Konkan Railway News | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला प्रत्येकी एका फेरीसाठी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव या गाडीला हापा येथून सुटताना 05 एप्रिल रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना 07 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाईल. याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेलीदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला पोरबंदर येथून सुटताना 06 एप्रिल रोजी तर कोचुवेली येथून सुटताना 09 रोजी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास या मार्गावरील सर्वच गाड्या आता विद्युत इंजिनसह धावत आहेत. विद्युत इंजिनामुळे इंधनावर होणार्या खर्चावर मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे या वाचणार्या पैशांतून या मार्गावरील विकासाची कामे करणे रेल्वेला शक्य होणार आहे. त्याशिवाय डिझेल इंजिनामूळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण टाळता येणार आहे.
पण या विद्युतीकरणामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या मार्गावरील अनेक गावे रेल्वेरूळा मुळे दोन भागात विभागली आहेत. घर रूळाच्या एका बाजूला तर शाळा आणि शेती एका बाजूला. त्यामुळे रूळ ओलांडल्या शिवाय गावकर्यांकडे पर्याय नाही आहे. कारण या मार्गावर पलीकडे जाण्यासाठी ब्रिज नाही आहेत. असले तरी ते खूप अंतरावर आहेत. याआधी गाड्या डिझेल इंजिनावर धावत होत्या त्यामुळे गाड्यांचा मोठा आवाज येत असे. या आवाजामुळे ग्रामस्थ किंवा वन्य प्राणी सावध होत असत. पण आता त्याप्रमाणात आवाज येत नाही त्यामुळे रूळांवर अपघात वाढत असल्याचे दिसत आहेत. वन्य आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांचा बळी जाण्याच्या बातम्या आजकाल मोठ्या प्रमाणावर ऐकण्यास मिळत आहेत.
वन्यप्राणी रूळांवर येवू नये यासाठी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कुंपण बांधणे गरजेचे आहे. व्यवहार्य दृष्टीने पाहता सर्वच ठिकाणी पादचारी पूल बांधणे शक्य नाही पण ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूळ ओलांडले जाते अशा ठिकाणी असे पूल किंवा भुयारी मार्ग बांधणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग– कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकातून सुटणारी ट्रेन क्र. ११००३ दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यास कोकण रेल्वेने मंजुरी दिली आहे. या बदलामुळे प्रवाशांचा जवळपास १ तास वाचणार आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक कोकण प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.सध्या ही गाडी सावंतवाडी रोड मळगाव स्थानकातून सायंकाळी ७ वाजून १० ( १९.१०) मिनिटांनी निघत आहे. या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यात येत असून ती रात्री ८ वाजता निघणार आहे.
1) गाडी क्र. 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस चे वेळापत्रक
2) गाडी क्र. 11003 दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस च्या वेळापत्रकात जास्त बदल झालेले नाही आहेत. ही गाडी सावंतवाडी स्थानकावर येण्याच्या वेळेत बदल झाला आहे. ही गाडी १०.४० च्या जागी १०.२५ ला पोहोचणार आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Konkan Railway News:उन्हाळी सुट्टीकरिता गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने उन्हाळी हंगामादरम्यान काही अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पुणे-सावंतवाडी, पनवेल- सावंतवाडी,पनवेल-करमाळी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 01211 / 01212 Pune Jn. – Sawantwadi Road – Pune Jn. Special (Weekly):
Train no. 01211 Pune Jn. – Sawantwadi Road Special (Weekly)
दिनांक ०२/०४/२०२३ ते ०४/०६/२०२३ दरम्यान दर रविवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन रात्री २१:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01212 Sawantwadi Road – Pune Jn.Special (Weekly)
दिनांक ०५/०४/२०२३ ते ०७/०६/२०२३ दरम्यान दर बुधवारी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी १०:१० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:५५ वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01216 Sawantwadi Road – Panvel Special (Weekly)
दिनांक ०३/०४/२०२३ ते ०५/०६/२०२३ दरम्यान दर सोमवारी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी १०:१० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २० :३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01215 Panvel – Sawantwadi Road Special (Weekly)
दिनांक ०४/०४/२०२३ ते ०६/०६/२०२३ दरम्यान दर मंगळवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २१:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०३/०४/२०२३ ते ०५/०६/२०२३ दरम्यान दर सोमवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २१:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01214 Karmali – Panvel Special (Weekly)
दिनांक ०४/०४/२०२३ ते ०६/०६/२०२३ दरम्यान दर मंगळवारी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २०:३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01463 Lokmanya Tilak (T) – Kanniyakumari Special (Weekly)
दिनांक ०६/०४/२०२३ ते ०१/०६/२०२३ दरम्यान दर गुरुवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावरुन संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २३:२० वाजता कन्याकुमारी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01464 Kanniyakumari – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०८/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी कन्याकुमारी या स्थानकावरुन दुपारी १४:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१ :५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे
आरक्षण
गाडी नंबर 01211 , 01216 ,01213 या गाड्यांचे आरक्षण दिनांक ३१/०३/२०२३ रोजी रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर चालू होतील असे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
पालघर : वसई – विरार भागातील कोकणवासीयांसाठी एक चांगली बातमी आहे. मागील कित्येक गुढीपाडव्यानिमित्त विरार येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत खासदार श्री. गावित यांनी वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचेच अध्यक्ष शांताराम नाईक यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू होणार असल्याचे सांगितले. आपली मागणी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण गाडी लवकर सुरू झाली नाही, तर नाइलाजाने उग्र आंदोलन करावे, लागेल, असा इशाराही त्यांनी श्री. गावित यांना दिला. मात्र तशी वेळच येऊ देणार नाही. गाडी लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही श्री. गावित यांनी दिली.
बोरिवली ते विरार या पट्ट्यात कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्या वसईमार्गे जातात. पण या गाड्या नियमित नाही आहेत. तसेच या गाड्या कोकणातील काही मोजकेच थांबे घेतात.शिवाय त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना दादर या स्थानकावर यावे लागत आहे. वेळेचा अपव्यय तर होतोच पण खूप त्रास सहन करावा लागत आहे.
वसई टर्मिनसहून रत्नागिरी, सावंतवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे केली जात आहे. खासदार श्री. गावित यांनी ती मागणी पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे.
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी काही गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्र. २२९०८ हापा ते मडगाव एक्स्प्रेसला २९ मार्च रोजी स्लीपर कोच१ , परतीसाठी गाडी क्र. २२९०७ मडगाव हापा एक्स्प्रेसला ३१ मार्च रोजी एक डबा जोडण्यात येणार आहे.
गाडी क्र. २२४७५ हिसार ते कोइम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला टू टायर एसी एक कोच दिनांक ०५ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. परतीसाठी २२४७६ कोईम्बतूर जं.- हिसार जं. साप्ताहिक एक्स्प्रेसला दिनांक ०८ एप्रिल ते २९ एप्रिल पर्यंत जादा डबा जोडण्यात येणार आहे.
Indian Railway News :पॅरिसमधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा 35 मीटर उंच असणारे चेनाब रेल्वे पूल पूर्ण झाले असून काल दिनांक 26 मार्च रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीत उधमपुर – श्रीनगर – बारामुल्ला या रेल्वे मार्गावर एक चाचणी पण घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून लवकरच हा पूलाचे लोकार्पण करण्याची आशा आहे.
जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रिज ठरणार आहे. यामुळे भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे. ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.
1315 मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे. चेनाब ब्रिजमध्ये, 93 डेक सेगमेंट (deck segment), ज्याचे प्रत्येकी वजन सुमारे 85 टन आहे, एकाच वेळी दरीच्या दोन्ही टोकांवरून शक्तिशाली स्टील आर्चवर बसविले गेले आहेत.
कोकण रेल्वेच्या मदतीनं पुलाची उभारणी
उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) यांची चिनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेची मदत झाली आहे. तसेच मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Hon’ble Minister of Railways, Shri Ashwini Vaishnaw conducted the trolley inspection of the Chenab bridge on 26.03.23,the world's highest railway bridge. Konkan Railway is proud to be a part of the execution of the prestigious Udhampur-Srinagar-Baramulla Rail Link (USBRL)Project pic.twitter.com/BN95nQDSft
मुंबई – एकीकडे नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाडयांना दक्षणेकडील राज्यात थांबे देण्याचा सपाटा लावला असताना अनेक वेळा आंदोलने करूनही रेल्वे प्रशासनाने या गाडयांना संगमेश्वर रोड या स्थानकावर प्रायोगिक तत्वावरसुद्धा थांबा दिला नसल्याने संगमेश्वरवासीय प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपली नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना ‘पत्र लिहा’ हे अनोखे आंदोलन संमेश्वरवासियांनी सुरु केले आहे.
नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड थांब्या संदर्भात संयुक्त बैठक घेण्याबाबत प्रवाशांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जन शिकायत कार्यालय, पहिला मजला, चर्चगेट रेल्वे स्टेशन, मुंबई-400020 येथे पाठवावे असे सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या घरामधील जेवढे सदस्य आणि मित्र परिवार मंडळी असतील त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फ्रॉम भरून एकत्र पोस्टाने पाठवावे. आणि त्याची पावती 9819200887 ह्या नंबर वर पाठवणे असेही आवाहन केले गेले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या पत्राची प्रिंट काढून आपला नाव, पत्ता व संपर्क भरून रेल्वे राज्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पाठवल्यास संगमेश्वर रोड थांब्यासंदर्भातील संयुक्त बैठक घेण्याबाबत विचार होईल आणि आपल्या मागणी संदर्भात विचार करण्यास भाग पडेल असा या आंदोलनाच्या मागे हेतू आहे.
दिवा शहरात जोरदार प्रतिसाद
आज दिवा शहरातील कोकणवासीय प्रवाशांनी या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद देत याविषयी संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांना पत्रे लिहुन मागणी केली आहे. आज दिवा शहरातील कोंकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अवघ्या दोन तासात सुमारे 1743 मागणीपत्रे तयार करून देऊन उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. अजुनही हजारो प्रवाशी अशी मागणीपत्र देणार असुन ती लवकरच रेल्वे राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवण्यात येतील असे पत्रकार श्री संदेश जिमन यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नेत्रावती तसेच गांधीधाम एक्सप्रेसला दक्षिण गोव्यातील काणकोण स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम ( १६३४५ ) या डाऊन नेत्रावती एक्सप्रेसला दि. 2 एप्रिलपासून तर अप दिशेने धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसला( १६३४६) 1 एप्रिल 2023 पासून प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
तसेच कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नागरकोईल ते गांधीधाम ( 16336 ) एक्सप्रेसला दिनांक 4 एप्रिल पासून तर गांधीधाम ते नागरकोईल ( 16335 ) या गाडीला दि. 7 एप्रिल 2023 पासून दक्षिण गोव्यातील काणकोण स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेने दक्षिणेकडील राज्यातील स्थानकांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे देण्याचा सपाटा लावला असून महाराष्ट्रातील काही स्थानकांना या गाड्यांचे थांबे देण्यात यावे अशी वारंवार मागणी केली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच महिन्यात नेत्रावती एक्सप्रेसला भटकळ आणि कुंदापूरा या स्थानकांवर थांबे मंजूर करण्यात आले आहेत, तर मत्सगंधा एक्सप्रेसला बारकुर येथे थांबा देण्यात आला आहे. तसेच गरिबरथ एक्सप्रेसला अंकोला येथे थांबा देण्यात आला आहे. नेत्रावती एक्सप्रेस या गाडीच्या थांब्यासाठी पाठपुरावा केल्या जाणाऱ्या संगमेश्वर स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर का होईना थांबा मंजूर करण्याबाबत मात्र रेल्वेने कोणतेही पाऊल उचललेले नाही.
मुंबई – पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण, योगेश सागर, शेखर निकम, नाना पटोले, डॉ. देवराव होळी यांनी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामाबाबतची लक्षवेधी मांडत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची कराड ते चिपळूण प्रकल्पाची संकल्पना अनेक वर्षे चर्चेत आहे. २०१२ साली तत्कालीन आघाडी मंत्रिमंडळाने हा प्रकल्प केंद्र सरकारने 50 तर राज्य सरकारने 50 टक्के खर्च करून अमलात आणावा असा निर्णय घेतला. त्याला मान्यता देत निधीही देण्याची घोषणा केली. मात्र, काही दिवसांनी हा प्रकल्प 26 टक्के कोकण रेल्वे व 74 टक्के व्यावसायिक शापूरजी पालनजी कंपनीने करावा, असा निर्णय घेतला गेला. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला आले. त्यांच्या हस्ते भुमिपुजन पण केले.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे-बंगळूर हा महामार्ग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औदयोगिक प्रकल्प आहेत. आणि कोकण जरी अविकसित असला तरी या याठिकाणी मोठी जलसंपदा, बंदरे आहेत. पुढे सरकारने समृद्धी महामार्गालाप्राधान्य द्यायचे ठरवले. मात्र, या रेल्वे मार्गाला कमी लेखण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सातारा जिल्ह्यातील आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याचा त्याचा विचार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या प्रकल्पासाठी काही त्रुटी आहेत त्या दूर करून मुख्यमंत्री शिंदे या रेल्वेमार्गाला चालना देणार का?असा प्रश्न अधिवेशनात चव्हाण यांनी उपस्थित केला.
या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे म्हणाले की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रास जोडणाऱ्या चिपळूण – कराड रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल.
श्री. भुसे पुढे म्हणाले की, कराड- चिपळूण नवीन रेल्वे लाईन प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र शासनाचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला असून 7 मार्च 2012 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी या प्रकल्पाची किंमत 928.10 कोटी रुपये होती, त्यानुसार राज्य शासनाची 50 टक्के हिश्श्याची रक्कम 464.05 कोटी इतकी होती तर केंद्र शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पुढील तीन वर्षात द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या दरम्यान कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारीत अंदाजित रक्कम 3 हजार 196 कोटी झाली.
रेल्वे मंत्रालयाने सहभाग धोरण 2012 अंतर्गत चिपळूण- कराड रेल्वेमार्गास संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यास मंजुरी दिली. या उपक्रमात मेसर्स शापूरजी पालनजी यांची भागीदार म्हणून निवड करण्यात आली आणि भविष्यकालीन संयुक्त उपक्रम म्हणून कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांचे दरम्यान प्रत्येकी 26 टक्के आणि 74 टक्के या प्रमाणात सहभाग निश्चितीचा करार करण्यात आला. दरम्यानच्या काळात हा प्रकल्प व्यवहार्य नसून या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे कंपनीने pस्पष्ट केले . यानंतरच्या काळात केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी राज्य शासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने 80 टक्के भार उचलावा, असे राज्य शासनास कळविले. मात्र राज्यासमोरील परिस्थिती पाहता समप्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली, यावर केंद्राकडून अद्याप काही कळविण्यात आलेले नसल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून कराड – चिपळूण आणि वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी – कोल्हापूर या रेल्वे प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचा समावेश पिंकबुक मध्ये करण्यात आला आहे. कराड – चिपळूण रेल्वेमार्गासाठी पुन्हा एकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.