Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: आरपीएफची मोठी कारवाई; सीसीटीव्हीच्या मदतीने ३.५ लाखांच्या मुद्देमालासह तीन चोरट्यांना अटक

   Follow us on        

गोवा:

कोकण रेल्वेच्या थिविम रेल्वे स्टेशनवर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. स्टेशन परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना आरपीएफ जवानांनी तत्परता दाखवत रंगेहात ताब्यात घेतले. या आरोपींकडून तब्बल १५ महागडे मोबाईल फोन आणि ५ लॅपटॉप असा एकूण ३.५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. थिविम हे गोव्यातील एक अत्यंत महत्त्वाचे स्टेशन असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आरपीएफच्या चोख नजरतेमुळे या चोरांचा डाव उधळून लावण्यात यश आले.

​मंगळवारी स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना आरपीएफ कर्मचाऱ्यांना काही जणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. या आरोपींकडे चोरीच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे कॅमेऱ्यात स्पष्ट झाल्यानंतर, आरपीएफ आउटपोस्टच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना वेढा घातला आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांनाही अटक केली. या धडक कारवाईनंतर आरपीएफने पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तीनही आरोपींना जप्त केलेल्या मालासह अंजुना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या अंजुना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या टोळीची कसून चौकशी सुरू आहे.

​कोकण रेल्वे प्रशासनाने आरपीएफ जवानांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. आरपीएफच्या ‘#सदारसेवा’ या उपक्रमांतर्गत रेल्वे क्षेत्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा कारवाया सातत्याने केल्या जात आहेत. सीसीटीव्ही तंत्रज्ञान आणि जवानांची सतर्कता यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, प्रवाशांनीही प्रवास करताना आपल्या साहित्याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गणेशोत्सव २०२६: यावर्षी कोकण रेल्वेने गावी जाणार असाल तर ही बातमी वाचाच

   Follow us on        

गणेशोत्सव हा संपूर्ण कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. दरवर्षी लाखो चाकरमानी बाप्पाच्या आणि गौरीच्या उत्सवासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून न चुकता आपल्या कुटुंबासह गावी जात असतात. यंदा २०२६ मध्ये सोमवार, १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील ‘कोकणकन्या एक्सप्रेस’, ‘मांडवी एक्सप्रेस’, ‘तुतारी’ आणि ‘मत्स्यगंधा’ यांसारख्या नियमित गाड्यांचे आगाऊ तिकीट आरक्षण चालू झाले आहे. नियमित गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी दरवर्षी मोठी चुरस पाहायला मिळत असल्याने चाकरमान्यांना आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.

​यंदा शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी श्रावणी अमावस्या सकाळी ८:५६ वाजता संपत आहे, त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने याच रात्री गावाकडे निघण्याची शक्यता आहे. या ११ सप्टेंबरच्या प्रवासासाठीचे रेल्वे आरक्षण १३ जुलै रोजी सकाळी सुरू होणार आहे. त्यानंतर १२ आणि १३ सप्टेंबर (शनिवार व रविवार) रोजीच्या प्रवासासाठी नियमित गाड्यांचे तिकीट आरक्षण अनुक्रमे १४ जुलै आणि १५ जुलै रोजी खुले केले जाईल. रेल्वेचे हे आरक्षण प्रवासाच्या ६० दिवस आधी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना वेळेत तिकीट बुक करावे लागेल.

​यासोबतच, कोकणात गौरीच्या सणासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्याही खूप मोठी असते. यंदा गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी गौरी आगमन असून शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरच्या महत्त्वाच्या दिवशी गावात पोहोचण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या नियमित गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडण्याची चिन्हे आहेत. या १७ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण १९ जुलै रोजी सुरू होणार आहे. जर प्रवाशांना या नियमित गाड्यांचे तिकीट मिळाले नाही, तर त्यांना नंतर मध्य व कोकण रेल्वेकडून सोडल्या जाणाऱ्या विशेष (स्पेशल) गाड्यांवर अवलंबून राहावे लागेल. म्हणूनच कोकणवासीयांनी आरक्षणाच्या या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवून वेळेत आपले नियोजन करणे फायदेशीर ठरेल.

खुशखबर! मुंबई – मंगुळुरु एक्सप्रेससह सावंतवाडी स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश!

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आता ३ प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबा (Stoppage) मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील मंजुरी दिली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

‘या’ ३ गाड्यांना मिळाला थांबा:

सावंतवाडी रोड स्थानकावर आता खालील गाड्या थांबतील:

१. गाडी संख्या १२१३३/१२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस

२. गाडी संख्या १२४३१/१२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस

३. गाडी संख्या १२२०१/१२२०२: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

जनसामान्यांच्या सुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा मिळवा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून या तिन्ही गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे.

संघटनेच्या विविध माध्यमांतील प्रयत्नांना अखेर यश!

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रमुख गाड्या थांबवण्यात याव्यात, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने विविध माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली, विविध स्तरांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना मागण्यांची निवेदनेही देण्यात आली होती. यासोबतच, या मागणीला जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी समितीने सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. संघटनेच्या याच चौफेर प्रयत्नांची आणि जनभावनेची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या हितासाठी मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने परिसरातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच प्रवाशांच्या मागण्यांना यश आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या यशाबद्दल खासदार श्री. नारायण राणे साहेब, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. नरेश म्हस्के, आणि श्रीमती मेधाताई कुलकर्णी, पालकमंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. रवींद्र चव्हाण, आमदार श्रीमती सुलभा गायकवाड ताई, आमदार श्री. कुमार आयलानी, आणि आमदार श्री. बाळा नर आदींचे संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

​”आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे. भविष्यातही प्रवासी बांधवांच्या हितासाठी आणि हक्कासाठी आपले असेच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत राहील, हा विश्वास आहे.”

— कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी

​या यशस्वी प्रयत्नांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून या लोकप्रतिनिधींचे कौतुक होत आहे.

 

Konkan Railway: पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; प्रवाशांचे मोठे हाल

   Follow us on        

Konkan Railway:गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश एक्सप्रेस गाड्या तीन ते सहा तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विलंबाचा सर्वाधिक फटका ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ला बसला आहे. ही गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल सात तास उशिराने पोहोचली असून, गेल्या आठ दिवसांपासून तिचे उशिरा धावणे सुरूच आहे. याव्यतिरिक्त तुतारी एक्सप्रेस (५ तास), मांडवी एक्सप्रेस (५ तास) आणि दिवा एक्सप्रेस (६ तास) या गाड्याही मोठ्या विलंबाने धावत आहेत. या गाड्या रात्री उशिरा कोकणातील स्थानकांवर पोहोचणार असल्याने, पुढील प्रवासासाठी प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

या प्रमुख गाड्यांसोबतच वंदे भारत, जनशताब्दी, कोचुवेली, नेत्रावती, आणि मंगला एक्सप्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही अडीच ते साडेपाच तासांचा विलंब होत आहे. मात्र, या सर्व गोंधळात प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला असणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईकडे जाणारी तुतारी, जनशताब्दी, कोकणकन्या, मडगाव-एलटीटी आणि दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसारच धावत आहेत.

Vaibhavwadi Kolhapur Railway Line: डेडलाईन धोक्यात; भूसंपादन अजूनही कागदावरच!

   Follow us on        

विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर:

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्प’ सध्या प्रशासकीय लालफितीच्या कारभारामुळे पूर्णपणे रखडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून साकारल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या डिसेंबर अखेरीस दिले होते. मात्र, या आदेशाला तब्बल सात महिने उलटून गेले तरी प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाची २०२८ ची डेडलाईन केवळ कागदावरच राहणार का, असा संतप्त सवाल स्थानिक जनतेतून विचारला जात आहे.

​ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि निधीची मंजुरी:

या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा विचार कोकण रेल्वेच्या उभारणीच्या काळापासूनच सुरू होता. २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मिरज येथील परिषदेत या मार्गावर एकमत झाले. त्यांनी ३,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची घोषणा करत २०१७ च्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूदही केली होती. त्यानंतर अनेक वर्षे हा प्रकल्प थंड बस्त्यात होता. अखेर २०२३ मध्ये ‘पीएम गतिशक्ती’ उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी ३,४११ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली. मात्र, निधी आणि मंजुरी उपलब्ध होऊनही प्रशासकीय पातळीवरील कमालीच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प पुढे सरकलेला नाही.

​रेल्वे मार्गाचे स्वरूप आणि स्थानके:

१०७ किलोमीटर लांबीचा हा नियोजित रेल्वेमार्ग सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा आहे. हा मार्ग वैभववाडी रेल्वे स्थानक, सोनाळी, कुसूर, कुंभारी, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी या सिंधुदुर्गातील गावांमधून पुढे सैतवडे, कळे, भुये, कसबा बावडा, मार्केटयार्ड मार्गे कोल्हापूर असा असेल. या संपूर्ण मार्गावर एकूण १० स्थानके, ५ उड्डाणपूल आणि २६ बोगदे असणार आहेत. परंतु, रेल्वेमार्ग नेमका कुठून जाणार आणि स्थानके कुठे असतील, याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता न मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

​आर्थिक क्रांतीला ब्रेक आणि विकासाला फटका:

हा लोहमार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची आवक स्वस्त होईल. तसेच कोकणातील हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि मत्स्य उत्पादनांची थेट व जलद वाहतूक पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत करणे सुलभ होणार आहे. यामुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या व्यापार-उदीमात मोठी क्रांती घडू शकते आणि पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. परंतु, सध्याच्या कूर्मगती कारभारामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मोठी खीळ बसली असून, प्रशासनाने आता वेळ न घालवता तातडीने भूसंपादन सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Konkan Railway: महिला राखीव डब्यात हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांवर खेड स्थानकावर आरपीएफची कारवाई

   Follow us on        

Konkan Railway: एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या (गाडी क्रमांक १२६१८) महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करून हुल्लडबाजी करणाऱ्या हुल्लडबाज तरुणांविरोधात कोकण रेल्वे प्रशासनाने खेड रेल्वे स्थानकावर तातडीने मोठी धडक कारवाई केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने संबंधित तरुणांना डब्यातून बाहेर काढून त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​प्राथमिक माहितीनुसार, काही तरुणांनी महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. हे तरुण डब्यात सिगारेट ओढत होते आणि गुटखा खाऊन धूर व दुर्गंधी पसरवत होते. या हुल्लडबाजीमुळे आणि त्रासामुळे डब्यातील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रकार समोर आला.

​या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी तातडीने दखल घेत रेल्वे सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. ट्रेन रोहा स्थानक पार करून पुढे निघून गेल्यामुळे, पुढील प्रमुख स्थानक असलेल्या खेड रेल्वे स्थानकावर कारवाईची आखणी करण्यात आली. गाडी खेड स्थानकात दाखल होताच तेथे आधीपासूनच सज्ज असलेल्या रेल्वे पोलिसांच्या पथकाने महिला डब्याला चहुबाजूने वेढा घातला.

​पोलिसांना पाहताच डब्यातील काही हुल्लडबाजांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी सर्वांना जागीच ताब्यात घेतले. या वेळेवर झालेल्या धडक कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला असून, तत्परतेने पावले उचलणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकात ‘गरीब रथ’सह इतर गाड्यांना थांबा द्या; खासदार श्रीकांत शिंदे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) धावणाऱ्या ‘गरीब रथ एक्सप्रेस’सह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा, असे साकडे खासदार शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांना घातले आहे.

​कोकणातील हजारो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी रोड स्थानकावर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा थांबा नसल्यामुळे सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना ऐनवेळी लांबच्या अन्य स्थानकांवर जाऊन रेल्वे पकडावी लागते. यामुळे कोकणवासीयांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत असल्यामुळे खासदार शिंदे यांनी सविस्तर पत्राद्वारे नागरिकांच्या या व्यथा रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

​खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पत्रात सावंतवाडी रोड स्थानकाचे वाढते महत्त्व, कोकणातील वाढती प्रवासी संख्या आणि पर्यटनाला मिळणारी चालना याबाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या आहेत. विशेषतः मुंबई आणि कोकणदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी गरीब रथ एक्सप्रेस व इतर प्रमुख गाड्यांचा थांबा उपलब्ध झाल्यास, त्यांचा प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी पत्रात व्यक्त केला.

​या न्याय्य मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाला सावंतवाडी रोड स्थानकावर या रेल्वेगाड्यांचा थांबा देण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता (Feasibility) तपासण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रस्तावाचा व्यवहार्यता अहवाल रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर, नियमानुसार त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

​सावंतवाडी रोड स्थानकावर गरीब रथ एक्सप्रेससह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना अधिकृत थांबा मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणपट्टीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग प्रवाशांना प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल. तसेच, कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांनाही यामुळे मोठी चालना मिळून सकारात्मक फायदा होईल.

धक्कादायक! धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून चिमुकल्यासह तिघांची उडी, महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मडगावहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून एका पुरुषाने त्याच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिला आणि त्यांच्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलासह धावत्या रेल्वेतून उडी मारली. खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या भीषण अपघातात शुभ्रा अतिश दिवेकर नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

​पोलीस तपास आणि पुढील कारवाई:

घटनेची माहिती मिळताच रेल्वेतील प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले असून सध्या त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेल्या सचिन आणि त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांनी धावत्या रेल्वेतून एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक ताणतणाव किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे हा आत्महत्येचा प्रयत्न असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. खेड पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सावंतवाडी टर्मिनस इमारत कामाची निविदा जारी; ईमेल मोहीम व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजन सोहळ्याला तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, तरीही टर्मिनसची कामे रखडलेलीच होती. या अन्यायाविरुद्ध ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांच्या वतीने नुकतीच एक व्यापक ईमेल मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि निर्माण झालेल्या दबावामुळे अवघ्या ५ दिवसांत रेल्वे प्रशासनाला जाग आली असून, सावंतवाडी टर्मिनस टप्पा-२ अंतर्गत रखडलेल्या मुख्य टर्मिनस इमारतीच्या कामाची अधिकृत निविदा (Tender) अखेर जारी करण्यात आली आहे.

१००० पेक्षा जास्त ईमेल आणि डिजिटल मीडियाचा खंबीर पाठिंबा

या मोहिमेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळ, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाला रखडलेल्या कामांच्या तपशिलासह तब्बल १००० पेक्षा जास्त ईमेल पाठवण्यात आले होते. या जनआंदोलनाला ‘दैनिक पुढारी’सह विविध वृत्तपत्रे आणि डिजिटल मीडियाने खंबीर साथ दिल्यामुळे शासन व प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर ही निविदा काढण्यात आली. टर्मिनस प्रेमींनी हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय असल्याचे म्हटले आहे.

कोकणातील आमदारांना साकडे

सध्या राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने, मुंबई आणि कोकणातील सर्व विधानसभा व विधानपरिषद आमदारांना संघटनेने भावनिक साकडे घातले आहे. राज्य शासनाच्या अधीन असलेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरणातून पाणी पुरवठा योजना’ आणि ‘रत्नसिंधू समृद्धी योजनेतून’ होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसच्या कामांना या अधिवेशनात तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला असून दरवर्षी मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच ठोस पावले उचलावीत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि समस्त कोकणवासीयांनी केले आहे.

लढा अद्याप संपलेला नाही; प्रमुख मागण्या कायम

रेल्वेने केवळ इमारतीच्या कामाची निविदा काढली असली, तरी प्रवाशांच्या खऱ्या सोयीसाठी पुढील मागण्यांवर कोकण रेल्वे महामंडळाने त्वरित विचार करून निधीची तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे:

प्लॅटफॉर्मवर संपूर्ण शेड: पावसाळी व उन्हाळी संरक्षणासाठी प्लॅटफॉर्मवर ‘संपूर्ण शेड’ उभारणे.

नवा प्लॅटफॉर्म: गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘अजून एक नवीन प्लॅटफॉर्म’ तयार करणे.

अतिरिक्त रेल्वे रुळ: अतिरिक्त रेल्वे रुळांची (ट्रॅक) निर्मिती करणे.

या सर्व प्रमुख मागण्या आणि कामे मार्गी लावण्याचा लढा यापुढेही कायम राहील, असा निर्धार कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे.

राजापूर: रेल्वेच्या धडकेत ४ दुभत्या म्हशींचा मृत्यू; संरक्षक फेन्सिंगची मागणी

   Follow us on        

राज्यापूर: तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तातडीने मिळालेल्या माहितीनुसार, तळगाव येथील एका गरीब शेतकऱ्याच्या चार दुभत्या म्हशी चाऱ्याच्या शोधात मोसम परिसरातील रेल्वे मार्गाजवळ गेल्या होत्या. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात चारही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुभती जनावरे दगावल्याने संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या अनेक संवेदनशील भागांमध्ये आजही रेल्वे प्रशासनाने कोणतीही संरक्षक फेन्सिंग (कुंपण) उभारलेली नाही. त्यामुळे जनावरे सहजपणे रेल्वे रुळांवर पोहोचतात आणि अशा अपघातांना बळी पडतात. या भागात डिसेंबर महिन्यानंतर गुरे मोकाट सोडण्याची प्रथा असल्याने, जनावरे चाऱ्याच्या शोधात रेल्वे मार्गाकडे आकर्षित होतात. फेन्सिंगचा अभाव असल्यामुळे यापूर्वीही अनेक बैल, गाई आणि म्हशींचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही.

​सर्वात खेदाची बाब म्हणजे, अशा अपघातांमध्ये जनावरे दगावल्यानंतर शेतकऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसानभरपाई मिळत नाही. शेतीसोबतच दुग्धव्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दुभत्या जनावरांचा मृत्यू हा एक दुहेरी आर्थिक फटका ठरतो. या गंभीर परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना भक्कम संरक्षक फेन्सिंग बसविण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search