Category Archives: पर्यटन

मालवणात पर्यटनाचा ‘हा’ नवा ट्रेन्ड ठरत आहे पर्यटन व्यवसायिकांची डोकेदुखी

मालवण – उन्हाळी सुट्यांमुळे मालवणचे पर्यटन बहरलेले दिसून येत आहे; मात्र यात निवासव्यवस्थेचे दर आकारण्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, येथील व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यातच पर्यटकांनी मासळी आणून दिल्यास ती बनवून देण्याचा नवा ट्रेंड सुरु झाल्याने हॉटेल व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. एकूणच येथे काही काळापूर्वी वाढत असलेला पर्यटन व्यवसाय आता नव्या वळणावर पोहचला आहे. यातच अंमली पदार्थांसह व्यसनाधिनतेचे काही प्रकारही धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत.

पर्यटनाची राजधानी म्हणून मालवणकडे बघितले जाते. गेल्या काही वर्षात समुद्राखालील अनोखे विश्‍व पाहण्याची संधी स्कूबा, स्नॉर्कलिंगमुळे उपलब्ध झाली आहे. याबरोबरच साहसी जलक्रीडा प्रकार यामुळे येथील पर्यटन हंगाम हा गेल्या काही वर्षात बहरत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांना अत्यावश्यक सोईसुविधा पर्यटन व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे दाखल होत असून त्यांच्याकडून सागरी पर्यटनाचा आनंद लुटला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने नोकरीच्या मागे न लागता अनेक तरूण बेरोजगारांनी पर्यटन व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवित त्यातून गेल्या काही वर्षात चांगले अर्थांजन मिळविण्यास सुरवात केल्याचे किनारपट्टी भागात पहावयास मिळत आहे.सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्गात पर्यटक जास्ती पसंती देतात. वर्षातील साधारणतः ८० ते १०० दिवसांचा हा पर्यटन उद्योग सुरू असतो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळानंतर पर्यटन व्यवसाय आता खर्‍या अर्थांने उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे; परंतु सर्वात मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. यात हॉटेल्स, होम-स्टे, रिसॉर्टची जी वर्गवारी आहे. त्यात जी निवासव्यवस्थेची दर आकारणी केली जाते. यात ज्यांच्याकडे चांगल्या सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या निवासव्यवस्थेचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिदिवस असे आहेत. असे पर्यटन व्यावसायिक विनाकारण स्पर्धा करताना दिसून येत आहे. संबंधितांकडून ३० ते ४० टक्के दर कमी करून पर्यटकांना निवासाची व्यवस्था करून दिली जात आहे. परिणामी याचा फटका ज्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहेत मात्र ते दर स्थिर ठेवून व्यवसाय करू पाहतात अशा पर्यटन व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पर्यटक बुकींग करून येण्यापेक्षा थेट रिसॉर्ट, निवास न्याहरी, हॉटेल्सच्या ठिकाणी येऊन दरांमध्ये आपल्याला हवी तशी तडजोड करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिल्यास निवास व्यवस्थेचा जो व्यवसाय आहे तो कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.किनारपट्टी भागास पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षात पर्यटकांनाच तुम्ही मासे आणून द्या ते बनवून देतो असे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याने हा नवा ट्रेंड या क्षेत्रात निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथे येणारा पर्यटक हा थेट मासळी लिलावाच्या ठिकाणी जावून मासळी खरेदी करतात. मग ती वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी येऊन त्या व्यावसायिकाला ती बनविण्याचे सांगून किलोप्रमाणे दर निश्‍चित करून घेतात. ही प्रथा म्हणजे वेगळ्या प्रकारची कीड या व्यवसायास लागली आहे. जेमतेम १०० दिवसांच्या या पर्यटन व्यवसायाच्या काळात किलोवर असे मासे बनवून दिल्यास तर व्यावसायिक पैसे कमावणार केव्हा? बँकांचे हफ्ते, विविध शासनाचे कर कोठून भरणार? जेव्हा एखादा पर्यटक हॉटेलला वास्तव्यास असतो त्यावेळी त्याचे जेवण, वास्तव्य याचा विचार केला तर त्यातून सरासरी वार्षिक खर्च निघत असतो; परंतु असे जे प्रकार किनारपट्टी भागात सध्या सुरू आहेत हे चुकीचे असून येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकांनी यातून स्वतःला सावरण्याची गरज आहे. आपण जो व्यवसाय करत आहोत. तो कमर्शिअल पद्धतीने करायला हवा. या गंभीर बाबींकडे लक्ष न दिल्यास हा व्यवसाय कमर्शिअल पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता असून याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आताच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर,

जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ

 

   






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

श्रीलंकेच्या पिन्नावाला अभयारण्यासारखे कोकणात उभारले जाणार हत्तींसाठी अभयारण्य; शिंदे सरकारचे एका दगडात दोन पक्षी….

दोडामार्ग – कोकणात हत्तींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी सरकारने एक नवीन कल्पना अमलात आणण्याचे ठरवले आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्हा सीमेवर हत्तींचे अभयारण्य उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही कल्पना वास्तवात आणल्यास हे अभयारण्य देशातील केरळ मधील कुट्टूर आणि उत्तरप्रदेश येथील हत्ती संवर्धन केंद्रानंतर हत्तीं साठी तिसरा उपक्रम ठरणार आहे..

श्रीलंकेतील पिन्नावाला अभयारण्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या कोकणी मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत जंगली हत्तीना हक्काचं घर देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. या अभयारण्या मूळे एक नाही तर दोन फायदे होणार आहेत. शेतकर्‍यांना हत्तींच्या उपद्रवापासून मुक्ती मिळणार आहे. दुसरे म्हणजे या अभयारण्यामूळे कोकणातील पर्यटनास हातभार लागणार आहे. 

श्रीलंकेतील पिन्नावाला हत्ती अभयारण्य

श्रीलंकेत १९७५ साली Department of Wildlife Conservation अंतर्गत ‘The Pinnawala Elephant Orphanage’ ची स्थापना झाली. हत्तींना नीट खाद्य मिळावं, त्यांची काळजी घेतली जावी यासाठी हा हत्तींचा अनाथाश्रम उभारला गेला. त्यासाठी नदीकाठी २५ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली. जवळपास १०० हून अधिक हत्ती तिथे राहतात. तिथे हत्तींचे प्रजनन (breeding) देखील केले जाते. अभयारण्याच्या स्थापनेपासून २०१५ पर्यंत ७० नव्या हत्तींचा जन्म झाला. काहींना जंगलात सोडलं तर काहींना खासगी मालकांकडे. परंतु त्यांची नीट काळजी घेतली जाते की नाही याचं tracking एकदम काटेकोरपणे ते करतात. म्हणजेच काय तर असलेले हत्ती वाचवले, जगवले, वाढवले आणि एक ‘रोल मॉडेल’ तयार झाले! जगातील सर्वात जास्त हत्ती एका ठिकाणी असलेलं हे पिन्नावाला गाव. असं क्वचितच होतं की पर्यटक श्रीलंकेला जातात आणि तिथे जात नाही. पर्यटक हमखास तिथे भेट देतातच. आणि तेही तिकिट काढून भेट देतात. आपल्याला हत्तींना अंघोळ घालता येते. त्यांना जेवण देता येतं. त्यावर मनसोक्त फिरता येतं. आणि या सगळ्यासाठी थोडे बहुत पैसे घेतले जातात. त्या पैशातून तेथील देखभाल केली जाते. पर्यावरण जपत, प्राण्यांची काळजी घेत एक अगळं वेगळं पर्यटन ‘रोल मॉडेल’ श्रीलंकेने उभं केलंय.

पर्यटन महामंडळाचा फिलोशिप उपक्रम; पर्यटनात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी संधी, मिळणार ४० हजार रुपये दरमहा!

मुंबई  – महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या फेलोशिप उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून  २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये  प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या [email protected] आणि [email protected] या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह  १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे. समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे. 

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर कार्तिकेयाची मूर्ती चिपळुणातील श्रीविंध्यवासिनी मंदिरात

रत्नागिरी –  कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मूर्ती चिपळूणच्या श्रीविंध्यवासिनी मंदिरात आहे असे प्रतिपादन लेखक,अभ्यासक आशुतोष बापट यानी केले. ”सफर चिपळूण गुहागर परिसराची” या त्यांच्या पुस्तकाच्या  प्रकाशन समारंभात (२ एप्रिल) बोलताना त्यांनी हे कौतुकोद्गार काढले.  या वेळी व्यासपिठावर मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक लेखक आशुतोष बापट, ज्येष्ठ दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव उपस्थित होते.
मंदिर आणि मूर्ती हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. (व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काहीतरी आगळे वेगळे अद्वितीय असे लक्षण) त्याकडे आपण अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या मूर्ती कशाही, भंगलेल्या वगैरे असल्या, तरी त्या आपल्याला काहीतरी सांगून जात असतात. आपल्या संस्कृतीला दोन अंगे आहेत, आधिभौतिक म्हणजे ऐहिक जीवन समृद्ध करणे आणि दुसरी बाजू आधिदैविक अर्थात् तत्त्वज्ञान, अध्यात्म, मंदिर, मूर्ती, कला आदींची असून माणसाचे जीवन समृद्ध होण्याकरता ते आवश्यक आहे. कोकणातील मूर्तीवर लेखन होतेय ही चांगली गोष्ट आहे. कोकण किती समृद्ध आहे ? हे यातून लोकांना कळेल. लोकांचा ओघ कोकणाकडे वाढेल, अशी भावना ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केली.
चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. नंद-यशोदेची ही मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव–देवकीच्या कोठडीत पोहोचली आणि तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले असता ती त्याच्या हातातून निसटून विंध्यपर्वतावर जाऊन राहिली अशी पुराणकथा आहे
विंध्यवासिनी देवीचे हे मंदिर बहुधा यादवकालीन असून देवी पुरातन काळापासून शाक्तपंथीयांना पूजनिय असावी. परकीयांच्या आक्रमणात येथील मूळ रहिवासी असलेल्या बाराराव या कोळी जमातीने आपल्या कुलदेवतेचं रक्षण करण्यासाठी तिचं संपूर्ण मंदिर डोंगर तोडून व दगड मातीचा ढीग रचून त्यात गाडून टाकलं. कालांतराने छत्रपती संभाजीमहाराजांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्याकाळापासून आजापर्यंत देवीची नित्य पूजाअर्चा चालू आहे.
१९७६ साली देवीच्या स्थापनेचा ३०० वा वर्धापनदिन साजरा झाला. देवीची मूर्ती होयसाळ शैलीची असून ती ८०० ते १००० वर्षे जुनी असावी. त्याचप्रमाणे मूर्ती अष्टभूजा असून महिषासुरमर्दिनी या आक्रमक रूपांत उभी आहे. तिच्या आठही हातांत आयुधे असून तिने पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे. नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो. तिच्या गाभाऱ्यातील मयूर हे वाहन असलेल्या कार्तिकेयाची मूर्तीही अत्यंत देखणी आहे. या दोन्ही मूर्ती अतिशय सुंदर असून त्यावरील सुबकता, कोरीव काम व काळ्या पाषाणाची आजही टिकून असलेली तकाकी पाहून त्या कारागिरांच्या कामगिरीचे कौतुक वाटते.
साभार – FB (Chiplun Cha Balya)






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

 

गोव्याप्रमाणे आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरसुद्धा ‘बीच शॅक्स’ दिसणार

रत्नागिरी –आता गोव्यातील समुद्र किनाऱ्याप्रमाणे कोकणातील  समुद्रकिनाऱ्यांवर ‘बीच शॅक्स’ अर्थात चौपाटी कुटी दिसणार आहेत. पर्यटन वाढविण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ उभारण्यासंदर्भातील धोरणास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असलेल्या या कुट्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड येथील समुद्र किनाऱ्यांवर उभारल्या जातील.
सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल.
चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाचे पुढील नियम असतील 
  • या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरू ठेवता येईल. 
  • तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 
  • प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असेल.
  • एका चौपाटीवर कमाल १० कुट्या उभारता येतील.
  • यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील.
  • कालावधी – या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल.
  • आकार – त्यांचा आकार १५ फूट लांबी, १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल
  • बैठक –  गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल.
  • परवाना मूल्य – कुटी मिळणाऱ्या व्यक्तीला परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.
  • वार्षिक शुल्क – या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.
  • अनामत रक्कम – याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.

पर्यटनासाठी गोव्यात जात असाल तर ही बातमी वाचा; पणजीत एक महिन्यांचा लॉकडाऊन जाहीर..

गोवा वार्ता – एप्रिल महिन्यात गोवा राज्याला भेट देणार असाल तर तुमच्या साठी एक महत्त्वाची बातमी आहे. गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्याच्या रात्रीच विशेष मंत्रिमंडळ बैठकीत गोवा सरकारने एका महिन्याचा पणजी बंद लॉकडाऊन आज जाहीर केला आहे. त्याची कार्यवाही 1 एप्रिलच्या पहाटेपासून सुरू केली जाईल.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बेदरकारपणे चाललेल्या बांधकामांमुळे मेटाकुटीस आलेल्या राजधानीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा सरकारने हा लॉकडाऊन लावला आहे. 

शनिवारी सर्व वाहने पणजीमध्ये येण्यापासून रोखून ठेवली जातील. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना दुपारी एकपर्यंत मुभा राहील. केवळ अग्निशामक व रुग्णवाहिका यांना शहरात फिरण्यास अनुमती आहे.

एक वाजल्यानंतर मात्र लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरू होणार आहे. त्यात मच्छी व भाजी मार्केट बंद ठेवण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.

‘पोलिस खात्‍याच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना शहराचे शेरीफ म्हणून एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लॉकडाऊनची कडक कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ अशी माहिती एका अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

 

गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाची धास्ती….

सिंधुदुर्ग – गोवा ही देशाची पर्यटन राजधानी मानली जाते. परंतु गोव्याच्या पर्यटनाला आता एका नवीन चिंतेने ग्रासले आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन दृष्टीने पाहता गोवा राज्याची ही चिंता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनास नवा हुरूप देणारी ठरणार आहे. 

गोव्यातील समुद्रकिनारे आणि किनाऱ्यांवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. तथापि, गोव्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर महाराष्ट्रातील मालवणचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, अशी चिंता पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली. गोवा विधानसभा अधिवेशनात ते बोलत होते.

मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्यताील वॉटरस्पोर्ट्समध्ये दलालच बहुतांश वाटा घेऊन जातात आणि खुद्द वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटर्सना मात्र कमी पैसे मिळत आहेत. जर यावर नियमन असणारी यंत्रणा लवकरात लवकर आणली नाही तर हा प्रश्च चिघळेल. पर्यटन क्षेत्रासमोर गंभीर समस्या उभी राहिल. शेजारीच महाराष्ट्रातील मालवण येथे वॉटरस्पोर्ट्स आहेत. ते राज्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर मोठे आव्हान आहे, असे खंवटे म्हणाले.

हेही वाचा – मुंबई ते गोवा रेल्वेने प्रवास करताय? कोकण रेल्वे मार्गाव्यतिरिक्त रेल्वेचा ‘हा’ पर्याय सुद्धा जाणून घ्या…

पर्यटन मंत्री यांची चिंता रास्त आहे. गोवा राज्यात पर्यटन क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्र वेगळे आहे आणि समुद्र किनाऱ्यावर गर्दी कमी असते, तसेच गोव्यात जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्यातील जवळ जवळ सर्व प्रकार ईथे अनुभवता येत आहेत. त्यामुळे एक स्वस्त पर्याय म्हणुन पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनार्‍यांना प्राधान्य देताना दिसत आहे.

<h3>Related posts:</h3>

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन विकसित होत आहे कि नाही या प्रश्नाचे उत्तर काहीही असो, गोवा राज्याच्या पर्यटन उद्योगाने येथील पर्यटनाच्या विकासाची धास्ती घेतली हे नक्की. 

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

झाडी तोडून साफ करताच कोकणात पहिल्यांदाच सापडली अश्मयुगकालीन उभ्या दगडावरची कातळशिल्पे

सिंधुदुर्ग –  देवगड तालुक्यात साळशी येथे उभ्या दगडात कोरलेली दोन कातळशिल्पे (पेट्रोग्लिफ्स) आढळली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे अनेक ठिकाणी आढळतात. मात्र, उभ्या दगडात कोरलेली कातळचित्रे कोकणात प्रथमच सापडली असल्याचा दावा देवगड तालुका इतिहास संशोधन मंडळाने केला आहे.
झाडी तोडून साफ करताच उभ्या दगडावरची कातळशिल्पे सापडली. 
तालुक्यातील साळशी येथील नैसर्गिक ओहोळालगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात नुकताच सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्यात आला. तेव्हा या भागातील वाढलेली झाडी तोडून साफसफाई करण्यात आली. बंधाऱ्यालगतच सुमारे दहा-पंधरा फूट उंचीचा मोठा दगड आहे. या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली असल्याचे वाटल्याने साळशी येथील मुकुंद भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या योगेश धुपकर यांना याबाबत माहिती दिली. कोणता तरी शिलालेख सापडल्याचे कळताच तातडीने मंडळातर्फे साळशी मोहीम आखण्यात आली. या वेळी अभ्यासकांना दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली. या नैसर्गिक भव्य दगडावर एका बाजूस दगड तासून सपाट केला असून, त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत.
 गेल्या काही वर्षांत रत्नागिरीपासून कुडाळ, वेंगुर्लेपर्यंत दीड हजाराहून अधिक कातळचित्रे अनेक संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नांतून उजेडात आली. ही सर्वच कातळचित्रे जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे हे कोकणचे वैशिष्ट्य आहे; मात्र, साळशी येथे उभ्या दगडात कोरलेले कातळचित्र आढळले आहे. या कातळचित्रांचा शोध घेण्याच्या मोहिमेत पुरातत्त्व अभ्यासक रणजित हिर्लेकर यांच्याबरोबर योगेश धुपकर व अजित टाककर सहभागी झाले. 

चिपळूणच्या वस्तूसंग्रहालयात दाखल झाली शिवपूर्वकालिन पुरातन मूर्ती…

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे

काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.

 या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

आता कोकणातही बॅकवॉटर आणि हाऊसबोट चा अनुभव घेता येईल; कोकणातील तरुणाचे पर्यटन व्यवसायात एक पाऊल पुढे…

रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे  प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल. 
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात.  बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
बुकिंग साठी
>सत्यवान दरदेकर.
9881383228
9209705194

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search