Category Archives: कोकण रेल्वे

लॉंग वीकेंडलाच मध्य रेल्वेचा ब्लॉक; कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेससह अन्य गाड्या रखडणार

   Follow us on        

मुंबई: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (DFCC) प्रकल्पाच्या पायाभूत कामासाठी मध्य रेल्वेने पनवेल आणि कळंबोली स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक रविवार, २५ जानेवारी रोजी रात्री घेण्यात येणार असून, यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक मुळे शनिवार – रविवार आणि लागून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत गावी जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

​ब्लॉकचे मुख्य कारण

​कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन वजन) ‘ओपन वेब गर्डर’ उभारणीचे काम केले जाणार आहे. यासाठी पनवेल-कळंबोली दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर मध्यरात्री १:२० ते पहाटे ५:२० वाजेपर्यंत असा एकूण चार तासांचा ब्लॉक असेल.

​गाड्यांच्या मार्गात आणि वेळेत झालेले बदल:

​या कामामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

​१. मार्गात बदल (Diverted Train):

​गाडी क्र. २२१९३ (दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस): ही गाडी कर्जत – कल्याण – वसई रोड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

२. स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येणाऱ्या गाड्या (Regulated Trains):

​गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू – सीएसएमटी एक्सप्रेस): ही गाडी सोमाटणे स्थानकादरम्यान रात्री २:५८ ते पहाटे ५:२० पर्यंत थांबवून ठेवली जाईल.

​गाडी क्र. २०११२ (मडगाव – सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेस): ही गाडी पनवेल येथे पहाटे ४:०२ ते ५:२० पर्यंत थांबवली जाईल.

​गाडी क्र. ११००४ (सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस): ही गाडी आपटा स्थानकात पहाटे ४:२५ ते ५:१५ पर्यंत थांबवण्यात येईल.

​गाडी क्र. १२६२० (मंगळुरू – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस): ही गाडी जिते स्थानकात पहाटे ४:४१ ते ५:१० पर्यंत थांबवली जाईल.

३. वेळेत बदल आणि उशीर:

​गाडी क्र. १०१०३ (सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस): या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही गाडी सीएसएमटी येथून सकाळी ८:२० वाजता सुटेल.

​गाडी क्र. १७३१७ (हुबळी – दादर एक्सप्रेस): ही गाडी १५ ते २० मिनिटे उशिराने धावेल.

​प्रवाशांना आवाहन

​या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून, तुतारी, मांडवी आणि कोकण कन्या यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या विलंबाने धावतील. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर गाड्यांची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला तब्बल पाच वर्षे मुदतवाढ

   Follow us on        

Konkan Railway: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आणि प्रवासाची सोय अधिक सुलभ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम मध्य रेल्वेच्या समन्वयाने गाडी संख्या ०२१९८ / ०२१९७ जबलपूर – कोइम्बतूर – जबलपूर साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या सेवा विस्तारित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच वर्षासाठी या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, गाडी संख्या ०२१९८ जबलपूर – कोइम्बतूर साप्ताहिक स्पेशलच्या फेऱ्या ६ मार्च २०२६ पासून २७ डिसेंबर २०३० पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच, परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०२१९७ कोइम्बतूर – जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ९ मार्च २०२६ पासून ३० डिसेंबर २०३० पर्यंत धावणार आहे. म्हणजे पुढील पाच वर्षे ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.

या गाडीचे प्रमुख थांबे:

ही गाडी आपल्या प्रवासात नरसिंगपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खंडवा, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मूकंबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, वडाकरा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.

​डब्यांची रचना (Coach Composition):

या विशेष गाडीला एकूण २४ डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणी ए.सी. (First AC) चा १ डबा, द्वितीय श्रेणी ए.सी. (Two Tier AC) चे २ डबे, तृतीय श्रेणी ए.सी. (3 Tier AC) चे ६ डबे, स्लीपर क्लासचे ११ डबे, जनरलचे २ डबे आणि २ एस.एल.आर. (SLR) डब्यांचा समावेश आहे.

​विशेष म्हणजे, या ट्रेनच्या धावण्याचे दिवस, वेळ, थांबे आणि डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही; ती पूर्वीप्रमाणेच नियमितपणे धावत राहील. या विस्तारामुळे कोकणात आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी पाच वर्षांसाठी प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. या गाड्यांच्या थांब्यांच्या आणि वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी १०५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित – खासदार कोटा श्रीनिवास पुजारी

   Follow us on        

उडुपी | प्रतिनिधी

उडुपी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ‘अमृत भारत रेल्वे स्थानक योजने’अंतर्गत सुमारे २ कोटी ४० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण १४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. या नूतनीकरणामुळे उडुपी रेल्वे स्थानकाला आता आधुनिक आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले असून, किनारपट्टी भागातील प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

​उडुपी-चिक्कमगळुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या हस्ते कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने विकसित केलेल्या या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार पुजारी म्हणाले की, “केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी किनारपट्टी भागातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात २.६ कोटी रुपये खर्चून प्लॅटफॉर्म क्रमांक २ चा विकास केला जाईल, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तीन नवीन लिफ्ट बसवण्यात येतील.”

​रेल्वे विकासाचा धडाका:

खासदारांनी माहिती दिली की, बारकूर ते मुल्की दरम्यानच्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुधारणेसाठी ४.२८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून एकूण १० रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

​महत्त्वाच्या मागण्या आणि प्रस्ताव:

यावेळी खासदारांनी किनारपट्टी भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले:

​दुहेरीकरण: मंगळुरू ते कारवार या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण ही काळाची गरज असून, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्र सरकारला सादर केला जाईल.

​गाड्यांचा विस्तार: मडगाव-मंगळुरू ‘वंदे भारत’ ट्रेन मुंबईपर्यंत आणि बेंगळुरू-मंगळुरू ट्रेन कारवारपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

​नामकरण: उडुपी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘श्री कृष्ण रेल्वे स्थानक’ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

​या उद्घाटन समारंभाला आमदार यशपाल ए. सुवर्णा, आमदार गुरमे सुरेश शेट्टी, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, कारवार विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशा शेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Konkan Railway: लागून आलेल्या सुट्ट्यांसाठी मुंबई पुण्याहून विशेष गाड्या सोडाव्यात – कोकण विकास समिती

   Follow us on        

मुंबई/रत्नागिरी:

येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) जोडून आलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाड्या सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या काळात मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल झाल्याने चाकरमानी आणि पर्यटकांचे हाल होत आहेत.

​या पार्श्वभूमीवर, ‘कोकण विकास समिती’चे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाला सविस्तर पत्र लिहून विशेष गाड्यांचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या तीन मार्गांवर विशेष ट्रेनची मागणी:

​समितीने प्रवाशांच्या मागणीनुसार खालील तीन मार्गांवर विशेष फेऱ्यांचे प्रस्ताव मांडले आहेत:

​१. मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT:

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबून सिंधुदुर्गपर्यंत धावण्यासाठी अपेक्षित आहे. यात स्लीपर आणि एसी कोचची सोय असावी.

​२. पुणे – सावंतवाडी रोड – पुणे:

पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. लोणावळा, कल्याण, पनवेलमार्गे ही गाडी सोडल्यास पुणेकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल.

​३. मुंबई CSMT – चिपळूण – मुंबई CSMT (दिवसा धावणारी स्पेशल):

कमी अंतराच्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरेल. पेण, माणगाव, वीर, खेड यांसारख्या स्थानकांवर थांबा देऊन सेकंड सीटिंग आणि एसी चेअर कारची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

​दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस येणाऱ्या लाँग वीकेंडमुळे कोकणात कौटुंबिक भेटी आणि पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. नियमित गाड्यांमध्ये जागा नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या अव्वाच्या सव्वा भाड्याचा सामना करावा लागतो किंवा असुरक्षित रस्ते प्रवासाचा धोका पत्करावा लागतो.

​”जर रेल्वेने वेळेत विशेष गाड्यांचे नियोजन केले आणि बुकिंग सुरू केले, तर प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारा मनस्ताप वाचेल. तसेच, यामुळे भारतीय रेल्वेच्या महसुलातही मोठी भर पडेल,” असे कोकण विकास समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

​‘फुकटची’ बस नको, हक्काची ट्रेन द्या! मत हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

   Follow us on        

​मुंबई/सावंतवाडी:

“निवडणुका आल्या की आमची आठवण येते, सणासुदीला मोफत बसचे गाजर दाखवले जाते. पण आम्हाला ही तात्पुरती मलमपट्टी नको आहे. आम्हाला सन्मानाचा आणि हक्काचा रेल्वे प्रवास हवा आहे. जर मते हवी असतील, तर आधी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा,” अशा शब्दांत मुंबईतील कोकणी चाकरमान्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.

​सोशल मीडियावर सध्या एका व्यथित चाकरमान्याचे पत्र तुफान व्हायरल होत असून, ‘तात्पुरती बस नको, हक्काची ट्रेन हवी’ ही मागणी आता एका जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे.

​बसेसच्या राजकारणापेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा

​दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमग्याला राजकीय पक्षांकडून ‘मोफत बस’ सोडण्याची चढाओढ लागते. मात्र, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि बसचा प्रवास हा त्रासदायक ठरत असल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. “आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्टाळू आहोत. आम्हाला फुकटचा प्रवास नको, तर सुरक्षित रेल्वे प्रवास हवा आहे,” असा सणसणीत टोला या पत्राद्वारे राजकीय नेत्यांना लगावण्यात आला आहे.

​‘मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

​”जो आमच्या हक्कासाठी लढेल, त्याच्याच पाठीशी कोकणी समाज खंबीरपणे उभा राहील,” असा इशाराही चाकरमान्यांनी दिला आहे. भावी नगरसेवकांनी केवळ वॉर्डापुरते मर्यादित न राहता, सभागृहात आणि प्रशासनासमोर सावंतवाडी टर्मिनसचा आवाज उठवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

​”कोकणी बाणा हा आहे की, आम्ही कष्टाचे खातो. आम्हाला निवडणुकीपुरती मलमपट्टी नको, तर रेल्वेच्या रुळावर धावणारी कायमस्वरूपी प्रगती हवी आहे.”

— एक व्यथित कोकणी चाकरमानी

सावंतवाडी – पंढरपूर दरम्यान ”माघी वारी विशेष” एक्सप्रेस चालविण्यात यावी

   Follow us on        

रत्नागिरी/सिंधुदुर्ग: आषाढी आणि कार्तिकी एकादशीप्रमाणेच कोकणात माघी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने कोकणातील हजारो वारकरी पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. मात्र, कोकणातून पंढरपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, यावर्षी तरी सावंतवाडी ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

​रस्ते प्रवास ठरतोय त्रासदायक

​कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कठीण घाटमार्गामुळे हा प्रवास अत्यंत वेळखाऊ आणि थकवणारा होतो. वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी तासनतास बसचा किंवा खासगी वाहनाचा प्रवास शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरतो. रेल्वेने हा प्रवास केल्यास तो अधिक आरामदायक आणि सुरक्षित होऊ शकतो, असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.

​मध्य रेल्वे दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर आणि मिरज यांसारख्या विविध भागांतून विशेष गाड्यांची घोषणा करते. मात्र, दरवर्षी मागणी करूनही कोकण रेल्वे मार्गावरून पंढरपूरसाठी थेट विशेष गाडी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे कोकणातील भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महत्वाच्या एकदशा ऐन शेतीच्या हंगामात येत असल्याने वारकर्‍यांची ईच्छा असूनही कोकणकरांना पंढरपुरात जाणे शक्य होत नाही. माघी एकादशी सोयीच्या काळात येत असल्याने हा वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला भेट देतो. त्यामुळे माघी वारीला मोठ्या प्रमाणात कोकणी भक्त दिसून येतात. येवढेच नाही तर या एकादशीच्या वारीला कोकणवासीयांची वारी असेही संबोधले जाते.

या महिन्याच्या अखेरीस माघी एकादशी येत असल्याने रेल्वेने तातडीने यावर निर्णय घ्यावा.

​आता रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणातील वारकऱ्यांचा विठुरायापर्यंतचा प्रवास सुकर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संगमेश्वर स्थानकावर होळी विशेष एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा; निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपची आग्रही मागणी

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम/ सायले: संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांचा कायम पाठपुरावा करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुप च्या सदस्यांनी आज दि. ७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. शैलेश बापट यांची भेट निवेदन सादर केले. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावातील रेल्वे प्रवाशांच्या होळी उत्सवातील सुखकर प्रवासाचा विचार करून हे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी चर्चा करताना संगमेश्वर स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या ध्यानात घेऊन, उत्पन्न वाढी सोबत सुखकर प्रवास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे फुकट्या प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनाचा रेल्वेला बसणारा फटका, त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या चर्चेत ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, रुपेश मनोहर कदम, अशोक मुंडेकर हे सहभागी झाले होते.कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळाला तर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास नक्कीच सुखकर होणार!

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत १२ जानेवारीपासून बदल

   Follow us on        

​ठाणे: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची हक्काची गाडी असलेल्या ‘दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने एक बदल केला आहे. रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या वेळापत्रकानुसार या गाडीची वेळ आता ‘प्रीपोन’ म्हणजेच नियमित वेळेच्या काही मिनिटे आधी करण्यात आली आहे. हे सुधारित बदल १० जानेवारी २०२६ ऐवजी १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.

​नव्या बदलांनुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता दिवा स्थानकावरून पूर्वीच्या वेळेपेक्षा साधारण १० ते १५ मिनिटे लवकर सुटेल. रोहा स्थानकावर ही गाडी सध्या सकाळी ०९:०० वाजता पोहोचत होती, ती आता सकाळी ०८:५० वाजता पोहोचेल आणि ०८:५५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, ही गाडी रोहा स्थानकावर संध्याकाळी ५:२० ऐवजी ५:०५ वाजता पोहोचेल.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पाठोपाठ कोकण रेल्वेच्या अजून दोन गाड्या कायमस्वरूपी मुंबईच्या बाहेर नेण्याचा डाव

   Follow us on        

मुंबई: मुंबईहून कोकण आणि किनारपट्टी कर्नाटककडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्या पुन्हा एकदा पनवेलला ‘शॉर्ट-टर्मिनेट’ करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशाची गैरसोय होत असून रेल्वेच्या दीर्घकालीन हेतूंवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५/१६३४६) आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६१९/१२६२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहेत.

​​मध्य रेल्वेने ‘एलटीटी’ यार्डातील पिट लाईन क्रमांक ३ च्या देखभालीचे कारण देऊन या गाड्या महिनाभर पनवेलला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण विकास समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे ४० दिवस गाड्या रोखण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रवाशांना हळूहळू पनवेल टर्मिनसची सवय लावून या गाड्या कायमस्वरूपी तिथूनच चालवण्याचा घाट घातला जात असल्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पूर्वी रत्नागिरी-दादर पॅसेंजर कोव्हिडचे कारण देऊन तात्पुरत्या काळासाठी दादर ऐवजी दिवा स्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र कोव्हिड काळानंतर ही ट्रेन कायमची दिवा स्थानकावर हलवण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आता तोच प्रकार आता नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बाबतीत तर होणार नाही ना? अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पनवेलला गाडी थांबल्यामुळे वृद्ध, महिला आणि जड सामान असलेल्या प्रवाशांना लोकलने पुढचा प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. खाजगी वाहनांनी प्रवास करताना वेळ आणि पैसा यांचा मोठा फटका बसत आहे.

​कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक व्यावहारिक पर्याय मांडला आहे:

सध्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा गाड्यांचे रेक एलटीटी स्थानकावर उभे करून ठेवावे लागतात. या दोन्ही गाड्यांच्या रेकचे (Rake Linking) एकत्रीकरण करून त्या ‘प्लॅटफॉर्म-रिटर्न’ पद्धतीने चालवाव्यात. यामुळे गाड्यांना बराच वेळ यार्डात उभं राहण्याची गरज उरणार नाही आणि पिट लाईनवरील ताणही कमी होईल.

​समितीच्या प्रमुख मागण्या:

समितीने रेल्वे प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत.

​१. नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या रेक लिंकिंग प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी.

२. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वेची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा.

३. तात्पुरत्या कामांचे कारण देऊन प्रवाशांच्या हक्काच्या मुंबई जोडणीला कायमस्वरूपी सुरुंग लावू नये.

​याप्रश्नी रेल्वे प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

मुंबई | ५ जानेवारी २०२६:

​कोकण रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि मागणी लक्षात घेता, गाडी क्रमांक २२११५ / २२११६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – करमाळी – लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी आता करमाळीऐवजी मडगाव जंक्शन स्थानकापर्यंत धावेल आणि तेथूनच परतीचा प्रवास सुरू करेल.

आठवड्यातुन एकदा धावणार्‍या या गाडीला आता १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या गाडीचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘NTES’ ॲपचा वापर करावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search