Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: अखेर गोंधळ मिटला! ३ गाड्यांचे मान्सून काळातील आरक्षण सुरू होणार!

   Follow us on        

Konkan Railway: आगामी मान्सून कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांमध्ये सध्या काहीसा गोंधळ उडाला आहे. आयआरसीटीसी (IRCTC) आणि इतर रेल्वे बुकिंग ॲप्सवर मान्सून काळातील तीन गाड्यांचे आरक्षण दिसत नसून, तिथे थेट ‘ट्रेन कॅन्सल’ (Train Cancelled) असा संदेश दाखवला जात होता. यामुळे ऐन पावसाळ्यात गाड्या रद्द झाल्या की काय, अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली होती. वास्तविक पाहता, सुरक्षिततेच्या कारणास्तव पावसाळ्यात या मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या कमी केल्या जातात आणि याच बदलांमुळे हे आरक्षण तात्पुरते थांबवण्यात आले होते.

​या गोंधळानंतर कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने (Konkan Railway Corporation) अधिकृत सूचना जारी करत प्रवाशांना दिलासा दिला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावर येत्या १५ जून २०२६ पासून पावसाळी वेळापत्रक (Monsoon Timetable) लागू होणार आहे. याच नवीन वेळापत्रकाच्या अंमलबजावणीसाठी बुकिंग थांबवण्यात आले होते. आता या गाड्यांचे मान्सून काळातील आरक्षण ४ जून २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

​’या’ ३ गाड्यांच्या आरक्षणाची मिळणार सुविधा

​पावसाळी वेळापत्रकामुळे फेऱ्या कमी झालेल्या पुढील तीन प्रमुख गाड्यांचे आरक्षण ४ जूनपासून खुले होईल:

​मुंबई सीएसएमटी – मडगाव – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्र. २२२२९ / २२२३०)

​मुंबई सीएसएमटी – मडगाव – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस (ट्रेन क्र. २२११९ / २२१२०)

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (ट्रेन क्र. ११०९९ / १११००)

प्रवासी उद्यापासून (४ जून) सर्व रेल्वे पीआरएस (PRS) काउंटर्स, तसेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे आपले तिकीट बुकिंग करू शकतात. पावसाळ्यात या तिन्ही गाड्यांच्या फेऱ्या मर्यादित असणार असल्याने प्रवाशांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Konkan Railway: जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये कुजकी फळे विकण्याचा प्रकार; विक्रेत्यावर कारवाई

   Follow us on        

रत्नागिरी:

मागील आठवड्यात प्रवाशांना खराब कलिंगडापासून बनवलेले फ्रूट सॅलड विकण्याचा प्रकार कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका गाडीत झाला होता. या प्रकारामुळे रेल्वे गाड्यांतून विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थाच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकारांनंतर रेल्वे प्रशासनाने अनधिकृत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी १५ दिवसांची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कालच प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका अनधिकृत विक्रेत्यावर कोकण रेल्वेने कठोर कारवाई केली आहे.

मडगाव-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कुजलेली फळे विक्रीसाठी ठेवून प्रवाशांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे प्रशासनाने दंड ठोठावला आहे. या व्यक्तीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ताब्यात देण्यात आले आहे.

​नियमित तपासणीदरम्यान गैरप्रकार उघडकीस

​ही कारवाई ३१ मे रोजी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. रेल्वेच्या नियमित तपासणीदरम्यान संबंधित व्यक्ती कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय रेल्वे डब्यांमध्ये फळांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासणी केली असता, विक्रीसाठी ठेवलेल्या फळांचा दर्जा अत्यंत खराब असून ती कुजलेली असल्याचे आढळले. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीकडे कोणताही वैध परवाना किंवा ओळखपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर रेल्वे नियमांनुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि पुढील तपासासाठी त्याला रत्नागिरी येथील आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.

​१५ दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू

​दरम्यान, प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी कोकण रेल्वेने ३१ मेपासून १५ दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. वाणिज्य विभाग आणि आरपीएफच्या संयुक्त पथकांकडून रेल्वे स्थानकांवर तसेच धावत्या गाड्यांमध्ये ही धडक तपासणी केली जात आहे.

​या विशेष मोहिमेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

​अनधिकृत विक्री आणि फेरीवाल्यांना आळा घालणे.

​खाद्यपदार्थांसाठी होणारी अवाजवी दर आकारणी रोखणे.

​निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि इतर गैरप्रकारांवर कायदेशीर कारवाई करणे.

​रेल्वेमधील स्वच्छता व प्रवासी सेवांचा दर्जा कायम राखणे.

​रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन:

कोकण रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गाड्यांमध्ये किंवा स्थानकांवर अनधिकृत विक्रेते अथवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास प्रवाशांनी तातडीने रेल्वे प्रशासन किंवा आरपीएफकडे आपली तक्रार नोंदवावी.

कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती; थेट ‘वॉक-इन’ मुलाखतीद्वारे सुवर्णसंधी

   Follow us on        

मुंबई:

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL), भारत सरकारचा उपक्रम, यांच्यामार्फत विविध पदांसाठी कंत्राटी (करार) तत्त्वावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून थेट ‘वॉक-इन’ (Walk-in) मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या रोजगार अधिसूचना क्रमांक ७सी/२०२६, ८सी/२०२६ आणि ९सी/२०२६ नुसार, विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

​मुलाखतीची प्रक्रिया ८ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना पार पडणार आहे.

​प्रमुख पदे आणि एकूण जागांचा तपशील:

​जाहिरातीमध्ये दिलेल्या अधिसूचनेनुसार पदांची नावे आणि मुलाखतीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

अर्ज कसा करावा?

  • ​उमेदवारांनी अधिसूचना, पात्रता निकष इत्यादी तपशीलांसाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अधिकृत संकेतस्थळ: www.konkanrailway.com
  • ​संकेतस्थळावर गेल्यानंतर नियुक्ती \rightarrow वर्तमान अधिसूचना या लिंकवर क्लिक करून माहिती पाहावी आणि त्यानुसार अर्ज करावा, असे मुख्य कार्मिक अधिकारी यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Konkan Railway: प्रवाशांच्या जिवाशी खेळ! विक्रेत्याकडून सडक्या कलिंगडाचे ‘फ्रूट सॅलड’ विकण्याचा प्रकार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी ते मुंबई रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रेत्याकडून प्रवाशांना चक्क वास मारणारे, खराब झालेले ‘फ्रुट सॅलड’ विकण्यात आले. या सॅलडमधील कलिंगड पूर्णपणे सडलेले होते आणि त्याला दुर्गंधी येत होती. हा प्रकार लक्षात येताच रेल्वेतील प्रवासी प्रचंड आक्रमक झाले.

संबंधित विक्रेत्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणत्याही कंपनीचे किंवा ठेकेदाराचे नाव व संपर्क क्रमांक नव्हता. तसेच रेल्वेचे टी-शर्ट घालून फिरणाऱ्या या विक्रेत्यांकडे साधे ओळखपत्रही नव्हते. यावरून ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य ॲड. नकुल पार्सेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. “अशा खराब अन्नपदार्थांमुळे प्रवाशांना विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी रेल्वे निरीक्षकांना विचारला.

​या घटनेची दखल घेत रेल्वे टीसी आणि निरीक्षकांनी संबंधित कंपनीला केवळ १,००० रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, प्रवाशांनी या किरकोळ कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी ठेकेदारांना मोठा दंड करून त्यांचे थेट कंत्राट (ठेके) रद्द करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली. कोकण रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ट्रेनमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रकाराबाबत आता काही जागरूक प्रवासी ऑनलाइन तक्रार देखील दाखल करणार आहेत.

Konkan Railway: फुकट्या प्रवाशांची आता खैर नाही; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तपासणी तीव्र

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आपल्या मार्गावर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नुकत्याच संपलेल्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात कोकण रेल्वेने ९३४ तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या कारवाई दरम्यान तब्बल ३७,००० विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २.९० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच, आर्थिक वर्ष २०२५-२६ या संपूर्ण वर्षभरात रेल्वेने एकूण ११,३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या वर्षभराच्या मोहिमेत ४,९९,६७५ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २७.६८ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आगामी उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता, कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त समन्वयाने ही मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि त्रासमुक्त होईल. कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकिटासह सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror App’ डाऊनलोड करावे, असेही रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

 

मडगाव-पनवेल स्पेशल गाडीच्या डब्याला भीषण आग; घातपाताचा संशय

   Follow us on        

मडगाव, ता. २९: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी एका मोठ्या दुर्घटनेत मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाडीच्या एका डब्याला दुपारी २:५० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही गाडी पनवेलच्या दिशेने रवाना होणार असल्याने स्थानकाच्या आउटर ट्रॅकवर उभी करण्यात आली होती. अचानक इंजिनलागतच्या डब्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत १४ अग्निशमन सिलिंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की ती काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि यात रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने, घटना घडली तेव्हा गाडीत एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

​आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलत आग लागलेला डबा इतर डब्यांपासून वेगळा केला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे मार्गावरील २५ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी तात्काळ बंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानक परिसरात अग्निशमन बंबाला थेट आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. अखेर जवानांनी ईएसआय इस्पितळासमोरील जागेत अग्निशमन बंब उभे केले आणि तेथून लांब पाईप्स जोडून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.

​दरम्यान, प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसून, ती कोणीतरी मुद्दामहून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेत घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची कोकण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल.

प्रवाशांना खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावरील अजून एक गाडी नियमितपणे धावणार


   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत स्पेशल ट्रेन (०९०५७ / ०९०५८) आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन आता नवीन क्रमांकासह म्हणजेच ट्रेन क्रमांक १९०५७ / १९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत (बाय-वीकली) एक्सप्रेस म्हणून आठवड्यातून दोनदा धावणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण भारत, कोकण आणि गुजरातला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि निश्चित होणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १९०५७ सुरत – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस दिनांक ३ जून २०२६ पासून दर बुधवार आणि रविवारी सुरत स्थानकावरून संध्याकाळी १९:३५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू जंक्शन – सुरत एक्सप्रेस दिनांक ४ जून २०२६ पासून दर गुरुवार आणि सोमवारी मंगळुरू जंक्शनवरून रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरत स्थानकावर पोहोचेल.

​या एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय गुजरात आणि गोव्यातील प्रमुख स्थानकांसह कर्नाटकच्या किनारपट्टीवरील मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी यांसारख्या ३0 हून अधिक स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. यामुळे कोकण पट्ट्यातील आणि इतर भागांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या ट्रेनची रचना एकूण २० डब्यांची असणार आहे, ज्यामध्ये २ टायर एसीचा १ कोच, ३ टायर एसीचे ७ कोच, स्लीपर क्लासचे ६ कोच, जनरलचे ४ कोच आणि एसएलआर/डी चे २ डबे समाविष्ट असतील. प्रवाशांना या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती मिळवण्यासाठी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेने विशेष ब्लॉकचा कालावधी वाढवला; अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मेन लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे लागू करण्यात आलेल्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला रेल्वे प्रशासनाने आता १३ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत निवडक मेल/एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर आणि ठाणे स्थानकांवरच ‘शॉर्ट टर्मिनेट’ (प्रवास आधीच संपवणे) केल्या जातील.

​ब्लॉक वाढवण्याचे कारण काय?

​रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (RLDA) द्वारे सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिकीकरण आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत.

​यापूर्वी हा ब्लॉक दिनांक ०१.०२.२०२६ ते २६.०४.२०२६ पर्यंत लागू करण्यात आला होता, त्यानंतर तो १९.०५.२०२६ पर्यंत वाढवला गेला आणि आता कामाची व्याप्ती पाहता ही मुदत १३ जून २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

​या गाड्या धावणार फक्त दादर आणि ठाणे पर्यंतच

​दिनांक १३.०६.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या (JCO) खालील गाड्या सीएसएमटी पर्यंत न जाता आधीच थांबवल्या जातील:

​१. दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:

​गाडी क्र. १२११२: अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११००२: बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस

​गाडी क्र. १२८१०: हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११M२०: भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१४४: बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१०८: लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१२०: मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

​२. ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी:

​गाडी क्र. १२१३४: मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​रेल्वे प्रशासनाचे आवाहन

“पायाभूत सुविधांची देखभाल, सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी हे ब्लॉक्स अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे,” असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलांचा विचार करून करावे.

Konkan Railway: चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेची विशेष सोय; मडगाव – सीएसएमटी दरम्यान धावणार ‘वीकेंड स्पेशल’

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव (MAO) दरम्यान विशेष ‘टॉड’ (TOD Special) ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १-१ फेरी (01 Trip) चालवली जाणार आहे. शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी ही गाडी धावणार आहे.

​खालीलप्रमाणे या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि वैशिष्ट्ये आहेत:

​गाडी संख्या ०११७३ (सीएसएमटी ते मडगाव स्पेशल)

​दिवस: शनिवार, ३० मे २०२६

​प्रस्थान: मुंबई CSMT वरून रात्री ००:२५ वाजता (शुक्रवारची मध्यरात्र) सुटेल.

​आगमन: मडगाव (Madgaon) येथे त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता पोहोचेल.

​एकूण प्रवास वेळ: १३ तास ०५ मिनिटे.

 

​गाडी संख्या ०११७४ (मडगाव ते सीएसएमटी स्पेशल)

​दिवस: शनिवार, ३० मे २०२६

​प्रस्थान: मडगाववरून दुपारी १६:०० वाजता सुटेल.

​आगमन: मुंबई CSMT येथे रविवारी (३१ मे २०२६) पहाटे ०३:४५ वाजता पोहोचेल.

​एकूण प्रवास वेळ: १३ तास ३० मिनिटे.

​या गाडीचे थांबे 

दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सवर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी

​कोचची रचना (Composition):

या ट्रेनला एकूण २२ डबे (Coaches) असतील. यामध्ये:

​१६ GSCN (स्लीपर क्लास)

​२ GS + २ GSCN (अनारक्षित/General श्रेणीसाठी)

​२ SLR (गार्ड आणि ब्रेक व्हॅन)

​इंजिन: ही ट्रेन पूर्णपणे इलेक्ट्रिक (Electric Traction) इंजिनवर धावेल.

​महत्त्वाची नोंद: वीकेंडला कोकणात जाणाऱ्या किंवा मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रवाशांनी आरक्षणाची स्थिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण: मधु दंडवते यांचा गौरव की ऐतिहासिक ओळखीचा प्रश्न?

   Follow us on        

मुंबई, २७ मे २०२६: महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (२६ मे) मंत्रिमंडळ बैठकीत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय कोकण रेल्वेच्या शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ घेण्यात आला असून, तो कोकणवासीयांच्या दीर्घकाळाच्या मागणीचा परिपाक मानला जात आहे. मात्र, या निर्णयाने काहींमध्ये ऐतिहासिक ओळख हरवण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या (रेल्वे आणि गृह मंत्रालय) अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सावंतवाडी रोड हे नाव अधिकृतपणे बदलले जाईल.

या निर्णयाचे कोकणात मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, स्थानिक नेते आणि सामान्य जनतेकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

“कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करणाऱ्या मधु दंडवते यांना योग्य सन्मान मिळाला,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी सांगितले की, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. “कोकणवासीयांच्या हृदयातील नेत्याला त्यांच्या योगदानानुसार गौरव मिळाला,” असे मत व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी “ऐतिहासिक निर्णय”, “अभिमानाची बाब” आणि “पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा” असे शब्द वापरले.

मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या वारशाचा सन्मान मानला जातो.

काही आक्षेप: “सावंतवाडी नाव जपावे”

जरी सकारात्मक प्रतिसाद प्रबळ असला तरी, काही लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे मुख्यतः सोशल मीडियावर दिसले:

“सावंतवाडी हे नाव शतकानुशतके जुने आणि स्थानिक इतिहास, संस्कृतीशी जोडलेले आहे. त्यामुळे मूळ नाव बदलल्याने स्थानिक ओळख हरपेल,” असा आक्षेप काहींनी नोंदवला.

काहींना वाटते की मधु दंडवते यांचा जास्त संबंध राजापूरशी होता, त्यामुळे त्या स्टेशनला नाव देणे अधिक योग्य ठरले असते.

“नेत्यांचा आदर दुसऱ्या माध्यमातून करावा, पण रेल्वे स्थानकाचे मूळ नाव कायम ठेवावे,” असे मतही व्यक्त झाले.

मात्र, हे आक्षेप व्यक्तिगत पातळीवर आहेत आणि मोठ्या संघटना किंवा मुख्य माध्यमांमध्ये तीव्र विरोध दिसला नाही.

सरकारने स्पष्ट केले की, हा निर्णय कोकणातील जनभावनांचा आदर करणारा आहे. प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याने लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानक कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. नामकरणानंतर प्रवाशांना नव्या नावाची सवय होण्यास काही काळ लागेल, असे प्रवासी म्हणतात. हा निर्णय कोकण रेल्वेच्या विकासात एक नवा अध्याय ठरू शकतो.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search