Category Archives: कोकण रेल्वे

रेल्वेचा ‘महाराष्ट्रद्वेष’! राज्यांतर्गत दोन डझनहून अधिक गाड्या कायमस्वरूपी बंद

   Follow us on        

मुंबई, २७ मार्च २०२६: कोरोनाच्या काळापासून तसेच अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेगाड्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात प्रवासी संघटना आणि स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत.

रेल्वे अभ्यासक पियुष यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २ डझनहून अधिक गाड्या रद्द झाल्या आहेत. यात मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, कुर्ला एलटीटी-नांदेड एक्सप्रेस (बार्शी मार्गे), मुंबई-विजयापूर एक्सप्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, पनवेल-बारामती पॅसेंजर यासारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय दादर-रत्नागिरी, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, एलटीटी-अजनी (नागपूर) एक्सप्रेस, मनमाड-पुणे पॅसेंजर आदी गाड्याही बंद आहेत.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, या गाड्या बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, शेतीमाल वाहतूक आणि दैनंदिन प्रवास मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज, हिंगोली, वाशिम, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या भागांतून मुंबईसह इतर शहरांशी थेट जोडणी तुटली आहे. यामुळे प्रवाशांना महागड्या वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. प्रवासी संघटनांनी देखील रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारकडे या गाड्या तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. २०२५ मध्ये कोल्हापूर येथे सह्याद्री एक्सप्रेसच्या पुनर्स्थापनेची मागणी करत मोर्चे आणि निषेध प्रदर्शन झाले होते, तरीही अनेक गाड्या अद्याप बंदच आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मात्र या गाड्या कमी प्रवासी संख्या, शून्य-आधारित वेळापत्रक आणि गाड्यांच्या उपलब्धतेमुळे बंद ठेवल्याचे सांगण्यात येते. प्रवासी मात्र याला दुजाभाव म्हणत आहेत. काही गाडय़ा बंद करण्यामागे रेल्वे प्रशासनाने दिलेली कारणे पटण्यासारखी नाही आहेत. राज्यांतर्गत गाड्यांपेक्षा रेल्वे उत्तर भारत, गुजरात आणि ईतर राज्यात जाणार्‍या गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. कोरोनाकाळात बंद झालेल्या सर्व राज्यांतर्गत गाड्या तातडीने सुरू करा, कोकण रेल्वे मार्गावरील पॅसेंजर सेवा वाढवा, मराठवाडा-विदर्भातील रेल्वे जोडण्या मजबूत करा आणि नवीन वंदे भारत व एक्सप्रेस गाड्यांची घोषणा करा, अशी प्रमुख मागणी आहे.प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर या मुद्द्यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी पुढे एकही पॅसेंजर सेवा नाही. 
कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पट्ट्यात चालविण्यात येणार्‍या दिवा सावंतवाडी पॅसेंजरला एक्सप्रेसचा दर्जा दिल्याने तसेच रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर ५०१०१ / ५०१०२ बंद केल्यामुळे या पट्ट्यात एकही पॅसेंजर गाडी धावत नाही. या कारणाने सामान्य प्रवाशांना महागड्या वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

 

बंद झालेल्या काही प्रमुख गाड्या :

सह्याद्री एक्सप्रेस ११०२३ / ११०२४ (मुंबई CSMT – कोल्हापूर)

एलटीटी – अजनी (नागपूर) एक्सप्रेस (औरंगाबाद मार्गे) ११२०१ / ११२०२ (लोकमान्य तिलक टर्मिनस – अजनी) – हिंगोली, वाशिमसाठी महत्त्वाची

रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर ५०१०१ / ५०१०२ (रत्नागिरी – मडगाव)

दादर – रत्नागिरी पॅसेंजर (दिवा-रत्नागिरी मध्ये बदल झाला आहे, मूळ दादर सेवा बंद)

मनमाड – पुणे पॅसेंजर (ट्रेन नंबर: सामान्यतः ५१४१० / ५१४०९ सारखे, बंद)

मुंबई – भुसावळ पॅसेंजर (मुंबई – भुसावळ मार्गातील पॅसेंजर सेवा बंद)

पनवेल – बारामती पॅसेंजर (पनवेल – बारामती मार्ग)

कुर्ला / एलटीटी – नांदेड एक्सप्रेस (बार्शी मार्गे) (संबंधित ट्रेन नंबर: ११०११ / ११०१२ सारखे, बंद)

मुंबई – विजयापूर एक्सप्रेस (संबंधित ट्रेन नंबर: १११३९ / १११४० किंवा समान)

पुणे – भुसावळ एक्सप्रेस (पनवेल मार्गे) (संबंधित एक्सप्रेस सेवा बंद)

कोकण रेल्वे मार्गावर १०१०१ / १०१०२ (रत्नागिरी-मडगाव एक्सप्रेस) देखील दीर्घकाळ बंद किंवा रद्द झाली होती.

अनेक पॅसेंजर गाड्या जसे मुंबई-भुसावळ, पुणे-कर्जत-पनवेल, पुणे-पनवेल इत्यादींचे नंबर ५०००० सीरीजमध्ये असतात, पण त्या बंद आहेत.

 

 

 

 

 

 

मनसेचा दुसरा ‘प्रहार’! बंद केलेली गाडी सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रवाशांना सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक देत जोरदार निषेध नोंदवला. कोकणातील चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे सेवेत होणारी गैरसोय, तसेच ‘दादर–रत्नागिरी पॅसेंजर’सारख्या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

मनसेने स्पष्ट इशारा देताना सांगितले की, प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि रद्द केलेल्या गाड्या त्वरित पूर्ववत न केल्यास पक्ष आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन उभे करेल.

या वेळी लहू थळे, स्वप्निल पंडित, प्रथमेश म्हात्रे, अक्षय वानखेडे, सविनय म्हात्रे, विलास घोणे, सचिन कदम यांच्यासह बेलापूर विभागातील प्रकाश कोकाटे, प्रशांत कोळी, शशी कोळी, सिद्धेश गायकवाड, ऋषिकेश पवार आणि चंद्रकांत कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात धडाक देऊन दादर रत्नागिरी गाडी दादर येथून सोडण्याची मागणी केली आणि तसे न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू अशा इशारा दिला होता.

कोकणवासीयांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; खासदार नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ ट्रेन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने कोकणवासीयांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ही रेल्वे सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. या ट्रेनच्या अभावामुळे विशेषतः दैनिक मजूर, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना मोठ्या आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार राणे यांनी पत्रात स्पष्ट केले की, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील जनतेसाठी ही रेल्वे सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय होती. मात्र, ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा महागडा पर्याय निवडावा लागत आहे किंवा इतर ओव्हरक्राउडेड गाड्यांतून प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोकणातील सामाजिक आणि आर्थिक घडी विस्कटत असून, जनभावनेचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. कोकणच्या विकासासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी ही ‘पॅसेंजर’ सेवा लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दादर – रत्नागिरी गाडी बंद करण्यामागे दिलेले रेल्वेचे ‘स्पष्टीकरण’ पूर्णपणे अस्वीकार्य

मुंबई : पुन्हा एकदा मध्य रेल्वे प्रशासनाने ‘स्पष्टीकरण’ देत रत्नागिरी पॅसेंजर गाडीला लोकल विलंबाचे कारण ठरवले आहे. दिवा क्रॉसिंगवर मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे स्पष्टीकरण पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

मध्य रेल्वेचे ‘स्पष्टीकरण’

दादर – रत्नागिरी गाडी बंद करण्यामागे रेल्वेने आपले स्पष्टीकरण दिले आहे. दादर रत्नागिरी ही गाडी कोरोनानंतर सुरू करताना दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट केली गेली होती. याचे मुख्य कारण दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्यावेळेस सुमारे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते. त्यातून लोकल सेवेवर दुष्परिणाम होत होता, असे रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र हे स्पष्टीकरण अस्वीकार्य असून उत्तर भारतात जाणार्‍या गाड्यांना प्राधान्य दिल्यानंतर केलेली सारवासारव असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.

कोरोना पूर्व काळात मागील २० वर्षांपासून ही रत्नागिरी पॅसेंजर गाडी नियमित धावत होती. त्या काळात कधीही लोकल सेवेवर एवढा ‘मोठा’ परिणाम झाला नव्हता. आता अचानक काय बदलला? रेल्वे प्रशासनाला रात्रीच्या अंधारात काय ‘नवीन’ समस्या दिसली?

सर्वात मोठा प्रश्न – दिवा स्टेशनचा!

दिवा स्टेशनवरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांसाठी ट्रॅक क्रमांक ५ आणि ६ पूर्णपणे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी राखीव आहेत. मग लोकल गाड्यांना या रत्नागिरी पॅसेंजरमुळे कशी अडचण येते? एखादी पॅसेंजर गाडी क्रॉसिंगवर थांबली तरी ती ५-६ ट्रॅकवरच राहते ना? लोकलना तर वेगळ्या ट्रॅकवरून मार्ग मिळतो. मग ही ‘मोठी अडचण’ कुठून निर्माण झाली?

कल्याण स्टेशनची सत्यकथा…

कल्याण स्टेशनवर तर रोज दोन्ही बाजूने (मुंबई-कल्याण आणि कल्याण-पुढे) गाड्या एकाच वेळी मर्ज होतात. तेव्हा लोकल गाड्या खोळंबून बाजूला ठेवल्या जातात. तरीही त्या गाड्या चालू राहतात, वेळेवर सुटतात. प्रवासी तक्रार करतात पण रेल्वे प्रशासनाला ते ‘नॉर्मल’ वाटते. मग दिवा स्टेशनवर एका पॅसेंजर गाडीमुळे एवढा गोंधळ का?

पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘समजूत’ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रवासी आता म्हणतात – “२० वर्षे चाललेल्या गाडीला अचानक ‘समस्या’ का? ट्रॅक ५-६ मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना अडथळा कसा? कल्याणात मर्जिंग होऊनही लोकल चालतात, मग दिव्यात काय वेगळे आहे?”

मनसेचा अप्रत्यक्ष पण स्पष्ट संदेश

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने रेल्वे प्रशासनाकडे प्रतिनिधी पाठवून तातडीने गाडी पूर्ववत दादरपर्यंत सुरू करण्याची मागणी केली. रेल्वेने लोकल विलंबाचे कारण सांगत गाडी बंद/मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी मनसे म्हणते – कोकणवासीयांच्या सोयीसाठी ही गाडी आवश्यक आहे, आणि तिच्या जागी उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या प्राधान्य देणे हे मराठी माणसावर अन्याय आहे.

मागील २० वर्षे ही गाडी चालू होती, तेव्हा लोकलना एवढी अडचण नव्हती. आता अचानक “लोकल विलंब” म्हणून तिला लक्ष्य करणे हे रेल्वेचे तर्कशास्त्र मनसेला मान्य नाही. दिवा स्टेशनवर ५-६ ट्रॅक मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना कशी समस्या येते, हाही प्रश्न मनसेने केला आहे.

मनसेने सांगितले की, मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन आणि ट्रेन रोखण्याची कारवाई केली जाईल. हा इशारा रेल्वे आणि केंद्र सरकारला थेट आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकासाठी कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटरची मागणी

   Follow us on        

नवी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ व २ वर कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटर बसविण्याबाबत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) यांना बेलापूर येथे निवेदन सादर करण्यात आले.

“निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” फेसबुक ग्रुपच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, प्रवाशांच्या वाढत्या गैरसोयीचा मुद्दा यामध्ये मांडण्यात आला आहे. संगमेश्वर रोड हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई, गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक अत्यंत उपयुक्त ठरते.

मात्र, या स्थानकावर कोच पोजिशन दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना गाडी येण्यापूर्वी आपल्या आरक्षित डब्याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे गाडी थांबल्यानंतर प्रवाशांची धावपळ होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक वेळा योग्य डब्यापर्यंत वेळेत पोहोचता न आल्याने अपघाताचा धोका देखील निर्माण होत आहे.

इतर अनेक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असून संगमेश्वर रोड स्थानकावरही ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केली.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्यांना उन्हाळी हंगामासाठी मुदतवाढ

   Follow us on        

पनवेल: प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

०९०५७ सुरत–मंगळुरू जंक्शन विशेष (बुधवार, रविवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ दरम्यान धावणार आहे. तसेच ०९०५८ मंगळुरू जंक्शन–सुरत विशेष (गुरुवार, सोमवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते १ जून २०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे.

याशिवाय ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू जंक्शन विशेष (शुक्रवार) २७ मार्च २०२६ ते २९ मे २०२६ दरम्यान धावेल, तर ०९४२३ मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद विशेष (शनिवार) २८ मार्च २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या गाड्यांच्या थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, ०९०५७ या गाडीचे आरक्षण २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले आहे, तर ०९४२४ गाडीचे आरक्षण २६ मार्च २०२६ पासून उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in⁠� या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा RailOne/N TES अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

वैभववाडी – कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार; १०८ किमीच्या प्रकल्पाला गती मिळणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून माहिती समोर.

   Follow us on        

मुंबई, 25 मार्च 2026 : कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी दरम्यान 108 किमी लांबीच्या नव्या रेल्वे मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

डीपीआर तयार झाल्यानंतर आता या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि इतर संबंधित भागधारकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्यानंतर नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आदी संस्थांकडून आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विविध स्तरांवरील मंजुरी आणि मूल्यांकनांवर प्रकल्पाची अंतिम अंमलबजावणी अवलंबून असणार आहे.

सध्या कोल्हापूर स्थानकावरून 30 रेल्वेगाड्या धावतात, ज्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांशी थेट जोडणी उपलब्ध आहे. वंदे भारत, कोयना, महालक्ष्मी, हरिप्रिया आणि दीक्षाभूमी एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्या कोल्हापूरला सेवा देत आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जमीन अधिग्रहण, वनखात्याची मंजुरी, अतिक्रमण हटवणे, भौगोलिक परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि निधीची उपलब्धता हे महत्त्वाचे घटक ठरतात. तसेच मार्गावरील वाहतूक, कनेक्टिव्हिटी, सामाजिक-आर्थिक गरजा आणि राज्य व केंद्र सरकारांकडून होणारी मागणी यावरही प्रकल्पाच्या मंजुरीचा निर्णय घेतला जातो.

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! सुरत–मंगळुरू विशेष गाडीला नवीन वेळापत्रकासह कायमस्वरूपी एक्सप्रेसचा दर्जा

   Follow us on        

Konkan Railway: भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत 09057/09058 सुरत–मंगळुरू विशेष गाडीला आता कायमस्वरूपी “सुरत–मंगळुरू एक्सप्रेस” म्हणून नियमित करण्यास मंजुरी दिली आहे. 20 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, देशभरातील एकूण 10 जोड गाड्यांचे नियमितीकरण करण्यात येत असून त्यात या गाडीचा समावेश आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, 19057 सुरत–मंगळुरू एक्सप्रेस ही गाडी सुरत येथून बुधवारी आणि रविवारी सायंकाळी 7:35 वाजता सुटून मंगळुरू येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:45 वाजता पोहोचेल. तर 19058 मंगळुरू–सुरत एक्सप्रेस ही गाडी मंगळुरूहून गुरुवारी आणि सोमवारी रात्री 10:30 वाजता सुटून सुरत येथे मंगळवारी व शुक्रवारी रात्री 11:45 वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, भाटकल, उडुपी, सुरथकल आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तसेच महाराष्ट्र–कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून नियमित सेवा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

दादर – रत्नागिरी गाडी बंद होऊ देणार नाही; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दादर-रत्नागिरी प्रवासी गाडी बंद होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. केंद्रीय रेल्वेने या गाडीचा दादर स्टेशनवरील प्रस्थान स्लॉट रद्द करून तो दादर-गोरखपूर एक्सप्रेसला कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गाडी आता दिवा स्टेशनवरून सुरू होणार असल्याने कोकणातील दररोजच्या प्रवाशांना, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होणार होती.

या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (एमएनएस) आज, २४ मार्च २०२६ रोजी जोरदार विरोध प्रदर्शन केले. कोकणी माणसांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी १५ दिवसांत गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी बंद होऊ देणार नाही, असे सांगितले.

कोकण रेल्वे मार्गावरील ही प्रवासी गाडी स्थानिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देण्याच्या रेल्वेच्या धोरणामुळे स्थानिक सेवांवर परिणाम होत असल्याबाबत सातत्याने वाद उफाळून येत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली असून, जर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलने तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

”दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह कोविड काळात बंद झालेल्या गाड्या सुरू करा अन्यथा…” मनसेचा रेल्वे प्रशासनाला इशारा

   Follow us on        

मुंबई: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्र. ५०१०३/४) रद्द करून त्याऐवजी दादर-गोरखपूर गाडी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाचा विरोध केला आणि मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

​स्थानिक प्रवाशांच्या अडचणींकडे दुर्लक्ष

​नितीन सरदेसाई यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. कोविड काळात बंद झालेल्या मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस आणि पुणे-भुसावळ पॅसेंजर यांसारख्या अनेक गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अशातच आता दादर-रत्नागिरी ही कोकणवासीयांची हक्काची गाडी रद्द करून त्याऐवजी गोरखपूर गाडी सुरू करणे, हा कोकणवासीयांवर अन्याय आहे.

​प्रमुख मागण्या आणि इशारा:

​दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादर स्थानकावरूनच सोडण्यात यावी.

​कोविड काळात रद्द करण्यात आलेल्या महाराष्ट्रांतर्गत गाड्या पुन्हा त्वरित सुरू कराव्यात.

​स्थानिक प्रवाशांना डावलून परराज्यातील प्रवाशांना झुकते माप देणे रेल्वेने थांबवावे.

​”कोकणवासीयांना आणि महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा दुजाभाव रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. रेल्वेने या निर्णयाची तात्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा सज्जड दम नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.

​या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री (नवी दिल्ली) आणि कोकण रेल्वेचे व्यवस्थापक (बेलापूर) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कोकणवासीय आणि मुंबईकर प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, आता रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search