Category Archives: महाराष्ट्र

महाराष्ट्रात उभारले जाणार देशातील पहिले ‘ऑफशोर विमानतळ’

   Follow us on        

मुंबई: भारतातील पहिल्या ‘ऑफशोर’ (समुद्रातील किंवा किनारपट्टीवरील) विमानतळाची निर्मिती महाराष्ट्रात होणार असून, यामुळे देशाच्या विमान वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्ह्यातील कोरे बीच (Kore Beach) जवळ या प्रस्तावित विमानतळासाठी ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (DPR) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची पाहणी केली असून, या विमानतळाला थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘उत्तन-विरार सी लिंक’चा विस्तार करण्याची चाचपणी करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे विमानतळ जमिनीऐवजी समुद्रात जमीन संपादन करून किंवा कृत्रिम बेट तयार करून बांधले जाईल; अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये यशस्वी झाला आहे.

​हे विमानतळ वार्षिक सुमारे ९० दशलक्ष (९ कोटी) प्रवाशांची हाताळणी करण्यासाठी डिझाइन केले जात आहे. पालघर भागात होऊ घातलेले वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि इतर मोठ्या वाहतूक प्रकल्पांसह हे विमानतळ मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) आर्थिक चेहरामोहरा बदलून टाकेल. वाढवण बंदरामुळे लॉजिस्टिक्स, शिपिंग आणि वाहतूक क्षेत्रात सुमारे १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असून, या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वसई-विरार आणि पालघर हे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयास येतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

​या प्रकल्पामुळे उत्तर मुंबईच्या पट्ट्यात रिअल इस्टेट आणि गुंतवणुकीला प्रचंड मोठा वेग मिळणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांच्या मते, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीवेळी ज्याप्रमाणे उलवे, पनवेल आणि खारघरमधील मालमत्तांचे भाव विमाने उडण्यापूर्वीच वाढले होते, तसाच काहीसा ट्रेंड आता पालघर आणि विरार पट्ट्यात पाहायला मिळू शकतो. कोरे बीचच्या या प्रस्तावित जागेमुळे आणि नियोजित सी-लिंकमुळे हा प्रकल्प थेट मुंबईशी जोडला जाणार असून, हा संपूर्ण परिसर आगामी काळात महाराष्ट्राचा एक नवा आर्थिक कॉरिडॉर म्हणून नावारूपास येणार आहे.

‘शिवकाल’ अनुभवता येणार; राज्यातील १२ किल्ल्यांवर ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित

   Follow us on        

मुंबई: ​महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकताच समावेश झाल्यामुळे, राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या सर्व किल्ल्यांवर भव्य ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रायगड, शिवनेरी, खांदेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जिंजी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग आणि राजगड या किल्ल्यांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनाने ६० लाख रुपयांच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली असून, प्रत्येक किल्ल्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

​या महोत्सवांच्या माध्यमातून पर्यटकांना शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा जिवंत अनुभव घेता येणार आहे. यासाठी विविध लोककला प्रकार, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, शिवकालीन इतिहासावर आधारित नाट्यप्रयोग, व्याख्याने, ऐतिहासिक प्रदर्शने आणि दुर्गसंवर्धन विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमामुळे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होईल, स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, तसेच पर्यटन, हॉटेल व स्थानिक हस्तकला व्यवसायांना मोठी चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

   Follow us on        

अमरावती: जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर रविवार, २८ जून २०२६ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. चंद्रपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वॅगनआर कारने चॅनल क्रमांक १०५ जवळ पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका चिमुरडीचा समावेश आहे.

​या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढून ते रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप! महाबळेश्वरचा ‘विल्सन पॉइंट’ या वेळेत राहणार बंद; ड्रोन उडवल्यास थेट जप्ती!

   Follow us on        

महाबळेश्वर:

महाबळेश्वरमधील निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘विल्सन पॉइंट’ (सनराईज पॉइंट) परिसरासाठी सातारा वन विभागाने अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. या राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता, शांतता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती (भेकवली) यांच्या वतीने संयुक्तपणे हा निर्णय घेण्यात आला असून, पर्यटकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​या नव्या नियमांनुसार, विल्सन पॉइंटचे मुख्य प्रेक्षणीय स्थळ वगळता सभोवतालच्या मुख्य गाभा वनक्षेत्रात (Core Forest Area) पर्यटकांना प्रवेश करण्यास आता पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय आणि वनसंपदेचे रक्षण म्हणून विल्सन पॉइंटचे मुख्य प्रवेशद्वार आता सूर्यास्तानंतर पूर्णपणे बंद केले जाणार असून, ते थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच उघडले जाईल. त्यामुळे संध्याकाळी मुख्य गेट बंद होण्यापूर्वीच पर्यटकांना आपली वाहने आवाराबाहेर काढून घ्यावी लागणार आहेत.

​वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा रात्रीच्या वेळी या शांत आणि संवेदनशील वनक्षेत्रात काही पर्यटकांकडून लपून-छपून दारू पिणे, हुल्लडबाजी करणे, रात्रीच्या पार्ट्या करणे किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वनक्षेत्राच्या हद्दीत असे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर थेट वन अधिनियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

​वन्यजीवांच्या सुरक्षेचा विचार करून पर्यटकांना या परिसरात आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन येण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक पर्यटक हौस म्हणून येथील माकडे किंवा इतर वन्यप्राण्यांना चिप्स, बिस्किटे यांसारखे मानवी खाद्यपदार्थ टाकतात, ज्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांना कोणतेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे आणि संपूर्ण वनक्षेत्रात प्लॅस्टिकचा कचरा न करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

​अलीकडच्या काळात विस्तीर्ण दऱ्या आणि जंगलांचे चित्रीकरण करण्यासाठी पर्यटकांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, ड्रोनच्या आवाजामुळे राखीव क्षेत्रातील वन्यप्राणी आणि दुर्मीळ पक्षी भयभीत होतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन विल्सन पॉइंट परिसरात ड्रोन उडवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम डावलून ड्रोन उडवताना आढळल्यास तो थेट जप्त केला जाईल, असा इशारा वन प्रशासनाने दिला आहे.

Railway Updates: ‘किसान रेल’ सेवेला अखेर हिरवा कंदील!

 

   Follow us on        

​सांगली:

दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक आणि आशादायी बातमी समोर आली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील फळे, भाजीपाला, फुले व इतर नाशवंत कृषी उत्पादनांना देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद व सुलभ वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिरज-दिल्ली किसान रेल सेवा’ सुरू करण्याच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने अखेर अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या थेट समन्वयातून या किसान रेल्वेचे पुढील नियोजन केले जाणार असून, बाजारपेठ ते शेतकरी असा थेट व्यवहार शक्य होणार आहे.

​अशोक काकडे हे सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने किसान रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रक्रियेत कृषी विभाग, रेल्वे प्रशासन, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), व्यापारी संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी अनेक बैठका घेऊन योग्य समन्वय साधण्यात आला होता.

​ही सेवा मिरज येथूनच सुरू व्हावी, अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती. यामागील मुख्य उद्देश केवळ रेल्वे सेवा सुरू करणे एवढाच नसून, मिरज-सांगली परिसरात नवीन ‘कृषी-लॉजिस्टिक आणि आर्थिक विकास केंद्र’ निर्माण करणे हा आहे. यामुळे भविष्यात वित्तीय संस्थांच्या सहकार्याने शीतगृहे (Cold Storage), पॅक हाउसेस, वेअरहाउसिंग, प्रक्रिया उद्योग, वाहतूक व रोजगाराच्या नव्या संधी या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहेत. या किसान रेलमुळे द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ व इतर कृषी उत्पादने दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होईल. परिणामी, मालाची वाहतुकीतील नासाडी टळेल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल.

शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी सवलतीच्या दरात एसटी बस मिळणार

   Follow us on        

​मुंबई:

शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी आता सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात व्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. तसेच, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

​अनेकदा शेतकरी कुटुंब लग्न किंवा इतर शुभकार्यासाठी ट्रक, डंपर किंवा इतर अवैध वाहनांचा वापर करतात, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाकडे नवीन बसचा ताफा दाखल झाल्यानंतर, शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असल्यास आणि त्यांनी एसटीकडे मागणी केल्यास, एसटी महामंडळ त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

​राज्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, मेट्रो, एसटी आणि बेस्ट यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवर ताण वाढला असून, याचा गैरफायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. काही मार्गांवर सध्या प्रत्येक तासाला, तर पुढील दोन-तीन महिन्यांत दर अर्ध्या तासाने एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Railway Updates: रेल्वेच्या नियमांत बदल; विनातिकीट प्रवास करणे पडेल महागात! नवीन नियम ईथे वाचा

   Follow us on        

Railway Updates:रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या आणि रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांना आता चांगलाच दणका दिला आहे. ‘जनविश्वास (दुरुस्ती) कायदा-२०२६’ अंतर्गत रेल्वे कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांनुसार तब्बल २२ वर्षांनंतर रेल्वेने आपल्या विविध दंडांच्या रक्कमेत दुप्पट वाढ केली आहे. या नव्या नियमांनुसार, आता विना तिकीट प्रवासासाठी किमान २५० रुपयांऐवजी थेट ५०० रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. ८ एप्रिल २०२६ रोजी यासंबंधीची अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर रेल्वे मंडळाने सर्व विभागीय रेल्वेला आगाऊ सूचना जारी करत या सुधारित तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या नव्या नियमावलीनुसार केवळ विना तिकीट प्रवासच नव्हे, तर इतर अनेक प्रकारच्या नियमभंगासाठीही दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. जर कोणी महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात अनधिकृत प्रवेश केला, तर त्याला तब्बल २५०० रुपयांचा फटका बसेल. याशिवाय, दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास केल्यास किमान ५०० रुपये अतिरिक्त शुल्क, रेल्वे स्थानक किंवा परिसरात विनापरवाना फेरी मारणे अथवा भीक मागण्यासाठी २,००० रुपये दंड आणि अनधिकृत प्रवेशासाठी ५०० रुपये दंड आकारला जाईल. तसेच, सर्वाधिक दंड हा धोकादायक वस्तूंसह प्रवास करणाऱ्यांवर लावण्यात आला असून, त्यासाठी किमान १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे.

वाढती महागाई, बदललेली आर्थिक परिस्थिती आणि वंदे भारत, नमो भारत (वंदे मेट्रो), तेजस एक्सप्रेस यांसारख्या आधुनिक रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा वाढता खर्च लक्षात घेता जुना २५० रुपयांचा दंड अपुरा ठरत होता, म्हणूनच रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे की, दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित प्रवाशाविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येईल आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये थेट कारावासाची (जेलची) तरतूदही करण्यात आली आहे. अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांना जागेवरच दंड वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले असून, प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर पाऊल ठेवण्यापूर्वी हे नियम नीट जाणून घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

रेल्वेच्या सुधारित नियमांनुसार नवीन दंडाची (दंड सूची) यादी खालीलप्रमाणे आहे.

  • ​१) विना तिकीट प्रवास करणे: ₹ ५००/-

  • ​२) दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणे: ₹ ५००/-

  • ​३) बेकायदेशीर फेरीवाला (विनापरवाना विक्री करणे): ₹ २०००/-

  • ​४) दारू पिऊन गोंधळ किंवा उपद्रव निर्माण करणे: ₹ १०००/-

  • ​५) शिवीगाळ किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणे: ₹ १०००/-

  • ​६) रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे: ₹ २५००/-

  • ​७) अनधिकृत प्रवेश (अतिक्रमण करणे): ₹ ५००/-

  • ​८) वैध तिकिटाशिवाय आरक्षित डब्यातून उतरण्यास नकार देणे: ₹ २०००/-

  • ​९) चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) यांच्या आदेशांचे पालन न करणे: ₹ ५००/-

  • ​१०) पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यातून प्रवास करणे: ₹ २५००/-

  • ​११) मालाची खोटी माहिती देणे (घोषणा करणे): ₹ ५००/- प्रति क्विंटल

  • ​१२) आक्षेपार्ह किंवा धोकादायक वस्तू सोबत बाळगणे: ₹ १०,०००/-

  • ​१३) सार्वजनिक सूचनांचे विद्रुपीकरण करणे (फाडणे किंवा खराब करणे): ₹ २०००/-

  • ​१४) धूम्रपान करणे: ₹ २०००/-

NMC स्मार्ट कार्ड आता सक्तीचे; १ ऑगस्टपासून एसटी प्रवासातील सरकारी सवलतींसाठी नवीन नियम लागू

   Follow us on        

मुंबई:

महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) राज्यभरातील प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. येत्या १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस सेवेमध्ये मिळणाऱ्या शासकीय प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ (NCMC Smart Card) वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या नव्या उपक्रमामुळे आता प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने थेट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

​शासनाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ४२ लाखांहून अधिक नागरिकांनी या सुविधेसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. यापैकी २५ लाखांपेक्षा जास्त स्मार्ट कार्ड प्रत्यक्षरित्या सक्रिय (Active) झाली असून नागरिक त्याचा वापर करत आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि नोंदणी प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून राज्यभरात सुमारे ८,००० हून अधिक एसटी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सवलतीचा लाभ घेणाऱ्या पात्र नागरिकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांसह आपल्या जवळच्या एसटी स्मार्ट कार्ड केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विकसित महाराष्ट्र-२०४७: सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्हा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार!

   Follow us on        

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ चा महा-रोडमॅप

मुंबई (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारत असलेल्या ‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेत महाराष्ट्र आपले सर्वोच्च योगदान देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या ११ व्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा सर्वसमावेशक महा-रोडमॅप सादर केला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ‘एक राज्य, एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ’ या योजनेची मोठी घोषणा केली असून, यांतर्गत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून कायापालट केला जाणार आहे.

​राज्याचा आर्थिक विकास साधताना पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या महा-रोडमॅप अंतर्गत महाराष्ट्राला २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर, २०३५ पर्यंत २ ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरची महा-अर्थव्यवस्था बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी ‘महाराष्ट्र एआय (AI) धोरण २०२६’ लागू करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यटनाच्या बळावर राज्यातील लाखो तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील. राज्यात पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी तब्बल ९०० पर्यटन उप-परिपथ (सब-सर्किट्स) विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक, ऐतिहासिक, जलपर्यटन, आणि साहसी पर्यटनाला विशेष प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘ग्लोबल’ सुवर्णोदय होणार आहे.

​गुंतवणुकीच्या क्षेत्रात महाराष्ट्राचे देशातील अग्रगण्य स्थान कायम असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. देशात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) तब्बल ३१ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत आहे. राज्याच्या उद्योग व गुंतवणूक धोरणांतर्गत औद्योगिक प्रगतीला वेग देण्यासाठी ‘मैत्री’ (MAITRI) प्रणालीद्वारे सिंगल विंडो क्लिअरन्स, वेळेत मंजुरी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात आले आहे. सध्या राज्यात ६३.८५ लाखांपेक्षा अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) कार्यरत असून, त्याद्वारे २.५ कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. यासोबतच एआय (AI) क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि १४ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​याशिवाय, नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘पोस्ट-एलडब्ल्यूई विकास कार्ययोजना’ जाहीर केली. या कार्ययोजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला देशातील पहिले मोठे ‘एकात्मिक स्टील हब’ (Integrated Steel Hub) म्हणून विकसित केले जात आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत उपजीविकेवर भर दिला जात असून, यामुळे या दुर्गम भागाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे आणि स्थानिक तरुणांना रोजगाराचा मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाचे ‘आर्थिक इंजिन’ म्हणून आपले योगदान अधिक मजबूत करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत विविध राज्यांमध्ये एकूण ७,१५० अप्रेंटिस (Apprentices) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (Advt.No. CRPD/APPR/2026-27/07) जारी केली आहे. महाराष्ट्रात ५०४ जागा रिक्त असून, ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

​रिक्त पदांचा तपशील आणि महाराष्ट्रातील स्थिती:

​या भरती प्रक्रियेत राज्यानुसार जागांची विभागणी करण्यात आली असून, उमेदवारांना संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान होना आवश्यक आहे.

​महाराष्ट्र (मराठी): ५०४ पदे (खुला प्रवर्ग – २२५, इमाव – १३५, अजा – ५०, अज – ४४, ईडब्ल्यूएस – ५०). यामध्ये २१ पदे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव आहेत.

​इतर राज्ये: गुजरात (२१७ पदे), आंध्र प्रदेश (७०९ पदे), कर्नाटक (२७६ पदे), मध्य प्रदेश (२८५ पदे), गोवा (१६ पदे).

​महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांनुसार रिक्त जागा:

​पुणे (२०), नाशिक (१६), रायगड (१५), औरंगाबाद/छ. संभाजीनगर (१४), सोलापूर (१४), कोल्हापूर (१३), सांगली (१३), नागपूर (१३), सातारा (१३), अहमदनगर (१३), अकोला (१२), अमरावती (१२), लातूर (१२), नांदेड (१२), उस्मानाबाद (१२), परभणी (१२), जळगाव (१२), बीड (११), जालना (११), गडचिरोली (११), गोंदिया (११), धुळे (११), नंदुरबार (११), बुलढाणा (१०), वाशिम (१०), भंडारा (१०), चंद्रपूर (१०), वर्धा (१०), हिंगोली (१०), मुंबई आणि मुंबई उपनगरे (१०), रत्नागिरी (४), सिंधुदुर्ग (३).

​पात्रतेचे निकष:

​१. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२. वयोमर्यादा (दि. १ एप्रिल २०२६ रोजी): उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे (उमेदवाराचा जन्म १ एप्रिल २००६ ते २ एप्रिल १९९८ च्या दरम्यान असावा). नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल: इमाव (OBC) – ३ वर्षे, अजा/अज (SC/ST) – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

​ट्रेनिंग कालावधी आणि विद्यावेतन (Stipend):

​निवड झालेल्या उमेदवारांना १ वर्षाचा ट्रेनिंग कालावधी पूर्ण करावा लागेल. या कालावधीत अप्रेंटिसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

​निवड पद्धती आणि परीक्षा स्वरूप:

​उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषेची परीक्षा या आधारे केली जाईल.

​ऑनलाईन परीक्षा: ही परीक्षा जुलै २०२६ मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांवर आयोजित केली जाईल. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न (१०० गुण) असतील आणि वेळ ६० मिनिटे असेल.

​विषय: (१) जनरल/फायनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह ॲप्टीट्यूड, (४) रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टीट्यूड. प्रत्येक विषयाला २५ प्रश्न असतील.

​नकारात्मक गुण: चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.

​स्थानिक भाषेची परीक्षा: ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ही परीक्षा होईल. मात्र, ज्या उमेदवारांनी १० वी किंवा १२ वीत स्थानिक भाषा (मराठी) अभ्यासली आहे, त्यांना ही परीक्षा देण्याची गरज नाही.

​परीक्षा शुल्क:

​खुला/इमाव/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS): रु. ३००/-

​अजा/अज/दिव्यांग (SC/ST/PWD): परीक्षा शुल्क नाही (मोफत).

​भविष्यातील मोठा फायदा:

​स्टेट बँक ऑफ इंडियामधून अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बँकेतील ‘ज्युनिअर असोसिएट’ (Junior Associate – लिपिक वर्ग) पदाच्या भविष्यातील भरतीमध्ये विशेष वेटेज / सूट देण्यात येईल.

​अर्ज कसा करावा?

​इच्छुक उमेदवारांनी https://bank.sbi/careers किंवा https://sbi.co.in/careers या संकेतस्थळावर जाऊन ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी https://bfsissc.com किंवा NAPS पोर्टल https://apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search