रत्नागिरी |राज्यात होणार्या अतिवृष्टीचा परिणाम कोकण रेल्वेवर पण झाला आहे. कुडाळ आणि झाराप या स्थानकांदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमूळे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणुन या मार्गावरील काही गाड्या आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सुटणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनापत्रकानुसार खालील गाड्यां आज दिनांक 20 जुलै रोजी आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सोडण्यात येणार आहेत.
1.संध्याकाळी 7 वाजता सुटणारी 01140 मडगाव नागपूर विशेष गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 10 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.
2.संध्याकाळी 6 वाजता सुटणारी 20112 मडगाव – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 9 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.
3.संध्याकाळी 5:55 सुटणारी 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 8:55 वाजता सावंतवाडी स्थानकावरून सुटणार आहे.
मुंबई : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.
सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये माहिती मिळेल असा शासन आदेश संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांनी काढला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढून उद्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे
रायगड : हवामान खात्याने IMD दिलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यामुळे तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील 24 तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
IMD ने आज दिनांक 19 जुलै रोजी पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.
Kokan Railway | रेल्वे प्रशासनाने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या LHB डब्यांच्या संरचनेत काही बदल केले आहेत. या दोन्ही गाड्यांचे प्रत्येकी एक जनरल डबा कमी करण्यात आले असून इतरही काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल पुढीलप्रमाणे
दिनांक ०४/११/२०२३ पासून Train no. 22113 ex. Lokmanya Tilak (T) ही गाडी तर दिनांक 06/11/2023Train no. 22114 ex. Kochuveli ही गाडी या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
चिपळूण :मान्सूनचे आगमन झाले असून, गेले काही दिवस कोकणात सर्वत्र मुसळधार वृष्टी होत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ भरले असून, काही धबधबेही प्रवाहित झाले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. हा धबधबा सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.
मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.
या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो.
धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.
सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी लागोपाठ दोन दिवस देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
A) संगमेश्वर ते भोके
संगमेश्वर ते भोके दरम्यान दि. 11 जुलैला सकाळी 7.30 ते 10.30 असा 3 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक मुळे खालील गाड्यांवर परिणाम होणार आहे.
1) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुनेलवेली-जामनगर एक्सप्रेस 11577 ही गाडी ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 उशिराने चालविण्यात येणार आहे.
2) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल- लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस (16346) कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
B) कुडाळ ते वेर्णा
दि. 12 रोजी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्या सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत अशा तीन तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) 12 जुलै रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी -मडगाव (12051) ही जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थीवी स्थानकावर तीन तास थांबवून ठेवण्यात येणार आहे.
2) दि. 11 जुलैला सुटणारी हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस (12618) ही गाडी रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
3) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस (10105) ही गाडी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटे उशिराने चालणार आहे.
4) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेट्रल- हजरत निजामुद्दीन (22653) ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटेे उशिराने चालविण्यात येणार आहे.
Mumbai : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रस्तावित असणार्या पेण ते पत्रादेवी या ग्रीनफील्ड महामार्गास सरकारकडून मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एक जीआर गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन, औद्योगिक व वाणिज्य कामांसाठी समृद्ध आहे. कोकण तसेच गोवा ते कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची, व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. मुंबई ते कोकण पुढे गोवा असा द्रुतगती महामार्ग झाल्यास औद्योगिक पर्यटन क्षेत्र व दैनंदिन दळणवळण गतिमान होऊन कोकणची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे.
कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे.
महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि पुढील टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल.
पेण-बलवली ते रायगड/रत्नागिरी सीमा (रायगड जिल्हा) 94.40 किलोमीटर
रायगड/रत्नागिरी सीमा ते गुहागर चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) 69.39 किलोमीटर
गुहागर,चिपळूण ते रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा (रत्नागिरी जिल्हा) 122.81 किलोमीटर
रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग जिल्हा) असा 100.84 किलोमीटर
असा एकूण 388.45 किलोमीटरचा हा महामार्ग आहे.
या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.
Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल उच्च न्यायालयाने (High Court) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) ला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ॲड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. हायवेच्या बांधकामात निष्काळजीपणा केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला असे न्यायालयाने म्हटले आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने बुधवारी हा दंड ठोठावला आहे.
NHAI आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात तिसऱ्यांदा धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही खड्डे दुरुस्त झाले नाहीत. अशी माहिती याचिकाकर्ते अधिवक्ता ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयाला दिली.
अधिवक्ता पेचकर यांनी 2 जुलै 2023 रोजी काढलेली मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची छायाचित्रे न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत जोडली. खंडपीठाने एनएचएआयचे प्रकल्प संचालक आणि पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता यांना चार आठवड्यांत सर्वेक्षण करून उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दंडाची रक्कम आलेल्या न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या खर्चाची भरपाई म्हणुन याचिकाकर्त्यांना सुपूर्त करण्यात यावी असेही आदेश देण्यात आले आहेत.
सावंतवाडी | प्रतिनिधी :पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. हा धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. तर 5 वर्षापर्यंतच्या मुलांना कोणतेही शुल्क नसणार आहे.
कोरोना पूर्व काळात या धबधब्याला भेट देणार्या सर्व पर्यटकांना सरसकट 10 रुपये असे तिकीट दर अस्तित्वात होते. त्यानंतर ही तिकीट पद्धत बंद झाली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात येणार असून ही रक्कम जमा करण्याचा अधिकार वनव्यवस्थापन समितीला दिला असून मिळणार्या पैशाचा वापर धबधबा आणि आजूबाजूचा परिसरातील वनविकास करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिली आहे. येत्या शनिवार पासून हे पैसे आकारले जातील.