मुंबई: मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२९/२२२३०) या अत्यंत लोकप्रिय गाडीची क्षमता तातडीने वाढवून ती २० डब्यांची करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सर्वाधिक प्रवासी प्रतिसाद मिळणारी ही वंदे भारत सेवा सध्या केवळ ८ डब्यांसह चालवली जात असून, सुरुवातीपासूनच सातत्याने उच्च प्रवासी गर्दी असूनही क्षमतेत वाढ न होणे आश्चर्यकारक आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेतील अनेक वंदे भारत गाड्या ९० टक्क्यांहून अधिक प्रवासी भराव नोंदवताच १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुंबई–मडगाव मार्गालाही त्याच धर्तीवर वाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, नांदेड–मुंबई आणि सोलापूर–मुंबई वंदे भारत गाड्यांची मालकी व देखभाल जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे वर्ग झाल्याने मुंबईतील देखभाल सुविधा व पिट लाईनची क्षमता मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहे. त्यामुळे मुंबई–मडगाव वंदे भारतला कायमस्वरूपी २० डब्यांची रचना देण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उच्च मागणी असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अजूनही कमी क्षमतेची गाडी चालवली जाणे योग्य नसल्याचे सांगत रेल्वे बोर्ड तसेच संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन ही वाढ प्राधान्याने लागू करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी संबधित आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना ईमेल द्वारे केली आहे. कोकणातील प्रवासी या दीर्घकालीन आणि रास्त मागणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथे थांबा देणे गरजेचे
या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एका स्थानकावर, म्हणजे कणकवली येथेच थांबा आहे. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या या जिल्ह्यात अशा प्रीमियम गाड्यांना पुरेसे थांबे न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. तळकोकणातील सावंतवाडी येथे या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी गाडी सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठी सावंतवाडी थांब्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत हा थांबा मिळालेला नाही. ही गाडी २० डब्यांची करून तिला सावंतवाडी येथे थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.












