Category Archives: महाराष्ट्र

रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद

   Follow us on        

सातारा: सततच्या मुसळधार पावसामुळे ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा करंजाळे गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खचला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीची खबरदारी घेत माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

​रस्ता खचल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित मार्गाची दुरुस्ती पूर्ण होऊन तो सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत हा बंदी आदेश कायम राहणार आहे.

​दरम्यान, अहिल्यानगर व पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून, वाहनचालकांसाठी आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकतानुसार इतर पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

​माळशेज घाट परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ओतुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी ही माहिती देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

तलाठी भरती: ‘गट-क’ परीक्षेसाठी ३०८८ पदांचा समावेश; अर्ज भरण्यास मुदतवाढ

   Follow us on        

नवी मुंबई:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६’ बाबत अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असून, या भरतीमध्ये नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

​महत्त्वाचे बदल आणि ठळक मुद्दे:

​एकूण पदसंख्या: यापूर्वी २६१९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रानुसार आता एकूण ३०८८ पदांचा समावेश या परीक्षेत करण्यात आला आहे.

​अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ: उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आता ३१ जुलै, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

​परीक्षेची तारीख: सदर पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline – OMR आधारित) घेतली जाणार आहे.

​समाविष्ट करण्यात आलेली प्रमुख पदे:

​१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क: १५३९ पदे

२. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क: २५४ पदे

३. लिपिक-टंकलेखक (विविध विभाग): एकूण ९२४ पदे (नियंत्रक शिधावाटप, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास आणि महसूल व वन विभाग)

४. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३१ पदे

५. वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक: २२ पदे

​विविध संवर्गातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर अटींसाठी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) भेट देऊन अधिकृत प्रसिद्धीपत्रक तपासावे.

कागदी शिधापत्रिका होणार इतिहासजमा! आता मिळणार ‘क्यू – आर’ असलेल्या ‘स्मार्ट शिधापत्रिका’

   Follow us on        

मुंबई (वृत्तसंस्था):

राज्यातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित व आधुनिक स्वरूपातील शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत आता पारंपारिक कागदी शिधापत्रिका बंद करून त्याऐवजी क्यूआर कोड (QR Code) आधारित अत्याधुनिक ‘स्मार्ट शिधापत्रिका’ वितरीत केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली कागदी शिधापत्रिकेची पद्धत आता लवकरच इतिहासजमा होणार आहे.

​अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला (जि. नाशिक) येथील एका विशेष कार्यक्रमात क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिकेच्या प्रतिकृतीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. राज्यभरात ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून, त्याची सुरुवात म्हणून सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

​या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे १.७० कोटी कुटुंबांना क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या डिजिटल स्मार्ट कार्डमुळे सार्वजनिक शिधापत्रिका वितरण व्यवस्थेत अधिक सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता येण्यास मदत होणार आहे. तसेच बनावट कार्ड रोखण्यास आणि नागरिकांना शासकीय अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील सेवांचा अधिक सोयीस्करपणे व विनासायास लाभ घेण्यास मदत होणार आहे.

​जुन्या आणि जीर्ण झालेल्या कागदी शिधापत्रिकांमुळे राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांमध्ये आणि धान्य घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना डिजिटल स्वरूपातील स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संकल्पनेनुसार राज्यात पुढील तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम’ संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे.

​या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (AAY व PHH) तसेच एपीएल (APL) – शेतकरी योजना यांसारख्या विविध योजनांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतीकारी पाऊल मानले जात आहे.

पेपर फुटी प्रकरण: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मानवता विकास परिषदेची मागणी

   Follow us on        

२०२६ मध्ये उघडकीस आलेल्या ‘नीट’ (NEET) सह अन्य परीक्षांच्या पेपर फुटीच्या घोटाळ्यांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी ‘मानवता विकास परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. “देशाचे भविष्य प्रश्नात आहे, सरकारने आता तरी जागे व्हावे,” असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.

​विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या असत्या, तर आज दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले नसते, असे सावंत यांनी म्हटले आहे. देश हा संवादाने आणि न्यायाने चालतो; परंतु न्याय मागणार्‍या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून हा प्रश्न सुटणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, ही विद्यार्थी, पालक आणि सर्व भारतीयांची एकमुखी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​या अत्यंत संवेदनशील प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित लक्ष घालून निर्णय घ्यावा, अशी विनंती मानवता विकास परिषदेने केली आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या गंभीर विषयावर विशेष चर्चा घडवून आणावी आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) किंवा न्यायालयीन चौकशी करून कारवाई करावी, अशी कडक मागणी संस्थेने केली आहे. सरकारने तरुणांच्या भावनांचा आदर न केल्यास देशातील असंतोष अधिकच भडकेल, असा इशाराही श्रीकांत सावंत यांनी दिला आहे.

एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरऐवजी ‘सुपर ब्लू इथेनॉल गॅस सिलिंडर’ येणार?

   Follow us on        

​नवी दिल्ली: १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरऐवजी १०० टक्के इथेनॉलवर चालणारे ‘सुपर ब्लू इथेनॉल गॅस सिलिंडर’ येणार असल्याचा एक दावा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या दाव्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नावही जोडले गेले होते. मात्र, हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि भ्रामक असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) स्पष्ट करत ही अफवा फेटाळून लावली आहे.

​शासनाने खुलासा केला आहे की, सध्या सरकार वाहतूक क्षेत्रात इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी आणि जैवइंधन तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहे हे खरे आहे. परंतु, घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरमध्ये असा कोणताही देशव्यापी बदल करण्याचा सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. अशा प्रकारच्या बदलासाठी आवश्यक असणारे कोणतेही अधिकृत धोरण, नवीन सुरक्षा मानके, पायाभूत सुविधांची निर्मिती किंवा कोणतीही अधिकृत अधिसूचना शासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एलपीजी सिलिंडर बंद होऊन इथेनॉल सिलिंडर येणार, ही केवळ एक अफवा आहे.

​या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी समाजमाध्यमांवर वेगाने पसरणाऱ्या अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर किंवा अफवांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन डीजीआयपीआरने केले आहे. तसेच, इंधन किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत वेबसाइट्स आणि अधिकृत स्रोतांवरूनच खात्री करावी, असा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Railway Updates: अनधिकृत रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

   Follow us on        

मुंबई:

रेल्वे प्रवाशांची फसवणूक आणि लूट करणाऱ्या अवैध तिकीट दलालांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) मोठी धडक मोहीम उघडली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत मध्य रेल्वेने तब्बल १,६७६ गुन्हे दाखल करत १० कोटी ५० लाख रुपयांहून अधिक रकमेची तिकिटे जप्त केली आहेत.

​सणासुदीच्या किंवा सुट्ट्यांच्या काळात सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवणे कठीण होते. या गैरसोयीचा फायदा घेऊन अवैध दलाल आणि अनधिकृत एजंट्स तिकिटांचा काळाबाजार करतात. आरपीएफने अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने तपास करत गेल्या ५ वर्षांत ९ कोटी ६२ लाख रुपयांची ई-तिकिटे आणि ८८ लाख ४९ हजार रुपयांची जेसीआर तिकिटे जप्त केली आहेत.

​या कारवाईअंतर्गत आरपीएफने तब्बल १,६४१ दलाल आणि ४१० बेकायदेशीर एजंट्सना अटक करून गजाआड केले आहे. या धडक मोहिमेमुळे अवैध तिकीट विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

​विशेष म्हणजे, या संपूर्ण तिकीट घोटाळ्यात केवळ बाहेरील दलालच नाही, तर घरभेदी म्हणून रेल्वेचे काही कर्मचारीही सामील असल्याचे उघडकीस आले आहे. तपासादरम्यान अवैध तिकीट विक्रीच्या साखळीमध्ये सहभाग आढळलेल्या ७ रेल्वे कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आरपीएफच्या या सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाईमुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे

राजमाचीच्या घनदाट जंगलात ३ तरुण वाट भरकटले; पोलिसांची मध्यरात्री थरारक बचाव मोहीम

   Follow us on        

कर्जत:

ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजमाची परिसरात थरारक बचाव मोहीम राबवत रायगड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता आणि जनसेवेची बांधिलकी सिद्ध केली आहे. ठाणे जिल्ह्यातून कर्जत येथे राजमाची परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या पाच तरुणांपैकी तीन जण घनदाट जंगलात वाट चुकल्याची घटना घडली. मात्र, आपत्कालीन ‘डायल ११२’ हेल्पलाइनवर माहिती मिळताच रायगड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या तिन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले.

​मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याहून पाच मित्रांचा गट कर्जत तालुक्यातील राजमाची भागात ट्रेकिंगसाठी आला होता. दुर्गम आणि घनदाट परिसरात भ्रमंती करत असताना त्यातील तीन तरुण अचानक मुख्य रस्ता भटकले आणि जंगलात भरकटले. सायंकाळच्या वेळी अंधार पडू लागल्याने आणि आजूबाजूला घनदाट झाडी असल्याने तरुणांमध्ये घबराट पसरली. या परिस्थितीची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने ‘डायल ११२’ या पोलीस हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून मदतीची याचना केली.

​घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत पोलीस ठाण्याच्या पथकाने कसलाही विलंब न लावता तातडीने राजमाची परिसराकडे धाव घेतली. मुसळधार पाऊस, दाट धुके, प्रतिकूल हवामान आणि अंधार अशा भीषण आव्हानांचा सामना करत पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि ट्रेकर्सच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू केली. मध्यरात्रीच्या सुमारास जंगलाचा कोपरा अन् कोपरा पालथा घालत पोलिसांनी अत्यंत शिताफीने या तिन्ही तरुणांचा शोध घेतला आणि त्यांना सुरक्षितस्थळी आणले. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, सुखरूप बचावलेल्या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी रायगड पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

​दरम्यान, या यशस्वी बचाव मोहिमेनंतर रायगड पोलीस प्रशासनाने सर्व पर्यटकांना आणि ट्रेकर्सना सुरक्षेचे आवाहन केले आहे. “राजमाचीसारखा परिसर अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ आहे. पावसाळ्यात किंवा अंधार पडल्यानंतर येथे वाट भटकण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना अननुभवी मार्ग निवडून जिवाला धोका निर्माण करू नका. स्थानिक वाटाड्यांची मदत घ्या आणि हवामानाचा अंदाज घेऊनच ट्रेकिंगचे नियोजन करा,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा भीषण अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मुंबई:

सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे सोमवारी सकाळी एक दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडण्याच्या किंवा डिव्हायडरजवळ थांबलेल्या ६५ वर्षीय भास्कर रावसाहेब पांडे यांना एका अनियंत्रित बेस्ट (BEST) बसने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे पांडे यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.

​प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथील महामार्गावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. त्याच वेळी तेथे उभे असलेले भास्कर पांडे हे बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात बसचा चालक आणि वाहक (कंडक्टर) दोघेही जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, दोघांचीही प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

​अपघाताची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. स्थानिक नागरिकांनी काढलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसत असून, यावरून अपघाताची तीव्रता स्पष्ट होते. मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ आता चिंतेचा विषय ठरत असून, मानखुर्द पोलीस या अपघातामागील नेमके कारण—चालकाचा निष्काळजीपणा की यांत्रिक बिघाड—याचा सखोल तपास करत आहेत.

सावंतवाडी: शालेय विद्यार्थ्यांच्या नशिबी टोके लागलेले धान्य

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत शालेय पोषण आहार योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारातील धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींनी बैठकीदरम्यान केला आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

​पुरवठादाराकडून शाळांपर्यंत पोहोचवण्यात येणारे धान्य किडलेले, अस्वच्छ आणि लहान मुलांच्या खाण्यायोग्य अजिबात नसल्याचे सभेदरम्यान समोर आले. प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अशा प्रकारचे अस्वच्छ धान्य विद्यार्थ्यांच्या ताटात पोहोचत असल्याचे पाहून लोकप्रतिनिधींनी आणि उपस्थितांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला.

​या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत पंचायत समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला आक्रमकपणे जाब विचारला. सरकारी योजनांचा निधी मिळूनही विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याने संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले.

​विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे.

​शेवटी, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून निकृष्ट धान्याचा पुरवठा त्वरित थांबवावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेत, दर्जेदार आणि स्वच्छ पोषण आहार मिळेल याची खात्री प्रशासनाने तत्काळ करावी, अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली.

समृद्धी महामार्गावर इथेनॉल टँकर आणि कारचा भीषण अपघात; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

वर्धा: वर्ध्यातील विरुळजवळ समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला. नागपूरच्या दिशेने प्रवासाला निघालेल्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या इथेनॉलच्या टँकरने जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, धडक बसताच महामार्गावर मोठा थरार नाट्य घडले.

​धडकेच्या भीषणतेमुळे कारने क्षणात पेट घेतला. इथेनॉल अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने काही सेकंदांतच रौद्ररूप धारण केले. कारमध्ये असलेल्या ५ प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी न मिळाल्याने, त्यांचा कारच्या आतच करपून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत झालेले सर्व नागरिक वर्धा जिल्ह्यातीलच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

​घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस (HSP) आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि मदतकार्य जलद गतीने व्हावे यासाठी समृद्धी महामार्गावरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे रोखण्यात आली होती.

​सध्या पोलिसांनी जळालेल्या वाहनांना बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत केली आहे. पोलिसांनी सर्व ५ मृतदेहांचे अवशेष ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search