीम इंडियाच्या वार्षिक करारांची घोषणामुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२५–२६ या हंगामासाठी (१ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६) टीम इंडिया वरिष्ठ पुरुष व वरिष्ठ महिला संघासाठी वार्षिक खेळाडू करारांची घोषणा केली आहे. ही माहिती बीसीसीआयने ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या मीडिया अ‍ॅडव्हायझरीद्वारे दिली.

या करार यादीत खेळाडूंना ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C अशा तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.

टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) – वार्षिक करार २०२५–२६

ग्रेड A मधील खेळाडू

  1. शुभमन गिल
  2. जसप्रीत बुमराह
  3. रवींद्र जडेजा

 

ग्रेड B मधील खेळाडू

  1. वॉशिंग्टन सुंदर
  2. रोहित शर्मा
  3. विराट कोहली
  4. के. एल. राहुल
  5. मोहम्मद सिराज
  6. हार्दिक पंड्या
  7. ऋषभ पंत
  8. कुलदीप यादव
  9. यशस्वी जयस्वाल
  10. सूर्यकुमार यादव
  11. श्रेयस अय्यर

ग्रेड C मधील खेळाडू

  1. अक्षर पटेल
  2. तिलक वर्मा
  3. रिंकू सिंग
  4. शिवम दुबे
  5. संजू सॅमसन
  6. अर्शदीप सिंग
  7. प्रसिद्ध कृष्णा
  8. आकाश दीप
  9. ध्रुव जुरेल
  10. हर्षित राणा
  11. वरुण चक्रवर्ती
  12. नितीश कुमार रेड्डी
  13. अभिषेक शर्मा
  14. साई सुदर्शन
  15. रवि बिश्नोई
  16. ऋतुराज गायकवाड

 

टीम इंडिया (वरिष्ठ महिला) – वार्षिक करार २०२५–२६

ग्रेड A मधील खेळाडू

  1. हरमनप्रीत कौर
  2. स्मृती मंधाना
  3. जेमिमा रोड्रिग्स
  4. दीप्ती शर्मा

 

ग्रेड B मधील खेळाडू

  1. रेणुका ठाकूर
  2. शेफाली वर्मा
  3. ऋचा घोष
  4. स्नेह राणा
  5. राधा यादव
  6. अमनजोत कौर
  7. प्रतिका रावल
  8. क्रांती गौड
  9. उमा छेत्री
  10. अरुंधती रेड्डी

 

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे आगामी आंतरराष्ट्रीय हंगामासाठी संघाची रूपरेषा स्पष्ट झाली असून, युवा आणि अनुभवी खेळाडूंना योग्य संधी देण्याचा प्रयत्न दिसून येतो.

ही करार यादी बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर आज धावणार अनारक्षित मेमू गाड्या

   Follow us on        

रत्नागिरी/सावंतवाडी, दि. १० फेब्रुवारी २०२६ :

निवडणूकीहून परतणाऱ्या चाकरमान्यांना तसेच कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी गेलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष अनारक्षित मेमू (MEMU) गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या अंतर्गत सावंतवाडी रोड–पनवेल आणि पनवेल–रत्नागिरी दरम्यान विशेष TOD (Train on Demand) मेमू सेवा सुरू करण्यात आली आहे. या गाड्या मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी चालवण्यात येणार असून प्रवाशांना रात्री व दिवसा प्रवासाची अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे.

सावंतवाडी रोड–पनवेल विशेष मेमू (गाडी क्र. 01158)

ही गाडी सकाळी ०९.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून झारप, कुदाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, कोलाड, रोहा व पेन मार्गे रात्री ०८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे.

पनवेल–रत्नागिरी विशेष मेमू (गाडी क्र. 01157)

ही गाडी रात्री ०८.२५ वाजता पनवेल येथून सुटून पेन, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विंहेरे, दिवानखवटी, कलंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सवर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबे घेत बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ०४.०० वाजता रत्नागिरी येथे दाखल होणार आहे.

या विशेष मेमू गाड्या अनारक्षित असून मोठ्या प्रमाणावर होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले कर्मचारी, मुंबई–पनवेल परिसरातील चाकरमानी तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी गेलेले भाविक यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचेही सांगितले आहे.

Facebook Comments Box

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: ७०,००० सरकारी पदांची मेगाभरती; भरती प्रक्रियेत मोठे बदल केले जाणार

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्य प्रशासनात गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, येत्या काळात राज्यभरात ७०,००० रिक्त सरकारी पदे भरण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या एकूण पदभरतीपैकी सुमारे ५०,००० पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून, यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

​या नवीन भरती प्रणालीमध्ये केवळ पदे भरणे हाच उद्देश नसून, संपूर्ण निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि आधुनिकता आणण्यावर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भरतीचे निर्णय हे संबंधित पदासाठी लागणारी कौशल्ये, सेवा प्रवेश नियम, पात्रता निकष आणि कामाचे स्वरूप यावर आधारित असतील. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी ऑनलाइन आणि डिजिटल पडताळणी प्रणाली विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या ‘मानव संसाधन व्यवस्थापन मॉडेल’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत कौतुक झाले असून, इतर राज्यांनाही हे मॉडेल स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​प्रशासकीय सुधारणांचा भाग म्हणून राज्य सरकार लवकरच सेवा भरती नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. पुढील एका वर्षात महाराष्ट्रात एक नवीन ‘गव्हर्नन्स रिफॉर्म मॉडेल’ (प्रशासकीय सुधारणा प्रारूप) आकाराला येईल, ज्यामध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची असेल. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे शासकीय कामात कार्यक्षमता वाढण्यासोबतच, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: वंदे भारत एक्स्प्रेसची गुरांना धडक; कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प

   Follow us on        

सिंधुदुर्ग | दि. ९ : कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची अचानक रुळावर आलेल्या बैल आणि म्हशींना धडक बसली. या अपघातात काही गुरे मृत्युमुखी पडली. धडकेमुळे रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा खांब वाकला आणि वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी कुडाळ–मडगाव दिशेची सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली.

अपघातानंतर वंदे भारत एक्स्प्रेस जागीच थांबवण्यात आली. विद्युत वाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने डिझेल इंजिन लावून गाडी घटनास्थळावरून हलवली. सुमारे दुपारी २ वाजता वंदे भारत एक्स्प्रेस घटनास्थळावरून रवाना करण्यात आली. त्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प झाली होती. कुडाळ स्थानकात मांडवी एक्स्प्रेस, उदना एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, तर झाराप स्थानकात राजधानी एक्स्प्रेस थांबवण्यात आली. सावंतवाडीत दूरांतो एक्स्प्रेस, मडुरा स्थानकात मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि कणकवलीत मंगला एक्स्प्रेसही थांबवून ठेवण्यात आल्या.

वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज आंगणेवाडी जत्रेसाठी प्रवास करणाऱ्या भाविकांचा परतीचा प्रवासही काही काळ लांबला. अखेर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

Facebook Comments Box

भारत पाकिस्तान सामना होणार! पाकिस्तानचा बहिष्कार निर्णय मागे, ICC चर्चेनंतर यू-टर्न

   Follow us on        

कोलंबो: ICC टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान या बहुचर्चित सामन्यावरून निर्माण झालेला वाद अखेर निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याचा निर्णय मागे घेतला असून, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे हा सामना खेळवला जाणार असल्याचे वृत्त आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या भूमिकेमुळे PCB अडचणीत आले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कठोर भूमिका घेत संभाव्य कारवाईचा इशारा दिल्यानंतर PCB ने आपली भूमिका बदलली. ICC चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लाहोरमध्ये PCB सोबत प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच ICC चे CEO संजोग गुप्ता यांनी कोलंबोमध्ये PCB अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या बैठकींना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लामही उपस्थित होते. चर्चेनंतर भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता बळावली आहे. ICC ने ‘फोर्स मॅज्यूर’ कलमाचा आधार घेत सामना टाळण्याच्या PCB च्या भूमिकेवर स्पष्टीकरणही मागितले होते.

दरम्यान, बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांना स्पर्धेतून वगळून स्कॉटलंडला संधी देण्यात आली होती. पाकिस्तानने सुरुवातीला बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ICC च्या मध्यस्थीमुळे आणि खेळाच्या हिताला प्राधान्य देत पाकिस्तानने अखेर यू-टर्न घेतला आहे.

आता क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना मानला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथे रंगणार असल्याची दाट शक्यता आहे.

Facebook Comments Box

आता सबब नको! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या ‘त्या’ गाडीच्या डब्यांत वाढ करण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने ‘गाडी क्रमांक २२६२९/२२६३० तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस’चे टर्मिनल बदलून ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कोकण विकास समितीने स्वागत केले असून, आता ही गाडी २२ किंवा २४ डब्यांची (LHB कोच) करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.

​१५ एप्रिल २०२६ पासून तिरुनेलवेली येथून आणि १६ एप्रिल २०२६ पासून मुंबईतून सुटणारी ही गाडी दादरऐवजी एलटीटीवरून धावेल. दादर स्थानकातील तांत्रिक अडचणींमुळे या गाडीचे डबे वाढवता येत नव्हते त्यामुळे ती १६ डब्यांसह चालविण्यात येत असे, आता तो अडथळा आता दूर झाला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मार्गावर प्रवाशांची सतत मोठी गर्दी आणि प्रतीक्षा यादी असते, त्यामुळे डब्यांची संख्या वाढवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रेल्वेची क्षमता अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे

तसेच ही डबेवाढ वेळेबद्ध पद्धतीने अंमलात आणून प्रवाशांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानत, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या गरजांकडे भविष्यातही सकारात्मक लक्ष दिले जाईल, अशी आशा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

शिमगोत्सवासाठी एसटीकडून मुंबई–कोकण मार्गावर विशेष बससेवा; वेळापत्रक ईथे पहा

   Follow us on        

मुंबई: कोकणातील शिमगोत्सव (होळी) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी २०२६ मध्ये जादा वाहतुकीची विशेष योजना जाहीर केली आहे. मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातून मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात असल्याने ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

या जादा वाहतुकीअंतर्गत मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, ठाणे, बोरीवली, नालासोपारा आदी प्रमुख ठिकाणांहून कोकणातील खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, लांजा, कासे, सायन, देवगड, शिर्डी यांसह विविध गावी जाणाऱ्या बसेस सोडण्यात येणार आहेत.

या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

​मुंबई सेंट्रल आगार (२७ फेब्रुवारी २०२६ पासून)

​मुंबई सेंट्रल ते कासे: रात्री ८:३० वाजता

​मुंबई सेंट्रल ते खेड: रात्री ९:३० वाजता

​मुंबई सेंट्रल ते गुहागर: रात्री १०:०० वाजता

​मुंबई सेंट्रल ते दापोली: रात्री १०:४५ वाजता

​परळ आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)

​परळ ते दापोली: सकाळी ६:०० वाजता

​परळ ते देवरुख: संध्याकाळी ७:३० वाजता

​परळ ते खेड: रात्री १०:०० वाजता

कुर्ला नेहरू नगर व सायन (२७ फेब्रुवारी २०२६ पासून)

​कुर्ला ते गुहागर: रात्री ९:३० वाजता

​कुर्ला ते खेड: रात्री १०:३० वाजता

​सायन ते दापोली: संध्याकाळी ७:३० वाजता

​ठाणे CBS आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)

​ठाणे ते महाड: सकाळी ८:०० आणि रात्री ११:३० वाजता

​ठाणे ते खेड शिंदी: रात्री ९:०० वाजता (मार्गे: पनवेल, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर)

​ठाणे ते साखरपा: रात्री ९:१५ वाजता

​ठाणे ते गुहागर: रात्री ९:३० वाजता

​ठाणे ते खेड: रात्री ९:४५ वाजता

​ठाणे ते दापोली: रात्री ९:४५ वाजता

​बोरीवली आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)

​बोरीवली ते खेड: सकाळी ८:३० वाजता

​बोरीवली ते लांजा: संध्याकाळी ६:३० वाजता

​बोरीवली ते दापोली: रात्री ९:३० वाजता (ठाणे मार्गे)

विठ्ठलवाडी आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)

​विठ्ठलवाडी ते चिपळूण: सकाळी ५:४७ आणि रात्री ९:०१ वाजता

​विठ्ठलवाडी ते महाड: सकाळी ६:३२ वाजता

​विठ्ठलवाडी ते खेड: सकाळी ८:०० वाजता

​विठ्ठलवाडी ते गुहागर: रात्री ८:३२ वाजता

​विठ्ठलवाडी ते दापोली: रात्री ९:०२ आणि ९:१६ वाजता

मिळणाऱ्या विशेष सवलती:

​१. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना: ७५ वर्षांवरील सर्व प्रवाशांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा (अटी लागू).

२. महिला सन्मान योजना: सर्व महिला प्रवाशांना तिकीट दरात ५०% सवलत देण्यात येत आहे (अटी लागू).

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search