राजापूर, दि. २४ ऑगस्ट: अणुस्कुरा घाटात आज शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पहाटे ५ वाजताच्या सुमारास मातीचा भला मोठा भराव रस्तावर आल्याने हा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. सुदैवाने पहाटेचा सुमार असल्याने, वाहनांची जास्त वर्दळ नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र या घाट मार्गावर वारंवार कोसळणार्या दरडीमुळे येथील हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचा प्रकार घडला आहे.
कोल्हापूर: मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे यासाठी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यांना शाहू महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लगोलग त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून या प्रकल्पासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. खासदार नारायण राणे यांनीही या प्रकल्पासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले आहे. तसेच आपण संयुक्तपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असेही सांगितले. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच अस्तित्त्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
११४ किलोमीटर अंतर असलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वे मार्गाचा पहिला सर्वे १९७० रोजी झाला होता. त्यानंतर २०१८ रोजी साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या अधिकार्यांनी या मार्गाचा पुनः सर्वे करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्त केला होता. मात्र त्या नंतर योग्य पाठपुरावा झाला नसल्याने हा रेल्वे मार्ग प्रस्ताव रेंगाळला. अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी दिली. बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोलीमार्गे सावंतवाडी असा हा लोहमार्ग आहे.बेळगाव-सावंतवाडी मार्गाने दक्षिण रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. बेळगाव भागातील भाजीपाला कोकण-गोव्यात तर कोकणातील मासे दक्षिण कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यास मदत होणार आहे.
या मार्गात बेळगाव, चंदगड, आंबोलीसह एकूण 9 स्टेशन्स निश्चित केली आहेत. या लोहमार्गाचा अपेक्षित खर्च 1805.09 कोटी ऊपये असून निश्चितच तो भारतीय रेल्वेला परवडणारा आहे. या लोहमार्गामुळे होणारा आणखी एक प्रमुख लाभ म्हणजे जेव्हा कधी कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळून मार्ग बंद पडतो, त्यावेळी कोकण रेल्वेची वाहतूक बेळगावमार्गे वळविता येणे शक्य होणार आहे. शिवाय सध्याचे बेळगावहून खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, मडगाव, करमळी, पेडणेमार्गे सावंतवाडी हे अंतर 279 कि.मी. आहे. बेळगाव-सावंतवाडी लोहमार्ग झाल्यास हे अंतर 114.60 कि.मी. होऊन 165 कि.मी. सध्यापेक्षा रेल्वेमार्गाने बेळगावला सावंतवाडी जवळ होणार आहे, असा सकारात्मक अहवाल बेंगळूरचे मुख्य इंजिनिअर राम गोपाल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या खासदाराने बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या खासदारांच्या मदतीने स्वत: कॅप्टनशीप करून बेळगाव-सावंतवाडी लोहमार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील तसेच कोकणातील चौकुळ आणि आंबोली भागातील लोक रेल्वेच्या कक्षेत येतील. या भागातील प्रवासी पंढरपूर, मुंबईला रेल्वेने जाऊ शकतील. त्यामुळे या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल. स्वातंत्र्यानंतरही रेल्वेच्या प्रतीक्षेत दिवस कंठणाऱ्या वंचित भागाच्या विकासाची परिमाणे बदलू शकतील
खासदार शाहू महाराज यांनी आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करून तो पूर्ण करून घेवू असे आश्वासन दिले होते
Konkan Railway Updates: पाश्चिम उपनगरीय क्षेत्रातील कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक स्वतंत्र आणि नियमित गाडी असावी असे स्वप्न असलेल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मडगाव ते बांद्रा टर्मिनस अशी आठवड्यातून दोन दिवस धावणारी धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गाडीचा प्रस्ताव आणि कच्चा आराखडा कोकण रेल्वे तर्फे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पाश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
या गाडीचा प्रस्तावित मार्ग बांद्रा – बोरिवली – वसई – रोहा – मडगाव असा नमूद करण्यात आला आहे. या गाडीला एकूण २० LHB स्वरूपाचे डबे असणार असून त्यात सेकंड स्लीपर/सीटींगचे ६ डबे, थ्री टायर एसी/थ्री टायर एसी इकॉनॉमीचे ५ डबे, टू टायर एसीचे २ डबे, जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०१ समावेश आहे.
या प्रस्तावानुसार ही गाडी आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीचे थांबे अजून या प्रस्तावात नमूद केले नाही आहेत. मात्र गाडीचे सध्या दिलेले वेळापत्रक पाहता या गाडीला दिवा सावंतवाडी एक्सप्रेस 10105/10106 या गाडीच्या धर्तीवर थांबे मिळण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गाडीचा हा कच्चा प्रस्ताव असून त्यात रेल्वेच्या तिन्ही विभागाच्या सूचनांची बदल होणार आहेत अशी माहिती दिली आहे. या गाडीची घोषणा लवकरात लवकर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
Konkan Railway Updates:उत्तर व दक्षिण भारतात लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्याचा pकोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवरही होणार आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक १२४५० चंदीगड मडगाव एक्सप्रेस ७, ९, १४ आणि १६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२४४९ मडगाव-चंदीगड एक्सप्रेस १०, ११, १७ व १८ सप्टेंबर रोजी धावणार नाही.
चंदीगड कोचुवेली एक्सप्रेस ६, ११ व १३ सप्टेंबर रोजी आदर्शनगर, दिल्ली कांट, रेवारी, अलवार, मथुरामार्गे वळवण्यात आली आहे. याच मार्गाने कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस ७, ९ व १४ सप्टेंबर रोजी धावेल. कोचुवेली-अमृतसर आणि अमृतसर-कोचुवेली एक्सप्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन व निजामुद्दीन-एर्नाकुलम या गाड्याही या मार्गावरून धावणार आहेत.
मडगावहून १६ सप्टेंबर रोजी सुटणारी राजधानी एक्सप्रेस (२२४१३) ४ तास ४० मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी १२.४० वाजता सुटणार आहे. १० सप्टेंबरची एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस उत्तर मध्य रेल्वेच्या विभागात अर्धा तास थांबवली जाणार आहे.
केंद्रीयमंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी बोरिवलीतून कोकणात जाणारी रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी ही गाडी दिनांक २४ ऑगस्ट पासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . यासाठी कोकण विकास समितीने ईमेलद्वारे पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
पाश्चिम उपनगरीय रेल्वे क्षेत्रातील प्रवाशांसाठी या गाडीने कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र या गाडीचे थांबे निश्चित करताना या क्षेत्रातील सर्व कोकणवासियांचा विचार करणे गरजेचे आहे. 10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसच्या च्या धर्तीवर या गाडीला थांबे मिळाल्यास या गाडीचा मोठा फायदा प्रवाशांना होऊ शकतो. गरज असलेल्या स्थानकांवर नंतर थांबे मिळविण्यास खूप अडचणीचे जाते, त्यामुळे या स्थानकांवर सुरवातीलाच थांबे देण्याचा विचार करावा आशयाचे निवेदन कोकण रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना ईमेलद्वारे दिले आहे.
KRCL Recruitment: कोकण रेल्वेत नोकरी करण्याची ईच्छा असणाऱ्या कोकणकरांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य
या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसचे डबे कालबाह्य झाल्याने प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या गाडीचा जुना रेक बदलून ही गाडी नवीन एलएचबी LHB रेकसह चालविण्यात यावी अशी मागणी रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी इमेलद्वारे तसेच एक्स X च्या माध्यमातून रेल्वे प्रशासन तसेच संबधीत आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना केली आहे.
दिनांक ५ ऑगस्ट रोजी या गाडीतून प्रवास करणाऱ्या चिन्मय कोले नावाच्या प्रवाशाला प्रवासादरम्यान आलेल्या भयानक अनुभवाकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ३ टायर एसी मधून प्रवास करणारे चिन्मय कोले चिपळूण स्थानकावर गाडी थांबल्याने बाहेर गेले होते, मात्र गाडीत परत चढत असताना दाराज्याजवळील छताचे सर्वच पत्रे खाली कोसळले, सुदैवाने ते थोडक्याच बचावले. मात्र ही घटना या गाडीतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना धोक्याची सूचना देऊन गेली. चिन्मय कोले यांनीही ही घटना विडिओसकट सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गेली दैनिक स्वरूपात 25 वर्षे धावणाऱ्या मत्य्सगंधा एक्सप्रेसचे डबे आता कालबाह्य झाले आहेत. हेच डबे आता वापरणे चालू ठेवले तर एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर ही गाडी LHB डब्यांसह चालविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. कर्नाटक राज्यातील लोकसभा खासदार कोटा श्रीनिवासा पुजारी यांनीही गेल्याच महिन्यात या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिले होते.
मुंबई: बोरिवली येथून कोकणात जाण्यासाठी एक नियमित रेल्वे गाडी असावी असे स्वप्न पाहणाऱ्या कोकणकरांसाठी एक आशा निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नाने बोरिवली ते सावंतवाडी अशी गाडी येत्या २४ ऑगस्ट रोजी चालू होणार असल्याची माहिती उत्तर मुंबईच्या कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुमेश आंब्रे यांनी दिली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बोरिवली तुन कोकणात जाणारी नियमित रेल्वे चालू करणार अशी ग्वाही दिली होती. त्यांनी आपला शब्द खरा केला असून ही गाडी सोडण्यासाठी सर्व तजवीज केली आहे. या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती दिनांक २३ ऑगस्टपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बोरिवली-दहिसर, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकर जनतेची वस्ती आहे. कोकणात जाण्यास गाडी पकडण्यासाठी त्यांना दादर किंवा वसई या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे बोरिवली येथून कोकणसाठी नियमित स्वरूपात गाडी चालविण्यात यावी यासाठी खूप वर्षांपासून मागणी होत आहे. खासदार पियुष गोयल यांनी बोरिवली येथून कोकणसाठी गाडी चालविण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
Revas Reddy Coastal Highway:रेवस रेड्डी सागरी महामार्गाविषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या सागरी महामार्गावरील 1.7 किमीच्या बाणकोट खाडी वरील EPC मोडवर असलेल्या पुलाच्या नागरी बांधकामासाठी NCC Ltd या कंपनीला सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सावित्री नदीवरील हा नवीन पूल रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट (वेसवी बंदराजवळ) आणि रायगड जिल्ह्यातील बागमांडला (हरिहरेश्वरजवळ) जोडणार आहे. रेवस – रेड्डी कोस्टल महामार्गावरील बाणकोट पूल हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या ८ नवीन पुलांच्या मालिकेचा एक भाग आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने मार्च 2024 मध्ये या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजित रु. 272.88 कोटी आणि बांधकाम कालावधी अवधी ३ वर्षे साठी निविदा मागवल्या होत्या. एकूण 4 बोलीदारांच्या बोली दिनांक 2 जुलै रोजी तांत्रिक बोली आल्या होत्या. या बोलींत सर्वात कमी बोली रुपये NCC Ltd ची रुपये 355.99 या रकमेची होती. तर टी आणि टी इन्फ्रा (359.92 कोटी रुपये), अशोका बिल्डकॉन (363.47 कोटी रुपये), रेल विकास निगम लिमिटेड RVNL (380.70 कोटी रुपये) या बोलीदारांनी बोली लावली होती.
एनसीसीची 355.99 कोटी रु.ची बोली MSRDC च्या 272.88 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा 30.45% जास्त होते त्यामुळे त्यामुळे MSRDC आणि बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन या पुलाचे कंत्राट अंतिम करण्याबाबत बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे.
सावंतवाडी-सावंतवाडी येथील अपूर्ण रेल्वेचे टर्मिनस मार्गी लागावे, येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळण्याबरोबरच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करावे आदी मागण्यांसाठी आज १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे पुकारण्यात आलेले घंटानाद आंदोलन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार श्री दिपक भाई केसरकर यांचा आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित करण्यात आले.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे गेल्या २.५ वर्षात सावंतवाडी स्थानकातील अपूर्ण प्रवासी सुविधा आणि रेल्वेचे अपूर्ण असणारे टर्मिनस पूर्ण करण्यात यावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. २६ जानेवारी २०२४ ला प्रवासी संघटना सावंतवाडी ने आपल्या सलग्न संस्थांना सोबत घेऊन हजारो लोकांचा उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. तरी देखील शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल व हालचाल केली गेली नव्हती. परंतु पुन्हा संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर लगेच सावंतवाडी स्थानकातील PRS सुविधा ही १२ तास करण्यात आली.
आज झालेल्या या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीसावंतवाडी टर्मिनसला लागणारे पाणी हे तिलारी धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत मिळेल त्यासाठी ७ कोटी मंजूर आहेत तसेच येथील प्रस्तावित रेलोटेल लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि टर्मिनस साठी लागणाऱ्या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून ३ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती दिली. तसेच येथील रेल्वे थांब्यासाठी पुढील आठवड्यात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्याशी आपल्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लावू असे सांगितले.या वेळी त्यांचा सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, गजानन नाटेकर, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर श्री राजन तेली तसेच रुपेश जी राऊळ, मायकल डिसोझा यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची बाजू समजून आपण आपल्या परीने पाठपुरावा करू असे सांगितले.
याला प्रतिसाद म्हणून संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी जर कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली नाही आणि आमच्या मागण्या केल्या नाहीत तर गणेशोत्सवाच्या तोंडावर सावंतवाडी स्थानकावर हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावर बसून आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे सल्लागार बबन साळगावकर, बाळासाहेब बोर्डेकर, सचिव मिहिर मठकर, ॲड नकुल पार्सेकर, नरेंद्र तारी, माजी पंचायत सदस्य शांताराम गावडे, गुणाजी गावडे, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर,सुधीर राऊळ,सागर नानोसकर,गणेश चमणकर, प्रथमेश पाडगावकर, विनोद नाईक, अभिषेक शिंदे आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते