



पुणे: कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या कोकण रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून विशेष विनंती केली आहे.
या पत्रात त्यांनी कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तळकोकणातील स्थानकांवर निवडक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे.
शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून तो आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेक एक्स्प्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात आणि प्रमुख सणांच्या काळात — म्हणजे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात — निवडक एक्स्प्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी येथे थांबे देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
त्यांनी नमूद केले आहे की, या निर्णयामुळे तळकोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णांच्या प्रवासात मोठी सोय होईल, तसेच स्थानिक उत्पादने आणि हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या ‘कोकण रेल्वे’च्या कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या तळकोकणाच्या प्रलंबित मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्र लिहिलं.
महाराष्ट्रातील ‘सिंधुदुर्ग’ हा… pic.twitter.com/kMQLfKotFn
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 7, 2025