वर्धा / सिंधुदुर्ग:
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वी वर्धा येथे अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘शक्तीपीठ महामार्ग शेतकरी संवाद’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या संवाद कार्यक्रमात महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. मिश्रा सर, वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महामंडळाचे मुख्य अभियंता यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसन केले. या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार, १५ जुलै २०२६ आणि गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता ‘दूरदर्शन सह्याद्री’ वाहिनीवर करण्यात येत आहे. महामार्गाबाबतची अधिकृत माहिती आणि शासकीय भूमिका समजून घेण्यासाठी सर्व नागरिकांनी व विशेषतः शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा महामार्ग ज्या गावांतून जात आहे, त्या सर्व गावांमधील संबंधित शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, फुकेरी, झोळंबे तसेच सावंतवाडी तालुक्यातील केगद, उडेली, नेने, फणसवडे, डेगवे, बांदा, घारपी, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव आणि पडवे या गावांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित गावांमधील स्थानिक सुजाण नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना हा संवाद कार्यक्रम पाहण्याची विनंती करावी, जेणेकरून थेट प्रशासनाकडून मिळणारी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल.


