Category Archives: कोकण

Sawantwadi Terminus: “आता नाही तर कधीच नाही…..”

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व दीपकभाई केसरकर यांना घेऊन २७ जून २०१५ सावंतवाडी टर्मिनसचा शिलान्यास केला होता. तेव्हा कोकणी जनता आणि मुंबईस्थित चाकरमानी या घटनेने सुखावले होते, मात्र त्यानंतर या टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत पूर्ण झाले नाही आहे. २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ असा नारा त्यांनी दिला होता. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते नुसते आलेच नाही तर पक्षाच्या विक्रमी जागांसह सत्तेवर आले आहेत. त्यामुळे आता तरी ते सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करतील अशी आशा समस्त कोकणकरां कडून करण्यात येत आहे.

आता नाही तर कधीच नाही...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विकासासाठी पोषक राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात केंद्रात आणि राज्यात महायुतीचा दबदबा आहे. जिल्हय़ातील सर्वच आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस आणि ईतर रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी एक सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार नारायण राणे आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगले संबध निर्माण झाले आहेत. आमदार दिपक केसरकर यापुर्वीपासूनच सावंतवाडी टर्मिनस साठी आग्रही आहेत आणि त्यांच्या परीने ते त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सावंतवाडी टर्मिनस साठी लागणार्‍या पाण्यासाठी तिलारी प्रकल्पातून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असल्याचेही मागे सांगितले होते. मात्र त्यासाठी मोठी दिरंगाई होताना दिसत आहे. सध्याची केंद्रीय, राज्यातील आणि जिल्हय़ातील राजकिय परिस्थिती पाहता हे काम पूर्ण करून घेण्यासाठी हीच नामी संधी आहे.

 

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी चा पाठपुरावा 

सावंतवाडी येथे टर्मिनस व्हावे, येथे महत्त्वाच्या गाडय़ांना थांबा मिळावा आणि ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करत आली आहे. विविध माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती केली तर आहे त्याबरोबरच आपला मागण्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी संघटना आग्रही आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येवून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१५ साली त्यांनी सावंतवाडी टर्मिनसचे जे स्वप्न त्यांनी कोकणी जनतेला दाखवले होते ते लवकरच पूर्ण करतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.

 

 

 

 

 

 

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ६ गाड्यांच्या जनरल डब्यांत तात्पुरत्या स्वरूपात कपात

   Follow us on        

Konkan Railway Updates:कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. तब्बल सहा गाड्यांच्या डब्यांच्या बदल करण्यात येणार असून खासकरून या गाड्यांचे जनरल डबे कमी करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे.

१६३३४ / १६३३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस

सध्याची रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, 3 टियर एसी इकॉनॉमी – ०२ ,स्लीपर – ०७ ,जनरल  – ०४ , पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, ३ टियर एसी इकॉनॉमी – ०३ ,स्लीपर – ०७ ,जनरल  – ०२, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

दिनांक ०२ डिसेंबर २०२४ ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.

१६३१२/ १६३११ कोचुवेली – श्रीगंगानगर -कोचुवेली एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल  -०४, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना – टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०७,जनरल  – ०३, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

दिनांक ०७ डिसेंबर २०२४  ते २४ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.

२२६३४ / २२६३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल  – ०४, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१

सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल  – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१

दिनांक ०४ डिसेंबर २०२४  ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी  चालविण्यात येणार आहे.

२२६५३ / २२६५४  तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल  -०४, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल  -0२, जनरेटर कार – ०२

दिनांक ०७ डिसेंबर २०२४  ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी  चालविण्यात येणार आहे.

२२६५५ / २२६५६ एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०३, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – २, जनरेटर कार – ०२

दिनांक ११ डिसेंबर २०२४  ते २७  डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी  चालविण्यात येणार आहे.

२२६५९ / २२६६० कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना -०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ०२, जनरेटर कार – ०२

दिनांक ०६  डिसेंबर २०२४  ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘या’ गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज

कोकण रेल्वेच्या गाड्यांत जास्त मागणी आणि मर्यादित आसन उपलब्धता यामुळे वर्षभर गर्दी होत आहे. सध्या कोंकण रेल्वे मार्गाचा वापर दर Utilization  Rate 168% आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर ट्रेनची क्षमता वाढवण्याची तातडीची गरज आहे. सध्या कोकणरेल्वे, मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे या विभागातर्फे  कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या  काही गाड्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत नसून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी वाव आहे. कोकण विकास समितीने रेल्वे बोर्ड, विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री आणि  संबधीत आस्थापना आणि लोकप्रतिधींना या गोष्टीसाठी एक इमेलद्वारे मागणी केली आहे. या मागणी मध्ये कोकण रेल्वे मार्गावरील ज्या गाडयांची क्षमता वाढवता येणे शक्य आहे अशा गाड्यांची यादी आणि बदलांच्या शिफारशी देण्यात आल्या आहेत.
या शिफारशींची पूर्तता केल्याने अंदाजे 3,691 आसनांची (दररोज सुमारे 46 डबे) क्षमता वाढेल, ज्यामुळे प्रवाशांची सोय लक्षणीयरीत्या वाढेल आणि या अत्यंत वापरल्या जाणाऱ्या मार्गावरील गर्दी कमी होईल. नवीन रेल्वे सेवेची मागणी पाहता, या वाढीमुळे प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळेल असे कोकण विकास समितीचे  जयवंत दरेकर यांनी या ई-मेल मध्ये नमूद केले  आहे.

Loading

आंबोली-दोडामार्ग पट्ट्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व अधोरेखित; आतापर्यंतच्या विक्रमी संख्येची नोंद

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर वाघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे.
वनविभाग, सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारी ते मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्गमध्ये आठ वाघांचे अस्तित्व वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. हे वाघ सावंतवाडी तालुक्यातील आंबोली दोडामार्ग पट्ट्यात आढळून आले आहेत.
वनशक्ती संस्थेने मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असून तो भाग संरक्षित करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिकेला दाखल केली आहे. दीर्घकाळ यावर सुनावणी सुरु आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याचे वन शक्तीने वेळोवेळी उच्च न्यायालयात सांगितले आहे. आता भागात विक्रमी नोंद झाल्याने या झाल्याने या मागणीला बळ मिळाले आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाडी; आरक्षण ‘या’ तारखेपासून सुरु

Konkan Raiwlay:या महिन्यात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. पश्चिम रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर एक दिनांक ०८ डिसेंबर पासून एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालविणार आहे. या गाडीच्या एकूण १६ फेऱ्या होणार असून या गाडीचे आरक्षण दिनांक ०७ डिसेंबर रोजी पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या गाडी बद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे
०९४१२/०९४११ अहमदाबाद – थिवी  – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष (एकूण १६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून दिनांक ०८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ पर्यंत दर रविवार आणि बुधवार या दिवशी दुपारी १४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी  ११ वाजता थिवी  येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९४११ विशेष थिवी येथून दिनांक ०९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ पर्यंत दर सोमवार आणि गुरुवार या दिवशी सकाळी ११:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०८:४५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
थांबे:  आनंद,वडोदरा, भारूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी
ही गाडी एसी टू टायर, एसी थ्री टायर, स्लीपर क्लास आणि जनरल कोचसहीत चालविण्यात येणार आहे.

Loading

देवरुख: महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाआरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.

शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.

Loading

“कोकण रेल्वेला २ वंदे भारत एक्सप्रेससह एकूण ७ नव्या गाड्या दिल्यात; मात्र विलिनीकरण करण्याचे काम…… ” – केंदीय रेल्वेमंत्री

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सध्या सोसाव्या लागत असलेल्या अनेक गैरसोयीवर उपाय असलेल्या कोकण रेल्वे विलिनीकरणच्या प्रश्नाला आता खासदार संसदेत मांडत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चार राज्यांच्या हक्क सोडण्यावर कोकण रेल्वेचे विलीनीकरण अवलंबून असल्याने ते काहीसे किचकट आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे.

कंपनी अॅक्टनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची नोंदणी झाली आहे. यात भांडवली खर्चासाठी भारतीय रेल्वे, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, केरळ आणि गोवा सरकार यांनी गुंतवणूक केली आहे. 25 वर्षांपासून कोकण रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालय भागीदार असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खर्च चार राज्ये करत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करणे हे चार राज्यांच्या हक्क सोडण्याच्या अटीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ केंद्र सरकारचा नसून चार राज्यांच्या अखत्यारितील ही आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रोहा ते वीर सेक्शनचे दुपदरीकरण, अतिरिक्त थांबे यावर भर देतानाच प्रवाशांना सोयीसुविधा देण्यावरही भर दिला दिला गेला आहे  असे उत्तर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर गेल्या पाच वर्षांत सात नवीन ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत त्यात दोन वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. प्रवासी तसेच स्थानिकांच्या सोयीसाठी ओव्हरब्रिज, सबवे, पाथवे, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे ते म्हणाले.

कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी अशी मागणी राज्यसभेत केल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानले आहेत.

”अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल. त्यासाठी संसदेत पाठपुरावा केल्याबद्दल आपलेही नाव इतिहासात नोंदवले जाईल यात शंका नाही. लवकरच आपली भेट घेऊन आम्ही आमची भूमिका आणखी विस्तृतपणे मांडू. तूर्तास आपले खूप खूप आभार.” या शब्दात पत्र आणि ईमेल पाठवून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र ने यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती संघटनेचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.

Loading

Sindhudurg Submarine Project: पर्यटकांना जवळून पाहता येणार समुद्री विश्व

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आशादायक असलेल्या पाणबुडी प्रकल्पासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे गेले काही वर्ष रखडलेला वेंगुर्ले निवती समुद्रातील प्रस्ताविक पाणबुडी प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. सन २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले निवती रॉक जवळ समुद्रात पाणबुडी प्रकल्प होणार होता.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता आला असता, समुद्रातील अंतरंगात असलेला खजिना यामुळे न्याहाळत सफर झाली असती. आता केंद्र सरकारने निधी दिला असल्याने पर्यटन प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. साधारण वीस ते पंचवीस व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन समुद्राखालील अंतरंग बसून न्याहाळू शकतात. कोकणात सर्वात जास्त कोरल्स, रंगबिरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग दिसणारे अनोखे विश्व हे फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असून हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निवती समुद्रात होणार आहेमहाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकणातील या प्रकल्पाला ४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारने तशी घोषणाही केली. परंतु पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. समुद्र किनारी पर्यटन स्थळे विकसित झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात, म्हणून पाणबुडी प्रकल्पाला महत्त्व आले आहे.

Loading

Mumbai Goa Highway Accident: परशुराम घाटात पाच गाड्यांना मोठा अपघात; १५ प्रवासी जखमी

Road Accident : मुंबई गोवा महामार्गावरील खेड परशुराम घाटात आज पाच वाहनांचा अपघात घडल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. तर या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली. पाच वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरने घरडा बसला धडक दिली. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षणभिंत कोसळल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. मात्र आज दुपारी दोन वाजता चिपळूण शहरातून घरडा कंपनीचे कर्मचारी घेऊन बस कंपनीकडे निघाली होती. परशुराम घाटात ही बस एकेरी मार्गावर आली असताना समोरून गोव्याकडे जाणारा कंटेनर वेगाने येऊन बसवर आदळला. कंटेनरच्या धडकेने बस लावलेल्या गर्डरवर जाऊन आदळली. तर कंटेनरच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आढळल्या.

घरडा कंपनीच्या गाडीत असणारे घरडाचे कर्मचारी या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. किमान पंधरा ते वीस कर्मचारी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. खाजगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलीस महामार्ग यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. परशुराम घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.

Loading

कोकण रेल्वेचे विलीनीकरण व्हावे ही कोकणवासीयांची खरी गरज – सागर तळवडेकर

 

Konkan Railway: कर्नाटक येथील खासदार श्रीनिवास पुजारी यांनी लोकसभेत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे हा मुद्दा उचलून धरला असतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी देखील हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी २९ नोव्हेंबर रोजी हा मुद्दा पुन्हा राज्यसभेत उपस्थित केला होता.

गेले काही महिने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती,महाराष्ट्र या कोकणातील २५ प्रवासी संघटनेच्या शिखर समितीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे आणि रोहा ते सावंतवाडी पर्यंतचा भाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, त्यासंदर्भात समितीने संबंधित लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष आणि इमेल मोहीमेद्वारे लक्ष वेधले होते, त्याला अनुसरून समितीने दिलेल्या निवेदनात मांडलेले मुद्दे खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करून रेल्वे मंत्र्यांकडून लेखी उत्तर प्राप्त केले आहे. प्रवासी समितीचा तसेच कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल कोकणवासीयांतर्फे प्रवासी समितीने खासदार पाटील यांचे आभार मानले.

खासदार पाटील यांचा प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यापूर्वी त्याचे १००% समभाग केंद्र शासनाच्या हाती येणे आवश्यक आहे. आजच्या घडीला केवळ गोवा शासनाने कोकण रेल्वे महामंडळातील त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन करण्यास संमती दिल्याचे सांगितले.

आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील रेल्वे विकास, अमृत भारत स्थानक योजना, एक स्थानक एक उत्पादन योजना, रेल्वे मार्गाची क्षमतावृद्धी आणि आधुनिकीकरण, फलाट व इतर यंत्रणांचा कायापालट याकरिता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे आवश्यक आहे. तसेच राज्याच्या राजधानी मुंबईशी सुलभ संपर्कासाठी ज्या रेल्वे विभागाअंतर्गत मुंबई त्याच रेल्वे विभागात संपूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हेही यावेत ही समितीची भूमिका आहे असे समितीचे सचिव श्री अक्षय महापदी यांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेवरील बरीच विकासकामे निधीअभावी रखडली आहेत, त्यात प्रामुख्याने सावंतवाडी टर्मिनस हा विषय बरीच वर्षे रखडला आहे. आजच्या घडीला महामंडळ या मार्गाचे दुपदरीकरण करण्यास असमर्थ आहे त्यातच विविध राज्यांच्या हिस्सेदारीमुळे रेल्वे मंत्रालय किंवा संबंधित राज्य शासन निधी देण्यास हात आखडता घेत आहेत. त्यामुळे केवळ राज्यशासनांनी समभाग हस्तांतरित केल्यावर विलीनीकरण करण्याची भूमिका केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने न घेता ही प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी राज्य शासनाचे समभाग केंद्र शासनाकडे हस्तांतरित करताना राज्य शासनांनी गुंतवलेला निधी त्यांना परत कोण आणि कसा देणार किंवा देणार नाही याबाबत निर्णय होणे आवश्यक आहे. यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व राज्य शासनांचे समभाग विकत घेणे हा सोयीस्कर पर्याय आहे. तरी, याबाबत पुढील निर्णय जलदगतीने होण्यासाठी आपले असेच सहकार्य अपेक्षित आहे, असे समितीकडून दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांचे आभार व्यक्त करताना कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे काळाची गरज आहे ते लवकरात लवकर होणे हे सर्वांच्या हिताचे आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल असे मत समितीला संलग्न असलेली कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search