मुंबई | जयवंत दरेकर : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना जुन्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली नैसर्गिक मोठी झाडे तोडावी लागली त्यामुळे रस्ते परिसर ओसाड झाला, झाडांची सावलीच नष्ट झाल्यामुळे नैसर्गिक गारवा नाहीसा झाला. हा नाहीसा झालेला नैसर्गिक गारवा – सावली अर्थातच कोकणाचे रस्त्याचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी कोकणच्या मातीत सहज वाढणारी आणि दिर्घ आयुष्य असलेले वड,पिंपळ, किंजल, उंबर, चिंच, जांभूळ, गुलमोहर, पारिजात,आणि इतर वृक्षांची डिसेंबर महिन्यात चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर लागवड करण्याची पूर्व तयारी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आणि महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत रविन्द्र चव्हाण यांनी आजपासूनच दापोलीच्या कोंकण कृषी विद्यापीठापासून ते कोकणात असलेल्या नर्सरी केंद्रांना संपर्क करून निदान ३ ते ४ वर्ष जुनी रोपे यांचा शोध करून कोणतीही हयगय न करता डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील या पूर्व तयारीला लागा असे आदेश वन खात्याच्या चीफ कन्झर्वेटिव ऑफिसर (आयएफएस) श्री गोवेकर साहेब याना दिले. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग , कोंकण चे मुख्य अभियंता श्री शरद राजभोज साहेब, राष्ट्रीय महामार्ग( सां . बा. विभागचे )’मुख्य अभियंता श्री.संतोष शेलार साहेब, अधीक्षक अभियंता श्रीमती तृप्ती नाग मॅडम, उप अभियंता अकांक्षा मेश्राम मॅडम, उप अभियंता श्री पंकज गोसावी साहेब, स्वीय सहाय्यक श्री उत्तम मुळे साहेब, श्री एकनाथ घागरे साहेब, श्री अनिकेत पटवर्धन साहेब या विषयावर सतत पाठपुरावा करणारे आणि चर्चेसाठी मागणी करणारे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत दरेकर आणि त्यांना सक्रियपणे सहकार्य करणारे श्री. श्रीधर@काका कदम त्यांचे सहकारी श्री उदय सुर्वे, श्री संतोष गुरव, श्री राजू मुलुक, ॲड. प्रथमेश रावराणे,श्री शंकर उंबाळकर,श्री.हरिश्चंद्र शिर्के, आणि वृक्षप्रेमी श्री सुनील नलावडे हेही उपस्थित होते.
रत्नागिरी : चिपळूण एस. टी. आगारातर्फे खास श्रावण महिन्यानिमित्त अष्टविनायक दर्शन आणि मार्लेश्वर दर्शन जादा एस.टी. बससेवा सुरू करण्यात येणार आहे. भाविकांना दर सोमवारी मार्लेश्वर दर्शनासाठी चिपळूण ते मार्लेश्वर आणि मार्लेश्वर ते चिपळूण अशी एस.टी. ची सेवा सुरू करण्यात येईल. यासंदर्भात आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी पत्रकारांना माहिती दिली.
श्रावण महिना सुरू झाला आहे. या निमित्ताने २१, २८ऑगस्ट, ४ व ११ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवारनिमित्त मार्लेश्वर जादा एस. टी. गाडी सोडण्यात येणार आहे. सकाळी ८ वा. चिपळूण मार्लेश्वर व दुपारी ३:३० वा. मार्लेश्वर चिपळूण अशी बस निघेल. या गाडीचा तिकीट दर १३० रुपये असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत लागू आहे. या गाडीचे बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने अष्टविनायक दर्शनासाठीदेखील चिपळूण आगारातून एस.टी. बस सोडली जाणार आहे. त्याचेही बुकिंग सुरू करण्यात आले आहे. ही गाडी खास महिलांसाठी असून, ६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन घेता येणार आहे. श्रावण
महिन्यामध्ये अनेकजण देवदर्शन घेत असतात. या निमित्ताने प्रवाशांची सोय व्हावी आणि एस.टी.च्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. चिपळूण आगारातून अष्टविनायक दर्शन गाडी सुटेल. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बुकिंग करावे. महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीमुळे एस. टी. च्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग : मडगावच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसची धडक बसून बोर्डवे रेल्वे फटका नजीक तीन गवेरेडे ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली. मोटरमन कडून याबाबत माहिती मिळतच कणकवली रेल्वे स्टेशन वरील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत वनविभागाला देखील माहिती देण्यात आली. गवे रेड्यांना बसलेली रेल्वेची धडक ही एवढी जोरात होती की यात काही गवे ट्रॅक पासून दूरवर जाऊन पडले. तर काही एका गव्याचा अक्षरशा मांसाचा सडा रेल्वे ट्रॅक वर पडला होता.
रत्नागिरी :टोलनाका तोडफोड आंदोलनाप्रकरणी आज दिनांक 18 ऑगस्ट २०२३ रोजी मनसेच्या एकूण 14 जणांना अटक करण्यात आलेली आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई अन्वये मनसे च्या एकूण 97 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. आंदोलन प्रकरणी राजापूर, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई केली व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दिनांक 16 सप्टेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर कोकणातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तोडफोडीच्या एकूण 3 घटनांची नोंद झाली असून त्या घटनेसंदर्भात पुढीलप्रमाणे अटक झाली आहे.
1) हातिवले येथील घटनेत 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत व त्यांना 1 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
2) खानू येथील घटनेत एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे व अटकेची कारवाई चालू आहे.
3) पाली येथील JCB वर काठीने हल्ला करून काचांची तोडफोड प्रकरणी 8 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत व अटकेची कारवाई चालू आहे.
अटक करण्यात येणाऱ्या मनसे च्या 14 जणांना मा. न्यायालयात दिनांक 19/08/2023 रोजी हजर करण्यात येणार आहे.
अटक करण्यात आलेल्यांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 02 पदाधिकारी व 12 कार्यकर्ते यांची यादी समावेश आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे
1) अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहर अध्यक्ष, रा. अभ्युदय नगर,
2) अविनाश धोंडू सौंदळकर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष रा. नाचणे रोड रत्नागिरी,
Konkan Railway News :कोकणात गणेश चतुर्थी हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. या दरम्यान या मार्गावरील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागतो. चाकरमान्यांची पहिली पसंती असलेल्या कोकण रेल्वेवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाड्या चालविल्या जातात त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास पूर्णपणे नाहीसा करणे शक्य नसले तरी रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास तो थोडा कमी करता येणे शक्य आहे.
कोकण रेल्वे संस्थापक सदस्य आणि अभ्यासक श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर कोकण रेल्वेला या नियोजनाबाबत पत्र लिहून यावर एक उपाय पण सुचविला आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे
कोकण रेल्वे महाव्यवस्थापक १८/८/२०२३
सन्माननीय महोदय
कोकण रेल्वेला गणेशोत्सवात अडीचशे च्या वरती अतिरिक्त जागा गाड्या मार्गावर प्रवास करणार आहेत. यापूर्वीच मी पत्र दिले होते किमान गणपतीचे पहिले पाच दिवस येतानाच्या गाड्या लोढा मिरज मार्गे वळवाव्यात परंतु त्याची आपण दखल घेतली नाही पर्यायाने या वेळेला गणेशोत्सवात रहदारी वाढल्यामुळे गाड्यांना विलंब होणे हे नित्याचे होणार आहे .
तरी यावर आणखीन एक तोडगा म्हणून गणपतीच्या दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या अगोदर पाच दिवस व चतुर्थी नंतर पाच दिवस ज्या गाड्या पनवेल पासून पुढे रोहा मार्गे मेंगलोर पर्यंत धावतील त्या गाड्यांना पहिले प्राधान्य देऊन पुढे काढल्या जाव्यात व येणाऱ्या गाड्या सिग्नलला अथवा स्टेशनला उभ्या करून यांना जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा व पाच दिवसानंतर जाणाऱ्या गाड्या स्टेशनला साईडला घेऊन येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून गणेशोत्सवात जाणाऱ्या लोकांना प्राधान्याने पुढे जाता येईल व येणाऱ्या गाड्यांना पाच दिवसानंतर येताना प्राधान्य मिळेल. नियमित गाड्यांच्या बाबतीत हे असे नियोजन करणे शक्य नसले तरी अतिरिक्त गाड्यांच्या बाबतीत असे करणे शक्य होईल. रेल्वे प्रशासनाने याची आपण नोंद घ्यावी ही नम्र विनंती
सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर संस्थापक सदस्य कोकण रेल्वे 9404135619
Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या दक्षिणेकडील राज्यांच्या स्थानकांवर काही गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर काही कालावधीसाठी थांबे देण्यात आले होते. त्या थांब्यांना कायम करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे थांबे पुढील सूचना मिळेपर्यंत Till Further Advice कायम राहणार आहेत. रेल्वेच्या या प्रसिद्धी पत्रकानुसार एकूण 6 स्थानकावरील 16 गाड्यांचे थांबे कायम करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील स्थानके अजूनही प्रतिक्षेत
लांब पल्ल्यांच्या गाड्यांना कोकण रेल्वेच्या महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबे मिळावेत यासाठी विविध प्रवासी संघटनेंकडून अनेक वर्ष मागण्या होत आहेत. या स्थानकां कडून मिळणारे उत्पन्न आणि महत्त्व पाहता अधिक थांब्यासाठी होणारी मागणी रास्त आहे. मात्र या मागण्यांना रेल्वे प्रशासनाने नेहमी केराची टोपली दाखवली आहे. लांब पल्ल्याच्या नेहमीच्या गाड्यांना सावंतवाडी, खेड, संगमेश्वर तसेच ईतर महत्त्वाच्या स्थानकावर थांबे मिळावेत यासाठी अनेक वर्ष मागणी करूनही रेल्वे प्रशासन या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे दक्षिणेतील राज्यातील स्थानकांवर या गाड्यांना सहजासहजी थांबे मिळत आहेत. या सर्व प्रकारावरून कोकण रेल्वे नेमकी कोणासाठी हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा रहात आहे.
Mumbai Goa Highway News :मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसे आता आक्रमक झाली आहे. मनसेने खळखट्याक आंदोलन सुरु केलं असून, टोलनाक्यांना लक्ष केलं आहे. मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला आहे.रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या सीमेवर राजापूरमध्ये हा टोलनाका आहे. हा टोलनाका अद्याप सुरु झालेला नाही. पण त्याआधीच मनसेने तो फोडला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा असं आवाहन केलं होतं. तसंच सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
मनसेच्या एका कार्यकर्त्याने हातात झेंडा घेऊन टोलनाक्यावरील काचा फोडल्या. यावेळी त्याने तोंडावर रुमाल बांधला होता. हातातील काठीने काचा फोडल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
KonkanRailway News: गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या दिवा चिपळूण मेमू विशेष गाडी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01155 दिवा चिपळूण मेमू विशेष गाडीला दिवा या सुरवातीच्या स्थानकावरून याआधी नियोजित केलेल्या वेळेच्या 10 मिनिटे अगोदर सोडण्यात येणार आहे.
नियोजित वेळेनुसार ही गाडी संध्याकाळी 19:45 या वेळी सुटणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यामधे बदल करून ही गाडी सुधारित वेळेनुसार ही गाडी 10 मिनिटे अगोदर म्हणजे संध्याकाळी 19:35 वाजता सुटणार आहे. हा बदल दिनांक 13 सप्टेंबर पासून असणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे.
पनवेल :मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये तोफ धडाडली आहे. पनवेल येथे आज संपन्न झालेल्या मनसे निर्धार मेळाव्यामध्ये राज ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
▪️ आज मी इथं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय.
▪️ कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. अहो, आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात रस्ते चांगले बंधू शकत नाही का?
▪️ २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही?
▪️ फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात… लोकांचे ह्या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं?
▪️ भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.
▪️ लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर “मी तुला दिसलो का? मी होतो का.” म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का?
▪️ अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं.
▪️ मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं की अहो समृद्धी रस्ता करून इतके दिवस झाले पण अजून तुम्ही फेन्सिंग का नाही केलं? रस्त्यावर अनेक प्राणी येत आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, गाड्यांचे अपघात होत आहेत. इतकी साधी गोष्ट पण सरकारच्या लक्षात येऊ नये ?
▪️ आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या.
▪️ मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?
▪️ आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या हजारो एकर जमिनी कोणी बळकवल्या? ह्याचा शोध घेतलाच गेला पाहिजे.
▪️ मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत.
▪️ जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर ह्याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील.
▪️ २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.
▪️ गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही.
▪️ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री.
▪️ ३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं.
▪️ पण तुम्ही कश्मीर असो, हिमाचल असो की आपल्या ईशान्य भारतातील राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली ?
▪️ शिवडी-न्हावाशेवा रस्ता होणार तेव्हा बघा रायगड जिल्ह्याची काय अवस्था होते. तिथल्या जमिनी आधीच परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत आणि पुढे जाऊ परिस्थिती अशी होणार कि फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार.
▪️ मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात माझा मंडणगडचा तालुकाध्यक्ष तर एक शीख सरदार आहे.
▪️ अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं?
▪️ अमेरिकेत १९२७ च्या महामंदीच्या काळात सरकारने लोकांना पैसा देता यावं म्हणून अमेरिकेत रस्त्यांचं जाळं उभारलं, त्याच्यावर आजची अमेरिका उभी राहिली.
▪️ माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे.
▪️ ह्या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया.
Mumbai Goa HIghway News : मुंबई – गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील ४२ किलोमीटरच्या रस्त्यापैकी २३ किलोमीटर सिंगल लेनचा रस्ता पूर्ण झाला आहे. पेवर मशीनच्या माध्यमातून रोज कमीत कमी १ कि.मी. आणि जास्तीत जास्त १.५. कि. मी काम करण्याचं टार्गेट आहे. निश्चितंच गणेशोत्सवापूर्वी मुंबई – गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे काम पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काळ व्यक्त केला आहे. काल त्यांनी मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा केला होता त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई गोवा पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की,मुंबई – गोवा महामार्ग ५५० कि. मी. चा रस्ता आहे. या महामार्गाचे काम वेगवेगळ्या १० पकेजेस सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यातील पनवेल ते कासू या ४२ कि. मी. पैकी २२ कि. मी. सिंगल लेन काम पूर्ण झालेले आहे. या रस्ते बांधणीच्या कामासाठी नव्याने तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे९ मीटरच्या असणारया पेवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम चालत आहे. पेवर जवळ जवळ एका दिवसामध्ये ९०० मीटर काम होत आहे. आज मुंबई -गोवा महामार्गावर पहिल्या पॅकेजमध्ये २ पेवर मशीन्स काम करत आहेत. पहिल्या टप्यामध्ये साडेचार मीटरचे दोन पेवर काम करत आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये असेच दोन पेवर काम करत आहेत. या कामासाठी एक टार्गेट आहे, एक मशीन दर दिवशी कमीत कमी १ कि.मी. आणि जास्तीत जास्त १.५. कि. मी. रस्त्याचे या पेवरच्या माध्यमातून काम सुरू आहे.
पावसाने साथ दिली पाहिजे अशी आम्हीही प्रार्थना करत आहोत, पण जरी पावसाने साथ दिली नाही व रिमझिम पाऊस पडला तरी यामध्ये काम करता येऊ शकतं. त्या पद्धतीने काम आता सुरू आहे. खात्री आहे की, मुंबई – गोवा महामार्गाचं सिंगल लेनचे काम येत्या गणपती पूर्वी नक्की पूर्ण होईल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई गोवा महामार्गावरील रायगड मधील जे काम प्रामुख्याने प्रलंबित आहे ते काम आता नवीन CTB टेक्नोलॉजीने सुरु आहे. देशभरामध्ये अशा प्रकारच्या काही मशीन आहेत, या नवीन तंत्रज्ञानामध्ये चार ते पाच मशीनचा सेट असतो. त्यामधील तीन मशीनचा सेट आणलेला आहे आणि त्यामाध्यमातून काम सुरु झालं आहे. येणाऱ्या काळात ८ ते १० मशीन उपलब्ध करून रस्ता पूर्ण करण्याचं काम करणार असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले
मुंबई गोवा महामार्गाचे रायगड जिल्ह्यातील काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने गणेशोत्सवापूर्वी येणार्या दिवसात जड वाहनांसाठी हा जर बंद केला तर आम्हाला जलदगतीने काम करता येईल आणि त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जातोय. पाली, निजामपूर मार्गे वाहतूक वळवण्याबाबत विचार सुरू आहे हे काम जलदगतीने कस होईल याकडे लक्ष दिल जात आहे असेही त्यांनी सांगितले.