Category Archives: सिंधुदुर्ग

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ‘अँग्री स्टॅक फार्मर आयडी’ काढणे बंधनकारक

   Follow us on        

सिंधुदर्गनगरी, दि. ३०:

केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक (स्वतंत्र) ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करण्याची विशेष मोहीम सध्या सिंधुदुर्ग जिल्हाभर राबविण्यात येत आहे. आगामी हंगामापासून शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकरी बांधवांनी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि महिला बचत गटांनी या मोहिमेत शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे आणि गावातील १००% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

फार्मर आयडी’ शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे?

हा डिजिटल आयडी तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय प्रक्रिया आणि योजनांचा लाभ मिळवणे अत्यंत सोपे होणार आहे:

सर्व योजना एकाच ठिकाणी: पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह शासनाच्या सर्व आर्थिक योजनांचा लाभ या एकाच आयडीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा होईल.

नोंदणी प्रक्रियेत सुलभता: पीक विमा, केसीसी (KCC) कर्ज, फळबाग अनुदान, तसेच कोकणातील विशेष आंबा-काजू प्रक्रिया योजनांसाठी लागणारी नोंदणी प्रक्रिया यामुळे अधिक सोपी होईल.

डिजिटल जोडणी: शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’, ७/१२ (सातबारा) आणि ८अ चा उतारा ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे या आयडीशी डिजिटली जोडली जाणार आहेत.

कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्ती: एकदा हा आयडी तयार झाल्यानंतर, भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज पडणार नाही.

कोकणासाठी विशेष लाभ: कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा व काजू उत्पादकांसाठी येणाऱ्या विशेष योजनांचा लाभ थेट आणि गतीने मिळेल.

थेट नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट आणि कोणत्याही विलंबाशिवाय प्राप्त होईल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

१. आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर.

२. जमिनीचा अद्ययावत ७/१२ आणि ८अ उतारा.

नोंदणी कुठे आणि कशी करावी?

शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

सीएससी केंद्र: आपल्या गावातील जवळच्या ‘महा-ई-सेवा केंद्रात’ (CSC Center) जाऊन शेतकरी ही नोंदणी करू शकतात.

स्वयं-नोंदणी: शेतकरी स्वतः मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने https://agristack.gov.in या अधिकृत शासकीय पोर्टलला भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

शासकीय योजनांचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी विनाविलंब आपली नोंदणी पूर्ण करावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकण-गोव्यातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी १८ तरुणांची ‘राखणदार यात्रा’

   Follow us on        

दोडामार्ग:

विकासाच्या नावाखाली कोकण आणि गोवा भागातील जल, जंगल आणि जमिनीचा होत असलेला ऱ्हास आणि स्थानिक लोकसंस्कृती समूळ नष्ट करण्याचे चाललेले प्रयत्न याविरोधात जनजागृती करण्यासाठी नुकतीच ‘राखणदार यात्रा’ काढण्यात आली होती. निसर्ग आणि स्थानिक अस्तित्वाविषयी सजग असलेल्या १८ तरुणांनी १३ ते १६ जून या कालावधीत तब्बल १२० किलोमीटरची पायी पदयात्रा करत १२ गावांना भेटी दिल्या. या यात्रेच्या माध्यमातून निसर्गरक्षणाची प्रवृत्ती जागृत करणे आणि स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक व नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे हा मुख्य उद्देश होता, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांनी एका मुलाखती दरम्यान दिली.

​या यात्रेची सुरुवात कणकवली येथील कणकुंबीच्या माऊली देवी मंदिरापासून झाली. त्यानंतर केरी, विर्डी, कारापूर, दोडामार्ग, भेडशी, कुडासे, शिरवळ, झोळंबे, तांबोळी, बांदा आणि विलवडे अशा मार्गाने ही यात्रा पुढे गेली. म्हादाई नदीचे पात्र वळवण्याचे संकट, वन्यप्राण्यांसाठी संवेदनशील असलेल्या दोडामार्ग-सावंतवाडी पट्ट्यात चालणारे बेसुमार खाणकाम, रस्ते आणि रिसॉर्ट्ससाठी होणारी वृक्षतोड यांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय धोक्यांकडे या यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. उत्तर गोव्यातील कारापूर येथे स्थानिक मुणगेकर लोकांच्या जमिनी बळकावून चाललेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनालाही या यात्रेने पाठिंबा दिला.

​या यात्रेला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शिरवलसारख्या गावांनी आपल्या जमिनी बाहेरच्या लोकांना न विकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला आहे. या मोहिमेत प्रसाद गावडे, अविनाश उषा वसंत, सत्यजित चव्हाण यांसारखे कार्यकर्ते पूर्णवेळ सहभागी होते. भांडवलदार आणि मोठ्या प्रकल्पांमुळे कोकणचा विनाश होऊ नये यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाणार असून, यात्रेच्या पुढील टप्प्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमधील आंबा-काजू उत्पादक शेतकरी आणि मच्छिमारांच्या समस्यांवर काम केले जाईल, असा निर्धार यात्रेकरूंनी व्यक्त केला आहे.

बांदा: भर वस्तीत आढळले मगरीचे पिल्लू

   Follow us on        

बांदा, दि. ३०:

बांदा शहरात सोमवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या धुवाँधार पावसामुळे येथील बांदा सोसायटीसमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोखाली मगरीचे पिल्लू आढळून आले. भर शहरात मगरीचे पिल्लू दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ओहोळात आलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर हे मगरीचे पिल्लू थेट रस्त्यावर आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत या मगरीच्या पिल्लाला सुखरूप पकडले आणि तात्काळ वन विभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

​बांदा शहराच्या जवळून वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रात मगरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पावसामुळे मगरी नदीपात्राबाहेर पडून मानवी वस्तीत शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाचे दिवस अजून पुढे असल्याने नदीकाठच्या आणि ओहोळाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

सिंधुदुर्ग: कुडाळमध्ये ‘पुरुषांची वटपौर्णिमा’ उत्साहात साजरी

 

गेली १८ वर्ष अखंड जपली जातेय परंपरा

   Follow us on        

कुडाळ | प्रतिनिधी:स्त्री आणि पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, कधी मैत्रीण तर कधी कुटुंबाचा मुख्य आधार बनून अहोरात्र कष्ट करणाऱ्या पत्नीप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये एक अनोखा आणि कौतुकास्पद सोहळा पार पडला. कुडाळ मध्ये गवळदेव मंदिरात उमेश गाळवणकर मित्र मंडळ आणि  डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काल पुरुषांची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

विशेष म्हणजे, सामाजिक रूढी-परंपरांना नवा सकारात्मक दृष्टिकोन देणारे हे व्रत गेल्या १८ वर्षांपासून इथं अविरतपणे सुरू आहे.

आपल्या सुख-दुःखात सावलीसारखी सोबत देणाऱ्या पत्नीला दीर्घायुष्य लाभाव आणि ‘जन्मोजन्मी हीच पत्नी आपणास सहचारिणी म्हणून मिळावी’ या कृतज्ञतेपोटी आणि श्रद्धेपोटी या अनोख्या वटपौर्णिमेचे आयोजन करण्यात आल होत. सकाळी गवळदेव मंदिरात पुरोहितांच्या  मंत्रोच्चारात आणि उपस्थित पतींच्या शुभहस्ते वटवृक्षाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व पुरुषांनी वडाला सात फेऱ्या मारून पत्नीच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

​ठाणे-देवगड थेट एसटी बस सेवा लवकरच सुरू होणार

आमदार रवींद्र फाटक यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून दखल!

   Follow us on        

देवगड | प्रतिनिधी:

ठाणे ते देवगड या मार्गावर नवीन थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. या मागणीची तातडीने दखल घेत परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सदर बसफेरी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

​आमदार रवींद्र फाटक यांनी परिवहन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाणे ते देवगड या मार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक, तसेच कोकणात नियमितपणे ये-जा करणारे चाकरमानी प्रवास करत असतात. मात्र, या मार्गावर थेट एसटी बससेवेची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक अडचणींना व त्रासाला सामोरे जावे लागते. ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी नागरिकांची बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. ही सेवा सुरू झाल्यास नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येईल आणि कोकणातील नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होईल.

​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट हे राज्यातील जनतेला नियमित व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे हेच आहे. त्यामुळे नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे ते देवगड अशी नवीन एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आमदार फाटक यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. या रास्त मागणीची दखल घेत परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला ही बसफेरी त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

‘सिंधुदुर्गचे ॲमेझॉन’ राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित होण्याचे संकेत

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि स्थानिक विकासाला कमालीची गती देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘सिंधुदुर्गचे ॲमेझॉन’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्याला आता ‘राष्ट्रीय उद्यान’ (National Park) म्हणून घोषित केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​शासनाची तातडीने दखल आणि मंजुरी

​विधानमंडळात या संदर्भातील मागणी उपस्थित होताच राज्य शासनाने त्याची तातडीने दखल घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी या मागणीचे गांभीर्य ओळखून तिलारी परिसरात राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. शासनाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आता तिलारी खोऱ्याच्या वैभवात अधिकृतपणे भर पडणार असून, पुढील प्रशासकीय प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत.

​जैवविविधतेचे नंदनवन ‘तिलारी’

​सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तिलारी खोरे हे आपल्या अथांग आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. दाट सदाहरित जंगले, दुर्मीळ वनौषधी व वनस्पती, विविध प्रजातींचे रंगीबेरंगी पक्षी आणि जंगली हत्तींचे नैसर्गिक वास्तव्य ही या परिसराची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या भागाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यास येथील वन्यजीव संवर्धनाला आणि पर्यावरणाच्या रक्षणाला कायद्याचे मोठे बळ मिळणार आहे.

​पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी उभारी

​या ऐतिहासिक निर्णयामुळे केवळ वन्यजीव संवर्धनालाच फायदा होणार नाही, तर स्थानिक विकासाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. तिलारीला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यास या भागात पायाभूत सुविधांचा विकास होईल. तसेच, मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे स्थानिक रोजगार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था आणि इतर छोट्या-मोठ्या स्थानिक व्यवसायांना कमालीची चालना मिळणार आहे.

​गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक मजबूत होणार

​विशेष बाब म्हणजे, गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तिलारी हे ठिकाण अतिशय जवळ आहे. यामुळे गोव्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी तिलारी हे एक प्रमुख आणि हक्काचे आकर्षण ठरेल. या भौगोलिक सुविधेमुळे गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक बळकट होणार असून, आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर सिंधुदुर्गचे नाव आणखी ठळकपणे अधोरेखित होणार आहे.

गणेशोत्सवाआधीच चाकरमान्यांना गाठवा लागणार गाव! कारण काय?

   Follow us on        

सिंधुदुर्ग: नुकतीच उन्हाळी सुट्टी संपवून मुंबईला परतलेल्या चाकरमान्यांपैकी ज्यांना आपले नाव गावाकडील मतदार यादीत कायम ठेवायचे आहे, त्यांना यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा गावाची वारी करावी लागण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ३० जूनपासून हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत.

​तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच २००२ नंतर पहिल्यांदाच मतदार यादी संपूर्णपणे स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये आणि यादीतील मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी पूर्णपणे ‘क्लीन’ करणे हा आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती दिली.

​पुढील तीन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात व्यापक प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ९२१ ‘बीएलओ’ कार्यरत असून, त्यांच्यावर देखरेखीसाठी ९३ सुपरवायझर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मॅपिंग करण्याचे काम सध्या जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९२.४२ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

​३० जून ते २९ जुलै २०२६ या एक महिन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात सर्व बीएलओ निवडणूक आयोगाने दिलेले ‘प्रि-प्रिंटेड’ इन्फर्मेशन फॉर्म्स घेऊन प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देतील. मुंबईकर चाकरमान्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी घरात हजर असेल, तरी ती संपूर्ण कुटुंबाची माहिती देऊन फॉर्म भरू शकते. मात्र, जर एखादे घर पूर्णपणे बंद असेल, तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती नोंदवूनच नाव समाविष्ट करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

​हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य पावसाळ्याच्या दिवसांत येत असल्याने प्रशासनासमोर थोडे आव्हान नक्कीच आहे. परंतु, राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविला जात असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओना अचूक माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम; निष्काळजीपणा केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

सिंधुदूर्गनगरी:

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मतदार यादी अधिक अचूक, अद्यावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आता थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराने आवश्यक माहिती देऊन शुद्धीकरण अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. जर मतदाराने हा अर्ज भरला नाही, तर त्याचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळी देखील उपस्थित होते. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार यादीतील मयत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी तसेच अन्य त्रुटी दूर करून मतदार यादी अधिक विश्वासार्य बनविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ६ लाख ८८ हजार १४ मतदार नोंदणीकृत असून, त्यामध्ये ३ लाख ४० हजार ४५० पुरुष आणि ३ लाख ४७ हजार ५६४ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच मतदार नोंदणीच्या मॅपिंगचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

​या मोहिमेच्या नियोजनानुसार, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत आणि शुद्धीकरण अर्ज भरून घेऊन मतदारांची स्वाक्षरी घेतील. मतदार घरी नसल्यास कुटुंबातील प्रमुख व्यक्तीकडून आवश्यक माहिती घेऊन अर्ज भरला जाईल. जर मतदार घरी आढळला नाही, तर बीएलओ संबंधित पत्त्यावर तब्बल तीन वेळा भेट देतील. तरीही आवश्यक माहिती अथवा अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित मतदाराचे नाव यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नाव वगळले गेले तरी नियमानुसार पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध राहणार असली, तरी त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने नागरिकांनी वेळेत अर्ज भरून द्यावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर ५ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर प्राप्त होणारे दावे व हरकतींची सुनावणी करून शेवटी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘अंतिम मतदार यादी’ प्रकाशित केली जाणार आहे.

​विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

​२० ते २९ जून: कर्मचारी प्रशिक्षण व पूर्वतयारी

​३० जून ते २९ जुलै: बीएलओंच्या घरोघरी भेटी व अर्ज संकलन

​२९ जुलैपर्यंत: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

​५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर: दावे व हरकती दाखल करणे

​५ सप्टेंबर: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे

​७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

सिंधुदुर्ग:

राज्यात सध्या ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात कमालीची वाढ झाली असून, पावसानेही ओढ दिली आहे. या बदलत्या तीव्र हवामानाचा आणि वाढत्या उन्हाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये, म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून, आता या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवार दिनांक १९ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी हा बदल लागू असेल. या काळात शाळेची वेळ सकाळी ७.०० ते ११.१५ वाजेपर्यंत असणार आहे.

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद मधुकर कामत आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खांडेकर (भा.प्र.से.) आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्वच शैक्षणिक संघटनांनी शाळांच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले असून आता शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत.

Sawantwadi: शेतकर्‍याच्या विहिरीत आढळल्या तब्बल १६ मगरी

   Follow us on        

सावंतवाडी:

इन्सुली क्षेत्रफळ डोबवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत चक्क १५ पिल्लांसह पडलेल्या एका ७ ते ८ फूट लांबीच्या महाकाय मगरीला वन विभागाने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. इन्सुली येथील रहिवासी संतोष नेवगी यांच्या शेतातील विहिरीत रविवारी एक मोठी मगर आणि तिच्यासोबत लहान पिल्ले असल्याचे निदर्शनास आले होते. विहिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मगरी असल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. नेवगी यांनी तातडीने या घटनेची माहिती वन विभागाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील आणि सावंतवाडी येथील आर. आर. टी. (रॅपिड रेस्क्यू टीम) तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

​विहिरीची खोली आणि मगरीचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, वन विभागाच्या पथकाने आधुनिक साधनांचा वापर करून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत शिताफीने मोहीम राबवली. त्यांनी प्रथम मोठ्या मगरीला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा तिच्या १५ लहान पिल्लांना विहिरीबाहेर काढले. अशाप्रकारे एकूण १६ मगरींना जीवनदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. या सर्व मगरींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

​या धडक मोहिमेत पथक प्रमुख बबन रेडकर, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, देवेंद्र परब, पुंडलिक राऊळ, वनरक्षक अतुल पाटील, वनरक्षक पवन तारपे आणि वनरक्षक सदाशिव मोहिते यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. वन विभागाच्या या तत्परतेबद्दल आणि धाडसी कामगिरीबद्दल इन्सुली गावकऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search