Category Archives: महाराष्ट्र

खेड: विक्रीसाठी आणलेले ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्याने धुण्याचा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार

   Follow us on        

खेड: खेड बसस्थानक ते तीनबत्ती नाका दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्याने हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

ताडगोळे गटारात धूत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याबाबत पोलीस शिपाई तुषार रमेश झेंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी आलाउद्दीन कुवुस शेख (वय ६४, रा. बालुग्राम पश्चिमी, ता. उधवा दियारा, जि. साहेबगंज, झारखंड) याने विक्रीसाठी आणलेले ताडगोळे रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या सांडपाण्यात धुतले. या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, रोगांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

चित्रपट अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर

 

   Follow us on        

मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांर्गत रु.१० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप रु. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे रु. १० लाख व रु. ६ लाख, स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे पदक असे स्वरूप आहे.

तसेच, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. १० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार्थीची निवड करण्याकरिता शासन स्तरावर समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल, २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Volvo Bus On Fire: पुणे-सातारा महामार्गावर वॉल्वो बस पेटली

   Follow us on        

Volvo Bus On Fire: पुण्यात बसला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खेडशिवापूर जवळ ही घटना घडली आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर या खाजगी बसला आग लागली असून, आगीचे कारण हे शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ एका एसी व्हॉल्वो बसला आग लागली. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. चालकाच्या चातुर्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीची ही घटना दुपारी 12 वाजता घडली. बस वेगाने जात असताना खेड शिवापूरजवळ येताच इंजिन क्षेत्रातून धूर निघू लागला. काही क्षणातच गाडीला आग लागली. प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर पडण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एसी व्हॉल्वो बसमध्ये साधारणतः 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. आगीच्या दुर्घटनेमध्ये प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी काही जण किरकोळ जखमी आहेत. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे दल येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली होती. गाडीचा भडका आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. तसेच यामुळे बघ्याची देखील मोठी गर्दी जमली होती.

गाडीतून धूर येऊ लागताच, चालकाने सावध राहून बस थांबवली आणि प्रवाशांना ताबडतोब खाली उतरवले. राजगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “संपूर्ण बसने आग लावली, परंतु कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली.” प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द करा ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

   Follow us on        

मुंबईः (१६ एप्रिल, २०२५)-लांब पल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरु असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

 

ATM in Railway: धावत्या रेल्वेमध्ये देशातील पहिली एटीएम सेवा सुरू

   Follow us on        

Atm in Railway : मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा उपलब्ध झाली असून, अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे. त्यामुळे आता प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.

रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. या कल्पनेला प्रतिसाद देत, बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण 22 डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता 2032 असून दररोज सुमारे 2200 प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली. हे एटीएम ‘एक्स्प्रेस’ सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरळीतपणे कार्यरत राहावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हा संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवला जात आहे. या ऑनबोर्ड एटीएम सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होणार आहे. एटीएमची सुविधा ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे.

Kokan Railway: कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगाम विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्टी साठी कोकण रेल्वे मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ लोकमान्य टिळक (टी)- करमाळी – लोकमान्य टिळक (टी) (AC)साप्ताहिक स्पेशल:
गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक (टी)- करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर शुक्रवारी , ११/०४/२०२५ ते २३/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी  १२:०० वाजता करमाळी पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०५२ करमाळी – लोकमान्य टिळक (टी) स्पेशल (साप्ताहिक) दर शनिवारी , १२/०४/२०२५ ते २४/०५/२०२५ पर्यंत करमाळी येथून दुपारी १४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) ला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड,नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड,आणि थिविम आणि  या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० LHB कोच : दोन टायर एसी – ०८कोच, थ्री टायर एसी – १० कोच, जनरेटर कार – ०२ कोच

Shaktipeeth Expressway: ”…. तर कुणाल कामराज चे गाणे वाजवून करणार शिंदेंना विरोध”

शक्तीपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर 5 एप्रिल ला एकनाथ शिंदेंना अडवणार: गिरीश फोंडे यांचा इशारा

1 मे महाराष्ट्र दिन रोजी देखील कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नाही असाइशारा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway: कोल्हापुरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो असे सांगितले तसेच शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देणार असल्याचे देखील आश्वासन दिले ‌. पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केला आहे. या पार्श्वभूमी वरती आज सर्किट हाऊस मध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बोलताना समितीचे समन्वय गिरीश फोंडे म्हणाले,” एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन सरकार व पक्षाशी गद्दारी केली तेव्हा जनतेने हलकेपणाने घेतले. पण आता शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांची गद्दारी करत असतील तर कोल्हापुरातील शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्रात गेल्यावर्षी २९०० शेतकरी दररोज आठ आत्महत्या केलेल्या असताना विजय मेळावा घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.12 मार्च च्या मुंबई मोर्चा रोजी देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही. कुणाल कामरा चे गाणे लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध होईल”

उभाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले,” महाराष्ट्र युती सरकार हे सातत्याने आंदोलन करणाऱ्यांच्या वरती दडपशाही करत आहे. या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भिक घालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द करून व कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा. अन्यथा कोल्हापुरी हिसक्याला सामोरे जावे.”गोकुळ संचालक प्रकाश पाटील म्हणाले,”निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देत त्यांचे पालन करणे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे पतन आहे. महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट असताना 86 हजार कोटी कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे. या पैशातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू नये.”

शिवाजी कांबळे म्हणाले,” सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार एजंट ना पाठीशी धरून महामार्गाला समर्थन असल्याचे भासवत आहे.

कृष्णात पाटील म्हणाले,” एकनाथ शिंदे चे कोल्हापुरातील आमदार हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत शेतकऱ्यांना चितावणी देत आहेत. याला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे.”

इंडिया आघाडीने देखील शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता सर्किट हाऊस येथे मीटिंग बोलवली आहे. त्यामुळे आंदोलनाची व्यापकता वाढणार आहे.

यावेळी शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार सरवडे येथे होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विजय मेळाव्याच्या शेजारी म्हणजे मुदाळ तिट्टा जवळ शेतकऱ्यांची एक टीम जमेल. दुसऱ्या व तिसऱ्या टीमचा निर्णय वेळप्रसंगी घेऊ.

यावेळी शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, सुरेश बन्ने,किसान सभेचे नामदेव पाटील ,दिनकर सूर्यवंशी, प्रकाश पाटील,वृषभ पाटील, तानाजी भोसले, शिवाजी पाटील, सदानंद कदम, युवराज पाटील, जालिंदर कुडाळकर, वाय एन पाटील, मारुती नलवडे, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Weather Update: पुढील पाच दिवस राज्याला अवकाळी पावसाचा इशारा; वाचा कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार

   Follow us on        
Weather update:महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक महत्वाची  बातमी आहे. भारतीय हवामान केंद्राने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत.
दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला  ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. येलो अलर्ट नसला तरी पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. 2 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपणार आहे.
अवकाळी पाऊस कशामुळे येतोय?
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
31 मार्च: ठाणे पालघर नाशिक नगर धुळे नंदुरबार सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट.
– रायगड रत्नागिरी पुणे सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव पावसाची शक्यता
1 एप्रिल: ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक, नगर जळगाव छत्रपती संभाजी नगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट.
– पालघर सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली नंदुरबार धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा
2 एप्रिल: संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी वाद….नेमके प्रकरण काय? 

 

   Follow us on        

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे एक वादग्रस्त प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे., जे ऐतिहासिक सत्यता आणि सांस्कृतिक भावनांभोवती फिरते. ही समाधी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आहे आणि ती वाघ्या नावाच्या कुत्र्याची असल्याचे मानले जाते. लोककथेनुसार, वाघ्या हा शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा होता, ज्याने १६८० मध्ये महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी मारून प्राण त्यागले. ही कथा निष्ठेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे, विशेषत: राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास” नाटकामुळे, ज्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे.

प्रकरणाची मुळे अशी आहेत की, १९२७ मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर सुमारे १०-१२ वर्षांनी, म्हणजे १९३६ मध्ये, रायगड स्मारक समितीने गडकरींच्या नाटकाला आधार मानून वाघ्याचा पुतळा आणि समाधी उभारली. पण या कथेला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. शिवकालीन दस्तऐवज किंवा समकालीन नोंदींमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा अशा घटनेचा उल्लेख सापडत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही (ASI) असा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या समाधीवरून वाद का आहे? काही इतिहासकार आणि शिवप्रेमी, जसे की संभाजीराजे छत्रपती, यांचे म्हणणे आहे की ही समाधी कपोलकल्पित आहे आणि शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ अशी संरचना असणे हा त्यांच्या स्मृतीचा अपमान आहे. संभाजीराजे यांनी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मेपर्यंत हटवण्याची मागणी केली, कारण ती ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसलेली आणि रायगडावरील अतिक्रमण आहे. याउलट, काही लोकांना ही समाधी सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली वाटते, कारण ती निष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते.

दुसरीकडे, संभाजी भिडे यांनी वाघ्याची कथा सत्य असल्याचा दावा केला आहे आणि संभाजीराजेंच्या विधानाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कथा लोकपरंपरेतून आल्याचे सांगितले, परंतु ठोस पुराव्यांऐवजी त्यांचा भर भावनिक आणि पारंपरिक विश्वासांवर आहे.

भारतीय पुरातत्व विभागानेही असा खुलासा केला आहे की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारी कोणतीही माहिती किंवा पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत.

या वादात अनेक बाजू आहेत:

ऐतिहासिक सत्यतेचा मुद्दा: वाघ्याची कथा लोककथा असू शकते, पण ती सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत. काहींच्या मते, समाधी उभारताना सापडलेली हाडे उद-मांजराची होती, कुत्र्याची नव्हे.

सांस्कृतिक महत्त्व: काही समुदाय, उदा. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके, यांनी समाधी हटवण्यास विरोध केला आहे, कारण त्यांना ती परंपरेचा भाग वाटते.

राजकीय आणि सामाजिक आयाम: हा वाद औरंगजेबाच्या कबरीसारख्या इतर प्रकरणांशी जोडला गेला असून, काहींनी याला राजकीय रंग दिला आहे.

थोडक्यात, वाघ्या कुत्र्याची समाधी ही एका कथेवर आधारित आहे, ज्याला ऐतिहासिक आधार नाही, पण ती सांस्कृतिक प्रतीक म्हणून टिकून आहे. सध्या, संभाजीराजे आणि समर्थक ती हटवण्याची मागणी करत आहेत, तर काहींना ती ठेवायची आहे. हे प्रकरण ऐतिहासिक अचूकता आणि भावनिक मूल्यांमधील संघर्षाचे उदाहरण आहे…

 

 

 

सावंतवाडी:चराठा येथे २ लाख ३८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी शहर ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांसहित एक लाख रुपये किमतीची अल्टो कार मिळून सुमारे ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. बाबाजी विजय नाईक (४२, रा. खासकीलवाडा सावंतवाडी) व उमेश रघुनाथ सावंत (५०, रा. वायंगणी तालुका मालवण) अशी संशयतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.

ओटवणे ते चराठा अशी कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पाळत ठेवून मंगळवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या संशयित अल्टो कारला थांबवून त्याची पाहणी केली असता या गाडीत अवैध गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हा सर्व मुद्देमाल तसेच अल्टो कार ताब्यात घेण्यात आली तर या अवैध वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.

या दोघांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम, जयेश करमळकर यांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search