वेंगुर्ले:
मडगाव-वेळांकणी एक्सप्रेस (गाडी क्र. १७३१५) ही रेल्वे मडगावऐवजी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजपचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, पूर्वीप्रमाणे सावंतवाडी रोड स्थानकावर या गाडीला अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावी.
आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वेळांकणी येथील यात्रेसाठी सिंधुदुर्गातून हजारो भाविक जात असतात. मात्र, २०२२ पासून सावंतवाडी स्थानकावर अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा बंद करण्यात आल्यामुळे सध्या भाविकांना मडगावपर्यंत जाऊन ही ट्रेन पकडावी लागते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा वाया जात असून मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी ही रेल्वे सावंतवाडीतूनच सुरू करावी किंवा पूर्वीसारखी डबे जोडण्याची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देताना विष्णू उर्फ पप्पू परब यांच्यासोबत सायमन आल्मेडा उपस्थित होते.


