Category Archives: कोकण रेल्वे

तिरुवनंतपुरम – मदार जंक्शन विशेष एक्सप्रेस शनिवारपासून संगमेश्वर स्थानकावर थांबणार

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने संगमेश्वर रोड स्थानकावर तिरुवनंतपुरम मदार विशेष जादा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २ मे २०२६ पासून ६ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

​गाडी क्र. ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर बुधवारी तिरुवनंतपुरमवरून सुटते) दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर पोहोचेल आणि ०८:१८ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या गाडीला ६ मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा थांबा मिळेल.

​तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०६०१४ मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर शनिवारी मदार जंक्शनवरून सुटते) दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर येईल आणि २३:१२ वाजता मार्गस्थ होईल. या गाडीला २ मे २०२६ ते ६ जून २०२६ या कालावधीत हा जादा थांबा देण्यात आला आहे.

​कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दोन विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

पहिली विशेष गाडी क्रमांक ०११०४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मडगाव येथून सुटणार असून त्याच दिवशी रात्री १०:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. परतीची गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दुसरी विशेष गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मडगाव येथून सुटणार असून पुढील दिवशी सकाळी ६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी सोमवार, ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दोन्ही विशेष गाड्यांमध्ये एकूण २१ डबे असणार असून त्यामध्ये एसी थ्री टियरचा १ डबा, स्लीपरचे ११ डबे, सामान्य श्रेणीचे ७ डबे आणि एसएलआरचे २ डबे असतील. या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस आता कायमस्वरूपी धावणार

   Follow us on        

नागपूर:विदर्भ आणि कोकणला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूर-मडगाव-नागपूर या मार्गावर धावणारी विशेष रेल्वे (०११३९/०११४०) आता रेल्वे बोर्डाने नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आता ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस या नवीन क्रमांकाने धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि दिवस:

ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे:

​१. गाडी क्र. ११२०३ (नागपूर ते मडगाव): ही गाडी दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता नागपूरहून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि सायंकाळी १७:४५ वाजता मडगावला पोहोचेल.

​२. गाडी क्र. ११२०४ (मडगाव ते नागपूर): ही गाडी मडगावहून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री २०:०० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५:१५ वाजता रोहा येथे येईल आणि रात्री २१:३० वाजता नागपूरला पोहोचेल.

प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाडीला महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:

​वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.

​गाडीची संरचना:

ही गाडी एकूण २४ डब्यांची (ICF कोच) असेल. यामध्ये जनरल ५ डबे, स्लीपर ११ डबे, ३-टियर एसी ५ डबे, २-टियर एसी १ डबा आणि २ गार्ड/लगेज डबे असतील.

या गाडीची प्राथमिक देखभाल नागपूर येथे केली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ आणि पनवेल येथे गाडीत पाणी भरण्याची सोय केली जाईल. रेल्वे बोर्डाचे संचालक (कोचिंग) संजय आर. नीलम यांनी या संदर्भात आदेश जारी केले असून, ही सेवा लवकरच अधिकृत तारखेसह नियमितपणे सुरू केली जाणार आहे.

ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष रेल्वे म्हणून धावताना या गाडीचे तिकीट दर जास्त होते, मात्र आता नियमित एक्स्प्रेस झाल्यामुळे तिकीट दरात कपात होणार आहे. तसेच, या गाडीला आता कायमस्वरूपी वेळापत्रक मिळाल्याने ही गाडी अधिक वेळेवर धावण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि निश्चित वेळेत पूर्ण होईल.

 

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी आणि शुक्रवारी ट्रॅफिक ब्लॉक

   Follow us on        

बेलापूर:कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या (भुयारी मार्ग) बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक ३० एप्रिल २०२६ आणि १ मे २०२६ (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही गाड्यांच्या धावण्याच्या वेळेवर परिणाम होणार असून, प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल खालीलप्रमाणे:

​गाडी क्र. २२६२९ दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस: ही साप्ताहिक गाडी ३० एप्रिल रोजी नांदगाव रोड स्थानकावर १० मिनिटे थांबवून (Regulated) पुढे सोडली जाईल.

​गाडी क्र. १२२०२ तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) एक्सप्रेस: ही गाडी ३० एप्रिल ते १ मे दरम्यान मडगाव जंक्शन ते नांदगाव रोड या पट्ट्यात ६० मिनिटे (१ तास) थांबवून चालवण्यात येईल.

​या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या विलंबाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे अधिकृत ॲप डाऊनलोड करावे किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Railway Updates: जनशताब्दी,शताब्दी एक्सप्रेस गाड्यांची आसन व्यवस्था बदलणार

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांच्या व्यापक आधुनिकीकरणासाठी मोठा उपक्रम हाती घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेसमध्ये केलेल्या सुधारणा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना विद्यमान डब्यांची तपासणी करून त्रुटी ओळखण्याचे आणि ठराविक कालावधीत आवश्यक सुधारणा पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रवाशांच्या आरामात वाढ करणे हा आहे. जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांमध्ये सध्या असलेली आसनव्यवस्था प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. खास करून सेकंड सीटींग डब्याची आसने जी तीन प्रवाशांसाठी आहेत ती खूप छोटी आहेत. या आसनावर तीन प्रवासी नीट बसू शकत नाही. यावर उपाय म्हणुन आता नव्या कुशनसह आसनव्यवस्था बनवली जाणार आहे. तसेच शौचालयांची सुधारित रचना व उत्तम ड्रेनेज व्यवस्था, तसेच मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि स्नॅक टेबल्समध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान होणारे धक्के कमी करण्यासाठी तांत्रिक बदल केले जाणार असून त्यामुळे प्रवास अधिक सुरळीत होईल. याशिवाय डब्यांचे आतील भाग, फ्लोअरिंग, पॅनेल्स आणि व्हेस्टिब्युल क्षेत्रांचे नूतनीकरण करून टिकाऊपणा व आकर्षकता वाढवली जाईल.

सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून प्रवासी घोषणा व माहिती प्रणाली (PAPIS) अधिक स्पष्ट आणि विश्वासार्ह केली जाईल. डब्यांतील प्रकाशयोजना सुधारली जाईल तसेच बाहेरील गंतव्य फलक अधिक स्पष्ट करण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

सध्या देशभरात सुमारे २५ जोड्या शताब्दी एक्सप्रेस आणि २० हून अधिक जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या विविध शहरांना जोडतात. या सुधारणा उपक्रमामुळे लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा लक्षणीयरीत्या उंचावेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच, वाढत्या प्रवासी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी भारतीय रेल्वेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

सीएसएमटी स्थानकावर फलाट विस्तारीकरणाचे काम; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई : मुंबई सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ च्या विस्तारकामामुळे काही गाड्यांचे अंतिम थांबे तात्पुरते बदलण्यात आले असून ही मुदत आता २७ एप्रिल २०२६ ते १९ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना काही दिवस पर्यायी व्यवस्था लक्षात घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

या निर्णयानुसार मडगाव जंक्शन–मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस (गाडी क्र. २२१२०) ही २६ एप्रिल ते १७ मे २०२६ दरम्यान दादर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट होणार आहे. तसेच मंगळुरू जंक्शन–मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३४) ही २६ एप्रिल ते १८ मे २०२६ या कालावधीत ठाणे स्थानकावरच प्रवास समाप्त करणार आहे.

या बदलांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमेश्वर स्थानकावर ५ गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता

   Follow us on        

संगमेश्वर:कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणि विशेषतः संगमेश्वरवासीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संतोष कुमार झा यांनी संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून ही बैठक पार पडली असून, यावेळी संगमेश्वरसाठी ५ महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

​या बैठकीत प्रामुख्याने ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती, ज्यापैकी ५ गाड्यांबाबत लवकरच अनुकूल निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम स्पेशल गाडीला देखील संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. गाड्यांच्या थांब्यासोबतच प्रवाशांच्या तांत्रिक सोयीसाठी स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर ‘डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर’ बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आपला डबा नेमका कुठे येईल, याची अचूक माहिती मिळणे सोपे होणार आहे.

​केवळ स्थानकाचा विकासच नव्हे, तर प्रवासातील शिस्त आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी स्थानकावर दररोज तिकीट तपासनीस (TC) नेमण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, पद्मश्री गजानन माने यांनी मांडलेल्या कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याच्या मागणीला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मांडवी एक्सप्रेसला दिवा स्थानकावर थांबा देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीला श्री. गंगाराम टोपरे, श्री. मुकुंद सनगरे आणि ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे

३५ संघटना आणि २ आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत दादरमध्ये ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ मोठ्या उत्साहात संपन्न

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ हे महत्त्वपूर्ण ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन केले.

परिषदेतील प्रमुख घडामोडी आणि चर्चा:

चतुःसूत्रीवर आधारित थेट संवाद 

संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या सूत्रांवर आधारित या परिषदेत प्रामुख्याने मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातील रेल्वे प्रवासातील तांत्रिक अडचणी, गाड्यांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 एकजुटीचा निर्धार

रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार यावेळी करण्यात आला.

परिषदेत प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

बंद गाड्या तातडीने पूर्ववत करणे:

कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसह इतर ३० गाड्या त्वरित पूर्ववत कराव्यात. नांदेड व हरंगुळ (लातूर) एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत वाढवणे, आदी.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे:

कोकणासाठी प्रस्तावित सावंतवाडी येथील स्वतंत्र टर्मिनस सुविधा गेली १० वर्षे रखडले, ते प्राधान्याने मार्गी लावावे.

तातडीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे तसेच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे.

नव्या मार्गांना प्राधान्य:

सावंतवाडी-बेळगाव, छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव, मानवत रोड – परळी आणि जालना-जळगाव यांसारख्या रेल्वे मार्गांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

प्रवासी सुरक्षा आणि सुविधा:

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात याव्यात.

तांत्रिक मागण्यांचा पाठपुरावा 

रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तांत्रिक मागण्यांचा त्वरित पाठपुरावा करून त्या मार्गी लावाव्यात.

मान्यवरांची उपस्थिती आणि फलश्रुती

या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागांतून रेल्वे प्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादर येथील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीवर अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक प्रबळ व्यासपीठ मिळाले असून, आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून या रास्त मागण्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

सदर परिषदेला माजी खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोघांनीही वरील सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे. तसेच. श्री. अरविंद सावंत यांनी दादर रत्नागिरी, मुंबई सावंतवाडी, मुंबई पंढरपूर, नांदेड पुणे या गाड्यांसाठी मध्य रेल्वेला १० दिवसांची मुदत दिली असून ३ मे नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याचा पुनरुच्चार केला.

सदर परिषदेला कोंकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ, मराठा ऑर्गनायझेशन, कोकण कृती समूह, जल फाउंडेशन, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी, वैभववाडी तालुका विकास मंच, रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर, गडगडी धरण कृती समिती, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, रत्नागिरी सुवर्णदुर्ग विकास परिषद, राजापूर तालुका शेतकरी, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती परभणी, रेल्वे प्रवासी मित्रमंडळ बदलापूर, सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेल, आधार इंडिया, मराठी अभ्यास केंद्र, निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर, महाराष्ट्र राज्य प्रवासी प्रकोष्ठ, रेल्वे विकास समिती, गौरी गणपती उत्सव ठाणे, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ ठाणे, नाना शंकरशेठ संघर्ष समिती, रेल्वे प्रवासी सेल बार्शी, कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघ, शहीद अशोक कामटे बहुद्देशीय संस्था सांगोला, हिंद मजदूर किसान पंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे, श्री समर्थ शक्ती प्रतिष्ठान या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Mumbai Goa Highway: मुंबई -गोवा महामार्गाच्या कामात आता कोकण रेल्वेचा ‘अडथळा’

   Follow us on        

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाचे काम कोकण रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा रखडले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ३१ मेची डेडलाईन पूर्ण होणे आता कठीण दिसत आहे. विशेषतः माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामात कोकण रेल्वेचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी हा मार्ग पूर्ण होण्याच्या आशेवर असलेल्या कोकणवासीयांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाच्या कामासाठी आतापर्यंत तीन ठेकेदार बदलण्यात आले आहेत. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, तांत्रिक पेच सुटत नसल्याने प्रगती खुंटली आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुले होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामात विजेचे खांब आडवे येत असल्याने या भागातील काम पूर्णपणे थांबले आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. या भेटीनंतर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत एक संयुक्त बैठकही पार पडली. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटवण्यास मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात या कामात मोठी चालढकल होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा हा प्रकल्प आता थट्टेचा विषय बनला आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे आणि २०१४ पासून सुरू असलेल्या इंदापूर ते झारप या दुसऱ्या टप्प्याचे काम तब्बल १४ वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. या विलंबाबद्दल कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून वारंवार तारखा दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काम पूर्ण होताना दिसत नाही.

सध्या नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांचे बांधकामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे, ज्यामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक, नोकरदार आणि पर्यटकांना बसत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना जर हे बायपास आणि उड्डाणपूल खुले झाले नाहीत, तर प्रवाशांना पुन्हा एकदा खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या भीषण संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर १ मे पासून धावणार ‘विशेष मेमू’; अपुरे डबे व आरंभ स्थानकावरून प्रवासी नाराज

   Follow us on        

चिपळूण:कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण दरम्यान ‘अनारक्षित विशेष मेमू’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उपलब्ध असणार आहे. सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाडी क्र. ०११५९ (दिवा ते चिपळूण):

दिवा स्थानकावरून ही गाडी रात्री २३:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता चिपळूणला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११६० (चिपळूण ते दिवा):

परतीच्या प्रवासासाठी चिपळूण येथून ही गाडी दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच रात्री २३:१० वाजता दिवा स्थानकावर पोहोचेल.

या गाडीचे थांबे: निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी

​ही गाडी पूर्णपणे ‘अनारक्षित’ असल्याने प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची गरज भासणार नाही, ज्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. तरी प्रवाशांनी या विशेष मेमू गाडीच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे प्रवाशांची नाराजी 

मात्र गाडीच्या डब्यांची संख्या आणि सुरुवातीचे स्थानक यावरून रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली जात आहे.

​”ही प्रवाशांची चेष्टा आहे” – अक्षय महापदी

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’चे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, “मुंबई-कल्याण मार्गावर १५ डब्यांच्या लोकल्स अपुऱ्या पडत असताना, एवढ्या लांब पल्ल्याच्या मार्गावर ही ८ डब्यांची खेळण्यातली गाडी नक्की कोणासाठी सोडली आहे? ८ डब्यांची मेमू सोडून प्रशासनाने कोकणी प्रवाशांची क्रूर चेष्टा केली आहे.”

​दिवा स्थानकावरून गाडी सोडण्यास विरोध

प्रवाशांनी केवळ डब्यांच्या संख्येवरच नाही, तर गाडी सुटण्याच्या ठिकाणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईतील बहुतांश प्रवाशांना दिवा स्थानक सोयीचे नाही, ही बाब वारंवार निदर्शनास आणून देऊनही रेल्वे प्रशासन मुद्दाम दिव्यातून गाड्या सोडून प्रवाशांना डिवचत आहे का, असा संतप्त सवाल महापदी यांनी उपस्थित केला आहे.

सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची गर्दी प्रचंड असते. अशा वेळी ८ डब्यांची गाडी म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशी अवस्था असून, या गाडीला डबे वाढवून मिळावेत आणि ती मुंबईतील मुख्य स्थानकावरून सोडावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search