रायगड: पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत, तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला आहे.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.
वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
MSRTC News: पूर्वी एसटी म्हंटले की डोळ्यासमोर नकारात्मक चित्र उभे राहायचे. जुनी बस, निखळलेली आसने Seats, काचा फुटलेल्या किंवा धुळीने माखलेल्या खिडक्या गळणारे छत आणि चालताना होणारा कर्णकर्कश आवाज. मात्र आता एसटी आपली ओळख बदलताना दिसत आहे. एसटीच्या ताफ्यात आता वातानुकूलित आणि आरामदायक बस दाखल होत आहेत. मात्र या बसेस लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी चालविण्यात येत होत्या. आता एसटीने एक पाउल पुढे टाकले आहे. आता अशा बसेस ग्रामीण भागात पण चालविण्याचा विचार एसटी प्रशासनाने केला आहे.
एसटीने या करिता ५१५० ई – बसेस साठी मोठे टेंडर काढले आणि हे संपूर्ण टेंडर ओलेक्टरा (ईव्ही ट्रान्स) या कंपनीस देण्यात आले आहे. एकूण ५१५० बसेस असलेल्या या श्रेणीत ९ मीटर लांबीच्या २३५० बसेस आणि १२ मीटर लांबीच्या २८०० बसेस, एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार असून, याबसेसच्या माध्यमातून एसटी एक वेगळी श्रेणी निर्माण करत असल्याचे समजते.
मध्यम लांब पल्ला, शहरी तसेच ग्रामीण भागात या बसेसचे प्रामुख्याने मार्गक्रमण करण्याचे एसटीचे प्रयोजन असून, ३५ + १ (चालक) इतकी (नॉन पुशबॅक) आसन क्षमता असलेली’ओर्डीनरी एसी बस’ अशी एक वेगळी श्रेणी एसटी नव्याने आणू इच्छिते हे बसवरील नव्या रंगसंगतीवरून समजत आहे.सध्या या बसेस ठाण्यात आल्या असून, ट्रायल आणि पासिंग झाल्यावर आपल्या इच्छित मार्गावर लवकर सुरू होतील, अशी आशा आहे.
ठाणे : मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ एका पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. ही घटना आज रविवार, 10 डिसेंबर संध्याकाळी 6:31 च्या सुमारास घडली आहे.
“कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल्वे एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) मागवण्यात आले आणि अपघातस्थळी हलवण्यात आले,” असे मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. अधिक माहितीची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
सावंतवाडी : रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून त्याचा मांसाची तस्करी करणे तसेच इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक युवकाला सावंतवाडी वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले.
रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी रोहित कोळी याला अटक करण्यासाठी त्याचा माग काढत सावंतवाडी वन विभागाची टीम याबाबत कसून तपास करत होती. या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदरचा युवक हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची टीम रवाना झाली. यानुसार फिरते पथक सांगली यांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली हायवेवर रोहित कोळी व इतर ५ संशयितांना १० जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदरच्या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
सदरची कारवाई ही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर(प्रा.) श्री.आर. एम. रामनुजम, उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
प्रतिनिधी: रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF ‘जिवन रक्षक अभियानांतर्गत’ रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एप्रिल ते ऑक्टोबर या काळादरम्यान विविध विभागांमध्ये साहस आणि प्रसंगावधान दाखवून चुकीच्या पद्धतीने गाडी पडणाऱ्या ६६ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.
यात मुंबई विभागातील १९, भुसावळ विभागातील १३, नागपूर विभागातील १४,पुणे विभागातील १५ तर सोलापूर विभागातील ५ प्रवाशांचा समावेश आहे.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, “अमानत” या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, रोख, दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या आहेत.
यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने ८५७ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. त्याची किंमत २.७७ कोटी रुपये आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य आहे. भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख किमतीचे सामान नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख किमतीचे सामान, पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख किमतीचे सामान तर सोलापूर विभागात ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख किमतीच्या सामानाचा सामावेश आहे.
मध्य रेल्वेचे आवाहन
रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रवाशांनी त्यांना सहकार्य करावे तसेच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नये असे आवाहन केले आहे.
पनवेल: पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता.
हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं.
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने येत्या ५ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना तसेच कोल्हापूर,सातारा ,पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र नाशिक विभागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला नाही आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. आता त्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची नेहमीच चिंता असते आणि पालकांवरही ताण असतो. अनेकजण विशेषत: मुली अनुत्तीर्ण झाल्यावर अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात.या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागविली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर त्यांची मते मागवून घेतली आहेत. त्याचा विचार करून दोन वर्षांत नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे.पाठांतराची सवय कमी करण्याचा प्रयत्ननवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
नवीन बदल असा असणार… शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील. पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.सेमिस्टर पॅटर्नचा हेतू…विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होईलएका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्यांना जास्त अभ्यास करण्याची संधीअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबेल
मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
एकूण रिक्त पदे – १९०
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ EWS – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात अवश्य पाहा.