Category Archives: महाराष्ट्र

रुळांवर मानवनिर्मित अडथळ्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच’ मोहीम सुरू

   Follow us on        

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागात रेल्वे रुळांवर लोखंडी सामान, लाकूड किंवा दगड ठेवणे आणि धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. खेळण्याच्या उत्सुकतेपोटी किंवा कुतूहलामुळे हे प्रकार होत असल्याचे आरपीएफच्या तपासात समोर आले आहे. यामुळे मोठ्या रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होत असून, प्रवाशांच्या जीवितास आणि रेल्वे मालमत्तेला मोठे नुकसान होऊ शकते.

रुळाजवळील शाळा, गावे आणि वस्त्यांतील मुलांमध्ये हे प्रकार अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, ज्यांना याची गंभीरता कळत नाही.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे आरपीएफ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. तपासणीतून उघडकीस आले की, बहुतेक घटनांमागे स्थानिक मुलांचा सहभाग असतो आणि त्यांना रेल्वे रुळांवर खेळणे किंवा दगड फेकण्याचे परिणाम समजत नाहीत. यामुळे आरपीएफने विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या मोहिमेत आरपीएफचे अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभाग घेत आहेत.‘कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच’ या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील आरपीएफ निरीक्षक आणि प्रभारी अधिकारी रेल्वे रुळांलगतच्या शाळा, गावे आणि वस्त्यांमध्ये नियमित भेटी देत आहेत. विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, पालकांशी आणि ग्रामप्रमुखांशी थेट संवाद साधून रेल्वे रुळांवर खेळणे, दगड ठेवणे किंवा फेकण्याच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. यातून मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित रेल्वे वातावरणाची महत्त्वता समजावून सांगितली जाते.

या जनजागृती मोहिमेमुळे रेल्वे सुरक्षा वाढवणे आणि अपघात टाळणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. आरपीएफने यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलांना सावध केले आहे, परंतु सध्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबत प्रशिक्षण देऊन जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उन्हाळा-पावसाळ्यात अखंड वीजपुरवठ्यासाठी एआयवर भर

   Follow us on        

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली.

उन्हाळा व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीचे व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करून कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

रूफटॉप सौर ऊर्जेमुळे वीज वितरण यंत्रणेला फायदा होत असून, वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धता आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. यासह आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळेस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: दिनांक १८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसीलदार दीक्षात देशपांडे, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.

 

कारवाईदरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला. आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ला पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.*

रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत, अगदी ३ वाजेपर्यंत कारवाई सुरू राहिली. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित तहसीलदार आणि त्यांच्या पथकांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वी करून दाखवली. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अशा प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

राज्यात २०-२२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता

   Follow us on        

मुंबई: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

समृद्धी महामार्गावर वर्षभरात धावली दीड कोटींच्यावर वाहने; रेकॉर्डब्रेक टोल वसूली

   Follow us on        

मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने वाहन संख्या आणि टोल वसुलीमध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या ७०१ किमी लांबीच्या महामार्गावरून तब्बल १.५५ कोटी वाहनांनी प्रवास केला. या माध्यमातून वर्षभरात १,२४०.०४ कोटी रुपयांचा टोल महसूल गोळा झाला असून, हा आकडा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४९९.४१ कोटी रुपयांनी अधिक आहे. समृद्धी महामार्गाच्या इतिहासात टोल वसुलीने एकाच वर्षात १,००० कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

​या महामार्गाच्या प्रवासाकडे नजर टाकल्यास, २०२२-२३ मध्ये जेव्हा हा मार्ग अंशतः खुला झाला होता, तेव्हा पहिल्या चार महिन्यांत १३.५९ लाख वाहनांमधून १०६.४१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यानंतर २०२३-२४ मध्ये वाहनांची संख्या ६८.९९ लाखांवर पोहोचली आणि ५२८.१० कोटींचा टोल जमा झाला. २०२४-२५ मध्ये वाहनांच्या संख्येने १ कोटीचा टप्पा पार केला होता, ज्यातून ७४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गिकेचा वापर सातत्याने वाढत असून, आतापर्यंत एकूण ३.४४ कोटी वाहनांनी यावरून प्रवास केला आहे आणि त्यातून एकूण २,६६० कोटी रुपयांचा टोल जमा झाला आहे.

मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाविरोधात खासदार अरविंद सावंत आक्रमक

   Follow us on        

​नवी दिल्ली:उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाट्याला मध्य रेल्वेकडून येत असलेल्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत आवाज उठवला आहे. मध्य रेल्वेचे धोरण ‘उत्तर भारत केंद्रित’ असल्याचा आरोप करत सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना एक सविस्तर पत्र सादर करून कोकणवासीयांच्या भावना आणि आकडेवारीनिशी रेल्वेचा दुजाभाव त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

​खासदार सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्य रेल्वेने १९ मार्गांवर एकूण १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले असताना, त्यातील तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी आणि ३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या आहेत. याउलट, मुंबईतून लाखो प्रवासी ज्या कोकण मार्गावर अवलंबून असतात, तिथे केवळ ३६ गाड्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, उत्तर भारतासाठी धावणाऱ्या गाड्या दररोज उपलब्ध आहेत, तर मुंबई-मडगाव विशेष गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान आठवड्यातून केवळ एकदाच सोडली जाणार आहे. हा विरोधाभास संतापजनक असून कोकणी प्रवाशांची क्रूर थट्टा असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.

​नियमित गाड्यांची स्थितीही बिकट असून मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस सारख्या गाड्यांच्या स्लीपर क्लासची वेटिंग लिस्ट १०० च्या पुढे गेली आहे. सध्या कोकणातील रस्त्यांची दुरवस्था आणि घाटातील वाहतूक कोंडी पाहता रेल्वे प्रवास हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करावी, विशेष गाड्यांच्या फेऱ्या ‘दररोज’ कराव्यात आणि अतिरिक्त रेक्स (डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रमुख मागण्या त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत. हा अन्याय त्वरित दूर न झाल्यास कोकणच्या जनतेचा उद्रेक होईल आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.

शालेय अभ्यासक्रमातून मराठी विषय डावलणाऱ्या शाळांविरुद्ध राज्य सरकार आक्रमक

   Follow us on        

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत सविस्तर कार्यपद्धती निश्चित करून शासन निर्णय जारी केला आहे.या निर्णयानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस दिली जाईल आणि १५ दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. खुलासा समाधानकारक न झाल्यास शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील.

शाळेला निर्णयाविरुद्ध ३० दिवसांच्या आत अपील करण्याची संधी दिली जाईल. अपिलानंतरही आदेशाचे पालन न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन तीन महिन्यांच्या आत करण्यात येणार आहे.

या उपाययोजनांमुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आयबीसह) आणि खासगी-सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचे प्रभावी अध्यापन सुनिश्चित होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून तिचे संवर्धन आणि नव्या पिढीला मातृभाषेचे ज्ञान देणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत आहे.

Photo Credit – AI

 

 

एसटी प्रवाशांवर दोन रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’; सुट्या पैशांवरून वाहक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाद

   Follow us on        

मुंबई:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ (Cleanliness Surcharge) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे एसटी प्रवासासाठी आता प्रवाशांना अतिरिक्त दोन रुपये मोजावे लागणार आहेत. विशेषतः ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत १०० टक्के सवलत मिळणाऱ्या प्रवाशांनाही आता हे दोन रुपये द्यावे लागत असल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

​या नवीन नियमामुळे बसमध्ये सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांच्यात शाब्दिक चकमकी होत असल्याचे समोर आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी पूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत होती, ते आता अतिरिक्त दोन रुपये देण्यास टाळाटाळ करत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून यूपीआय (UPI) पेमेंटचा पर्याय उपलब्ध असला तरी, गेल्या आठवड्यात सर्व्हर डाऊन असल्याने प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जाऊनही महामंडळाच्या खात्यात ते जमा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे मशीनमधून तिकीट निघत नसल्याने वाहकांची मोठी पंचाईत होत आहे.

​महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. महामंडळाची ही स्वच्छता योजना हेतूने चांगली असली तरी, दोन रुपयांच्या वसुलीमुळे रोज सुमारे अडीच लाख अमृत ज्येष्ठ नागरिक आणि वाहकांमध्ये वाद होत आहेत. या वादांमुळे एसटीची बदनामी होत असून, प्रशासनाने यावर काहीतरी सुवर्णमध्य किंवा तोडगा काढावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे. दरम्यान, ‘महिला सन्मान योजना’ आणि इतर सवलतधारक प्रवाशांच्या बाबतीत हा अधिभार नक्की कसा लागू राहील, याबाबत अद्याप काही संभ्रम कायम आहेत.

ॲप आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात टॅक्सी चालकांचा पुण्याहून मुंबईपर्यंत पायी प्रवास

   Follow us on        

मुंबई: अॅप-आधारित टॅक्सी कंपन्यांकडून होणारी पिळवणूक आणि अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील तीन कॅब चालकांनी सुमारे १५० किलोमीटरचा पायी प्रवास करून मुंबई गाठली आहे. परमेश्वर घोंगे, संतोष दुर्गे आणि वैभव भेगडे या ‘महाराष्ट्र कामगार सभे’शी संबंधित चालकांनी १० एप्रिल रोजी पुण्याहून या ‘न्याय पदयात्रे’ला सुरुवात केली होती. तळपत्या उन्हात, पायाला फोड येऊनही केवळ निर्धाराच्या जोरावर लोणावळा, खालापूर, पनवेल आणि वाशीमार्गे त्यांनी बुधवारी मुंबईत प्रवेश केला. हे चालक १५ एप्रिल रोजी आझाद मैदानावर पोहोचून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत.

​या आंदोलनाचा मुख्य उद्देश कंपन्यांच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करणे हा आहे. आंदोलक चालकांच्या म्हणण्यानुसार, ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या सरकारनं ठरवून दिलेल्या भाडेदरांचे पालन करत नाहीत. याशिवाय, ‘पॅनिक बटण’च्या नावाखाली चालकांकडून वारंवार केली जाणारी कपात, कमिशनमधील पारदर्शकतेचा अभाव आणि मुंबई-नागपूर सारख्या शहरांत विनापरवाना सुरू असलेल्या ‘बाईक टॅक्सी’मुळे होणारे नुकसान यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, हा लढा चालकांच्या हक्कासाठी असून जोपर्यंत शासन यावर ठोस पाऊल उचलत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील. दरम्यान, परिवहन विभागाने या कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश वारंवार दिले असल्याचे सांगत, कंपन्या एकमेकांवर बोट ठेवून जबाबदारी टाळत असल्याचा दावा केला आहे.

सावधान! राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

   Follow us on        

मुंबई, दि. १५ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,

मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी सूचना

उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ORS घ्यावे, हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घेणे व घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक व मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रशासनाची तयारी

प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जिल्हास्तरावर Heat Action Plan कार्यान्वित करणे तसेच रुग्णालयांत आवश्यक औषध साठा ठेवणे यावर भर दिला आहे. शाळांना सूचना देणे, गरजेनुसार वेळेत बदल करणे आणि माध्यमांद्वारे जनजागृती करणे यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येत आहेत.

 

विशेष सूचना

जनसमूह कार्यक्रमांसाठी सावली व पाण्याची सोय करावी, वैद्यकीय मदत व ORS उपलब्ध ठेवावे तसेच कार्यक्रमाचा वेळ शक्यतो बदलावा, असे सांगण्यात आले आहे. कामगार, शेतकरी व बाहेर काम करणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे, नियमित पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत.

नागरिक, स्थानिक संस्था व उद्योग क्षेत्राने दिलेल्या सूचनांचे पालन करून उष्णतेच्या लाटेमुळे होणारे धोके कमी करावेत, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search