Category Archives: कोकण




मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती वाढली आहे.
आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.
मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे. 20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.
कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग, १५ एप्रिल :देहदान व अवयवदान यातील मूलभूत फरक समजून घेणं गरजेचं आहे. देहदान नैसर्गिक मृत्यू नंतर करता येते. त्यासाठी मृत्य व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असल्यास संपूर्ण देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरिरशास्त्र विभागाच्या ताब्यात स्वतः नातेवाईक यांनी दान करावा लागतो. त्यापुर्वी दोन्ही डोळ्यांचे नेत्रपटल म्हणजे डोळ्यावरची पारदर्शक काच व त्वचा दान करता येते. पण त्या साठी प्रशिक्षित तज्ञांची टीम घरी किंवा दवाखान्यात नेऊन नेत्र व त्वचादान स्विकारतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या तरी नेत्र व त्वचापेढी नसल्याचे आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती यांना नेत्र व त्वचादाना साठी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठावे लागले . पण वेळेअभावी या गोष्टी अशक्य आहेत. नेत्र व त्वचा शिवाय हाडं, अस्तिमज्जा, हृदयाची झडपा, मज्जा पेशी, रक्तवाहिन्या इतकेच नाही तर शरिराचे हात, पाय व डोक्यावरील केस पण दान करुन सुमारे पन्नास रुग्णांना एक मृत व्यक्ती व्याधी मुक्त करू शकतो.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान स्विकारण्याची सोय करण्यात आलेली असून मृत व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची ईच्छा असल्यास व्यक्तीच्या मृत्यूनंतर देह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरिरशास्त्र विभागात स्विकारण्याची सोय केलेली आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अवयव व देहदान महासंघचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी कळविले आहे.
अलीकडेच त्यांनी सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज जोशी व शरिरशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता थेटे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. मृत्यू समयी एडस्,कोरोना, कर्करोग सारखा महाभयंकर रोग असल्यास किंवा मृत्यू आत्महत्या, विषप्राशन, गळफास घेऊन झाल्यास अश्या व्यक्तींना देहदान, नेत्रदान, त्वचा दान करता येतं नाही. ईश्वराने शरिराचा कोणताही भाग टाकाऊ बनविला नाही, फक्त आपल्या अज्ञानामुळे आपण शरिर जाळुन टाकतो किंवा मातीत मिसळतो, भारतीय समाज सामाजिक, धार्मिक अंधश्रद्धांच्या परंपरागत गैरसमजुतीं मध्ये अडकुन बसलेला असुन काळानुसार यात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. कालानुरूप सती जाणं , स्त्री शिक्षण, बालविवाह सारख्या बाबतीत बदल झाले असून देहदान बाबतीत सुद्धा हे बदल हळूहळू होतील अशी आशाही डॉ. संजीव लिंगवत यांनी व्यक्त केली.
संपादकीय :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जुने, इतिहासाचा वारसा असलेले, प्रसिद्ध पर्यटन स्थळ, सुंदर आणि तलावाचे शहर अशी अनेक विशेषणे असलेल्या सावंतवाडी या शहराचे वर्णन महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर अशा शब्दात केल्यास ती अतिशयोक्ती निश्चीतच ठरणार नाही.
सावंतवाडी हे शहर माहीत नसलेला व्यक्ती क्वचितच सापडेल. कधी काळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहरातूनच जात असे. मुंबई गोवा प्रवासात अनेक शहरे लागत असली तरी प्रवाशांच्या स्मृतीत राहणारे हे एकमेव शहर. पर्यटकांना आकर्षित करणारा येथील स्वच्छ आणि सुंदर तलाव म्हणा, महामार्गाला अगदी लागून असलेला राजवाडा म्हणा किंवा स्थानिक कलाकारांनी हस्तकौशल्यांने साकारलेली येथील लाकडी खेळणी म्हणा, या सर्व गोष्टी पर्यटकांना नेहेमीच आकर्षित करत आले आहेत.
दुसरे म्हणजे पाश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी महामार्ग सुद्धा सावंतवाडी शहरातून जातो,त्यामुळे मुंबई म्हणा किंवा पाश्चिम महाराष्ट्र म्हणा गोव्याला जाणारा पर्यटक सावंतवाडी शहरातून जाणार हे नक्की. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ईतर शहरांशी तुलना करता सावंतवाडी शहराचा विकास चांगला होत होता.
मात्र मागील काही वर्षांपासून चित्र बदलायला लागले. सर्व काही सुरळीत चालू असताना या शहराला कोणाची नजर लागावी तशा या शहराच्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी घडायला सुरवात झाली.
कोकणात 1998 साली कोकणरेल्वे आली. सावंतवाडी शहर हे मध्यवर्ती आणि तालुक्याचा प्रशासकीय भाग असल्याने या शहरातून किंवा शहराजवळून रेल्वे मार्ग जाणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता तो शहराच्या बाहेरून नेवून शहरापासून जवळपास आठ किलोमीटर दूर रेल्वे स्थानक बनविण्यात आले. वाहतुकींच्या अपुऱ्या सोयींमुळे तालुक्यातील नागरिकांसाठी हे रेल्वेस्थानक गैरसोयीचे बनले. जर स्थानक शहराच्या जवळपास असते तर येथील प्रवासी संख्याही जास्त असली असती आणि रेल्वेला मिळणार्या महसुलाच्या बाबतीतही कोकण रेल्वेच्या पाहिल्या पाच स्थानकांच्या यादीतही सावंतवाडीचा समावेश नक्किच झाला असता.
दुसरी नकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे या शहरातून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या दूर जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून बाहेरूनच वळविण्यात आला. शहराच्या विकासावर त्यामुळे नकारात्मक परिणाम झालाच मात्र सर्वात मोठा परीणाम येथील पर्यटनावर झाला. पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यावसायिक, कोकणी मेवा विक्रेते, लाकडी खेळणी दुकानदार आणि ईतर व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला. गोवा मुंबई दरम्यान चालविण्यात येणार्या खाजगी बसेस आता शहराच्या बाहेरून जावू लागल्याने चाकरमान्यांच्या त्रासातही वाढ झाली आहे.
या गोष्टी कमी होत्या म्हणुन की काय आता सावंतवाडी शहराच्या बाबतीत अजून एक नकारात्मक गोष्ट घडत आहे. विद्यमान सरकारचा प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा महामार्गही आता सावंतवाडी शहराबाहेरून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत. या महामार्गामुळे पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक सरळ बाहेरच्या बाहेर गोव्यात जाणार आहे. गोव्याला जायला शक्तीपीठ महामार्गाचा पर्याय मिळाल्याने सावंतवाडी शहरातून जाणार्या सध्याच्या निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी महामार्गाचे महत्व कमी होणार आहे. सहाजिकच त्याचा फटका सावंतवाडी शहराच्या विकासाला बसणार आहे.
वरील गोष्टींमुळे सावंतवाडी शहराच्या तसेच संपूर्ण तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. तालुक्यातील साधनसामुग्री जमिनींच्या स्वरुपात महामार्गासाठी, रेल्वेरूळांसाठी वापरल्या गेल्या आहेत. मात्र त्याचा फायदा पाहिजे तसा तालुक्याला झाला नाही. चुका झाल्यात, मात्र त्या कोणाकडून, का आणि कशा झाल्यात यावर पण विचार करणे गरजेचे आहे. काही प्रमाणात येथील स्थानिक नागरिकही याला जबाबदार असतिल आणि येथील राजकारणीही. मात्र आता चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत नाहीतर सावंतवाडी शहर किंबहुना संपूर्ण तालुका विकासाच्या युगात खूप मागे पडेल.
Konkan Railway News: कोकणवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 13 एप्रिल पासून सुरू होणार आहे.
एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११८७/०११८८ आणि एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११२९/०११३० या दोन्ही गाड्यांचे आरक्षण उद्या सकाळी रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आहे.
अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपलब्ध
एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११२९/०११३० ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची चालविण्यात येणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने या गाडीचे काही डबे (सेकंड सिटींग) आरक्षणासाठी उपलब्ध करून दिले असल्याचे जाहीर केले आहे.
२) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११२९/०११३०
Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून २ गाड्या; एकूण ३२ फेऱ्या – Kokanai
सविस्तर वृत्त 👇🏻https://t.co/I1b7zf3xfS#konkanrailway #KonkanNews pic.twitter.com/fLVRF9LsAE
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) April 11, 2024