Category Archives: महाराष्ट्र

नवीन शैक्षणिक वर्षात चार इयत्तांचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार.

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीपाठोपाठ आता इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यालाही मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. यामुळे येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात आता इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी अशा चारही वर्गांचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.

​राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत राहून, विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी आणि अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) लक्षात घेऊन हा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या बैठकीला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह शिक्षण विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी आणि सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.

​या नवीन आराखड्याला आता अभ्यासक्रम समन्वय समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, ‘बालभारती’मार्फत या वर्गांची पाठ्यपुस्तके तातडीने तयार केली जाणार आहेत. ही पुस्तके नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. दरम्यान, नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) याच महिन्यात मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले असून, त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मुंबई लोकलच्या ‘लेडीज स्पेशल’ला ३४ वर्षे पूर्ण

   Follow us on        

मुंबई:भारतीय रेल्वेच्या इतिहासात महिला-केंद्रित उपनगरीय प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला गेला आहे. जगातील पहिल्या ‘लेडीज स्पेशल’ ट्रेन सेवेने आपल्या यशस्वी संचालनाची ३४ वर्षे पूर्ण केली आहेत. ५ मे १९९२ रोजी सुरू झालेली ही सेवा मुंबईतील नोकरीपेशा महिलांच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवासाच्या वाढत्या गरजेला दिलेले उत्तर होते. सुरुवातीला ही सेवा केवळ चर्चगेट ते बोरीवली दरम्यान होती, परंतु महिलांच्या प्रतिसादानंतर १९९३ मध्ये तिचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला.

​१९९० च्या दशकात दक्षिण मुंबईत झालेली औद्योगिक वाढ आणि नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या वाढत्या संख्येमुळे ‘लेडीज स्पेशल’ची संकल्पना उदयास आली. या गाड्यांमुळे महिलांना गर्दीच्या वेळी नियमित लोकलच्या डब्यात चढण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कमी झाला. कालांतराने, या गाड्या केवळ प्रवासाचे साधन न राहता महिलांच्या सामाजिकीकरणाचे केंद्र बनल्या. या प्रवासात विविध वयोगटातील आणि समाजातील महिलांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले असून, अनेक प्रवाशांसाठी हा वेळ दैनंदिन अनुभव शेअर करण्याची हक्काची जागा बनली आहे.

​सध्या पश्चिम रेल्वेद्वारे दररोज १० ‘लेडीज स्पेशल’ सेवा चालवल्या जातात. या सेवा सकाळ आणि संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी (Peak Hours) दोन्ही दिशांना उपलब्ध आहेत. सकाळी विरार, बोरीवली, भाईंदर आणि वसई रोड येथून चर्चगेटसाठी ६ सेवा धावतात, तर संध्याकाळी चर्चगेटवरून बोरीवली आणि विरारसाठी ४ परतीच्या सेवा उपलब्ध आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ही सेवा वरदान ठरली आहे.

​गेल्या तीन दशकांत या सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. २००६ मध्ये वांद्रे यार्ड ते चर्चगेट अशी सेवा सुरू झाली होती, जिचे पुढे २०१८ मध्ये विरार-चर्चगेट सेवेत रूपांतर करण्यात आले. तसेच २०१३ मध्ये सुरू झालेल्या वांद्रे उपनगरीय सेवांचाही विस्तार २०१६ आणि २०१८ मध्ये विरारपर्यंत करण्यात आला. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील हा एक महत्त्वाचा घटक असून, तो महिलांच्या कार्यक्षेत्रातील वाढत्या सहभागाचे प्रतीक मानला जातो.

आंबे पिकवण्यासाठी घातक केमिकलची फवारणी? APMC मधील व्यापाऱ्यांवर एफडीएची मोठी कारवाई

   Follow us on        

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) फळ मार्केटमध्ये आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका जागरूक ग्राहकाने व्यापाऱ्यांना आंब्यांवर उघडपणे रसायनांची फवारणी करताना पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि APMC प्रशासनाने संयुक्तपणे फळ मार्केटमध्ये अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान संशयास्पद व्यापाऱ्यांच्या गाळ्यांची झडती घेण्यात आली असून आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले आहेत.

​प्रशासनाने जप्त केलेले हे नमुने सध्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असताना, अशा प्रकारे रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी नैसर्गिक आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांमधील फरक ओळखण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा रंगाने एकसारखा नसतो आणि त्याला एक गोड सुगंध असतो, तसेच तो सर्व बाजूंनी मऊ लागतो. याउलट, रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा पूर्णपणे गडद पिवळा दिसतो, त्याला नैसर्गिक वास नसतो किंवा कधीकधी औषधासारखा वास येतो. असे आंबे बाहेरून मऊ वाटले तरी आतून कडक असण्याची शक्यता असते. फळ तज्ज्ञांनी नागरिकांना आंबे खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आणि लहान मुले व वृद्धांना देताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Photo Credit – AI

Road To Rail: मध्य रेल्वेचा नवा अध्याय! आता रेल्वेने होणार कार्सची वाहतूक

   Follow us on        

मुंबई: भारतीय रेल्वेच्या ‘रोड टू रेल’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सेंट्रल रेल्वेने इगतपुरी गुड्स शेडवर ऑटोमोबाईल लोडिंगची सुविधा यशस्वीपणे सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात रेल्वेने आपले पाऊल अधिक भक्कम केले असून, गती शक्ती मिशनला यातून मोठी चालना मिळणार आहे.

​या उपक्रमाची पहिली मोठी ऑर्डर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून प्राप्त झाली असून, इगतपुरी (IGP) ते नौतनवा (NTV) या मार्गावर पहिल्या NMG रेकचे प्रस्थान झाले आहे. या रेकमध्ये एकूण २५ वॅगन्स असून त्यामध्ये १०० कार्स सुरक्षितपणे लोड करण्यात आल्या आहेत. या एका रेकच्या माध्यमातून रेल्वेला सुमारे १७.१६ लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

​या सुविधेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन वाहनांची सुरक्षित, जलद आणि पर्यावरणस्नेही वाहतूक शक्य होणार आहे. सेंट्रल रेल्वेने या लोडिंग प्रक्रियेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले असून, यामध्ये कामगार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाहने वॅगनमध्ये लोड करताना दिसत आहेत. लॉजिस्टिक्स क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

मालवण: कडक निर्बंधांमुळे थांबलेली किल्ले प्रवासी होडी वाहतूक अखेर सुरू

   Follow us on        

मालवण: मध्य प्रदेशातील जबलपूर येथे अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीवर प्रवासी क्षमतेच्या दृष्टीने कडक निर्बंध लादले होते. रविवारी सकाळी बंदर विभागाने अचानक प्रत्येक होडीतील प्रवाशांची संख्या निश्चित केल्यामुळे होडी व्यावसायिक आणि बंदर अधिकारी यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली. नियमानुसार पर्यटकांच्या सुरक्षेचे काटेकोर पालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रमाचे वातावरण पसरले आणि याचा परिणाम म्हणून काही काळ प्रवासी होडी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत होडी व्यावसायिकांनी आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. पर्यटकांच्या सुरक्षेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या होडी व्यावसायिकांची बाजू आमदार निलेश राणे यांनी प्रशासनासमोर मांडली. या सकारात्मक चर्चेनंतर अखेर तोडगा निघाला आणि बंद पडलेली किल्ले प्रवासी होडी वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झाली. या निर्णयामुळे खोळंबलेल्या पर्यटकांसह व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले असून, ‘शिवराजेश्वर किल्ला प्रवासी वाहतूक’ संस्थेच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत.

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फीचा मोह पडणार महागात; महामार्ग पोलिसांकडून कारवाई सुरू

   Follow us on        

पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, या प्रकल्पाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रवासी आपले वाहन महामार्गावर थांबवून सेल्फी आणि फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांचा हा सेल्फीचा मोह आता त्यांच्या जीवावर बेतू शकतो, ही बाब लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी अशा बेशिस्त प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.

​महाराष्ट्र दिनी (१ मे) उद्घाटन झालेल्या या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ साधारण ३० मिनिटांनी कमी झाला असून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका झाली आहे. मात्र, हा मार्ग अतिवेगवान असून येथे वाहने १०० ते १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत केवळ फोटो काढण्यासाठी वाहन थांबवणे हे भीषण अपघातांना निमंत्रण देणारे ठरू शकते.

​महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे वाहन थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर प्रसंगी गुन्हेही दाखल केले जातील. प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी महामार्गावर कोठेही थांबू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला असला तरी, प्रवाशांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावर कडक वाहतूक नियम लागू

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) प्रकल्पावर वाहतूक नियमांची माहिती सर्व वाहनचालकांना दिली आहे.

१३.३ किलोमीटर लांबीच्या या आठ पदरी मार्गावर केवळ कार आणि बसेसनाच प्रवेश देण्यात येणार आहे. ट्रक, अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारी वाहने तसेच ट्रेलर्स यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

१ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या नवीन मार्गामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. खंडाळा घाटातील धोकादायक  वळणे टाळून हा मार्ग तयार करण्यात आला असून, त्यामुळे प्रवास वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होईल.

एमएसआरडीसीने सुरक्षित, वेगवान आणि शिस्तबद्ध वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे नियम लागू केले आहेत. सर्व वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे एमएसआरडीसीने आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

मिसिंग लिंकवर मराठी ‘मिसिंग’? प्रशासनाने स्पष्टीकरण दिले

   Follow us on        

लोणावळा: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी करणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान टनेलच्या प्रवेशद्वारावर दिसलेल्या एका डिजिटल पाटीमुळे सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

​नेमका वाद काय?

​प्रकल्पाच्या उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे लक्ष टनेलच्या दर्शनी भागावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल पाटीकडे गेले. या पाटीवर “Missing Link Tunnel में आपका स्वागत है” असा हिंदी मजकूर झळकताना दिसला. महाराष्ट्र दिनीच राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पावर मराठीऐवजी हिंदी भाषेचा वापर केल्याचे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

​प्रशासनाचे स्पष्टीकरण

​सोशल मीडियावरील वाढती चर्चा आणि टीकेची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “ती एक आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल पाटी आहे. या पाटीवर माहिती केवळ एकाच भाषेत नसून ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये क्रमाने (Rotation) प्रदर्शित केली जाते. ज्यावेळी फोटो काढला गेला, त्यावेळी हिंदीतील संदेश स्क्रीनवर दिसत होता.”

​प्रवाशांच्या सोयीसाठी आणि माहितीसाठी या तिन्ही भाषांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

​प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

आशियातील सर्वात रुंद बोगदा

​वेळेची बचत: या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील २५ मिनिटे वाचणार असून ६ किमीचे अंतर कमी होणार आहे.

​प्रकल्प खर्च: सुमारे ₹६,६९५ कोटी खर्चून हा १३.३ किमीचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

​जागतिक विक्रम: प्रकल्पातील ८.९ किमी लांबीचा आणि २२.३ मीटर रुंदीचा बोगदा हा ‘आशियातील सर्वात रुंद बोगदा’ ठरण्याची शक्यता असून, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याचे संकेत आहेत.

​सुरक्षित प्रवास: खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि दरड प्रवण क्षेत्राला हा मार्ग सक्षम पर्याय ठरणार आहे.

​मिसिंग लिंक प्रकल्पामुळे आता पुण्याहून मुंबईला जाणारा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला असला, तरी उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या या भाषिक चर्चेने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याला ३ नवीन एक्सप्रेस गाड्या आणि १ नवीन पॅसेंजर गाडीची भेट

   Follow us on        

Railway Updates: ​मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. नांदेड मंडळांतर्गत तीन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस, एक नवीन डेमू (DEMO) सवारी गाडी आणि एका विद्यमान गाडीच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.

​या नवीन गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​१. नांदेड – तिरुचानूर – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस (१७६३३/३४)

​प्रारंभ: ९ मे पासून प्रत्येक शनिवारी (नांदेडून).

​वेळ: शनिवारी दुपारी १६:४५ वाजता सुटून रविवारी दुपारी १२:२० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १० मे पासून प्रत्येक रविवारी तिरुचानूरहून १९:४५ ला निघून सोमवारी १८:२० वाजता नांदेडला पोहोचेल.

​कोच: १६ कोच (१ AC फर्स्ट, १ AC टू-टियर, ४ AC थ्री-टियर, ६ स्लिपर, ४ जनरल).

​२. जालना – तिरुचानूर – जालना साप्ताहिक एक्सप्रेस (१७६२३/२४)

​प्रारंभ: ११ मे पासून प्रत्येक सोमवारी (जालन्याहून).

​वेळ: सोमवारी सकाळी ७:०० वाजता सुटून मंगळवारी दुपारी १२:०० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १२ मे पासून प्रत्येक मंगळवारी तिरुचानूरहून १५:१५ ला निघून बुधवारी रात्री २१:०० वाजता जालन्याला पोहोचेल.

​कोच: २२ कोच (३ AC टू-टियर, ५ AC थ्री-टियर, १० स्लिपर, ४ जनरल).

३. तिरुपती – पंढरपूर – तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस (१७४३७/३८)

​प्रारंभ: १६ मे पासून प्रत्येक शनिवारी (तिरुपतीहून).

​वेळ: शनिवारी १६:०० वाजता सुटून रविवारी सायंकाळी १९:०० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १७ मे पासून प्रत्येक रविवारी रात्री २०:०० वाजता पंढरपूरहून निघून सोमवारी रात्री २३:३० ला तिरुपतीला पोहोचेल.

​प्रमुख थांबे: लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, बीदर.

​४. नवीन डेमू (DEMU) सवारी गाडी (७७६२३/२४)

​मार्ग: पूर्णा – जालना – हुजूर साहिब नांदेड.

​दिनांक: ४ मे पासून पूर्णेहून आणि ५ मे पासून जालन्याहून दररोज धावणार.

​कोच: ८ डबे (द्वितीय श्रेणी).

​५. रायचूर – परभणी गाडीचा जालन्यापर्यंत विस्तार (१७६६३/६४)

​रायचूर – परभणी आणि परभणी – जालना या गाड्यांचे एकत्रीकरण करून आता ही गाडी थेट रायचूर ते जालना दरम्यान चालवली जाईल. ही सेवा ५/६ मे पासून सुरू होत आहे. रायचूर ते परभणी दरम्यानच्या जुन्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला

   Follow us on        

लोणावळा:१ मे २०२६ रोजी सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या ओघामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. रणरणत्या उन्हामुळे एकापाठोपाठ १० ते १२ वाहने नादुरुस्त (ब्रेकडाउन) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. या भीषण कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह हजारो प्रवाशांना बसला असून, नागरिक तब्बल ३ ते ४ तास एकाच जागी अडकून पडले होते. विशेषतः लोणावळा आणि खोपोली परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोंडीत अडकलेल्या सर्व वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प (Missing Link Project) तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

​वास्तविक हा प्रकल्प आज मध्यरात्रीनंतर लोकांसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, घाटातील वाढती गर्दी आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेता, उद्घाटन सोहळा संपताच हा मार्ग तात्काळ सुरू करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे घाटातील प्रवासाचा वेळ वाचणार असून, रखडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search