Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! होळीसाठी विशेष गाडीला मुदतवाढ; वेळापत्रकातही बदल

   Follow us on        

Konkan Railway: होळी आणि शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल गाडीच्या फेऱ्या मार्चअखेरपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, १ मार्च २०२६ पासून या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

​गाडी क्र. ०९०५७ दिनांक २५/०२/२०२६ ते २९/०३/२०२६ पर्यंत आणि  ​गाडी क्र. ०९०५८ दिनांक २६/०२/२०२६ ते ३०/०३/२०२६ पर्यंत या गाडीचा विस्तार करण्यात येणार आहे. विस्तारित कालावधीत दोन्ही दिशांनी मिळून एकूण १८ फेऱ्या (९ येण्याच्या आणि ९ जाण्याच्या) चालवल्या जाणार आहेत.

गाडीची नवीन वेळ (१ मार्च २०२६ पासून प्रभावी)

​ही गाडी दिनांक १ मार्च २०२६ पासून सुधारित वेळापत्रकावर चालविण्यात येणार आहे.

गाडी क्र. ०९०५७ (सुरत – मंगळुरू जंक्शन): ही गाडी सुरत येथून दर बुधवारी आणि रविवारी रात्री १९:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

​गाडी क्र. ०९०५८ (मंगळुरू जंक्शन – सुरत): ही गाडी मंगळुरू जंक्शन येथून दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरतला पोहोचेल.

​या प्रवासात गाडी खालील स्थानकांवर थांबेल:

​१. उधना जंक्शन | २. वलसाड | ३. वापी | ४. पालघर | ५. वसई रोड | ६. भिवंडी रोड | ७. पनवेल | ८. पेण | ९. रोहा | १०. माणगाव | ११. खेड | १२. चिपळूण | १३. सावर्डे | १४. संगमेश्वर रोड | १५. रत्नागिरी | १६. राजापूर रोड | १७. वैभववाडी रोड | १८. कणकवली | १९. सिंधुदुर्ग | २०. कुडाळ | २१. सावंतवाडी  | २२. थिवि | २३. करमळी | २४. मडगाव जंक्शन | २५. काणकोण | २६. कारवार | २७. अंकोला | २८. गोकर्ण रोड | २९. कुमटा | ३०. मुरुडेश्वर | ३१. भटकळ | ३२. मुकांबिका रोड बिंदूर | ३३. कुंदापुरा | ३४. उडुपी | ३५. मुल्की | ३६. सुरथकल.

Konkan Railway: मध्यरेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी होळी विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: होळी आणि शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणासुदीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल

​गाडी क्र. ०१११९: ही गाडी २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी LTT वरून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११२०: ही गाडी २७ फेब्रुवारी आणि ६ मार्च २०२६ रोजीसावंतवाडीवरून सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०५ वाजता LTT ला पोहोचेल.

​थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

​डब्यांची रचना (Coach Composition):१ एसी फर्स्ट क्लास + ३ एसी २-टायर + ७ एसी ३-टायर + ८ स्लीपर क्लास. (एकूण १९ डबे)

​२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल

​गाडी क्र. ०११७१: ही गाडी २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी CSMT वरून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि दुपारी १२:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११७२: ही गाडी दिनांक २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी सावंतवाडीवरून सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता CSMT ला पोहोचेल.

​थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

​डब्यांची रचना (Coach Composition):१ एसी २-टायर + ६ एसी ३-टायर + ९ स्लीपर क्लास + ४ जनरल डबे + २ एसएलआरडी. (एकूण २२ डबे)

​प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आरक्षणासंदर्भातील अधिक माहितीसाठी प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

कोकण मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसच्या क्षमतेत वाढ; तब्बल ६ कोच वाढवले!

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा ओघ प्रचंड असतो, मात्र अनेक गाड्या कमी डब्यांच्या (उदा. १६ किंवा १८ डबे) चालवल्या जात होत्या. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना आरक्षण मिळणे अशक्य व्हायचे. मात्र कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तिरुनेलवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)  (२२६३० / २२६२९) एक्सप्रेसच्या प्रवाशांना कोकण रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. या गाडीची क्षमता आता १६ डब्यांवरून २२ डब्यांपर्यंत वाढवण्यात आली असून, दक्षिण रेल्वेने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.

नवीन डब्यांची रचना (Coach Composition):

डब्याचा प्रकार पूर्वीची स्थिती (Existing)
आताची सुधारित स्थिती (Revised)
एसी २ टायर (2 Tier AC) ०१ डबा ०२ डबे
एसी ३ टायर (3 Tier AC) ०२ डबे ०६ डबे
एसी ३ टायर इकॉनॉमी (3E) ०१ डबा
०१ डबा (बदल नाही)
स्लीपर क्लास (Sleeper) ०६ डबे ०७ डबे
जनरल क्लास (General) ०४ डबे
०४ डबे (बदल नाही)
जनरेटर कार / एसएलआर ०२ डबे
०२ डबे (बदल नाही)
एकूण डबे (Total Coaches) १६ एलएचबी (LHB)
२२ एलएचबी (LHB)

 

बदल कधीपासून लागू होणार?

  • गाडी क्र. २२६३० (तिरुनेलवेली येथून): १५ एप्रिल २०२६ पासून.

  • गाडी क्र. २२६२९ (लोकमान्य टिळक टर्मिनस येथून): १६ एप्रिल २०२६ पासून.

या निर्णयामुळे तिरुनेलवेली – एलटीटी एक्सप्रेसच्या प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. रेल्वेने केलेल्या बदलांनुसार, एसी ३ टायरच्या डब्यांमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली असून, त्यांची संख्या आता २ वरून थेट ६ करण्यात आली आहे. तसेच, एसी २ टायरची संख्या १ वरून २ करण्यात आली असून, स्लीपर क्लासचा १ डबा वाढवून आता एकूण ७ स्लीपर डबे या गाडीला जोडले जातील. अशा प्रकारे या ट्रेनमध्ये एकूण ६ नवीन डबे कायमस्वरूपी वाढवण्यात आले आहेत. डब्यांच्या या लक्षणीय वाढीमुळे विशेषतः उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी होण्यास आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे.

कोकण विकास समितीचा पाठपुरावा:

कोकण विकास समितीचा पाठपुरावा: काही काळापूर्वी या गाडीचे टर्मिनल दादरवरून लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे हलवण्यात आले होते. दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या मर्यादेमुळे या गाडीला जास्त डबे जोडण्यात अडचणी येत होत्या. टर्मिनल बदलल्यामुळे हा तांत्रिक अडथळा दूर झाला होता. याच संधीचा फायदा घेत कोकण विकास समितीने ही गाडी २२ डब्यांची करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. समितीच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

सावधान! ईथे फसवणूक होण्याची शक्यता; कोकण रेल्वे प्रशासनाचे दक्षतेचे आवाहन

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. काही अनधिकृत व्यक्ती आणि एजंट रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे खोटे आश्वासन देऊन नोकरी इच्छुकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे की, त्यांनी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला नोकरी देण्यासाठी किंवा त्याबदल्यात पैसे गोळा करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. रेल्वेतील सर्व भरती प्रक्रिया ही केवळ अधिकृत नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीनेच राबवली जाते. कोणत्याही मध्यस्थाचा या प्रक्रियेशी संबंध नसून अशा दाव्यांना बळी पडू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

 

नोकरी संदर्भातील सर्व अधिकृत माहिती आणि अपडेट्ससाठी केवळ konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची तातडीने तक्रार करावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये सापडली बेवारस बॅग! रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा एका प्रवाशाचे मौल्यवान सामान सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले आहे.

दिनांक ०९.०२.२०२६ रोजी, गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये नियमित तिकीट तपासणी सुरू असताना, B1 कोचमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना एक बेवारस बॅग आढळून आली. बराच वेळ या बॅगवर कोणीही दावा न केल्याने, सुरक्षा नियमांचे पालन करून ही बॅग तातडीने ताब्यात घेण्यात आली.

​बॅगमध्ये असलेले साहित्य:

ही बॅग पुढील कार्यवाहीसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF) सोपवण्यात आली आहे. तपासणी दरम्यान बॅगेमध्ये खालील वस्तू आढळून आल्या आहेत:

​रोख रक्कम: एकूण ४,९३३ रुपये.

​कागदपत्रे: आधार कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रे.

​इतर वस्तू: पॉकेट (Wallet), चाव्या, चार्जर, डेटा केबल आणि इअरफोन्स.

​प्रवाशांना आवाहन:

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना आपल्या सामानाची काळजी घ्यावी. तसेच, गाडीत किंवा स्थानक परिसरात कोणतीही संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित रेल्वे कर्मचाऱ्यांना कळवावे, जेणेकरून रेल्वे प्रवास सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.

Konkan Railway: भाविकांचा प्रवास सुखाचा होणार! आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वे कडून अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        

मडगाव: आंगणेवाडी यात्रा २०२६ दरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. यात्रेकरू व चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव–लोकमान्य टिळक (टी) विशेष

ही गाडी बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी)–मडगाव विशेष

ही गाडी गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

या विशेष गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना:

एकूण २२ डबे

– स्लीपर: २०

– एसएलआर: ०२

या विशेष गाडीमुळे आंगणेवाडी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसह कोकण-मुंबई मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासाठी ‘नियम ३७७’ चे अस्त्र! खासदार वायकरांचा लोकसभेत पाठपुरावा

   Follow us on        

नवी दिल्ली: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत ‘नियम ३७७’ अंतर्गत ही महत्त्वाची मागणी लावून धरली असून, या प्रक्रियेला गती देण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. १९९० च्या दशकात स्थापन झालेली कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वे आणि संबंधित राज्यांचा संयुक्त उपक्रम होता. मूळ करारानुसार, १० वर्षांच्या आत या संस्थेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे अपेक्षित होते, मात्र तीन दशके उलटूनही ही प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने कोकण रेल्वेच्या विकासाला खीळ बसत असल्याचे वायकर यांनी निदर्शनास आणून दिले.

​खासदार वायकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोकण रेल्वे आपल्या क्षमतेच्या १७५% पेक्षा जास्त वापर करत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या एक वेगळे कॉर्पोरेशन असल्याने, इतर रेल्वे झोनप्रमाणे कोकण रेल्वेला केंद्राकडून थेट ‘अर्थसंकल्पीय साहाय्य’ मिळत नाही. निधीच्या प्रचंड टंचाईमुळे सुमारे ३५० किमी मार्गाचे दुहेरीकरण (Doubling) आणि भूस्खलन रोखण्यासारखी महत्त्वाची सुरक्षा कामे रखडली आहेत. पुरेशा पायाभूत सुविधांअभावी या मार्गावर नवीन गाड्या सुरू करणेही आता अशक्य झाले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

​विलीनीकरणाच्या प्रक्रियेत राज्यांच्या सहमतीचा मुद्दाही आता मार्गी लागला आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या विलीनीकरणाला अधिकृत मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने केवळ एकच अट घातली आहे की, विलीनीकरणानंतरही या ऐतिहासिक ब्रँडचे नाव ‘कोकण रेल्वे’ असेच कायम ठेवण्यात यावे, ज्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. सर्व संबंधित राज्यांची संमती मिळाल्यामुळे आता विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

​शेवटी, केंद्र सरकारने ही विलीनीकरण प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी रवींद्र वायकर यांनी केली आहे. विलीनीकरण झाल्यास कोकण रेल्वेला आवश्यक तो निधी उपलब्ध होईल, ज्यामुळे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होऊन कोकणच्या विकासाला नवी गती मिळेल. कोकण रेल्वे हा या भागाचा कणा असून, या प्रदेशातील जनतेचा हा हक्क असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.

नियम ३७७ काय आहे? 

लोकसभेतील नियम ३७७ हा खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील किंवा देशपातळीवरील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वापरता येणारा नियम आहे. या नियमांतर्गत खासदार सभागृहात तोंडी चर्चा न करता लिखित स्वरूपात निवेदन सादर करतो. या निवेदनावर कोणतीही चर्चा होत नाही तसेच संबंधित मंत्र्यांना तात्काळ उत्तर देणे बंधनकारक नसते. मात्र, हा विषय लोकसभेच्या अधिकृत नोंदीत समाविष्ट होतो आणि संबंधित मंत्रालय किंवा विभागाच्या लक्षात अधिकृतपणे आणला जातो. रेल्वे, रस्ते, पाणीपुरवठा, नैसर्गिक आपत्ती, विकासकामे रखडणे, स्थानिक समस्या अशा अनेक विषयांसाठी नियम ३७७ चा वापर केला जातो. त्यामुळे हा नियम थेट निर्णयासाठी नसला, तरी सरकारवर लक्ष केंद्रित करून पुढील कारवाईसाठी दबाव निर्माण करणारा महत्त्वाचा संसदीय उपाय मानला जातो.

कोकण रेल्वे मार्गावर आज धावणार अनारक्षित मेमू गाड्या

   Follow us on        

रत्नागिरी/सावंतवाडी, दि. १० फेब्रुवारी २०२६ :

निवडणूकीहून परतणाऱ्या चाकरमान्यांना तसेच कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी गेलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष अनारक्षित मेमू (MEMU) गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या अंतर्गत सावंतवाडी रोड–पनवेल आणि पनवेल–रत्नागिरी दरम्यान विशेष TOD (Train on Demand) मेमू सेवा सुरू करण्यात आली आहे. या गाड्या मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी चालवण्यात येणार असून प्रवाशांना रात्री व दिवसा प्रवासाची अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे.

सावंतवाडी रोड–पनवेल विशेष मेमू (गाडी क्र. 01158)

ही गाडी सकाळी ०९.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून झारप, कुदाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, कोलाड, रोहा व पेन मार्गे रात्री ०८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे.

पनवेल–रत्नागिरी विशेष मेमू (गाडी क्र. 01157)

ही गाडी रात्री ०८.२५ वाजता पनवेल येथून सुटून पेन, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विंहेरे, दिवानखवटी, कलंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सवर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबे घेत बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ०४.०० वाजता रत्नागिरी येथे दाखल होणार आहे.

या विशेष मेमू गाड्या अनारक्षित असून मोठ्या प्रमाणावर होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले कर्मचारी, मुंबई–पनवेल परिसरातील चाकरमानी तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी गेलेले भाविक यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचेही सांगितले आहे.

Konkan Railway: वंदे भारत एक्स्प्रेसची गुरांना धडक; कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प

   Follow us on        

सिंधुदुर्ग | दि. ९ : कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची अचानक रुळावर आलेल्या बैल आणि म्हशींना धडक बसली. या अपघातात काही गुरे मृत्युमुखी पडली. धडकेमुळे रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा खांब वाकला आणि वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी कुडाळ–मडगाव दिशेची सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली.

अपघातानंतर वंदे भारत एक्स्प्रेस जागीच थांबवण्यात आली. विद्युत वाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने डिझेल इंजिन लावून गाडी घटनास्थळावरून हलवली. सुमारे दुपारी २ वाजता वंदे भारत एक्स्प्रेस घटनास्थळावरून रवाना करण्यात आली. त्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प झाली होती. कुडाळ स्थानकात मांडवी एक्स्प्रेस, उदना एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, तर झाराप स्थानकात राजधानी एक्स्प्रेस थांबवण्यात आली. सावंतवाडीत दूरांतो एक्स्प्रेस, मडुरा स्थानकात मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि कणकवलीत मंगला एक्स्प्रेसही थांबवून ठेवण्यात आल्या.

वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज आंगणेवाडी जत्रेसाठी प्रवास करणाऱ्या भाविकांचा परतीचा प्रवासही काही काळ लांबला. अखेर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

आता सबब नको! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या ‘त्या’ गाडीच्या डब्यांत वाढ करण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने ‘गाडी क्रमांक २२६२९/२२६३० तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस’चे टर्मिनल बदलून ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कोकण विकास समितीने स्वागत केले असून, आता ही गाडी २२ किंवा २४ डब्यांची (LHB कोच) करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.

​१५ एप्रिल २०२६ पासून तिरुनेलवेली येथून आणि १६ एप्रिल २०२६ पासून मुंबईतून सुटणारी ही गाडी दादरऐवजी एलटीटीवरून धावेल. दादर स्थानकातील तांत्रिक अडचणींमुळे या गाडीचे डबे वाढवता येत नव्हते त्यामुळे ती १६ डब्यांसह चालविण्यात येत असे, आता तो अडथळा आता दूर झाला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मार्गावर प्रवाशांची सतत मोठी गर्दी आणि प्रतीक्षा यादी असते, त्यामुळे डब्यांची संख्या वाढवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रेल्वेची क्षमता अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे

तसेच ही डबेवाढ वेळेबद्ध पद्धतीने अंमलात आणून प्रवाशांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानत, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या गरजांकडे भविष्यातही सकारात्मक लक्ष दिले जाईल, अशी आशा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search