Category Archives: कोकण रेल्वे

एक्सप्रेस गाड्यांच्या संगमेश्वर रोड येथील थांब्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांशी बोलणार; खासदार नारायण राणे यांचे आश्वासन

   Follow us on        देवरूख: बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर देवरूख येथे पार पडलेल्या खासदारांच्या जनता दरबारात संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय अग्रक्रमाने मांडण्यासाठी सकाळी लवकरच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, सहकारी अशोक मुंडेकर , समन्वयक रुपेश मनोहर कदम लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय येथे उपस्थित होते.

संगमेश्वर स्थानकात दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या बघता ९ अतिरिक्त गाडयांना थांबा मिळावा म्हणून कोंकण रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वर जनतेच्या वतीने निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपने मागणी  केली होती त्यावेळी  कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मागणी केलेल्या ९ गाड्यांपैकी जामनगर, पोरबंदर व मडगाव एक्सप्रेस या तीन गाडयांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबे देण्यास सर्व बाबी अनुकूल असून तसा प्रस्ताव आम्ही केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवतो असे सांगितले आणि  तसा प्रस्ताव पाठवला.

या बैठकीला स्थानिक आमदार श्री शेखर निकम सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा आपली शिफारस त्यांच्या  पत्राद्वारे केली होती. 

थांबे मंजूरी हा विषय केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला स्थानिक खासदारांची शिफारस असणे क्रमप्राप्त असून त्यांचे रेल्वे मंत्र्यांना शिफारस पत्र लागेल असे कोंकण रेल्वे प्रशासनाने संगितले. त्याप्रमाणे मे २०२५ मध्ये खासदार श्री नारायण राणे यांना भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडण्यात आला आणि त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आपले शिफारस पत्र सुद्धा दिले आणि पुढील दोन दिवसात मी रेल्वे मंत्र्यांना भेटून  मंजूरी घेतो असे आश्वासनही दिले परंतू या गोष्टीला आज सहा महिने उलटले तरी या गाड्यांच्या थांब्याना मंजूरी मिळालेली नाही त्यामुळे काल खासदारांच्या देवरुख येथे झालेल्या जनता दरबारात पुन्हा हा प्रश्न त्यांच्यासामोर मांडून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली गेली. 

यावेळी उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले, “माझे मित्र असलेले केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी करून मी थांबे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो.”

परंतु थांबे मंजूर करुन घेण्यासाठी कधी कधी वजनदार व्यक्तींचा एक शब्दही कामी येतो याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यात आजूबाजूच्या जिल्ह्यात मंजूर झालेले थांबे बघता लक्षात  येते. विशेष  म्हणजे हे कोकणातील थांबे जिल्हयाबाहेरील नेत्यांनी  रेल्वे मंत्र्यांकडे आपले वजन वापरुन तातडीने मंजूर  करून घेतले मग आपल्या खासदारांच्या शिफारशीला रेल्वे बोर्ड पहात नाही कां? असा सवाल विचारला जात आहे.

Konkan Railway: दिवा–चिपळूण मेमू सेवा कायमस्वरूपी झाल्याची बातमी खोटी; रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

   Follow us on    

 

 

दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित किंवा कायमस्वरूपी मान्यता मिळाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांमध्ये पसरवल्या जात आहेत. मात्र, या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वेच्या अधिकृत माहितीपत्रकात  म्हटले आहे की, “सध्या दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवीन कायमस्वरूपी किंवा नियमित गाड्यांबाबत कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती अधिकृत माध्यमांतून देण्यात येईल.”

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, प्रेस नोट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरूनच माहिती घ्यावी.

दरम्यान, कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मेमू सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असून, अनेक प्रवाशांनी तिला नियमित करण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वेने या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लवकरच दिसणार ‘डिजिटल कोच इंडिकेटर’

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ वरील उघड्या जागेत तसेच शेड परिसरात दुहेरी दिशेच्या मार्गदर्शक प्रदर्शन फलक (सीजेमबीडी) पुरवठा, स्थापित करणे, चाचणी आणि कार्यान्वयनासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.

या कामासाठी निविदा क्रमांक KR-RN-S&T-07-2025-26 असून एकूण अनुमानित खर्च 19.84 लाख रुपये (जीएसटीसह) निश्चित करण्यात आला आहे. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025, दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे.

निविदेसाठी ईएमडी रक्कम 39,700 ठेवण्यात आली असून इच्छुक आणि पात्र ठेकेदारांनी अधिक माहितीसाठी www.ireps.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कोकण रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश 

२६ जानेवारी २०२५ च्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील ऑफिसमधे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सावंतवाडी येथे ही डिजिटल कोच इंडिकेटर करिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणती गाडी प्लॅटफॉर्म ला उभी आहे आणि त्या गाडीतील कोच प्लॅटफॉर्मवर कोणत्या स्थानी लागला आहे हे कळणे आता सुलभ होईल.

हे सर्व कोकणवासीयांचा एकजुटीमुळे शक्य झाले आहे. सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी प्रथम लिफ्ट आणि आता कोच इंडिकेटर सारखी कामे सावंतवाडी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर १७० मीटरची निवारा शेड देखील होईल हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली आहे.

Konkan Railway: महत्वाचे! कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल.

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या दिनांक २१ ऑक्टोबर पासून कोकण रेल्वे मार्गावर बिगर पावसाळी वेळापत्रक लागु होणार असून रेल्वे गाड्या जलद धावण्यास सुरुवात होणार आहे.

पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येवून सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेवून हा निर्णय कोकण रेल्वे प्रशासना कडून घेण्यात येत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात हा वेग कमी करण्यात आला होता.

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – कोकण मार्गावरील प्रवास गतीमान होणार आहे.

दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते, परंतु यंदा पूर्व पावसाळी कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे १५ दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपविण्यात आले आहे.

त्यामुळे आता प्रवाशांना मुंबई – कोकण मार्गावर जलद प्रवास करता येणार आहे. गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी NTES या रेल्वेच्या अधिकृत अॅप वर आपण प्रवास करणार असलेल्या गाडीचे वेळापत्रक आणि सद्यस्थिती तपासावे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार गाड्यांना थांबे मंजूर

नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2025

   Follow us on    

 

 

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नवीन आदेश जाहीर करत चार महत्त्वाच्या गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Basis) देण्यात आला असून, तो लवकरच अमलात येणार आहे.

या आदेशानुसार खालील गाड्यांना थांबा मिळणार आहे:

22655/22656 Ernakulam – Hazrat Nizamuddin Express – थांबा: सिंधुदुर्ग

12977/12978 Ernakulam – Ajmer Marusagar Express – थांबा: सिंधुदुर्ग

22475/22476 Hisar – Coimbatore Express – थांबा: कणकवली

16335/16336 Gandhidham – Nagercoil Express – थांबा: कणकवली

 

 

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भिजत घोंगडे; मुंबईतील सिंधुपुत्र आमदारांचा कोकणवासियांच्या हक्कासाठी लढा.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष.

   Follow us on    

 

 

मुंबई: कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आणि कोकण रेल्वेच्या विविध गाड्यांना थांबा मिळावा, या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार श्री. अनंत (बाळा) नर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मूळचे सिंधुदुर्गातील तरळा-वारगावचे सुपुत्र असलेल्या श्री. नर यांनी थेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कोकणवासियांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे या प्रश्नासाठी लढणाऱ्या स्थानिक प्रवासी संघटनांच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले आहे.

गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस आणि कोचिंग डेपोचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हक्काच्या गाड्या सोडण्याकरिता आणि इतर टर्मिनस सुविधांसाठी त्यांना थेट मडगाव किंवा मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार बाळा नर यांनी आपल्या पत्राद्वारे या गंभीर समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यास केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील.

या पत्राद्वारे केवळ टर्मिनसच्या कामाचीच नव्हे, तर कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यामध्ये मुंबई-मंगळूरु एक्सप्रेस, संपर्कक्रांती एक्सप्रेस, निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या थांब्यांमुळे मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणी चाकरमान्यांची प्रवासाची सोय होईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

स्थानिक संघटनांचा अविरत संघर्ष

सावंतवाडी टर्मिनस आणि रेल्वे थांब्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) सातत्याने लढा देत आहे. संघटनेचे मुंबईतील पदाधिकारी श्री. संदीप गुरव, शाखाप्रमुख श्री. नंदकुमार ताम्हणकर, उपशाखाप्रमुख शैलेश बांदेलकर, श्री. केशव पांचाळ, राजापूर तालुका सहसंपर्कप्रमुख श्री. जगन्नाथ कदम आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वीच माहीमचे आमदार श्री. महेश सावंत यांनीही या विषयात पत्रव्यवहार केला होता. आता आमदार बाळा नर यांच्या पुढाकाराने या मागणीला अधिक वजन प्राप्त झाले आहे.

आमदार नर यांच्या या पत्रामुळे कोकणवासियांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, “आता कोकणच्या हक्काचे टर्मिनस मिळवूच!” असा निर्धार व्यक्त केला जात आहे. सरकार आणि रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणवासीयांना न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तळकोकणात थांबा नसणार्‍या त्या ३२ गाड्यांना थांबा द्यावा; शरद पवार यांची रेल्वेला विनंती

   Follow us on    

 

 

पुणे: कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या कोकण रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून विशेष विनंती केली आहे.

या पत्रात त्यांनी कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तळकोकणातील स्थानकांवर निवडक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून तो आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेक एक्स्प्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पवार यांनी प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात आणि प्रमुख सणांच्या काळात — म्हणजे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात — निवडक एक्स्प्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी येथे थांबे देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

त्यांनी नमूद केले आहे की, या निर्णयामुळे तळकोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णांच्या प्रवासात मोठी सोय होईल, तसेच स्थानिक उत्पादने आणि हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

Konkan Railway: रेल्वेचा गलथान कारभार! आरक्षित असलेला डब्बा न जोडताच गाडी रवाना

   Follow us on        

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर : मुंबईवरून मडगावकडे जाणाऱ्या १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये आज तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवाशांकडे  कन्फर्म तिकीटे असलेला DL-1 डबा गाडीला लावण्यातच आलेला नव्हता.

या अनपेक्षित घटनेमुळे गाडीत गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. परिस्थिती हाताळताना रेल्वेतील टीसी आणि कर्मचारी देखील अडचणीत सापडले.

टीसींनी प्रवाशांना या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदविण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली असून, हा प्रकार रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे

Konkan Railway: वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडी एलएचबी रेकसह धावणार

   Follow us on    

 

 

Konkan Railway: वास्को-द-गामा : प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-द-गामा साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 07311/07312) आता पारंपरिक आयसीएफ डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी डब्यांसह धावणार आहे.

ही सुविधा 22 सप्टेंबर 2025 पासून वास्को-द-गामा येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07311 साठी लागू होणार असून, मुझफ्फरपूर येथून 25 सप्टेंबर 2025 रोजी सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07312 पासून अमलात येईल.

रेल्वेच्या माहितीनुसार, या गाडीत यापुढे एक फर्स्ट एसी, दोन टू टियर एसी, तीन थ्री टियर एसी, नऊ स्लीपर, तीन जनरल, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर असा एकूण 20 एलएचबी डब्यांचा समावेश असेल. पूर्वी या गाडीत 21 आयसीएफ डबे जोडले जात होते.

प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. संबंधित गाडीचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या बदलामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या सेवांचा अधिक सोयीस्कररीत्या लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Konkan Railway Updates: प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून नवीन मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सादर

   Follow us on    

 

 

Konkan Railway Updates: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आज नव्याने डिझाईन केलेले KR MIRROR मोबाईल अ‍ॅप्लिकेशन  सादर केले. हे अ‍ॅप्लिकेशन प्रवाशांना आधुनिक, सुलभ आणि समावेशक डिजिटल अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

हे अ‍ॅप्लिकेशन केवळ माहिती देणारे साधन न राहता आता एक संपूर्ण प्रवास साथीदार ठरत आहे. दृष्टी, हालचाल किंवा संज्ञानात्मक अडचणी असलेल्या प्रवाशांनाही सहज वापरता येईल, याची काळजी घेण्यात आली आहे. बहुभाषिक पर्याय, मोठ्या अक्षरे, तसेच डार्क/लाईट मोडसारख्या सुविधा यात उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या सुविधा:

  • गाडीचे प्रत्यक्ष धावते स्थिती व वेळापत्रक

  • स्थानकांवरील व गाड्यांवरील सेवा, केटरिंग माहिती

  • महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा व सुरक्षा हेल्पलाईन्स

  • पर्यटन व चित्रपट स्थळांची माहिती, छायाचित्रे

  • हेल्पडेस्क व तक्रार नोंदविण्याचे पर्याय

  • कोकण रेल्वेचा इतिहास, कामगिरी व घोषणा

  • आपत्कालीन माहिती व सुरक्षा सुविधा

प्रवासी लाभ:
या अ‍ॅप्लिकेशन द्वारे प्रवाशांना जलद माहिती, सुरक्षा जागरूकता, पर्यटन नियोजन, स्थानिक भाषांतील माहिती तसेच थेट KRCL शी संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे.

हे अ‍ॅप्लिकेशन आता Google Play Store वर डाउनलोडसाठी उपलब्ध असून, खालील लिंकवर जाऊन ते डाउनलोड करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.konkanrailway.krclapp

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search