Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वेचा यशस्वी वर्षाचा प्रवास; प्रवासी संख्या वाढली, सुरक्षा व सेवांमध्ये मोठी सुधारणा

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत प्रवासी वाहतूक, सेवा आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात विक्रमी यश नोंदवले आहे. कोकण भागातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करताना, संस्थेने तिकीट तपासणीमधून तब्बल 27.59 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

नवीन गाड्या आणि विशेष सेवा सुरू

या कालावधीत KRCL ने ‘देव दर्शन स्पेशल ट्रेन’सह अनेक नवीन सेवा सुरू केल्या. रांजणगाव, अयोध्या आणि रामेश्वरम यांना जोडणाऱ्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय गणपती, उन्हाळा आणि हिवाळा हंगामात 1,400 हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील सुधारणा

पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेही मोठी प्रगती करण्यात आली आहे. पूल, बोगदे आणि सिग्नल प्रणालींचे आधुनिकीकरण करून सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यात आली. ड्रोनच्या मदतीने ट्रॅक मॉनिटरिंगसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले. मडगाव स्थानकावर सुधारणा करून ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आणि सोयी

प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. दिव्यांगांसाठी रॅम्प, ब्रेल साइनज, सुधारित सूचना फलक यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. रत्नागिरी, सावंतवाडी रोडसारख्या स्थानकांवर एसी लाउंज, रेल आर्केड, डिजी लॉकर सुविधा सुरू करण्यात आल्या. काही स्थानकांवर उंच प्लॅटफॉर्म, फूटओव्हर ब्रिज आणि शेड सुधारणा देखील पूर्ण करण्यात आल्या.

सुरक्षा उपाय आणि सौरऊर्जेवर भर

सुरक्षा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. KRCL ने 3.67 लाख kWh सौरऊर्जा निर्मिती करून सुमारे 45.94 लाख रुपयांची बचत केली. याशिवाय 2,700 मीटर कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरे आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. तसेच 90 हरवलेल्या मुलांना वाचवण्यातही यश आले आहे.

सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उपक्रम

गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी विशेष सुविधा, मोफत पाणी, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे कोकण रेल्वेने प्रवासी-केंद्रित सेवा, सुरक्षितता आणि विकास यामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करण्यासाठी कोकणातील संघटना आक्रमक; खासदार अनिल देसाई यांची भेट

   Follow us on        

मुंबई:रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी कोकणातील विविध संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आज शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कोकण विकास समिती, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (महाराष्ट्र) आणि जल फाउंडेशन कोकण विभाग यांच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांची शिवसेना भवन येथे भेट घेण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाबाबत चर्चा करण्यात आली.

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने आक्रमकपणे आपली बाजू मांडताना सांगितले की, रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी-दादर गाडी पूर्ववत न करणे हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे, त्यामुळे आता त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. हा प्रश्न केवळ एका गाडीपुरता मर्यादित नसून, मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील सुमारे २८ गाड्या बंद केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. परराज्यात जाणाऱ्या गाड्या दिवा किंवा पनवेल येथून सोडाव्यात आणि महाराष्ट्रातील सर्व गाड्यांना दादर किंवा सीएसएमटी स्थानकावरूनच प्राधान्य मिळावे, अशी आग्रही मागणी खासदार महोदयांकडे करण्यात आली.

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विशेषतः कोकणातील खासदार-आमदारांनी या विषयावर एकत्र येऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे दाद मागणे गरजेचे असल्याचे संघटनांनी नमूद केले. तसेच, गरज पडल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. खासदार अनिल देसाई यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अशा व्यापक संघर्षाची आवश्यकता असल्याचे मान्य केले. या प्रसंगी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, अक्षय महापदी, दिलीप कदम, संतोष भोसले, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक, जल फाउंडेशनचे नितीन जाधव आणि प्रमोद बागवे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Railway Megablock : मध्यरेल्वेचा दोन दिवसांचा ‘ब्लॉक’, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परळ आणि करी रोड दरम्यान असलेला जुना रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) पाडण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ४ एप्रिलच्या रात्री २३:१५ पासून ५ एप्रिलच्या पहाटे ०५:४५ पर्यंत असेल. या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तारखेनुसार वेळापत्रकात खालील बदल करण्यात आले आहेत:

​३ एप्रिल २०२६ (शुक्रवार)

​या दिवशी सुटणाऱ्या खालील गाड्या मुंबई सीएसएमटीला न जाता ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होतील (प्रवास ठाण्यातच संपेल):

​१२८७० हावडा – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

​११०५८ अमृतसर – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस

​११०२० भुवनेश्वर – मुंबई सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​१२८१० हावडा – मुंबई सीएसएमटी मेल

​०१०८० गोरखपूर – मुंबई सीएसएमटी विशेष

​४ एप्रिल २०२६ (शनिवार)

​अ) ठाणे आणि पनवेल येथे प्रवास संपणाऱ्या गाड्या:

​१२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१२७०२ हैदराबाद – मुंबई सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१११४० होसपेटे जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१२०NT/१२०५२ मडगाव – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​१०१०४ मडगाव – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​२२१२० मडगाव – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​ब) बदललेल्या स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या (Short Originate):

​२०१११ कोकण कन्या एक्स्प्रेस: ही गाडी सीएसएमटीऐवजी पनवेल स्थानकावरून रात्री ००:३२ वाजता सुटेल.

​११०५७ मुंबई – अमृतसर एक्स्प्रेस: ही गाडी सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरून रात्री २३:४६ वाजता सुटेल.

​५ एप्रिल २०२६ (रविवार)

​अ) नवीन वेळेनुसार सुटणाऱ्या गाड्या (Rescheduled):

ब्लॉकमुळे सकाळी सुटणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे:

​११००३ दादर – सावंतवाडी रोड राज्यराणी एक्स्प्रेस: सकाळी ०६:३० वा.

​२२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस: सकाळी ०५:४० वा.

​२२१७७ मुंबई सीएसएमटी – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस: सकाळी ०५:५० वा.

​१७६१७ मुंबई सीएसएमटी – नांदेड तपोवन एक्स्प्रेस: सकाळी ०६:३० वा.

​२२१०५ मुंबई सीएसएमटी – पुणे जंक्शन इंद्रायणी एक्स्प्रेस: सकाळी ०६:५० वा.

​०११२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव विशेष: सकाळी ०७:१० वा.

​१०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्स्प्रेस: सकाळी ०७:५० वा.

​२२१५९ मुंबई सीएसएमटी – चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस: दुपारी ०२:३० वा.

​ब) पनवेलवरून सुटणाऱ्या गाड्या:

​१२०५१ मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस: सकाळी ०६:४५ वाजता पनवेलवरून सुटेल.

​२२११९ मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेस: सकाळी ०७:०७ वाजता पनवेलवरून सुटेल.

या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आणि लोकल गाड्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड वापरण्याचे आवाहन केले आहे. पायाभूत सुविधांच्या या महत्त्वाच्या कामासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग कोकण रेल्वेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित – सागर तळवडेकर

   Follow us on        

सावंतवाडी: लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आजही कोकण रेल्वेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केला आहे. कोकण रेल्वेमुळे गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना विकासाचा मोठा फायदा झाला असताना महाराष्ट्रातील सिंधुदुर्गकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुविधांच्या बाबतीत मागे ठेवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोवा आणि कर्नाटक राज्यांना आधुनिक डेमू आणि मेमू गाड्यांचे जाळे उपलब्ध झाले आहे, तर सिंधुदुर्गमधील प्रवाशांना अद्यापही मर्यादित सेवा आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील प्रवाशांना कमी तिकिट दरात सेवा मिळत असली तरी महत्त्वाच्या गाड्यांना थांबे मिळत नसल्याने स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेक गाड्या जिल्ह्यातून धावत असल्या तरी त्यांचा लाभ स्थानिकांना पुरेसा मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे तळवडेकर यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी टर्मिनस हा केवळ एक प्रकल्प नसून कोकणाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. मोपा विमानतळ आणि प्रस्तावित पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांमुळे सावंतवाडी परिसर पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम होणार आहे.

मात्र सध्या कोकणातून धावणाऱ्या बहुतांश गाड्या गोवा किंवा दक्षिण भारताकडे वळवल्या जात असल्याने स्थानिक प्रवाशांना आरक्षणाची समस्या भेडसावत आहे. गणेशोत्सव, होळी यांसारख्या सणांच्या काळात ही अडचण अधिक तीव्र होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन या प्रश्नावर आवाज उठवावा, असे आवाहन सागर तळवडेकर यांनी केले आहे.

उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा सुधारण्याच्या नावाखाली कोकणरेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना ‘बाहेरचा मार्ग’?

   Follow us on        

मुंबई: कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांच्या हक्काची आणि जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे आता कायमची इतिहासजमा होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, ही कोकणवासीयांची अत्यंत रास्त मागणी रेल्वे प्रशासनाने अत्यंत उद्धटपणे फेटाळून लावली आहे.

​शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी नुकतीच दिल्लीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी दादर किंवा सीएसटीएम येथून रत्नागिरीसाठी गाडी सुरू करणे ‘शक्यच नाही’ असे स्पष्टपणे सांगून कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

विशेष म्हणजे, आता ही गाडी दिवा स्थानकावरून वसईमार्गे वळवण्यात येणार आहे. म्हणजेच, मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्याला ही गाडी पकडण्यासाठी थेट दिवा किंवा वसई गाठावी लागणार आहे.

उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणासाठी कोकणकरांच्या सोयीचा बळी. 

रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा वाढविण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गे जाणार्‍या गाड्या कायमस्वरूपी पनवेल, बोरिवली येथील प्रस्तावित टर्मिनसवर शिफ्ट करण्याचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे.

एका आघाडीच्या मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या आता पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून सुटतील. या गाड्या पुढील दीड ते दोन वर्षात पूर्ण होणार्‍या नव्या रेल्वे मार्गाने म्हणजेच जुचंद्र, कमान रोड, खारबाव, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोलीमार्गे पनवेलला जातील.

एकदंरीत मध्यरेल्वे कोकणरेल्वेशी असलेली लिंक संपूर्णपणे तोडणार असून या गाड्या पाश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवासी वर्गात नाराजी. 

आधीच दादर रत्नागिरी एक्सप्रेस गाडी बंद केल्याने नाराज झालेला कोकणातील प्रवासी वर्ग या बातमीने सुन्न झाला आहे. कोकणातील जनतेचा कोणी नसल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

Konkan Railway: ऐन हंगामात विशेष गाडीच्या फेर्‍यांमध्ये कपात; प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

   Follow us on        

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव (गोवा) दरम्यान चालवल्या जाणाऱ्या साप्ताहिक ‘उन्हाळी विशेष’ ट्रेनच्या (०१०१९/०१०२०) वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी ५ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार होती, मात्र आता ही सेवा १२ एप्रिल २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. ही विशेष रेल्वे १२ एप्रिल ते ७ जून २०२६ या कालावधीत दर रविवारी चालवली जाणार आहे.

फेर्‍यांमध्ये केलेल्या कपातीमुळे प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याआधीच कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुरेशा गाड्यांची घोषणा केली नसल्याचा सूर होता. आता ही गाडी ऐन हंगामात जेव्हा चाकरमानी गावी जाण्याची योजना आखतात तेव्हाच रद्द केली गेली असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

​सुधारित वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई सीएसएमटीहून दर रविवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२० मडगावहून रविवारी सायंकाळी १६:०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०३:५० वाजता मुंबईत पोहोचेल. या विशेष गाडीचे बुकिंग १ एप्रिल २०२६ पासून आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तरी प्रवाशांनी या बदललेल्या तारखांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील थांब्यावर शेडची प्रतिक्षा संपता संपेना

   Follow us on        

सावंतवाडी ::कोकण रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः वेंगुर्ले आणि शिरोडा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांब्यावर निवारा (Shed) नसल्याने प्रवाशांना भर पावसात आणि कडक उन्हात एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.

​शेडअभावी हाल

​सावंतवाडी रेल्वे स्थानकाबाहेरून वेंगुर्ले, शिरोडा आणि परिसरातील गावांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, येथे एसटी बससाठी कायमस्वरूपी निवारा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात प्रवाशांचे कपडे आणि सोबत असलेले सामान भिजण्याचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे, सावंतवाडी शहराच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी जे शेड उपलब्ध आहे, त्याची क्षमता अत्यंत कमी असून ते प्रवाशांच्या गर्दीच्या मानाने खूपच लहान पडत आहे.

​रिक्षा स्टँड आणि पार्किंगला जागा, मग बस प्रवाशांना का नाही?

​काही काळापूर्वी जेव्हा या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकासकामे करण्यात आली, तेव्हा रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र स्टँडची व्यवस्था करण्यात आली. तसेच एका बाजूला ‘पे अँड पार्किंग’साठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, शेकडो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी बससाठी साधे शेड उभारले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

​प्रवाशांची मागणी

​रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सुसज्ज बस निवारा (Bus Stand Shed) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पार्किंग आणि इतर सुविधांना प्राधान्य देताना सामान्य प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करू नये, असा सूर सध्या उमटत आहे.

Konkan Railway: मुंबई – मडगाव दरम्यान ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई, दि. ३० मार्च २०२६ – उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी  –मडगाव–मुंबई सीएसएमटी दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई सीएसएमटी–मडगाव स्पेशल ही गाडी दर रविवारी पहाटे ००:५५ वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल. ही सेवा ०५ एप्रिल २०२६ ते ०७ जून २०२६ या कालावधीत चालणार असून, गाडी त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तसेच, गाडी क्रमांक ०१०२० मडगाव–मुंबई सीएसएमटी स्पेशल ही गाडी दर रविवारी सायंकाळी १६:०० वाजता मडगावहून सुटेल आणि पुढील दिवशी पहाटे ०३:५० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. ही सेवा देखील ०५ एप्रिल २०२६ ते ०७ जून २०२६ या कालावधीत चालवण्यात येणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

या गाडीची एकूण रचना २२ डब्यांची असून त्यात २ एसी (१), ३ एसी (६), स्लीपर (९), जनरल (४) आणि एसएलआर (२) डब्यांचा समावेश आहे.

दरम्यान, गाडी क्रमांक ०१०२० साठी आरक्षण ०१ एप्रिल २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Konkan Railway: रेल्वे रूळ क्रॉसिंग अपघात रोखण्यासाठी आयोजित सेमिनार कोकणरेल्वे मुख्यालयात पार

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेने सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी अधिक मजबूत करत लेव्हल क्रॉसिंग गेट्सवरील (LC Gates) सुरक्षा आणि जनजागृती वाढवण्यासाठी २६ मार्च २०२६ रोजी बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उच्चस्तरीय सेमिनार आयोजित केला. या सेमिनारमध्ये गेटमॅन, सुपरवायझर, स्टेशन मास्टर आणि लोको पायलट अशा विविध कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी भूषवले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

या सेमिनारमध्ये लेव्हल क्रॉसिंगवरील उपकरणांचा योग्य वापर, सुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणती कार्यपद्धती अवलंबावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, रेल्वे रुळांच्या सुरक्षिततेसाठी फ्लॅंजची रुंदी आणि उंची योग्य राखण्यावरही भर देण्यात आला. रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी गेटजवळ स्पष्ट साइनबोर्ड आणि मार्किंग असणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या वेळी गेट परिसरातील रस्त्यांची देखभाल सुधारण्याची गरज व्यक्त करत, टिकाऊ रबर लेव्हल क्रॉसिंग पॅनेल्स बसवण्याचे फायदे सांगण्यात आले. या पॅनेल्समुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास अनुभव मिळेल आणि देखभालही सुलभ होईल. सेमिनारमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करून सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त उपाय सुचवले.

रेल्वेचा ‘महाराष्ट्रद्वेष’! राज्यांतर्गत दोन डझनहून अधिक गाड्या कायमस्वरूपी बंद

   Follow us on        

मुंबई, २७ मार्च २०२६: कोरोनाच्या काळापासून तसेच अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेगाड्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात प्रवासी संघटना आणि स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत.

रेल्वे अभ्यासक पियुष यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २ डझनहून अधिक गाड्या रद्द झाल्या आहेत. यात मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, कुर्ला एलटीटी-नांदेड एक्सप्रेस (बार्शी मार्गे), मुंबई-विजयापूर एक्सप्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, पनवेल-बारामती पॅसेंजर यासारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय दादर-रत्नागिरी, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, एलटीटी-अजनी (नागपूर) एक्सप्रेस, मनमाड-पुणे पॅसेंजर आदी गाड्याही बंद आहेत.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, या गाड्या बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, शेतीमाल वाहतूक आणि दैनंदिन प्रवास मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज, हिंगोली, वाशिम, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या भागांतून मुंबईसह इतर शहरांशी थेट जोडणी तुटली आहे. यामुळे प्रवाशांना महागड्या वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. प्रवासी संघटनांनी देखील रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारकडे या गाड्या तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. २०२५ मध्ये कोल्हापूर येथे सह्याद्री एक्सप्रेसच्या पुनर्स्थापनेची मागणी करत मोर्चे आणि निषेध प्रदर्शन झाले होते, तरीही अनेक गाड्या अद्याप बंदच आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मात्र या गाड्या कमी प्रवासी संख्या, शून्य-आधारित वेळापत्रक आणि गाड्यांच्या उपलब्धतेमुळे बंद ठेवल्याचे सांगण्यात येते. प्रवासी मात्र याला दुजाभाव म्हणत आहेत. काही गाडय़ा बंद करण्यामागे रेल्वे प्रशासनाने दिलेली कारणे पटण्यासारखी नाही आहेत. राज्यांतर्गत गाड्यांपेक्षा रेल्वे उत्तर भारत, गुजरात आणि ईतर राज्यात जाणार्‍या गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. कोरोनाकाळात बंद झालेल्या सर्व राज्यांतर्गत गाड्या तातडीने सुरू करा, कोकण रेल्वे मार्गावरील पॅसेंजर सेवा वाढवा, मराठवाडा-विदर्भातील रेल्वे जोडण्या मजबूत करा आणि नवीन वंदे भारत व एक्सप्रेस गाड्यांची घोषणा करा, अशी प्रमुख मागणी आहे.प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर या मुद्द्यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी पुढे एकही पॅसेंजर सेवा नाही. 
कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पट्ट्यात चालविण्यात येणार्‍या दिवा सावंतवाडी पॅसेंजरला एक्सप्रेसचा दर्जा दिल्याने तसेच रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर ५०१०१ / ५०१०२ बंद केल्यामुळे या पट्ट्यात एकही पॅसेंजर गाडी धावत नाही. या कारणाने सामान्य प्रवाशांना महागड्या वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

 

बंद झालेल्या काही प्रमुख गाड्या :

सह्याद्री एक्सप्रेस ११०२३ / ११०२४ (मुंबई CSMT – कोल्हापूर)

एलटीटी – अजनी (नागपूर) एक्सप्रेस (औरंगाबाद मार्गे) ११२०१ / ११२०२ (लोकमान्य तिलक टर्मिनस – अजनी) – हिंगोली, वाशिमसाठी महत्त्वाची

रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर ५०१०१ / ५०१०२ (रत्नागिरी – मडगाव)

दादर – रत्नागिरी पॅसेंजर (दिवा-रत्नागिरी मध्ये बदल झाला आहे, मूळ दादर सेवा बंद)

मनमाड – पुणे पॅसेंजर (ट्रेन नंबर: सामान्यतः ५१४१० / ५१४०९ सारखे, बंद)

मुंबई – भुसावळ पॅसेंजर (मुंबई – भुसावळ मार्गातील पॅसेंजर सेवा बंद)

पनवेल – बारामती पॅसेंजर (पनवेल – बारामती मार्ग)

कुर्ला / एलटीटी – नांदेड एक्सप्रेस (बार्शी मार्गे) (संबंधित ट्रेन नंबर: ११०११ / ११०१२ सारखे, बंद)

मुंबई – विजयापूर एक्सप्रेस (संबंधित ट्रेन नंबर: १११३९ / १११४० किंवा समान)

पुणे – भुसावळ एक्सप्रेस (पनवेल मार्गे) (संबंधित एक्सप्रेस सेवा बंद)

कोकण रेल्वे मार्गावर १०१०१ / १०१०२ (रत्नागिरी-मडगाव एक्सप्रेस) देखील दीर्घकाळ बंद किंवा रद्द झाली होती.

अनेक पॅसेंजर गाड्या जसे मुंबई-भुसावळ, पुणे-कर्जत-पनवेल, पुणे-पनवेल इत्यादींचे नंबर ५०००० सीरीजमध्ये असतात, पण त्या बंद आहेत.

 

 

 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search