सिंधुदुर्गनगरी:
कोकण रेल्वे महामंडळाने १४ तारखेला प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार १३२ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत २२ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मुलाखतींचे केंद्र थेट आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे निश्चित करण्यात आले आहे. मुलाखतींचे केंद्र राज्याबाहेर ठेवण्यात आल्यामुळे कोकणातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, मुलाखती महाराष्ट्राबाहेर न घेता त्या रत्नागिरी येथे आयोजित करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी ‘कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघर्ष समितीने’ केली आहे. या संदर्भात समितीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना एक निवेदनही सुपूर्द करण्यात आले आहे.
समितीने आपल्या निवेदनात स्थानिक उमेदवारांच्या व्यथा मांडल्या आहेत. कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये यापूर्वीही स्थानिक उमेदवारांवर सतत अन्याय झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. कोकणातील अनेक स्थानिक युवकांनी परीक्षा देऊनही त्यांना योग्य संधी मिळाली नाही, उलट परप्रांतीय उमेदवारांना जाणीवपूर्वक प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी या मुलाखती विशाखापट्टणमऐवजी तात्काळ रत्नागिरीत वर्ग कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
















