Category Archives: महाराष्ट्र

हिल गँग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कसारा-इगतपुरी घाटात संभाव्य दरड दुर्घटना टळली

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या अतिशय मोक्याच्या आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कसारा-इगतपुरी (थाळ घाट) विभागात एक मोठी दुर्घटना टळली आहे. या भागात नियमित गस्त आणि सुरक्षा तपासणी करणाऱ्या ‘इगतपुरी हिल गँग’च्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

​धोकादायक खडकाचा शोध आणि तत्परता

थाळ घाट विभागातील टीजीआर २ ते टीजीआर १ दरम्यानच्या डोंगराळ भागात नियमित तपासणी सुरू असताना हिल गँगच्या कर्मचाऱ्यांना एक मोठा धोका निदर्शनास आला. मुख्य खडकापासून अंदाजे ३.९ मीटर लांब, १.८ मीटर रुंद आणि १.६ मीटर उंच आकाराचा एक प्रचंड खडकाचा ढीग सुटा होऊन वेगळा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा महाकाय खडक रेल्वे ट्रॅकच्या थेट १५ मीटर उंचीवर कटिंगच्या कडेवर अत्यंत धोकादायक स्थितीत लटकलेला होता.

​नियोजित ट्रॅफिक ब्लॉक आणि सुरक्षित कारवाई

डोंगराच्या कडेवर असलेला हा भलामोठा खडक कधीही खाली कोसळून मोठी जीवित वा वित्तहानी घडवू शकला असता. याची गांभीर्याने दखल घेत इगतपुरी हिल गँगच्या टीमने कोणत्याही विलंब न करता तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करून एका नियोजित ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान अत्यंत कौशल्याने व काळजीपूर्वक हा मोठा खडक ट्रॅकवर सुरक्षितपणे खाली सोडण्यात आला.

​पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने ट्रॅक मोकळा

खडक खाली पाडल्यानंतर तो रेल्वे मार्गावर अडथळा ठरत होता. हा महाकाय खडक तातडीने बाजूला सारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पावले उचलण्यात आली. ‘बाऊलडर स्पेशल ट्रेन’वरील आधुनिक पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने या भल्यामोठ्या खडकाचे तुकडे करण्यात आले आणि संपूर्ण ट्रॅक तातडीने साफ करून पूर्ववत मोकळा करण्यात आला.

हिल गँगच्या कार्याचे कौतुक

इगतपुरी हिल गँगच्या या अत्यंत साहसी, समयसूचक आणि कौतुकास्पद कार्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेची आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मंडल रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) संपूर्ण हिल गँग टीमची उघडपणे प्रशंसा केली असून त्यांच्या पाठीवर कौतुुकी थाप दिली आहे.

​आता फक्त ६० रुपयांत मिळणार डिजिटल भूनकाशा

   Follow us on        

कणकवली: मूळ जमाबंदीवेळी तयार झालेले भूमापनचे सर्व्हे नंबरचे नकाशे, एकत्रीकरण योजनेअंतर्गत तयार झालेले गट नंबरचे डिजिटल नकाशे, नगर भूमापन नकाशे, गावठाण भूमापन नकाशे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेले गावठाण भूमापन नकाशे एप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीचे शुल्कही निश्चित करण्यात आले असून, या अंतर्गत संगणकीकृत स्वाक्षरीचे पीडीएफ नकाशे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रिपेड स्वरूपात ६० रुपये दराने मिळणार आहेत.

​संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg स्वरूपातील नकाशे आणि .shp स्वरूपातील नकाशे १२० रुपयांच्या दरात उपलब्ध होणार आहेत. खासगी व सरकारी बँकांसाठीही हाच दर लागू असणार असून, त्यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात एक महिना क्रेडिट उपलब्ध होईल. राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी असे नकाशे नि:शुल्क मिळणार आहेत. भारत सरकारचे सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात पीडीएफ नकाशे ८४ रुपयात, तर संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg व .shp नकाशे ६० रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण गाव नकाशाची मागणी केल्यास ५००० रुपये आकारणी करण्यात येणार असून, त्यात राज्य शासनाचा हिस्सा ३००० रुपये आणि जमाबंदी आयुक्त यांचा हिस्सा २००० रुपये असेल.

​संगणकीकृत स्वाक्षरीने मिळकत पत्रिकेसाठी अ, ब, क वर्ग नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात नागरिकांसाठी ९० रुपये प्रति अभिलेख आणि ग्रामीण क्षेत्रासाठी ४५ रुपये प्रति अभिलेख दर असणार आहे. सरकारी व खासगी बँकांसाठीही हाच दर लागू आहे. सामान्य नागरिकांसाठी पीडीएफ स्वरूपातील सातबारा, आठ-अ आणि फेरफारसाठी प्रति अभिलेख १५ रुपये, सरकारी व खासगी बँकांसाठी एक महिन्याच्या क्रेडिटवर पोस्टपेड स्वरूपात १५ रुपये आणि प्रशासकीय विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत.

​सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक महामंडळे, स्वायत्त संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात प्रति अभिलेख १५ रुपये आकारले जातील. भारत सरकारचे जे विभाग महसूल अभिलेख देऊन स्वतःकडील डेटा शेअर करतात, अशा विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत. मात्र, भारत सरकारचे जे विभाग अभिलेख घेऊन स्वविभागाकडे डेटा शेअर करत नाहीत, त्यांना १५ रुपये आकारण्यात येणार आहेत.

२३ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मुंबई-पुणे रेल्वे मार्ग पूर्ववत

   Follow us on        

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा घाट विभागातील बंद पडलेले तीनही रेल्वे मार्ग आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात मध्य रेल्वेला मोठे यश आले आहे. या अत्यंत दुर्गम आणि कठीण भूप्रदेशात रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेने अविरत परिश्रम घेतले आहेत.

​या कठीण मोहिमेत २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांत तब्बल ११,७४५ रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कर्मचाऱ्यांनी एकूण १,४०,९४० मनुष्य-तास काम करत अहोरात्र मेहनत घेतली आणि या आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली.

​दुरुस्तीच्या या कामासाठी ११० हून अधिक साहित्याच्या रेकींचा (माती, खडक व ढिगारा हटवणाऱ्या विशेष गाड्या) प्रभावी वापर करण्यात आला. या साहाय्याने दरडी कोसळलेल्या भागातील रेल्वे रुळांवरून माती आणि दरडीचे अवशेष तातडीने बाजूला सारण्यात आले.

​निसर्गाच्या या भीषण संकटाला धैर्याने तोंड देत भारतीय रेल्वेने आपले उच्चस्तरीय इंजिनिअरिंग कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यामुळे मुंबई-पुणे दरम्यानची बहुप्रतिक्षित रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली असून, या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मध्य रेल्वेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्यातील प्रकल्पांच्या मंजुरीसाठी नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्याने प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन पत्र दिले आणि विशेष पाठपुरावा केला आहे.

​मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने ‘सागरमाला २.०’ कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, हे प्रकल्प २.० अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव आहेत. हे प्रकल्प ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

​या प्रकल्पांमुळे राज्यातील बंदराधारित विकासाला चालना मिळणार असून बहुविध लॉजिस्टिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल, मत्स्य बंदरांचे आधुनिकनीकरण होईल, किनारी भागातील पायाभूत सुविधा उन्नत होतील तसेच किनारी जलवाहतूक, अंतर्गत जलमार्ग आणि सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. याशिवाय किनारी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव सादर केले आहेत.

​केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्रातील बंदर विकास, सागरी पायाभूत सुविधा, किनारी अर्थव्यवस्था आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठी प्रगती होईल. असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

‘शक्तीपीठ’ तीन महामार्गांना जोडेल! – आमदार दीपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी: ‘शक्तीपीठ’ महामार्ग तीन महामार्गांना जोडला जाईल आणि याद्वारे पर्यटन विकास घडवला जाईल असे विधान सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी काल केले,. दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथे काही निर्बंध आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. या भागातील वृक्षतोट रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी एनजीओच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे.

​मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या आमसभा गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नव्हत्या, मात्र आता त्या होत असल्याची आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली. वेळापत्रकानुसार सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची आमसभा ७ ऑगस्टला होणार असून, सावंतवाडी व दोडामार्गपाठोपाठ पुढील आठवड्यात वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. भविष्यात या भागात अजून जास्त गाड्या उपलब्ध करून देण्याच्या आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी शेवटी सांगितले.

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचे जीवन, राष्ट्रसेवा आणि समाजप्रबोधन

   Follow us on        

परभणी:

राष्ट्रधर्म, समाजप्रबोधन आणि मानवतेचे महान उपासक म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाणारे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे जीवन आणि कार्य हे खऱ्या अर्थाने “भूतो न भविष्यति” असेच प्रेरणादायी आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता राष्ट्रप्रेम, समाजसेवा, सामाजिक समता, धर्मरक्षण आणि मानवकल्याण यांचा एक अनोखा संगम ठरले आहे. त्यांनी धर्म, राष्ट्र आणि मानवतेच्या सेवेसाठी आपले आयुष्य पूर्णपणे अर्पण केले होते.

​जन्म व ऐतिहासिक कर्मभूमी

​राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१२ रोजी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे झाला. या पवित्र भूमीत जन्मलेल्या महाराजांमध्ये बालपणापासूनच अध्यात्म, राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जाज्वल्य वृत्ती होती. धर्मरक्षण आणि राष्ट्रसेवेचा वसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी स्वतः “हिंदू राष्ट्र सेना” उभारली. मुक्तेश्वर दरी हे त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचे प्रमुख केंद्र राहिले. अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच निर्भीडपणे आवाज उठवला, ज्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकार आणि निजामशाही या दोघांचाही रोष सहन करावा लागला. मात्र, सत्य, स्वाभिमान आणि राष्ट्रहिताचा मार्ग त्यांनी कधीही सोडला नाही.

​सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता

​रत्नागिरी येथील ऐतिहासिक ‘पतितपावन मंदिर’ — ज्याची उभारणी प्रसिद्ध समाजसेवक भागोजी कीर यांनी केली होती — त्याच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज, डॉ. कुर्तकोटी, चौंडे महाराज आणि संत गाडगेबाबा यांसारखे महान संत एकत्र उपस्थित होते. ही ऐतिहासिक घटना सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा एक अत्यंत संदेश देणारी ठरली.

​राष्ट्रीय नेत्यांचे मार्गदर्शक

​राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज हे केवळ संत नव्हते, तर राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी मार्गदर्शक होते. देशातील अनेक दिग्गज व मान्यवर नेते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असत. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, वि. स. पागे, रासू गवई, गुलजारीलाल नंदा, शिवराज पाटील आणि नानाजी देशमुख यांसारख्या राष्ट्रसेवकांचा व नेत्यांचा समावेश होता.

​१९८५ मधील ऐतिहासिक प्रदर्शन

​जानेवारी १९८५ मध्ये दिल्ली येथे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्रीकांत (बाळा) सावंत यांच्या वतीने राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित एका भव्य चित्रमय जीवन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमास स्वतः राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, गृहमंत्री शंकरराव चव्हाण, संरक्षणमंत्री शिवराज पाटील आणि केंद्रीय मंत्री वसंत साठे आदी दिग्गज नेत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती. हा कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करणारा एक सुवर्णटप्पा ठरला.

​आजच्या काळाची गरज: राष्ट्रसंतांचे विचार

​आजच्या काळात राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्याने, विचारमंथन सत्रे, चित्रप्रदर्शने, समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आणि युवा प्रेरणा उपक्रम आयोजित करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. त्यांचे विचार, आदर्श आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा आगामी अनेक पिढ्यांना सदैव योग्य मार्गदर्शन करत राहील.

महाराष्ट्र शासनकडून विविध उपयुक्त आणि सुरक्षित मोबाईल अॅप्सची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई, २८ जुलै: सामान्य नागरिकांची शासकीय कामे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावीत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) विविध उपयुक्त मोबाईल अॅप्सची माहिती जाहीर केली आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत उचलण्यात आलेल्या या पाऊलामुळे नागरिकांची कागदपत्रांची बचत होऊन प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

​यादीतील प्रमुख अॅप्समध्ये UMANG, DigiLocker, Aaple Sarkar, PM Kisan, ABHA, mParivahan, BHIM UPI, FASTag आणि DigiYatra यांचा समावेश आहे. या डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने नागरिकांना आता दस्तऐवज सुरक्षितपणे साठवणे, विविध बिल भरणे, शेतीविषयक अनुदान मिळवणे, आरोग्य सेवांचा लाभ घेणे तसेच वाहन व प्रवासासंबंधित महत्त्वाची माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे. हे सर्व अॅप्स Google Play Store आणि Apple App Store वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद

   Follow us on        

सातारा: सततच्या मुसळधार पावसामुळे ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा करंजाळे गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खचला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीची खबरदारी घेत माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

​रस्ता खचल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित मार्गाची दुरुस्ती पूर्ण होऊन तो सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत हा बंदी आदेश कायम राहणार आहे.

​दरम्यान, अहिल्यानगर व पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून, वाहनचालकांसाठी आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकतानुसार इतर पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

​माळशेज घाट परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ओतुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी ही माहिती देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

तलाठी भरती: ‘गट-क’ परीक्षेसाठी ३०८८ पदांचा समावेश; अर्ज भरण्यास मुदतवाढ

   Follow us on        

नवी मुंबई:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६’ बाबत अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असून, या भरतीमध्ये नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

​महत्त्वाचे बदल आणि ठळक मुद्दे:

​एकूण पदसंख्या: यापूर्वी २६१९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रानुसार आता एकूण ३०८८ पदांचा समावेश या परीक्षेत करण्यात आला आहे.

​अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ: उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आता ३१ जुलै, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

​परीक्षेची तारीख: सदर पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline – OMR आधारित) घेतली जाणार आहे.

​समाविष्ट करण्यात आलेली प्रमुख पदे:

​१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क: १५३९ पदे

२. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क: २५४ पदे

३. लिपिक-टंकलेखक (विविध विभाग): एकूण ९२४ पदे (नियंत्रक शिधावाटप, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास आणि महसूल व वन विभाग)

४. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३१ पदे

५. वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक: २२ पदे

​विविध संवर्गातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर अटींसाठी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) भेट देऊन अधिकृत प्रसिद्धीपत्रक तपासावे.

कागदी शिधापत्रिका होणार इतिहासजमा! आता मिळणार ‘क्यू – आर’ असलेल्या ‘स्मार्ट शिधापत्रिका’

   Follow us on        

मुंबई (वृत्तसंस्था):

राज्यातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित व आधुनिक स्वरूपातील शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत आता पारंपारिक कागदी शिधापत्रिका बंद करून त्याऐवजी क्यूआर कोड (QR Code) आधारित अत्याधुनिक ‘स्मार्ट शिधापत्रिका’ वितरीत केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली कागदी शिधापत्रिकेची पद्धत आता लवकरच इतिहासजमा होणार आहे.

​अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला (जि. नाशिक) येथील एका विशेष कार्यक्रमात क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिकेच्या प्रतिकृतीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. राज्यभरात ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून, त्याची सुरुवात म्हणून सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

​या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे १.७० कोटी कुटुंबांना क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या डिजिटल स्मार्ट कार्डमुळे सार्वजनिक शिधापत्रिका वितरण व्यवस्थेत अधिक सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता येण्यास मदत होणार आहे. तसेच बनावट कार्ड रोखण्यास आणि नागरिकांना शासकीय अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील सेवांचा अधिक सोयीस्करपणे व विनासायास लाभ घेण्यास मदत होणार आहे.

​जुन्या आणि जीर्ण झालेल्या कागदी शिधापत्रिकांमुळे राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांमध्ये आणि धान्य घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना डिजिटल स्वरूपातील स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संकल्पनेनुसार राज्यात पुढील तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम’ संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे.

​या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (AAY व PHH) तसेच एपीएल (APL) – शेतकरी योजना यांसारख्या विविध योजनांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतीकारी पाऊल मानले जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search