मुंबई: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका प्रकल्पात रेल्वे प्रशासनाकडून मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. दक्षिण मुंबईतील जागेची टंचाई, दाट लोकवस्ती आणि जवळपास ५५० प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान लक्षात घेता, आता परळ ते सीएसएमटी दरम्यानची जलद उपनगरी (लोकल) मार्गिका थेट भूमिगत करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार, भायखळा हे एकमेव स्थानक भूमिगत केले जाण्याची शक्यता असून मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) सध्या या पर्यायाची व्यवहार्यता तपासण्यासाठी सर्वेक्षण करत आहे. या तांत्रिक अभ्यासासाठी जपानच्या ‘पाडेको’ (PADECO) या नामांकित अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या १७.५ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील कुर्ला ते परळ (१०.१ किमी) या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे, मात्र परळ ते सीएसएमटी (७.४ किमी) या दुसऱ्या टप्प्यातील काम जागेच्या अनुपलब्धतेमुळे रखडले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित जागेत केवळ एकच अतिरिक्त मार्गिका उभारणे शक्य आहे. त्यामुळे नव्या नियोजनानुसार, विद्यमान तिसरी आणि चौथी जलद मार्गिका दादरपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी राखीव ठेवली जाईल आणि जलद लोकल मार्गिका भूमिगत केली जाईल. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी लोकल वाहतुकीचे अधिक प्रभावी विभाजन करणे शक्य होणार आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्या जड असल्याने त्यांना तीव्र चढ-उतारांवरून धावणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते, तर लोकल गाड्यांमध्ये मल्टिपल मोटर डबे असल्याने त्या तीव्र चढ सहज पार करू शकतात; म्हणूनच लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी केवळ लोकल मार्गिकाच भूमिगत करणे तांत्रिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य मानले जात आहे. भूसंपादनाचा तिढा सुटण्यास यामुळे मदत होणार असली, तरी जलद मार्गिका भूमिगत केल्यास या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च मूळ अंदाजाच्या तुलनेत थेट अडीच ते तीन पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सल्लागार कंपनीचा अंतिम आराखडा आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.


