सिंधुदुर्ग : एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीत आलेल्या व्यक्तिचा त्या मृतदेहासोबत दरीत पडून मृत्यू झाल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कराड येथील एका विट व्यावसायिकाने एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला व्यावसायिकाने एका मित्राच्या मदतीने मारहाण केली. या मारहाणी दरम्यान त्या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो व्यावसायिक आणि त्याचा मित्राने सरळ आंबोली गाठली आणि मृतदेह एका खोल दरीत टाकायचे ठरवले. पण तो मृतदेह दरीत टाकताना त्या व्यावसायिकाचा पाय घसरला आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. व्यावसायिकचा मित्र आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही मृतदेह पण सापडले आहेत. मारहाणी दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमूळे न होता हार्ट अॅटॅक मुळे झाला असल्याचेही त्याने सांगितले. नेमकी घटना काय आहे ह्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. आज दिनांक 31 जानेवारीपासून ऑनलाईन पध्दतीने हे अर्ज स्विकारले जातील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2023 आहे.
परीक्षेकरिता अर्जप्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटला क्लिक करून उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत आहे
प्रवेशपत्र डाऊनलोड
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 प्रवेशपत्र दिनांक १५/०२/२०२३ पासून डाउनलोड करू शकता
वेळापत्रक
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)
परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्त्वाचे
अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्य राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी.
स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे. सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल.
ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
सिंधदुर्ग :दिनांक 1 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग विमानतळावरून पहिल्यांदा राज्याबाहेरील विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे. देशातील दोन महत्त्वाच्या शहरांसोबत सिंधुदुर्ग जोडला जाणार आहे. मुंबई- सिंधुदुर्ग-मुंबई ही सेवा देणार्या अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैदराबाद-मैसूर-सिंधुदुर्ग-मैसूर- हैदराबाद या दुसर्या विमानसेवेचा प्रारंभ होत आहे.
सुरवातीला दर बुधवारी आणि रविवारी अशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा उपलब्ध असेल. या सेवेच्या प्रारंभाने सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैद्राबाद आणि दक्षिणेस मैसूर या देशातील अत्यंत महत्वाच्या शहराशी विमानसेवेने जोडला जाणार आहे .अशी माहिती आयआरबी कंपनीच्या प्रसिद्ध विभागातून देण्यात आली.
वेळापत्रक
शहर
HYD -SDW
SDW – HYD
हैदराबाद
13:40 ⇓
21:55
म्हैसूर
16:00
19:30
सिंधुदुर्ग
17:30
18:00 ⇑
प्रवास मार्ग
प्रवास भाडे
सिंधुदुर्ग – हैदराबाद
4,613.00
हैदराबाद – सिंधुदुर्ग
6,158.00
प्रवास मार्ग
प्रवास भाडे
सिंधुदुर्ग – म्हैसूर
2,513.00
म्हैसूर – सिंधुदुर्ग
3,353.00
Note : The information given above is indicative.
कोकणातल्या प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.
Konkan Railway News : आंगणेवाडी जत्रेसाठी जाणार्या भाविकां साठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोकणरेल्वेतर्फे सोडण्यात आलेल्या विशेष Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly) या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 31 जानेवारीपासून सकाळी रेल्वे च्या सर्व आरक्षण तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
या गाडीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून त्यासंबंधी बातमी वाचा.
Konkan Railway News : कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने फेब्रुवारी आणि मार्च या २ महिन्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावर एक आठवडी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिच्या विचित्र वेळापत्रकामुळे तिचा फायदा कोकणवासीयांना होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly) दर शनिवारी ही गाडी सुरतकल या स्थानकावरुन संध्याकाळी 7:40 वाजता सुटणार आहे. या गाडीची सावंतवाडी स्थानकावर येण्याची वेळ रात्री 01:52, कुडाळला 02:24 , सिंधुदुर्गला 02:36, कणकवलीला 02:52, रत्नागिरीला 05:55 तर संगमेश्वर या स्थानकावर पहाटेचा 06:50 असा आहे. या विचित्र वेळेला स्थानकावर पोहोचून गाडी पकडणे खूपच गैरसोईचे आहे. त्यामुळे तळकोकणातील प्रवाशांसाठी ती असून नसल्यासारखी आहे.
कोकणातील बहुतेक स्थानके मुख्य शहरापासून दूर आहेत. संध्याकाळी 7 नंतर एसटीची सेवा बंद होते. खाजगी वाहतुक दिवसा परवडत नाही तर रात्रीचे विचारूच नका. बहुतेक रस्ते निर्जन आणि जंगल भागातून जाणारे आहेत त्यामुळे अनेक समस्या येतात. रात्री जंगलातील प्राणी (खासकरून गवा रेडा) सर्रास रस्तावर येत असल्यामुळे या रस्त्यांतून रात्रीचा प्रवास करताना दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
याआधी असेच विचित्र वेळापत्रक आखून विशेष गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या विशेष गाड्या कोकणच्या प्रवाशांसाठी सोडल्या जात आहेत की दक्षिणेकडील प्रवाशांसाठी सोडल्या जात आहे असा प्रश्न कोकणातील प्रवाशांकडून विचारला जात आहे.
Mumbai-Goa Highway News | मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे आणि महामार्गावर होणाऱ्या दुय्यम कामामुळे येथे होणाऱ्या अपघातांस सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे माणगाव येथील लोणेरे येथील भीषण अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी मुंबई गोवा जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दिनांक १९/०१/२०२३ रोजी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रक समोरासमोर आढळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. जर महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता तर हा अपघात टळला असता. या अपघातास पूर्णपणे सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारतर्फे त्वरित नुकसान भापाई जाहीर करण्यात यावी अशी समितीची मागणी आहे.
कोकणातील जनतेसोबत दुजाभाव का?
चार दिवसापूर्वी तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली होती . चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली होती .सदर घटना घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्वरित 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. ईतरांना मदत जाहिर होते तर कोकणाला का नाही? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.
कोकणाला आणि कोकणातील जनतेला नेहमीच दुय्यम स्थान देणार असाल तर आता कोकणकर शांत बसणार नाही .या अपघातात निधन झालेल्याना लवकरात लवकर मदत जाहिर करावी तसेच शिमग्यापूर्वी कामाला सुरुवात करून प्रवासासाठी प्रवासायोग्य महामार्ग करावा अन्यथा विविध संघटना,मंडळ आणि कोकणकर लवकरच मुंबईत आणि शिमग्यानंतर रस्त्यावर उतरून कोकणातील आजी माजी नेत्यांच्या नावे शिमगा करतील अशी चेतावणी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे देण्यात आली आहे.
खेड : खेड तालुक्यातील सत्विणगाव येथे लागलेल्या वणवा विझवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर ग्रामस्थांनी हल्ला केला. या हल्ल्यात २ कर्मचारी जखमी झाले आहेत.याप्रकरणी २० संशयितांविरोधात पोलीस व वनविभागाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील सत्विणगाव येथील संरक्षित वनक्षेत्राच्या उत्तर दिशेच्या खाजगी मालकी क्षेत्रात वणवा लागल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वनपाल खेड, वनरक्षक काडवली, वनरक्षक तळे, वनरक्षक खवटी व मौजे मोरवंडे चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वणवा विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी मौजे दाभिळ, बैकरवाडी खेड येथील २० ते २५ जण घटनास्थळी आले. त्यांना हा वणवा वन कर्मचाऱ्यांनी लावला असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला.
निलेश फावरे (रा.दाभिळ, बैकरवाडी) व इतर २० जणांनी तळे वनरक्षक परमेश्वर नवनाथ डोईफोडे यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले. वनरक्षक काडवली अशोक अजिनाथ ढाकणे यांनाही मारहाण केली. त्यांनी वनक्षेत्राच्या हद्दीखुणामध्ये बदल केला. दरम्यान, जखमी परमेश्वर डोईफोडे यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी निलेश फावरे (रा . दाभिळ , बैकरवाडी), अरविंद फावरे (रा. दाभिळ, बैकरवाडी), धोंडु बैकर (रा . दाभिळ, बैकरवाडी) यांच्यासह २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बास्केट ब्रिज भूमिपूजनाच्या कार्यक्रमात होणाऱ्या ब्रिजच्या रस्त्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.कितीही मोठा पूर आला तरी पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबणार नाही. सांगली-कोल्हापुरात सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधू.पुढचे ५० वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची हमी देतो, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.गेली अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात महापरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच महापुराचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गावर येत असल्यामुळे अनेक दिवस या परिसरातील वाहतूकही ठप्प होत असते. यासाठी सातारा ते निपाणी या दरम्यान सहा पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुलावरून थेट कोल्हापूरपर्यंत बास्केट ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. याची पायाभरणी तसेच रत्नागिरी कोल्हापूर राज्य मार्ग चौपदरीकरण टप्पा 2 , रत्नागिरी कोल्हापूर चौपदरीकरण टप्पा 3 याचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘पुण्यासाठी लवकरत रिंग रोड बांधणार आहे. नागपूर ते कोल्हापूर सात तासात अंतर पार होईल अशी व्यवस्था करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात टेक्नॉलॉजीच्या आधारावर नवीन उद्योग झाले पाहिजेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना ऊर्जा दाता बनवलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यानेच पुढाकार घेतला पाहिजे’. असे गडकरी म्हणाले
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे २०२४ ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “३४ मतदारसंघाची यादी पाहिली नाही. पण, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा उमेदवारी देतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, नारायण राणे लोकसभा निवडणुकीत उभे राहिले, तर अडीच लाख मतांनी त्यांचा पराभव करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे,” असं विनायक राऊत यांनी सांगितलं.
“केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे दिल्ली सोडून जिल्हा नियोजनाच्या बैठकीला येऊन बसतात. त्यांच्या खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला राणेंनी पुन्हा सेवेत घेतलं. त्या अधिकाऱ्याने पदाचा दुरुउपयोग करुन नारायण राणेंच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार केला,” असं विनायक राऊत यांनी म्हटलं.
तसेच, “त्या अधिकाऱ्याने दोन तरुणींची फसवणूक करुन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे लवकरच नारायण राणेंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे,” असा दावा विनायक राऊत यांनी केला.
‘इंडिया टुडे’ आणि सी-वोटर’चा एक सर्वे समोर आला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्या पार्शवभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.
कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्याच क्षणी त्याचा हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : हल्लीच सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे गावात एक बैल सापडला आहे. या बैलाच्या पाठीवर व्यंग असलेला पाचवा पाय असल्यामुळे हा बैल विशेष चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यालगतच्या कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोक देवाचा बैल (पांगुळ बैल) घेऊन कोकणात आपल्या उपजीविकेसाठी येतात अशापैकी कोणाच्या मालकीचा हा बैल असून त्याची मालकाबरोबर ताटातूट झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हा बैल कारिवडे येथील ग्रामस्थ संजय जाधव यांच्या घरी बांधून ठेवण्यात आलेला आहे. या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था समाजसेवक आणि माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर तसेच रवी परब व इतर ग्रामस्थांनी केली आहे. बैल सापडल्याची बातमी त्यांनी पत्रकारांना देऊन या बैलाच्या मालकाने संपर्क साधून तो घेऊन जावा असे आवाहन केले होते. पण १० ते १२ दिवस उलटले तरी अजून या बैलाच्या मालकाचा पत्ता लागला नाही आहे.
सर्वात मोठी समस्या म्हणजे हा बैल येथील ओली चार आणि सुके गवत किंवा पेंड खात नाही. त्याला लागणारा चारा येथील आजूबाजूच्या गावी सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तो मालवण तालुक्यातील धामापूर येथून तो आणावा लागतो. कारिवडे ते धामापूर हे अंतर जवळ जवळ ४० किमी आहे. चारा जास्त दिवस टिकत नसल्याने दर २ दिवसांनी तो आणावा लागतो. दुसरे म्हणजे या बैलाला असे सोडून देऊ शकत नाही कारण त्याची उपासमार होईल. पुढील काही महिने येथील नद्यांचे पाणी पण आटते त्यामुळे पाणीपण त्याला भेटणार नाही.
कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्याच क्षणी हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात. प्राण्यांना भावना असतात हे ऐकण्यात आले होते पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती येथील ग्रामस्थ घेत आहेत.
कारिवडे गावचे मंगेश तळवणेकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी या बैलाला असाच वाऱ्यावर न सोडता त्याची जबाबदारी घेऊन भूतदया आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
ही बातमी सर्वदूर पोहचवा जेणेकरून मूळ मालकापर्यंत हि बातमी पोहोचेल आणि आणि या बैलाची त्याच्या मालकाशी भेट होईल. जो कोणी मालक असेल त्यांनी ९४२१२६९४४४ या नंबरवर संपर्क साधावा. इथे येऊन ओळख पटल्यानंतरच हा बैल सुपूर्त करण्यात येईल. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च करण्यात येईल असे मंगेश तळवणेकर म्हणाले आहेत.