सावंतवाडी दि. २८ मे.सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील कैलास धाब्याच्या पाठीमागे मानवी हाड कवटी सहित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वेत्ये रोडवर असलेल्या कैलास धाब्याच्या पाठीमागे काल संध्याकाळी येथील एका स्थानिकाला मानवी हाडे असल्याचे दिसली, त्यांनी संबंधित धाबे मालकाला याची कल्पना दिली त्यानंतर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरची हाडे पंचनामा करून ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे.
कुडाळ, दि.२८ मे: रत्नागिरी येथील एका कंपनीने सिंधुदुर्गात २.२५ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी येथील एका जॉब वकर्सच्या नावाखाली प्रस्थापित झालेल्या प्रा. लि. कंपनीच्या विरोधात सिंधुदूर्गातील ७८ जणांनी आपली २.२५ कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांत दाखल केला आहे.
ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील असून जॉब वकर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. यावेळी ७८ जणांनी एकत्र येत आपल्या फसवणूकीची तक्रार कुडाळ पोलिसांकडे दिली आहे. त्यावर ७८ जणांची नावे व त्यासमोर आपण जमा केलेली रक्कम टाकण्यात आल्याचे समजते. यामध्ये २५ हजारांपासून १ लाख ७५ हजारांपर्यंतची रक्कम नमुद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची ही ७८ जणांची रक्कम आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्यांचा आकडा अजुनही मोठा असून रक्कमही त्याच पटीत वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांत रितसर तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या फसवणुकीत अनेक जनसामान्यांना गंडा बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तकार दारांच्या अर्जाची दखल घेऊन फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
सिंधुदुर्ग: साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथे तब्बल अर्धा किलो पेक्षा जास्त वजन असलेले आंबे एका बागेत सापडत आहेत. येथील बागायतदार बाबूराव वामन राणे यांच्या बागेत ६०५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा आढळून आला आहे. या भागात आढळून आलेले हे या हापूसचे सर्वाधिक वजनाचे फळ आहे.
आंबा काढणी करीत असताना श्री. राणे यांना काही झाडांवरील फळे नियमित आंब्यांपेक्षा आकाराने मोठी दिसून आली. त्यामुळे त्यांनी या फळांचे वजन केले असता एका फळांचे वजन ६०५ ग्रॅम आढळून आले. ४५० ग्रॅम ते ६०० ग्रॅमपर्यंत सरासरी फळे दिसून येत आहेत.
साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. या बागेचे व्यवस्थापन श्री. राणे हे नैसर्गिकरीत्या व सेंद्रिय पद्धतीने करतात. या फळांची माहिती मिळाल्यानंतर तालुका कृषी विभागाचे अमोल सदावर्ते, कृषी सहायक एस. व्ही. उलपे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप खाडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. वजनाची देखील खात्री केली.
कणकवली, दि. ०२ मे: कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला एक बॅनर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चर्चेचा विषय बनला आहे. “प्रचारास प्रवेश बंदी” असे या बॅनर वर लिहिले असून हा बॅनर येथील ग्रामस्थांनी लावला आहे.
“निषेध निषेध निषेध, प्रचारास प्रवेश बंदी, जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये” असे या बँनरवर लिहिण्यात आले आहे. गेली ३० वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाला तालुक्याशी जोडणारा हा एकमेव रस्ता असून त्याची सध्याची स्थिती खूपच खराब झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. हा रस्ता मंजूर होऊनही गेले काही महिने प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही आहे. विशेष म्हणजे कणकवली शहरापासून हा रस्ता फक्त ५ किलोमीटर अंतरावर असून याकडे दुर्लक्ष होत असून हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यामुळे अशा आशयाचा बॅनर येथे लावला असे ग्रामस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने गावात प्रचारासाठी येऊ नये अशी ताकीदच गावकऱ्यांनी दिली आहे.
सावंतवाडी, दि. ०१ मे : येत्या रविवारी (ता.५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते सावंतवाडी येथे येणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली
‘‘निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राणेंचा विजय निश्चित आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट व रामदास आठवले आरपीआयच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणल्यात त्या आम्ही जनतेसमोर घेऊन जात असून कणखर नेतृत्व म्हणून मोदी हे जगभरात प्रसिद्ध आहेत. आम्ही जनतेसमोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामगिरी घेऊन जात आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. ऑनलाइन अर्थात डिजिटल पद्धतीने चलनात पैसा येऊ लागल्याने अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. ती पुढील काळात तीन नंबरवर आणण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम होईल. केंद्रीय मंत्री राणे यांनी बेरोजगारीवर पर्याय शोधले असून त्यांनी प्रकल्प साकारण्याचा निश्चय केला आहे. सी वर्ल्ड प्रकल्प झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दूर झाली असती. पण, खासदार विनायक राऊत आणि ठाकरे यांच्या आमदारांनी त्याला विरोध केला. रिफायनरीला देखील विरोध राहिल्याने तो होऊ शकला नाही. असे राजन तेली या वेळी म्हणालेत.
‘‘आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग तालुका निर्मिती राणे यांनी केली आहे. या ठिकाणी देखील रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराच्या प्रश्नावर नारायण राणे यांचे मॉडेल तयार आहे. ते निश्चित काम करतील.’’ असे ते पुढे म्हणालेत
नांदगाव, दि. २८ एप्रिल : मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव येत्या रविवारी (दि. ०५ मे) होणार आहे. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते.
‘कोळंब्याचा चाळा’ म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असणारा आणि विशेष करून मुक्या प्राण्यांचा रक्षणकर्ता म्हणून कोळंबा देवाची सर्वदूर ख्याती आहे. श्री देव कोळंबाचा नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबड्या, बकरीचा बळी देण्याची व मटण भाकरीच्या प्रसादासाठीची जत्रा म्हणून याची ओळख आहे.
येथे हजारो वर्षांपासून श्रीदेव महादेवाचे निराकाररुपी लिंग गर्द अशा झाडीत होते. याच लिंगरुपी पाषाणाला स्थानिक ग्रामस्थ ‘श्री देव कोळंबा’, या नावाने गावाचा रक्षणकर्ता म्हणून पूजाअर्चा करतात. ‘‘आपल्या घराचे-गावाचे रक्षण कर, सांभाळ कर’’, असे म्हणून श्रद्धेने देवाच्या चाळ्याला कोंबडा व देवाला श्रीफळ अर्पण करतात. याच्या श्रद्धेची प्रचिती आल्याने आज लाखाहून अधिक श्री देव कोळंबाचे भक्त आहेत. पूर्वी जत्रेला शे-दीडशे भाविक दर्शनास येत. त्यांची संख्या आता लाखाच्या घरात पोचली असून प्रत्येक भक्ताला अनुभूती मिळत आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे आणि सायंकाळी चारनंतर महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.
सावंतवाडी: प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील विघ्ने वाढत चालली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला मोठया प्रमाणावर विरोध केला आहे. आता तर तळकोकणातही ज्या पट्ट्यातून हा महामार्ग जात आहे तो पट्टा ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ क्षेत्र Eco Sensitive Zone जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालायने सरकारला दिले असल्याने या महामार्गासमोरील सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
प्रस्तावित महामार्ग आंबोली, कीतवडे,गेळे,वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उदेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा या गावातून जाणार आहे. मात्र यातील फणसवडे, उडेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी ही गावे या इको सेन्सेटिव्ह झोन ESZ मध्ये येत आहेत. येथे वृक्षतोड करणे आणि महामार्ग बांधकामास मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या वाटेवरील अडचणी वाढल्या आहेत. या महार्गासाठी या भागातून नेण्यास मंजुरी मिळवणे खूप कठीण होणार आहे.
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या क्षेत्राला ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ क्षेत्र Eco Sensitive Zone ESZ जाहीर करण्यात यावे असेच आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा हा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र गेल्या ११ वर्षात या आदेशांचे पालन झाले नसल्याने केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरल्याचे म्हणत न्यायालयाने ताशेरे ओढले होते.आता मात्र उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने पुढील दोन महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
सवांवाडी दोडामार्ग कॉरिडॉर दरम्यान २५ गावे येतात. सिंधदुर्गतील केसरी, फणसवडे , उडेली, दाभील- नेवली, सरंबळे, ओटावणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंब्रल, पांतुर्ली, भिके कोनाळ, कळणे, उगडे, पडवे माजगाव ही २५ गावे या कॉरिडॉर मध्ये मोडतात.या मार्गिकेतून अनेक वन्य प्राणी येजा करतात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात जैवविविधता आहे. तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत. मात्र या भागातून असे महामार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन जैवविविधतेची मोठी हानी होऊ शकते. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असल्याने येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद यांनी मत मांडले आहे.
सिंधुदुर्ग, दि. २६ एप्रिल:बळवली पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या मार्गाच्या डीपीआरमध्ये सुधारणा केली जात असल्याची माहिती आहे, या पूर्वीच्या संरेखनाप्रमाणे हा महामार्ग सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ Eco-Sensitive झोनमधून जात होता. या कारणांमुळे या महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी समस्या निर्माण होणार असल्याने त्यात बदल करण्यात येणार आहे.
अलीकडेच उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला तळकोकणातील २५ गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे येथील भागातील वृक्षतोडीवर, जंगलतोडीवर मर्यादा येणार आहेत. या कारणांमुळे या महामार्गासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवणे कठीण जाणार आहे.
हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यावर, शिवडी, मुंबई ते पणजी, गोवा असा प्रवास ६ तासांपेक्षा कमी वेळेत करता येणार आहे कारण अटल सेतू आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या एक्स्प्रेसवेशी अखंडपणे जोडले जाणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे. महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि एकूण ४ टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल. या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.
रत्नागिरी, दि.१९ एप्रिल: नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली असल्याने शिंदे गटातील काही कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे (Narayan Rane) यांना आपला पाठिंबा जाहीर केला असूनही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
इतकंच नाही तर रत्नागिरी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा सत्र ही चालू केले आहे. युवा सेनेच्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. याची देखील राजकारणात चर्चा होऊ लागली आहे.त्यामुळे सामंत बंधू आपल्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहावं लागेल.
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीकच्या माभळे येथील शासकीय विश्रामगृहाजवळ वृक्षतोड सुरू आहे. याची वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी येथील वनप्रेमींनी केली आहे.
महामार्गावरील माभळे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वनविभागाकडे पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली तसेच ती झाडे जप्तही केली होती. त्यानंतर पुन्हा झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अवैध असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.