Category Archives: महाराष्ट्र

जनशताब्दी एक्सप्रेस अडीच तास उशिरा पोहोचली! ठाणे स्थानकावर शेकडो चाकरमानी रात्रभर ताटकळत

   Follow us on        

ठाणे: कोकण रेल्वेची शान आणि वेगासाठी ओळखली जाणारी १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सोमवारी (९ मार्च) तब्बल अडीच तास उशिराने धावल्यामुळे होळीचा सण साजरा करून परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे स्थानकावर उतरलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरच्या प्रवाशांना शेवटची लोकल हुकल्यामुळे संपूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवर काढावी लागली.

​होळीच्या सुट्ट्या संपवून मुंबईत कामावर परतण्यासाठी कोकणातील प्रवाशांनी जनशताब्दी एक्सप्रेसला पसंती दिली होती. मात्र, कोकण रेल्वेच्या विस्कळीत नियोजनामुळे ही गाडी रात्री उशिरा मुंबईत पोहोचली. ठाणे स्थानकावर ही गाडी आली तेव्हा शेवटची लोकल सुटून अवघी १० मिनिटे झाली होती. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जतच्या दिशेला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची मोठी कोंडी झाली.

​प्रवाशांचा संताप: “आम्ही करायचे काय?”

​ठाणे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या प्रवाशांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली:

​ओला/उबेर परवडत नाही: लांबच्या प्रवासासाठी टॅक्सीचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक प्रवाशांनी स्थानकावरच थांबणे पसंत केले. एकटी महिला असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने या पर्यायाचा विचारच न केलेला बरा.

​अतिरिक्त लोकल का नाही?: “नवीन वर्षाचे स्वागत असो किंवा क्रिकेटचे सामने, रेल्वे प्रशासन रात्री उशिरापर्यंत जादा गाड्या चालवते. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत, जेव्हा एखादी महत्त्वाची एक्सप्रेस उशिरा येते, तेव्हा माणुसकीच्या नात्याने एखादी जादा लोकल का सोडली जात नाही?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

​प्लॅटफॉर्मवरच काढली रात्र

​शेवटची गाडी हुकल्याने प्रवाशांना पहाटेच्या पहिल्या लोकलची (सुमारे ४ तास) वाट पाहत प्लॅटफॉर्मवरच बसून किंवा झोपून राहावे लागले. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे “वेगाचा दावा करणाऱ्या जनशताब्दीने प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याऐवजी कष्टदायकच केला,” अशी भावना व्यक्त होत आहे.

​प्रशासनाला प्रश्न:

सणासुदीच्या काळात गाड्या उशिरा धावणार हे माहित असताना, समन्वय राखून शेवटची लोकल १० मिनिटे थांबवून ठेवता आली नसती का? किंवा प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था का केली गेली नाही?

Shaktipeeth Expressway: नागपूर – पत्रादेवी शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल; नवीन गावांची नावे समाविष्ट

   Follow us on        

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून आता या महामार्गाची नवी अलाइनमेंट पुढे आली आहे. राज्य शासनाने या बदलाला मंजुरी दिल्यानंतर महामार्गाची दिशा काही प्रमाणात बदलणार आहे.

नवीन अलाइनमेंटमुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून या भागातील वेगळ्या मार्गाने महामार्ग नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नव्या मार्गानुसार अनेक तालुक्यांतील गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.

नव्या अलाईन्मेंटनुसार संभाव्य गावे:

​नव्या प्रस्तावाप्रमाणे सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील तालुक्यांमधील गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे:

​पलूस तालुका: देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव, मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव.

​वाळवा तालुका: वाळवा, उरण, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळप, ऐतवडे खुर्द.

​हातकणंगले व पन्हाळा तालुका: पारगाव, बहिरेवाडी, जाखले, गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशिरे, मनपाडले.

​करवीर तालुका: केली, केळें, वरणगे, पाडळी बु., शिदेवाडी, खुपीरे, वाकरे, कुडित्रे, बहिरेेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दु., सडोली दु., भाटणवाडी, हसूर.

​राधानगरी तालुका: राशिवडे बु., कोदवडे, वाघवाडे, मोहाडे, माजगाव, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, सरवडे.

​कागल व भुदरगड तालुका: उंदरवाडी (कागल), खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवडे, पाचवडे, बसरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटिवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, कराडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुले, मेघोली, अरळगुंडी.

​आजरा तालुका: कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मासोळी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.

​चंदगड तालुका:गवसे, भुजवडे, कुर्णी, म्हाळुंगे, बिझूर, भोगोली, कानूर बु., पिलानी, जांबरे आणि इसापूर.

​दोडामार्ग तालुका:कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर आणि झोळंबे.

​सावंतवाडी तालुका: पडवे माजगाव, पडवे, देगाव आणि बांदा.

या बदलामुळे काही गावांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, महामार्ग प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रशासनाला मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

MSRTC: “राजमाता जिजाऊ” बससेवा लवकरच सेवेत दाखल होणार

   Follow us on        

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आणखी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद पाऊल उचलले आहे. स्वराज्याची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन अत्याधुनिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. एसटीच्या नव्या ५५ आसनी (३×२ आसन रचना) असलेल्या आधुनिक बसेसना “राजमाता जिजाऊ” असे नाव देण्यात आले असून या बसांची पहिली झलक समोर आली आहे. या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार असून अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा यामुळे हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला आकार मिळाला. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि संस्कारांमुळेच स्वराज्याची पायाभरणी झाली. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू होणारी ही बससेवा केवळ प्रवासाची सुविधा नसून इतिहासाचा आणि स्वराज्याच्या मूल्यांचा सन्मान मानला जात आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला सलाम करत ही “राजमाता जिजाऊ” बससेवा लवकरच राज्याच्या विविध मार्गांवर धावू लागणार आहे.

दक्षिण मुंबई – अलिबाग प्रवास ७५ मिनिटांवर आणणार्‍या रेवास–करंजा सागरी पूल प्रकल्पाला वेग

   Follow us on        

रायगड: महाराष्ट्राच्या किनारी भागातील महत्त्वाकांक्षी रेवास–करंजा सागरी पूल प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून मार्च २०२६ पर्यंत सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. धर्मतर खाडीवर उभारण्यात येणारा हा पूल महाराष्ट्राच्या सागरी कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रकल्पात २ किलोमीटर लांबीचा मुख्य सागरी पूल आणि अ‍ॅप्रोच रस्त्यांसह एकूण १०.६५ किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून हा प्रकल्प राबवला जात असून तो ३० महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्याची कामाची गती पाहता हा प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा पूल अटल सेतूच्या चिर्ले इंटरचेंजपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ते अलिबागचा प्रवास सध्याच्या सुमारे २.५ तासांवरून फक्त ७५ मिनिटांवर (१ तास १५ मिनिटे) येणार आहे. यामुळे अलिबागसह संपूर्ण कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

रेवास–करंजा पूल हा महाराष्ट्र कोस्टल हायवे (सागरी महामार्ग) प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून तो उरण (नवी मुंबई) आणि रेवस (अलिबाग) यांना थेट जोडणार आहे. यामुळे मुंबई–कोकण–गोवा किनारी मार्ग अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.

प्रकल्पाची प्रगती सातत्याने वाढत असून ऑक्टोबर २०२५ मध्ये १५%, नोव्हेंबरमध्ये १८%, फेब्रुवारी २०२६ मध्ये २२% आणि मार्चमध्ये २५% काम पूर्ण झाले आहे. पूल तयार झाल्यानंतर पावसाळ्यात फेरी सेवा बंद असतानाही बारमाही सुरक्षित आणि जलद रस्ता उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पामुळे रायगड जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीला नवे आयाम मिळणार असून कोकणवासीयांसाठी हा पूल खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

Pic credit – Infra News India (INI)

‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याबाहेरही धावणार; प्रस्तावित मार्गांची यादी जाहीर, ‘स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात होणार

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) ‘शिवनेरी’ बससेवा लवकरच मुंबई–पुणे मार्गाबाहेर राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा MSRTC चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.

२००२ मध्ये सुरू झालेली शिवनेरी सेवा वेळेची काटेकोरता, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाते. सामान्य बसांच्या तुलनेत भाडे थोडे अधिक असले तरी प्रवाशांचा या सेवेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

२०० नवीन व्होल्वो बसांची भर

राज्यभर विस्तारासाठी MSRTC ने २०० अत्याधुनिक व्होल्वो बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या बस पुढील प्रमुख मार्गांवर धावणार आहेत:

नाशिक–पुणे

नाशिक–छत्रपती संभाजीनगर

नाशिक–जळगाव–धुळे

पुणे–कोल्हापूर

पुणे–सांगली

पुणे –सोलापूर

नागपूर–चंद्रपूर

नागपूर–अमरावती–अकोला

ई-शिवनेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरिवली–स्वारगेट, ठाणे–शिवाजीनगर आदी मार्गांवर ई-शिवनेरी (इलेक्ट्रिक) बस धावत आहेत. पर्यावरणपूरक या बसांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महिलांना व ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाते, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे.

स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात

नवीन २०० बसांपैकी ३० बस स्लीपर कोच असणार आहेत. या ‘स्लीपर शिवनेरी’ बस काही लांब पल्ल्याच्या मार्गांवरील नॉन-एसी स्लीपर बसांची जागा घेणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अधिक सुरक्षितता आणि आरामदायी बेड-कोच सुविधेमुळे रात्रीच्या प्रवासासाठी ही सेवा अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

शिवनेरी सेवेचा हा विस्तार म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरूवात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Fact check: होळीसाठी ४ मार्च सुट्टी असल्याची बातमी खोटी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) स्पष्ट केले आहे की, होळीनिमित्त फक्त मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सोशल मीडियावर बुधवार, ४ मार्च २०२६ रोजीही सुट्टी असल्याचा खोटा दावा आणि फेक नोटिफिकेशन व्हायरल झाले होते. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत (२०२६) ४ मार्चला कोणतीही अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही.

यंदा चंद्रग्रहणामुळे (३ मार्चला) आणि धार्मिक परंपरेनुसार काही ठिकाणी लोकांनी रंग खेळणे ४ मार्चला पुढे ढकलले असले तरी, शासकीय/शाळा/बँक/कार्यालयांसाठी सुट्टी फक्त ३ मार्चलाच आहे. ४ मार्च हा सामान्य कार्यदिवस राहील.महाराष्ट्रातील २०२६ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी (मार्च महिन्यातील महत्त्वाच्या) ३ मार्च २०२६ (मंगळवार) – होळी (धुलिवंदन/दुसरा दिवस)

अधिकृत माहितीसाठी DGIPR च्या पोस्ट किंवा शासनाच्या वेबसाइटला (https://dgipr.maharashtra.gov.in) भेट द्या. फेक न्यूज पसरवू नका, फक्त विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवा!

 

 

 

महाराष्ट्रातील दोन ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर्स’ ना केंद्र सरकारची मंजुरी.

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH-48) वर सातारा आणि कोल्हापूर भागात दोन उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) बांधण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण २५८.९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली असून, त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत मोदी सरकारच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

या मंजुरीमुळे सातारा जिल्ह्यातील उंब्रज परिसरात सहा-लेनचा उन्नत मार्ग आणि कोल्हापूर भागात आठ-लेनचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान होईल. विशेषतः पावसाळ्यात पंचगंगा नदी परिसरात येणाऱ्या पूरामुळे होणारी वाहतूक अडचण कायमची दूर होईल. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या एकूण पायाभूत सुविधा विकासाला नवीन गती मिळेल.

हे प्रकल्प NH-48 या दिल्ली-चेन्नईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गाचा भाग आहेत, ज्यामुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये कोल्हापूरजवळील पंचगंगा नदीवरील ३.५७८ किलोमीटर लांबीच्या सहा-लेन उन्नत फ्लायओवरसाठी ९१३.७० कोटी रुपयांची स्वतंत्र मंजुरी देण्यात आली होती. सदर २५८.९९ कोटींची तरतूद ही अतिरिक्त किंवा पूरक असण्याची शक्यता आहे, ज्यात स्थानिक उन्नत भाग आणि संबंधित सुविधांचा समावेश असू शकतो.

रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकासमार्ग वेगाने पुढे सरकत आहे. पायाभूत सुविधांच्या या निर्णयांमुळे राज्याच्या समग्र प्रगतीला चालना मिळेल. NHAI मार्फत लवकरच या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

 

कोकण–कोल्हापूर कनेक्टिव्हिटीला बूस्ट! एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन नवे घाट मार्ग प्रस्तावित

   Follow us on        

वारणानगर: कोल्हापूर जिल्हा, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील दळणवळण तसेच पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी तीन नवीन घाट रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. हे नवीन मार्ग कोल्हापूरला थेट कोकणाशी जोडणार असून, यामुळे दोन्ही विभागांच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे.

या संदर्भात आमदार कोरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रस्तावित कामांना लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.

प्रस्तावित नवीन घाट रस्ते खालीलप्रमाणे आहेत:

१. पावनखिंड ते देवडे-भोवडे मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे यांना जोडणारा नवीन घाट मार्ग तयार करणे.

२. अणुस्कुरा ते भांबेड मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा-गावडवाडी (कोल्हापूर जिल्हा हद्द) ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-धनगरवाडी या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाट रस्ता बांधणे.

३. वाशी-पडसाळी ते काजिर्डा मार्ग: पन्हाळा तालुक्यातील वाशी-पडसाळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिर्डा यांना जोडणाऱ्या नवीन घाट रस्त्याचे काम करणे.

या बैठकीप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मान्यवरांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारीदेखील या चर्चेत सहभागी झाले होते.

थोडक्यात सांगायचे तर: या तीनही नवीन घाट रस्त्यांच्या कामांमुळे कोल्हापूर आणि कोकणातील अंतर कमी होणार असून, दुर्गम भागातील दळणवळणाची समस्या सुटण्यास मदत होईल. विशेषतः विशाळगड आणि पावनखिंड परिसरातील ऐतिहासिक पर्यटनाला यामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


रेल्वे ट्रॅफिक ब्लॉक: उन्हाळी सुट्टीत रेल्वेने गोव्याला जायचा बेत असेल तर ही बातमी वाचाच!

   Follow us on        

हुबळी: दक्षिण पश्चिम रेल्वेच्या घाट विभागात असलेल्या कॅसलरॉक आणि कुलेम स्थानकांदरम्यान ‘बीसीएम’ (BCM) कामासाठी दररोज ५ तासांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २८ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत सकाळी ११:०० ते दुपारी १६:०० वाजेपर्यंत असेल.

उन्हाळी सुट्ट्यांच्या पर्यटनाला फटका

हा ब्लॉक नेमका उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात घेण्यात येत असल्याने, उन्हाळ्यात गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आणि नियमित प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक गाड्या वास्को-द-गामा (गोवा) पर्यंत न जाता हुबळीलाच थांबणार असल्याने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.

या ब्लॉक मुळे वास्को-द-गामा आणि हुबळी दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे.

१. हुबळीपर्यंतच धावणाऱ्या गाड्या (Short Termination)

खालील गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकाऐवजी हुबळी (Hubballi) स्थानकावर थांबतील आणि तेथूनच परतीच्या प्रवासाला निघतील. म्हणजेच हुबळी ते वास्को-द-गामा दरम्यान या गाड्या रद्द राहतील:

शालिमार – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१८०४७): २५ एप्रिल ते ४ जून दरम्यानच्या ठराविक तारखांना ही गाडी हुबळीपर्यंतच धावेल.

तिरुपती/हैदराबाद – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७४१९/१७०२१): ३० एप्रिल ते ४ जून दरम्यान (दर गुरुवारी) हुबळीपर्यंत धावेल.

सिकंदराबाद – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७०३९): २९ एप्रिल ते ५ जून दरम्यान हुबळीपर्यंत धावेल.

जसिडिह – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७३२२): २७ एप्रिल ते १ जून दरम्यान हुबळीपर्यंत धावेल.

 

२. हुबळीवरून सुटणाऱ्या गाड्या (Partial Cancellation)

परतीच्या प्रवासात खालील गाड्या वास्को-द-गामा ऐवजी हुबळी स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेनुसार सुटतील:

वास्को-द-गामा – शालिमार एक्सप्रेस (१८०४८): २८ एप्रिल ते ७ जून.

वास्को-द-गामा – तिरुपती/हैदराबाद एक्सप्रेस (१७४२०/१७०२२): १ मे ते ५ जून.

वास्को-द-गामा – सिकंदराबाद एक्सप्रेस (१७०४०): ३० एप्रिल ते ६ जून.

वास्को-द-गामा – जसिडिह एक्सप्रेस (१७३२१): १ मे ते ५ जून.

 

३. गाड्यांच्या मार्गात बदल (Diversion)

काही लांब पल्ल्याच्या गाड्या घाट विभागातील काम टाळण्यासाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत:

गाडी क्रमांक व नाव वळवलेला मार्ग रद्द केलेले थांबे
११०९७ पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे – पनवेल – रोहा – मडगाव
सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, लोंढा इ.
११०९८ एर्नाकुलम – पुणे एक्सप्रेस मडगाव – रोहा – पनवेल – पुणे
मडगाव ते पुणे दरम्यानचे सर्व मुख्य थांबे
१७३१५ वास्को – वेलंकन्नी एक्सप्रेस मडगाव – मंगळुरू – शोरानूर – इरोड
हुबळी, दावणगेरे, तुमकुर, बेंगळुरू, सालेम इ.
१७३१६ वेलंकन्नी – वास्को एक्सप्रेस इरोड – शोरानूर – मंगळुरू – मडगाव
सालेम, बेंगळुरू, हुबळी, धारवाड, लोंढा इ.

दहावी बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या केंद्रांवर कारवाई; १०७ परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातील तब्बल १०७ परीक्षा केंद्रांना गैरप्रकार आणि अनियमिततेच्या आरोपाखाली ‘काळ्या यादीत’ (Blacklist) टाकण्यात आले आहे. या केंद्रांवर पेपर फुटी, सामूहिक कॉपी आणि बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने ही कारवाई केली असून, आता या केंद्रांवर पुढील बोर्ड परीक्षा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

​शिक्षण विभागाने यावर्षी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) देखरेख, भरारी पथके आणि काही ठिकाणी ड्रोन सर्व्हिलन्सचाही वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच एका केंद्रावर एआय (AI) टूल्सचा वापर करून विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि विशेष भरारी पथकांद्वारे परीक्षेच्या पारदर्शकतेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. राज्य सरकारने स्पष्ट ताकीद दिली आहे की, परीक्षेच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा गैरप्रकार आढळल्यास ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search