Category Archives: कोकण रेल्वे
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12741/12742 वास्को द गामा – पटना सेमी फास्ट एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 जानेवारी पासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वास्को द गामा ते पटना (12741) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 24 जानेवारी 2024 च्या फेरीपासून तर पटना ते वास्को (12742) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 27 जानेवारी 2024 च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी 22 डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती 21 एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे.
या साप्ताहिक गाडीला कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी आणि चिपळूण या स्थानकांवर थांबे आहेत.
Konkan Railway News :अयोध्येत २२ जानेवारीला राममंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा होत आहे. त्यापूर्वी देशभरातून अनेक रामभक्त अयोध्येला भेट देत आहेत. अयोध्या जगातील एक मोठ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. दरवर्षी देशभरातून हजारो रामभक्त अयोध्येला भेट देणार आहेत. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येत जाण्यासाठी रेल्वे आठवड्यातून एकदा सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर केली आहे. याबाबत कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन सादर केले आहे.
कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.
वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

Akshay Mahapadi
Konkan Railway News :कोकण रेल्वेमार्गावर गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, एका नोव्हेंबर महिन्यात २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोकणकन्या, मांडवी, दिवा-सावंतवाडी, तुतारी यासारख्या गाड्या दररोज हाऊसफुल्ल असतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेकजणं फुकट प्रवास करतात. यामध्ये कोकण रेल्वेचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पथके निश्चित केली आहेत. काहीवेळा अर्धे तिकिट काढून पुढे प्रवास केला जातो. काहीजण जनरल तिकिट काढून आरक्षित डब्यामधून प्रवास करतात. काहीवेळा तर आरक्षित डब्यातील तिकीटच न काढता प्रवास केला जातो.
विनातिकीट प्रवास करताना कोणी प्रवास सापडला तर त्या त्या परिस्थिनुसार दंडाची रक्कम आकारली जाते. नोव्हेंबर महिन्यात गाड्यांची गर्दी लक्षात घेऊन केलेल्या तपासणीमध्ये ७ हजार १३ जणांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रवाशांना तिकिटाच्या तिप्पट रक्कमही भरणा करावी लागली आहे. भविष्यातही संपूर्ण मार्गावर या पद्धतीने तिकीट तपासणी मोहीम तिव्रतेने राबवण्यात येणार आहे.