Category Archives: कोकण रेल्वे

पर्यायी रस्ता नसल्याने रुळांवरून चालताना एक्सप्रेसची धडक; नाधवडे येथील तरुणाचा जागीच मृत्यू

   Follow us on        

वैभववाडी:रेल्वेची जोरदार धडक बसल्याने नाधवडे-हेलकरवाडी येथील अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६) या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भीषण घटना सकाळी साडेआठच्या सुमारास शुकनदी पुलाजवळ घडली. अमोल खांडेकर हे मुंबईतील चिंचपाडा परिसरात आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह राहत होते आणि एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ते आपल्या मालकीच्या जमिनीत काजू लागवडीची पूर्वतयारी करण्यासाठी गावी आले होते.

रविवारी सकाळी ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरले आणि तिथून पायीच घराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शुकनदी पुलाजवळ पोहोचताच गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या निस्सार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संबंधित एक्सप्रेस सुमारे तासभर घटनास्थळी थांबवण्यात आली होती, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

​लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच अपघात; ग्रामस्थांचा आरोप

​या भीषण अपघातानंतर हेलकरवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या वाडीत जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. रस्त्याअभावी येथील लोकांना जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून किंवा पुलावरूनच ये-जा करावी लागते आणि याच मुख्य कारणामुळे हा भीषण अपघात घडला आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे हक्काच्या पर्यायी रस्त्यासाठी वारंवार तक्रारी व मागण्या करण्यात आल्या आहेत, मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या याच उदासीनतेमुळे आज एका निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

​पोलिसांकडून तपास सुरू

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी वैभववाडी पोलिसांना तात्काळ कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनलवलकर, पोलीस हवालदार धनाजी धडे व उद्धव साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अपघाताची माहिती मिळताच अमोल खांडेकर यांचे मुंबईतील नातेवाईक गावी रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक जाण्याने हेलकरवाडी परिसरात आणि खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातून पर्यायी रस्त्याची मागणी आता अधिक आक्रमकपणे केली जात आहे.

Konkankanya Express: ‘सुपरफास्ट’ शुल्काच्या नावाखाली प्रवाशांची लूट!

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अत्यंत लाडकी आणि महत्त्वाची समजली जाणारी ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ (गाडी क्र. २०१११ / २०११२) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमालीची उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’चा दर्जा असलेल्या या गाडीकडून प्रवाशांकडून तिकिटासोबत जादा सुपरफास्ट शुल्क वसूल केले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही गाडी दररोज २ ते २.५ तास उशिराने धावत असल्याने, “रेल्वे प्रशासन सुपरफास्टच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लूट करत आहे का?” असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणारी ही गाडी प्रत्येक स्थानकावर वेळेचे उल्लंघन करत आहे. मुंबईकडे येणारी गाडी असो वा गोव्याकडे जाणारी, प्रवाशांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मडगावकडे जाणारी २०१११ कोकणकन्या एक्सप्रेस खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथे तब्बल २ ते २.५ तास उशिराने पोहोचली. रत्नागिरीत सकाळी ५:०० वाजता येणारी गाडी थेट ७:५४ वाजता पोहोचल्याने प्रवाशांचे हाल झाले. एवढेच नव्हे तर २१, २२ आणि २३ मे रोजी मडगावला पोहोचताना देखील या गाडीला २ तासांपेक्षा जास्त उशीर झाला होता.

​दुसरीकडे, मडगावहून मुंबईकडे येणाऱ्या २०११२ कोकणकन्या एक्सप्रेसची स्थितीही वेगळी नाही. २२ मे च्या प्रवासात ही गाडी पनवेल, ठाणे आणि दादर येथे तब्बल २ तास ४० मिनिटे उशिराने धावत होती. तर २३ मे रोजी सुटलेली गाडीही १ तास १० मिनिटे उशिराने धावत मुंबईला पोहोचली. कोकण रेल्वेच्या या सावळागोंधळामुळे प्रवाशांचे कामाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या गाडीला सुपरफास्ट वर्गात समाविष्ट करण्यात आले असले तरी ही गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याने प्रवाशी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘सुपरफास्ट’चे पैसे घ्यायचे आणि सेवा मात्र ‘पॅसेंजर’पेक्षाही संथ द्यायची, या रेल्वेच्या कारभारावर आता प्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतला असून, कोकण रेल्वे प्रशासनाने यावर तात्काळ सुधारीत पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! CSMT येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी रेल्वेचा १० दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंत मर्यादित

   Follow us on        

मुंबई:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने, अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या आगामी १० दिवसांसाठी दादर आणि ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत तसेच इतर आवश्यक कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानुसार, २९ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या कालावधीसाठी काही अप मेल/एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्म (दादर/ठाणे पर्यंतच) चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

या ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, ज्याची यादी खालीलप्रमाणे आहे:

​दादर पर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या:

गाडी क्र. १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, गाडी क्र. १२८१० हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११०२० भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, गाडी क्र. २२१४४ बिदर – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. २२१०८ लातूर – सीएसएमटी एक्सप्रेस आणि गाडी क्र. २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्सप्रेस या सर्व गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर येथे थांबवण्यात येतील.

ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या 

गाडी क्र. १२१३४ मंगळूर – सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी सीएसएमटीपर्यंत न जाता ठाणे स्थानकातच थांबवण्यात येईल.

​या रेल्वे ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने प्रवाशांना आधीच सूचित केले असून, सर्वांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदललेल्या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

Konkan Railway: पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जादा डबा (कोच) जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार गाडी संख्या १०११६/१०११५ मडगाव जंक्शन – वांद्रे (टर्मिनस) – मडगाव जंक्शन द्विसप्ताहिक एक्सप्रेस आणि गाडी संख्या १०२१५/१०२१६ मडगाव जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन – मडगाव जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये आता ‘३ टायर एसी’ (3 Tier AC) चा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात येणार आहे. यामुळे या गाड्यांची एकूण डब्यांची संख्या आता २० वरून २१ (LHB कोचेस) होणार असून, प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

​या सुधारित रचनेनुसार, मडगाव येथून सुटणाऱ्या वांद्रे एक्सप्रेसला (१०११६) २६ मे २०२६ पासून, तर वांद्रे येथून सुटणाऱ्या मडगाव एक्सप्रेसला (१०११५) २७ मे २०२६ पासून हा जादा डबा जोडला जाईल. तसेच, मडगाव-एर्नाकुलम एक्सप्रेसच्या (१०२१५) प्रवासासाठी २४ मे २०२६ पासून आणि एर्नाकुलम-मडगाव एक्सप्रेससाठी (१०२१६) २५ मे २०२६ पासून ही नवीन डब्यांची रचना लागू होईल. नवीन रचनेमध्ये १ डबा २ टायर एसी, ४ डबे ३ टायर एसी, २ डबे ३ टायर इकॉनॉमी, ८ स्लीपर क्लास, ४ जनरल डबे, १ जनरेटर कार आणि १ SLR कोचचा समावेश असेल.

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. गाड्यांच्या थांब्यांच्या व वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडीच्या ४ फेऱ्या; परतीच्या प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी संख्या ०११०६/०११०५ मडगाव-पनवेल-मडगाव साप्ताहिक विशेष (TOD) या गाडीच्या दोन्ही दिशांनी मिळून एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाडीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

​या वेळापत्रकानुसार, गाडी संख्या ०११०६ मडगाव-पनवेल विशेष ट्रेन मडगाव येथून रविवार, दिनांक २४ मे २०२६ आणि ३१ मे २०२६ रोजी दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०४:०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी संख्या ०११०५ पनवेल-मडगाव विशेष ट्रेन सोमवार, दिनांक २५ मे २०२६ आणि ०१ जून २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​ही ट्रेन २३ आयसीएफ (ICF) कोचच्या संरचनेसह धावणार असून, यामध्ये ११ स्लीपर क्लास, ३ थर्ड एसी (3A), ७ जनरल आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल. मध्य रेल्वे (CR) क्षेत्रात या गाडीला रोहा, पेण आणि पनवेल या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि माणगाव या स्थानकांवरही ही ट्रेन थांबणार आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

 

​कोकण रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; गाड्यांच्या वक्तशीरपणावर परिणाम होण्याची शक्यता

   Follow us on        

मंगळूर:कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मान्सूनपूर्व ट्रॅक तपासणी तसेच प्रतिबंधात्मक कामांना सुरुवात केली आहे. कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी (सिंगल-लाईन) असून या मार्गावर गाड्यांची वर्दळ खूप जास्त असते, त्यामुळे याचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे करावे लागते. हा रेल्वे मार्ग अत्यंत खडतर भूप्रदेश आणि मुसळधार पावसाच्या क्षेत्रातून जात असल्याने, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सध्या विविध तांत्रिक व अभियांत्रिकी कामे वेगाने केली जात आहेत.

​या मान्सूनपूर्व कामांमध्ये कटिंग लोअरिंग (डोंगराचे कडे कमी करणे), बीएलटी (BLT) दुरुस्ती, ट्रॅक लिफ्टिंग, डीप स्क्रीनिंग, थ्रू-ट्रॅक नूतनीकरण आणि पीक्यूआरएस (PQRS) देखभालीचा समावेश आहे. ट्रॅकची क्षमता आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही कामे केली जात आहेत. या दुरुस्तीच्या कामांमुळे मार्गावर तात्पुरते गती निर्बंध (स्पीड रिस्ट्रिक्शन्स) आणि ब्लॉक घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे गाड्यांना काही प्रमाणात उशीर होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मान्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण केली जातील, त्यानंतर गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल. प्रवाशांनी वेळापत्रकातील बदलांची माहिती मिळवण्यासाठी स्टेशनवरील घोषणा, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप्सचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

​कोरोना काळात रद्द केलेले गाड्यांचे थांबे पूर्ववत होण्याच्या शक्यता वाढल्या

   Follow us on        

सावंतवाडी:कोरोना महामारीच्या काळात सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून बंद करण्यात आलेले प्रमुख एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. सावंतवाडीकर रेल्वे प्रवाशांना लवकरच या संदर्भात आनंदाची बातमी मिळेल, असे आश्वासन देत त्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

​कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) आणि माहिती अधिकार महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने अध्यक्ष विनोद नाईक यांनी मंगळवारी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सावंतवाडीकरांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर केले. या बैठकीत प्रामुख्याने गरीब रथ एक्सप्रेस (१२२०२), राजधानी एक्सप्रेस आणि मंगळूरू एक्सप्रेस (१२४३४) या गाड्यांना सावंतवाडी येथे पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

​यापूर्वी २६ जानेवारी २०२५ रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश येडगे यांनी मुंबई येथे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले होते. आजच्या बैठकीत त्या जुन्या निवेदनाची आठवण करून देत, हे थांबे सावंतवाडीकरांसाठी किती गरजेचे आहेत हे पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

​कोरोना काळात बंद झालेल्या थांब्यांमुळे सावंतवाडी परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सध्या मुंबई किंवा इतर राज्यांत प्रवास करताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे हक्काचे थांबे पुन्हा सुरू व्हावेत, अशी जनतेची मागणी आहे. पालकमंत्र्यांनी यावर तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासित केले आहे. या गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू झाल्यास चाकरमान्यांसह सर्वांनाच खूप मोठा दिलासा मिळणार असून, पालकमंत्र्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे आता सावंतवाडीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

इंधन बचत आणि शाश्वत विकासासाठी कोल्हापूर व कोकण विभागात प्रस्तावित तीन रेल्वेमार्ग विकसित करावेत

   Follow us on        

कोल्हापूर: देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. देशाची आर्थिक गंगाजळी वाचवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी केवळ रस्ते विकास पुरेसा नसून, रेल्वे जाळ्याचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे संघाने या पत्रात अधोरेखित केले आहे.

​प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, सध्या मुंबई-पुणे-कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांदरम्यान रोज हजारो खाजगी वाहनांमुळे लाखो लीटर पेट्रोल व डिझेल वाया जात असून अब्जावधी रुपयांचे परकीय चलन देशाबाहेर जात आहे. ‘शक्तीपीठ महामार्ग’ सारख्या प्रकल्पांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात असले, तरी त्यामुळे भविष्यात परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होणार नाही. याला उत्तम पर्याय म्हणून १) कोल्हापूर – आजरा – गडहिंग्लज – चंदगड – बेळगाव, २) सावंतवाडी – चंदगड – बेळगाव आणि ३) कोल्हापूर – वैभववाडी या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे नियोजन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जलद गतीने करून पुढील पाच वर्षांत ते प्रत्यक्ष पूर्ण करावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

​या रेल्वे मार्गांमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सीमाभागाचा आर्थिक, औद्योगिक, पर्यटन व सामाजिक विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. रेल्वे वाहतूक वाढल्यास पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल, रस्ते अपघात व पर्यावरण प्रदूषण कमी होऊन ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल, असेही पत्रात नमूद केले आहे. केंद्र व राज्य शासनाने केवळ “पेट्रोल वाचवा” असे आवाहन करण्यापुरते मर्यादित न राहता रेल्वे आणि जलमार्गासारख्या शाश्वत वाहतूक सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. या मागणीबाबत सकारात्मक विचार करून केंद्र शासन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून त्वरित योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शासन फक्त कंत्राटदार व उद्योगपतींच्या हितासाठी कार्यरत असून सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी भावना जनतेत निर्माण होईल, असा इशारा ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघा’चे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांनी दिला आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

‘दिवा-संगमेश्वर’ मेमू सेवा सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

खेड: गणेशोत्सव तसेच इतर सणासुदीच्या काळात दिवा स्थानकावरून सुटणाऱ्या विशेष ‘दिवा-चिपळूण मेमू रेल्वे’ सेवेचा विस्तार करावा आणि ती थेट दिवा ते संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेला एक रीतसर निवेदनही देण्यात आले आहे. ही मेमू सेवा भविष्यात संगमेश्वरपर्यंत सुरू झाल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कढवई तसेच परिसरातील प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

​विशेषतः गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात गावी ये-जा करताना चाकरमान्यांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा प्रवाशांना प्रचंड गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच या भागातील अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबई व उपनगरांकडे नियमित प्रवास करत असतात. त्यामुळे या मार्गावर एक स्वतंत्र मेमू सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे.

​दिवा-संगमेश्वर मेमू सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होण्यास मदत होईल. शिवाय सणासुदीच्या काळात तसेच नियमित दिवसांमध्येही या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असल्याने या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांच्या हिताचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’चे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.

कोकण रेल्वेवर उन्हाळी सुट्टीत ‘सावंतवाडी-पनवेल’ साप्ताहिक स्पेशल ट्रेन धावणार

   Follow us on        

​नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने सावंतवाडी रोड ते पनवेल दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत एकूण ४ फेऱ्या पूर्ण करेल.

​गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग:

गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी रोड – पनवेल स्पेशल दर शनिवारी सकाळी ०७:२० वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:०० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०१००७ पनवेल – सावंतवाडी स्पेशल दर शनिवारी संध्याकाळी १८:१० वाजता पनवेलहून सुटेल आणि रविवारी पहाटे ०४:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. प्रवासादरम्यान ही ट्रेन कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.

ही ट्रेन १६ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत धावणार असून दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ४ फेऱ्या होतील. या गाडीला एकूण २० एलएचबी (LHB) कोच असतील, ज्यामध्ये वातानुकूलित (AC) आणि शयनयान (Sleeper) डब्यांचा समावेश आहे. ही ट्रेन पूर्णपणे विजेवर चालणारी (Electric Traction) असेल. कोकण रेल्वेने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, स्थानकांवर या संदर्भात फलक आणि उद्घोषणांद्वारे माहिती दिली जाणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search