Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग विमानतळावर “फ्लाय-९१” विमान कंपनीची सेवा आजपासून सुरु; पहिले प्रवासी विमान बंगुळुरूला रवाना

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि. १८ मार्च :नुकतेच विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केलेल्या फ्लाय-91 विमान कंपनीने आपली सेवा सिंधुदुर्ग विमानतळावर आजपासून सुरु केली आहे. सिंधुदुर्ग ते बंगळुरू अशी ही विमानसेवा असून ७५ बैठक क्षमता असलेले पहिले विमान आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी बंगुळुरु साठी रवाना करण्यात आले आहे. या नवीन सेवेचे उद्दघाटन माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्लाय ९१ कंपनीचे व्यवस्थापक मनोज चाको,आशुतोष चिटणीस, आय. आर. बि. कंपनीचे कुलदीपसिंग, परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर इत्यादी उपस्थित होते.
“सिंधुदुर्ग ते बंगुळुरु प्रवास करा फक्त १९९१ रुपयांत भारत ब्रॉडबँड या अंतर्गत कनेक्ट बंगुळुरु, गोवा, हैद्राबाद, सिंधुदुर्ग” अशी टॅगलाईन या कंपनीने केली आहे. या कंपनीने याच महिन्यात गोव्याच्या मोपा विमानतळावर सेवा चालू केली आहे. आता सिंधुदुर्ग विमानतळावर सेवा सुरु केल्याने तिच्या रूपाने सिंधुदुर्ग विमानसेवेबद्दल एक आशा निर्माण झाली आहे.
 फ्लाय-91 ही किंगफिशर एअरलाइन्सचे माजी सीईओ मनोज चाको यांनी सुरू केलेली नवीन एअरलाइन आहे. या विमान कंपनीला मागच्या वर्षी एप्रिलमध्येच सरकारकडून उड्डाणाची परवानगी मिळाली होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त केल्यानंतर, फ्लाय-91 एअर ऑपरेटर परमिट (AOP) मिळविण्याचा प्रयत्न करत होती, जे त्यांना आता मिळाले आहे. अहवालानुसार न्यू गोवा विमानतळ हे कंपनीचे बेस सेंटर आहे आणि गोवा हे कंपनीचे मुख्यालय आहे.

Video | रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी; रेल्वे प्रशासन दुर्घटनेच्या प्रतीक्षेत?

   Follow us on        
Absence of FOB :कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूल नसल्याने दोन प्लॅटफॉर्म च्या मधील रुळावरून जीव मुठीत पलीकडे जावे लागत आहे. खासकरून वरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि लहानमुले आणि स्त्रियांना रेल्वे रूळ ओलांडताना मोठी पराकाष्टा करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीवरून येथे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र येथे प्रवासी संख्या आणि चांगले उत्पन्न मिळत असूनही तसेच अनेक वर्ष मागणी करूनही येथे पादचारी मंजूर होत नसल्याने येथे अपघात घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघणार का असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
सध्या वैभववाडी मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी एक्सप्रेस  स्थानकावर सध्या ४ नियमित गाड्या थांबा घेतात. तसेच सणावारीआणि हंगामात चालविण्यात येणाऱ्या  जवळपास सर्वच गाडयांना येथे थांबा देण्यात येतो. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी उत्पन्नाच्या बाबतीत वैभववाडी स्थानक रत्नागिरी विभागातून सातव्या स्थानावर तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या स्थानकांचा विचार करता ७२ स्थानकामध्ये १४ व्या स्थानावर आहे. हे वास्तव असूनही या स्थानकावर एक पादचारी पूल का मंजूर होत नाही हा पण एक मोठं प्रश्च म्हणावा लागेल

Petroglyphs | देवगड तालुक्यात सापडली मानवाकृती “मामा भाचे” कातळशिल्पे

   Follow us on        
देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली आहेत. येथील देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने  त्याची पाहणी करण्यात आली. सापडलेल्या कातळचित्राच्या परिसराची जागा स्वच्छ करून चित्र खुले करण्यात आले. या परिसरात आणखी काही कातळचित्रे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोधमोहीम राबवत आहे. याच मोहिमेतंर्गत तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली. याची माहिती मिळताच प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला. त्यावेळी तेथे पुसटशा मानवाकृती रेषा दिसत होत्या.
या दोन उलट सुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी इथे जर मध्य रेषा काढली तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळ जवळ काढलेली नसावीत असे दिसते. डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा अतिशय सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्यरेषा सराईतपणे कोरलेल्या दिसतात. अन्यत्र आढळणाऱ्या मानवाकृती इतक्या सफाईने कोरलेल्या दिसत नाहीत.
कातळचित्राचे “मामा भाचे” नामकरण  
येथील काही ग्रामस्थ या कातळचित्रांना “मामा भाचे” असे संबोधतात. या मागे एक ऐकिव कथा पण आहे.  एके काळी मामा आणि भाचा येथे शिकारीला आले होते.  हे दोघे कातळावर शिकारीसाठी फिरत असताना त्यांना शिकार न मिळाल्यामुळे येथे थकून बसले होते. इतक्यात एक कुठला तरी जंगली प्राणी या दोघांच्या मधून पळून जाताना त्यांना दिसला. दोघांनी तात्काळ त्या प्राण्याच्या दिशेने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण तो प्राणी शिफाईने पळून गेला व बंदुकीच्या गोळ्या लागून दोन्ही मामा भाचे ठार झाले. या मानवाकृतीच्या डोक्याच्या जागी जे दोन खळगे दिसतात त्या त्यांना लागलेला गोळ्या आहेत असे येथील गाववाले समजतात. (या कथेस कोकणाई दुजोरा देत नाही. फक्त वाचकांच्या माहितीसाठी हे येथे लहिण्यात आले आहे.)

दोडामार्ग | तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        

सिंधुदुर्ग :दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे . दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे.

दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.

तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्‍चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.

Konkan Tourism | सावंतवाडीत आजपासून जंगल सफारी सेवा सुरु; वेळापत्रक आणि शुल्क येथे जाणून घ्या

   Follow us on        
सावंतवाडी, दि. १६ मार्च: सावंतवाडी शहराचे वैभव असणाऱ्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना उद्यापासून नरेंद्र वन उद्यान निसर्ग पर्यटन सफारी वाहन, सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्गमाहिती केंद्र अशा सुविधा अनुभवता येणार आहेत. सावंतवाडी वन विभागांतर्गत येणाऱ्या नरेंद्र वन उद्यान येथे सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध निसर्गपर्यटन सुविधांचा अनुभव घेण्यासाठी सर्व सावंतवाडीकरांना आवाहन करण्यात येत आहे.
पर्यटकांना मोती तलावा शेजारी असलेल्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र वन उद्यानापर्यंत जाण्यासाठी सफारी वाहनाने प्रवास करता येईल. नरेंद्र वन उद्यानामध्ये पोहोचल्यावर तिथे असलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्ग माहिती केंद्र हे देखील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.
सफारीचा मार्ग
येणार्‍या पर्यटकांना सावंतवाडी भोसले उद्यान ते नरेंद्र डोगर असे फिरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जाताना सावंतवाडीच्या मोती तलाव तसेच राजवाडा आदींची माहिती देवून शहराला वळसा घालून ही सफर थेट सालईवाडा गणपती मंदिर हॉलकडुन नरेंद्र डोंगरावर नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जाताना सर्व झाडांची स्थानिक स्तरावर आढणारे प्राणी, पक्षी, बुरशी आदींची माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्या ठिकाणी जावून निसर्ग माहिती केंद्रांत सिंधुदुर्गात आणि सह्याद्री पट्ट्यात आढळून येणार्‍या प्राणी, पक्षी व फुले, फळे आदींची माहिती देण्यात येणार आहे.
वेळापत्रक 
जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र डोंगर प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले सफारी वाहन प्रत्येक 2 तासाच्या अंतराने सकाळी 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता, सायंकाळी 4 वाजता व शेवटची फेरी सायंकाळी 6 वाजता या वेळापत्रकानुसार सोडले जाईल.
शुल्क 
या नरेंद्र डोंगर सफारीसाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर सफारी चार्जेस, गाईड चार्जेस व निसर्ग माहिती केंद्र प्रवेश फी हे सर्व मिळून एकत्रितरित्या प्रौढांसाठी 100 रु. प्रति व्यक्ती तर 14 वर्षांखालील लहान मुलांसाठी 50 रु. शुल्क करण्यात येणार आहे. तरी सावंतवाडीकरांनी या निसर्ग पर्यटनाचा नक्की अनुभव घ्यावा असे सावंतवाडी वन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Sindhudurg | जिल्ह्यातील एकूण ३० दशावतार नाटक कंपन्यांना अनुदान मिळणार

कुडाळ:कोकणातील पारंपरिक दशवतार लोककलेस बळ मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३० दशावतार नाटक कंपन्यांना शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे.  सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतची मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी योजनेचे अध्यक्ष तथा मंत्री दीपक केसरकर आणि संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार संबधितांना अनुदान प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती श्री. पावसकर यांनी दिली आहे. त्यांनी हे अनुदान देणार्‍या योजनेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्याकडे दशावतार मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी दशावतार मंडळांसाठी साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान मिळण्यासंदर्भात मागणी केली होती. श्री. पावसकर यांनी तातडीने या मागणीचे पत्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व सिंधुरत्न समिती संचालक किरण सामंत यांच्या जवळ केली.
मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाला ही मागणी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. जिल्हा प्रशासनाने याबाबतची अंमलबजावणी करून तत्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरी देखील मिळाली

सावंतवाडीतील कबूलायतदार गावकर जमिनीचा प्रलंबित प्रश्न सोडवणार – रविंद्र चव्हाण

मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गेळे गावातील कबूलायतदार गावकर जमीनीचा  प्रश्ना संदर्भात गेळे गावातील ग्रामस्थांनी आज मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांची भेट घेतली.
कबूलायतदार गावकर  प्रश्नावर नियमानुसार कार्यवाही करुन येत्या २ महिन्यात हा विषय सोडविण्याच्या सूचना या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे मंत्रालयात झालेल्या या बैठकीत रविन्द्र चव्हाण यांनी ग्रामस्थांना सांगितले.
हा प्रश्न हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित होता. विशेष म्हणजे कबूलायतदार गावकर पद्धत ही सिंधुदुर्ग जिल्हा वगळता इतर कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. आपले सरकार हा प्रश्न नक्कीच मार्गी लावेल असा विश्वास गेळे गावातील ग्रामस्थांच्या मनात आहे. हा विषय सोडविण्याच्या दृष्टीने शासनाला सहकार्य करण्यासाठी हे ग्रामस्थ सकारात्मक आहेत. असे ते यावेळी म्हणालेत.
 या बैठकीला भाजपचे सावंतवाडी, आंबोलीचे तालुकाध्यक्ष संदिप गावडे यांच्यासह गेळे गावचे ग्रामस्थ प्रत्यक्ष तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

Sindhudurg | देवगड तालुक्यातील पडेल गावात सापडली पुरातन काळातील मूर्ती

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ नळपाणी योजनेच्या खुदाई कामादरम्यान देवीची मूर्ती सापडली.जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम सुरु असताना ही मुर्ती सापडली आहे. मूर्तीची उंची 3 फुटाच्या आसपास असून डाव्या हातात शंख,उजव्या हातात गदा आहे, उजव्या पायाशी गरुड असून डाव्या बाजूला लक्ष्मी देवी आहे.
पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्या दरम्यान सापडली आहे. ही देवीची मूर्ती सापडताच शंकरेश्वर मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीय, पडेल सरपंच भूषण पोकळे व गावातील ग्रामस्थांनी देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीयांनी दिली आहे. शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे. हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shaktipeeth Expressway Updates | भूसंपादन करण्यासाठी सर्व तालुक्यांतून अधिकारी नियुक्त; राजपत्र जारी

Shaktipeeth Expressway Updates: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रीयेच्या हालचालींना सुरवात झाली आहे. हा महामार्ग जात असलेल्या तालुक्यांसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे राजपत्र गुरुवारी जारी करण्यात आले आहे.
संपूर्ण महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस एकूण २७ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ५ विभागातून ५ विभागीय आयुक्तांची लवाद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांतील भूसंपादनासाठी सावंतवाडीचे उप विभागाचे उपविभागीय अधिकारी काम पाहतील. ७ मार्च पासून त्यांची नियुक्ती झाल्याचे या राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महामार्गाची संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. शासनाने निर्धारित केलेल्या गुणांकनानुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाईल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवाद म्हणून कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.
राजपत्र Gazette वाचण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा
Gazette

नागपूर – पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग कोकणच्या पर्यटनास तारक की मारक?

सिंधुदुर्ग, संपादकीय : नुकतीच बहुचर्चित नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसची अधिसूचना महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ MSRTC तर्फे जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समजण्यात येणारा हा मार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. एकूण 11 जिल्ह्यातून जाणारा महामार्गामुळे नागपूर गोवा हे अंतर फक्त 8 तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांमधील तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेली माहुरची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जोडली जाणार आहेत. या महामार्गाने पर्यटन विकास होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
कोकणाला किती फायदा?
हा महामार्ग तळकोकणातून जाणार असल्याने त्याचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होणार असल्याचा दावाही केला जात आहे.  महामार्ग जेथून जातो त्या भागाचा विकास होतो ही गोष्ट साहजिक आहे. मात्र आखणी करताना एखाद्या भागाचा विचार करून त्याप्रमाणे आखणी केली असती तर त्या भागाचा किंवा प्रदेशाचा अधिक विकास होतो. मात्र या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नसल्याचे दिसत आहे.
गोव्याला तारक; कोकणास मारक 
हा मार्ग कोल्हापूरहून फणसवडे, घारपी आणि बांदामार्गे सरळ गोव्याच्या सीमेला मिळणार आहे.या मार्गात कोकणातील एकही पर्यटनस्थळ किंवा शहर लागत नाही आहे. आंबोली घाटातही बोगदा पाडून हा मार्ग पुढे येणार आहे. त्यामुळे आंबोली पर्यटनस्थळ सुद्धा पर्यटकांना या मार्गात भेटणार नाही. या कारणाने नागपूर किंवा पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक हा महामार्गामुळे सरळ गोव्यात जाणार आहे. त्यामुळे कोकण पेक्षा गोव्याच्या पर्यटनास या महामार्गाचा अधिक फायदा होणार आहे.  दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या कोल्हापूर आंबोली या मार्गाने गोव्याला जाणारा पर्यटक नवीन एक्सप्रेस मार्गाचा वापर करणार असल्याने त्याचा आंबोली आणि सावंतवाडी पर्यटन स्थळांवर विपरीत परिणाम होणार आहे.
आंबोली ते सावंतवाडी इंटरचेंज गरजेचा 
महामार्ग सावंतवाडी शहरातून किंवा शहराच्या अगदी जवळून गेला असता तर त्याचा खूप मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासाला झाला असता.  काही बाबींमुळे हे जर शक्य नसेल तर  या महामार्गाला एक इंटरचेंज सांगलीच्या धर्तीवर किंवा आता आजरावासिय मागत आहेत त्या धर्तीवर सावंतवाडी साठी द्यावा. जेणेकरून सिंधुदुर्ग चे पर्यटन बहरेल आणि सिंधुदुर्ग वासियांना आणि कोकण वासियांना धार्मिक पर्यटनासाठी अजून एक महामार्ग उपलब्ध होईल असे मत येथील स्थानिक  श्री. सागर तळवडेकर यांनी केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search