Category Archives: महाराष्ट्र

मराठी सक्ती: परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाला ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचा पाठिंबा

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार, ज्या चालकांना मराठी लिहिता, वाचता किंवा बोलता येणार नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी कडक ताकीद देण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

​या निर्णयाला ९६ वर्षीय पद्मश्री पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी पत्राद्वारे आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी ट्विटरवर कर्णिक सरांच्या स्वाक्षरीतील पत्राची प्रत शेअर करत, हा आपल्यासाठी मोठा आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे. कर्णिक यांनी या वयातही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​स्थानिक भाषेचा आदर राखला जावा आणि प्रवाशांशी संवाद साधताना भाषिक अडथळे येऊ नयेत, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक मराठी संघटनांनी या पावलाचे स्वागत केले असले, तरी काही अमराठी चालक संघटनांनी याला विरोध करत १ मे पासून संपाचा इशारा दिला आहे. मात्र, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक भाषेचा सन्मान करावाच लागेल,” अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय राज्यातील भाषिक अस्मिता अधिक बळकट करणारा ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

राज्यांतर्गत गाड्या बंद करून मध्य रेल्वेचा राज्याबाहेर जाणार्‍या गाड्यांना नियमित करण्याचा सपाटा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेने उत्तर भारतातील विशेष रेल्वे गाड्या नियमित करण्याचा सपाटा लावला असून, याच मालिकेत आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रिवा’ या साप्ताहिक एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१५३/२०१५४ रिवा-सीएसएमटी-रिवा ही गाडी आता नियमित स्वरूपात धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी रिवा येथून दुपारी १५:५० वाजता सुटेल, तर दर शुक्रवारी सीएसएमटी येथून दुपारी १३:३० वाजता सुटेल. या निर्णयामुळे उत्तर भारतीयांना दिलासा मिळाला असला तरी, महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा नको, असे तांत्रिक कारण पुढे करून दादर-रत्नागिरी सारख्या महत्त्वाच्या राज्यातील गाड्या बंद पाडणाऱ्या रेल्वे प्रशासनाने, आता परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मात्र मुंबईतील मुख्य टर्मिनसवरून सोडण्याचा सपाटा लावला आहे. यावरून मध्य रेल्वेचा महाराष्ट्रातील प्रवाशांप्रती असलेला दुजाभाव स्पष्टपणे समोर येत आहे.

​काही काळापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजरसारख्या गाड्या केवळ मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांना अडथळा हे कारण देऊन बंद करण्यात आल्या. मात्र, दुसरीकडे दादर-गोरखपूर, मुंबई-बेंगळुरू वंदे भारत आणि आता नव्याने नियमित करण्यात आलेली ‘रिवा एक्स्प्रेस’ यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर आणि सीएसएमटीसारख्या गजबजलेल्या स्थानकांवरून हिरवा कंदील दाखवला जात आहे. “राज्यातील प्रवाशांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील गाड्यांना झुकते माप देणे हे नेमके कोणते रेल्वे प्रशासन?” असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना विचारत आहेत.

रेल्वे मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली?

विशेष म्हणजे, दादर-रत्नागिरी गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्याच्या व्यवहार्यतेची (Feasibility) तपासणी करण्याचे आदेश खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे मंत्र्यांच्या सूचनेनंतरही टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा हा ‘मुजोरपणा’ असल्याचे बोलले जात आहे.

​कोकण आणि राज्यातील इतर भागांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना, रेल्वेचे अधिकारी मात्र सोयीस्करपणे तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत आहेत. एका बाजूला राज्यातील रेल्वेगाड्यांच्या वेळेचा बोजवारा उडाला असताना, दुसऱ्या राज्यांसाठी मुंबईची मुख्य स्थानके रिकामी कशी होतात, असा सवाल उपस्थित करत आता रेल्वे प्रवासी आक्रमक झाले आहेत. या मुजोर प्रशासनाविरोधात आता दादर येथे होणाऱ्या रेल्वे परिषदेत मोठे आंदोलन पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शक्तीपीठ महामार्ग रधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ जर राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणला नाही, तर या जिल्ह्याला महामार्गाचा ‘बगल’ मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन आणि स्थानिक व्यापारावर होईल, असा इशारा माजी आमदार संदेश पारकर यांनी दिला आहे.

​पारकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारकडे मागणी केली आहे की, सध्या आखण्यात येत असलेल्या महामार्गाच्या आराखड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला योग्य स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा महामार्ग जिल्ह्याबाहेरून गेला, तर कोकणातील आर्थिक चक्रावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

पर्यटनाला मिळणार मोठी चालना

​महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेल्यास गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक मजबूत होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवासाची सोय होईल. राधानगरी मार्गे जोडणी मिळाल्यास खालील पर्यटन स्थळांना मोठा फायदा होऊ शकतो:

​किल्ले: सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग आणि रांगणा किल्ला.

​किनारे: तारकर्ली आणि देवबाग.

​थंड हवेची ठिकाणे: आंबोली आणि सावंतवाडी.

धार्मिक स्थळांचा विकास

​केवळ निसर्ग पर्यटनच नाही, तर धार्मिक पर्यटनालाही यामुळे गती मिळेल. कुणकेश्वर, आंगणेवाडी, मांगरूर दत्त मंदिर आणि वालावल लक्ष्मीनारायण मंदिर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर भाविकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही पारकर यांनी नमूद केले.

​जर महामार्गाने सिंधुदुर्गला वळसा घातला, तर जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आराखड्यात बदल करून राधानगरी मार्गे सिंधुदुर्गचा समावेश करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांकडून केली जात आहे.

सरकारचा मोठा निर्णय! आपसातील जमीन वाटपासाठी लागणारे नोंदणी शुल्क माफ

   Follow us on        

मुंबई:महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतजमीन वाटपाच्या नोंदणीसाठी लागणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आता वारसाहक्काने किंवा आपापसातील सहमतीने होणाऱ्या शेतजमीन वाटपासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यासंदर्भात महसूल विभागाकडून सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आवश्यक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

​पूर्वी शेतजमिनीचे वाटप करताना जमिनीच्या एकूण किमतीच्या १ टक्के नोंदणी शुल्क आकारले जात होते. ही रक्कम मोठी असल्याने अनेक शेतकरी अधिकृत दस्तनोंदणी करणे टाळत असत. यातूनच पुढे कुटुंबात जमिनीच्या मालकीवरून वादाचे प्रसंग निर्माण व्हायचे आणि शेतकऱ्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागायचा. मात्र, आता शुल्कमाफी झाल्यामुळे दस्तनोंदणी करणे सोपे होणार असून, यामुळे जमिनीचे वाद कमी होण्यास मदत होईल.

​महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार, शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून दस्त तयार केले जातात. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार असून, जमिनीच्या अधिकृत नोंदणीच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाच्या या पावलामुळे ग्रामीण भागातील जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शेकरू, उडणारी खारीसह ईतर दुर्मिळ प्राण्यांचे अवशेष जप्त

   Follow us on        

गडचिरोली:वन्यजीवांच्या शिकारीसाठी जंगलात दबा धरून बसलेल्या एका मोठ्या टोळीला जेरबंद करण्यात आलापल्ली वनविभागाला मोठे यश आले आहे. रविवारी, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलात काही जण शिकारीच्या उद्देशाने लपून बसल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने तातडीने परिसरात सापळा रचला. वनविभागाच्या पथकाची चाहूल लागताच शिकाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने पाठलाग करून १२ जणांना ताब्यात घेतले.

​शिकाऱ्यांची झडती घेतली असता वनविभागाच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकडूचे (चार अवशेष), एक उडणारी खार, एक हरीनाल पक्षी आणि घूबड प्रजातीतील पक्षांचे अवशेष व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिकारी टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व शिकाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​सदर मोहीम आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले व उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, सुरेश मडावी, श्याम जंगमवार, नामाजी मडावी आणि देवाजी सलामे यांनी सहभाग घेतला. वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाचे विशेष लक्ष असून, नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित वनविभागाला द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी केले आहे.

रुळांवर मानवनिर्मित अडथळ्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच’ मोहीम सुरू

   Follow us on        

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागात रेल्वे रुळांवर लोखंडी सामान, लाकूड किंवा दगड ठेवणे आणि धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. खेळण्याच्या उत्सुकतेपोटी किंवा कुतूहलामुळे हे प्रकार होत असल्याचे आरपीएफच्या तपासात समोर आले आहे. यामुळे मोठ्या रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होत असून, प्रवाशांच्या जीवितास आणि रेल्वे मालमत्तेला मोठे नुकसान होऊ शकते.

रुळाजवळील शाळा, गावे आणि वस्त्यांतील मुलांमध्ये हे प्रकार अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, ज्यांना याची गंभीरता कळत नाही.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे आरपीएफ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. तपासणीतून उघडकीस आले की, बहुतेक घटनांमागे स्थानिक मुलांचा सहभाग असतो आणि त्यांना रेल्वे रुळांवर खेळणे किंवा दगड फेकण्याचे परिणाम समजत नाहीत. यामुळे आरपीएफने विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या मोहिमेत आरपीएफचे अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभाग घेत आहेत.‘कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच’ या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील आरपीएफ निरीक्षक आणि प्रभारी अधिकारी रेल्वे रुळांलगतच्या शाळा, गावे आणि वस्त्यांमध्ये नियमित भेटी देत आहेत. विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, पालकांशी आणि ग्रामप्रमुखांशी थेट संवाद साधून रेल्वे रुळांवर खेळणे, दगड ठेवणे किंवा फेकण्याच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. यातून मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित रेल्वे वातावरणाची महत्त्वता समजावून सांगितली जाते.

या जनजागृती मोहिमेमुळे रेल्वे सुरक्षा वाढवणे आणि अपघात टाळणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. आरपीएफने यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलांना सावध केले आहे, परंतु सध्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबत प्रशिक्षण देऊन जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उन्हाळा-पावसाळ्यात अखंड वीजपुरवठ्यासाठी एआयवर भर

   Follow us on        

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली.

उन्हाळा व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीचे व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करून कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

रूफटॉप सौर ऊर्जेमुळे वीज वितरण यंत्रणेला फायदा होत असून, वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धता आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. यासह आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळेस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: दिनांक १८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसीलदार दीक्षात देशपांडे, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.

 

कारवाईदरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला. आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ला पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.*

रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत, अगदी ३ वाजेपर्यंत कारवाई सुरू राहिली. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित तहसीलदार आणि त्यांच्या पथकांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वी करून दाखवली. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अशा प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

राज्यात २०-२२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता

   Follow us on        

मुंबई: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

समृद्धी महामार्गावर वर्षभरात धावली दीड कोटींच्यावर वाहने; रेकॉर्डब्रेक टोल वसूली

   Follow us on        

मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने वाहन संख्या आणि टोल वसुलीमध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या ७०१ किमी लांबीच्या महामार्गावरून तब्बल १.५५ कोटी वाहनांनी प्रवास केला. या माध्यमातून वर्षभरात १,२४०.०४ कोटी रुपयांचा टोल महसूल गोळा झाला असून, हा आकडा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४९९.४१ कोटी रुपयांनी अधिक आहे. समृद्धी महामार्गाच्या इतिहासात टोल वसुलीने एकाच वर्षात १,००० कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

​या महामार्गाच्या प्रवासाकडे नजर टाकल्यास, २०२२-२३ मध्ये जेव्हा हा मार्ग अंशतः खुला झाला होता, तेव्हा पहिल्या चार महिन्यांत १३.५९ लाख वाहनांमधून १०६.४१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यानंतर २०२३-२४ मध्ये वाहनांची संख्या ६८.९९ लाखांवर पोहोचली आणि ५२८.१० कोटींचा टोल जमा झाला. २०२४-२५ मध्ये वाहनांच्या संख्येने १ कोटीचा टप्पा पार केला होता, ज्यातून ७४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गिकेचा वापर सातत्याने वाढत असून, आतापर्यंत एकूण ३.४४ कोटी वाहनांनी यावरून प्रवास केला आहे आणि त्यातून एकूण २,६६० कोटी रुपयांचा टोल जमा झाला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search