Category Archives: महाराष्ट्र

वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रणा कार्यान्वित

   Follow us on        

नागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार हे आदिवासीबहुल क्षेत्र आणि विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशीत असलेले गाव. या शेजारी पिपरिया नावाचे छोटेसे गाव. वाघांच्या डरकाळ्या व संचार या गावात तसा नवा नाही. वेळोवेळी पाळीव प्राण्यांसह या गावात माणसांवरही जीवघेणे हल्ले झाले आहेत. यातून माणसांना वाचविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस व वन विभागाने अभिनव उपाययोजनांवर विचार सुरु केला. यातून एआय आधारित प्रकल्पाने आकार घेतला. याची फलश्रुती म्हणून तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होऊन संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून देवलापारजवळील पिपरिया येथे वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले.

विशेष म्हणजे येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे.

नागपूर ग्रामीण भागात मागील अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात गावकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या १५ घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक घटनांमध्ये गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून वन विभाग आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘एआय’ आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित) उपाययोजना सुरु केल्या आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात योगदान देणाऱ्या मार्व्हल या संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे मार्व्हल संस्थेचे सीईओ देखील आहेत. पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, मागील दोन ते तीन वर्षात घडलेल्या घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. त्यावर उपाय म्हणून आम्ही ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. गावाच्या परिसरात वाघ, बिबटे, अस्वलांसारख्या आक्रमक प्राण्यांचा परिसरात वावर असल्यास सतर्कतेचा इशारा देणाऱ्या ‘एआय’ तंत्रज्ञानावर मार्व्हलने काम केले. त्याअंतर्गत विशिष्ट ठिकाणांवर उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान ‘बायो अॅक्यूस्टिक्स’ (ध्वनी आधारित) आणि ‘बायो व्हिज्युअल’ (प्रत्यक्ष दृष्य आधारित) अशा दोन प्रकारे काम करते. वाघ किंवा बिबटे परिसरात आल्यास चितळ, सांबर, माकड यासारखे तृणभक्षी प्राणी आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून संपूर्ण परिसराला सतर्क करतात. ते विशिष्ट आवाज टिपून हे ‘एआय’ तंत्रज्ञान डेटाचे विश्लेषण करुन त्यासंबंधीचे सतर्कतेचे इशारे संबंधितांना पाठविण्याचे कार्य करते. सतर्कतेचे इशारे वन विभागाचे अधिकारी व गावकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर मिळू शकतात. याशिवाय ‘बायो व्हिज्युअल’ प्रकारच्या तंत्राच्या माध्यमातून कॅमेरात प्रत्यक्ष प्राण्याचे फोटो ‘कॅप्चर’ झाल्यास हे तंत्रज्ञान सतर्कतेचे इशारे पाठवते.

पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, वन विभागाच्या मदतीने आम्ही वन्यप्राण्याच्या हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील अशा ४० ठिकाणांची निवड केली असून तेथे प्राधान्याने कॅमेरे लावण्यात आले आहेत. याच आठवड्यात तब्बल तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वितही झाली असून मागील चार दिवसात दोनदा वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचा सतर्कतेचा इशारा वन विभाग आणि ग्रामस्थांना देण्यात आला आहे. वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश असलेल्या वन्यजीव क्षेत्रासह प्रादेशिक विभागातही खापा व पारशिवनी परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही ही यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून यासंदर्भात वन विभागाचा मार्व्हल संस्थेशी सामंजस्य करार झाला असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

पुणे – सावंतवाडी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

पुणे: पुणे आणि कोकण या दोन महत्त्वाच्या विभागांना रेल्वेने अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुण्याहून कोकणसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सेवा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. या नवीन रेल्वे सुविधेमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

या भेटीदरम्यान डॉ. कुलकर्णी यांनी ‘प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ अंतर्गत ‘सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पा’ला मंजुरी देण्याबाबतही सविस्तर चर्चा केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण कोकणातील रेल्वे वाहतुकीचे जाळे अधिक भक्कम होईल आणि सावंतवाडी हे एक महत्त्वाचे रेल्वे हब म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, या निर्णयामुळे पुणे-कोकण प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुणे ते कोकण रेल्वे प्रवासाच्या सद्यस्थितीचा विचार करता, सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे सेवा प्रवाशांच्या अफाट संख्येच्या तुलनेत अत्यंत अपुऱ्या आहेत. सध्या पुण्याहून कोकणात जाण्यासाठी  ‘पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस’ या एकमेव गाडीचा पर्याय उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासन काही विशेष गाड्या सोडते, परंतु त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. पुण्यामध्ये कोकणातील चाकरमान्यांची संख्या लाखांच्या घरात असून, या मोजक्या गाड्यांमुळे प्रवाशांना वर्षभर आरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा प्रवाशांना लांबचा वळसा घालून पनवेलमार्गे प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात.

रेल्वेची ही अपुरी सोय असल्यामुळे बहुतांश प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स किंवा एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. मात्र, पावसाळ्यात घाटांमधील दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रस्ते वाहतूक अनेकदा विस्कळीत होते, अशा वेळी रेल्वे हाच सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय ठरतो. म्हणूनच, खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ची मागणी अत्यंत रास्त आणि काळाची गरज आहे. ही गाडी सुरू झाल्यास सामान्य प्रवाशांना कमी खर्चात, जलद आणि आधुनिक सोयींसह थेट कोकणात पोहोचणे शक्य होईल, ज्यामुळे सध्याच्या यंत्रणेवरचा ताण मोठ्या प्रमाणात हलका होईल.

दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक; ग्रुप ऍडमिनविरुद्ध गुन्हा दाखल

   Follow us on        

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच ‘महाराष्ट्रलीकर्स’ (Maharashtra Leakers) नावाच्या टेलिग्राम चॅनेलवर लीक झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ५ मार्च रोजी होणारा गणित भाग-२ चा पेपर तब्बल तीन दिवस आधीच या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.

​या प्रकरणाची माहिती मिळताच बोर्डाच्या अधिकार्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या या प्रश्नपत्रिकांची अधिकृत प्रश्नपत्रिकांशी पडताळणी केली. तपासाअंती या दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याने पुणे विभागीय मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

​या तक्रारीनुसार, संबंधित टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस आता या रॅकेटचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या पेपर लीकच्या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, संबंधित विषयांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जमीन मोजणी प्रक्रिया होणार जलद! राज्यात २०० खाजगी भूमापकांची नियुक्ती, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही दिलासा

   Follow us on        

मुंबई: राज्यात जमिनीच्या मोजणीसाठी प्रलंबित असलेल्या हजारो अर्जांचा निपटारा करण्यासाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय भूमापकांची कमतरता लक्षात घेता, नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी राज्यात २०० खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. यामुळे आता जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक वेगवान होणार असून, अर्ज केल्यानंतर एक महिन्यात मोजणी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

​राज्यात सध्या मनुष्यबळाच्या अभावामुळे पोट-हिस्सा, हद्दकायम, बिनशेती आणि गुंठेवारी यांसारखी मोजणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर रखडली होती. यावर तोडगा म्हणून शासनाने दोन खाजगी यंत्रणांमार्फत २०० परवानाधारक भूमापकांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. हे भूमापक दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून ३० मार्चपासून प्रत्यक्ष मोजणीच्या कामाला सुरुवात करतील.

​अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शुल्कात कपातीचे संकेत

​जमीन मोजणीसाठी सध्या सरसकट नऊ हजार रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, हे शुल्क अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी परवडणारे नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. गरीब शेतकऱ्यांसाठी हे शुल्क कमी करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, अडीच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकांसाठी मोजणी शुल्काबाबत शासन वेगळा प्रस्ताव तयार करत असल्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले.

जनशताब्दी एक्सप्रेस अडीच तास उशिरा पोहोचली! ठाणे स्थानकावर शेकडो चाकरमानी रात्रभर ताटकळत

   Follow us on        

ठाणे: कोकण रेल्वेची शान आणि वेगासाठी ओळखली जाणारी १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सोमवारी (९ मार्च) तब्बल अडीच तास उशिराने धावल्यामुळे होळीचा सण साजरा करून परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे स्थानकावर उतरलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरच्या प्रवाशांना शेवटची लोकल हुकल्यामुळे संपूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवर काढावी लागली.

​होळीच्या सुट्ट्या संपवून मुंबईत कामावर परतण्यासाठी कोकणातील प्रवाशांनी जनशताब्दी एक्सप्रेसला पसंती दिली होती. मात्र, कोकण रेल्वेच्या विस्कळीत नियोजनामुळे ही गाडी रात्री उशिरा मुंबईत पोहोचली. ठाणे स्थानकावर ही गाडी आली तेव्हा शेवटची लोकल सुटून अवघी १० मिनिटे झाली होती. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जतच्या दिशेला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची मोठी कोंडी झाली.

​प्रवाशांचा संताप: “आम्ही करायचे काय?”

​ठाणे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या प्रवाशांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली:

​ओला/उबेर परवडत नाही: लांबच्या प्रवासासाठी टॅक्सीचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक प्रवाशांनी स्थानकावरच थांबणे पसंत केले. एकटी महिला असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने या पर्यायाचा विचारच न केलेला बरा.

​अतिरिक्त लोकल का नाही?: “नवीन वर्षाचे स्वागत असो किंवा क्रिकेटचे सामने, रेल्वे प्रशासन रात्री उशिरापर्यंत जादा गाड्या चालवते. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत, जेव्हा एखादी महत्त्वाची एक्सप्रेस उशिरा येते, तेव्हा माणुसकीच्या नात्याने एखादी जादा लोकल का सोडली जात नाही?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

​प्लॅटफॉर्मवरच काढली रात्र

​शेवटची गाडी हुकल्याने प्रवाशांना पहाटेच्या पहिल्या लोकलची (सुमारे ४ तास) वाट पाहत प्लॅटफॉर्मवरच बसून किंवा झोपून राहावे लागले. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे “वेगाचा दावा करणाऱ्या जनशताब्दीने प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याऐवजी कष्टदायकच केला,” अशी भावना व्यक्त होत आहे.

​प्रशासनाला प्रश्न:

सणासुदीच्या काळात गाड्या उशिरा धावणार हे माहित असताना, समन्वय राखून शेवटची लोकल १० मिनिटे थांबवून ठेवता आली नसती का? किंवा प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था का केली गेली नाही?

Shaktipeeth Expressway: नागपूर – पत्रादेवी शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल; नवीन गावांची नावे समाविष्ट

   Follow us on        

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून आता या महामार्गाची नवी अलाइनमेंट पुढे आली आहे. राज्य शासनाने या बदलाला मंजुरी दिल्यानंतर महामार्गाची दिशा काही प्रमाणात बदलणार आहे.

नवीन अलाइनमेंटमुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून या भागातील वेगळ्या मार्गाने महामार्ग नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नव्या मार्गानुसार अनेक तालुक्यांतील गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.

नव्या अलाईन्मेंटनुसार संभाव्य गावे:

​नव्या प्रस्तावाप्रमाणे सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील तालुक्यांमधील गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे:

​पलूस तालुका: देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव, मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव.

​वाळवा तालुका: वाळवा, उरण, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळप, ऐतवडे खुर्द.

​हातकणंगले व पन्हाळा तालुका: पारगाव, बहिरेवाडी, जाखले, गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशिरे, मनपाडले.

​करवीर तालुका: केली, केळें, वरणगे, पाडळी बु., शिदेवाडी, खुपीरे, वाकरे, कुडित्रे, बहिरेेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दु., सडोली दु., भाटणवाडी, हसूर.

​राधानगरी तालुका: राशिवडे बु., कोदवडे, वाघवाडे, मोहाडे, माजगाव, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, सरवडे.

​कागल व भुदरगड तालुका: उंदरवाडी (कागल), खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवडे, पाचवडे, बसरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटिवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, कराडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुले, मेघोली, अरळगुंडी.

​आजरा तालुका: कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मासोळी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.

​चंदगड तालुका:गवसे, भुजवडे, कुर्णी, म्हाळुंगे, बिझूर, भोगोली, कानूर बु., पिलानी, जांबरे आणि इसापूर.

​दोडामार्ग तालुका:कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर आणि झोळंबे.

​सावंतवाडी तालुका: पडवे माजगाव, पडवे, देगाव आणि बांदा.

या बदलामुळे काही गावांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, महामार्ग प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रशासनाला मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

MSRTC: “राजमाता जिजाऊ” बससेवा लवकरच सेवेत दाखल होणार

   Follow us on        

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आणखी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद पाऊल उचलले आहे. स्वराज्याची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन अत्याधुनिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. एसटीच्या नव्या ५५ आसनी (३×२ आसन रचना) असलेल्या आधुनिक बसेसना “राजमाता जिजाऊ” असे नाव देण्यात आले असून या बसांची पहिली झलक समोर आली आहे. या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार असून अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा यामुळे हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला आकार मिळाला. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि संस्कारांमुळेच स्वराज्याची पायाभरणी झाली. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू होणारी ही बससेवा केवळ प्रवासाची सुविधा नसून इतिहासाचा आणि स्वराज्याच्या मूल्यांचा सन्मान मानला जात आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला सलाम करत ही “राजमाता जिजाऊ” बससेवा लवकरच राज्याच्या विविध मार्गांवर धावू लागणार आहे.

दक्षिण मुंबई – अलिबाग प्रवास ७५ मिनिटांवर आणणार्‍या रेवास–करंजा सागरी पूल प्रकल्पाला वेग

   Follow us on        

रायगड: महाराष्ट्राच्या किनारी भागातील महत्त्वाकांक्षी रेवास–करंजा सागरी पूल प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून मार्च २०२६ पर्यंत सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. धर्मतर खाडीवर उभारण्यात येणारा हा पूल महाराष्ट्राच्या सागरी कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रकल्पात २ किलोमीटर लांबीचा मुख्य सागरी पूल आणि अ‍ॅप्रोच रस्त्यांसह एकूण १०.६५ किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून हा प्रकल्प राबवला जात असून तो ३० महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्याची कामाची गती पाहता हा प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा पूल अटल सेतूच्या चिर्ले इंटरचेंजपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ते अलिबागचा प्रवास सध्याच्या सुमारे २.५ तासांवरून फक्त ७५ मिनिटांवर (१ तास १५ मिनिटे) येणार आहे. यामुळे अलिबागसह संपूर्ण कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

रेवास–करंजा पूल हा महाराष्ट्र कोस्टल हायवे (सागरी महामार्ग) प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून तो उरण (नवी मुंबई) आणि रेवस (अलिबाग) यांना थेट जोडणार आहे. यामुळे मुंबई–कोकण–गोवा किनारी मार्ग अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.

प्रकल्पाची प्रगती सातत्याने वाढत असून ऑक्टोबर २०२५ मध्ये १५%, नोव्हेंबरमध्ये १८%, फेब्रुवारी २०२६ मध्ये २२% आणि मार्चमध्ये २५% काम पूर्ण झाले आहे. पूल तयार झाल्यानंतर पावसाळ्यात फेरी सेवा बंद असतानाही बारमाही सुरक्षित आणि जलद रस्ता उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पामुळे रायगड जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीला नवे आयाम मिळणार असून कोकणवासीयांसाठी हा पूल खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

Pic credit – Infra News India (INI)

‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याबाहेरही धावणार; प्रस्तावित मार्गांची यादी जाहीर, ‘स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात होणार

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) ‘शिवनेरी’ बससेवा लवकरच मुंबई–पुणे मार्गाबाहेर राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा MSRTC चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.

२००२ मध्ये सुरू झालेली शिवनेरी सेवा वेळेची काटेकोरता, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाते. सामान्य बसांच्या तुलनेत भाडे थोडे अधिक असले तरी प्रवाशांचा या सेवेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

२०० नवीन व्होल्वो बसांची भर

राज्यभर विस्तारासाठी MSRTC ने २०० अत्याधुनिक व्होल्वो बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या बस पुढील प्रमुख मार्गांवर धावणार आहेत:

नाशिक–पुणे

नाशिक–छत्रपती संभाजीनगर

नाशिक–जळगाव–धुळे

पुणे–कोल्हापूर

पुणे–सांगली

पुणे –सोलापूर

नागपूर–चंद्रपूर

नागपूर–अमरावती–अकोला

ई-शिवनेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरिवली–स्वारगेट, ठाणे–शिवाजीनगर आदी मार्गांवर ई-शिवनेरी (इलेक्ट्रिक) बस धावत आहेत. पर्यावरणपूरक या बसांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महिलांना व ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाते, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे.

स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात

नवीन २०० बसांपैकी ३० बस स्लीपर कोच असणार आहेत. या ‘स्लीपर शिवनेरी’ बस काही लांब पल्ल्याच्या मार्गांवरील नॉन-एसी स्लीपर बसांची जागा घेणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अधिक सुरक्षितता आणि आरामदायी बेड-कोच सुविधेमुळे रात्रीच्या प्रवासासाठी ही सेवा अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

शिवनेरी सेवेचा हा विस्तार म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरूवात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Fact check: होळीसाठी ४ मार्च सुट्टी असल्याची बातमी खोटी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) स्पष्ट केले आहे की, होळीनिमित्त फक्त मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सोशल मीडियावर बुधवार, ४ मार्च २०२६ रोजीही सुट्टी असल्याचा खोटा दावा आणि फेक नोटिफिकेशन व्हायरल झाले होते. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत (२०२६) ४ मार्चला कोणतीही अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही.

यंदा चंद्रग्रहणामुळे (३ मार्चला) आणि धार्मिक परंपरेनुसार काही ठिकाणी लोकांनी रंग खेळणे ४ मार्चला पुढे ढकलले असले तरी, शासकीय/शाळा/बँक/कार्यालयांसाठी सुट्टी फक्त ३ मार्चलाच आहे. ४ मार्च हा सामान्य कार्यदिवस राहील.महाराष्ट्रातील २०२६ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी (मार्च महिन्यातील महत्त्वाच्या) ३ मार्च २०२६ (मंगळवार) – होळी (धुलिवंदन/दुसरा दिवस)

अधिकृत माहितीसाठी DGIPR च्या पोस्ट किंवा शासनाच्या वेबसाइटला (https://dgipr.maharashtra.gov.in) भेट द्या. फेक न्यूज पसरवू नका, फक्त विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवा!

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search