सिंधुदुर्ग – येत्या ०१ जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टोल नाक्याला स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जर ओसरगाव येथे टोल वसुली करणार असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी केलेल्या MH07 वाहनांना टोलमुक्ती मिळावी अशी सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीची भूमिका आहे. मात्र जर हा टोल नाका खारेपाटण किंवा बांदा या ठिकाणी शिफ्ट केल्यास आपला त्याला कोणताही विरोध नसेल अथवा टोल मुक्तीची मागणी नसेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१ जूनला ओसरगाव टोल नाका सुरू झाल्यास टोलमुक्ती समितीतर्फे लाक्षणीय आंदोलन छेडले जाईल. असा इशारा टोलमुक्ती कृती सिमतीचेअध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. टोलमुक्ती कृती सिमती तर्फे कणकवली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
सिंधुदुर्ग : आंबोलीच्या नागिरकांमध्ये चिंता निर्माण होईल अशी एक बातमी आहे. आंबोली परिसरात गेली काही वर्षे ये-जा करणार्या महाकाय टस्करने आपला मोर्चा पुन्हा आंबोलीकडे वळवला आहे. शुकवारी तो आजरा येथे दिसला होता . येत्या 2 ते 4 दिवसांत हा टस्कर आंबोली परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे.
हा टस्कर अचानक रस्त्यावर येत असल्याने काही वेळा येथील वाहन चालकांची भंबेरी उडाली आहे. या टस्कर ने आंबोलीतील लोकवस्तीत शिरून तेथे हैदोस मांडला होता. दिवसा जंगलात राहून तो रात्री लोकवस्तीत धुडगूस घालतो. त्यामुळे त्याच्या येण्याने आंबोलीच्या जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारवाईच्या नावाखाली सिंधुदुर्ग वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूर जिल्हा हद्दीत हुसकावून लावत आहेत. पण तिथे कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी त्याला पुन्हा आंबोली हद्दीत हुसकावतात यामुळे हा टस्कर गेली काही वर्षे सतत आंबोलीसह आजरा परिसरात ये-जा करत असतो.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्ग |कुडाळ तालुक्यातील साळगाव भांडारसावंतवाडी येथील श्री सावंत कुलस्वामि मंदिर मध्ये वार्षिक उत्सवाचे आयोजन दि. 20 मे व 21 मे रोजी केले आहे. शनिवार दि. 20 मे 2023 रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्याच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चे आयोजन केले आहे. रात्रौ 8:30 वाजता लहान मुला मुलींचे, महिलांचे नृत्य, गायन, वादन असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
रविवार दि. 21 मे 2023 रोजी रात्रौ 8:30 वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ चा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सावंत कुलस्वामि मंडळ ( भांडारसावंतवाडी साळगाव ) ने केले आहे.
सिंधुदुर्ग – दिनांक १५ मे सोमवारी एका मोठ्या उद्योगपतीने दोडामार्ग तालुक्यातील शिरवल या भागास भेट देऊन तेथील जमिनीची पाहणी केल्याने अनेक चर्चांना ऊत आले आहे. या उद्योगपती नाव समजले नसले तरी तो एक दिल्लीतील मोठा उद्योगपती असलयाचे समजते. सुमारे १० ते १२ गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर होता, तसेच स्थानिक प्रशासनाने त्याला या दौऱ्यासाठी सुरक्षा दिल्याचे समजते. पण याबाबत कोणतीही बातमी किंवा माहिती प्रशासनतर्फे प्रसिद्धीसाठी दिली नाही आहे, त्यामुळे जनतेला अंधारात ठेवून काहीतरी शिजवले जात आहे असे तर्क लावण्यात येत आहेत.
तळकोकणातील दोडामार्ग तालुका गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. अलीकडेच गोवा – महाराष्ट्र सीमेवर नवीन विमानतळ झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जमिनींवर भूमाफियांची, परप्रांतीयांची वक्रदृष्टी पडली आहे. अलीकडेच या तालुकयातील काही जमिनीबाबत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्ववभूमीवर जमिनीचे अनेक गैरव्यवहार झाले होते. तसाच प्रकार येथे होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे .मोठ्या उद्योगपतींनी पण येथे रस दाखविला असल्याने येथे पण एक प्रकल्प येईल का असे तर्क लावले जात आहेत.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत.
वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे.
मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे.
रस्ते, महामार्ग हे विकासाला हातभार लावत असतात. रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढते, व्यापाराची मोठी संधी निर्माण होते. अविकसित असलेल्या खेड्यांचे रूपांतर शहरात होते. मात्र मुंबई गोवा महार्गावरील एका शहराच्या बाबतीत उलट झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गामुळे तळकोकणातील सावंतवाडी या शहराला फायदा न होता तोटा झाला आहे. पूर्वी मुंबई गोवा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र नवीन महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून जात आहे. सावंतवाडी शहरापासून सुमारे १२ ते १४ किलोमीटर अंतरावरून झाराप येथून हा मार्ग मळगाववरून गोव्याला जातो. त्यामुळे नव्या मुंबई गोवा महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराचे झाले आहे.
मुंबईतुन गोव्याला जाणारा मोठा प्रवासवर्ग या मार्गावरून प्रवास करतो. जेव्हा हा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता तेव्हा आपोआपच येथील पर्यटनाची जाहिरात होत असे. जुना राजवाडा, नयनरम्य मोती तलाव आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे पर्यटकांना येथे थांबा घेण्यास भाग पाडत असत. पर्यटक येथे थांबून येथील बाजारपेठेतील लाकडी खेळणी, कोकणी मेवा आणि इतर वस्तू आवर्जून खरेदी करायचे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असे.
मात्र आता चित्र पालटले आहे. महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्यामुळे येथील पर्यटनाची पीछेहाट होत आहे. त्यामुळे या नवीन महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराला झाले आहे. सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणार्या बसेस सुद्धा बायपास मार्गावरून जात असल्याने मुंबई आणि गोव्यात जाण्यास उपलब्ध असणार्या पर्यायांत घट झाली आहे.
हे नुकसान भरून काढण्यासाठी किमान प्रस्तावित संकेश्वर – बांदा महामार्ग तरी या शहरातून जावा अशी जोरदार मागणी होत आहे.
सिंधुदुर्ग – तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोलीपासुन अवघ्या दहा कि. मी.अंतरावर असलेल्या चौकुळ या गावी सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर सापडले आहे. सिंधुदुर्गातीलच नव्हे तर सर्व भारतीय भूवैज्ञानिक व पर्यटकांना उत्साह देणारे संशोधन नुकतेच झाले असुन याबाबत अधिक अभ्यास चालू आहे. या संशोधनास सर्व अभ्यासाअंती दुजोरा भेटल्यास कोकणातील पर्यटनाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे आणि चौकुळ या गावाला आता ‘जागतिक भूवैज्ञानिक स्थळ’ म्हणून ओळखले जाणार आहे.
शिरूर(पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॕ.अतुल जेठे व प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी या येथील खमदादेव पठारावर भेट दिली असता पश्चिम घाटातील या पठारावर सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर नजेरेला पडले.
डॉ. अतुल जेठे
या संदर्भात डाॕ. अतुल जेठे यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –
” चौकुळ येथील आज असलेल्या खमदादेव मंदिरापासुन पूर्वेकडे सुमारे ५००मीटर अंतरावर सुमारे पन्नास हजारहून अधिक वर्षापूर्वीआकाशातून एक पेटता अशनी येऊन येथील जांभ्या खडकाच्या कठीण पठारावर कोसळला व त्यामुळे वर्तुळाकार आकाराचे विवर तयार झाले. आज या विवरात काळसर -पिवळट रंगाची माती व त्यावर पावसाळ्यात उगवणारे गवत यांचे अस्तित्व आहे.पावसाळ्यात सर्वात जास्त म्हणजे ७२०से. मी. पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या या विवराच्या ईशान्य दिशेकडून विवरातील पाणी वाहून जाते. या विवराचा पूर्व
-पश्चिम व्यास सुमारे १८०मीटर तर उत्तर-दक्षिण सुमारे २२० मीटर असुन विवराचा परिघ सुमारे ५२५ मीटर आहे.या विवराचा अधिक अभ्यास व संशोधन करण्यासाठी डाॕ. जेठे पावसाळ्यात पुन्हा भेट देणार आहेत.
या स्थळाला शासनाने ‘अति संवेदनाशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून संक्षित करावे अशी मागणी डाॕ. जेठे यांनी केली आहे.
भौगोलिक स्थान
या विवराचे पृथ्वीवरील भौगोलिक स्थान १५ अंश ५२ मिनिटे व ३९.५ सेकंद उत्तर अक्षवृत्त ते ७४अंश १ मिनिट ५४.५ सेकंद पूर रेखावृत्त असे आहे. समुद्र सपाटीपासुन हा भाग सुमारे ६३० मीटर उंचीवर आहे. घटप्रभा व कृष्णा या नद्यांच्या जोडणारी’ देवाची न्हय’ही नदी पूर्वेकडून पावसाळ्यात वहाते. भारतातीलच नव्हे; तर जगातील जांभ्या खडकावरील,(Laterite Rock) कातळसड्यावरील हे एकमेव विवर ठरण्याची शक्यता डाॕ.अतुल जेठे यांनी वर्तवली. असुन याला शास्त्रीय परिभाषेत ‘सिम्पल बाऊल क्रेटर’ म्हणजेच ‘साधे वर्तृळाकृती विवर’असे म्हणतात. आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस या भागात पडत असल्याने वातावरणातून अतिगतिमान अशनीचा आघात झाल्यावर वर उसळून आलेली कड (Ejecta- Blanket) मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी.
नामकरण-‘रजतकृष्ण’विवर
या विवरावर दोन दिवस संशोधन केल्यावर आपल्या या शोधून काढलेल्या विवराला ‘ राजतकृष्ण Crater’ म्हणजेत ‘रजतकृष्ण विवर असे नाव डॉ.जेठे यांनी दिले आहे. २००९ पासुन भारतातील विविध विवरांचा भूशास्रीय अभ्यास करताना मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या इस्रो (IIRS) डेहराडून (उत्तरा खंड)या जागतिक पातळीवर संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भूशास्र विभागाचे प्रमुख रजत चटर्जी यांचे शुभनाव व आपले सहकारी मित्र मराठी विभागात अध्यापन करणारे मालवणी बोली साहित्य व संस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक मार्गदर्शक डाॕ. बाळकृष्ण लळीत यांच्या नावातील ‘कृष्ण’ यावरून चौकुळ येथील विवराचे ‘ रजतकृष्ण विवर’असे नामकरण या दोन्हींच्या (गुरू आणि मित्र) यांच्या सन्मानार्थ केल्याचे डाॕ. अतुल जेठे यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी २०११साली शोधलेल्या लोणार जवळील विवराला ‘गगन विवर’असे नामकरण केले होते. या संशोधना दरम्यान चौकूळ येथील समाजसेविका मा.सौ. सुषमाताई गावडे,अनिल गावडे,प्रताप गावडे.मा.सरपंच गुलाबराव गावडे तसेच सरपंच श्री.सुरेश शेटवे डाॕ.सुश्रुत लळीत तसेत अन्य चौकुळ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या शोधकार्याचे चां ता. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. के. सी. मोहिते व संस्था सचिव मा.श्री. नंदकुमार निकम यांनी डाॕ.अतुल जेठे यांचे अभिनंदन केले आहे.
आंबोली: गोव्यावरून कर्नाटक राज्यात जात असताना आंबोली येथे लघुशंकेसाठी उतरलेल्या छत्तीसगड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दरीत कोसळल्याने आंबोली येथेजागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मिथिलेश पॅकेरा हे छत्तीसगड पोलीस तुकडी बरोबर कर्नाटक होत असलेल्या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी कर्नाटकात आले होते. दरम्यान काही काल सुट्टी असल्याने त्याने आणि त्याच्या इतर ४ मित्रांनी गोवा फिरायला जाण्याचा बेत आखला. तेथून परत येत असताना त्यांनी गाडी आंबोली येथे मुख्य धबधब्याच्या काही अंतरावर लघुशंकेसाठी गाडी थांबवली. मिथिलेश यांना काळोखात तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने ते दरीत कोसळले. ही घटना घडताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित आंबोली पोलीस स्टेशन ला कॉन्टॅक्ट केला आणि मदत मागवली. आंबोली रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर आणि मायकल डिसोझा आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरीत उतरून बचावकार्य सुरु केले, मात्र परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस हवालदार दत्ता देसाई आदी सहका-यांनी त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. याबाबत उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..
सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील वरवडे संगम पॉईंट येथील गडनदी पात्रात बुडून एका १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल येथे घडली. मृत युवकाचे नाव हरीकृष्णन टी मनोज (वय – १७, रा.कणकवली, मुळ रा.केरळ) असून नदी पात्रातील एका मोठया खडकावर बसून सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरून नदीत पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हा तरुण आणि त्याचा मित्र या ठिकाणी फिरायला आले होते. मात्र सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो बुडाला. ही घटना त्याच्या मित्राने त्या युवकाच्या घरी कळवली. तेव्हा त्या बुडालेला हरीकृष्णन यांचा काका आणि नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्र झाल्याने शोध लागला नव्हता. आज कणकवली पोलिसांनी पुन्हा सकाळी भोरपी समाजाच्या लोकांना घेऊन नदीत शोध मोहीम राबवली. वरवडे नदीपत्रात पाण्यात हरीकृष्णन यांचा मृतदेह सकाळी ७ वाजता आढळून आला.पोलिस निरीक्षक अनिल जाधव पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. तेथील नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला शोधण्याची मोहीम यशस्वी झाली. हरीकृष्णन याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मालवण – उन्हाळी सुट्यांमुळे मालवणचे पर्यटन बहरलेले दिसून येत आहे; मात्र यात निवासव्यवस्थेचे दर आकारण्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, येथील व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यातच पर्यटकांनी मासळी आणून दिल्यास ती बनवून देण्याचा नवा ट्रेंड सुरु झाल्याने हॉटेल व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. एकूणच येथे काही काळापूर्वी वाढत असलेला पर्यटन व्यवसाय आता नव्या वळणावर पोहचला आहे. यातच अंमली पदार्थांसह व्यसनाधिनतेचे काही प्रकारही धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत.
पर्यटनाची राजधानी म्हणून मालवणकडे बघितले जाते. गेल्या काही वर्षात समुद्राखालील अनोखे विश्व पाहण्याची संधी स्कूबा, स्नॉर्कलिंगमुळे उपलब्ध झाली आहे. याबरोबरच साहसी जलक्रीडा प्रकार यामुळे येथील पर्यटन हंगाम हा गेल्या काही वर्षात बहरत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांना अत्यावश्यक सोईसुविधा पर्यटन व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे दाखल होत असून त्यांच्याकडून सागरी पर्यटनाचा आनंद लुटला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने नोकरीच्या मागे न लागता अनेक तरूण बेरोजगारांनी पर्यटन व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवित त्यातून गेल्या काही वर्षात चांगले अर्थांजन मिळविण्यास सुरवात केल्याचे किनारपट्टी भागात पहावयास मिळत आहे.सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्गात पर्यटक जास्ती पसंती देतात. वर्षातील साधारणतः ८० ते १०० दिवसांचा हा पर्यटन उद्योग सुरू असतो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळानंतर पर्यटन व्यवसाय आता खर्या अर्थांने उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे; परंतु सर्वात मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. यात हॉटेल्स, होम-स्टे, रिसॉर्टची जी वर्गवारी आहे. त्यात जी निवासव्यवस्थेची दर आकारणी केली जाते. यात ज्यांच्याकडे चांगल्या सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या निवासव्यवस्थेचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिदिवस असे आहेत. असे पर्यटन व्यावसायिक विनाकारण स्पर्धा करताना दिसून येत आहे. संबंधितांकडून ३० ते ४० टक्के दर कमी करून पर्यटकांना निवासाची व्यवस्था करून दिली जात आहे. परिणामी याचा फटका ज्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहेत मात्र ते दर स्थिर ठेवून व्यवसाय करू पाहतात अशा पर्यटन व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पर्यटक बुकींग करून येण्यापेक्षा थेट रिसॉर्ट, निवास न्याहरी, हॉटेल्सच्या ठिकाणी येऊन दरांमध्ये आपल्याला हवी तशी तडजोड करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिल्यास निवास व्यवस्थेचा जो व्यवसाय आहे तो कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.किनारपट्टी भागास पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षात पर्यटकांनाच तुम्ही मासे आणून द्या ते बनवून देतो असे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याने हा नवा ट्रेंड या क्षेत्रात निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथे येणारा पर्यटक हा थेट मासळी लिलावाच्या ठिकाणी जावून मासळी खरेदी करतात. मग ती वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी येऊन त्या व्यावसायिकाला ती बनविण्याचे सांगून किलोप्रमाणे दर निश्चित करून घेतात. ही प्रथा म्हणजे वेगळ्या प्रकारची कीड या व्यवसायास लागली आहे. जेमतेम १०० दिवसांच्या या पर्यटन व्यवसायाच्या काळात किलोवर असे मासे बनवून दिल्यास तर व्यावसायिक पैसे कमावणार केव्हा? बँकांचे हफ्ते, विविध शासनाचे कर कोठून भरणार? जेव्हा एखादा पर्यटक हॉटेलला वास्तव्यास असतो त्यावेळी त्याचे जेवण, वास्तव्य याचा विचार केला तर त्यातून सरासरी वार्षिक खर्च निघत असतो; परंतु असे जे प्रकार किनारपट्टी भागात सध्या सुरू आहेत हे चुकीचे असून येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकांनी यातून स्वतःला सावरण्याची गरज आहे. आपण जो व्यवसाय करत आहोत. तो कमर्शिअल पद्धतीने करायला हवा. या गंभीर बाबींकडे लक्ष न दिल्यास हा व्यवसाय कमर्शिअल पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता असून याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आताच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर,
जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.